Monday 27 June 2022

उद्विग्न सत्ताबाजार....!

शिवसेनेतलं बंड हे महाराष्ट्रातलं राजकारण नासवणारं ठरणार आहे. हा सत्तेचा बाजार पाहून सर्वसामान्यांच्या मनात उद्विग्नता येतेय. राज्यातली सत्ता ही लोकांच्या सेवेसाठी आहे की, हिंदुत्वासाठी? एकनाथ शिंदे म्हणतात आमचं हिंदुत्व हे बाळासाहेबांचं हिंदुत्व आहे मग उद्धव यांचं हिंदुत्व कुठलं आणि भाजपचं कुठलं? फुटलेले ४० आमदार शिवसेना सोडून अपक्ष म्हणून निवडून येण्यास लायक आहेत का, तशी त्यांची तयारी आहे का? अडीच वर्षे आघाडीत घालवलीत मग आता कशी आठवण झाली की आघाडी अनैसर्गिक आहे?ही आमदार मंडळी एवढ्या लांब गुवाहाटीला का आहेत, त्यांना महाराष्ट्रात एवढी भीती आहे तर मग हे उद्या न घाबरता कसे काय जनतेचे प्रश्न मांडणार? मुख्यमंत्र्यांनी संघटनाप्रमुख हे पद सांभाळताना कार्यकत्यांकडं दुर्लक्ष केलं हे बरोबर आहे. त्यासाठी संवाद हा मार्ग असताना बंडाचं निशाण का फडकवलं? अशी सारी बंड शिवसैनिकांनी उधळून लावलीत; यात आपणही होतात मग ही दुर्बुद्धी का झालीय?
----------------------------------------------

राज्याचं राजकारण शिवसेनेतल्या आमदारांच्या बंडानं ढवळून निघालंय. दूरचित्रवाणी वाहिन्यांवर महाराष्ट्र धर्माची संस्कृती असलेल्या ग्यानबा तुकारामांच्या पालखीचं प्रस्थान आणि प्रयाण यांच्या बातम्यांऐवजी विकृतीतल्या एकनाथाच्या बंडाचं भारुड ऐकवलं आणि दाखवलं जात होतं. शिवसेनेला बंड हे काही नवं नाही. अशी अनेक बंडं पचवलीत. अगदी शिवसेनेच्या स्थापनेपासूनच हे होत आलंय. शिवसेनेच्या स्थापनेतले शिवसेनाप्रमुखांचे सहकारी घाटकोपरचे माधव देशपांडे यांनीच सामूहिक नेतृत्व हवंय म्हणत पहिल्यांदा बंड केलं होतं. आग्रही हिंदुत्व आणि हत्यारांचं प्रशिक्षण या मुद्द्यांवर बंडू शिंगरे आणि भाई शिंगरे या दोघांनी बंड केलं होतं. त्यांनी 'प्रति शिवसेना' स्थापन केली होती. पण त्यांच्यामागे कोणी गेलं नाही. दुसरीकडं शिवसेना मात्र वाढतच गेली. मुंबई महापालिकेवर भगवा फडकला. डॉ. हेमचंद्र गुप्ते पहिले महापौर बनले. आणीबाणीत शिवसेनेनं शिवसैनिकांना कारागृहात जायला लागू नये म्हणून काँग्रेसला पाठींबा दिला. पण शिवसेनेनं जनता पक्षात सहभागी व्हावं, असा आग्रह धरत महापौर गुप्ते, दत्ता प्रधान आदि मंडळींनी बंड केलं. पण ते मोडून काढलं गेलं. पुढे गुप्ते, प्रधान आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं अस्तित्व राहिलं नाही. राजकारणातून दूर फेकले गेले. असे काही लहानमोठे आघात शिवसेनेवर झाले. ठाण्यात पक्षविरोधात मतदान करणाऱ्या श्रीधर खोपकर याची हत्या केली गेली 'गद्दारांना क्षमा नाही!' असं म्हणत आनंद दिघे यांनी एक वेगळं वातावरण निर्माण केल्यानं त्यानंतरच्या काळात शिवसेनेत कुणी बंड करायचा विचारही केला नाही. छगन भुजबळ यांनी केलेलं बंड हे त्यानंतरचं मोठं बंड! १९९० च्या विधिमंडळातल्या १८ आमदारांना घेऊन ते काँग्रेसवासी