Thursday, 29 January 2026

महाराष्ट्राचा दादा माणूस...!

"फारसा थेट संबंध आलेला नसतानाही काही व्यक्तींच्या अकाली जाण्याने मनाला चटका लागतो....मन व्यथित होतं... अस्वस्थ होतं ! नकळत डोळ्यात पाणी तरळतं !! दादांचं असं जाणं खरोखरच भावनाविवश करणारं आहे. थेट भूमिका, रोखठोक बोलणं, शिस्तीचा आग्रह, परखड मतं, धाडसी निर्णय घेण्याची क्षमता असणारा नेता हरपला हे अतिशय दुःखदायक आहे. खरंतर असे नेते तयार होण्यासाठी खूप काळ जावा लागतो. पण असा तयार झालेला नेता काळाने अशा पद्धतीने न्यायला नको होता......! महाराष्ट्राची 'दादा'गिरी आज हरपलीय...!"
..............................................
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुःखद निधन झाले आहे. मुंबईहून विमानाने उड्डाण केल्यानंतर एक तासाने सकाळी ९ वाजता ही घटना घडली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वीच्या सभांना संबोधित करण्यासाठी अजित पवार बारामतीला जात होते. 
अजित अनंतराव पवार हे महाराष्ट्र राज्यातले एक महत्वाचे राजकारणी होते. त्यांचा जन्म २२ जुलै १९५९ रोजी नगर जिल्ह्यातल्या देवळाली प्रवरा इथं त्यांच्या आजोळी झाला. त्यांचं बालपण बारामतीला गेलं. त्यांनी आपलं प्राथमिक शिक्षण देवळाली, प्रवरा, नगर इथं पूर्ण केलं. ते पुणे जिल्ह्यातल्या बारामती तालुक्यातल्या काटेवाडी या गावाचे होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते पुतणे होते. अजितदादा पवार हे शरद पवारसाहेब यांचे मोठे बंधू अनंतराव पवार यांचे पुत्र होते. अनंतरावांनी प्रारंभीच्या काळात प्रख्यात चित्रपट निर्माते, व्ही. शांताराम यांच्या मुंबईतल्या राजकमल स्टुडिओसाठी काम केलं होतं. अजितदादा पवार यांचे आजोबा गोविंदराव पवार हे बारामती सहकारी सोसायटीत नोकरी करत होते आणि त्यांच्या आजी शारदाबाई पवार ह्या कौटुंबिक शेतीची देखभाल करत होत्या. त्याचबरोबर त्या शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्याही होत्या. त्यामुळं त्यांच्यावर पुरोगामी विचारांचे संस्कार झालेले होते. अजितदादांचे महाराष्ट्रातले माजी मंत्री पदमसिंह पाटील यांच्या भगिनी सुनेत्रा निंबाळकर पाटील यांच्याशी विवाह झाला होता. त्यांना पार्थ आणि जय अशी दोन मुलं आहेत. अजितदादांनी पहिल्यांदा १९८२ साली जेव्हा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर निवड झाली तेव्हापासून अजितदादांच्या सक्रिय राजकारणाला प्रारंभ झाला. १९९१ मध्ये ते पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले, तेव्हापासून जिल्ह्याच्या राजकारणात वावरू लागले होते. तब्बल १६ वर्षे ते या पदावर कार्यरत राहिले. जिल्हा बँकेच्या माध्यमातून त्यांनी अनेक विकास कामे केली. या काळात ते बारामतीतून लोकसभेचे खासदार म्हणूनही निवडले गेले. पण दिल्लीतलं राजकारण त्यांना भावलं नाही. मग त्यांनी देशाचे संरक्षणमंत्री बनलेले आपले काका शरद पवार यांच्यासाठी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी राज्यस्तरावरच राजकारण करायचं असा निर्धार केला आणि राज्य हेच आपलं कार्यक्षेत्र म्हणून निवडलं. सन १९९५, १९९९, २००४, २००९, २०१४, २०१९ आणि २०२४ मध्ये बारामतीतून विधानसभेचे सदस्य म्हणून सतत