Saturday 27 March 2021

भाजपेयींचं शिमग्याचं कवित्व!

"महाराष्ट्रात विरोधीपक्षनेत्यांची एक मोठी परंपरा आहे. भाजपतही रामभाऊ म्हाळगी ते एकनाथ खडसे यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणांनी तत्कालीन सरकारांना वेठीला धरलं होतं. देवेंद्र फडणवीस यांनीही आमदार म्हणून चांगलं काम केलेलं आहे; पण जिंकूनही हरल्यानंतर आणि पहाटेचा शपथविधी फसल्यानंतर विरोधीपक्षनेता म्हणून ते अधिकच वैफल्यग्रस्त झाल्याचं दिसून येतंय. त्यामुळं आता आक्रस्ताळीपणा, आकांडतांडव आणि आततायीपणा हा त्यांचा जणू स्थायीभाव बनलाय. सत्तेसाठी ते आतुर बनलेत, आसुसलेत असं दिसून येतंय. खैरनार, तिनईकर यांना हाताशी धरून 'ट्रकभर' पुरावे त्यानंतर, विजय पांढरेच्या साथीनं सिंचन घोटाळातील बैलगाडीभर पुरावे, आता परमबीर, रश्मी शुक्लांच्या साथीनं पेनड्राईव्हभरून पुरावे! या पुराव्यांचा इतिहास पाहता त्यात किती तथ्य आहे हे काळच ठरवील. भाजपनं वास्तव लक्षांत घेऊन सक्षम विरोधीपक्ष म्हणून काम करावं. सरकार पाडण्याचा प्रयत्नानं तिन्ही पक्ष अधिकच जवळ येताहेत. घट्ट बनताहेत तेव्हा देवाभाऊ, जरा दमानं घ्या.....!"
--------------------------------------------------------------

*क* र्नाटकापासून मध्यप्रदेशपर्यंत काँग्रेसी आमदार फोडून सत्ता मिळविण्यात भाजपेयींना यश आलं. पण महाराष्ट्रात 'जिंकूनही हरलेल्या' आणि 'मी पुन्हा येईन..!' अशी वलग्ना करणाऱ्या फडणवीसांनी ते जमलं नाही. मनाला खूप लावून घेतलं. पहाटेचा शपथविधी फसल्यानंतर तर त्यांच्या वर्मीच घाव लागला. मग सूडानं पेटलेल्या फडणवीसांनी हरेक प्रयत्न केले; पण हाती काहीच लागलं नाही. एकही आमदार गळाला लागला नाही. सत्तेच्या आमिषानं भाजपेयीं बनलेले आमदार सत्ता नसल्यानं धायकुतीला आले. त्यांना सांभाळण्यासाठी काही करणं गरजेचं होतं. ते अगदी छोट्यामोठ्या कारणावरून 'राष्ट्रपती राजवटी'ची मागणी करू लागले. ऊठसूट राजभवन गाठू लागले. राज्यपालांच्या गळी पडू लागले. केवळ आपणच नाही तर त्यांनी आपली सगळी ब्रिगेड याकामी लावली. तेही सदानकदा राजभवनावर जाऊ लागले. एवढं करूनही अपेक्षित साध्य होत नव्हतं. आमदार हाती लागत नाहीत. सत्ताबदल करता येत नाही या वैफल्यातून मग त्यांनी राज्यात आरोपांची राळ उठवली. एक नियोजनबद्ध 'साजिश' विधिमंडळाच्या अर्थसंकल्प अधिवेशन काळात रचली गेली. जरा आठवा सुधीर मुनगंटीवार यांनी 'तीन महिने थांबा, आम्ही पुन्हा येतो की, नाही बघाच...!' असा इशारा विधिमंडळात दिला होता. संजय राठोड यांचा राजीनामा घेतल्यानंतर भाजपेयींनी उचल खाल्ली तर सत्ताधारी बॅकफूटवर गेले. विधिमंडळात आणि रस्त्यावर सरकारच्या बदनामीच्या संधी विरोधकांनी सोडली नाही. हे सुरू असतानाच फडणवीस आपल्याशी एकनिष्ठ असणाऱ्या 'अभिजनी-संघी' अधिकाऱ्यांना हाताशी धरलं. पोलीस महासंचालकपदी असलेले सुधीरकुमार जयस्वाल, रश्मी शुक्ला आणि शर्मा यांना केंद्रात डेप्युटेशनवर पाठवलं गेलं. त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई होणार नाही याची खबरदारी घेऊन सरकारातल्या त्यांच्याकडं असलेल्या 'टॉप सिक्रेटस' मिळवल्या. दरम्यान वाझे प्रकरण उदभवलं. संघी अधिकाऱ्यांनी मग मिळालेली सर्व माहिती सरकारच्या आधी फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचविली. ती फडकवीत फडणवीसांनी विधिमंडळ दणाणून सोडलं. सत्ताधाऱ्यांची पळता भुई थोडी झाली. वाझेंना पाठीशी घालण्याचा प्रयत्न सरकारच्याच अंगलट आला. वाझेंच्या निलंबनाबरोबरच आयुक्त परमबीरसिंग यांची बदली केली गेली. मग फडणवीस यांनी थेट दिल्ली गाठली. तिथं सल्लामसलत केली अन परतले. परमबीरसिंग आपल्यावर अन्याय झालाय असं म्हणत थेट सरकारातल्या गृहमंत्र्यावर १०० कोटी रुपयांची डान्स बार, बिअरबारमधून वसुली करण्याबाबतचा आरोप करणारं पत्रच मुख्यमंत्र्यांना आणि राज्यपालांना धाडलं. हे पत्र प्रसिद्धीमाध्यमांकडं पाठवायला ते विसरले नाहीत. अपेक्षित असा लेटर बॉम्ब पडला होता. जो हलकल्लोळ माजायचा होता तो माजला. मग फडणवीसांची एन्ट्री झाली. त्यांनी एकापाठोपाठ एका पत्रकार परिषदेत संघी अधिकाऱ्यांनी दिलेला दारुगोळा सरकारवर टाकला. सरकार पुरतं घायाळ झालं. सारेच सैरभैर झाले. काय करावं काही सुचत नव्हतं. दुसरीकडं 'फडणवीस ब्रिगेड' सरकारवर दूरचित्रवाणीवर, सोशल मीडियावर तुटून पडत होते. पुन्हा फडणवीसांनी दिल्ली गाठली. तिथं हिंदीत पत्रकार परिषद घेतली, नेत्यांबरोबरच गृहसचिवांची भेट घेतली. कागदपत्रे, सीडी, पेनड्राईव्ह सोपविली. या दरम्यान बंगालच्या निवडणुका होताहेत, त्या संपल्या की काय आहे ते मी पाहीन असं अमित शहा यांनी आजतक वाहिनीला सांगितलंय. इकडं मंत्रिमंडळाची बैठक झाली. टॉप सिक्रेट माहिती बाहेर कशी गेली याची चौकशी करायचा आदेश मुख्य सचिवांना दिला गेला. रश्मी शुक्ला यांनी ही माहिती पुरवल्याचं उघड झालं. त्या तर आधीच डेप्युटेशनवर केंद्रात गेल्यात. त्यांनी जो अहवाल चुकीचा दिलाय, तो आपण मागे घेत असल्याची विनंती केली. पण तसा प्रघात नसल्यानं तो मागे घेतला गेला नाही. दरम्यान आपल्या नवऱ्याचं कर्करोगानं नुकतंच निधन झालंय, शिवाय मुलं अजून शिकताहेत तेव्हा कारवाई करू नये अशी रडत विनंती सरकारकडं केली. मुख्यमंत्र्यांनी सहानुभतीनं त्यांच्यावर कारवाई न करता बढती देत केवळ बदली केली. पण मुख्यमंत्र्यांच्या या सौजन्याचा शुक्ला यांनी गैरफायदा घेतला आणि आपली 'स्वामीनिष्ठा' यांनी दाखवून फडणवीस यांच्याकडं अहवाल आणि रेकॉर्डिंग असलेलं पेनड्राईव्ह सोपवलं. सरकार शुक्लांच्या बरोबरच आपल्या गृहमंत्र्याची चौकशी करणार आहे. परमबीरसिंग तर सर्वोच्च न्यायालयातून परत पाठवल्यानंतर उच्च न्यायालयात गेले आहेत. पाहू या आगे आगे होता है क्या...!

परमबीरसिंग यांनी गृहमंत्री महिन्याला १०० कोटी जमा करतात हे जाहीरपणे सांगून खळबळ उडवून दिली! खरंतर पोलीस, क्राईम बिट कव्हर करणाऱ्या प्रत्येक पत्रकाराला ही बाब नवीन नाही, उलट आकडा फारच कमी सांगितला गेलाय अशी पहिली प्रतिक्रिया अनेक क्राईम रिपोर्टरांची होती! राजकीय व्यवस्थेत हे रुटीन बनलंय, ज्याच्याकडं गृहखाते त्यानंच पक्षाचे सारे खर्च करावेत, हा अलिखित नियम बनलाय. कोणताही पक्ष त्याला अपवाद नाही. अगदी भाजपसुद्धा त्याबाबत नाकानं कांदे सोलू शकत नाहीत. हा एवढा नियमित कामकाजाचा भाग बनलाय. निवडणुका समजा अधिकृत वर्षभरावर आल्या असतील तर त्या त्या पक्षाचा गृहमंत्री पक्षाला सहज किमान हजार कोटी तरी जमवून देतो! महिन्याला १०० कोटी हा आकडा वाचून काही बिचाऱ्या लोकांना झटका बसला असेल कारण ते कधी इकडे लक्ष देतच नाहीत त्यामुळं हा आकडा त्यांचे डोळे पांढरे करू शकतो. पण ज्यांना मुंबई पोलीस आणि त्यांच्या कमाईचा चार्ट माहीत आहे ते हा आकडा ऐकून हसत असावेत! मुंबईत पोलीस आयुक्त व्हावं हे राज्यात काम करणाऱ्या प्रत्येक आयपीएस अधिकाऱ्यांचं अंतिम ध्येय असतं यावरून लक्षात घ्या, हे ध्येय प्राप्त केल्यावर त्याची महिन्याला प्राप्ती किती असेल? मुंबई पोलीस आयुक्तांची दर दिवसाला किमान ५ कोटी कमाई होते, मग गृहमंत्री किती कमवत असेल? मुंबई सोन्याचं अंडे देणारी कोंबडी उगाच समजली जात नाही. इथं क्राईम ब्रँचमध्ये वर्णी लागायला एखादा अधिकारी ५ कोटी मोजायला का तयार होतो, याचा विचार केला की सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतात. अर्थात मुंबईला केवळ मंत्रालयात दर आठवड्याला चक्कर मारणाऱ्या कुण्याही नेता, कार्यकर्त्याला हे आर्थिक गणित लक्षात येणार नाही. या प्रक्रियेत असणाऱ्या लोकांनाच फक्त हे विराट दर्शन झालेलं असतं. मुंबई पोलिसात कायम मराठी विरुद्ध अमराठी असं प्रबळ गट आहेत. राजकीय नेते आपल्या फायद्यासाठी त्यांना पाठबळ देऊन त्यांचं पालनपोषण करीत असतात. पोलीस अधिकाऱ्यांचे असे विविध गट सांभाळणे थोरल्या पवारांसाठी डाव्या हाताचा मळ आहे. सत्तेवर येणारा प्रत्येक पक्ष कमी अधिक प्रमाणात यापेक्षा वेगळं काहीच करीत नाही. उलट नेत्यांमधील सवतेसुभे लक्षात घेऊन पोलीस अधिकारी खरे आर्थिक उत्थान करून घेताना दिसतात. जो पकडला गेला तो चोर असा सगळा मामला असतो! क्रिकेट सट्टा, वरळी मटका, बार, हूक्कापार्लर, जुगार हे कोरोनाचेही बाप आहेत. ते कधीच संपत नाहीत. ज्यानं त्याना संपवितो म्हटलं तोच संपतो. कितीही काहीही केलं तरी त्यावर अंकुश ठेवताच येत नाही. या परमवीरसिंह यांच्या पत्रावर फार खळबळजनक अन् धक्कादायक अशा प्रतिक्रिया देणाऱ्यानी आपल्या छातीवर हात ठेवून सांगावं कि, त्यांच्या शहरात क्रिकेट सट्टा, वरळी मटका, जुगार चालू आहे कि नाहीत? त्यासाठी पोलिस खंडणी घेतात की नाही? त्या विरोधात कुणी बोलतंय का? तक्रार करतंय का? नाही. कारण ते परंपरागत आहेत आणि त्यासाठी खंडणी देणं-घेणं हीसुद्धा एक रुढी आहे. अशा ह्या वाहत्या गंगेतून बाजूला काढल्याचं परमवीरसिंह यांना अतिव दुःख झालंय. त्यांनी हे पत्र तो फार 'सद् रक्षणाय खल निग्रहणाय !' आहे म्हणून लिहिलेलं नाही. तसं असतं तर हे फडणवीसांच्या काळातच घडलं असतं. कारण ही खंडणी परंपरागत असल्यानं फडणवीसांनाही ही रसद मिळतच होती. ती सरळ आपल्याच खिशात यावी म्हणूनच त्यांनी गेली पाच वर्षे गृहमंत्रीपद स्वतःकडंच ठेवलं होतं. आणि परमवीरसिंह यांनी पत्राद्वारे खंडणीचं रहस्योद्घाटन केलं. त्याची बदली केली नसती तर हे सारे कायदेशीर राहिलं असतं. पण बदली झाल्यानं हेच बेकायदेशीर ठरलं. सोबतच फडणवीसही असेच खंडणीखोर होते, हे सत्यही उघडकिस आलंय. बदली झाल्यावर परमबीरसिंह यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून देशभर एक हवा निर्माण केली. परमबीरसिंग हे या प्रकरणातील नाहक बळी आहेत की निर्दोष की अपयशी की मुक संमती असलेले अधिकारी होते की लाभार्थी की गुन्हेगार? की कळसूत्री बाहुली, की आणखी काही? हे पूर्ण तपासांती समजेल