झाले. त्यावेळी मनोहर जोशी विरोधीपक्षनेते होते. ते पद त्यांना हवं होतं, ते न मिळाल्यानं त्यांनी मंडल आयोगाचं निमित्त करून शिवसेना सोडली. त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत फुटलेला एकही आमदार पुन्हा निवडून आला नाही. ते राजकारणातून बाद झाले. अगदी भुजबळांचा माझगाव या त्यांच्या हक्काच्या मतदारसंघात बाळा नांदगावकर या तरुण शिवसैनिकानं त्यांचा पराभव केला. भुजबळांनी मग मुंबईऐवजी नाशिक हे कार्यक्षेत्र निवडलं. त्यांनी येवल्यातून निवडणूक लढवली. यानंतरचं बंड हे नारायण राणे यांचं! १९९८ च्या दरम्यान नव्या मुंबईतले गणेश नाईक यांनी बंड पुकारलं. नवी संघटना स्थापन केली. पण १९९९ च्या निवडणुकीत त्यांचा शिवसेनेनं पराभव केला. २००५ मध्ये उद्धव ठाकरे यांच्याशी मतभेद झाल्यानं ११ आमदारांसह त्यांनी शिवसेना सोडली. त्यानंतर झालेली पोटनिवडणुक वगळता आजवर राणे यांना कधीच निवडून येता आलेलं नाही. त्यांच्या साथीनं बंड केलेल्या ११ आमदारांनाही कधीच निवडून येता आलेलं नाही किंबहुना त्यांचं राजकीय आयुष्य संपुष्टात आलं. हे सारे बंड शिवसेना विरोधीपक्षात असताना झाली होती. आताचं एकनाथ शिंदे यांचं बंड हे सत्ता असताना झालेलं आहे. ही सत्तेसाठीची साठमारी आहे.

शिंदे यांच्यासोबत बंड करणारे हे आमदार हे खरे बंडखोर नाहीत, यांना ब्लॅकमेल केलं गेलंय. ईडी, सीबीआय, इन्कमटेक्स यासारख्या यंत्रणांकडून त्यांच्या गळ्याला फास आवळला गेलाय आणि या फासेचा दोर आहे तो केंद्रीय गृहमंत्रालयाच्या हाती! तो हळूहळू आवळला जातोय, त्यामुळं एक एक जण गळाला लागतोय. या बंडातल्या अनेकांना जसं की, प्रताप सरनाईक, भावना गवळी, यामिनी जाधव अगदी एकनाथ शिंदेचे आर्थिक व्यवहार पाहणारे सचिन जोशी यांनाही घेरलं आहे. ते सध्या बेपत्ता आहेत. अशा बातम्या आल्यात. त्यामुळं त्यांनी भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेतलाय. याचं कारण यापूर्वी ज्या भाजप नेत्यांनी नारायण राणे, गणेश नाईक, बबनराव पाचपुते, विजयकुमार गावित, कृपाशंकरसिंह, हर्षवर्धन पाटील अशा अनेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यानंतर ईडी वा तत्सम तपास यंत्रणेच्या माध्यमातून चौकशा सुरू झाल्या. मात्र या साऱ्यांनी भाजपला जवळ केल्यानं त्यांच्या चौकशा थांबल्या. शिवसेनेतल्या अनेकांचा भूतकाळ हा अत्यंत सामान्य राहिला आहे. बारा बलुतेदारातल्या, सामान्य घरातल्या, कुणी रिक्षाचालक, कुणी भाजी विक्रेता, कुणी कामगार, कुणी पानपट्टीवाला अशाप्रकारच्या अनेक कुसाबाहेरच्या तरुणांना शिवसेनेचा परिसस्पर्श झाल्यानं त्यांचं जीवन उजळलं. लोकप्रतिनिधी नगरसेवक, आमदार, मंत्री बनले. ते करोडपती, अब्जोपती बनले हे भाजपला माहीत असल्यानं त्यांनी तपास यंत्रणांच्या माध्यमातून त्यांना घेरायला सुरुवात केली. आपण भाजपसोबत गेलो तरच आपल्या मागचा हा चौकशीचा ससेमिरा संपेल आणि तसं दिसून आल्यानं या सेनेच्या नवश्रीमंतांनी