Saturday 14 January 2023

नृपशंभूराजांबद्धल अपसमज!

इथल्या मानबिंदूंची अवहेलना, अवमान, अपसमज निर्माण करून त्याच्या साथीनं आपला कमकुवत राज्यकारभारावरील जनतेचं, रयतेचं लक्ष इतरत्र वळविण्यात राज्यकर्ते धन्यता मानताहेत. शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. आंबेडकर, महात्मा गांधी यांच्याबद्धल अनुदार काढा वा अपसमज पसरावा हा उद्योग गेले काही दिवस सुरू आहे. साधता त्यांच्या हाती संभाजी महाराज लागलेत. राजे स्वराज्य रक्षक होते की, धर्मवीर यावर वाद आरंभलाय. शंभूराजांबद्धल विकृत इतिहास लिहिला गेलाय. हे आता सिद्ध झालंय. पण मनुवादी अद्याप त्याच चिखलात लोळताहेत. शंभूराजांबद्धलचे असलेले अपसमज दूर करणारं हे लेखन आपल्याला निश्चित आवडेल...!
--------------------------------------------------
संभाजी महाराजांना कैद होईपर्यंत हिंदवी स्वराज्याचा कोणताही गड वा प्रदेश मोगलांच्या हाती पडला नव्हता. उलट उत्तरेकडचा आणि दक्षिणेकडचा मोगलीप्रदेशच संभाजीराजांनी बळकावला होता. मोगली सैन्याचं आक्रमण कल्याण-पुणे भागात नेहमीप्रमाणे शिवकालापासून अयशस्वीपणे चालूच होतं. त्यात मोगलांना संपूर्ण यश कधीच मिळालं नव्हतं. (संदर्भ: इतिहासकार वा. सी. बेंद्रे लिखित 'श्री छत्रपती राजाराम महाराज आणि नेतृत्वहीन 'हिंदवी स्वराज्याचा मोगलांशी झगडा'). संभाजीमहाराजांचा हा पराक्रम कोणत्याही मोजमापानं असामान्य कोटीतील होता. हे मान्यच करावं लागेल, शेवटी त्यांना घरभेद्यांच्या राजद्रोहामुळं अटक झाली, तरी जे देदीप्यमान आणि धीरोदात्त हौतात्म्य त्यांनी बाणेदारपणे स्वराज्यासाठी स्वीकारलं, त्यामुळं त्यांच्या निर्वाणानंतरही मराठी सेना एका धुंद अभिनिवेषात स्वराज्य रक्षणार्थ प्राणपणानं झगडत राहिली आणि २६ वर्षांत पुन्हा एकदाही आग्रा, दिल्ली या आपल्या सत्ताकेंद्रांचं तोंडही पाहावयास न मिळता गाझी औरंगजेबाला मराठीराज्याला तर धुळीत मिळवता आलं नाहीच, पण त्याला स्वतःलाच या महाराष्ट्र भूमीच्या धुळीत १७०७ मध्ये थकल्या-भागल्या स्थितीत, निराश मनानं अखेरचा विसावा घ्यावा लागला. आपल्या पराक्रमानं संभाजीमहाराजांनी मराठी स्वराज्य तर राखलंच, पण आपल्या धीरोदात्त मरणानंही स्वराज्याचं रक्षण करण्यास ते मराठी सैन्याचे स्फूर्तिदाते ठरले. 'संभाजीमहाराजांच्या कार्यकर्तृत्वाचा दर्जा फार मोठा होता. त्यांच्या चारित्र्याला कलंकित करणारे सर्व आरोप असत्य कोटीतले अथवा द्वेषभावनेनं कल्पिलेले होते. समकालीन पुराव्यांनी ते तसे ठरतात. उलट तेच आरोप मंत्र्यांनाच लागू पडतात, हे ऐतिहासिक समकालीन साधनांनी सिद्धच होत आहे!' असं वा. सी. बेंद्रे स्पष्टच म्हणतात. (संदर्भ: बेंद्रे लिखित 'श्रीछत्रपती राजाराम महाराज आणि नेतृत्वहीन 'हिंदवी स्वराज्या'चा मोगलांशी झगडा').

अशा परिस्थितीत वास्तविक संभाजीमहाराजांनी राज्याचा विध्वंस केला, असं म्हणणं म्हणजे आपण कारस्थानी सरकारकून यांनी केलेलं पाप लपवण्यासाठी खोट्या कंड्या पिकवणं होय. हा प्रकार केवळ व्यक्तिगत नामुष्कीमुळं आलेला अपवाद दूर करण्याचा राजद्रोही प्रयत्न होय असंही वा. सी. बेंद्रे नमूद करतात. स्वराज्याचा विध्वंस संभाजी महाराजांनी केला नाही. तो विध्वंस आण्णाजी दत्तो, राहूजी सोमनाथ, प्रल्हाद निराजी, रामचंद्रपंत अमात्य आदी कारस्थानी हिंदू मूलतत्त्ववादी सरकारकून आणि त्यांच्या बगलबच्चांनी केला. त्यात मोरोपंतांचे चिरंजीव निळो मोरेश्वर, शंकराजी नारायण वगैरे प्रमुख व्यक्ती आणि सामान्य ब्राह्मण येत नाहीत. त्यांना थोरल्या महाराजांनी केलेल्या अनेक लोककल्याणकारी सुधारणा जाचत होत्या आणि राज्यातली सामाजिक स्थिती पूर्वपदावर नेण्याचा त्यांचा प्रयत्न होता. 'रामचंद्रपंतानं हिंदवी स्वराज्याची मूळ उद्दिष्टे आणि राजपत्रातले, व्यवहारातलं वगैरे तपशिलात बदल करून इस्लामी राज्यबंधारणेतल्या फारसी पदव्या आणि लेखनात फारसी भाषेतली विचारसरणी, राज्याभिषेक शककालाच्या नोंदींऐवजी सुहुर सनाच्या आणि इस्लामी तारीख महिन्यांचा पुन्हा वापर केला आणि महाराष्ट्र धर्म, महाराष्ट्र राज्य हे देवाब्राह्मणांचे राज्य या नवीन विचारसरणीचा प्रचार करून जातीच्या आचारधर्मात संभाजी महाराजांनी केलेल्या सुधारणांना मूठमाती दिली.' (संदर्भ: 'श्रीछत्रपती राजाराम महाराज आणि नेतृत्वहीन "हिंदवी स्वराज्याचा मोगलांशी झगडा") असं वा. सी. बेंद्रे जे दाखवून देतात त्यावरून हे सिद्धच होतं की, शिवकालातच हिंदू मूलतत्त्ववाद्यांचं ग्रहण स्वराज्यास लागलं होते! संभाजी महाराजांनी ते आपल्या हयातीत तरी खग्रास होऊ दिलं नाही. संभाजीमहाराजांच्या बाणेदार आणि तेजस्वी कारकीर्दीचा अत्यंत दुर्दैवी भाग म्हणजे अखिल हिंदुस्थान विरुद्ध छोटे मराठी हिंदवी स्वराज्य, असा अत्यंत विषम सामना झडला असतानाही संभाजीराजांनी स्वपराक्रमानं आपलं छोटं राज्य रक्षिलं, त्याकरिता वेदनामय हौतात्म्य पत्करलं, तरी संभाजीराजांना मुळात तसे नसताना बराच काळ व्यभिचारी, व्यसनी, राज्य विध्वंसणारे असं ठरवण्यात हिंदू सनातन्यांना यश आलं आणि ज्यांनी प्रत्यक्ष प्रजाप्रिय राजाला ठार मारण्याचे अनेक वेळा प्रयत्न केले, राजाला पकडून देण्यासाठी शत्रूला मदत केली. ज्यांनी राज्याचा मोठा हिस्सा शत्रूला खुशाल देऊन टाकण्याचा स्वार्थी डाव टाकला, बलाढ्य शत्रूशी लढा देण्यापेक्षा भेकडपणे त्याला शरण जाऊन त्याची मांडलिकी पत्करण्याचे व्यूह रचले, ते भ्रष्ट, कपटी, पाताळयंत्री पीटर पॅन कूपमंडूक वृत्तीचे मूलतत्त्ववादी, हिंदू सनातनी सरकारकून मात्र इतिहासात करड्या आणि करारी स्वभावाचे आणि जाणकार म्हणवून रंगवले गेले. आपले जातिनिष्ट, अनीतिमान, विषमवादी वर्णवर्चस्व येनकेनप्रकारे कायम राखणे हेच ज्यांचं अंतिम ध्येय, त्यांना आमजनतेला प्रगतीपथावर नेणाऱ्या समता, स्वातंत्र्य आदि उज्वल कल्पनांचं कसले अप्रूप!