आपल्या एका ज्युनिअर अधिकाऱ्याला आपल्या हद्दीतून पैसे गोळा करायला सांगितलं हे समजल्यावर आयुक्त काय करू शकतो? तर तो स्पष्ट तोंडी नकार देवू शकतो, लेखी पत्र देऊन नकारही कळवू शकतो. मंत्री आणि अधिकाऱ्यांना दिलेल्या सूचनांची लेखी नोंद कोणत्याही एका अगर सर्वच पोलिस स्टेशनमधल्या डायरीमध्ये करू शकतो. कारण पोलिस स्टेशनमधील स्टेशन डायरी नोंद हा एकमेव पुरावा अगदी सुप्रीम कोर्टापर्यंत ग्राह्य धरला जातो. ताब्यातील अधिकाऱ्यांना परस्पर बोलविण्याचा आणि तपासाबाबत वाजवी कायदेशीर सूचना देण्याचा अधिकार गृहमंत्र्यांना आहे. असतो. शेवटी सरकार म्हणजे कॅबिनेटमंत्री. म्हणूनच कोणत्याही अपयशाबद्धल विरोधीपक्ष मंत्र्यांचा राजीनामा मागते. मंत्र्यांनी दिलेल्या सूचना तपासी अंमलदार यांच्यावर बंधनकारक नसल्या तरी तपासी अंमलदार त्या सूचनांची नोंद तपासाच्या केस डायरीमध्ये करतात. ते करणे बंधनकारक असते. केस डायरीतील नोंद याला पुराव्याच्या दृष्टीनं मोठं महत्त्व आहे. गृहमंत्र्यानी केलेल्या हस्तक्षेपाच्या नोंदी परमबिरसिंग यांनी केलेल्या आहेत का? मोहन डेलकरांचा गुन्हा मुंबईत दाखल न करण्याचा परमबीर यांचा युक्तिवाद हा घटना बाह्य आणि पोरकट वाटतो. आत्महत्येचा गुन्हा मुंबईत घडला म्हणजे गुन्हा मुंबईतच दाखल झाला पाहिजे हे गृहमंत्र्याचं म्हणणं योग्य आहे.
एसीपी पाटील यांचे व्हॉट्सअॅप वरील संभाषण नंतर तयार केलेलं दिसतं. अशा गोष्टींबद्धल असा संवाद संशयास्पद वाटतो. या पत्राला पुरावा मूल्य अजिबात नाही. पत्र नैसर्गिक प्रतिक्रिया नसून कारवाईनंतर आलेल्या विचारातून लिहिल्यासारखे जाणवते. पत्रात नमूद केलेल्या घटना घडत असता अर्जदाराची अगोदरची वर्तणूक आणि दोषी ठरवून बदली केल्यानंतरच्या काळातील वर्तणूक यात फार मोठी तफावत जाणवते. यात कुठलाही कायदेशीर पुरावा नसून सामान्य माणसासाठी सनसनाटी आणि विरोधीपक्षासाठी खाद्य पुरवल्याचं दिसतंय. आजचे आयपीएस अधिकारी यांचं मूळ एकेकाळी आयपी या ब्रिटिशसेवेत आहे. मुठभर आयपी अधिकारी काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत कायदा सुव्यवस्था राखायचं काम करीत. आजचे हे अधिकारी अर्धी चड्डीच्या इशाऱ्यावर चाल सिंहाची दाखवतात मात्र वर्तणूक लबाड कोल्ह्याची करतात. पोलिस दलाची दुर्दशा व्हायला हेच आयएएस आणि आयपीएस नेतृत्व जबाबदार आहे हे मी अनेक वर्ष मांडत आलोय! असं माजी पोलीस अधिकारी सुरेश खोपडे यांचं म्हणणं आहे.

प्रत्येक वेळेला सुशांतसिंग राजपूत, कंगना रनौत, अर्णव गोस्वामी आणि आता वाझेसारखं प्रकरण उपस्थित करायचं. प्रसारमाध्यमांच्या मागण्यांची पूर्तता करायची आणि महाराष्ट्रातील गारपीट, अवकाळी पाऊस, शेतीमालाचे भाव, कांद्याचा प्रश्न, वाढती महागाई, पेट्रोल-डिझेलचे दर, बेरोजगारी, कोरोना या प्रश्नांवर जो आक्रस्ताळेपणा आवश्यक आहे, तो फडणवीस करत नाही. फक्त मुख्यमंत्रिपदावर डोळा ठेवून आपल्या पाच वर्षाच्या कालावधीतील भानगडी उघड्या होता कामा नये, हा हेतू मनात ठेवून फक्त खोटं बोलताहेत. असो. नाटककार राम गणेश गडकरी यांनी आपल्या 'राजसंन्यास' नाटकात जिवाजी कलमदाने या पात्राच्या तोंडी एक वाक्य लिहिलंय, " वारुळातली दोन जिभांची पिवळी नागीण चावली तर एका पिढीचा घात होतो; पण कारकुनी कानावरची ही दोन जिभांची काळी नागीण डसली तर सात पिढ्यांचा सत्यानाश करते. शाईचा सोमरस आणि लेखणीची समिधा करून एखाद्याची आहुती घेण्यासाठी कारकुनाने एक ओळ खरडली की ती वेदवाक्य...!" हे त्रिकालाबाधित सत्य सध्याच्या सरकारला अनुभवायला येतंय. राज्य प्रशासनातल्या काही अधिकाऱ्यांनी राजकारण्यांचे फोन चोरून ऐकले, रेकॉर्ड केले आणि तो सारा मालमसाला फडणवीस यांच्याकडं सुपूर्द केलाय. ते सरकारमधल्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं सिद्ध केलंय. याचा अर्थ त्या संबंधित अधिकाऱ्यांना विद्यमान सरकारपेक्षा गेलेल्या सरकारातल्या नेत्यावर अधिक विश्वास असावा. ही स्वामीनिष्ठा म्हणावी की, आणखी काही. पण हे गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे. टॉप सिक्रेट कागदपत्रे बाहेर जातात. थेट विरोधकांकडं जातात. ती सार्वजनिक होतात. हा कर्तव्यच्युतीचा भाग आहे. सनदी अधिकारी म्हणून घेतलेल्या शपथेचा भंग आहे. अधिकाऱ्यांच्या या स्वामीनिष्ठांचे विच्छेदन व्हायला हवंय!
हरीश केंची
९४२२३१०६०९

Monday 22 March 2021

वाझेंचं ओझं का वाहताहात?