भाजपबरोबर जाण्याचा मानस व्यक्त केला आहे. त्यासाठी प्रसंगी त्यांनी आपल्या मतदारांच्या, शिवसैनिकांच्या मानसिकतेला वेठीला धरलं आणि शिवसेना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड केलं. रिक्षाचालक असलेल्या शिंद्यानी शिवसेनेच्या माध्यमातून आपलं साम्राज्य उभं केलंय. त्यांची अमाप संपत्ती हा चर्चेचा विषय बनलाय. शिवाय शिंदेंची एनआयए कडून चौकशी सुरू झाली होती, असं सांगितलं जातंय. संजय निरुपम यांनी असा आरोप केला आहे की, अंबानींच्या घराजवळ जी स्फोटकं-जिलेटिनच्या कांड्या सापडल्या त्या कुणा व्यक्तीला नाही तर कंपन्यांना दिली जातात. ती स्फोटकं ज्या कंपनीला दिली होती ती कंपनीशी शिंदे यांचा संबंध आहे. हे खरं खोटं निरुपम हेच जाणो. शिंदेंच्या बंडाची कुणकुण मुख्यमंत्र्यांना लागली होती. पोलिसी यंत्रणांनी याबाबतची माहिती त्यांना दिली होती. उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना वर्षावर बोलावून घेतलं. आपल्याला अशी माहिती मिळालीय की, अशाप्रकारे काहीतरी चाललंय, हे कितपत खरं आहे अशी विचारणा केली. त्यावेळी शिंदे अडखळले. त्यांना असं काही विचारलं जाईल याची कल्पना नव्हती. शिंदेंनी उद्धव आणि रश्मी ठाकरे यांच्यासमोर असं काहीही नाही. मी तुमच्या कुटुंबातला आहे. शिवसेनाप्रमुख हे माझं दैवत आहे. मला सारं काही मिळालंय, मी असं का करीन? तुम्हाला कुणीतरी खोटंनाटं सांगतंय, असं रडत रडत सांगितलं. उद्धव यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला. आणि म्हणाले, असो, आपल्यावर भाजपचं लक्ष आहे. आता राज्यसभा, विधानपरिषदेच्या निवडणुका आहेत. त्यावर लक्ष ठेव, सगळ्या आमदारांशी संपर्क ठेऊन कुठेही दगाफटका होणार नाही याची दक्षता घे! असं सांगितलं आणि विधानपरिषदेच्या निवडणुकीची जबाबदारी सोपवली. ही जबाबदारी म्हणजे ठाकरेंनीच या बंडासाठी शिंदेंना संधी दिली. हीच संधी साधून शिंदेंनी साऱ्या आमदारांशी संपर्क साधून बंडाची रचना केली. अर्थात त्यासाठी भाजप नेत्यांच्या सहकार्यानं अंमलबजावणी केली. आणि सुरत गाठली, पुढं गुवाहाटी जवळ केली. जवळपास तीन वर्षे सत्तेचा उपभोग आणि मंत्रिपदाच्या खुर्च्या उबवल्यानंतर अचानक त्यांना हिंदुत्वाची, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांची आठवण झाली. आपण काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्याशी केलेली युती ही अनैसर्गिक आहे, अशी जाणीव त्यांना झाली. आपण भाजपसोबत जायला हवं अशी भूमिका घेत या आमदारांनी बंड पुकारलं. शिवसेनेतल्या 'रंकाचे राव' झालेल्यांनी हिंदुत्वासाठी बंड करत असल्याचा देखावा निर्माण करत असले तरी त्याआडून चौकशीचा ससेमिरा वाचविण्यासाठीच हे नाट्य उभं केलं असल्याचं दिसून येतंय. त्यामुळं राज्यात अस्थिरता, तणाव निर्माण झालीय. या बंडखोरांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन भाजपनं शिवसेनेला संपविण्याचा डाव टाकलाय.