शिवरायांप्रमाणेच शिवरायांचे ज्येष्ठ पुत्र संभाजी राजे यांच्याबद्दल ते युवराज असल्यापासून फार मोठ्या प्रमाणावर अपसमज प्रचलित होते. तपस्वी इतिहास संशोधक वा. सी. बेंद्रे यांनी आपल्या ४०-४२ वर्षांच्या अथक संशोधनानंतर १९६० मध्ये संभाजीराजांवर संभाजी महाराज हे पुस्तक प्रसिद्ध होईपर्यंत जवळपास २७० वर्षांच्या काळात हे अपसमज अस्तित्वात होते. बेंद्रे यांच्या पुस्तकानंतर डॉ. कमल गोखले यांचंही संभाजी महाराजांवरील किटाळ दूर करणारं शिवपुत्र संभाजी हे अप्रतिम पुस्तक १९७१ मध्ये प्रसिद्ध झालं. त्याही नंतर १९९० मध्ये छत्रपती संभाजी स्मारक ग्रंथ, डॉ. जयसिंगराव पवार यांच्या संपादनानं प्रकाशित झाला. त्यात अनेक इतिहासकार आणि इतिहास अभ्यासक यांचे संभाजी महाराजांसंबंधित लेख मिळवून डॉ. पवारांनी प्रत्येक लेखाचा गोषवारा तर दिलाच, पण संभाजीमहाराजांवर आधी लिहिल्या गेलेल्या सर्व लिखाणांचा परामर्ष घेणारं फार सुरेख असं प्रदीर्घ प्रास्तविक लिहिलं आहे. वरील नमूद तिन्ही पुस्तकांनी, संभाजी महाराजांची मलिन केली गेलेली प्रतिमा साधार पुराव्यांनिशी पूर्णपणे पुसून टाकून, संभाजी महाराज मूलतः कसे साहसी आणि झुंझार सेनानी, कर्तव्यदक्ष राजा आणि प्रजाप्रिय होते, तसंच शिवपुत्र म्हणून शोभेल असंच त्यांचं व्यक्तिमत्त्व होतं आणि त्यांनी औरंगजेबासारख्या सामर्थ्यशाली शत्रूबरोबरच पोर्तुगीज आणि सिद्दी या सागरी सत्ताधाऱ्यांशी एकाच वेळी दिलेल्या ८-९ वर्षांच्या शौर्यशाली आणि स्फूर्तिदायक लढ्यानंतर स्वराज्य रक्षणाकरिता दुर्दैवी पण धैर्यशाली हौतात्म्य कसं पत्करलं, याचं मोठं गौरवशाली आणि यथार्थ चित्रण केलं आहे. वास्तव असं असताना माझ्यासारख्या इतिहासाच्या अभ्यासकाला याच विषयावर पुन्हा लिहिण्यासाठी धाडस करण्याचं काही कारण नव्हतं, पण...

डॉ. कमल गोखले यांच्या पुस्तकाची प्रस्तावना लिहिताना थोर इतिहास संशोधक महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांनी म्हटलं आहे, 'ऐतिहासिक पंडित हा मानवी इतिहासाच्या सूक्ष्म अवलोकनानं, मननानं आणि चिंतनानं परिष्कृत झालेली प्रतिभा वापरतो!' ख्यातनाम ललित लेखक आणि इतिहास अभ्यासक शिवाजी सावंत यांनीही, डॉ. जयसिंगराव पवार संपादित संभाजीमहाराजांच्यावरच्या 'स्मारक ग्रंथा'तल्या आपल्या लेखात म्हटलं आहे, ‘इतिहासातील व्यक्तिरेखा आपणास हवा तेवढा सोयीच्या कालखंडाचा तुकडा घेऊन कधीच नीट समजत नाहीत, हे माझं पूर्ण अभ्यासानंतरचं नम्र आणि ठाम मत आहे. त्यासाठी इतिहासात सततचा जो एक दीर्घ आणि मूक अंतःस्त्रोत असतो त्याची नस नेमकेपणी ललित लेखकाला गवसावी लागते. फक्त ललित लेखकालाच नव्हे, प्राधान्येकरून इतिहासकाराला अशी नस, कारण आणि परिणाम, सत्य आणि आभास, यांचा पडताळा येण्यासाठी सापडणे अधिक गरजेचं आहे, हे सांगण्याची गरज नाही.' असेच पण अधिक स्पष्टपणे आपले विचार मांडताना, हिंदू धर्म ग्रंथांचे एक चिकित्सक अभ्यासू आणि विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे म्हणतात. 'इतिहासातील एखाद्या घटनेचा अन्वयार्थ लावताना त्या घटनेकडे एक सुटी घटना म्हणून पाहाता येत नाही. ती घटना घडवणाऱ्या आणि त्या घटनेची नोंद करणाऱ्या लोकांचे सामाजिक हितसंबंध, त्यांची परंपरा, त्यांच्या प्रकृती इत्यादी असंख्य घटक ध्यानात घेऊनच त्या घटनेचं स्वरूप समजून घ्यायचं असतं!' या दृष्टीनं विचार करता मला असं आढळून आलं की, महाराणी सोयराबाई यांची, युवराज संभाजीला बाजूला सारून किंवा राज्याची वाटणी होऊन, छत्रपतींच्या रायगडावरील मूळ तख्ताचा वारसा, आपला मुलगा राजाराम याला मिळावा ही भावना, सर्वसाधारण सावत्र मातांची पूर्वापार दृष्टोत्पत्तीस आलेली प्रवृत्ती पाहाता एक वेळ सहज समजू शकतं. तथापि, थोरल्या महाराजांनी जाणते आणि विश्वासू म्हणून नेमणुका केलेली त्यांच्या प्रधानमंडळातली आणि इतर ज्येष्ठ मंडळीपैकी मोरोपंत, आण्णाजी दत्तो, प्रल्हाद निराजी, बाळाजी आवजीसारख्यांनी. दिल्लीच्या बलाढ्य मोगल बादशहाची जंगी फौज मराठी राज्यावर ते पूर्णतः नेस्तनाबूत करण्याच्या इराद्यानं लवकरच चालून येणार हे स्पष्ट होत असताना, राजारामांसारख्या केवळ ९-१० वर्षांच्या आणि हा त्यांचा प्रयत्न राजाराम ४-५ वर्षांचे असल्यापासूनच चालू होता अननुभवी आणि नाजूक प्रकृती आणि प्रवृत्तीच्या राजपुत्राचा पक्ष, आपलं शौर्य, साहस, युद्धकुशलता आणि कर्तव्यपरायणता सिद्ध केलेल्या आणि मातब्बर औरंगजेबाच्या चौफेर आक्रमणास प्रभावशालीपणे पायबंद घालण्यास सर्वथा समर्थ असलेल्या जे पुढे सिद्धही झालं, युवराज म्हणून आधीच संबोधित झालेल्या संभाजीराजांच्या विरोधात, तेही बहुतांशी फार गंभीर न भासणाऱ्या कारणांसाठी का धरावा आणि त्यासाठी त्यांचं चारित्र्यहनन करून त्यांच्या खुनाचं प्रयत्न करण्यापर्यंत, त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी अत्यंत परिश्रमानं स्थापन केलेल्या सार्वभौम हिंदवी स्वराज्याचा मोठा हिस्सा औरंगजेबाचा पुत्र अकबर याला आंदण देण्याची योजना आखण्यापर्यंत, एवढंच नव्हे, तर संभाजीराजांना पकडून देण्यासाठी मोगलांना मदत करण्यापर्यंत का मजल मारावी याचा बोध केवळ तत्कालीन कारणांवरून नीट होण्यासारखा नाही. काही इतिहासकारांनी फक्त एवढंच म्हटलं आहे की, 'त्यांनी ते स्वार्थासाठी केलं. पण त्या पलीकडं जाऊन आधीच्या कोणत्याही इतिहासकारानं कट करणाऱ्यांच्या अंतस्थ हेतूचा शोध घेण्याचा, त्यांचा नेमका स्वार्थ कार्य होता. हे जाणून घेण्याचा प्रयत्न केल्याचं दिसत नाही.