"विरोधीपक्ष हे आम्ही म्हणू तशी चौकशी झाली पाहिजे आणि तसेच निष्कर्ष आले पाहिजेत असा आग्रह धरताहेत हे घातक आहे. हे विधान वाचताना प्रबोधनकारांचे पुढील भाष्य आठवलं, त्यांच्या 'प्रतापसिंह छत्रपती आणि रंगो बापूजी' या पुस्तकात ते म्हणतात, "आम्ही सांगू तोच खरा इतिहास, ठरवू तोच प्राणी देशभक्त, आमचेच पंचांग लोकमान्य, स्वदेशाभिमान काय ती आम्हाला ठावा, आम्हीच तो गावा नि इतरांना सांगावा, ब्राह्मणेतर कधीच गेले नाहीत त्या गावा, असा जो कांगावा या दांभिक हिंदुत्वनिष्ठांच्या 'राष्ट्रीय' ठणठणाट दिसून येतो, त्यात सत्याभिमान, इतिहासभक्ती, साहित्यसेवा, हिंदूंचा उद्धार, लोकशाहीची विवंचना वगैरे काहीही नसून मयत पेशवाईच्या ब्राह्मणी वर्चस्वाच्या पुनरुद्धाराचा दुर्दम्य अट्टाहास मात्र दिसून येतो....!' हे पुस्तक १९४८ सालचे आहे. विरोधीपक्ष असलेला भाजप यापेक्षा वेगळा ते काय वागतोय! सत्तापिपासूवृत्तीनं भाजपेयींनी महाराष्ट्र, महाराष्ट्रातली पोलीस तपास यंत्रणा यांना बदनाम करण्याची जणू मोहीमच उघडलीय. 'महाराष्ट्रधर्म' म्हणून जो देशात ओळखला जातोय त्याला नख लावण्याचा प्रयत्न होतोय. हे एका बाजूला होत असताना सत्ताधाऱ्यांच्या मानसिकतेचाही धिक्कार करावा तितका कमीच आहे. सरकारला उगाचच वाझेंचं ओझं वाहण्याची गरज नव्हती! आता सरकारनं आत्मचिंतन करून महाराष्ट्राची ढासळणारी प्रतिष्ठा सांभाळण्याची जबाबदारी पार पाडावी!"
-----------------------------------------------------------
*गे* ल्यावर्षांपूर्वी सर्वाधिक जागा जिंकूनही महाराष्ट्रातील सत्तेपासून वंचित राहिलेल्या भारतीय जनता पक्षाचा आत्मविश्वास वाढवणा-या घटना वर्षभरानंतर पहिल्यांदाच घडू लागल्या आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही सूर गवसल्याचं चित्र दिसू लागलंय. फाजील आत्मविश्वास, नौटंकीची हौस, कुणाचा तरी हट्टाग्रह यामुळं अत्यंत तकलादू पटकथेच्या आधारे सुमार नटांना घेऊन रचलेलं नाटक सरकारच्याच मुळावर आल्याचं पाहायला मिळतंय. सुधीर मुनगंटीवार यांनी सरकार पाडण्यासाठी नव्या जोमानं तीन महिन्यांचा नवा वायदा केला असला तरी सरकारला धोका नाही. परंतु गेलेली प्रतिष्ठा मिळवण्यासाठी सरकारला फार समन्वयानं काम करावं लागेल. अत्यंत कसोटीच्या काळात नाना पटोले यांना आपण विरोधी पक्षनेते नव्हे, तर सरकारचे भाग आहोत याचं भान ठेवून व्यवहार करावा लागेल. सध्याचा जो रणसंग्राम सुरू आहे, तो तीन स्तरावरचा असून एका लढाईच्या पोटात इतरही काही लढाया दडल्या आहेत. पहिली लढाई उघड स्वरुपाची आहे, ती म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार विरुद्ध भाजपेयीं. ही राजकीय लढाई आहे. दुसरी लढाई राजकीयच आहे, परंतु त्यासाठी सरकारी यंत्रणा झुंजतेय. एनआयए ही केंद्रीय यंत्रणा विरुद्ध मुंबई पोलीस अशी ही दुसरी लढाई आहे. आणि तिसरी लढाई मुंबई पोलिसांच्यातलीच अंतर्गत वर्चस्वाची, गटबाजीची लढाई आहे. प्रत्यक्षात हे पोलिसांच्यातलं गँगवॉर आहे आणि या गँगवॉरमुळंच अंबानींच्या दारातल्या गाडीतल्या स्फोटकांपेक्षाही मोठा राजकीय भूकंप होऊन पुढचा सगळा रणसंग्राम सुरू झालाय. या तिन्ही लढायांत भाजपेयींनी महाविकास आघाडी सरकारला मात दिल्याचं दिसलं. सत्तेपासून वंचित राहिल्यामुळं देवेंद्र फडणवीस यांचा वर्षभरापासून सुरू असलेला त्रागा सगळा महाराष्ट्र पाहतोय. राज्यातल्या सत्तेला केंद्राचं समर्थन असतं तेव्हा खोटेनाटे रचून ते खरं असल्याचं न्यायालयापर्यंत सिद्ध करण्यात अडचण येत नाही. पोलिस दलातल्या 'संघी' अधिकाऱ्यांना हाताशी धरून कोरेगाव भीमा प्रकरणी अर्बन नक्षलची पटकथा रचण्याचा अनुभव फडणवीस यांच्या गाठी होता. त्यांच्या काळात त्याचा तपास महाराष्ट्रातील अधिकारी करीत होते, त्यासाठी ते त्यावेळी सक्षम होते परंतु महाविकास आघाडी सरकारनं त्याचा नव्यानं तपास करण्यासाठी हालचाली सुरू केल्या तेव्हा फडणवीस यांनी दिल्लीत चाव्या फिरवून रात्रीत हा तपास एनआयएला ताब्यात घ्यावा लावला. फडणवीस यांच्या काळातला बनाव उघड होण्याची संधी आली असताना महाराष्ट्र सरकारनं चर्चेचं गु-हाळ लावून ती संधी घालवलीय!

फडणवीसांनी विधानसभेत प्रचंड आवेशपूर्ण भाषण केलं. याच सभागृहात ते २०१४ पूर्वी त्यांनी मोठ्या आवेशात विजयकुमार गावित यांच्यावर घोटाळा केल्याचा आरोप करुन सभागृह दणाणून सोडलं होतं. त्यानंतर काय झालं? गावितांची मुलगी २०१४ ला भाजप खासदार झाली आणि विजयकुमार आमदार झाले. याच सभागृहात त्यांनी सिंचन घोटाळ्यावर जबरदस्त फटकेबाजी करत अजितदादा आणि तटकरे यांच्यावर आरोप केले होते. तसंच त्यांनी या घोटाळ्याचे गाडीभर पुरावेही दिले होते. त्यानंतर काय झालं? स्वतः मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असताना त्यांनी अजितदादा किंवा तटकरे यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. उलट याच अजितदादांसोबत त्यांनी पहाटे शपथ घेऊन सरकार स्थापन केलं. याच सभागृहात ते मुख्यमंत्री असताना राणेंनी केलेल्या आरोपांवर उत्तर देताना त्यांनी राणेंवरील आरोपांची आणि दाखल झालेल्या गुन्ह्यांची जंत्रीच सभागृहात वाचून दाखवली होती. राणेंचा पाहण्यालायक झालेला चेहरा अनेकांना आठवत असेल. काही भक्तांची भिंत पाहिली तर या आवेशपूर्ण भाषणाचा संपूर्ण व्हिडिओ पाहता येईल. त्यानंतर काय झालं? हेच राणे भाजपचे खासदार झाले आणि त्यांचा मुलगा आमदार झाला. याच सभागृहात प्रवीण दरेकरांच्या मुंबई बँक मध्ये घोटाळा झाल्याचे पुरावे असलेले पेपर दाखवत कारवाईची मागणी करायचे. त्यानंतर काय झालं ?
२०१४ मध्ये मुख्यमंत्री झाल्यावर प्रवीण दरेकरांनाच भाजपमध्ये घेतलं, विधानपरिषदेतून आमदार केलं आणि आता ते विधानपरिषदमध्ये भाजपचे विरोधीपक्ष नेता आहेत. इतकंच नाही तर मुख्यमंत्री असतांना मामुनीं शिक्षकांची वेतन बँक खाती मुंबई बँकेत वळवली! नंतर आधी हायकोर्ट मग सुप्रीमकोर्टनं फटकारल्यावर तोंडावर पडले आणि मग खाती मागे घ्यावी लागली. याच सभागृहात कृपाशंकर सिंग यांनी केलेल्या घोटाळ्यांबद्धल पण अनेक आरोप केले. त्यानंतर काय झालं? विरोधी पक्षनेता असतांना कृपाशंकरच्या घोटाळ्याची कागद नाचवली पण स्वतः मुख्यमंत्री, गृहमंत्री झाल्यावर त्याच कृपाशंकर विरुद्ध आम्हाला पुढं चौकशी करायची नाहीये असं प्रतिज्ञापत्र कोर्टाला दिलं आणि त्याला निर्दोष सिद्ध केला. अशी अनेक उदाहरण देता येतील. याशिवाय ते मुख्यमंत्री, गृहमंत्री असताना राज्यात वाढलेली गुन्हेगारी असो, विशेषतः नागपूरात. हत्या असोत, आत्महत्या असतो... विशेषतः गोविंद पानसरे, मंत्रालयात आत्महत्या करणारे शेतकरी धर्मा पाटील यांना कोण विसरेल?... अनेक उदाहरणं आहेत. एकंदर ज्या लोकांवर आधी फडणवीसांनी आरोप केले किंवा सभागृहात आवेशपूर्ण आणि अभ्यासपूर्ण भाषण केलं त्यांना आपल्याच पक्षात सामावून घेतलं किंवा ज्यांना घेता येणं शक्य नव्हतं; जसे की अजितदादा, तटकरे, कृपाशंकर त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. २०१४ पूर्वी ठीक होतं पण आता एक पूर्ण टर्म स्वतः मुख्यमंत्री आणि गृहमंत्री राहिलेल्या फडणवीसांची कारकीर्द लोकांनी पाहिलेलीय. त्यामुळं दरवेळी प्रत्येक विषयात फडणवीस मी..मी करत आकांडतांडव करत आहेत ते लोकांच्या सहज पचनी पडताना दिसत नाहीये. उलट ते मोठ्या प्रमाणावर ट्रोल होतांना दिसताहेत, कारण यांच्या हातात सत्तासूत्र असतांना हे आधी ज्यांना गुन्हेगार आणि भ्रष्टाचारी म्हणायचे त्यांना शासन करायचं सोडून त्यांना जवळ करत पक्ष वाढवण्यात त्यांनी आपल्या पदाचा वापर केलाय. मागच्या एक वर्षात विरोधीपक्ष नेता म्हणून करोना महामारी, मुख्यमंत्री सहाय्यता निधी, लॉक डाऊन, सुशांतसिंग राजपूत, कंगना राणावत, अर्णब गोस्वामी आणि आता सचिन वाझे वगैरे विषयात त्यांनी आणि एकूणच भाजपनं केलेला आकांडतांडव पाहता, मुख्यमंत्री म्हणून 'मी पुन्हा येईन' म्हणणाऱ्या फडणवीसांना मुख्यमंत्री नव्हे तर विरोधीपक्ष नेता म्हणून पुन्हा येण्याची संधी मिळालीय; याचं जास्तच नैराश्य आलेलं दिसतंय. असो, अनेक भक्तांना फडणवीस अजूनही अभ्यासू नेते वाटत असले तरी त्यांचा अभ्यास दिवसेंदिवस उघडा पडून त्यांची चिडचिडच जास्त होतांना दिसतेय. आपण फक्त त्यांची मजा बघायची. 

अंबानींच्या दारातील स्फोटकांच्याप्रकरणातही फडणवीसांनी एनआयएकडं तपास देण्याची मागणी केली तेव्हा महाराष्ट्र सरकारनं सावध व्हायला हवं होतं. परंतु इथंही पुन्हा मार खाल्ला. सचिन वाझे यांच्यावर विधिमंडळात आरोप केले तेव्हा 'तुमच्या अर्णबला अटक केली' म्हणून त्यांच्यावर तुमचा राग असल्याचा सुमार युक्तिवाद गृहमंत्र्यांनी केला. या संपूर्ण घटनेसंदर्भात फडणवीस ज्या रितीनं घटनाक्रम सांगत होते, परिस्थितीजन्य पुरावे मांडत होते त्यावरूनही सरकार आणि गृहखात्यातील जाणकारांना अंदाज येत नव्हता. यावरून ही मंडळी किती गाफील होती हे लक्षात येऊ शकतं. गृहमंत्री देशमुख यांनी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, ते गृहमंत्री असले तरी पोलिस यंत्रणा मात्र गुप्त माहिती फडणवीस यांच्यापर्यंत त्याच्याआधी पोहोचवत होती. त्यांना सचिन वाझे, मनसुख हिरेन, तसेच स्फोटकांसाठी वापरलेल्या गाड्या यासंदर्भातली इत्थंभूत माहिती मिळत होती. याचाच अर्थ मुंबई पोलिसांच्यात एक प्रबळ 'संघी' गट आहे आणि तो विद्यमान सरकारला नव्हे, तर विरोधकांना माहिती पुरवत आहे. पोलिस दलातील ही मंडळी कोण आहेत, यांचा शोध घेऊन त्यांचा बंदोबस्त केला नाही तर मागे संजय राऊत म्हणाले त्याप्रमाणे सरकार पाडण्याच्या आगामी कटामध्ये ही लॉबीच महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. या एकूण प्रकरणात मुंबई पोलिस दलातील गँगवॉर चव्हाट्यावर आलंय आणि त्यानंच विरोधी पक्षनेते आणि एनआयएला सुद्धा माहिती पुरवली असावी, यात शंका वाटत नाही. सुशांतसिंह प्रकरणाच्या तपासातही मुंबई पोलिसांनी हलगर्जी केली होती. सुरुवातीच्या काळात तपास अधिकारी खेळ खेळत बसले होते. रोज नवी थेअरी मांडत संबंध नसलेल्या मोठमोठ्या कलावंतांना चौकशीसाठी बोलावून शोबाजी करत होते. बिहारमध्ये एफआयआर नोंदवल्यानंतर त्यांचं पितळ उघडं पडलं होतं. भाजपेयींनी केंद्रीय यंत्रणा आणून प्रकरणाचा बाजार मांडला त्यामुळं मुंबई पोलिसांची अब्रू कशीबशी वाचली, परंतु त्यावेळीही मुंबई पोलिसांनी गोंधळ घातला होता. अंबानींच्या दारातल्या गाडीच्या प्रकरणात तर सरकारच्या अब्रूचे धिंडवडे निघाले आहेत. केवळ स्कॉटलंडयार्डशी तुलना आणि कोविड योद्धे म्हणून गौरव करून त्या पूर्वपुण्याईच्या आड सरकारला आणि अधिका-यांनाही लपता येणार नाही. मुंबई पोलिसांतला गँगवॉर यानिमित्तानं चव्हाट्यावर आलाय. महाराष्ट्र सरकारला कठोर पावलं उचलून हे 'अस्तनीतले निखारे' शोधून काढावं लागतील. नाहीतर आज विरोधकांना गुप्त बातम्या पुरवणारे पोलिस अधिकारी उद्या सरकार पाडण्याच्या कटात सामील झाले, तर आश्चर्य वाटायला नको.

