Saturday 29 July 2017

विपक्षमुक्त भारत! एकाधिकार युगाचा आरंभ

 *विपक्षमुक्त भारत! एकाधिकार युगाचा आरंभ!!*

" मोदींना आव्हान देण्यासाठी उभे ठाकलेले ममता, मुलायम, मायावती, लालूप्रसाद यांचं राजकीय अस्तित्व आता संकटात आलंय. राहुल आणि त्यांची काँग्रेस दिशाहीन बनलीय. साम, दाम,दंड,भेद ही चाणक्यनीती वापरीत भाजपेयींनी, मोदी शहांनी गतकाळातल्या दिग्गजांचा, वर्तमानातल्या राजकीय धुरंधरांचा आणि भविष्यातल्या उत्साही आणि उथळ अशा आपल्या प्रतिस्पर्धकांचा सफाया चालविलाय, नितीशकुमार यांचे आव्हानही संपुष्टात आलंय.भाजपने निर्धार केल्याप्रमाणे केवळ 'काँग्रेसमुक्त भारत' च नव्हे तर 'विपक्षमुक्त भारत' होईल काय याची भीती वाटतेय. असे झाले तर  'लोकशाही'त 'एकाधिकारयुगा'चा आरंभ होईल. अगदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं स्वप्न पाहिलेल्या 'एकचालकानुवर्तीत' साम्राज्याचा...!
____________________________

 लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपेयींनी 'काँग्रेसमुक्त भारत' अशी घोषणा मतदारांसमोर केली होती. आता आपण केवळ साधनसुचिता धारण करणारे नाही तर 'शठ्यम प्रती शाठ्यम' म्हणत आक्रमकपणे चाल करून जाणारे बनलो आहोत, याचा प्रत्यय त्यांनी करून दिलाय.राजकारणात विरोधी पक्षावर कुरघोडी करीत सत्ता मिळवणं हा एकमेव हेतू असतो. पण प्रतिस्पर्धकांची पुरती ओळखच पुसून टाकण्या इतपत आक्रमकतेचा परिचय भाजपेयींच्या तीन वर्षांच्या कार्यकाळात जनतेला झालाय. साम, दाम, दंड, भेद यासारख्या चाणक्यनीतीतील आयुधांचा वापर करण्यात तरबेज असलेल्या शिर्षस्थ भाजपेयी नेतृत्वाने काँग्रेसचं नाही तर, विरोधीपक्षाला संपविण्याचा प्रयत्न चालविला आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक यश मिळविले, आणि ५४१ सदस्यसंख्या असलेल्या संसदेत २८२ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवलं. तब्बल तीस वर्षे आघाडी सरकारांनी ग्रासलेल्या संसदेला मुक्त करीत एक हाती सत्ता मिळविली. या यशाचं श्रेय नरेंद्र मोदींच्या करिष्म्याला आणि अमित शहा यांच्या राजकीय कुटनीतीला द्यावे लागेल. निवडणूक निकालानंतर 'देशात स्पष्ट बहुमत मिळाले असले तरी, केवळ ३१ टक्के मतदारांनी भाजपला मते दिलीत तर ६९टक्के मतदारांनी भाजपला स्वीकारलेले नाही!' अशी टीका विरोधकांनी केली होती. पण आज भाजप अशा स्थितीत जाऊन पोहोचला आहे की, आगामी निवडणुकीत या टीकेला आरोपाला सणसणीत उत्तर देईल. स्वातंत्र्यप्राप्ती नंतर पंडित नेहरू, इंदिरा गांधी यांचा एक करिश्मा होता, जनमानसावर पगडा होता, ही वस्तुस्थिती मान्य करावी लागेल की, त्यांनादेखील कधीच ५० टक्क्यांहून अधिक मतं मिळविता आलेली नाहीत. फक्त एकदाच इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर झालेल्या निवडणुकीत सहानुभूतीच्या लाटेत ५१४ पैकी ४१४ जागा जिंकल्या होत्या , तेव्हा काँग्रेसला ४९.१ टक्के मते मिळाली होती. आजवरचा तो एक विक्रमच आहे. त्याला आजवर कुणी धक्का लावलेला नाही. भाजपेयींनी मात्र 'सत्तेसाठी सारं काही' म्हणत; त्याज्य-स्वीकार्य, नैतिक-अनैतिक या साधनसुचिता दर्शविणाऱ्या बाबी दूर सारून नीती-अनितीचे सारे मार्ग अवलंबिले आहेत. हे सारे पाहता २०१९ च्या निवडणुकीत भाजपने विक्रमी मतं मिळविली तर आश्चर्य वाटायला नको. कारण भाजपेयी सरकारनं कोणताही निर्णय घेतला की, तो जनसामान्यासाठी योग्यच आहे असं समजलं जाऊ लागलंय. आता खोटं देखील खरं वाटायला लागलंय.

भाजपेयींचा दांभिकपणा पदोपदी जाणवतोय. एकेकाळी पीडीपी हा देशद्रोही पक्ष आहे. पाकिस्तानचा दलाल आहे अशी जहरी टीका भाजपेयी करीत असत. त्याच पीडीपी बरोबर जम्मू काश्मिरात सत्तासाथीदार बनल्यावर त्यांना त्यांनी निर्विवादपणे स्वीकारले. काश्मिरात अशांती, तणाव दंगली, सैनिकांवर हल्ले  ही स्थिती जशीच्या तशीच आहे तरीपण तो केंद्र सरकारचा दोष म्हटले जात नाही. महागाई भडकली तरी ती आता राष्ट्रहिताची वाटू लागलीय. सरकारच्या कोणत्याही धोरणाचं, निर्णयाचं कौतुक करताना केवळ मंत्री, नेतेच नव्हे तर कार्यकर्तेही थकत नाहीत. ही राजकीय स्थिती पक्षासाठी उत्साहवर्धक असली तरी लोकशाहीच्या दृष्टीनं हितावह खचितच नाही.

विरोधीपक्षांत असताना भाजपेयी 'सीबीआयच्या दुरुपयोग' सत्ताधारी काँग्रेस करते आहे अशी कडाडून टीका करीत असत. प्रसिद्दीमाध्यमेही टीकेची राळ उठवीत. सत्तेचा दुरुपयोग होतोय असा कांगावा केला तर जनतेमध्ये असंतोष निर्माण होण्याची शक्यता असते. इंदिरा गांधींच्या काळात सीबीआयचा दुरुपयोग विरोधकांना तुरुंगात डांबण्यासाठी झाला होता, परंतु त्याचा परिणामाला त्यांना सामोरं जावं लागलं होतं. पण आज तशी भीती भाजपेयींना वाटतच नाही. कारण विरोधकांवर जनतेचा विश्वासच राहिलेला नाही तसाच तो प्रसिद्धी माध्यमांवरही नाही. शिवाय सरकार अशा बाबतीत कशाचीही दखल घ्यायलाही तयार नाही. सगळं राजकारण एका वेगळ्या दिशेनं वाटचाल करते आहे.