खरं म्हणजे, संभाजीराजांना विरोध करणाऱ्या प्रधानमंडळातल्या धुरिणांच्या धार्मिक प्रवृत्ती, त्यांचे सामाजिक हितसंबंध, त्याबाबतीत इतिहासात दृग्गोचर झालेली परंपरा आणि सतत आढळून येणारा दीर्घ आणि मूक अंतःस्रोत. तसंच या घटना नोंदणाऱ्यांचा कल आणि प्रवृत्ती इत्यादी घटनांचा सूक्ष्म अभ्यास करून कारणमीमांसा शोधायला हवी होती. मात्र ज्येष्ठ लेखक, इतिहासकार व विचारवंतांनी वर नमूद केलेल्या त्यांच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, इतिहासाचा एक अभ्यासक या नात्यानं मी जेव्हा याबाबतीत मागोवा घेतला. तेव्हा एक वेगळीच कारणमीमांसा माझ्या दृष्टोत्पत्तीस आली आणि तीच जनतेसमोर यावी, या हेतूनं मी या लेखनास हात घातला. संभाजीराजांसारख्या स्वतंत्र व सार्वभौम राज्याच्या अधिकृत वारसानं मोगलांसारख्या शत्रूस मिळणं, हा लहानसहान अपराध होऊ शकत नाही. हे मीही जाणतो. पण हे स्वराज्याच्या हितासाठी रचलेल्या गुप्त राजकीय डावाच्या अनुषंगानं असेल तर? मात्र काही इतिहासकारांनी जे म्हटलं आहे की, संभाजी राजे मोगलांस मिळाल्यानं त्यांना राज्यपद देण्यास प्रधानमंडळातल्या धुरिणांचा विरोध होता, हे काही मला पूर्णार्थानं बरोबर वाटत नाही. संभाजीराजे मोगलांकडं १३/१२/१६७८ रोजी गेले. त्यांचा दिलेरखानाशी पत्रव्यवहारही थोरले महाराज ऑक्टोबर १६७६ मध्ये कर्नाटक स्वारीवर गेल्यानंतर सुरू झाला. पण त्याआधी १६७५ पासूनच त्यांच्याविरुद्ध अनेक खोट्यानाट्या वावड्या उडवून त्यांचं चारित्र्यहनन आणि बदनामी करून, त्यांना युवराज म्हणून स्वाभिमानानं स्वराज्यात जगणं अशक्य करून, त्यांना पित्याच्या मनातून उतरवून, त्यांच्या मराठी राज्याच्या सिंहासनावरच्या हक्काला बाधा आणण्याचा गंभीर आणि मेटाकुटीचा प्रयत्न काही ज्येष्ठांनी केला, तेव्हाच त्यांनी गुप्त राजकीय डावाची भक्कम पूर्वपीठिका तयार झाल्यावर अखेरचं असं हे पाऊल उचललं. अर्थात, त्यामुळं त्यांच्या विरोधकांना आपल्या विरोधासाठी एक सबळ कारण मिळालं; तरी ते त्यांच्या विरोधाचं मूळ कारण नव्हे. इतरही काही कारणं देण्यात येतात, पण तीही सर्व नंतरची आहेत. मुळात संभाजीराजांच्या हक्काला वेगळ्याच कारणांसाठी विरोध होत होता. ती कारणं काय होती, याचा खुलासा अनेकांनी आपल्या पुस्तकातून केलाय. पण ते मोगलांना मिळाले म्हणून प्रायः त्यांना विरोध झाला, असं म्हणणं म्हणजे इंग्रजी वाक्यप्रचाराप्रमाणे Putting the Cart before the horse - घोड्याच्या पुढे गाडी लावणे असा होईल. संभाजीराजांनी असा निर्णय कोणत्या परिस्थतीत आणि काय कारणानं घेतला, याचाही ऊहापोह अनेक इतिहासकारांनी केलाय. नृपशंभूबाबत झालेले अपसमज दूर करण्यासाठी, लिहिण्यासाठी मला ज्या इतिहास संशोधक, इतिहास अभ्यासक यांच्या ग्रंथांचा आणि लेखांचा आधार मिळाला, आभार मानले पाहिजेत.
- हरीश केंची,
९४२२३१०६०९

तमसो मा ज्योतिर्गमय...!

"पृथ्वीच्या पोटातून कधीतरी लाव्हाच्या रूपानं बाहेर पडणारी थोडीशी उष्णता आणि चंद्राची भरती ओहोटी घडवून आणणारी ऊर्जा याचा परिणाम सोडला, तर पृथ्वीवरच्या सगळ्या सजीव -निर्जीवातली ऊर्जा ही यांना त्या रूपानं सूर्यापासून मिळालेली असते. सूर्याचं असं नियंत्रण असल्यामुळंच सूर्याला प्रमुख देवतेचं स्थान मिळालं खरं; परंतु सूर्याची उपासना करणाऱ्या अनेक जमातींमध्ये माणसाचं प्रभुत्व दाखविण्यासाठी अनेक चालीरीतीही प्रचारात आणल्या गेल्या. काही जमातींमध्ये सूर्याचा घड घेणाऱ्या राक्षसाला पळवून लावण्यासाठी सूर्याच्या दिशेनं बाण मारण्याची प्रथा आहे. सूर्य मानवी शरीरावर अधिकार गाजवत असतो तो दिवस आणि रात्र यांच्या ताल-लयबध्दतेनं! सूर्योदय झाला की, माणूस ताजातवाना होऊन कामाला सुरुवात करतो जसजसा मावळतो तशी मानवातली ऊर्जा कमी होत जाते. सुर्याच्याच तालावर माणूस काम आणि विश्रांती घेत असतो. सूर्याच्या या लयबद्धतेतच उत्पत्ती, स्थिती आणि लय यांची पुनःपुन्हा होणारी आवर्तनं माणसाला जन्म आणि पूर्वजन्म यासारखं तत्वज्ञान सहजपणे समजावून देत असतात. ही मकरसंक्रांतीच्या निमित्तानं उत्तरायणाचा प्रारंभ आणि सूर्य याची वैज्ञानिक माहिती!"
---------------------------------------------------