धनंजय मुंडे प्रकरण, संजय राठोड राजिनामा यामुळं अगोदरच बॅकफुटला गेलेल्या सरकारवर भाजपनं अधिक जोमानं चाल केली आणि राज्याचं राजकारण ढवळून निघालं. जेव्हा विधिमंडळात हे प्रकरण आलं तेव्हा वाझे यांना निलंबित करा अशी मागणी भाजपकडून केली गेली. त्यावर सत्ताधारी गटात एकवाक्यता होतच होती, पण विरोधी पक्षांच्या अशा दबावापुढं किती वेळा झुकायचं असा प्रश्नही विचारला गेला आणि वाझे यांची केवळ बदली केली गेली. सत्ताधाऱ्यातल्या काहींना असं वाटतं की अधिवेशनातच निर्णय झाला असता तर आता वाझेंच्या अटकेनंतर जी नामुष्की सरकारला पत्करावी लागतेय, ती वेळ आली नसती. पुढं विरोधी पक्षाचा दबाव अधिक वाढला आणि राजकारण ढवळून निघालं. हे सरकार अस्तित्वात आल्यापासून केंद्र विरुद्ध राज्य असं द्वंद्व सातत्यानं पहायला मिळतंय. जीएसटी पासून ते कोव्हिड मदतीपर्यंत या संघर्षाची व्याप्ती आहे. पण आता वाझे प्रकरणात एनआयएनं केलेल्या एन्ट्रीनंतर आणि कारवाईनंतर केंद्राला राज्यावर कुरघोडी करण्याचं अजून एक निमित्त मिळालं. वाझे प्रकरणामुळं मुंबई पोलीस दलातलं अंतर्गत राजकारणही ढवळून निघालं आहे आणि पुन्हा एकदा गटबाजीची चर्चा सुरु झालीय. पोलीस दलातली गटबाजी ही नवी गोष्ट नाही पण एका अधिकाऱ्याला अटक होणं आणि अजून काहींची चौकशी होणं, त्यामुळं या गटबाजीला गंभीर परिमाण मिळालं आहे. उघडपणे त्याबद्दल बोललं जात नाही, पण दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे. मुंबईचे पोलीस आयुक्तही बदलण्यात आले आहेत. नवे आयुक्त आले आहेत. पण वाझे प्रकरण पुढं त्यांच्यासाठी काय ठरणार याबद्धलही अनेक कयास आहेत. त्यामुळं हे संपूर्ण प्रकरण केवळ एका एपीआयचं न राहता, पोलिसदल आणि सत्ताधारी पक्ष ढवळून काढणारं ठरलं. एका एपीआयनं राजकारण ढवळून काढलं असं म्हणण्यापेक्षा पोलीस दलावर वचक नसला तर राजकारणात काय किंमत द्यावी लागते हे या प्रकरणामुळं समोर आलंय. पोलिसांचे गट, त्यात असलेल्या भ्रष्टाचारामुळं सरकारलाही जुमानेसं होणं हेही दिसून आलं. सरकार त्यांच्यामुळं अडचणीत आलं. आघाडीच्या मित्रपक्षांच्या बैठकीतही याबद्धलचं बोलणं झालं. त्यामुळं आता हे बदल्याचं सत्रं सुरु झालंय. अजून जर कोणा अधिकाऱ्यावर या प्रकरणात कारवाई झाली तर 'स्कॉटलंड यार्ड'ची उपमा मिरवणाऱ्या या पोलीसदलाची अधिक बदनामी झाली असती.

सध्या महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून जे काही घडतंय, ते निश्चितच या राज्याला भूषणावह नाहीये. महाराष्ट्राला सकारात्मक, संवेदनशील विचारांचे अधिष्ठान आहे. इथल्या महापुरुषांनी त्याची असा विचार शेकडो वर्षांपूर्वी इथल्या मातीत रुजवलीत. त्यातूनच या राज्याला एक विचारशील समाज लाभलाय. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडं सदगुणांच्या विचारांचा हा वारसा नेला जात असतो. महाराष्ट्रातील चिंतनशील आणि विनयशील राजकारण हीदेखील या विचारांचीच देण आहे. नैतिकता इथल्या राजकारणाचा आत्मा आहे. राजकीय आरोप-प्रत्यारोप हा राजकारणाचा भाग आहे. ते खिलाडूवृत्तीने घेण्याची इथली परंपरा आहे. हे होत असताना इथल्या राजकारणात अनैतिकतेला आजवर कधीच थारा मिळाला नाही. नैतिक-अनैतिक, चांगलं-वाईट याचं वर्गीकरण करण्याचा सद्सदविवेकपणा इथल्या नेत्यांमध्ये नेहमीच पाहायला मिळालाय. म्हणूनच आज देशात महाराष्ट्राकडं एक वेगळ्या सन्मानानं पाहिलं जातंय. अगदी यशवंतराव चव्हाण यांच्यापासून बाळासाहेब ठाकरे यांच्यापर्यंत कोणत्याही नेत्यानं कधी विचारांशी बेईमानी केली नाही. स्वार्थासाठी भ्रष्ट-दुराचारी लोकांचं कधीच समर्थन केलं नाही. सत्ता भोगताना एखाद्याच्या हातून अनुचित प्रकार घडल्यास त्याला सत्तेतून पायउतार करण्याचं धारिष्ट्य या नेत्यांकडं होतं. त्याला शासन झालं पाहिजे, हीच त्यांची भूमिका राहिलीय. सत्ता येते आणि जाते. पण आरोपामुळं पदांना डाग लागू नयेत, त्यांची गरिमा, प्रतिष्ठा जपली जावी. जनतेच्या मनात शासन व्यवस्थेविषयी विश्वास कायम राहावा, या उदारमतवादी विचारांनी या नेत्यांनी राजीनामा देत आपली राजकीय कारकीर्द पणाला लावलीय. कारण राजीनामा ही त्यावेळच्या परिस्थितीची तातडीची गरज असते. म्हणून हे नेते संपले का? तर नाही! जनतेच्या न्यायालयात गेले. तिथं जिंकून ते बहुमतानं पुन्हा सत्तेत आले. लोकशाहीत जनता सर्वोच्च आहे, त्यांच्या मताचा आदर करत त्यांना शरण गेलेल्या अशा नेत्यांची चूक जनतेनंही मोठ्या मनानं पोटात घालून घेतल्याची ही उदाहरणं आहेत. स्वत:ला सत्तेचे मालक समजणारे, जनमताचा अनादर करणारे मात्र देशोधडीला लागले, हाही इथला इतिहास आहे. सत्ता ही आपल्या मालकीची नाही. जनताच त्याची खरी मालक आहे. आपण केवळ विश्वस्त आहोत, ही भावना सतत मनात ठेवून जे इथं वावरले तेच या इथल्या राजकारणातले हिरो बनलेत हा इतिहास आहे. तो कसा विसरता येईल!

सध्या गाजत असलेले सचिन वाझे प्रकरण महाराष्ट्राच्या राजकीय प्रतिष्ठेला शोभणारं नक्कीच नाही. सचिन वाझे यांना राज्यकर्त्यांनी केवळ व्यक्ती म्हणून वागवणं संयुक्तिक नव्हतं. ते मुंबई पोलिसांचं प्रतिनिधित्व करत होते. त्यांचं कृत्य थेट पोलीसदलाला कलंकित करणारं होतं. त्यांना अभय देणं म्हणजे मुंबई-महाराष्ट्राच्या पोलीस दलातील प्रामाणिक अधिकाऱ्यांवर अन्याय करणारं ठरेल. याची जाणीव ठेवून त्वरेनं कारवाई होणं अपेक्षित होतं. पण तसं झालं नाही. वाझेंना हटवण्यात आलं, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. ते दोषी आहेत की निर्दोष ही ठरवणारी आपल्याकडं सक्षम यंत्रणा आहे. त्यामुळं इतर कोणी एखाद्याविषयी निष्कलंकपणाचा दाखला देत असेल तर त्याला जनतेच्या लेखी काहीही अर्थ उरत नाही. आता वाझेंना अटक झाल्यानंतर तर धक्कादायक खुलासे होत आहेत. यावरून हे प्रकरण हाताळण्यात चूक झाली, हे मान्य करावं लागेल. फक्त वाझेच नव्हे वनमंत्री संजय राठोड असो अथवा सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपांच्या प्रकरणातही दिरंगाई झाली. किंबहुना या मंत्र्यांनी मनाचा मोठेपणा दाखवत स्वत:हून पायउतार व्हायला हवं होतं. इथं विरोधकांचे आरोप हा मुद्दाच इथं गौण आहे. आरोप करणं त्यांचं काम आहे, तशी त्यामागील सत्यता सक्षम यंत्रणेकडून तपासणं ही राज्यकर्त्यांची जबाबदारी नाही का? शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे हुकूमशाहीचे जाहीररीत्या समर्थन करणारे होते म्हणून त्यांनी सत्तेचा कधीही अनादर केला नाही. १९९५ मध्ये शिवसेना-भाजपा युती सत्तेत असताना महादेव शिवणकर, बबनराव घोलप, शशिकांत सुतार, शोभाताई फडणवीस या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले तेव्हा बाळासाहेबांनी त्यांची पाठराखण केली नाही. त्यांचे राजीनामे घेत सत्तेचं पावित्र्य जपलं होतं. ही या महाराष्ट्राची परंपरा आहे. त्याला तडा जाता कामा नये. सत्ता सांभाळताना अनेकदा परीक्षेचा काळ येतो. मन विचलित करणारे प्रसंग घडतात. त्यावेळी ‘आपले हे काम लोकशाहीच्या पद्धतीनं चाललं आहे की नाही, याचं कठोर आत्मनिरीक्षण केलं पाहिजे,’ हा यशवंतरावांचा विचार डोळ्यासमोर ठेवला की निश्चित मार्ग सापडेल. त्यासाठी आत्मचिंतन करण्याची गरज आहे!