शिवसेनेत बाळासाहेब ठाकरे हा एकच आकडा, बाकी सारे शून्ये! शून्यांमुळे आकडा वाढतो, पण आकडा असतो म्हणूनच शून्यांना किंमत येते. शून्ये आकड्याची जागा घेऊ शकत नाहीत. ही जागा मिळावी म्हणून शून्यांनी मांडलेल्या डावाचे उद्धवांनी बारा शब्दात बारा वाजवले आहेत. आपण बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत असं म्हणत ज्यांनी भाजपशी जवळीक साधली त्यांना बाळासाहेब समजलेच नाहीत. शिवसेनाच समजली नाही असं म्हणावं लागेल. भाजपला शिवसेना मोठी झालेली नकोय म्हणून बाळासाहेबांच्या निधनानंतर अनेक वार शिवसेनेवर केले आहेत. पण शिवसेना डगमगली नाही. अधिक जोमानं उभी ठाकल्याचं दिसतंय. २०१४ ला भाजपच्या हाती नरेंद्र मोदी लागल्यानं त्यांनी युती तोडली. शिवसेनेनं एकट्यानं निवडणूक लढवली त्यात ६३ आमदार निवडून आले. ही ताकद लक्षांत येताच २०१९ मध्ये पुन्हा भाजप मातोश्रीवर आली आणि युतीची गळ घातली. सत्तेच्या समसमान वाटा अशा आणाभाका दिल्या गेल्या. पण मोदींच्या चेहऱ्यावर झालेल्या निवडणूकीत शिवसेनेच्या ५६ इतक्या जागा कमी झाल्या. भाजपच्या वाढल्या आपण एक हाती सत्ता घेऊ शकतो असं भाजपला वाटू लागलं. आणाभाका विसरल्या गेल्या. शिवसेनेनं ज्यांना आयुष्यभर विरोध केला त्यांनी विश्वास दिला तर ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनी दगा दिला. त्यामुळं शिवसेनेनं साथसंगत सोडली. समोर आलेलं सत्तेचं ताट हिसकावून घेतलं गेल्यानं भाजप चवताळली पहाटेचा शपथविधीही फसल्यानं पुरी नाचक्की झाली. तेव्हापासून शिवसेनेला लक्ष्य केलं गेलं. सर्व बाजूनं कोंडी केली गेली. अगदी खालच्या पातळीवर जाऊन आरोप केले. जेवढी म्हणून बदनामी करता येईल तेवढी त्यांनी केली. फोडाफोडीचा प्रयत्न केला, हरेक प्रयत्न करूनही शिवसेना फोडण्यात यश आलं नव्हतं. मग केंद्रीय तपास यंत्रणांचं हत्यार उपसलं. एकेकाला घेरण्याला सुरुवात केली. अखेर त्यांना यश आलं. एकनाथ शिंदेंसारखा मोहरा हाती लागला. शिवसेना संपविण्याचा प्रयत्नाला चालना मिळाली. पण ती यशस्वी होईल असं दिसतं नाही. कारण उद्धव ठाकरेंनी म्हटल्याप्रमाणे शिवसेना वृक्षाची फळं, फुलं, पानं, फांद्या या तोडून नेल्या तरी त्याची मुळं भक्कम आहेत. त्या मुळावरच पुन्हा पालवी फुटू शकेल. हे निश्चित!
हरीश केंची
९४२२३१०६०९

Tuesday 21 June 2022

कार्यकर्ता हरवलाय!!

