Tuesday 10 July 2018

उद्धवजी, जरा जपून...!

उद्धवजी,
जय महाराष्ट्र
सावध व्हा! इलेक्शन जवळ येऊ लागले आहे. तुम्हाला चुचकारण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. युतीसाठी जाहीररित्या प्रस्ताव दिला गेला आहे. तुम्ही सहजासहजी प्रतिसाद देणार नाही, याची त्यांना कल्पना आहे. तुम्हाला हिंदुत्वाची आन दिली जाईल. इमोशनल ब्लॅकमेल केले जाईल. माननीय बाळासाहेबांचा वास्ता दिला जाईल. अगदी म्हटले तर बेमालूमपणे नकला केल्या जातील,  नेते वेगवेगळ्या भूमिकांमधून तुमच्या समोर अवतरतील. तीन- साडेतीन वर्षे अवहेलना करणारे हेच नेते तुमच्यासाठी पायघड्या पसरतील. मातोश्रीच्या पायऱ्या झिझवतील. पण तुम्ही स्वबळावर ठाम राहा. आपल्या निर्णयापणासून तसूभरही विचलित होऊ नका...

उद्धवजी, साडेतीन वर्षांपूर्वीचे विधानसभा निवडणुकीपूर्वीचे दिवस आठवा. तुम्हाला युतीच्या चर्चेत मश्गुल ठेऊन तुमच्या मित्र पक्षाने आतून स्वबळाची तयारी पूर्ण केली होती. तुम्ही भाबडेपणावर गेलात. २५ वर्षाची युती तुटणार नाही, अखेरच्या क्षणी चर्चेतून मार्ग निघेल, असा तुम्हाला विश्वास होता. पण दगाफटका झाला. तुमचा विश्वास पायदळी तुडवत त्यांनी स्वबळावर इलेक्शन लढवले. जिंकण्यासाठी साम, दंड, भेद सर्व तत्त्वे वापरली. मोठ्या साहेबांची करंगळी धरून महाराष्ट्रात राजकारण करणारा, त्यांच्या नजरेने उठबस करणारा तुमचा मित्रपक्ष त्यांच्या पश्चात मात्र कसा शिरजोर झाला, त्याने तुमच्याशी कसे दोन हात केले. याचा अनुभव गेल्या निवडणुकीत तुम्ही घेतला आहेच. त्यामुळे पुन्हा अपेक्षाभंगाने मन पोळून घेऊ नका. प्रतारणेच्या वेदना तुम्ही अनुभवल्या आहेत, त्या पुन्हा नकोत...

उद्धवजी, सत्तेत राहून साडेतीन वर्षे झालेला अपमान शिवसैनिकांनी विषाच्या घोटाप्रमाणे प्यायला आहे. तुम्ही जानेवारी महिन्यात कार्यकारिणीच्या बैठकीत स्वबळाची घोषणा केली अन शिवसैनिकांच्या मनावरील औदासीन्याचे मळभ दूर झाले. त्यांच्यात नवा उत्साह संचारला. शिवसैनिकांच्या धमण्यांमध्ये विचाऱ्यांच्या ठिणग्या बाळासाहेबांनी पेरल्या आहेत. त्यावर फक्त फुंकर घालण्याची आवश्यकता आहे, त्याचे ज्वालांमध्ये रूपांतर व्हायला वेळ लागत  नाही. याचा अनुभव या देशाने अनेकदा घेतला आहे. तुम्हीही जाणता, शिवसैनिक हेच शिवसेनेचे खरे वैभव आहे, तीच संपत्ती आहे. तेच शस्त्र आणि अस्त्रही! शिवछत्रपतींनी आपल्या मावळ्यांच्या विश्वासावर मोघल, निजामशाही, आदिलशाही आणि कुतुबशाही सारख्या बलाढ्य साम्राज्यात स्वतःचे अस्तीत्व उभा केले होते, स्वराज्य निर्माण केले होते. शिवसैनिकांच्या रूपाने तीच ताकद तुमच्याकडे आहे. तुम्हीही स्वबळावर कर्तृत्व उभारावे.सुराज्य आणावे...

उध्दवजी, गेली साडेतीन वर्षे आत्ममश्गुल होऊन सत्ता उपभोगताना त्यांना शिवसेना आठवली नाही. पण पुन्हा सत्तेची शिडी चढण्यासाठी त्यांना शिवसेनेची गरज भासणार आहे. शिवसैनिकांची कुमक लागणार आहे. त्यासाठी त्यांच्या विनवण्या सुरू होतील. खलिते येतील. शिष्टमंडळे गठीत होतील. त्यांना मराठी माणसांच्या भाबडा स्वभाव ज्ञात आहे. त्याच्या मनाच्या निर्मळपणाचा त्यांनी अनेकदा अनुभव घेतला आहे. मराठी माणसात दुराग्रह, हट्टी, चीडचीड हे दुर्गुण आहेत, पण कपटीपणा नाही. तो कारस्थानी नाही. पोटात तेच ओठावर हे त्याचे स्वभाव वैशिष्ट्य आहे. शत्रू संकटात असला तरीही सर्वकाही विसरून त्याला मदतीचा हात देण्याचा त्याच्यात उपजत गुण आहे. याचाच फायदा घेत ते मदतीसाठी हात पुढे करतील आणि त्याच हाताने पाठीत खंजीर खुपसतील. तुम्ही सावध व्हा! तुमच्या मित्र पक्षांकडून युतीसाठी आलेला प्रस्ताव हा रणनीतीचा भाग असू शकतो, तुम्हाला बेसावध ठेवण्याचा! सद्यस्थितीत त्यांना तुम्हीच मुख्य शत्रू वाटता, त्यामुळे तुम्हाला चर्चेत मश्गुल ठेऊन ते आपले इप्सित साध्य करून घेतील. तुम्ही गाफील राहू नका. साथ द्यायची तर उघडपणे आणि लाथ घालायची तर तीही उघडपणे हा मराठी बाणा त्यांना दाखवून द्या...

No comments:

Post a Comment

आपलं ठेवायचं झाकून......!

"एकचालुकानुवर्तीत पक्ष आणि सत्ताधारी असं रूप 'लोकशाहीची जननी' म्हणवणाऱ्या देशात आकाराला येतंय. सामूहिक नेतृत्वाची प...