Tuesday 10 July 2018

राजसंन्यासी...गडकरी!

विमानातुन प्रवास करणाऱ्या त्या दोन सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणांना संभाजीराजे यांची तथाकथित ब्राह्मणी इतिहासकारांनी पसरविली अपकीर्तिच ज्ञात होती. त्यांच्या या लेखनानं शंभूराजे यांची  डागाळली गेलेली प्रतिमा. तीच प्रतिमा समाजापुढे नेहमी राहिल्यानं तरुणांना तेच खरं वाटत होत. दादोजी कोंडदेव, राम गणेश गडकरी त्यांच्या नाटकातील विकृत चित्रण, रायगडावरील कुत्र्याचं स्मारक याबाबत प्रसिद्धीमाध्यमातून उठलेलं वादळ याची त्यांना माहिती होती साहजिकच चर्चेचा सूर तिकडे वळाला..

*'राजसंन्यासा'ची चर्चा*
चर्चेच्या ओघात त्यांनी राजसंन्यास नाटक आणि राम गणेश गडकरी यांच्याबद्धल काही प्रश्न विचारले. पुण्यातील संभाजी उद्यानातील राम गणेश गडकरी यांचा पुतळा का हटवला गेला? रायगडावरील कुत्र्याची समाधी का तोडली गेली? प्रसिद्धीमाध्यमाच्या उलटसुलट बातम्या याचा संदर्भ त्यांनी दिला. यावरून त्यांना या घटना माहीत होत्या पण त्या मागचा इतिहास काय हे माहीत नव्हतं. ही झालेली संभाजीराजांची बदनामी हे ज्या मराठी नाटकात केली गेली ती म्हणजे गडकरीचं नाटक 'राजसंन्यास' हे होय!

*'राजसंन्यासा'त शंभूराजांची बदनामी*
राम गणेश गडकरी यांनी 'राजसंन्यास' नाटकात संभाजीराजे यांची यथेच्छ बदनामी केली. त्यांनी आपल्या ३२वर्षाच्या आयुष्यात एकच प्याला, पुण्यप्रभाव, प्रेमसंन्यास, भावबंधन, राजसंन्यास, वेड्यांचा बाजार अशी पाचेक नाटकं लिहिली. विविध प्रकारचं लेखन याशिवाय गोविंदाग्रज या नावानं काव्य लेखन तर बालकराम नावानं विनोदी लेखन केलंय. त्यांचं लेखन सामर्थ्य जबरदस्त होत. वाचकाला ते वाचनात खिळवून ठेवायचे. याच त्यांच्या लेखनशैलीतून त्यांनी 'राजसंन्यास' हे नाटक लिहीलंय. हे त्यांचं पांच अंकी नाटक, पण ते पूर्णरित्या लिहिलेलं नाही. या पांच अंकी नाटकाचे पहिल्या अंकाचे दोन प्रवेश पूर्ण, तिसरा प्रवेश अर्धवट, दुसरा अंक लिहिलेला नाही, तिसऱ्या अंकातल्या पहिल्या प्रवेशाचे एकच गाणे लिहिलेलं आहे, चौथा अंक नाही मात्र पांचव्या अंकातले पाचही प्रवेश लिहिलेलं आहे. १९१७ मध्ये हे नाटक अपूर्ण सोडून त्यांनी भावबंधन लिहायला घेतलं. त्यावेळी ते क्षयरोगानं आजारी होते. पण तशाही अवस्थेत त्यांनी भावबंधन नाटक लिहून पूर्ण केलं. त्यानंतर त्यांचं निधन झालं. गडकरींच्या निधनानंतर १९२०मध्ये हे नाटक रंगभूमीवर आलं. त्यानंतर १९२२ मध्ये अपूर्ण राजसंन्यास नाटक पुस्तक रूपाने प्रसिद्ध झालं.