"राज्यसभा अन विधानपरिषदेच्या निवडणुका झाल्या. यात राजकारणातल्या सटोडीयांना मानाचं पान दिलं गेलंय तर कार्यकर्त्यांच्या तोंडाला पानं पुसली! सर्वत्र भुरट्या राजकारण्यांची चलती आहे. सत्तेसाठी वाट्टेल ते करण्याच्या इराद्यानेच लोक राजकारणात येतात. सारं काही करून आव मात्र तत्व-निष्ठेचा, निस्वार्थी जनसेवेचा आणतात. मिळेल तिथं हात धुवून घेतो, तोच वारंवार माझे हात स्वच्छ आहेत अशी ग्वाही देतो. कोण कुठं होते नि कुठं पोहीचले हे काय लोकांना दिसत नाही? हे एका बाजूला सुरू असताना नेत्यांची मुलं कधी कार्यकर्ता होतच नाहीत. एकदम पदाधिकारी वा मंत्री म्हणूनच समोर येतात! ध्येय-धोरण, विचार-आचार, तत्व-निष्ठा, मूल्याधिष्ठित राजकारण, लोकांप्रती बांधिलकी ह्यासारखे मुद्दे टांगले गेले आहेत. त्यामुळं निरलस, निरपेक्ष, निस्वार्थी कार्यकर्ता आज गायब झालाय, हरवलाय! तो पुन्हा ठामपणे उभा राहणं ही केवळ राजकीय पक्षांचीच नव्हे तर समाजाचीही गरज आहे!"
--------------------------------------------------

*आ* जच्या तरुणांचा कोणत्याच राजकीय पक्षांवर विश्वास राहिलेला नाही; तो राजकीयदृष्ट्या भांबावल्यासारखा, दिशाहीन झालाय. कुणाचा तरी आदर्श आपल्या जीवनात घ्यावा असं नेतृत्वही त्याला दिसत नाही. मध्यंतरी अण्णा हजारेंच्या आंदोलनात हजारो तरुण रस्त्यावर उतरले होते, त्यांना अण्णांसारखा साधासुधा माणूस आकर्षित करू शकला. इतका स्वच्छ निस्वार्थी माणूस असू शकतो याचं आश्चर्य आणि कुतूहल त्यांना वाटलं होतं. पण कधीकाळी आपल्याकडं अशी माणसं शेकड्यांनीच नव्हे तर हजारोंनी होती; त्यावेळी त्यांनाच कार्यकर्ते संबोधलं जाई. त्यांच्याकडं कोणी त्यागी, निस्वार्थी म्हणून आदरार्थी बघत असला तरी त्यांना कोणी साधुसंत समजत नव्हतं. आपण प्रामाणिक असावं ही भावना समाजात सर्वत्रच रूढ होती. अशी निस्वार्थी माणसंही 'कार्यकर्ते' म्हटली जायची. आज अशी माणसं दुर्मिळ होताहेत. तसे आदर्श आजच्या पिढीसमोर नाहीत. त्यांना कार्यकर्ता म्हणजे काय, कसं समजावं असा प्रयत्न राजकीय पक्षांकडून, नेत्यांकडून होताना दिसत नाही. पूर्वी सर्वच पक्षात असे निष्ठावान कार्यकर्ते होते. *गांधी टोपी डोक्यावर घालण्यापूर्वी त्यावर कपाळ टेकवून वंदन करणारे काँग्रेस कार्यकर्ते होते, नेहरू सदर्‍याला ठिगळ लावून खांद्यावर शबनम बॅग लटकवून देशात समाजवाद आणण्याच्या निश्चयानं वठलेले साथी समाजवादी होते. उच्चविद्याविभूषित पदवीधर द्विपदवीधर झालेले अनेक जण राष्ट्रवादाच्या विचारानं भारून देशाच्या कानाकोपर्‍यात जाऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचार पोचवणारे स्वयंसेवक होते. शिवसेनाप्रमुखांचा आदेश येताच जीवाचीही पर्वा न करता दे धडक बेधडक भिडणारे शिवसैनिक होते!* आता अशा कार्यकर्त्यांची सर्वत्र वानवाच दिसून येतेय. सगळ्याच पक्षनेतृत्वाला हे जाणवतं; याचं कारण, आजचं पक्षीय राजकारण लोकांच्या सुखदुःखाशी निगडीत राहीलेलं नाही. कोणत्याही विचारांशी वाहिलेलं नाही. केवळ सत्तेसाठी, खुर्चीसाठी आणि निवडणुकीसाठीच! असं ह्या पक्षांचं स्वरूप राहिलेलंय. सार्‍यांच्या निष्ठा या सत्तेला आणि खुर्चीला वाहिलेल्या असल्यानं सारे नेते हे सत्ताधारी पुढारी होण्यासाठीच सज्ज झाले आहेत. कार्यकर्ता व्हायला कोणीच तयार नाही. याचं कारण राजकारण हा व्यवसाय बनलाय आणि नेते, कार्यकर्ते हे व्यावसायिक झालेत. पूर्वीचा तो निरलस, निरपेक्ष, निस्वार्थी कार्यकर्ता आज गायब झालाय, हरवलाय!