चौकट
*भाजपेयींची शाऊटिंग ब्रिगेड*
या लेखाच्या सुरुवातीला इन्ट्रोमध्ये प्रबोधनकार ठाकरे यांच्या 'प्रतापसिंह आणि रंगोबापूजी' या पुस्तकातला उतारा दिलाय त्याची अनुभूती आजही येतेय. भाजपेयींची पत्रकार परिषद वा आरोपांची फैरी झडल्या नाहीत असा एकही दिवस जात नाही. आपल्याच पक्षाच्या अभिजनी प्रवक्त्यांऐवजी बहुजनी आयारामांना आपल्या इच्छित उद्दिष्टासाठी भाजपेयींनी विषेशतः फडणवीसांनी इथं एक गेम चालवलाय. संघी वा भाजपेयीं प्रवक्त्यांना दूर सारून आपणच मांडीवर घेतलेल्या आयारामांकडं सरकारला, प्रामुख्यानं शिवसेनेला त्यातही उद्धव ठाकरेंना 'टार्गेट' करून त्यांचं चारित्रहनन करण्याची जबाबदारी दिल्याचं जाणवतं. माधव भांडारी, केशव उपाध्ये, विश्वास पाठक या 'संघी' निष्ठावंताना सध्या बाजूला ठेवलेलं दिसतं. त्यांच्याऐवजी शिवसेनेतून भाजपेयीं व्हाया काँग्रेस आलेले 'स्वाभिमानी' नारायण राणे आणि त्यांचे दोन्ही पुत्र, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून आलेले प्रवीण दरेकर, राम कदम, राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपत आलेले प्रसाद लाड, चित्रा वाघ ही आयाराम मंडळी भाजप कार्यालयातून पत्रकार परिषदा घेण्यात आघाडीवर ठेवण्यात आलं आहे. इथं पक्षातल्या निष्ठावंत संघीयांना दूर ठेऊन बाटग्यांना पुढं केलं जातंय. साहाजिकच 'बाटग्याची........ मोठी!' या मराठीतल्या म्हणीप्रमाणे त्यांचं वक्तव्य असतं. आपल्या मालकाशी किती एकनिष्ठ आहोत हे त्यांना दाखवून द्यायचं असतं. त्यासाठी ते बेछूट आरोप करत असतात. याशिवाय आशिष शेलार, अतुल भातखळकर, किरीट सोमय्या ही अनाहूत मंडळी सतत दूरचित्रवाणीवर झळकत असतातच. 
हरीश केंची
९४२२३१०६०९

Saturday 13 March 2021

संघ स्वयंसेवकही सरकारच्या विरोधात !

"देशात आज जे 'भाजपेयीं' वातावरण निर्माण झालेलं आहे त्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं अत्यंत नियोजनबद्धरित्या मोर्चेबांधणी केलीय. सर्वच क्षेत्रात वेगवेगळ्या स्तरावर अधिकृतरीत्या २९ संस्था स्थापन केल्यात. याशिवाय इतर शेकडो संस्थाचं जाळं निर्माण करण्यात आलंय. ही एक हिंदूत्ववादी सामाजिक आणि कौटुंबिक संघटना आहे. सामाजिक आणि सांस्कृतिक संस्था या स्वरूपात ही संघटना काम करीत असते. राष्ट्रभक्ती आणि संस्कृतीच्या प्रसार, प्रचार आणि संवर्धनासाठी अनेक संस्था आणि समाजोपयोगी निस्वार्थ, सेवाभावी कार्यकर्ते तयार केले आहेत. पण मुख्य उद्देश हा 'हिंदुराष्ट्र' निर्मितीचा आहे. आज देशातच नव्हे तर जगात सर्वाधिक कार्यकर्ते असलेला राजकीय पक्ष म्हणून याच संघाची राजकीय शाखा 'भारतीय जनता पक्ष' ठरलाय. देशात आणि अनेक राज्यात त्यांची सत्ता आहे. ज्या उद्दिष्टासाठी संघाची निर्मिती झाली ते साध्य झाल्यानं या पूरक संस्थांची गरज उरली आहे का? अशी चर्चा संघातर्गत सुरू झालीय. शेतकरी आंदोलनाच्या निमित्तानं संघाच्या भारतीय किसान संघाची भूमिका संदिग्ध बनल्यानंतर स्वयंसेवकांमध्ये हा अंतर्विरोध सुरू झालाय. आतातर उद्या १५ मार्चपासून भारतीय किसान संघ, भारतीय मजदूर संघ आणि स्वदेशी जागरण मंच यांनी सरकार विरोधात आंदोलन उभारलंय. त्यामुळं संघातला सरकारचा अंतर्विरोध इथं प्रकर्षानं जाणवतोय!"
----------------------------------------------------------

*रा* ष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संबंधित भारतीय किसान संघ, स्वदेशी जागरण मंच आणि भारतीय मजदूर संघ यांनी निर्गुंतवणूकीला विरोध आरंभलाय. नुकतंच चेन्नई इथं झालेल्या भारतीय मजदूर संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय की, उद्या १५ मार्चपासून ११ नोव्हेंबरपर्यंत कृषिकायदे, औद्योगिक निर्गुंतवणूक, खासगीकरण, यांच्या विरोधात देशभर आंदोलन करण्याचं त्यांनी जाहीर केलंय. भारतीय मजदूर संघांच्या मते सरकारचं हे धोरण अत्यंत चुकीचं आहे. या कंपन्यातील कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या यामुळं जातील. त्यांचा रोजगार कायमचा संपुष्टात येईल. त्यामुळं भारतीय मजदूर संघानं दीर्घ मुदतीचं आंदोलन करण्याचा ठरवलंय. भारतीय किसान संघ आणि स्वदेशी जागरण मंच या संघाच्या अधिपत्याखालील संघटनाही या आंदोलनात सहभागी होताहेत. मजदूर संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत आंदोलनासंदर्भात सांगितलं गेलं की, येत्या १५ मार्चपासून १४ एप्रिलपर्यंत उद्योगवार सेमिनार आयोजित केले जातील. त्यात त्या उद्योगातील कामगारांवर काय परिणाम होतील याची चर्चा होईल. मे महिन्यात याबाबतचा राष्ट्रीय स्तरावर एक भव्य सेमिनार आयोजित केला जाणार आहे. त्यानंतर २० जूनपर्यंत 'जागरूकता अभियान' चालवलं जाईल. यात सरकारच्या धोरणातील घातकता, त्यामुळं शेतकऱ्यांचं, कामगारांचं होणारं नुकसान, देशात निर्माण होऊ घातलेली अराजकता, उद्योजकांनी केलेली कोंडी, याबाबत लोकांना जागृत केलं जाईल. त्यानंतर १५ जुलैदरम्यान सामूहिक आंदोलन केलं जाईल. हे सारं कुणाच्या? तर आपल्याच विचारांच्या सरकारच्या विरोधात! कोण करणार आहेत तर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक! हे इथं लक्षात घेतलं पाहिजे! त्यानंतर हे स्वयंसेवक सरकारविरोधात २० ते ३० सप्टेंबर दरम्यान राज्यस्तरीय संमेलनं आयोजित करतील. सहाव्या आणि शेवटच्या टप्प्यात भारतीय मजदूर संघ विक्रीसाठी काढलेल्या सर्व सरकारी कंपन्यांच्या कार्पोरेट कार्यालयासमोर आंदोलन करतील. दिल्लीच्या सीमेवरचं शेतकऱ्यांचं आंदोलन हे काँग्रेस व इतर विरोधीपक्ष प्रभावित आहे, ते हे आंदोलन भडकवीत आहेत. याशिवाय आंदोलनकारी नक्षलवादी, खलिस्तानवादी आहे असा कांगावा सरकार करत होतं. आता रा.स्व.संघाच्या संस्थाच सरकारच्या विरोधात उभ्या ठाकल्यात. त्यांनाही काँग्रेसनं भडकावलं असं म्हणता येईल का? निर्गुंतवणूक करण्याचं धोरण काँग्रेसच्या काळातही राबविलं गेलं असं भाजपेयींचं म्हणणं आहे. पण यात खूप मोठा मूलभूत फरक आहे. काँग्रेसनं जे निर्गुंतवणूक धोरण राबविलं त्यावेळी या कंपन्यांच्या आयपीओ म्हणजे त्याचं भाग भांडवल सर्वसामान्यांच्या खरेदीसाठी खुलं केलं, ज्यात केवळ एक ते दीड टक्का शेअर खरेदी करता येत होतं, त्याहून अधिक घेता येत नव्हतं. त्यामुळं त्याची मालकी सर्वसामान्य भागधारकाकडंच राहीलीय. या कंपन्यांमध्ये होणारा फायदा हा सर्वसामान्य भागधारकाला मिळत असे आणि त्या कंपनीची मालकी मात्र सरकारकडं राहायची. आज भाजपेयींनी ज्या सरकारी मालकीच्या कंपन्यांचं निर्गुंतवणूक करायचं ठरवलंय त्यात या कंपन्या सर्वसामान्य भागधारकांना नाही तर उद्योपतींना पूर्णपणे 'सेल आऊट' करायच्या ठरवल्यात. पूर्वी या कंपन्या सर्वसामान्यांच्या हाती राहात आता या कंपन्या सर्रास उद्योगपतींना बहाल केल्या जाणार आहेत. याला संघाच्याच या संस्थाचा विरोध आहे. हे इथं प्रकर्षानं नोंदवलं पाहिजे.

*संघाच्या मूलभूत विचारांशी फारकत घेणारे निर्णय*
भाजपेयींची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेनं भारतीय किसान संघ, भारतीय मजदूर संघ, स्वदेशी जागरण मंच या संघटना स्थापन झाल्या, देशभर पसरल्या. आज सरकारनं घेतलेल्या निर्णयांनी या संघटनांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होतोय का? अशी भीती स्वयंसेवकांना वाटू लागलीय. यातून संघ स्वयंसेवकांमध्ये अंतर्विरोधाला सुरुवात झालीय. अटलजी प्रधानमंत्री असतांना त्यांनी घेतलेल्या काही निर्णयांना तत्कालीन सरसंघचालक सुदर्शनजी विरोध करत. आज मात्र संघनेतृत्व सरकारच्या पाठीशी नाईलाजानं उभं आहे. अशी भावना स्वयंसेवकांत आहे. अशांशी चर्चा करताना संघाच्या अस्तित्वाचा प्रश्न तर उभा राहणार नाही ना?' अशी शंका निर्माण झालीय. पण त्याला स्वयंसेवकांचं उत्तर आहे की, 'हिंदुत्व' ही संघाची मूलभूत विचारधारा आहे. शेतकरी हे या हिंदुत्वाच्या अंतर्गतच येतात. शेतकरी हा भूमिपुत्र आहे. राष्ट्रीयता ही अभिन्न परिभाषा आहे, ज्यात हिंदुत्व येतं. त्यामुळं शेतकऱ्यांना हिंदुत्व वा इतर कोणत्याही विषयावरून कोणीही विभागू शकणार नाही. हे जरी स्वयंसेवक सांगत असले तरी संघ अंतर्विरोधात सापडलाय, अडकलाय. शेतकऱ्यांचं हिंदुत्व हे सर्वसमावेशक असल्यानं संघाच्या विरोधातलं हिंदुत्व म्हणजे 'हिंदुत्व विरुद्ध हिंदुत्व' असा संघर्ष तर उभा राहणार नाही ना? असा सवाल केला जातोय...! देशातलं शेतकरी आंदोलन दिवसेंदिवस चिघळतंय. सत्ताधारी भाजपेयींना वाटतंय की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. तर संघाला वाटतंय की, सत्तेवरचं नरेंद्र मोदी सरकार हे आपली जी धोरणं आहेत तीच राबवतंय. पण हळूहळू संघाच्या लक्षांत हे येतंय की, असं जे वाटतंय त्यात काही तथ्य नाही. संघाशी संबंधित तीन संघटना ज्यात १९५५ मध्ये स्थापन झालेला 'भारतीय मजदूर संघ' ज्याची स्थापना स्व. दत्तोपंत ठेंगडी यांनी केली होती. त्यानंतर १९७१ मध्ये याच दत्तोपंत ठेंगडी यांनी 'भारतीय मजदूर संघ' याची स्थापना केली होती. तुम्हाला आठवत असेल की, याच दत्तोपंत ठेंगडी यांनी १९९१ मध्ये स्वदेशी जागरण मंच उभारला होता. जो स्वदेशी वस्तू खरेदी करण्याचा आग्रह करीत होता. दत्तोपंतांचा दृष्टिकोन हा अत्यंत स्वच्छ आणि विशाल असा होता. भारतातल्या प्रत्येक क्षेत्राचं स्वदेशीकरण व्हायला हवंय. भारतातला शेतकरी हा या मातीशी एकरूप झालेला हवाय. तो जो शेती करतोय ते स्वतःसाठी शिवाय देशासाठी करतोय हे त्यातून स्पष्ट व्हायला हवंय. 'भारतीय किसान संघ' याची निर्मिती याच विचारातून झाली. कारण शेतीउद्योग हीच तर आपल्या देशाची ओळख आहे, त्याला अनुसरून त्याची शेती व्हायला हवीय. याच भावनेला समांतर अशा पद्धतीनं 'भारतीय मजदूर संघ' स्थापन करण्यात आला. याच विचारानं 'स्वदेशी जागरण मंच' काम करत होता. देशातल्या निर्माण झालेल्या आजच्या परिस्थितीत या तीनही संस्थेतील स्वयंसेवकांसमोर एक प्रश्न उभा ठाकलाय, की या ज्या तीनही संघटना जो संघाचा विचार, धोरण राबवित आहेत; नेमकं त्याच्या विरोधात त्यांच्याच विचाराचं सध्याचं भाजपेयीं सरकार कायदे करतेय!