*ब्राह्मणी इतिहासकारांचा कट*
खरं तर हे असं अपूर्ण राहिलेलं राजसंन्यास हे नाटक पुस्तकरूपाने प्रसिद्ध करण्याचं काही कारण नव्हतं. पण या नाटकाच्या माध्यमातून संभाजीराजांची यथेच्छ बदनामी करण्यात आली असल्यानेच त्यांच्या मृत्यूनंतर ते प्रसिद्ध केलं गेलं! या नाटकाची सुरुवातच सौंदर्याच्या मोहनबाधेने धुंद झालेल्या तुळसेला संभाजीराजे रायगडावर आणतात. या प्रसंगाने झालीय. संभाजीराजांचा रंगेलपणा, त्यामुळे शिवाजीमहाराजांशी झालेला मनभेद आणि शिवरायांच्या पश्चात या साऱ्यांबद्धल झालेली उपरती, या विषयावर बेतलेले हे नाटक आहे! हे नाटक गडकऱ्यांनी पूर्ण लिहिलेलं असावं, परंतु संभाजीराजांच्या केलेल्या बदनामीमुळे काही आक्रीत घडलंच तर जो काही प्रश्न होईल त्या भीतीनं पुस्तक प्रकाशित करणाऱ्यानं ते संपूर्णपणे छापलं नसावं, अशी शंका घेण्यास भरपूर वाव आहे. खरं तर गडकरी नाटकाचा शेवट आधी लिहीत असं म्हटलं जातं असे. हे जर खरं असेल तर लेखन पूर्ण झाल्याशिवाय कुणी पुस्तकाची अर्पणपत्रिका लिहीत नाही. 'राजसंन्यास' पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीत अर्पण पत्रिका आहे आहे पुढच्या काही आवृत्तीत नाटकाच्या प्रयोगाची छायाचित्रेही आहेत. प्रसिद्ध झालेल्या पुस्तकात जे आहे ते अत्यंत संतापकारक आहे. संभाजीराजांची बदनामी करण्यासाठी काही ब्राह्मणी इतिहासकारांनी रचलेला कट होता हे इतिहासाचार्य बा.सी.बेंद्रे आणि डॉ.कमल गोखले यांनी पुराव्यासह सिद्ध केलं आहे. यावरून गडकरी हे संभाजीराजे यांची बदनामी करणाऱ्यांच्या गटात सामील झाले होते, वा त्यांना त्यासाठी वापरण्यात आलं होतं. याची साक्षच राजसंन्यास नाटकातून मिळते.

*शिवाजीराजांचीही टवाळी*
या नाटकात शिवाजी महाराजांना कमी लेखण्याचा त्यांचं उपमर्द करण्याचाही प्रयत्न झालाय. त्यासाठी गडकऱ्यांनी देहू दप्तरी आणि कारकून जिवाजीपंत कलमदाने या पात्राची रचना केलीय. देहू शिवरायभक्त आहे तर शिवरायांची टवाळी, बदनामी करणारा जिवाजीपंत आहे.गडकऱ्यांनी नाटकाच्या अखेरच्या भागात संभाजीराजांच्याच तोंडून 'संभाजी हा म्हणजे हा केवळ छाकटा रंडीबाज!' हे वाक्य वदवून घेतलंय.