*आ*ज संक्रांत ही संक्रांत प्रत्येक वर्षी १४ जानेवारीला येते. पण ती यंदा १५ जानेवारीला आलीय. संक्रांत म्हणजे विज्ञान आणि धार्मिकता यांचा अजोड संयोग! मकर संक्रांतीच्या दिवशी एकमेकांना तिळगुळ देऊन गोड बोलण्याची शपथच जणू आपण घालीत असतो. पुराणांचा आधार घ्यायचा, तर पौष महिन्यात येणाऱ्या मकर संक्रांतीच्या दिवशी देवांचा दिवस आणि दानव-राक्षसांची रात्र सुरू होते, असं म्हणता येईल. देवलोकात रात्र असतानाच दानवांना या अंधारात आपली काही कृत्ये करायला अधिक सोपे जात असावं; परंतु विज्ञानाला देव आणि दानव या गोष्टी कबूल नाहीत. मंजूर नाहीत; पण मात्र त्यांना एक गोष्ट मंजूर आहे. सूर्य नावाच्या एका अति तापलेल्या ग्रहामुळं पृथ्वीवरचं जीवन शक्य आहे ही ती गोष्ट ! जोतिबाच्या दृष्टीनं बघायचं तर मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य धनू राशीतून मकर राशीत संक्रमण करतो. बारा राशींमधून भ्रमण करणारा सूर्य जानेवारी महिन्यात आपलं आवर्तन पूर्ण करून पुन्हा एकदा सालाबादप्रमाणे मकर राशीत प्रवेश करतो, असं ज्योतिषशास्त्राचं म्हणणं आहे. खगोलशास्त्रज्ञांनी याच्याही पुढे झेप घेतली. त्यांनी पृथ्वीचा गोल आकार आणि तिची सूर्याभोवती प्रदक्षिणा करण्याची कक्षाही शोधून काढली. ही कक्षा लंबवर्तुळाकार आहे म्हणून पृथ्वी भ्रमणकक्षेत कधी सूर्याच्या जवळ तर कधी सूर्यापासून लांब जात असते. पृथ्वी सूर्याच्या जवळ असते तेव्हा दिवस मोठा असतो. ती सूर्यापासून दूर असते तेव्हा रात्री मोठ्या असतात. सूर्य तसा स्थिर आहे. दिवसभरात तो आपल्याला पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना दिसतो. हे घडतं पृथ्वीच्या पूर्वेकडं फिरण्याच्या गतीमुळं. अशाप्रकारे सूर्याचा जो भासमार्ग तयार होतो त्याला भारतीय प्राचीन वैज्ञानिकांनी उत्तरायण आणि दक्षिणायन असं नाव दिलं. उत्तरायणाची सुरुवात झाली की, सूर्य मकर वृत्तापासून उत्तरेकडे सरकायला लागतो. मग भीतिदायक वाटणाऱ्या लांबच लांब रात्री लहान होऊ लागतात आणि दिवस मोठे होऊ लागतात. असे दिवस मोठे होण्याची प्रक्रिया खरंतर २२-२३ डिसेंबरला सुरू झालेली असते; परंतु सूर्य ज्या दिवशी मकर राशीत प्रवेश करतो तो दिवस मकर संक्रमणाचा...! देवाचा दिवस उजाडण्याचा क्षण म्हणजे प्रकाशाचा आणि आनंदाचा असायलाच हवा. त्यातच पृथ्वीवरच्या जीवनाचा प्रमुख आधार आणि प्रकाशाची देवताही सूर्यच! त्यामुळं भारतीय नव्हे, तर इतर अनेक परंपरांनी सूर्याला आपली आद्यदेवता मानलंय. भारतीयांनी तर नवग्रहस्तोत्रात सूर्याची प्रार्थना करताना
जपाकुसुम संकाशं काश्यपेयं महाद्युती.
तदापि सर्व पापघ्नं प्रणतोऽस्मि दिवाकरम्।।'
अशी सूर्याची प्रार्थना केलीय. इतकंच नव्हे तर ग्रहपीडांपासून मुक्त होण्यासाठी याच परंपरेत आद्य लोकांचं रक्षण करणारा ग्रह म्हणून त्यांनी सूर्याची 'पीडाहरतु मे रविः' अशी विनवणीही केली. मकर संक्रांतीपासून सूर्याचं उत्तरायण सुरू होतं, तेव्हा आपल्याकडं हिवाळ्याची गुलाबी थंडी असते. या थंडीमुळं त्वचा सुकते आणि ओलाव्याचा अंश कमी झाल्यामुळं त्वचा तडतडते. कधी हातांच्या तळव्याची साल निघू लागतात, तर पायांना भेगा पडण्याचं प्रमाणही वाढतं. वातावरणाचं तपमान कमी झाल्यानं माणसाचं शरीर संतुलित राहण्यासाठी शरीरातली उष्णता अधिक प्रमाणात उत्सर्जित करीत असते. अशावेळी त्वचेमधल्या तेलाचं प्रमाण कायम राखण्यासाठी आहारात स्निग्ध पदार्थाची गरज वाढते. त्याचबरोबर शरीरातून उत्सर्जित होणारी अधिक प्रमाणातली उष्णता भरून काढण्यासाठी आहारात थोडे-अधिक उष्ण पदार्थही लागतात. लोकमानसामध्ये आपल्या परंपरेनं या दिवसामधला मकरसंक्रांतीचा दिवस उत्सवाचा म्हणून रुजवला असावा. तिळगूळ इतरांना देताना आपल्यालाही तिळाची स्निग्धता इतरांकडून मिळणारच म्हणून ही रूढी कायम केली गेली असावी. संक्रांतीच्या दिवशी तिळगुळाप्रमाणेच बाजरीची भाकरी आवश्यकच. कारण ज्वारी किंवा गव्हापेक्षा ती अधिक उष्ण, गूळ तर उष्णतेचं प्रतीकच, कारण उन्हाळ्यात गूळ अधिक प्रमाणात आहारात घेतला तर निश्चितच घोळणा फुटणार, परंतु मकर राशीत या दिवशी प्रवेश करणाऱ्या सूर्याचं महत्त्व इथंच संपत नाही. पृथ्वीच्या पोटातून कधीतरी लाव्हाच्या रूपानं बाहेर पडणारी थोडीशी उष्णता आणि चंद्राची भरती-ओहोटी घडवून आणणारी ऊर्जा परिणाम सोडला, तर पृथ्वीवरच्या सगळ्या सजीव-निर्जीवातली ऊर्जा ही यांना त्या रूपानं सूर्यापासून मिळालेली असते. सूर्याचं असं नियंत्रण असल्यामुळंच सूर्याला प्रमुख देवतेचं स्थान मिळालं खरं; परंतु सूर्याची उपासना करणाऱ्या अनेक जमातींमध्ये माणसाचं प्रभुत्व दाखविण्यासाठी अनेक चालीरीतीही प्रचारात आणल्या गेल्या. काही जमातींमध्ये सूर्यग्रहणाच्या वेळी सूर्याचा घास घेणाऱ्या राक्षसाला पळवून लावण्यासाठी सूर्याच्या दिशेनं बाण मारण्याची प्रथा आहे. सूर्य मानवी शरीरावर अधिकार गाजवीत असतो तो दिवस आणि रात्र यांच्या ताल-लयबद्धतेनं सूर्योदय झाला की, माणूस ताजातवाना होऊन कामाला सुरुवात करतो. सूर्य माथ्यावर आला असताना त्याच्या कामाची गती सर्वाधिक असते. परंतु सूर्य मावळतीला आला की, माणूसही मंद होतो आणि सुस्तावतो. एक तऱ्हेनं त्याची ऊर्जा उतरणीला लागलेली असते. संध्याकाळनंतर रात्र होते तसा हा माणूस झोपेच्या अधीन होतो. पुन्हा सकाळी ताजेपणानं एका नव्या दिवसाची सुरुवात करण्यासाठी.... दिवस मोठा आणि रात्र लहान असते. तेव्हाही तो या सूर्याच्याच तालावर काम आणि विश्रांती घेत असतो. सूर्याच्या या लयबद्धतेतच उत्पत्ती, स्थिती आणि लय यांची पुनः पुन्हा होणारी आवर्तनं माणसाला मृत्यू आणि पुनर्जन्म यासारखं तत्त्वज्ञान सहजपणे समजावून देत असतात. ही मकर संक्रांतीच्या निमित्तानं उत्तरायणाचा प्रारंभ आणि सूर्य याची वैज्ञानिक माहिती! देवाचा दिवस उगवण्याचा पर्वकाळ म्हणजे मकर संक्रांत. या दिवशी स्निग्ध तीळ आणि उष्ण गूळ वाटून आरोग्यरक्षण करीत असतानाच या दिवसाची उत्सवमूर्ती असलेल्या सूर्याला म्हणू या... तमसो म ज्योतिर्गमय !