निवडून आले. २०१९ आणि २०२४ मध्ये त्यांनी भाजपसह सर्व विरोधी उमेदवारांची अनामत रक्कम जप्त करून निवडून आले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख होते. त्यांनी २०१० ते २०१४, २०१९ ते २०२१ आणि २०२२ ते आज असे पाच वेळा  उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहीलंय. अजित पवार हे एका राजकीय प्रतिथयश कुटुंबाचे सदस्य होते. शरद पवार यांच्यासारख्या राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून ते आले होते. अजित पवार यांनी बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयातून कॉमर्स पदवी संपादन केली होतेी. त्यानंतर त्यांनी पुणे विद्यापीठातून व्यवसाय प्रशासन या विषयातून पदव्युत्तर शिक्षण घेतलं. त्यांनी राज्य सरकारतल्या अनेक विभागांमध्ये विविध पदांवर काम केलेलं आहे. जलसंपदा मंत्री आणि ऊर्जा मंत्री म्हणून काम करण्याचा त्यांच्याकडे दांडगा अनुभव होता. पवार त्यांच्याकडं असलेल्या प्रशासकीय कौशल्यासाठी प्रसिद्ध होते. त्यांचा प्रशासनावर जबरदस्त पकड होती. राज्यातले वेगवेगळे सिंचन प्रकल्प यशस्वीपणे राबविण्याचं श्रेय त्यांना जातं. पण जलसंपदामंत्री असताना सिंचन प्रकल्पांमध्ये भ्रष्टाचार केल्याचे आरोप करण्यात आले होते. कामामध्ये अनियमिततेच्या आरोपांसह अन्य वादांमध्येही ते अडकले होते. पुढे महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं त्यांना या आरोपांतून मुक्त केलं. अजित पवार हे त्यांच्याकडं असणारी हुशारी आणि राजकीय कुशाग्र बुद्धीसाठी लोकप्रिय होते. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला सर्वांचा पाठिंबा मिळवून देण्याची त्यांच्याकडं क्षमता होती. वादग्रस्त विधानांमुळं ते नेहमी चर्चेत होते. भ्रष्टाचाराचे आरोप आणि अन्य बेकायदेशीर कामांमध्ये असलेल्या कथित सहभागावरुन त्यांच्यावर टिका होत होती. असं असूनही ते महाराष्ट्राच्या राजकारणातले एक महत्त्वपूर्ण लक्षवेधी नेते होते. राज्यामध्ये त्यांचे खूप समर्थक होते. त्यांच्याकडं एक सक्षम नेतृत्व होते. त्या बळावरच ते मुख्यमंत्री होण्याची क्षमता राखून होते.
लोकशाही आघाडी असो, महाविकास आघाडी असो की महायुती. सरकार मध्ये काम करतांना राज्याचा आणि पर्यायाने देशाचा विकास विचार सर्वप्रथम. जे जमण्यासारखे असेल ते केल्याशिवाय राहणार नाही आणि जे जमणार नसेल तर लोंबकळत ठेवणार नाही, हा दादांच्या कार्यपद्धतीचा खाक्या. गुळगुळीत आणि मुळमुळीत राजकारण दादांना कधी जमलेच नाही. माणुसकी, प्रामाणिकपणा याचे ओतप्रोत दर्शन दादा आपल्या कार्यपद्धती मधून घडवितात. दादांचा करारी बाणा असला तरी मनाच्या एका कोपऱ्यात हळवेपणा सुद्धा निश्चित दिसून येतो. अजितदादा पुण्याचे अनेकवर्षे पालकमंत्री असल्यानं त्यांच्या माझ्या अनेक भेटी पत्रकार परिषदेच्या निमित्तानं झाल्या होत्या पण फारशी जवळीक निर्माण झाली नाही. मात्र प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रबोधन पक्षिकाच्या शताब्दी महोत्सवाच्या निमित्तानं अजित पवारांची भेट झाली तेव्हा त्यांनी माझ्याकडून प्रबोधनकारांसंबधी माहिती जाणून घेतली होती. त्यानंतर प्रबोधनकारांची काही पुस्तकं देखील मागून घेतली. प्रबोधन पक्षिकाच्या शताब्दी समारंभाला ते आवर्जून उपस्थित राहिले. त्यावेळी त्यांच्या स्वभावातला वेगळा गुण लक्षांत आला. त्यांनी माझा त्या समारंभात सत्कारही केला. अजित पवार हे शरद पवार, यशवंतराव चव्हाणांच्या राजकारणाच्या तालमीत तयार झालेले, त्या विद्यापीठाचे राजकारणी. सत्ता मिळवायची. टिकवायची. त्यासाठी सगळे अपराध मान्य. मात्र, ही सत्ता लोकांसाठी आहे, हे कधी विसरायचं नाही.  