सीबीआय वा इतर कोणत्याही तपास यंत्रणेने निष्ठेनं आणि प्रामाणिकपणे काम केलं तर, स्वच्छ चारित्र्याचा, प्रामाणिक राजकीय नेता शोधायला फार कष्ट घ्यावे लागतील. तपास यंत्रणेचा वापर सत्ताधारी करतात हे आता लपून राहिलेलं नाही. काँग्रेस आघाडीचं सरकार असताना मोदी आणि शहांच्या विरोधात असा वापर झाला होता. आता पलटवार सुरू आहे. तेच हत्यार अधिक धारदारपणे तीव्रपणे परिणामकारकरीत्या वापरले जात आहे. पूर्वी या कारवाया निंदनीय ठरत, पण आज त्या अभिनंदनीय ठरताहेत. या साऱ्या प्रकारामुळे राजकारणाची चिंता वाटत नाही, तर लोकांच्या बदलत्या मानसिकतेची वाटते आहे. याबाबत विरोधकही तेवढेच जबाबदार आहेत.

त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सरकार आणि केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन हे दोघेही डाव्या पक्षाचे आहेत. या व्यतिरिक्त देशातील प्रत्येक राजकीय नेता हा कोणत्या ना कोणत्या गुन्ह्यात अडकलेला आहे. लालूप्रसाद यादवांसारखा खुले आम भ्रष्टाचार करणारा, दोषी ठरलेला नेता, नव्या पिढीच्या मानसिकतेचा विचार न करता अल्पसंख्याकांचे तुष्टीकरण करणारे मुलायमसिंग, दिशाहीन, प्रभावहीन, आणि अविश्वसनीय ठरलेले राहुल गांधींसारखे राजकीय नेते भाजपच्या समोर असतील तर आगामी निवडणुकीत भाजपेयींना फारसे कष्ट घ्यावे लागणार नाहीत. कारण प्रभावी विरोधक समजले जाणारे नेते भाजपच्या वळचणीला आले आहेत. त्यातही विरोधकांनी असपल्या वागण्यानेच भाजपचा मार्ग सोपा केलाय.

बिहारमधील महागठबंधन उध्वस्त करून नितीशकुमार यांना आपल्या दावणीला बांधून टाकलंय. तिथली सता हस्तगत केलीय. खरं तर गेली चार वर्षे सत्ताहीन बनलेल्या भाजपेयींची पक्ष संघटन विस्कळीत झाले होते, सत्तेशिवाय त्याचं संघटन होणं कठीण आहे याची जाणीव भाजपेयी वरिष्ठ नेत्यांना झाली होती, त्या तुलनेत राजदची पक्ष संघटना मजबूत होती. निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांच्याशी भाजपनं आघाडी केली होती, पण बिहारी जनतेनं त्यांना धोबीपछाड लावली होती. तेव्हा अडवाणी यांच्यासह वरिष्ठ भाजप नेत्यांनी उघडपणे अमित शहा यांच्यावर टीका केली होती. आता अमित शहांनी मागील दाराने का होईना बिहारची सत्ता पक्षाला मिळवून दिली....'जनाधारकी ऐसी की तैसी'! शेवटी जो जिता वही सिकंदर...!

बंगालमधील राजकीय स्थिती संवेदनशील बनली आहे. ममता बॅनर्जी तिथं एवढया अडकल्या आहेत की, त्यांना कलकत्ता सोडणं शक्य नाही. गुरखालँड आंदोलनाने उग्र रूप धारण केलंय. हे थांबलं तर नारदा, शारदा, रोझवेली, व इतर चिटफंडच्या केसेस सुरू होतील, शिवाय मिदनापोर, २४परगणा इथे जातीय दंगली उसळल्या आहेत. अशा वातावरणात राष्ट्रीय राजकारणात येऊन मोदींना आव्हान देण्याची ताकदच उरली नाही, वेळही नाही. व्यंकय्या नायडूंच्या माध्यमातून दक्षिणेकडे भाजपने आगेकूच आरंभलीय. कर्नाटकात सत्तेने पुनरागमन करण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केलीय. कर्नाटकात संख्येने सर्वाधिक आणि राजकारणावर प्रभाव असलेल्या लिंगायत समाजाला आपल्याकडे वळविण्यात भाजपला यश आलंय. लिंगायत समाजाच्या येडीयुरप्पा यांच्याकडे कर्नाटकाची सूत्रे सोपविण्यात आलीय. आंध्रप्रदेशात आणि तेलंगणात भाजप कमकुवत आहे, त्यांचं तिथं अस्तित्वच दिसत नाही. पण तेलुगु देशम आणि तेलंगण राष्ट्रसमिती यांच्याशी भाजपची आघाडी आहे. तामिळनाडूत भाजपेयींनी कंबर कसलीय. शशिकला, पनीरसेल्वम, रजनीकांत यासारख्या मोहरांवर त्यांनी गळ टाकला मात्र त्यांना तिथं अपयश आलं. आता नव्या नेत्यांची जुळवाजुळव सुरू आहे. तीन वर्षांपूर्वी भाजपेयी सत्तेवर आल्यानंतर काँग्रेस एवढी निष्प्रभ होईल असं वाटलं नव्हतं, कारण काँग्रेसची पाळंमुळं खोलवर रुजलेली होती, काही वर्षापूर्वी काँग्रेसकडे देशात एकहाती सत्ता होती, आज ती गलितगात्र झालीय. लालू, मुलायम, मायावती, ममता आणि तत्सम नेत्यांची सद्दी आता संपत आलीय.वाचाळ केजरीवाल यांनी मौन धारण केलंय. २०१९ पर्यंत अशीच स्थिती देशात राहिली तर देश केवळ भाजपेयींच्या इच्छेनुसार 'काँग्रेसमुक्त भारत' नव्हे तर 'विपक्षमुक्त भारत' सुद्धा होऊ शकेल. आणि देशात ५०टक्क्यांहून अधिक मतं मिळविणारा पक्ष म्हणून भाजप उदयाला आला तर आश्चर्य वाटणार नाही. शेवटी हे यश, ही सफलता भाजपेयींची असेल. यात लोकशाहीने काय मिळवलं आणि काय गमावलं याचा विचार राजकीय निरीक्षकांना, विचारवंतांना करावा लागेल.

मोदींना आव्हान देण्यासाठी उभे ठाकलेले ममता, मुलायम, मायावती, लालूप्रसाद यांचं राजकीय अस्तित्व आता संकटात आलंय. राहुल आणि त्यांची काँग्रेस दिशाहीन बनलीय. साम, दाम,दंड,भेद ही चाणक्यनीती वापरीत भाजपेयींनी, मोदी शहांनी गतकाळातल्या दिग्गजांचा, वर्तमानातल्या राजकीय धुरंधरांचा आणि भविष्यातल्या उत्साही आणि उथळ अशा आपल्या प्रतिस्पर्धकांचा सफाया चालविलाय, नितीशकुमार यांचे आव्हानही संपुष्टात आलंय.भाजपने निर्धार केल्याप्रमाणे केवळ 'काँग्रेसमुक्त भारत' च नव्हे तर 'विपक्षमुक्त भारत' होईल काय याची भीती वाटतेय. असे झाले तर  'लोकशाही'त 'एकाधिकारयुगा'चा आरंभ होईल. अगदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं स्वप्न पाहिलेल्या 'एकचालकानुवर्तीत' साम्राज्याचा...!
- हरीश केंची,

Saturday 22 July 2017

भाजपचे दक्षिणायन


 *भाजपेयींचे दक्षिणायन...!*

"दक्षिणेकडील राज्ये ही भाजपेयींसाठी वाळवंटच पण तिथंही ओएसिस शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. पश्चिम आणि उत्तरेकडील राज्यात भाजपनं आपलं बस्तान बसवलंय, पूर्वेकडील राज्यात हातपाय पसरायला सुरुवात झालीय. पण दक्षिणेकडे काही त्यांना अपेक्षेप्रमाणे यश मिळत नाही. आगामी २०१९च्या निवडणुकीत उत्तरेकडील राज्यात आज जेवढया जागा मिळाल्या आहेत तेवढया मिळतील असे नाही. हे मोदी शहा जाणतात. आज लोकसभेत जे स्पष्ट बहुमत मिळालं आहे तेवढ्या जागा मिळविताना उत्तरेकडे काही दगाफटका झालाच तर तो खड्डा भरून काढण्यासाठी दक्षिणेकडील राज्यांवर भाजपनं लक्ष केंद्रित केलं आहे. उपराष्ट्रपती पदासाठी व्यंकय्या नायडू यांची जाहीर केलेली उमेदवारी हेच दर्शवतय! त्यासाठीचं हे भाजपेयींच दक्षिणायन...!"