संक्रांतीचं वर्णन प्रत्येक जण आपआपल्या सोयीनं करतो. ती कशी आहे, कशावर स्वार होऊन येतेय; याची वर्णन ज्योतिषशास्त्री नेहमीप्रमाणे करताहेत. त्यानुसार उद्याची दुनिया कशी असेल, याच भाकीत केलं जातंय. उद्याची दुनिया कशी असेल, याची कल्पना आजकालच्या दुनियेवरून करता येईल. आजची दुनिया ओरडणाऱ्यांच्या भूलथापांना फसलेल्या रडणाऱ्यांची आहे. कालची दुनिया यापेक्षा भित्र नव्हती. भविष्याची वाट भूतकाळातूनच निर्माण होते. हा निसर्गनियम मानायचा, तर उद्याच्या दुनियेचं चित्र रंगविण्यासाठी कल्पनाशक्ती शिणवायची आवश्यकता नाही. माणसाला नव्याची आस असावी, पण त्यासाठी सत्याचा पास घेण्याची बदमाषी नसावी. काळ हा नेहमीच दुटप्पी असतो. त्यावर स्वार झालात, तर तो तुम्हाला आपल्याही पुढे नेणार. त्याच्याकडं पाहत राहाल तर मात्र तो तुमचा काळ होणार, गेल्या वर्षाच्या कालखंडावर कुणी, कसा आपला ठसा उमटविला, याची भारंभार चर्चा वाचायला, ऐकायला मिळेल. आगामी काळ हा ज्ञानाधिष्ठित विज्ञानाचा असणारंय. माणसाची जात, धर्म त्याचं ज्ञान ठरविणार, पण प्रत्यक्षात वेगळं काही घडतंय, याचा अनुभव येतोय. भावनेचं विज्ञान असतं, त्यानुसार त्या फुलविता, विझविता आणि वांझोटाही ठेवता येतात. त्याबाबतचे धडे सध्या प्रसिद्धिमाध्यमं घराघरांतून देत असतात. दूरचित्रवाणीवरच्या वेगवेगळ्या वाहिन्या याबाबतीत आघाडीवर आहेत. भावनेचं विज्ञान असतं. मात्र, विज्ञानाला भावना नसते. विज्ञान ज्याला कळतं ते त्याचं होतं. त्यासाठी ज्ञान हवं, बुद्धीची चमक हवी. ती भावनेच्या वरचढ हवी. अशा दृष्टीनं पाहिलं की लक्षात येतं, सध्या खूप अंधार आहे. धर्म, जात, संस्कृतीच्या अहंकारी अस्मितांना देवभक्तीच्या भाबड्या भावनांना आपण नव्या सहस्रकात घेऊन गेल्यानं ते अधिक गडद होताहेत. हे सोयीस्कररीत्या विसरलं जातंय की, भारताच्या उभारणीत अनेकांचा, असंख्यांचा ध्येयध्यास कारणी लागलाय. कित्येकांनी त्यासाठी आपल्या आयुष्याचा होम केलाय. रक्त सांडलंय. परंतु अशा असंख्यांच्या त्यागामागच्या, कार्यामागच्या ध्येयाला मर्यादा होत्या. काहींसाठी त्या काळाच्या होत्या, तर काहींसाठी त्या विचारदृष्टीच्या होत्या. अशा मर्यादा छत्रपतींच्या, महात्माजींच्या आणि आंबेडकरांच्या ध्येयकार्याला नव्हत्या. स्वराज्य, स्वातंत्र्य आणि समता हे या त्रिमूर्तीचं ध्येय होतं. ते दृष्टिपथात नसताना त्यांनी जाहीर केलं होतं आणि हयातीत आपली ध्येयपूर्ती केली. भारताच्या लोकशाहीचं सार या तिच्या ध्येयवादात होतं म्हणूनच ती राष्ट्रउभारणी घडविणारी राष्ट्रसूत्रं झाली. ही सूत्रं आणि त्याच्या प्रतिष्ठापनेसाठी त्यांनी आयुष्यभर दिलेली झुंज केवळ गतकालातच नाही, तर यापुढच्या काळातही जेव्हा जेव्हा मानव्यरक्षणाचा प्रश्न निर्माण होईल, तेव्हा त्याच्या संरक्षणासाठी ढाल-तलवार बनणारी आहे. स्वराज्य, स्वातंत्र्य आणि समता या तीन तत्वांची गुंफण झाल्याशिवाय लोकशाहीची पूर्तता होत नाही. स्वराज्यात स्वातंत्र्य हवं. स्वातंत्र्यात समता हवी अन् समतेच स्वराज्य हवं. स्वराज्य, स्वातंत्र्य आणि समता या तत्त्वांची थोरवी जशी परस्परांवर अवलंबून आहे, तसंच शिवाजीमहाराज, महात्मा गांधी आणि डॉ. आंबेडकर यांचं अमीट ऐतिहासिक कार्यही परस्परांच्या जीवनकार्यावर आधारलेलं आहे. परंतु प्रत्यक्षात हेच विसरून या राष्ट्रपुरुषांना वेगवेगळं करून भजलं, पूजलं जातं, या राष्ट्रपुरुषांच्या जयंत्या-मयंत्यांच्या वेळी पोलिस बंदोबस्त ठेवावा लागतो. ही सर्वच भारतीयांसाठी शरमेची गोष्ट आहे. जातीच्या, धर्माच्या, प्रांताच्या फाजील या शरमिंद्या करणाऱ्या गोष्टी अजूनही अस्मिता जागविणाऱ्या वाटतात. मुंजीपासून मयतापर्यंतची कर्मकांडंही संस्कृतीची प्रसादचिन्ह ठरतात. दिवसभर अशुभ व्यवहार करून सांजवातीला शुभंकरोती म्हटलं, सोयीनं सत्यनारायण घातला किंवा दिवसभर गिन्हाईकांना मापात पाप करून लुबाडून संध्याकाळी गोरक्षण समितीला रुपया देऊन धर्मरक्षकाच्या तोऱ्यात मिरविणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. सध्या अशांचा सुकाळ आहे. धंद्याचा धर्म करण्याऐवजी धर्माचा धंदा केला जातोय. त्यासाठी कोणत्याही पातळीवर येण्याची तयारी चालविलीय. यातून निष्पन्न काय होऊ शकतं, हे सारं तुम्ही-आम्ही सहजपणे समजण्याइतपत शहाणे नक्कीच आहोत. कळतं पण वळत नाही, हेच खरं. आपण इतके हतबल झालो आहोत, आपल्यात लढण्याचं, प्रतिकार करण्याचं त्राणच राहिलेलं नाही. अशा गलितगात्र झालेल्या, गर्भगळीत झालेल्याला संक्रांत कशावर बसून आली आहे अन् ती आपलं काय भलं वाईट करणार, याची चिंताच नको. जसं निवडणुकीत आपण सगळ्यांचंच, सगळ्या पक्षांच्या उमेदवारांचं स्वागत करतो, अगदी तसंच सगळ्या सणवारांचं स्वागत करतो. इतके की, आपल्याला 'स्थितप्रज्ञ' म्हणणंच योग्य ठरेल.

वर्षभरात बारा राशींतून सूर्याची बारा संक्रमणे होत असली, तरी भारतीय लोकांच्या दृष्टीनं मकरसंक्रमणाला म्हणजेच संक्रांतीला अधिक महत्त्व आहे कारण या संक्रमणापासून सूर्याच्या उत्तरायणाला प्रारंभ होतो आणि उत्तर गोलार्धात राहणाऱ्या भारतीयांना उत्तरायणामध्ये अधिक प्रकाश आणि उष्णता यांचा लाभ होतो. त्यामुळंच त्यांना मकर संक्रमण उत्सवाच्या स्वरूपात स्वागतार्ह वाटतो. आर्य लोक उत्तर ध्रुवावर राहत होते तेव्हा त्यांना हे संक्रमण अधिकच आनंददायक वाटत असलं पाहिजे. पूर्वी उत्तरायणाचा प्रारंभ हाच वर्षारंभ असावा इ. प्रकारची मतं आढळतात. सूर्याच्या मकर संक्रमणाचं संक्रांतीच्या स्वरूपात दैवतीकरणही करण्यात आलंय. लांब ओठ, दीर्घ नाक, एक तोंड आणि नऊ बाहू असलेल्या एका देवीनं संक्रांतीच्या दिवशी संकरासुराची हत्या केली होती. दरवर्षी तिचं वाहन, शस्त्र, वस्त्र, अवस्था, अलंकार,भक्षण वगैरे गोष्टी वेगवेगळ्या असतात आणि त्या भावी घटनांच्या सूचक मानल्या जातात. ती एखाद्या वाहनावर बसून एका दिशेकडून येते, दुसऱ्या दिशेला जाते आणि त्यावेळी तिसऱ्या दिशेकडं पहात असते. ती ज्या दिशेकडून येते त्या दिशेला समृद्धी मिळते, तर ती जिकडे जाते आणि पाहते तिकडे संकट कोसळते, त्यामुळंच संक्रात येणं म्हणजे संकट येणं असा वाक्प्रचार रूढ झालाय. तिनं ज्या वस्तू घेतलेल्या असतात, त्या नष्ट वा महाग होतात अशीही समजूत आहे. पंचांगात तिचं चित्र दिलेले असतं. संक्रांतीच्या दिवशी शुभ कार्ये करीत नाहीत. भारतातील बहुतेक सर्व भागांतून हा सण साजरा केला जातो. उत्तरभारतात त्या दिवशी डाळ आणि भात यांची खिचडी खातात आणि दान देतात त्यामुळंच तिथं संक्रातीला ’खिचडी संक्रांती’ असं म्हणतात. बंगालमध्ये त्या दिवशी काकवीत तीळ घालून बनलेला ’तिळुआ’ नावाचा पदार्थ, तसेच तांदळाच्या पिठात तूपसाखर घालून केलेला ’पिष्टक’ नावाचा पदार्थ खातात आणि वाटतात म्हणून तिथं संक्रांतीला ‘तिळुआ संक्रांती’ आणि ‘पिष्टक संक्रांती’ असे म्हणतात. दक्षिणेत याच वेळी पोंगल नावाचा तीन दिवस चालणारा उत्सव असतो. पहिल्या दिवशी इंद्राप्रीत्यर्थ भोगी पोंगल वा इंद्रपोंगल, दुसऱ्या दिवशी सूर्याप्रीत्यर्थ सूर्यपोंगल आणि तिसऱ्या दिवशी गायीसाठी मट्टपोंगल साजरा केला जातो. महाराष्ट्रात संक्रांतीच्या आधीच्या दिवसाला भोगी, तर नंतरच्या दिवसाला किंक्रांत किंवा करिदिन म्हणतात. किंक्रांतीच्या दिवशी संक्रांती या देवीनं किंकर नावाचा दैत्य मारला, अशी कथा असून तो दिवस अशुभ मानला जातो. संक्रांतीच्या दिवशी केले जाणारे तीर्थस्नान आणि दान पुण्यदायी मानलंय. त्या दिवशी प्रयाग, गंगासागर इ. ठिकाणी प्रचंड मेळे भरतात. या दिवशी पितृश्राद्ध करावं असं सांगितलंय. गंगा सागरात स्नान करून पिंड अर्पण करण्याची प्रथा आहे. महाराष्ट्रात स्त्रिया मृत्तिका घटाचं दान देतात आणि देवाला तीळ-तांदूळ अर्पण करतात आणि संक्रांतीनिमित्त सौभाग्यवाण लुटतात. सुनाग नामक ऋषींनी जाबाली ऋषींना संक्रांतीचं माहात्म्य सांगितल्याची कथाआढळते. या दिवशी तिळगूळ मोठ्यांनी लहानांस द्यावा अशी वहिवाट आहे. हा सण माणसांच्या परस्परसंबंधांमध्ये स्नेह व माधुर्य हवे, असा संदेश देत असल्यामुळे सामाजिक दृष्टीनेही महत्त्वाचा आहे. तिळगूळ देताना ’तिळगूळ घ्या गोड बोला’ असे म्हणण्याची पद्धत, विविध वस्तूंचे दान देण्याचा आग्रह, दूरच्या संबंधितांना शुभेच्छापत्रे आणि तिळगूळ वगैरे पाठविण्याची पद्धत, सुवासिनींनी आपल्या घरचे तांदुळ दुसऱ्यांच्या घरच्या आंधणात शिजविण्याची आणि दुसऱ्यांच्या घरात असोला नारळ सोडण्याची कोकणातली प्रथा इ. गोष्टी सामाजिक अभिसरणाच्या द्योतक आहेत. असो मकरसंक्रांतीचं स्वागत करू या अन् सारे मिळून म्हणू या, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला !
हरीश केंची
९४२२३१०६०९