*म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावता कामा नये*
इथं एक प्रश्न उभा राहतो की, संघाच्या प्रेरणेनं निर्माण झालेल्या या तीनही संघटनांची गरज आज देशाला खरंच राहिलेली नाही का? संघानं ज्या हिंदुत्वाच्या विचारानं देशातल्या घडामोडींकडं पाहिलं त्याला आज शेतकरी आंदोलनाच्या माध्यमातून आव्हान दिलं जातंय का? 'हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व...!' हा विचार पोहोचविण्याचं काम करणाऱ्या संघाला या देशातला भूमीपुत्रच आव्हान द्यायला उभा ठाकलाय का? ज्यामुळं भारताची परिभाषा बदलण्याची वेळ आली आहे का? असे काही प्रश्न त्यांच्या मनांत उभे राहीलेत. सरकारनं, भाजपेयींनी याबाबत संघस्वयंसेवकांशी चर्चा करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शेतकऱ्यांच्या आणि कामगारांच्या नव्यानं केलेल्या धोरणांप्रती काय भूमिका आहे हे समजून घेतलं पाहिजे. विशेषतः मोदी सरकारनं जी काही धोरणं, कायदे, निर्णय घेतलेत त्याबाबत त्यांची मतं काय आहेत. याबाबत काही वरिष्ठ स्वयंसेवकाशी चर्चा केल्यानंतर असं लक्षांत आलं की, संघाच्या मते सध्याचं दिल्लीच्या सीमेवरचं सुरू असलेलं शेतकऱ्यांचं आंदोलन हे काही देशभरातल्या शेतकऱ्यांचं आंदोलन नाही; तर ते केवळ पंजाब-हरियाणामधल्या शेतकऱ्यांच्या पुरतं मर्यादित आहे. त्याचं देशातल्या इतर प्रांतातल्या शेतकऱ्यांशी काही देणंघेणं नाहीये. संघाच्या मते ज्या पांच राज्यातल्या निवडणुका जाहीर झाल्यात तिथल्या शेतकऱ्यांनी आंदोलन केलेलं नाही. हे आंदोलन काही राज्यातच असल्यानं देशाच्या राजकारणावर या आंदोलनाचा काहीही परिणाम होणार नाहीये. त्यांच्याशी केलेल्या चर्चच्यावेळी संघस्वयंसेवकांनी सवाल केला की, सरकारनं संसदेत संमत केलेले कायदे कसं काय मागे घेणार? तसं घडलं तर कोणताच कायदा नव्यानं होणार नाही. प्रत्येक कायद्याला कोणाचा न कोणाचा विरोध असणार आहे. मग त्याचंही आंदोलन होईल; सरकारला माघार घ्यावी लागेल. म्हणून 'म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावता कामा नये' ! दुसरं असं की, सरकारनं शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करायचं जे आश्वासन दिलं आहे. त्यासाठी सरकारला बाजार समित्यांवर अवलंबून राहायचं नाहीये. नाहीतर ते कधीच पूर्ण होणार नाहीये. कारण बाजार समिती आणि अन्नधान्य महामंडळ - Apmc आणि Fci इथंच शेतीमालाच्या खरेदीविक्रीतून मोठ्याप्रमाणात भ्रष्टाचार होतो आणि त्या माध्यमातून काळा पैसा निर्माण होतो. इथं खरेदीविक्री करताना शेतकऱ्यांना जीएसटी आणि पॅनकार्ड नंबर द्यावा लागतो. शेतकऱ्यांचं उत्पन्न करमुक्त दाखवायचं असेल तर यांची बिलं सादर करावी लागतात. Apmc आणि Fci कडून जी बिलं दिली जातात त्यातून व्यापारी आणि शेतकरी यांच्याकडं काळा पैसा जमा होतो. भारतीय किसान संघाची निर्मिती करताना जी भूमिका आणि वातावरण संघाला अभिप्रेत होतं, तसं वातावरण आता राहिलेलं नाही. हे इथं लक्षांत घेतलं पाहिजे!

*संघ-संस्था राजकीय परिपेक्षाच्या बाहेर जाण्याची भीती*
राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं आपल्या विचार प्रसारासाठी ज्या वेगवेगळ्या संस्था-संघटना निर्माण केल्या आहेत त्यांची गरज आजच्या काळात राहिली आहे का? असा विचार संघामध्ये सध्या होतोय. ४ मार्च १९७९ ला राजस्थानातल्या कोटा इथून दत्तोपंत ठेंगडी यांनी भारतीय किसान संघाच्या कामाला सुरूवात केली. तेव्हापासून किसान संघानं वेगवेगळ्या पक्षाच्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात वेगवेगळ्या राज्यात आंदोलनं केली आहेत. शेतकऱ्यांना आवश्यक असलेल्या वीज, खतं, बियाणं याबाबत काही समस्या असतील तेव्हा भारतीय किसान संघ शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलंय. मग ते सरकार भाजपेयींचं असो वा इतर कोणत्याही पक्षाचं असो. २६ जानेवारी १९८१ ला भारतीय किसान संघानं हैद्राबादेत आंध्रप्रदेशच्या विधानसभेला घेराव घातला होता. १९८५ मध्ये राजस्थानच्या विधानसभेला भारतीय किसान संघानं घेरलं होतं. १९८६-८७ दरम्यान गुजरात विधानसभेला घेराव घातला होता. त्यावेळी तिथं चार लाख शेतकरी जमले होते. त्यावेळी तिथले भाजपेयीं नेतेमंडळी किसान संघाच्या मागे उभं राहिले होते. कारण त्यावेळी देशात शरद जोशी यांच्या 'शेतकरी संघटने'चा प्रभाव निर्माण झाला होता. महाराष्ट्रात त्याचा जोर होता. त्याचे पडसाद गुजरातेत उमटू नयेत आणि त्यांचा शिरकाव इथं होऊ नये अशी भूमिका त्यामागे भाजपेयींची होती. १९९९ मध्ये हस्तिनापूरमध्ये भारतीय किसान संघानं आंदोलन केलं होतं. २००३ मध्ये गुजरातेत त्यावेळी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपेयीं सरकार होतं, त्यांनी वीजेचे दर वाढवले होते. त्याच्या विरोधातही भारतीय किसान संघानं तेव्हा आंदोलन केलं होतं. पण केंद्रात अटलबिहारी वाजपेयी आणि मनमोहनसिंग यांचं सरकार असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जी भूमिका होती ती आताशी राहिलेली नाही. अटलजींनी देशाच्या विकासासाठी घेतलेले विदेशी गुंतवणूक, खासगीकरण, खुलं बाजारपेठ आणि खुलं आर्थिक धोरण यासारख्या धोरणांना, भूमिकेला रा.स्व. संघानं विरोध केला होता. त्यावेळी सुदर्शनजी सरसंघचालक होते. मात्र आज संघ या मुद्द्यांवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या सरकार समवेत उभा आहे! आगामीकाळात शेतकरी आंदोलन आणि मोदी सरकार यांच्यातला संघर्ष वाढला तर रा.स्व.संघ मोदींच्याच पाठीशी उभं राहणार आहे का? असा प्रश्न उभा राहतो. संघाच्या मते राजकारणात आंदोलनालाही एक स्थान मिळायला हवंय. पण आंदोलनं अधिक लांबली गेली तर मात्र ती सत्तानुकूल राहणार नाहीत. दिल्लीतल्या सीमेवरच्या शेतकरी आंदोलनाशी इतर राज्यातील शेतकरी जोडले गेले तर भारतीय किसान संघ जो देशातल्या ३०१ जिल्ह्यातून कार्यरत आहे. भारतीय मजदूर संघ २५० हून अधिक जिल्ह्यात पसरलेला आहे. स्वदेशी जागरण मंच तर सर्वत्र कार्यरत आहे. या तीनही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेनं सुरू झालेल्या संघटना हळूहळू सामाजिक आणि राजकीय परिपेक्षाच्या बाहेर जाईल, अशी भीती संघात निर्माण झालीय.

*स्वयंसेवकांमध्ये द्विधा मनःस्थिती निर्माण झालीय*
या आणि अशाच काही केंद्र सरकारच्या धोरणांमुळं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला अंतर्विरोधानं ग्रासलं जातंय की काय अशी भीती निर्माण झालीय. एकाबाजूला संघाला केंद्रातल्या मोदी सरकारच्या धोरणासोबत उभं राहायचं आहे. तर दुसऱ्याबाजूला संघाची मूळ विचारधारा असलेल्या हिंदुत्वाशी देशाला जोडायचं आहे. भारतीय किसान संघ, भारतीय मजदूर संघ आणि स्वदेशी जागरण मंच यासारख्या संघाशी संलग्न असलेल्या संघटनांतील कार्यकर्त्यांमध्ये त्यामुळं द्विधा मनःस्थिती निर्माण झालीय. अशांशी चर्चा करताना त्यांनी 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अस्तित्वाचा प्रश्न तर उभा राहणार नाही ना?' अशी शंका व्यक्त केलीय. पण त्याला स्वयंसेवकांचं उत्तर आहे की, 'हिंदुत्व' ही संघाची मूलभूत विचारधारा आहे. आंदोलन करणारे शेतकरी हे या हिंदुत्वाच्या अंतर्गतच येतात. शेतकरी हा भूमिपुत्र आहे. राष्ट्रीयता ही अभिन्न परिभाषा आहे, ज्यात हिंदुत्वही येतं. त्यामुळं शेतकऱ्यांना हिंदुत्व वा इतर कोणत्याही विषयावरून कोणीही विभागू शकणार नाही. हे जरी स्वयंसेवक सांगत असले तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अंतर्विरोधात सापडलाय, अडकलाय. शेतकऱ्यांचं हिंदुत्व हे सर्वसमावेशक असल्यानं रा. स्व. संघाच्या विरोधातलं हिंदुत्व म्हणजे 'हिंदुत्व विरुद्ध हिंदुत्व' असा संघर्ष तर उभा राहणार नाही ना? असा सवाल केला जातोय...! भारतीय किसान संघ, भारतीय मजदूर संघ आणि स्वदेशी जागरण मंच यांचे स्वयंसेवक आंदोलनाच्या पवित्र्यात उभे ठाकले असताना मात्र भाजपेयीं नेते आणि प्रधानमंत्री, गृहमंत्र्यांसह सरकारातले सारे मंत्री सध्या निवडणुकांच्या 'मूड'मध्ये मश्गुल आहेत. त्यांना स्वयंसेवकांच्या या आंदोलनाची फिकिरच नाही...!