----------------------------------------------
 अपेक्षेप्रमाणे रामनाथ कोविंद हे भारताचे १४वे राष्ट्रपती म्हणून निवडून आले. भारताचं राजकारण कोणत्या दिशेनं चाललंय त्याचं हे एक उत्तम उदाहरण! भाजपेयींनी इतर पक्षांपेक्षा दोन पावलं पुढं जाऊन राजकीय दूरदृष्टीने धोरणं, चाली, त्यासाठीचे आयोजन आणि नियोजन केलेलं दिसतंय. राजकीय धुरंधर असलेल्याच हे काम. आणि हे काम मोदी आणि शहा यांनी देशाच्या वर्तमान राजकारणाच्या शर्यतीत चोख बजावलं आहे. ते सर्वच पातळ्यांवर इतर राजकीय पक्षांपेक्षा वरचढ ठरताना दिसले. २०१९ आणि २०२४ च्या निवडणुकीसाठीची व्यूहरचना म्हणून त्यांनी राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकांना नवा आयाम दिल्याचं दिसलं.

रामनाथ कोविंद आणि मिराकुमार यांच्यातील निवडणूक औत्सुक्याची असेल असं वाटत असतानाच ती एकतर्फीच झाली. कोविंदांना एनडीएचे उमेदवार म्हणून जी मतं अपेक्षीली होती त्याहून कितीतरी अधिक मतं त्यांना मिळाली. युपीएच्या मिराकुमार यांना आपल्याच साथीदारांना आपल्याकडं राखणं शक्य झालं नाही. अशी स्थिती जर विरोधी पक्षाची असेल तर भाजपला शह युपीए कसा देऊ शकेल? ही एक शंकाच आहे. या निवडणुकीत कोविंदांसाठी भाजपेयींनी जी मोर्चेबांधणी केली होती त्यात अनेक पक्ष गुरफटले, काहींची फरफट झाली तर काहींनी 'क्रॉस व्होटींग' केल्याची चर्चा आहे. महाराष्ट्रातही काँग्रेस राष्ट्रवादीची मते फुटली.

आता साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत त्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीकडे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत काँग्रेसनं आपलं घोडं पुढं दामटलं. त्यानं विरोधीपक्ष नाराज झाला. उपराष्ट्रपतीपदासाठी आपली ताकद नाही हे दिसताच काँग्रेसनं नमतं घेतलं, मित्रपक्षांनी सुचविलेल्या गोपालकृष्ण गांधी यांच्या नावाला मान्यता द्यावी लागली. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत युपीएत एकजूट राहिली नाही तशी महागठबंधन राहिलं नाही. संख्याबळाचा विचार करता उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक ही केवळ औपचारिकता उरलीय.

इथं एक महत्वाचं की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघांची विचारधारा राजकारणात व्यापकदृष्ट्या रुजविण्यासाठी संघाचे द्वितीय सरसंघचालक मा.स. गोळवलकर गुरुजींच्या प्रेरणेने जनसंघाची रचना झाली आणि याच जनसंघातून भाजप अस्तित्वात आला. स्थापनेपासून हा उजव्या विचाराचा पक्ष उत्तरेकडील राज्यांपुरताच राहिला. एकेकाळी संसदेत केवळ दोन सदस्य असलेला भाजप नरेंद्र मोदींची प्रशासकीय राजनीती आणि अमित शहा यांच्या व्यूहात्मक नेतृत्वाने आपल्या राजकीय वाटचालीतील सुवर्णकाळ अनुभवतो आहे. त्यांनी जिथं संघाचा विचार रुजला होता तिथे तो आणखी मजबूत केला. जिथं थोडाफार जनाधार होता तिथं आज सत्ताधारी बनवलं. आसाम आणि पूर्वेकडील राज्यात कधी स्वप्नवत वाटणारं यश संपादन करीत, एकहाती सत्ता घेतली. आता त्यांची नजर दक्षिणेकडे लागलीय. तसे व्यंकय्या नायडू हे उपराष्ट्रपतीपदासाठी राजी नव्हते. पण दक्षिणेकडील एक वफादार नेता म्हणून मोदी शहांनी त्यांची निवड केली. मोदी शहांची ही राजकीय मोर्चेबांधणी होती. २०१९ च नव्हे तर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठीच्या हा 'गेम प्लॅन' आहे त्यासाठी नायडू यांना मोहरा बनविला गेला.

नायडूंची नाराजी तशी रास्तच म्हणावी लागेल. कारण या संविधानिक पदाबरोबरच राजकीय क्षेत्रातील निवृत्तीचा 'अलार्म' आपोआप वाजू लागतो. त्यात मोदींनी सत्तेची सूत्रे हाती घेताच ७५वर्ष वयाच्या नेत्यांना सत्तेपासून दूर ठेवलं. ही भीती आहेच. पण आगामी निवडणुकीत जर असेच बहुमत मिळाले तर मोदी ७५ ही वयोमर्यादा आणखी खाली आणतील. ही शक्यताही नाकारता येत नाही. नायडू हे ज्या आंध्र प्रदेशातुन येतात तिथं भाजपला जनाधार नाहीच त्यामुळे तीन वर्षांपूर्वी मिळालेलं मंत्रिपद सोडण्यास नायडू उत्सुक नव्हते, ते स्वाभाविकही आहे. अखेर पक्षाचे पाईक म्हणून त्यांनी हे पद स्वीकारलं. उपराष्ट्रपदाचा कार्यकाळ संपेल तेव्हा नायडू ७३ वर्षाचे असतील. शिवाय संवैधानिकपद उपभोगल्यानंतर पुन्हा राजकारणात सक्रिय होणं हे नैतिकदृष्ट्या योग्य नाही. त्यावेळी मोदी शहांनी मंत्र्याची वयोमर्यादा आणखी घटविली तर नायडू यांना मोदी शहांकडे राष्ट्रपतीपदाची मागणी करावी लागेल नाहीतर राजकारणातून निवृत्त व्हावं लागेल हे दोनच पर्याय राहतील.

भाजपच्या दृष्टीनं राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, हे मजबूत किल्ले आहेत. मध्यप्रदेश, उत्तराखंड हे राखलं गेलंय. उत्तरप्रदेशात आज जे मजबूत बहुमत लाभलं आहे, २०१४ च्या लोकसभेनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचं पुनरावर्तन झालं आहे. पण आगामी निवडणुकांत हीच स्थिती राहील असं नाही, इथल्या जातीय आणि धार्मिक समीकरणात धोडासा जरी फेरफार झाला तर समाजवादी पक्षाचं वर्चस्व वाढू शकतं हे मोदी शहा जाणतात. बिहार मधलं मजबूत महागठबंधन तोडणं भाजपला आजतरी शक्य झालेलं दिसतंय. पण हा जुगार पुन्हा फलद्रुप होईल हे सांगता येणं कठीण आहे.