Monday 9 January 2023

भाजपची २०२९च्या रणांगणाची तयारी!

भाजप केवळ २०२४ च्याच नव्हे तर पुढच्या अनेक निवडणुकांची तयारी करत आहे. २०२६ मध्ये लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना होणार आहे. त्यासाठीच्या परिसीमन समितीचं काम सुरू झालंय. लोकसंख्येनुसार जवळपास नऊशे मतदार संघ होताहेत. त्यासाठी 'सेंट्रल व्हीस्टा' सज्ज झालीय. पण यात मोठा घोळ आहे की, उत्तरप्रदेश, बिहार, मध्यप्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र आणि गुजरात या सहा राज्यात लोकसंख्येचा विस्फोट होतोय. तिथल्या खासदारांची संख्या दुप्पट होतेय. त्यामुळं खासदारांच्या एकूण संख्येहून अधिक खासदार या सहा राज्यातून निवडून येतील. त्या तुलनेत दक्षिणेकडील राज्यांनी लोकसंख्या नियंत्रण केल्यानं तिथले मतदारसंघ वाढत नाहीत. त्यामुळं दक्षिणेकडील राज्यांमध्ये लोकसंख्येनुसार पुनर्रचनेला विरोध होतोय. इतर निकषही लक्षात घ्यावेत असं त्यांचं म्हणणं आहे. आधीच हिंदीविरोधी वातावरणाला पुनर्रचनेची फोडणी मिळते की काय अशी भीती आहे.पण भाजप आगामी ३०-४० वर्षाची रणनीती आखते आहे, त्यानुसार वाटचाल सुरू झालीय!
-------------------------------------------

प्रधानमंत्री मोदींची दुरदृष्टीनं निर्णय घेण्याची क्षमता निश्चितच वाखाणण्याजोगी आहे. पक्षांतर्गत जोडतोड असो, इतर पक्षातल्या नेत्यांशी संबंध असोत, त्यांना आपलंसं करून घेण्याची त्यांची हातोटी कमालीची आहे. त्यांचं राज्यकारभार करण्याचं, पक्षाच्या यशासाठी करायचं नियोजन काबिल-ए-तारीफ आहे! मोदीजी जे काही करताहेत हे जर बारकाईनं पाहिलं तर त्यांची दूरदृष्टी, धोरण लक्षांत येईल. संसद भवनाची इमारत जी आजही अत्यंत मजबूत आहे, त्याला कुठंही धक्का लागलेला नाही, तरीही नवं संसदभवन 'सेंट्रल विस्टा' उभं करण्याचा ध्यास त्यांनी घेतला. आणि तो पूर्णत्वाला नेलाय. ज्यावेळी नव्या संसदभवनाचा विषय मोदींनी जाहीर केला त्यावेळी खूप टीका झाली. संसदभवन अद्यापि मजबूत असतानाही नव्या संसद भवनाची गरज ती काय, कशासाठी अब्जावधी रुपये खर्च केले जाताहेत? असे प्रश्न उपस्थित केले गेले. पण एकदा का निर्णय घेतला तर तो कोणत्याही स्थितीत पूर्णत्वाला नेणं ही मोदींची खासियत आहे. आजमितीला ती इमारत 'सेंट्रल विस्टा' जवळपास बांधून तयार झालीय. जुन्या संसदभवनात ५४८ खासदारांना बसता येईल अशी तजवीज आहे, पण नव्या सेंट्रल विस्टा मध्ये ८८८ हून अधिक म्हणजे जवळपास नऊशे ते हजार खासदार सहजपणे बसू शकतील अशा त्या भव्यदिव्य सभागृहाची निर्मिती करण्यात आलीय. तेव्हा लोकांनी त्यांना विचारलं की, नऊशे खासदारांचं सभागृह कशासाठी निर्माण केलंय? याला विरोधकांकडेच नाही तर सत्ताधारी भाजपकडंही समाधानकारक उत्तर नव्हतं. पण राजकारणातले चाणक्य समजले जाणारे नरेंद्र मोदी, अमित शहा आणि संघ यांच्या डोक्यात काही वेगळंच होतं. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सत्ता मिळविण्याबरोबरच आगामी ३०-४० वर्षे ते टिकविण्यासाठी केलेला प्रयत्न आहे. सध्या बैठकीची व्यवस्था असलेल्या खासदारांच्या संख्येत जवळपास दुपटीनं वाढ होतेय याचा जर बारकाईनं विचार केला तर लक्षात येईल की, किती लांबचा विचार ही मंडळी करताहेत. पूर्वी ५४३ खासदार निवडले जात मग आता त्यांची संख्या आठशेहून अधिक अन का कशी होतेय? आज आपल्या शहरातून एक खासदार निवडला जातोय यापुढे दोन खासदार निवडले जातील. हा सत्तेसाठीचा संख्यांचा खेळ आहे तसाच तो धोरणाचाही आहे. यामागे मोदींची दूरदृष्टी मानावीच लागेल. मोदींचा खासदारांच्या संख्याचं गणित लक्षांत घेतलं तर राजकारणाचा डावही लक्षांत येईल. आगामी काळात म्हणजे २०२६ दरम्यान लोकसभेच्या मतदारसंघाची पुरर्चना केली जाणार आहे. मतदारसंघाची रचना ही लोकसंख्येच्या आधारे केली जात असते. त्यामुळं उत्तरप्रदेश आणि बिहार इथल्या खासदारांची संख्या जवळपास दुप्पट होणार असल्याने भाजपनं ह्या दोन्ही राज्यावर आपलं वर्चस्व निर्माण केलं तर केंद्राची सत्ता भाजपला सहजसाध्य आहे. पण उत्तरप्रदेशात अखिलेश यादव आणि बिहारमध्ये तेजस्वी यादव जर एकत्र आले तर मात्र हे दोघे किंगमेकर बनतील.