कार्यकर्त्यांच्या समर्पणवृत्तीचा संस्कार आता हरवलाय. कार्यकर्ते जिथं, तिथं कामाचा उरक झपाट्यानं, हा मंत्र खोटा ठरू लागलाय. मात्र गणेशोत्सव, नवरात्र उत्सवांशिवाय नेत्यांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या, यांच्या मिरवणुकीत नाचणार्‍यांची संख्या काही कमी झालेली नाही, ती अफाट बनलीय. आरतीला, महाप्रसादालाही रांगाच्या रांगा फुललेल्या दिसतात, परंतु कार्यक्रमाच्या ठिकाणी सतरंज्या घालायला कार्यकर्ते मिळण्याचे दिवस संपुष्टात आल्याचं दिसतं. अंग मोडून काम करणारी कार्यकर्त्यांची पिढी आता हायटेक झालीय. अधिकाधिक सोयी मिळाव्यात म्हणून 'इव्हेंट मॅनेजमेंट' नावाची एक नवी जमात अस्तित्वात आलीय. त्यांच्या आयोजनामुळं कार्यक्रम देखणा, आखीव-रेखीव आणि व्यवस्थापनाचं उत्तम उदाहरण ठरतं! परंतु अशा व्यावसायिक रूपानं पक्षाचा कार्यकर्ता हरवतोय हे कुणी राजकीय नेते लक्षात घेत नाहीत. पूर्वी मी कम्युनिस्ट, मी पुरोगामी, मी नवमतवादी, आम्ही हिंदुत्ववादी, आम्ही अहिंसावादी, आम्ही अमुक विचारांचे असं सांगताना सांगणाऱ्याच्या मनात काही किंतू नव्हता; मी ऐकणार नाही उलट दोन्ही बाजूंना त्यांच्या त्यांच्या परीनं त्या त्या विचारांचा आणि चळवळीचा आदर होता. विरुद्ध मतवादी विचारसरणी डावी-उजवी करीत कार्यपद्धतीबाबत फारकत मानत परंतु परस्परांच्या कार्यकर्तावृत्तीबाबत आदरभाव होता मी या विचारसरणीचा असल्यानं माझं नुकसान होईल, ते माझ्या विचारांची मला मोजावी लागणारी किंमत आहे असाच त्यामागे अभिमानी विचार असायचा. मात्र या किमतीची मोजणी ज्या काळापासून राजकारण्यांनी अर्थकारणात, पैशात केली त्या क्षणापासून कार्यकर्ता वृत्तीचा ऱ्हास होत गेला. आताशी नवे कार्यकर्ते कार्यक्रमानंतर मिळणाऱ्या पाकिटांबरोबरच मटणासह ओल्या पार्टीची वाट पाहू लागलेत. विविध चळवळीत भक्तिभावानं झोकून देणं आता दूर झालंय. आणीबाणी सोसत प्रसंगी भूमिगत राहून ध्येयासाठी लढणाऱ्यांना तुरुंगवासाची भीती नव्हती की, पोटापाण्याची चिंता नव्हती. समाजरचनेसाठी आवश्यक त्या यज्ञात अशा कार्यकर्त्यांच्या हजारो समिधा होऊन लढल्या. आजही विविध मोर्चे, सभा, संमेलन, मेळाव्याला गर्दी होते. पण तळहातावर ठेवलेल्या नोटांच्या हिशोबानं! टाळ्या वाजतात त्याही त्याच हिशेबानं! कार्यक्रमानंतर पाण्याचा पाऊच, पोळीभाजीची पाकीटं हजारोंनी अंगावर फेकली जातात. ठरलेल्या वेळात आलेल्या माणसाच्या लोंढी पुन्हा ट्रकमध्ये चढविल्या जातात. आजच्या एखाद्या पक्षाची सभा संपल्यानंतर उद्या कोणत्या पक्षाच्या सभेला माणसं न्यायची, यावर चर्चा झडतात. कोणत्यातरी विषयावर भाळून संपूर्ण