बंगालमधील सारे भाजपेयी सर्व पातळ्यांवर केंद्र सरकारच्या सहाय्याने आपली ताकद वाढविण्याचा प्रयत्न करताहेत. पण ममता बॅनर्जी यांचा किल्ला त्याला दाद देत नाही. ओरिसाची सत्ता हाती आली असली तरी, लोकसभेबरोबर विधानसभेची निवडणूक झाली तर आज जे तशी तिथं मिळालं आहे तेवढं यश पुन्हा मिळेल याची शाश्वती खुद्द भाजपेयींना नाही. अशा राजकीय स्थितीत २०१९  आज लोकसभेत जे स्पष्ट बहुमत मिळालं आहे ते टिकवायचं असेल तर, उत्तरभारतात अपेक्षेप्रमाणे यश मिळो वा न मिळो त्याकडे फारसे लक्ष न देता इतर राज्यात आपले पाय रोवण्यासाठी भाजपनं दक्षिणेकडे आगेकूच आरंभलीय.

आंध्र प्रदेश, तेलंगण, कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळ या दक्षिणेकडील राज्यात आपलं स्थान निर्माण करण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. त्यासाठी व्यंकय्या नायडू यांची ही उमेदवारी आहे. कर्नाटक भाजपसाठी नवीन नाही. इथं सत्ता उपभोगलीय. सत्तेवर असताना भाजपेयी मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले.त्यावेळी त्यांना तत्कालीन भाजप नेत्यांनी मुख्यमंत्री पदावरून हटवलं, त्याचा परिणाम जो व्हायचा तो झाला. भाजपच्या हातून इथली सत्ता गेली. आता पक्षांमध्ये 'सत्तेचं राजकारण' ही एकच विचारधारा राबविली जातेय.त्यामुळे त्याच येडीयुरप्पा यांना पुन्हा पक्षात घेऊन मानाचं पद दिलं गेलंय. येडीयुरप्पा यांच्या पक्षात परतण्यानं कर्नाटकातील जातीय समीकरणं साधली गेलीय, त्यामुळे तिथे त्यांना सत्तेची पुनर्स्थापना करण्याची आशा आहे पण इतरत्र तशी स्थिती नाही.

तेलंगणतील तेलंगणा राष्ट्र समिती आणि आंध्रप्रदेशातील तेलुगु देशम हे दोन्ही पक्ष केंद्रात भाजपचे सत्तासाथीदार आहेत. पण तिथे या दोन्ही पक्षावर अवलंबून राहिल्याने भाजपला आजवर शिरकाव करणं तिथं कठीण गेलंय. तिथे अमित शहांनी वेगळी रणनीती आरंभलीय. मध्यंतरी शहा यांनी मोठा गाजावाजा करीत भारतभ्रमण करीत असल्याचे जाहीर केलं. मात्र या भ्रमणात सर्वाधिक वेळ त्यांनी दक्षिणेकडील राज्यात काढला होता. तिथे नवा साथीदार शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. मित्रपक्षाऐवजी स्वतःच्या पक्ष चिन्हावर जास्तीतजास्त जागा जिंकण्याचा त्यांनी मनसुबा जाहीर केलाय. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत जगन रेड्डी यांच्या पक्षाचा पाठींबा मिळविण्यात त्यांना यश आलंय त्यामुळे आगामी काळात जगन रेड्डी हा त्यांचा मित्र बनला तर आश्चर्य वाटणार नाही.

तामिळनाडूत जयललिता यांच्या निधनानंतर जी राजकीय पेचप्रसंग निर्माण झाला होता तेव्हा भाजपनं तिथं आपल्या चाली खेळल्या. बंडखोर पनीरसेलव्हम यांच्या मागे उभं राहून अप्रत्यक्षरीत्या खेळी केली, त्यासाठी राज्यपाल विद्यासागर यांना वापरलं मात्र तिथे त्यांना सफलता मिळाली नाही. त्यानंतर भाजपेयींनी तामिळनाडूत अत्यंत प्रभावशाली लोकप्रियता आणि करिश्मा असलेल्या चित्रपट अभिनेते रजनीकांत यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन लक्ष्य साधण्याचा प्रयत्न करून पाहिला. तामिळनाडूत द्राविडियन संस्कृती असल्याने आणि भाजपेयी हे ब्राह्मणवादी असल्याने आपल्यावरही 'ब्राह्मणवादी' असल्याचा आरोप होईल या भीतीनं रजनीकांत यांनी काढता पाय घेतला. पुन्हा एकदा भाजपेयी तोंडावर आपटले. आता नव्या नेत्याचा शोध तिथं सुरू आहे, चित्रपट अभिनेते विजयकांत यांच्याशी सूत जुळविण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू झालाय.

केरळ हे असं राज्य आहे की, तिथल्या सत्ताधारी डाव्यांशी त्यांचा जबरदस्त संघर्ष गेली अनेक वर्षे सुरू आहे. इथे रक्तरंजित घटना घडल्या आहेत. देशभरात डाव्यांची पीछेहाट झाली असली तरी इथे केरळात त्यांचं वर्चस्व आहे. भाजप इथे खूप संघर्ष करीत पक्षविस्तार करण्याचा प्रयत्न करतोय. त्यासाठी केंद्रातील योजनांचा तिथं भडीमार केला जातोय. पक्षाची अधिवेशनं, बैठका, मेळावे इथं वरच्यावर आयोजिले जाताहेत. डाव्यांच्या या प्रभावक्षेत्रात प्रयत्नांती अगदी थोडंसं जरी यश मिळालं तरी ते त्यांच्यासाठी खूप मोठं यश असेल. डाव्यांच्या साम्राज्यात पाय रोवण्यासाठी तरी जागा मिळावी म्हणून अमित शहा सर्व प्रकारची समीकरणं जुळवीत आपली प्रतिमा निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत त्यासाठी सर्व शक्ती त्यांनी पणाला लावलीय.

भाजपने अत्यंत हुशारीने व्यंकय्या नायडू यांना पुढं केलंय. ते एक हुशार, अभ्यासू, पेचप्रसंगातून पक्षाला, नेत्यांना सावरण्याची मोठी कला त्यांच्याकडे आहे. भाजपचा 'दक्षिणेकडील चेहरा' म्हणूनही नायडू ओळखले जातात. उपराष्ट्रपती हे जसे संवैधानिक पद आहे तसेच ते राज्यसभेचे अध्यक्षही असतात. नायडू यांनी तिथला मोठा अनुभव आहे. जवळपास दोन दशक ते राज्यसभेचे प्रतिनिधींत्व करतात. संसदेच्या विविध समित्यावरील त्यांचं काम प्रभावशाली ठरलं आहे. संसदेतील अनेक कठिणप्रसंगी त्याचं संवैधानिक ज्ञान आणि प्रसंग हाताळण्याचं कसब कमालीचं आहे. त्यामुळे राज्यसभेत अध्यक्ष म्हणून ते भाजपच्या आगामी राजकारणात महत्वाची भूमिका बजावतील असं सांगितलं जातंय. त्यामुळे नायडूंची ही निवड पक्षाच्या दृष्टीनं उचित आणि अपेक्षित अशीच आहे. नायडू हे मोदी आणि कोविंद यांच्याप्रमाणेच संघ स्वयंसेवक आहेत. आंध्रप्रदेशातील त्याचं राजकारण तसं फारसं विकसित झालं नाही. आणीबाणी नंतर त्यांच्या राजकारणाला बहर आला. पक्षाच्या अध्यक्षपदापर्यंत ते पोहोचले. त्यानंतरच्या राष्ट्रीय राजकारणातलं त्याचं पदार्पण उत्तरोत्तर यशदायी ठरत गेलं.