हरीश केंची
९४२२३१०६०९

Sunday 7 March 2021

सरकारनं भांडी विकायला काढलीयत!

"भारताच्या अर्थव्यवस्थेला मंदीची झळ लागलीय. लोक बेरोजगार आहेत, बॅंकांना टाळे लागतायत, अनेक कंपन्या बंद पडतायत. सरकारकडं देश चालवायला पैसा नाही. पैसे नसले की ते मिळवण्याचे तीन मार्ग सरकार वापरतं. बेग, बॉरो आणि स्टील. म्हणजे मागायचं, उधार घ्यायचं किंवा चोरी करायची. अलिकडेच टॅक्स भरा अशी विनंती सरकार वारंवार करतंय म्हणजे लोकांकडून मागून पैसे जमवतंय. बॉरो म्हणजे उधार घेणं. जागतिक बाजारातून, वर्ल्ड बॅंकेतून सरकार पैशांची उचल करतंय. मध्यंतरी सरकारनं रिझर्व्ह बँकेकडून पैसे घेतलं होते. सरकार चोरी तर करू शकत नाही. मग काय करणार? तर सरकारनं चक्क घरातली भांडी विकायला काढलीयत. आता ही भांडी कोणती? तर सरकारच्या मालकीची जमीनी आणि सरकारी कंपन्या. १०० हून अधिक सरकारी बँका, कंपन्यांचं खासगीकरण किंवा निर्गुंतवणूक करायचं असं सरकारनं ठरवलंय. विकासाची कामं करण्यासाठी पैसा लागतो. रस्त्यांची कामं करायला, सरकारी दवाखाने, शाळा चालवायला पैशांची गरज असते. देशातल्या श्रीमंत आणि उच्च मध्यमवर्गीय नागरिकांकडून आणि भरपूर नफा कमवणाऱ्या कंपन्यांकडून सरकार कर घेतं. तसंच नागरिकही वेगवेगळ्या वस्तुंवर अप्रत्यक्ष कर देतात. त्यातून ही विकास कामं होतात. पण हा टॅक्स कमी पडू लागलाय. त्यामुळं सध्या अशी परिस्थिती सरकारवर ओढवलीय."
---------------------------------------------------
*नि* र्गुंतवणूक हा शब्द सध्या प्रसिद्धीमाध्यमांतून वाचायला मिळतो. पैसे लावणं किंवा एखाद्या कंपनीसाठी भांडवल म्हणून आपले पैसे देणं, त्या कंपनीचा काही भाग किंवा शेअर्स विकत घेणं ही झाली गुंतवणूक. त्याच्या बरोबर उलटी क्रिया म्हणजे एखाद्या कंपनीतून आपले पैसे काढून घेणं किंवा त्या कंपनीचे शेअर्स दुसऱ्याला विकणं ही झाली निर्गुंतवणूक! निर्गुंतवणूक केल्यामुळं कंपनीतली एक तर मालकी कमी होते किंवा संपते. सरकार निर्गुंतवणूक करणार म्हणजे सरकारी कंपन्यांचे शेअर्स विकणार. हे शेअर्स कुणीही खरेदी करू शकतं. एखादी दुसरी सरकारी कंपनी, खासगी कंपनी किंवा सामान्य नागरिकांपैकी कुणालाही हे शेअर्स विकत घेण्याचा अधिकार असतो. भारतानं या आधीही सरकारी कंपन्यांमध्ये निर्गुंतवणूक करून आपली पडती आर्थिक बाजू सांभाळण्याचा प्रयत्न केलाय. काँग्रेसच्या काळातही अशी निर्गुंतवणूक झाली होती. खासकरून उदारीकरण म्हणजेच लिबरलायझेशनचं धोरण स्विकारल्यानंतर भारतानं निर्गुंतवणूक करायला सुरवात केली. त्यासाठी तर अर्थ मंत्रालयाअंतर्गत एक नवा विभागही तयार करण्यात आलाय. या विभागाचं नाव आहे डिपार्टमेंट ऑफ इनवेस्टमेंट अँड पब्लिक ऍसेट मॅनेजमेंट म्हणजे 'दिपम...!' साधारणतः निर्गुंतवणूक केली म्हणजे कंपनीचं खासगीकरण झालं असा अनेकांचा समज असतो. पण खरंतर दोन्ही संकल्पनांमध्ये फरक आहे. सरकारी कंपनीमध्ये बाकी खासगी कंपन्यांचे आणि सामान्य नागरिकांचेही शेअर्स असतात. फक्त संपूर्ण शेअर्सपैकी ५१ टक्क्यांपेक्षा जास्त भाग सरकार आपल्या हातात ठेवते. यामुळं कंपनीमधले महत्वाचे निर्णय सरकार घेऊ शकतं. ५१ टक्क्यांपेक्षा जास्त शेअर्स सरकारचे असले तर ती कंपनी सरकारी किंवा पब्लिक होते. आता जेव्हा सरकारी कंपनीचं खासगीकरण होतं तेव्हा ५१ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त शेअर्स इतर कंपनीला विकले जातात. यासोबतच कंपनीचं मॅनेजमेंट म्हणजेच प्रशासन पाहण्याची जबाबदारी खरेदीदार खासगी कंपनीकडं जाते. निर्गुंतवणूक करताना सरकार कंपनीचा काहीच हिस्सा खासगी किंवा इतर सरकारी कंपन्यांना विकते. सरकारनं एखाद्या सरकारी कंपनीचे सगळेच्या सगळे शेअर्स विकले तरच खासगीकरण होतं. पण असं सहसा होत नाही. अनेकदा सरकार आपल्या कंपनीचे थोडेच शेअर्स विकतं म्हणजेच निर्गुंतवणूक करतं. निर्गुंतवणूकीचा एक गुप्त फायदा असतो. काही सरकारी कंपन्या वर्षानुवर्षे तोट्यात असतात. देशातले नागरिक जो टॅक्स भरतात ते पैसे या कंपनीत बरबाद होतात. याचं उत्तम आणि ताजं उदाहरण म्हणजे एअर इंडिया. या परिस्थितीला 'मनी लिकेज' आर्थिक गळती असं म्हणतात. अशा तोट्यात असणाऱ्या कंपन्यांमध्ये निर्गुंतवणूक केली किंवा त्या विकून टाकल्या तर ही गळती थांबते. आत्ताच्या परिस्थितीत सरकार नेमकं हेच करायचा प्रयत्न करतेय.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पायाभूत क्षेत्र व अवजड उद्योगासाठी प्रगती साधण्यासाठी पंतप्रधान नेहरूंच्या सरकारनं मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली अन या क्षेत्रासाठी सरकारी कंपन्या स्थापन झाल्या. एकेकाळी या सरकारी कंपन्यांची संख्या ३८० पर्यंत पोहोचली होती. या प्रयोगाचा परिणाम म्हणून भारताची अर्थव्यवस्था १९९० च्या दशकापर्यंत कधीही ३ टक्क्यांपेक्षा अधिक दरानं वाढली नाही. १९९१ मध्ये डॉ. मनमोहनसिंग यांनी खुल्या बाजार व्यवस्थेचा पुरस्कार केला. त्यामुळे सरकारी कंपन्या खासगी कंपन्यांच्या स्पर्धेत मागे पडू लागल्या. त्यांना स्पर्धाक्षम बनवण्याचे अनेक प्रयत्न फसल्यानंतर, या कंपन्या खासगी कंपन्यांना विकण्याचं म्हणजे निर्गुंतवणूक धोरण आलं. कंपन्यांचे बाजारमूल्य घसरलं, गेल्या पाच वर्षांत मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर निर्गुंतवणुकीतून मिळणारा निधी अर्थसंकल्पीय तूट भरून काढण्यासाठी वापरला जाऊ लागल्याचं दिसून येतंय. सध्याच्या सरकारजवळ कोणतेच आर्थिक धोरण नसल्यानं, निर्गुंतवणुकीचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी एका सरकारी कंपनीकडून दुसऱ्या सरकारी कंपनीचं अधिग्रहण करण्याचे प्रकारही सुरू झाले. मुळात कंपनीची मालकी सरकारकडंच शिल्लक राहत असल्यानं याला निर्गुंतवणूक म्हणावं की नाही, असा प्रश्न या क्षेत्रातील जाणकार उपस्थित करीत आहेत. याचं उत्कृष्ट उदाहरण ऑईल अ‍ॅण्ड नॅचरल गॅस कॉर्पोरेशननं (ओएनजीसी), हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन (एचपीसीएल) आणि गुजरात स्टेट पेट्रोलियम कॉर्पोरेशन (जीएसपीसी) या दोन कंपन्यांचं अधिग्रहण केलंय. ओएनजीसीनं एचपीसीएल तब्बल ३६ हजार ९१५ कोटीत खरेदी केली, तर जीएसपीसीसाठी चक्क १९ हजार कोटी मोजले. याचा परिणाम म्हणून ओएनजीसीचा राखीव निधी ९ हजार ५०० कोटींवरून फक्त १६७ कोटी झाला, तर कर्ज १ हजार ३०० कोटींवरून २५ हजार ५९२ कोटींपर्यंत वाढलं. बाजारमूल्य ३.५० लाख कोटींवरून २.२० लाख कोटींपर्यंत घसरलं. २०१८-१९ या एका वर्षात हे घडलं आहे.१५ कंपन्यांच्या निर्गुंतवणुकीतून मिळाले ७७ हजार ४१७ कोटी, २०१८ ते २०२० या दोन आर्थिक वर्षात सरकारला एकूण ४० सरकारी कंपन्यांची निर्गुंतवणूक करायची होती. यापैकी सन २०१८-१९ मध्ये १५ कंपन्यांची निर्गुंतवणूक करण्यात आलीय. यातून सरकारला ८४ हजार ९७२ कोटी रुपये येणे अपेक्षित होते. पण प्रत्यक्षात ७७ हजार ४१७ कोटी रुपये मिळाले. निर्गुंतवणूक करण्यात आलेल्या १५ सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमध्ये प्रोजेक्ट अ‍ॅण्ड एएमपी डेव्हलपमेंट इंडिया लि., हिंदुस्थान प्रीफॅब लि., इंजिनीअरिंंग प्रोजेक्टस् (इं.) लि., ब्रीज अ‍ॅण्ड रुफ कंपनी इंडिया लि., पवनहंस लि., हिंदुस्थान न्यूजप्रिंट लि. (साहाय्यक कंपनी), स्कूटर्स इंडिया लि., भारत अर्थ मूव्हर्स लि., भारत पंप अ‍ॅण्ड एएमपी कॉम्प्रेसर्स लि., हिंदुस्थान फ्लुसो कार्बन लि. (साहाय्यक कंपनी), सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स लि., फेरो स्क्रॅप निगम लि. (साहाय्यक कंपनी), सिमेंट कॉर्पोरेशन आॅफ इंडिया लि., नग्मार स्टील प्लॅण्ट (एनएमडीसी), अलॉय स्टील प्लॅण्ट आदींचा समावेश आहे. या कंपन्यांचं निर्गुंतवणुकीकरण झाल्यान सरकारची मालकी संपलीय.सध्या जीडीपीची वाढ ४.५ टक्क्यांपर्यंत पोहोचलीय. पण ही परिस्थिती पुढे राहणार नाही. अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी आठ मोठी पावलं उचलली आहेत. त्याचा सकारात्मक परिणाम दिसेल आणि अर्थव्यवस्था पुन्हा सुस्थितीत येण्याची अपेक्षा अर्थतज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.