लोकसभेच्या मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर उत्तरप्रदेशात १४६ तर बिहारमध्ये ७९ म्हणजे अशा २२२ जागा होतील. 'सेंट्रल विस्टा'ची निर्मिती करतानाची वेळ पाहिली तर आपल्याला धक्का बसेल देशभरात कोरोनानं उच्छाद मांडलेला होता. ऑक्सिजनचा तुटवडा होता. असं एकही स्मशान नव्हतं की, जिथं मृतदेहाच्या रांगा लागल्या नव्हत्या. देशासमोरच्या साथीच्या रोगाच्या काळात याचं बांधकाम सुरू केलं गेलं होतं.  यामागचं राजकारण काय आहे हे नव्यानं साकारणाऱ्या लोकसभेच्या जागांची राज्यवार संख्या पाहिली तर सगळं काही समजेल. उत्तरप्रदेशात आजमितीला ८० जागा आहेत. ती वाढून आता तब्बल १४३ होणार आहे. बिहारच्या ४० जागांऐवजी ७९ जागा होतील. मध्यप्रदेशातल्या २९ जागांची संख्या ५२ होईल. महाराष्ट्राच्या ४८ जागांच्या ठिकाणी ७६ जागा होतील. राजस्थानात २५ आहेत त्या ५० होतील. तर गुजरातमध्ये २६ आहेत त्या ४३ होतील. म्हणजे या प्रमुख सहा राज्यात २४८ जागा आहेत त्या वाढून तब्बल ४४३ होतील. उत्तराखंड, उत्तरांचल जर धरले तर  आज जी लोकसभेची सदस्यसंख्या आहे त्याच्या जवळपास ही संख्या जातेय. या सहा राज्यात मोदींनी जर हिंदू-मुस्लिम, मोफत रेशन, वा इतर गोष्टींचा वापर केला तर मोदींना दक्षिणेकडे फिरकण्याची गरजच पडणार नाही. ही पांच-सहा राज्ये जिंकली तर त्यांना इतरत्र काही विशेष प्रयत्न करण्याची गरजच उरणार नाही. यासाठी अमित शहा, योगी आदित्यनाथ सज्ज झालेत. आता आपल्याला कळून चुकलं असेल की 'सेंट्रल विस्टा' का बांधलं आणि लोकसभेच्या जागा का वाढवल्यात. मतदारसंघ आणि त्याची संख्या याचा थोडासा मागोवा घेतला तर  १९७१ साली, त्यावेळी इंदिरा गांधी प्रधानमंत्री होत्या. देशातली लोकसंख्या वेगानं वाढत होती. आजच नाही तर तेव्हाही लोक म्हणत होते की, लोकसंख्येचा विस्फोट होतोय, ती चीनपेक्षा अधिक होतेय. तेव्हा विचार केला गेला की, लोकसंख्येच्या प्रमाणात लोकसभेच्या जागा वाढविल्या पाहिजेत. संविधानात स्पष्टपणे म्हटलं आहे की, संसदेत लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व द्यायला हवंय. क्षेत्रफळाच्या आकारावर नाही. उत्तरप्रदेशाहून क्षेत्रफळाच्या दृष्टीनं राजस्थान, मध्यप्रदेश ही मोठी राज्ये आहेत. मात्र तिथल्या लोकसभेच्या जागा खुप कमी आहेत. १९७१ च्या जनगणनेच्या तुलनेत लोकसभा सदस्यांची संख्या खुप कमी होती. म्हणून मग इंदिरा गांधींनी त्यांची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला होता. १९७१ साली लोकसंख्या होती ५४.७९ कोटी तर खासदारांची संख्या होती ५२१. मात्र २०२२ मध्ये लोकसंख्या तिप्पट झाली म्हणजे ती १४० कोटीहून अधिक पण लोकसभेच्या जागा काही वाढल्या नाहीत. तेवढ्याच राहिल्या. लोकसंख्या वाढीचा वेग लक्षांत घेता २०२६ दरम्यान हीच लोकसंख्या १४८ हून अधिक होईल त्याच्या अनुषंगानं लोकसंख्येच्या प्रमाणात खासदारांची संख्या ८४८ इतकी असेल.

यापूर्वी आपण उत्तर-पश्चिमेकडील राज्यांची लोकसंख्या आणि वाढलेली खासदारांची संख्या जशी दुप्पट होतेय तशी दक्षिणेकडील राज्यात मात्र फारसा फरक पडलेला दिसत नाही.  खासदारांची संख्या जवळपास तेवढीच राहील. कारण लोकसंख्या इतरत्र जशी वाढलीय तशी दक्षिणेकडील राज्यात वाढलेली नाही. एका तज्ज्ञाच्या रिसर्च पेपरनुसार उत्तरेकडं वाढलेली लोकसंख्या आणि त्यानुसार वाढणारी खासदारांची संख्या पाहता दक्षिणेकडील राज्यांवर अन्याय होणार आहे. वर ज्याप्रमाणे आपण उत्तर-पश्चिमेकडील संख्या पाहिली आता दक्षिणेकडील पाहू या. तामिळनाडूत आज ३९ खासदारांच्या संख्या आहे त्यात केवळ १० ची वाढ होऊन ती ४९ होईल. केरळात काहीही वाढ झालेली नाही ज्या २० जागा आज आहेत, तेवढ्याच २० जागा असणार आहेत. आंध्रप्रदेश आणि तेलंगणाच्या ४२ जागा आहेत त्या ५४ होतील. कर्नाटकात २८ जागा आहेत त्या वाढून ४१ होतील. म्हणजेच सध्या अस्तित्वात असलेल्या १२९ जागा आहेत त्या १६४ होतील. म्हणून सरकारच्या लोकसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेला दक्षिणेतल्या खासदारांनी विरोध केलाय. लोकसंख्येच्या आधारावर मतदारसंघाची पुनर्रचना करू नका अशी त्यांनी मागणी केली. दक्षिण भारतातल्या खासदारांचं म्हणणं आहे की, आम्ही लोकसंख्या नियंत्रित केलीय. आमच्या सरकारांनी खूप चांगलं काम केलंय आणि लोकसंख्या नियंत्रित केलीय. देशाच्या दृष्टीनं आम्ही अत्यंत चांगलं काम केलंय. त्या चांगल्या कामाची ही बक्षिसी आहे की, सजा दिली जातेय? आमच्या जागा कमी होताहेत, तिथं बिहार-उत्तरप्रदेशात जंगलराज आहे. लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढतेय. तिथं बेलगाम संख्या वाढलीय. तिथं लोकांमध्ये बदहाली वाढलीय. भ्रष्टाचार वाढलाय. जी आजारी राज्ये आहेत त्यांची संख्या हेतुपूर्वक वाढविली जातेय. ज्यांनी राज्याचं वाटोळं केलं त्यांना खासदारांची संख्यावाढीची बक्षिसी दिली जातेय आणि ज्यांनी राज्ये व्यवस्थित चालविलीत त्यांच्या संख्या कमी केलीय जातेय. ज्यांनी चांगलं अडमिनिस्ट्रेशन केलंय त्यांना सजा दिली जातेय. याच्या परिणामाची चिंता केली जात नाही. मात्र गोदी मीडिया यावर काहीच बोलत नाहीये. भाजप आणि संघाचं पुढल्या तीस वर्षाचं लक्ष्य टार्गेट आहे की, त्यांना त्याकाळात सत्तेवर राहायचंय म्हणूनच त्यांनी मतदारसंघाची फेररचना आणि नवं संसदभवन 'सेंट्रल विस्टा' उभं केलंय. उत्तरप्रदेश, बिहार, मध्यप्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, गुजरात या राज्यात भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं वर्चस्व आहे. यामुळं दक्षिण भारत विरुद्ध उत्तर भारत असा संघर्ष उभा राहीलंय. हे एक मोठं आव्हान आहे. देशाला वाचवायचं आहे. हा संघर्ष होणं योग्य नाही. देशाच्या या  दोन भागात विघटन होणं योग्य नाही. या सगळ्या घडामोडीवर राहुल गांधी यांचे बारीक लक्ष्य आहे. भारत जोडो साठी त्यांनी दक्षिण भारताचा आधार घेतलाय. मोदींचं प्लॅनिंग खूप छान असतं. आता नव्यानं हिंदू-मुस्लिम बरोबरच दक्षिण-उत्तर असा वाद निर्माण होतोय. हिंदी-नॉनहिंदी असा लढा उभा केलाय. आधीच हिंदीविरोधी आंदोलन तिथं जोर पकडत असतानाच हे असं घडत असल्याच्या चाहुलीनं तिथं असंतोष निर्माण होण्याची शक्यता आहे.