कोविंद यांची पक्षानं केलेली निवड जी कार्यकर्त्यांसाठी अनभिज्ञ होती तशीच ती राजकीय वर्तुळात आश्चर्याची होती. पण नायडू यांच्याबाबत असं म्हणता येणार नाही. आणीबाणीनंतरच्या सर्व घडामोडीत ते सक्रिय आहेत त्यामुळे देशभरात त्यांची ओळख आहे. पक्ष कार्यकर्ते यांनाही ते आपलेसे वाटतात. मोदी यांच्या सरकारात राजनाथसिंह, सुषमा स्वराज, अरुण जेटली यांच्या नंतरचे चौथे वरिष्ठ मंत्री म्हणून नायडू ओळखले जातात. ते ज्येष्ठ आहेत तसेच ते अनुभवी आहेत. राष्ट्रपती उत्तरेकडील, पंतप्रधान मध्यभारतातील तर उपराष्ट्रपती दक्षिणेकडील म्हणजे भारताला एकसमान प्रतिनिधीत्व दिल्याचा दावा भाजपेयी आता करू शकतात. भाजपने २०१९च्या निवडणुकीत दक्षिणेकडे जे यश अपेक्षिले आहे ते साध्य झालं नाही तर नायडू यांचं प्रमोशन नक्की ठरलेलं त्यांना सहजपणे राष्ट्रपतीपद मिळू शकत. त्यामुळं आज राष्ट्रपती कोण होणार ही चर्चा जशी बराच काळ सुरू होती, त्याबाबत सस्पेन्स निर्माण झाला होता तसा तेव्हा होणार नाही.

आता प्रश्न असा आहे की, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत यश मिळालं आहे. उपराष्ट्रपती पदासाठीचं यश दृष्टीपथात आहे. अशावेळी मोदी सरकार राष्ट्रीय राजकारणात आणखी मजबूत होतील काय? याचं उत्तर 'हो' असं सकारात्मक असेच आहे. कारण विरोधीपक्ष हा विखुरला गेलाय, एकसंघ राहिलेला नाही, महागठबंधनच्या माध्यमातून मोदींना पर्याय देण्याची स्वप्ने पाहणाऱ्यांची स्वप्ने या निवडणुकात उध्वस्त झालीत. आगामी राजकारणाची दिशा ओळखून भाजप जशी वाटचाल करतो आहे तसा प्रयत्न करताना कोणी दिसतच नाही. आणि  विरोधकांचं धोरण किती दिशाहीन, तकलादू होत हे समोर आलंय.त्यामुळे भविष्यात ते एकत्र येतील ही शक्यताच भाजपनं मोडीत काढलीय.

- हरीश केंची.


प्रभंजन साठीचा लेख.

Saturday 15 July 2017

नितीश यांची बिहारी राजनीती

नीतिश यांची 'बिहारी' राजनीती...!

"एक मान्य करावं लागेल की, भाजपेयींचं नशीब फळफळतंय! प्रमुख विरोधीपक्ष म्हणून काँग्रेसचं नेतृत्व विश्वसनीयता, दिशा, नीती,धोरण, राजकीय चाली आणि त्याची अंमलबजावणी यात सपशेल अपयशी ठरलं आहे. मायावती, ममता, लालू, मुलायम यासारखे प्रादेशिक सेनापती यापूर्वीच आपल्या कार्यकर्तृत्वाने राष्ट्रीय स्तरावर नाकाम झाले आहेत. भारतीय सुशिक्षितांच्या मनांत थोडीशी आशा पल्लवित करणाऱ्या आम आदमी पार्टीच्या केजरीवाल यांच्या वाचाळपणाने त्यांच्या मर्यादा स्पष्ट केल्या, त्यामुळे त्यांना महापालिका निवडणुकीत सपाटून मारही खावा लागला त्यामुळे त्यांची बोलती बंद झाली, अशा वातावरणात उरलेला तसा मोठा आणि परिणामकारक म्हणू असा विरोधी पक्ष जनता दल युनायटेड होता, अखेर राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत तोही भाजपेयींच्या साथीला गेला. त्यामुळे आता विरोधीपक्षांच्या पंखात एकजुटीने लढण्याचं बळच नाहीस झालंय."
--------------------------------------------
एकेकाळी नरेंद्र मोदी यांचा कट्टर विरोधक म्हणून नितीशकुमार ओळखले जाई. एनडीएमध्ये असताना, अटलजींच्या मंत्रिमंडळात त्यांचे सहकारी असताना ते गुजरात दंगलीच्यावेळी एनडीएतुन बाहेर पडून मोदींवर टीकास्त्र उगारले होते, बिहार राज्याच्या निवडणुकांच्यावेळी ती अधिक धारदार झाली. त्यामुळे बिहारमध्ये भाजपेयींना हार खावी लागली. या निवडणुकीत भाजपेयींसमोर विरोधी पक्षाचं 'महागठबंधन' निर्माण झालं आणि त्याचं नेतृत्व नितीशकुमार यांच्याकडे होतं. साहजिकच या विजयानंतर नितीशकुमारांकडे मोदींसाठीचा पर्याय म्हणून पाहिलं गेलं. मात्र कालांतरानं यात बदल झाला, गेल्या काही दिवसात त्यांनी मोदी सरकारच्या ध्येयधोरणांना, नीती आणि निर्णयांना सतत पाठींबा दिला तेव्हा सर्वांच्याच भुवयां उंचावल्या. नोटबंदीच्या निर्णयाला समस्त विरोधीपक्ष विरोधात असताना नितीशकुमारांनी मोदींना उघडपणे पाठींबा दिला. पाठोपाठ देशभरात खळबळ माजविणारा गोहत्याबंदी कायदाही त्यांनी स्वीकारला. जीएसटी साठी मोदींसरकारने बोलावलेल्या मध्यरात्रीच्या संसदच्या अधिवेशनाला सर्व विरोधकांनी बहिष्कार घातला असताना तेव्हाही नितीशकुमारांनी आपला प्रतिनिधी म्हणून आपल्या अर्थमंत्र्याना पाठविले होते.

या साऱ्या पार्श्वभूमी लक्षात घेता, राष्ट्रपतीपदाची निवडणूक जसजशी जवळ येतेय तसतशी बिहारमधल्या या तथाकथित महागठबंधनाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होतो आहे. त्यातच या महागठबंधनातील लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबियांवर पडलेले छापे आणि त्याबाबत नितीशकुमार यांनी बाळगलेले मौन यानंतरही, बिहारमधल्या या मोठ्या आणि सक्षम अशा जनता दल युनायटेड या पक्षाला आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न महागठबंधनातील पक्षांनी केला. भाजपेयींच्या रामनाथ कोविंद यांच्यासमोर त्यांच्याचप्रमाणे दलित कार्ड असलेल्या मीराकुमार यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून आणले. 'बिहारकी बेटी' असेल त्यातही ती दलित आणि महिला असेल तर नितीशकुमार पाठींबा देतील असा कयास होता मात्र तो उधळत नितीशकुमार भाजपेयींबरोबर जाण्याच्या निर्णयावर ठाम राहिले.