*टिंगल, टवाळी, अवहेलना*
गडकऱ्यांनी या नाटकात "हा संभाजी छत्रपती या किताबतीला नालायक आहे. छत्रपतींनी बांधलेल्या राष्ट्रतीर्थाची-श्रीगंगासागराची व्यभिचाराने मोरी केली. वैराग्याच्या वेगाने फडफडणाऱ्या भगव्या झेंड्याला दारुबाजाचे तोंड पुसण्याचा रुमाल केला. महालक्ष्मीच्या वैभवाचा जरीपटका फाडून त्याची रांडेची काचोळी केली." यासारखी वाक्ये संभाजीराजांच्या तोंडी घालून त्यांनी न केलेल्या अपराधाची कबुलीही द्यायला लावलीय. या नाटकातील कारकून जिवाजीपंत कलमदाने आपल्या अंगभूत कारस्थानी प्रवृत्ती दाखवताना म्हणतो, "वारुळातील दोन जिभांची पिवळी नागीण चावली तर एकाच पिढीचा घात होतो. परंतु, कारकुनी कानावरची दोन जिभांची काळी नागीण- म्हणजे लिहिण्यासाठी त्याकाळी वापरली जाणारी लेखणी...टाक डसली, तर ती सात पिढ्याचा सत्यानाश करते!" अशाच लेखणीच्या माध्यमातून गडकऱ्यांनी संभाजीराजांची यथेच्छ टिंगल टवाळी अवहेलना केलीय. त्यांना रंडीबाज, दारुबाज, स्वराज्यद्रोही ठरवलंय.

*दादोजींचा पुतळा हलविला*
नव्या दमाच्या बहुजन समाजातील तरुण इतिहासाचे अभ्यासक या साऱ्या कपोलकल्पित इतिहासाची चिकित्सा करू लागले तेव्हा या प्राकृत इतिहासातील खोटेपणा प्रकर्षाने जाणवू लागला. या इतिहासाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू लागला त्याची सुरुवात २००४ साली शिवाजी महाराज आणि जिजाऊ यांच्या चरित्र्याची विटंबना करणाऱ्या जेम्स लेनच्या वादग्रस्त पुस्तकापासून प्रारंभ झाला. त्यानंतर पुणे महापालिकेनं उभारलेल्या दादोजी कोंडदेव पुतळ्याचे प्रकरण उदभवले. दरम्यान राज्यसरकार खेळातील प्रशिक्षकाला दिला जाणारा 'दादोजी कोंडदेव पुरस्कार' रद्द केला. दादोजी हे शिवाजी राजांचे गुरू नाहीत तर ते नोकर होते असा अहवाल इतिहासकारांनी त्यावेळी दिला. त्यामुळे सरकारनं तो निर्णय घेतला. या वातावरणात लालमहालात उभारलेले शिवराय, जिजाऊ यांच्या समूह शिल्पात दादोजींना घुसविण्यात आलं होतं ते खटकू लागलं. त्या समूहशिल्पातील दादोजींचा पुतळा हलवावा अशी मागणी पुढे आली. महापालिकेत चर्चा झाली झाली अन दादोजींचा पुतळा हलविला.

*गडकऱ्यांचा पुतळा हटवला*
त्यानंतर रायगडावरील कुत्र्याच्या स्मारकाचा प्रश्न निर्माण झाला . हे कुत्र्याचं काल्पनिक पात्र याच नाटकात गडकऱ्यांनी रंगवलं आहे. राम गणेश गडकरी यांनी ज्या राजसंन्यास नाटकातून संभाजीराजे यांची बदनामी केली त्या गडकऱ्यांचा पुतळा लक्ष्य ठरला. हा गडकरींचा पुतळा ज्या ठिकाणी बसविला गेला होता ते ठिकाण होतं संभाजी उद्यान! वास्तविक ज्या संभाजीराजांची बदनामी गडकऱ्यांनी केली त्यांचाच पुतळा संभाजीराजांच्या स्मारकात बसविला. हा केवळ खोडसाळपणाच! त्यामुळेच शंभुभक्तांनी हा संभाजी राजाचं नाव असलेल्या स्मारक-उद्यानात त्यांचीच बदनामी करणाऱ्याचा पुतळा हटवला....
!

No comments:

Post a Comment

आपलं ठेवायचं झाकून......!

"एकचालुकानुवर्तीत पक्ष आणि सत्ताधारी असं रूप 'लोकशाहीची जननी' म्हणवणाऱ्या देशात आकाराला येतंय. सामूहिक नेतृत्वाची प...