संसदीय राजकारणाची शिस्त समजणारे होते. उभा-आडवा महाराष्ट्र त्यांना माहीत होता. प्रशासनातले अधिकारी त्यांना घाबरत, कारण त्यातली ओळ ना ओळ त्यांना ठाऊक असे. अजित पवारांनी कधीही जातीचं, धर्माचं राजकारण केलं नाही. लोकांची कामं करा आणि निवडून या, हा त्यांचा खाक्या होता.  अर्ध्या रात्रीही अजित पवार लोकांसाठी उभे असायचे. ते सतत काम करत असायचे. त्यामुळेच लोकांचे ते प्रचंड लाडके होते. लोकांसोबत दादा मस्त रमत. खुमासदार विनोद करत. त्यांची कामे करत. त्यांना खडसावत. त्यांच्या राजकारणाची एक स्वतंत्र शैली होती. काकांचेच बोट धरून ते राजकारणात आले, पण त्यानंतर त्यांनी अहोरात्र काबाडकष्ट करून, अभ्यास करून, लोकांमध्ये जाऊन, स्वतःचे लोक मिळवून आपली स्वतःची ओळख स्वतःच्या कर्तबगारीने तयार केली. अजित पवारांचा दरारा होता. पण, ती दहशत नव्हती. लोकांनाही त्यांची दादागिरी आवडे. कारण, त्याच्या मुळाशी एक प्रेमळ माणूस होता. त्यांनी कायम त्यांच्या मनाचं ऐकलं. फार व्यूहरचना अथवा असे काही करत न बसता, जे वाटलं ते केलं. कार्यकर्त्यांवर त्यांचा जीव होता. कार्यकर्ते सदैव त्यांच्या सोबत असत. अजित पवार या माणसांच्या जशा मर्यादा त्यांना होत्या. तशा त्या त्यां  राजकारणाला होत्या. तो मातीत उगवलेला, राजकारणाला धर्म मानणारा नेता. जन्मच राजकारणात झाला होता, ते जसे राजकारण करू लागले तेव्हा यशवंतराव, शंकरराव, वसंतदादा, शरद पवारांचा महाराष्ट्र होता. अजित पवार वयाची साठी उलटत असताना मात्र त्या राजकारणाचा आकार उकार पार बदलून गेलाय. त्याच्याशी जुळवून घेण्याची कसरत ते करत राहिले. मिश्किलपणा, हजरजबाबीपणा, स्वतःवरही विनोद करण्याची प्रवृत्ती कायम लक्षात राहील. ते उगाच किरकिर करत बसणारे नेते नव्हते. त्यांच्यात एक उमदेपणा होता. काम होत असेल तर कितीही अडचणी आल्या तरी करायचंच आणि होण्याजोगं नसेल तर तसं स्पष्ट सांगायचं हा त्यांचा खाक्या. माणसं दुखावली जातील याची त्यांनी कधी फिकीर केली नाही. फार विचार करून बोलण्याची सवय नसल्याने अनेकदा ते अडचणीतही आले. चुकलं तर दिलगिरी व्यक्त करायची, प्रायचित्त घ्यायची त्यांची तयारी असायची. हे त्यांचं वेगळेपण होतं. परिस्थिती जी आहे ती समजून आणि ती स्वीकारून पुढे जाणारे नेते होते ते. प्रशासनाच्या झारीतल्या शुक्राचार्याच्या वृत्तीवर मात करून अधिकाऱ्यांकडून कामे करून घेण्याची धमक त्यांच्यात होती. महाराष्ट्राचा भूगोल आणि महाराष्ट्रीयन माणसाची नाडी माहित असलेल्या अजिदादाच जाणं निश्चितपणे महाराष्ट्राच्या राजकारणाचं नुकसान करणारं आहे. अजितदादांना भावपूर्ण आदरांजली


No comments:

Post a Comment

महाराष्ट्राचा दादा माणूस...!

"फारसा थेट संबंध आलेला नसतानाही काही व्यक्तींच्या अकाली जाण्याने मनाला चटका लागतो....मन व्यथित होतं... अस्वस्थ होतं ! नकळत ...