नितीशकुमारांची ही राजकीय चाल म्हणा नाहीतर व्युहरचना म्हणा ती त्यांच्या परिपकवतेचं दर्शन घडवतं. भाजपेयींशी जवळीक साधतानाच त्यांनी एकत्र आलेल्या विरोधीपक्षांना आपलं अस्तित्व दाखवून दिलं. नितीशकुमारांची ओळख एक सक्षम प्रशासक म्हणून आहे. ते चौथ्यांदा मुख्यमंत्री झाले आहेत. ते जेव्हा पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले तेव्हा बिहारची राजकीय, सामाजीकच नव्हे तर कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले होते. त्यातच राज्याच्या तिजोरीत खडखडाट होता. अशावेळी त्यांनी सुधारणावादी, सकारात्मक आणि विकासाचं राजकारण करीत बिहारला प्रगतीपथाकडे नेलं. कायदा आणि सुव्यवस्था आपल्या खिशात आहे असं समजणाऱ्या बाहुबली नेत्यांच्या मुसक्या आवळून त्यांना वठणीवर आणलं. आणि सत्तेवर जबरदस्त मांड ठोकली. याचे सारेच कौतुक करतात अगदी भाजपेयींही!

मोदींचं राजकारण हे विकासाचं राजकारण आहे. मोदी म्हणजे विकास, मोदी म्हणजे आक्रमक राष्ट्रवाद, मोदी म्हणजे आक्रमक गतिशीलता, मोदी म्हणजे पारदर्शकता, यासारख्या प्रचारपुढे टिकायचं असेल तर आपली राजकीय आणि प्रशासकीय प्रतिमादेखील तेवढीच उजळ हवी हे अन्य विरोधीपक्षांच्या नेत्यांपेक्षा नितीशकुमारांना अधिक कळतं. लालूप्रसाद यादव, मुलायमसिंग, ममता बॅनर्जी, मायावतीसहित तमाम नेत्यांच्या तुलनेत नितीशकुमारांनी आपली प्रतिमा स्वच्छ आणि प्रतिभाशाली ठेवलीय.

आज देशातल्या इतर मुख्यमंत्र्याच्या तुलनेत नितीशकुमार यांची कारकीर्द अधिक चमकदार आहे. नितीशकुमार चार वेळा, नवीन पटनाईक तीनवेळा मुख्यमंत्री बनलेत. इतर मुख्यमंत्री हे प्रथमच वा दुसऱ्यांदा बनलेत. शिवराजसिंह हे सिनिअर मुख्यमंत्री आहेत पण ते व्यापम घोटाळ्यात अडकलेत. आता तिथंही महाराष्ट्राप्रमाणे शेतकऱ्यांचं आंदोलन उभं झालंय. राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे शिंदे या ललित मोदी प्रकरणात अडकलेत. ममता बॅनर्जी या सिनिअर मुख्यमंत्री आहेत पण नारदा, शारदा, रोजव्हॅलीसहित अनेक घोटाळ्यात त्यांचे नाव गोवलं गेलं आहे. नितीशकुमार आणि नवीन पटनाईक हे अशा आरोपांपासून दूर राहिलेले आहेत. हे सारं पाहता, नितीशकुमार यांना मोदींना आव्हान देणारा वा पर्याय म्हणून जर राहायचं असेल तर त्यांना आपली प्रतिमा डागाळू नये याची खबरदारी घ्यावी लागेल. पण नितीशकुमार यांच्या नशिबानं त्यांना लालूप्रसाद यादवांबरोबर महागठबंधन करावं लागलं आहे. शहाबुद्दीन सारख्या बाहुबली नेत्यांशी लालूंचे असलेले संबंध, केवळ लालूच नव्हेतर त्याच्या कुटुंबियांवर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप, त्यांच्या घरावर पडलेले छापे, या साऱ्या बाबींमुळे नितीशकुमार यांना स्वच्छ राहण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागतेय.

लवकरच होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीनंतर नितीशकुमार महागठबंधनशी निगडित राहतील काय असा सवाल राजकीय निरीक्षकांना पडलाय. बिहारमधील सत्तेसाठीच संख्यात्मक गणित नितीशकुमार यांच्याकडे आहे महागठबंधन जर तोडण्याचा प्रयत्न लालू वा काँग्रेसकडून झाला तर सरकार अस्थिर होणार नाही. राज्य विधानसभेत नितीशकुमार यांचे संख्याबळ ७१ आहे आणि भाजपचे ५३ सदस्यांचे आहे त्यामुळे राजद आणि काँग्रेस जरी दूर झाले तरी नितीशकुमार यांचं काही बिघडणार नाही.

पण इथलं राजकारण वेगळंच आहे. नितीशकुमार यांच्या व्होटबँकेत दलित, मुस्लिम, यांची संख्या लक्षणीय आहे. त्याशिवाय ओबीसी देखील मुख्यपणे आहेत. नितीशकुमार यांनी २००२च्या दरम्यान गुजरातमधील दंगलीच्या मुद्द्यावर मोदींना उघडपणे विरोध करायला सुरुवात केली. भाजपेयींनी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर करताच त्यांनी भाजप बरोबर असलेली तब्बल १७ वर्षांची युती तोडली होती, याला आता केवळ तीन वर्षे झालीत. तीन वर्षापूर्वी मोदी जसे त्याहून अधिक मजबूत आज झाले आहेत. आता कोणत्या मुद्द्यावर नितीशकुमार भाजपबरोबर जातील हे पाहणे लक्षणीय ठरणार आहे. देशात भाजपचं वादळ घोंघावत आहे, मोदी नावाच्या झंझावातात सगळेच पक्ष उडून गेले आहेत. तिथे मोदींशिवाय कुणाचीच छबी दिसत नाही. भाजपशी पूर्वीपासून आधाडी केलेले, शिवसेना वगळता सारे पक्ष थोडीशी कुरबुरी करीत मोदींचं गुणगान करताना दिसतात. अशा परिस्थितीत मोदी वा भाजप नितीशकुमार यांना एनडीएत घेतील अशी शक्यता दिसत नाही. त्यातही आपल्याला विरोध करणाऱ्यांना कधीही माफ न करण्याचा मोदींचा स्वभाव पाहता नितीशकुमार हे मोदींच्या जवळ जाणार नाहीत. आपण जर मोदीजवळ गेलो तर आपलं काही खरं नाही हे नितीशकुमार हे ओळखून आहेत. त्यामुळे नितीशकुमार जसे भाजपच्या जवळ जात असल्याचे दाखवताहेत तसाच विरोधही करताहेत. अगदी शिवसेनेसारखं! नितीशकुमार मोदी यांच्याशी थोडंसं अंतर राखूनच वागायचं असं ठरवताना दिसताहेत. मोदी यांच्याशी जवळीक साधतानाच त्यांनी काँग्रेस-लालूप्रसादांशीही संबंध ठेवले आहेत. कारण ते राहतील ते केवळ विरोधीपक्ष म्हणूनच. कारण मोदींचा प्रभाव वा झंझावात ओसरला तर त्यांच्यासमोर नितीशकुमार यांचीच प्रतिमा उजवी ठरणार आहे. मोदींच्या बरोबर गेले तर त्यांचे मांडलिकत्व स्वीकारावं लागेल हे पाहता नितीशकुमार एनडीए आणि महागठबंधन या दोघांशीही ठराविक अंतर राखूनच वावरताहेत. मात्र ही दोन्ही दगडावर पाय ठेवणारी कृती कोणतं वळण घेईल याची भीती त्यांना असावी.त्यामुळे त्यांना ही जोखीम उचलावीच लागेल. पाहू उआ आगे आगे होता है क्या....!