राज्यघटनेनुसार मतदारसंघ पुनर्रचनेचा लोकसंख्या हा मुख्य निकष आहे.  प्रत्येक जनगणनेनंतर मतदारसंघाची पुनर्रचना करण्याचा अधिकार घटनेनं संसदेला दिलाय. एका लोकसभा मतदारसंघासाठी सरासरी १० लाख ४३ हजार ४७५ एवढी लोकसंख्या आवश्यक आहे. १९७६ मध्ये करण्यात आलेल्या ४२ व्या घटनादुरुस्तीत  १९८१ आणि १९९१ च्या जनगणनेनुसार मतदारसंघ पुनर्रचनेला प्रतिबंध घालण्यात आलाय. या घटनादुरुस्तीला २००१ मध्ये कायद्यात रुपांतर करण्यात आलं. तेव्हा २००१ च्या जनगणनेप्रमाणेच २०२६ पर्यंत मतदारसंघ कार्यरत राहतील, अशी तरतूद करण्यात आलीय. त्यामुळं घटनेनं प्रत्येक जनगणनेनंतर मतदारसंघ पुनर्रचनेचा घालून दिलेला नियम संसदेच्या कायद्यानं संपुष्टात आला आहे. १९५३ मध्ये संसदेत कायदा करुन परिसीमन आयोग नेमण्यात आला. त्यानंतर १९५३, १९६३, १९७३, २००२ मध्ये प्रत्येकवेळी संसदेत कायदा करुन ४ वेगवेगळ्या परिसीमन आयोगाची स्थापना करण्यात आली. प्रत्येक जनगणनेनंतर लोकसभेच्या आणि राज्यातल्या विधानसभेच्या मतदार संघाची पुनर्रचना करण्याची संविधानात तरतुद आहे. या तरतुदीची अंमलबजावणी करण्याचे संपुर्ण अधिकार संसदेलाच आहे. संविधानाप्रमाणे सन १९५३, १९६३ आणि १९७३ ला मतदार संघाची पुनर्रचना झालीय. मात्र, ‘परिसीमन कायदा १९७२’  मतदारसंघ पुनर्रचनेच्या दृष्टीनं सर्वाधिक महत्वपुर्ण मानला जातो. या कायद्यात राखीव जागाची निश्चिती, प्रशासकीय सीमांचा निकष, लोकसंख्येचा निकष याबाबींचा अभ्यासपुर्वक विचार केला गेला. या दुरुस्त्यांना १९७६ मध्ये ४२ वी घटना दुरुस्ती करुन बळ देण्यात आले. त्यावेळी देशाची लोकसंख्या केवळ ५५ कोटी होती. मात्र, या सुधारणेला आता पंचेचाळीस वर्षं लोटली आहेत. त्यावेळेच्या तुलनेत आज लोकसंख्या जवळपास तिप्पट वाढलीय. म्हणूनच आता मतदारसंघ पुनर्रचनेवर लावण्यात आलेल्या बंदीविषयी पुनर्विचार करण्याची गरज आहे. संसदेनं १० वर्षाऐवजी २० वर्षानं मतदारसंघांची पुनर्रचना करण्याचे ठरविल्यानं २०२६ पर्यंत पुन्हा पुनर्रचना होणार आहे. नव्या पुनर्रचनेत जागांची संख्या वाढेल. त्यात उत्तरेकडच्या जागा अधिक वाढतील. त्या तुलनेत दक्षिण भागात जागा कमी वाढतील.२०२६ मध्ये पुनर्रचना झाल्यास त्यासाठी कमीत कमी ५ ते ७ वर्षं लागतील. त्यामुळे असं मानलं पाहिजे की त्यानंतरच्या निवडणुकांमध्ये लोकसंख्या बघता लोकसभेत आठशे ते हजार जागा होतील. २०११ च्या जनगणनेनुसार उत्तरप्रदेशची लोकसंख्या १९.९ कोटी आहे. तर तामिळनाडूची ७ कोटी आणि कर्नाटकची ६ कोटी आहे. तर उत्तर प्रदेशात लोकसभेच्या ८० जागा आहेत. तामिळनाडू आणि कर्नाटकात क्रमशः ३९, २८ जागा आहेत. बिहारची लोकसंख्या १० कोटी आहे आणि तिथे लोकसभेच्या ४० जागा आहेत. तर ९ कोटी लोकसंख्या असलेल्या प. बंगालमध्ये लोकसभेच्या ४२ जागा आहेत. केरळ २०, कर्नाटक २८, तामिळनाडू ३९, आंध्र प्रदेश २५, आणि तेलंगणा १७ या सर्व राज्यांचे मिळून एकूण १२९ खासदार लोकसभेत जातात. या तुलनेत उत्तर भारतातील बिहार ४०, उत्तर प्रदेश ८० आणि प. बंगाल ४२ या केवळ तीन राज्यांचे मिळून १६४ खासदार आहेत. राज्यांमध्ये आधीच असमतोलाची भावना आहे. २०१८ साली वित्त आयोगात महसूलाच्या वितरणाबाबत दक्षिण भारतातल्या राज्यांनी नाराजी व्यक्त केली होती. उत्तरभारताचं ओझं दक्षिण भारतानं का वाहावं, असा त्यांचा सवाल आहे. लोकसभेची सदस्यसंख्या आठशे ते हजार झाल्यास महिलांना जास्त प्रमाणात प्रतिनिधित्व मिळेल. संसदेची सदस्यसंख्या वाढवणं आणि लहान मतदारसंघ यांचा जनतेला नक्कीच फायदा होईल. एक खासदार १६ ते १८ लाख लोकांचं प्रतिनिधीत्व करत असेल तर तो खरंच इतक्या लोकांशी संपर्क कसा ठेऊ शकेल? शिवाय खासदाराला जो विकासनिधी मिळतो तोदेखील अपुरा पडेल. केवळ संपर्काविषयी बोलायचं तर अशा परिस्थितीत खासदार आपल्या मतदारसंघातील लोकांना केवळ एक पोस्टकार्ड पाठवू शकेल. यापूर्वी संसदेत महिला खासदारांना आरक्षण देण्याचा विषय आला होता त्यावेळी देखील जागा वाढवण्याची चर्चा झाली होती. वेगवेगळ्या पक्षांनी याला विरोध करण्याचं खरं कारणही हेच होतं. मात्र जागा वाढल्या आणि महिलांना आरक्षणही मिळालं तर ते देखील फायद्याचंच ठरेल अडचणी तर येतीलच. मात्र, सरकारने विचार करून काहीतरी मार्ग काढायला हवा. उघड आहे याचा फायदा स्पष्टपणे उत्तर भारतालाच होईल. आजही संसदेत दक्षिण भारताच्या कमी जागा आहेत. यावरून आधीच नाराजी आहे. जागा वाढल्या तर तणाव वाढेल. कारण उत्तर प्रदेश विधानसभेची सदस्यसंख्या ४०३ इतकी आहे आणि दक्षिण भारतातल्या कुठल्याही राज्याच्या विधानसभेत एवढी सदस्यसंख्या नाही. मतदारसंघाची पुनर्रचना करताना लोकसंख्येच्या आकडेवारीसोबतच इतर निकषांचाही विचार व्हायला हवा. उदाहरणार्थ एखाद्या राज्यानं लोकसंख्येवर नियंत्रण मिळवलं असेल किंवा तुम्ही इतरांच्या तुलनेत जास्त विकास केला असेल किंवा तुम्ही स्वतः केलेल्या मेहनतीमुळं तुमचा जीडीपी इतरांच्या तुलनेत चांगला असेल तर..., हे देखील निकष मानले गेले पाहिजेत. यासंदर्भात विचार करायला सुरुवात केली तर काहीतरी मार्ग नक्कीच निघेल. सर्व गोष्टींकडं नव्यानं बघण्याची गरज आहे. यातून काहीही वाईट निघणार नाही. खुल्या मनाने नव्या पद्धतीविषयी विचार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. जेणेकरून संसदेत जाणारे प्रतिनिधी खऱ्या अर्थानं आपल्या मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करू शकतील.
हरीश केंची
९४२२३१०६०९

'इंडिया शायनिंग' ते 'मोदी की गॅरंटी...!'

"एकचालुकानुवर्तीत पक्ष आणि सत्ताधारी असं रूप 'लोकशाहीची जननी' म्हणवणाऱ्या देशात आकाराला येतंय. सामूहिक नेतृत्वाची प...