Tuesday 10 July 2018

लागली समाधी ज्ञानेशाची....

१९७२ रोजीच्या केलेल्या वैज्ञानिक प्रयोगादवारे ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीमध्ये हे सापडले ..समाधी घेतलेल्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज शरीररूपाने समाधीत असायला हवेत, असा अभ्यासहीन तर्क करणा-या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी ते पहाण्यासाठी समाधीचे खोदकाम करण्याचे ठरवले. ‘खिस्ताब्द १९७२ साली अंधश्रद्धा-निर्मूलनाचे कार्य करणा-या कार्यकर्त्यांना आळंदी येथील ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीबाबत वाटले की ‘जर ज्ञानेश्वरांनी जिवंत समाधी घेतली असेल, तर आज ते शरीररूपाने खाली असतील का ? जिवंत असतील का ? नसल्यास त्यांची हाडे, हाडांचा सांगाडा तरी त्या ठिकाणी नक्कीच असला पाहिजे. त्या ठिकाणी आपण खोदकाम करून पहायला हवे.’ जिवंत समाधीबद्दल म्हणजे संजीवन समाधीबद्दल सविस्तर माहिती असणे गरजेचे आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन करणा-या कार्यकर्त्यानी जर अगोदर ‘संजीवन समाधी म्हणजे काय’ हे जाणून घेतले असते, तर त्यांना समाधी उकरून काढण्याची आवश्यकता भासली नसती. विज्ञान इतकं प्रगत झालेलं आहे की, वेगवेगळ्या मापकांच्या साहाय्याने ‘आत काय आहे, आहे कि नाही, नसल्यास का नाही आणि ‘आहे’ म्हणतात, तर ते नेमके काय आहे’, हे कळते. वाचकांना ते कळावे, म्हणून या ठिकाणी त्या वेळी घडलेल्या घटनांचा सविस्तर ऊहापोह करीत आहे.

संजीवन समाधी घेतल्यावर शरिरातील पंचमहाभूते ब्रह्मांडातील पंचतत्त्वांशी एकरूप होऊन विरून जात असल्याने त्या ठिकाणी फक्त चैतन्य, ऊर्जा किंवा स्पंदने शिल्लक रहात असतात. तसेच अशी समाधी घेणा-यांना पंचमहाभूतांतून हे सगळे पुन्हा घेऊन शरीर धारण करणे शक्य असते. ‘संजीवन समाधी म्हणजे काय’, हे पातंजलयोगशास्त्रात सांगितलेले आहे. जेव्हा एखादा साधू वा संत संजीवन समाधी घेतो, तेव्हा तो पातंजलयोगशास्त्राप्रमाणे पंचमहाभूतात्मक होतो. आपले शरीर पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश या पंचमहाभूतांपासून तयार झालेले आहे. जेव्हा तो साधू वा संत संजीवन समाधीत उतरतो, तेव्हा तो सजग असतो. आपल्या सगळ्यांना दिसणारी शरिराच्या अवयवांतील पंचतत्त्वे त्यास दिसत असतात.
समाधीत बसल्यावर व्यक्ती निर्विकल्प होते, निर्देही होते. याचा अर्थ त्याच्या शरिरातील पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश ही तत्वं बाहेरच्या ब्रह्मांडातील पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश यांत विरून जातात, एकरूप होऊन जातात. ज्यांचे जे घेऊन हे शरीर निर्माण झालेले असते, त्यांचे ते त्यांना परत देऊन साधू-संत निर्देही होतात. त्यामुळे समाधीच्या जागी काहीही शिल्लक रहात नाही. त्या ठिकाणी जर काही शिल्लक रहात असेल, तर ते चैतन्य, ऊर्जा, स्पंदने. याचे आणखी एक वैशिष्ट्य असे आहे की, या साधूसंतांना पंचमहाभूतांतून हे सगळे पुन्हा घेऊन आपले शरीर धारण करता येते. ज्या संतमहंतानी संजीवन समाधी घेतलेली आहे, त्या सगळ्यांना हे सर्व शक्य असते.
समाधीचे खोदकाम करून ‘आत काय आहे’, हे पहाण्यास येणा-या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना वैज्ञानिक दृष्टीने समाधीचे महत्त्व समजावून देऊन त्यांना समाधीची मोडतोड करण्यापासून परावृत्त करण्यास वैज्ञानिक असलेल्या डॉ. शुक्ल यांना म्हणजे मला वारक-यांच्या प्रमुखांनी सांगितले. ‘संजीवन समाधी’ या विषयाचा सखोल अभ्यास, सखोल ज्ञान या कार्यकर्त्यांना असते, तर संजीवन समाधी घेतलेल्या ज्ञानेश्वर महाराजांची समाधी खोदून ‘त्यातून हाडे मिळतात कि ज्ञानेश्वर महाराज जिवंत सापडतात’, हे पहाण्याचा उद्योग त्यांनी केला नसता. त्यांनी कुणा जाणकाराजवळ चौकशी करून माहिती करून घेण्याचा प्रयत्न केला नाही वा पातंजलयोगात काय आहे, हेदेखील पडताळून पहाण्याचेसुद्दा त्यांनी कष्ट घेतले नाहीत. (समजल्यावरसुद्धा घेतले असतील, याची खात्री देता येत नाही.)
रात्री ११.३० वाजता अचानक हरिभक्तपरायण व वारक-यांचे अर्ध्वर्यु असलेल्या मामा दांडेकरांचा मला फोन आला. पुण्याहून डॉ. फाटकांचाही फोन आला, ‘‘तू वैज्ञानिक आहेस, तेव्हा तुझी मदत आम्हाला हवी आहे.’’ प्रकार असा होता की, ट्रकमधून दोनअडीचशे माणसे पुण्याहून आळंदीला जाऊन ती ज्ञानेश्वरांची समाधी फोडून पहाणार होती. त्यांना मी वैज्ञानिक दृष्टीकोनातून पटवून द्यावयाचे होते की, संजीवन समाधी म्हणजे नेमके काय घडते आणि काय उरते. मी त्या दोघांना आश्वासन दिले, ‘‘मी माझ्या पद्धतीने त्यांना पटवून देण्याचा अवश्य प्रयत्न करीन.’’ मला खात्री होती की, मी त्यांना पटवून देऊन तोडफोड करण्यापासून परावृत्त करू शकेन, तेदेखील योग्य व चांगल्या प्रकारे. समाधीचे खोदकाम करण्यासाठी येतांना कार्यकर्त्यांनी ते फार आधुनिक असल्याचे दाखवून देण्यासाठी सोबत काही डॉक्टर्स व परदेशातील तीन व्यक्तींना बरोबर आणण्यात येणार होते.