- हरीश केंची.


प्रभंजन साठी लेख.

Sunday 9 July 2017

भाजपेयींची किंकर्तव्यमूढता...!

*भाजपेयींची किंकर्तव्यमूढता...!*

"भाजपच्या आयुष्याचं हे ३७ व वर्ष आहे. एवढ्या कालावधीत हा पक्ष शून्यातून २८२ संसदसदस्यांपर्यंत पोहोचलाय. अर्थात, ही वाटचाल केवळ एक नवा पक्ष जन्माला आला आणि त्यानं यश मिळवलं, अशी झालेली नाही. या पक्षाच्या मागे भारतीय समाजातील सनातन विचार करणारा वर्ग, त्या विचारांचं प्रतिनिधित्व करणारा ९२ वर्ष वयाचा 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ' भक्कमपणे उभा आहे. संघाच्या पाठींब्याने पूर्वी जनसंघ संसदीय राजकारणात दखलपात्र होता. तर बऱ्याच काळानंतर तो 'भाजप' अवतारात सत्ताधीश झाला. आता सारंच साध्य केल्यानंतर पुढे काय? असा प्रश्न पडल्यानंतरही जे त्याचं उत्तर शोधत नाहीत, अशांच्या हातातील  सारंच साध्य मानलेलं गेल्यानंतर जी अवस्था होते, ती भाजपची झालेली आहे."
---------------------------------------------

भारतीय जनता पक्षानं आपलं बहुमत दिसताच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकाला 'राष्ट्रपती'पदावर बसविण्याची तयारी चालविली आहे. यापूर्वी अटलबिहारी वाजपेयी प्रधानमंत्री असताना डॉ. अब्दुल कलाम यांना राष्ट्रपतीपदावर बसविले होते पण ते संघाशी संबंधित नव्हते. आता प्रथमच एक संघ स्वयंसेवक राष्ट्रपती होतो आहे. रामनाथ कोविंद हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे 'फाईंड' आहेत. वरिष्ठ भाजपेयी राष्ट्रपती होण्याची चिन्हे असतानाही मोदींनी लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यासारख्या नेत्यांना जाणीवपूर्वक बाजूला ठेवलं. ही निवड करताना मोदींनी संघालाही विश्वासात घेतलं नाही, किंबहुना संघाशी विचार विनिमय करायचंही टाळलं. मात्र याबाबत कुणी ब्र काढताना दिसलं नाही. मोदींच्या दबंगगिरीपुढे कुणाचं काही चालत नाही. मोदींच्या या दबंगगिरीमुळे केवळ भाजपेयींच नाही तर रा.स्व.संघ सुद्धा हतबल झालाय.

राजकारणातील जेव्हा शिस्तीची चर्चा होते, तेव्हा रा.स्व.संघ आणि भाजप यांचा उल्लेख केला जायचा. अर्थात हे कधीपर्यंत? तर भाजपला केंद्रात सत्ता मिळाली नव्हती तोपर्यंत, केंद्रात सत्ता मिळाली आणि सत्तेच्या कुरणात जे होतं, तेच भाजपच्या नेत्यांचं झालंय. सारं चित्रच बदललं आहे. भाजप म्हणजे 'जातीयवादी काँग्रेस' आहे आणि काँग्रेस म्हणजे 'सेक्युलर भाजप' बनलेत. असं असलं तरी पूर्वी भाजपच्या नेतृत्वावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा 'रिमोट' चालायचा, त्यामुळे किमान वचक तरी असायचा. परिस्थिती फारच हाताबाहेर जातेय, असं वाटायचं, तेव्हा नागपूरच्या रेशीमबागेत हालचाल व्हायची आणि सरसंघचालक हंटर घेऊन बाहेर पडायचे. त्याबरोबर सगळे चिडीचूप व्हायचे. नाठाळाना त्यांची जगा दाखवून दिली जायची. आगाऊपणा करणाऱ्यांचे कान टोचले जायचे आणि आपल्या मर्जीतील कुणाकडे तरी सूत्रं देऊन 'शिस्तीत राहा' अशी तंबी दिली जायची. संघाच्या या हंटरबाजीत अगदी बलराज मधोक यांच्यापासून अगदी अण्णा डांगे, अण्णा जोशी, गोपीनाथ मुंढे यांच्यासारखे 'संघनिष्ठ' भाजपेयी राजकारणातून कायमचे गारद झाले. परंतु गेल्या काही दिवसांपासून रा.स्व.संघाचा हा 'रिमोट' बिघडला असावा किंवा त्यातील पॉवर संपली असावी किंवा संघच हतबल झाला असावा की काय? यापैकी कशाचाच अंदाज येत नाही. अशी परिस्थिती निर्माण झालीय. भाजपमध्ये एवढी अनागोंदी यापूर्वी कधीच पाहायला मिळाली नव्हती. कुणालाच कुणाला ताळमेळ नाही. संघाच्या निष्ठावंतांवरही कचरा होण्याची वेळ आली आहे. सत्ता प्रबळ बनली असून संघटनेला कस्पटासमान वागणूक मिळत असल्याचं चित्र दिसत आहे, जे यापूर्वी कधीच पाहायला मिळालं नव्हतं. मोदींच्या दबावापुढे संघ एवढा हतबल झाला की, आपल्या सच्च्या कार्यकर्त्यांसाठी काही करण्यास कुणीही पुढे येत नाही. संघातून वा भाजपमधून रिटायर झालेले नेते  'व्यक्तीपेक्षा संघटना मोठी' असे सुविचार टीव्हीसमोर सांगू लागतात तेव्हा ते हास्यास्पद वाटू लागते.

भाजपच्या आयुष्याचं हे ३७ व वर्ष आहे. एवढ्या कालावधीत हा पक्ष शून्यातून २८२ पर्यंत पोहोचला आहे. अर्थात, ही वाटचाल एक नवा पक्ष जन्माला आला आणि त्यानं लगेच यश मिळवलं, अशी झालेली नाही. या पक्षाच्या मागे भारतीय समाजातील सनातन विचार करणारा वर्ग, त्या विचारांचं प्रतिनिधित्व करणारा ९२ वर्ष वयाचा 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ' भक्कमपणे उभा आहे. संघाच्या पाठींब्याने पूर्वी जनसंघ संसदीय राजकारणात दखलपात्र होता. तर बऱ्याच काळानंतर तो 'भाजप' अवतारात सत्ताधीश झाला. सारंच साध्य केल्यानंतर पुढे काय? असा प्रश्न पडल्यानंतरही जे त्याचं उत्तर शोधत नाहीत, अशांच्या हातातील  सारंच साध्य मानलेलं गेल्यानंतर जी अवस्था होते, ती भाजपची झालेली आहे.