सरकारच्या कोणत्या कंपनीचे किती शेअर्स विकायचे आहेत हे ठरवण्याचे अधिकार 'दिमप'कडे असतात, दिमपने ५ कंपन्यांच्या निर्गुंतवणूकीसाठी परवानगी दिलीय. या पाच कंपन्या कोणत्या? तर भारत पेट्रेलियम म्हणजेच बीपीसीएल, शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजे एससीआय, टिहरी हायड्रोइलेक्ट्रिक डेवलपमेंट कॉर्पोरेशन केंद्र म्हणजे टीएचडीसी, नॉर्थ ईस्ट इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजे नीपको आणि कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजे कॉनकोर या त्या पाच कंपन्या आहेत. या पाचही कंपन्या रणनितीक खरेदीदार म्हणजे स्ट्रॅटेजिक बायरला विकल्या जातील. यातल्या टीएचडीसी आणि नीपको या दोन कंपन्या नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन या कंपनीच्या हवाली केल्या जातील. उरलेल्या तीन कंपन्या कुणीही विकत घेऊ शकतं. अर्थमंत्र्यांनी याला स्ट्रॅटेजिक निर्गुंतवणूक असं म्हटलंय. याचा अर्थ असा की कंपनीच्या काही भागाच्या मालकीसोबत खरेदीदाराला त्या कंपनीचं प्रशासनही सांभाळावं लागेल. बीपीसीएलमध्ये सध्या सरकारचे ५३.२९ टक्के शेअर आहेत. त्यातले सगळेच्या सगळे शेअर्स सरकारनं विकायचं ठरवलंय. एससीआय मध्ये ६३.७५ टक्के शेअर आहेत. त्यातलेही सगळे शेअर्स विकायचं सरकारनं ठरवलंय. कॉनकोरमधल्या ५४.८० टक्के शेअर्सपैकी ३०.०८ टक्के शेअर्स सरकार विकणार आहे. टीएचडीसीमधले ७४.२३ टक्के आणि नीपको ही संपूर्ण कंपनी एनटीपीसी विकत घेईल. यासंदर्भात तीन नवे प्रस्ताव पुढच्या आठवड्यात सरकारकडून सादर केले जाऊ शकतात, असंही या वीडिओमधून समोर येतं. सरकारच्या काही जमिनीही विकल्या जातील. जमिनी विकत घेण्याच्या प्रक्रियेला जसा रिस्पॉन्स मिळेल त्यावरून पुढचे निर्णय घेतले जातील. एअर इंडियाला विकायचं हे तर आधीच ठरवलंय. पण यात एक गोम अशी की की खरेदीदार मिळत नाहीयत. यासोबतच 'शत्रू संपत्ती' म्हणजे १९४७ मध्ये फाळणीनंतर भारत सोडून पाकिस्तानात गेलेल्या लोकांची मालमत्ताही सरकार विकणार आहे. अशा अनेक मालमत्ता आहेत पण त्यावर भलत्या लोकांनीच ताबा घेतलाय. पण सरकारनं त्या विक्रीचा निर्णय घेतलाय.

या सगळ्यात मोठा विरोध होतोय तो भारत पेट्रेलियम म्हणजे बीपीसीएलचं खासगीकरण करण्याला. मोदी सरकारनं बीपीसीएलला महारत्नचा किताब दिला होता. गेल्या ५ वर्षांत बीपीसीएलनं ३५ हजार१८२ कोटीचा नफा मिळवून दिलाय. याचसोबत गेल्या ५ वर्षांत बीपीसीएलनं १९ हजार ६०३ कोटी रूपये टॅक्स सरकारकडं भरलाय. शिवाय, ८ हजार ९५५ कोटीचा डिव्हिडंड शेअरहोल्डर्स यांना दिलाय. डिव्हिडंड म्हणजे कंपनीच्या नफ्यातली शेअरधारकांना मिळणारी रक्कम. भारत गॅस कनेक्शन, पेट्रोल, डिझेल अशा मोठा व्यापार बीपीसीएलअंतर्गत चालतो. कच्च्या तेलाचं रिफायनिंग बीपीसीएलमध्ये होतं. संपूर्ण भारतात होणाऱ्या रिफायनिंगपैकी १३% रिफायनिंग एकटं बीपीसीएल करतं. बीपीसीएलची मार्केट वॅल्यू आता १ लाख कोटी रुपये इतकी आहे. सरकारचे त्यात ५३.३ टक्के शेअर्स आहेत. बीपीसीएल विकून सरकारला साधारण ६५ हजार कोटी मिळतील. असा अंदाज व्यक्त केला जातोय. पण बीपीसीएलचं खासगीकरण झालं तर त्याची मोठी किंमत बीपीसीएलच्या अधिकाऱ्यांना मोजावी लागेल, अशी भीती व्यक्त करण्यात आलीय. कंपनी विकल्यावर बीपीसीएल खासगी मालकाकडे जाणार. बीपीसीएल आत्ताच भरपूर नफा कमवते. आता अजून जास्त नफा कमवायचा असेल तर एकच मार्ग उरतो आणि तो म्हणजे काही कर्मचारी कमी करायचे आणि उरलेल्या कर्मचाऱ्यांकडून जास्तीचं काम करून घ्यायचं. शिवाय जे बीपीसीएलचं पेट्रोल, डिझेल सरकारकडं राहणं हे अत्यावश्यक आणि गरजेचं आहे. खासगी क्षेत्राकडे या संसाधनांची मालकी गेली तर त्यानं देशाच्या सुरक्षेला देखील धोका निर्माण होईल. त्यातही परदेशी कंपनींकडे ही मालकी गेली तर तो धोका अधिक वाढणार आहे ही भीती राहील.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सरकारी उपक्रमांमधील सरकारी भागीदारी काढून घेण्याच्या निर्णयाचं समर्थन केलंय. आजारी सरकारी उपक्रमांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर ताण पडत असून अशा कंपन्यांमध्ये देशातील करदात्यांचा पैसा अडकून पडला असल्याचं समर्थनही पंतप्रधानांनी केलंय. सरकारनं १०० हून अधिक कंपन्यांच्या निर्गुंतवणूकीकरणामधून अडीच लाख कोटी रुपये उभं करण्याचं उद्दीष्ट ठेवलंय. केंद्रीय अर्थसंकल्पात सरकार या निर्गुंतवणूकीतून १.७५ लाख कोटी रुपये उभारणार असल्याचं म्हटलं होतं. अर्थसंकल्पामध्ये नॅशनल अ‍ॅसेट मॉनेटायझेशन पाईपलाइन या धोरणाअंतर्गत १०० कंपन्यांमधील आपली भागीदारी सरकार विकणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. गेल्या एक दोन वर्षांत अनेक बँका त्यांच्या बिकट परिस्थितीमुळेच चर्चेत आल्या. येस बँक, PMC, लक्ष्मी विलास बँक वगैरे. सध्या भारतात १२ राष्ट्रीय बँका आहेत. सरकार खासगीकरण करताना मोठ्या, मध्यम किंवा कमकुवत होत जाणाऱ्या यापैकी कोणत्या आणि किती बँकांचा विचार करेल? खरेदी करणारा म्हणून तुम्ही फक्त आजारी बँकांचा विचार कराल का? विक्रेता म्हणूनही तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. ही एक मोठी आणि वेळ घेणारी प्रक्रिया आहे. तुम्ही विक्रीसाठी जे काही काढायचं ठरवाल, ते उत्पादन विकण्याजोगं असलं पाहिजे, ते PSUs विकण्याजोगे असले पाहिजेत. सरकार निर्गुंतवणूकीचं धोरण जोरात पुढे नेतंय हे स्पष्ट आहे. पण भारतीय बँकिंग व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्याचं काम रिझर्व्ह बँक करत असते. १९७९ साली इंदिरा गांधींच्या काँग्रेस सरकारने १४ मोठ्या बँकांचं राष्ट्रीयीकरण केलं. तेव्हा याचा प्रचंड गवगवा झाला. आता २०२१ मध्ये भाजप सरकार बँकांचं खाजगीकरण करण्याबद्धल बोलतंय. ५० वर्षांत परिस्थिती इतकी कशी बदलली हा प्रश्नही अनेकांना पडलाय. सरकारनं जे अपेक्षित किंमत अपेक्षीली आहे ती मिळणं पूर्वानुभवानं कठीण दिसतंय. प्रधानमंत्री अडीच लाख कोटी उत्पन्न मिळेल असं म्हणताहेत तर तेच उत्पन्न अर्थमंत्री पावणे दोन लाख कोटी उत्पन्न अपेक्षित धरलंय. पण त्याहून कमी रक्कम हाती लागेल अशी अर्थतज्ज्ञांची मतं आहेत. याचाही विचार केला पाहिजे.

उद्योग-व्यावसायिकांच्या संघटना ‘असोचेम’, फिक्की’, ‘सीआयआय’ यांनी सरकारी बँकांचं खासगीकरण करण्याची मागणी केलीय. सरकारी बँकांमध्ये घोटाळे, गैरव्यवहार झाले हे खरं असलं तरी हे घोटाळे कोणी केले हे पाहणं गरजेचं आहे. सरकारी बँकांचे खासगीकरण केलं म्हणजे सर्वकांही आलबेल होणार आहे काय ? वास्तविक पाहता बँकांतील घोटाळ्याचं सत्र बंद होणार असेल तर कोणताही सुजाण भारतीय नागरिक सरकारी बँकांच्या खासगीकरणाच्या निर्णयाचं स्वागत करील हे नक्की. परंतु यासंदर्भात तसा विश्वास नव्हे तर हमी कोणी देतील असं वाटत नाही. नव्या विधेयकाचं कायद्यात रुपांतर झाल्यास आणि सरकारी बँकांचे खासगीकरण करण्याचा निर्णय झाला तर देशात आर्थिक गोेंधळाची स्थिती निर्माण होईल. तसेच कडक नियामक यंत्रणा नसेल तर खातेदारांच्या पैशांना नक्कीच धोका निर्माण होईल. सध्या सरकारी बँकांमध्ये जो कांही गैरव्यवहार होत असला तरी त्याचा फटका देशातील सामान्य बँक ग्राहकांना बसलेला नाही. कारण अजूनही देशातील ८० टक्क्यांहून अधिक ग्राहकांची खाती सरकारी बँकांमध्ये आहेत. त्याचे कारण सरकारी बँकांवर असलेला लोकांचा विश्वास. खासगी बँकांच्या तुलनेत उत्तम सेवा मिळत नसली तरी सरकारी बँक खात्यांमधील पैसा, ठेवी सुरक्षित असल्याची भावना आणि विश्वास सर्वसामान्यांचा आहे. त्यामुळे खाजगी बँकांचे जाळे मोठ्या प्रमाणावर विस्तारत असले तरी अजूनही सर्वसामान्य लोकांचा विश्वास सरकारी बँकांवरच आहे. लोकांचा हा विश्वास सार्थ करणं हे अर्थ मंत्रालयाचं काम आहे. बँकांवर नियंत्रण ठेवण्याचं काम भारतीय रिझर्व्ह बँकेचं आहे. त्यामुळे सरकारी बँकांचं खासगीकरण करण्यापूर्वी अर्थ मंत्रालय आणि रिझर्व्ह बँक यांनी एकत्रितपणे विचारविनिमय करुन देशातील सर्वसामान्य बँक ग्राहकांच्या हिताचे रक्षण कसं करता येईल, हेही पाहणं गरजेचं आहे.
हरीश केंची
९४२२३१०६०९

'इंडिया शायनिंग' ते 'मोदी की गॅरंटी...!'

"एकचालुकानुवर्तीत पक्ष आणि सत्ताधारी असं रूप 'लोकशाहीची जननी' म्हणवणाऱ्या देशात आकाराला येतंय. सामूहिक नेतृत्वाची प...