सकाळी लवकर ठराविक माणसे बरोबर घेऊन आम्ही आळंदीला पोहोचलो. इतरांना कुणाला याची काहीच कल्पना येऊ दिली नव्हती.
मी सोबत तीन मीटर्स घेतले होते. त्यातला एक होता ‘गायगर-म्यूलर स्किंटीलेशन काऊंटर’. एक्सरे, अल्फा, गॅमा, बिटा इत्यादी नावांची जी किरणं किंवा ऊर्जा असते, ते एखाद्या ठिकाणी आहेत कि नाहीत ते त्या मीटरवर दाखवले जाते. तो ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीपासून सहा फूट अंतरावर ठेवला. दुस-या मीटरला ‘थर्मिस्टर बोलोमीटर’ म्हणतात.
त्याने अल्ट्राव्हायोलेट, इन्फ्रारेड किरणं आहेत कि नाही, हे पहाता येते. तोही मीटर समाधीजवळ ठेवला.
तिसरा होता ‘फ्रिक्वेन्सी मीटर रडार’. (रेडिओ, दूरदर्शन यांच्याकरिता हे वापरले जाते.) हा मीटरही त्याठिकाणी ठेवला.
ठरल्याप्रमाणे ट्रक भरून दोन-अडीचशे माणसे आळंदी देवस्थानाजवळ घोषणा करीत आली. सगळी आळंदी ‘हा काय प्रकार आहे’, हे पहाण्यासाठी जमा झाली. अंधश्रद्धा-निर्मूलनाच्या कार्यकर्त्यांबरोबर काही डॉक्टर्स व बाहेरच्या देशातील तीन इंग्लिश माणसे आली होती. त्यामागचे कारण आम्हाला नंतर कळले. ते असे, ‘आम्ही फार आधुनिक आहोत. आम्ही काय करतो, हे प्रत्यक्षच पहा’, हे त्यांना दाखवून द्यायचे होते.

समाधीच्या ठिकाणी तीन वेगवेगळी मीटर्स (गायगर-म्यूलर स्किंटीलेशन काऊंटर’, थर्मिस्टर बोलोमीटर व फ्रिक्वेन्सी मीटर रडार) लावून नंतर समाधीवर तीन वेगवेगळ्या धातूंची आवरणे घालून पाहिल्यावर प्रत्येक आवरणाच्या वेळी मीटरच्या रीडिंगमध्ये फरक आढळतो व आवरण काढल्यावर ठरावीकच (समाधीच्या आतील स्पंदनांचे) रीडिंग आढळते.

आम्ही अंधश्रद्धा-निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांच्या जमावाला दाराजवळ थोपवले आणि शांतपणे त्यांना सांगितले, ‘‘तुम्हाला जे करावयाचे आहे, ते अवश्य करा. आम्ही तुम्हाला अडवणार तर नाहीच, उलट कुदळ फावडे घेऊन तुम्हाला तुमच्या कामात मदत करणार आहोत.’’ त्यांच्यातील डॉक्टरांकडे मी, मामा दांडेकर व डॉ. फाटक गेलो आणि त्यांना विनंती करून सांगितले, ‘‘या समाधीबद्दल आम्ही सांगतो त्या पद्धतीने अगोदर प्रयोग करून पहा. समाधीवर झाकण्यासाठी मी जस्ताचे, पितळेचे व लोखंडाचे अशी तीन प्रकारची वेष्टणे आणली आहेत. आम्ही या ठिकाणी तीन मीटर्स ठेवलेली आहेत. लोखंड, पितळ आणि जस्त यांचे वेष्टण एकेक करून समाधीवर ठेवून प्रत्येक मीटरवर काय दिसते, ते पहावयाचे आहे. तुम्ही पहाल, त्या वेळी आम्ही येथे थांबणार नाही. बाहेर थांबू. त्यांच्यातील दहाबारा प्रमुख मंडळी पुढे आली. त्यांना आम्ही गाभा-यात नेले आणि त्यांना माहिती देऊन आम्ही गाभा-या बाहेर निघून गेलो. आमच्यापैकी कोणीही तेथे थांबले नाही. त्यांनी आम्ही सांगितल्याप्रमाणे प्रयोग करून पाहिला.