भाजपच्या बाबतीतली पूर्वीची सारी गृहीतकं संघ का पुसत आहे? तसं करताना संघ नेमकं काय करायला निघालं आहे? संघाला यातून काय साध्य करायचं आहे? ते बघितलं पाहिजे. संघाचं या देशावर सांस्कृतिक अधिसत्ता आणण्याचं उद्दिष्ट स्पष्ट आहे. अर्थात, ते ही बाब सांगतात वेगळ्या शब्दात. मात्र मतितार्थ तोच. थोडं विषयांतर, मुद्दा समजून घेण्यासाठी!.... भारतीय समाजाच्या जीवनाला जी जी क्षेत्र स्पर्श करतात, त्यात आपल्या विचारांचे गट कार्यरत असावेत, असा विचार मानून 'संघ परिवारा'च्या इतर शाखा सुरू झाल्या. दीनदयाळ उपाध्याय, श्यामाप्रसाद मुखर्जी हे संघाच्या राजकीय शाखेचे; जनसंघाचे निर्माते बनले. जनसंघ-भाजपची स्थापना १९५२ मधली., पण त्याला राजकीय यश मिळायला १९६७ साल उजाडावं लागलं. त्यावेळी उपाध्याय, मुखर्जींसारखे बडे नेते होते. प्रेमचंद डोग्रा, पितांबर दास, मौळीचंद शर्मा, ए. रामाराव हे ही होतेच. बलराज मधोक त्यावेळी लोकांना पेटवणारी भाषणं करायचे. सर्व तऱ्हेची व्हरायटी संघाच्या या राजकीय शाखेकडे होती. मात्र विस्तार होत नव्हताच.

संघाच्या दृष्टिकोनातून त्यांचं उद्दिष्ट महत्वाचं. संघटनेचं नांव, माणसं आणि त्या माणसाचं व्यक्तिगत कर्तृत्व दुय्यम असतं. त्यामुळेच आणीबाणीनंतर निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीचा लाभ उठविण्यासाठी संघानं पंचवीस वर्षं मेहनत घेऊन वाढवलेला भारतीय जनसंघ हा पक्ष जनता पक्षात विलीन करताना फारशी खळखळ केली नाही. आपल्या अस्तित्वाचा आग्रह धरला नाही. मात्र पुढच्याच दहा वर्षांत राजीव गांधींच्या विरोधात असंच वातावरण तयार होत असताना आधी जनमोर्चा आणि त्यानंतर जनता दलात विलीन व्हायला नकारही दिला अर्थात, हा नकार नावासाठी नव्हता; तर अस्तित्वासाठीच होता. जनता पक्षात स्वतंत्र अस्तित्वाची खात्री होती, जी पुढे सिध्द झाली. जनता दलात घुसून दुसऱ्यांदा फसवणूक करणं आणि करुन घेणं शक्य नव्हतं. असो.

आपली ओळख आणि पुरेसा विस्तार झाल्यानंतर आपल्या राजकीय शाखेच्या जन्मावेळी नांव ठेवलं.... भारतीय जनता पक्ष. उद्दिष्ट होतं, एकविसाव्या शतकाच्या प्रारंभी केंद्रात आपली सत्ता आणणं. त्यावेळी पहिल्या पिढीतले बहुतेक सारे जनसंघीय नेते बाद होत चालले होते. ही जबाबदारी वयाची पन्नाशी ओलांडलेल्या वाजपेयी, अडवाणी यांच्याकडे देण्यात आली. अडवाणींनी कडवेपणाने आणि वाजपेयींनी सौम्यपणे आपले मुद्दे मांडायचे. प्रसंगी दोघांनी परस्परविरोधी बोलायचं, पण ते अंतिमतः परस्परपूरक ठरलं पाहिजे. त्याचा परिणाम असा झाला की, ज्या वर्गाला सनातन भाषा आवडते आणि जो वर्ग मध्यममार्गी आहे, तिथपर्यंत संघाची ही राजकीय शाखा पोहोचली. परिणामी २ खासदारांच्या पक्षाने १०० त्यानंतर १७५ तर आता २८२ पर्यंत मजल मारली. या प्रवासात ज्यांचा के.सी.सुदर्शन यांनी 'नापास विद्यार्थी' म्हणून ज्यांचा उल्लेख केला ते बंगारु लक्ष्मण, व्यंकय्या नायडू, कुशाभाऊ ठाकरे, जना कृष्णमूर्ती हे अध्यक्षपदी आले. हे लोक काही लोकनेते नव्हते, त्यांना राष्ट्रीय ओळखही नव्हती. मात्र पक्षाची अध्यक्षपदाची खुर्ची सांभाळण्यासाठी ही माणसं त्या परिस्थितीत तेव्हा योग्य म्हणून गणली गेली होती.

गडकरी यांना अध्यक्षपद दिल्यानंतर राष्ट्रीय राजकारणातल्या साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या. राष्ट्रीय पक्षात अशी प्रादेशिक नेतृत्वाची गरज पडल्यास प्रतिष्ठापना करायची असते. राष्ट्रीय नेते नव्हे; तर राष्ट्रीय उंची नसणाऱ्यांनाही अध्यक्षपद मिळाले आहे. त्याने राष्ट्रीय पक्ष संपतो किंवा वाढतो; असं होत नाही. पक्ष आपल्या पद्धतीनं चालतच असतो.भाजपचं तसंच आहे. आणि गडकरींना हे चांगल माहीत होतं की, भाजपचं नवनिर्माण होण्यासाठीची ही सुरुवात आहे. आपलं अस्तित्व ही त्या कामातली पहिली समिधा आहे.

गडकरी यांच्यानंतर पुन्हा पक्षाध्यक्षपदावर आलेल्या राजनाथसिंह यांना पंतप्रधानासाठी योग्य आणि सर्वसंमत असा नेता पक्षात दिसत नव्हता. तेव्हा मोदींनी जेटली यांच्या माध्यमातून आपलं नांव पुढं रेटले. पक्षाने त्यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता त्यांनी काही अटी घातल्या, सर्वप्रथम सुनील जोशी यांना कार्यकारिणीतून हटविण्याचा आग्रह धरला. तो साध्य होताच त्यांनी छोट्या छोट्या गोष्टी पुढे केल्या. गडकरी यांनाही त्यांचा विरोध होता, पण भय्यु महाराजांनी मध्यस्ती केली, त्यामुळे त्यांचा गडकरी-विरोध दूर झाला. त्यांची पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर होताच पक्षाची सूत्रे ताब्यात घेतली, गुजरातमधील आपले सहकारी अमित शहांना पक्षाध्यक्ष केले. त्यानंतरचा इतिहास आपल्या समोर आहेच. भाजप कधीच व्यक्ती साक्षेप पक्ष नाही तो विचारांवर आधारलेला पक्ष आहे असे सांगणाऱ्या भाजपची पिसे गळून पडली आहेत. पक्षावर विचारांचा नव्हे तर मोदी-शहांचा पगडा निर्माण झालाय, या 'मोदीशाही'ने मग सत्तेसाठी सर्वकाही असंच धोरण राबविले. सत्ता येताच त्यांनी केवळ सत्तेचीच नव्हे तर पाठोपाठ पक्षांचीही सूत्रे हाती घेतली, या घडामोडीत त्यांना रोखणारा कुणीच निपजला नाही. त्यामुळे अमर्याद सत्ता मोदी शहांच्या हाती आली. भाजपेयींना सत्तेचं चाटण मिळाल्यानंतर संघ आणि पक्ष दोघेही हतबल झालेत, असेच चित्र सध्या तरी दिसते आहे.

- हरीश केंची

'इंडिया शायनिंग' ते 'मोदी की गॅरंटी...!'

"एकचालुकानुवर्तीत पक्ष आणि सत्ताधारी असं रूप 'लोकशाहीची जननी' म्हणवणाऱ्या देशात आकाराला येतंय. सामूहिक नेतृत्वाची प...