लोखंड, पितळ आणि जस्त यांचे वेष्टण एकेक करून समाधीवर टाकले की, जो काटा काही प्रमाणात वर यायचा, तोच वेष्टण काढल्यावर एकच ठराविक रीडींग दाखवायचा. आम्ही तर आत नव्हतो. आम्ही काटा हलवण्याचा प्रश्नच येत नव्हता. त्यांच्यापैकी कुणी मीटरला हातदेखील लावत नव्हते. मग काटा रीडींग का दाखवत होता ? आतील रीडिंग दाखविणारे चैतन्य, स्फुरण, स्पंदने कोठून आली ? आवरण घातल्यावर रीडिंग बंद का होते ? वेष्टण काढल्यावर रीडिंग का दाखवते? त्यांना तीनही प्रकारची वेष्टणे घालून पहावयाला सांगितले होते. त्या प्रत्येक वेष्टणाच्या वेळी रीडिंगमध्ये वेगवेगळा फरक का येत होता ? यात कसलीही हातचलाखी नव्हती अथवा जादूटोणा नव्हता हे त्यांच्या लक्षात आले. ज्याप्रमाणे क्ष किरण दिसत नसले, तरी त्यांच्यामुळे शरिराच्या आतील भागातील छायाचित्र (फोटो) काढता येत असल्याने त्यांचे अस्तित्व कळते, तसे संजीवन समाधीतील चैतन्य, ऊर्जा व स्पंदने दिसत नसली, तरी त्यांचे अस्तित्व वैज्ञानिक प्रयोगाद्वारे सिद्ध होते. शास्त्रज्ञांच्या शास्त्रीय परिभाषेतील हे प्रयोग त्यांना करून दाखवल्यावर आणि ‘संजीवन समाधी म्हणजे काय’ हे जेव्हा त्यांना समजावून सांगितले, तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, या ठिकाणी निश्चितपणे चैतन्य आहे, ऊर्जा आहे, स्पंदने आहेत. म्हणूनच त्यांचा आलेख मीटर्सवर जाणवतो. वेगवेगळ्या धातूंची वेष्टणे घातल्यावर त्या चैैतन्यलहरींना अडथळा निर्माण होतो आणि त्यामुळे प्रत्येक आवरणाच्या गुणधर्मानुसार निरनिराळ्या प्रकारची रिडींग्ज् मीटरवर दिसतात. शास्त्रीय उपकरणांच्या साहाय्याने त्यांच्या लक्षात आले की, चैतन्य दिसत नसले, तरी त्याचे अस्तित्व असते. अल्फा, गामा, बीटा, रडार, क्ष किरण इत्यादी दिसत नसले, तरी त्यांंचे अस्तित्व आपण नाकारत नाही. त्यांच्यामुळे होणारे परिणाम आपण दृश्य स्वरूपात पहातो. क्ष किरणांमुळे शरिराच्या आतील फोटो काढला जातो, हे दृश्य झाले. पण मग क्ष किरण दिसले नाही; म्हणून त्यास नाकारावे याला अर्थच नाही. वैज्ञानिक दृष्टीकोनाने सर्व संभ्रम दूर झाल्यानंतर ही सगळी मंडळी दर सहा महिन्यांनी न चुकता समाधीच्या दर्शनासाठी आळंदीस येऊ लागली. तीन परदेशी माणसांपैकी एकाने तर स्वतला आळंदीला वाहून घेतले आहे. ही खिस्ताब्द १९७२ सालातील घटना आहे.
‘जेव्हा विज्ञानाचा उपयोग काय’, असा प्रश्न विचारला जातो, तेव्हा ‘विज्ञानाचा सदुपयोग असाही होऊ शकतो’, हे छातीठोकपणे सांगता येते. सर्वसामान्य माणसाला सहजपणे आणि सुलभपणे पटवून देण्यासाठी हा एक सोपा आणि सरळ मार्ग आहे. आळंदीप्रमाणे पंढरपूर, गाणगापूर आणि देहू हीसुद्दा चैतन्यमय अन् जागृत ठिकाणे आहेत.’

No comments:

Post a Comment

आपलं ठेवायचं झाकून......!

"एकचालुकानुवर्तीत पक्ष आणि सत्ताधारी असं रूप 'लोकशाहीची जननी' म्हणवणाऱ्या देशात आकाराला येतंय. सामूहिक नेतृत्वाची प...