जीवन कारणी लावण्याचा वेड गेल्या दोन दशकापर्यंतच्या पिढीत होतं. परंतु या दरम्यान घडलेल्या नेत्यांनी अशा भावनिक कार्यकर्त्यांचा गैरवापर करून घेतला. हा कार्यकर्ता वर्ग चपला सांभाळणारा ठरला. चळवळीच्या ताई, भाऊ, दादा, अण्णा यांना स्टेशनवर उतरून घेतल्यापासून त्यांच्या बॅगा उचलण्यापर्यंत आणि स्टेजवर चढताना त्यांनी काढलेल्या चपला सांभाळण्यापर्यंतची सारी जबाबदारी या कार्यकर्त्याकडं बहाल करण्यात आली. कार्यकर्त्याला सुरवातीला अत्यंत सन्मानाचं वाटणारे हे काम थोड्याकाळानंतर रामागड्याचं होऊन जातं आणि त्याच्यातली ती कार्यकर्ता वृत्ती हरवून जाते. सुरुवातीला आग्रहानं सामाजिक, राजकीय कार्यात गेलेल्यांची फरफट कधी होते हे त्याचं त्यालाच कळत नाही. मग कालांतरानं त्याला प्रचंड मनस्ताप होतो. खाण्याचं, पिण्याचं, राहण्याचं वांदे होतात. एक एक आदर्श ढासळताना त्याच्या कार्यकर्तावृत्तीला दिसतात आणि त्यावेळी त्याला जे नैराश्य येतं, त्यानं त्याचं जीवनच बदलून जातं. यातून बाहेर पडावं आणि कुटुंबात रमावं तर, आजवरच्या आपल्या राजकारणापायी कुटुंबाची हेळसांड झालेली असते. त्यामुळं घरदार ही त्रासलेलं असतं. अशावेळी नाराजी व्यक्त करण्याची एकही संधी कुटुंबीय सोडत नाहीत. राजकारणाच्या भुताटकीतून भानावर आलेल्यांना ही सजा मिळालेली असते! पोटच्या पोराच्या तोंडाचा घास ओढून घेऊन चळवळीतल्या कार्यकर्त्यांना भरवलेला असल्यानं  कुटुंबप्रमुख याविषयी खदखदणारा त्याचा राग बायको-पोरांवर काढतात. कार्यकर्ता म्हणून साहेबांच्या मागे फिरावं तर फिरताना, मिरवताना, त्यांच्या चपला सांभाळताना घरात आलेलं उघडेपण यानं तो आतल्या आत खचत असतो. आदर्श म्हणून ज्या नेत्याकडं तो पाहत असतो, त्यांच्याशी बोलावं तर ही व्यक्तिगत बाब आहे नंतर बोलू असं म्हणून त्याला गप्पगार बसवलं जातं!

अशाप्रकारे ज्येष्ठ कार्यकर्त्यांचं तिळातिळानं होणारं मरण मात्र नवी पिढी हेरते. त्यांच्यासारखं निष्काम काम करून काही साधणार नाही, हे तो ओळखतो, मग चळवळीतून स्वतःला घडवायचं एक नवं चक्र तयार होतं. पद, अधिकार याचा गैरवापर सर्रास होतो. जुन्या कार्यकर्त्यांना अलगद बाजूला सारलं जातं आणि सुरू होतो नव्या पिढीच्या हिशोबी कार्यकर्त्यांचा खेळ! यात तत्त्व, विचार, निष्ठा, आदर्श, ध्येयं याला थारा नसतो की तत्त्वासाठी, निष्ठेसाठी, सत्यासाठी, प्राणांची आहुती देण्याची भूकही नसते. अशा व्यावसायिक मनोवृत्तीचा आताशी शिरकाव झाला आहे तो 'इव्हेंट मॅनेजमेंट'चा! त्याचबरोबर स्वयंसेवी संस्थांचा! समाजसेवेच्या नावाखाली देशी, परदेशी निधी घेऊन उपक्रम चालवण्याचा! हे एका बाजूला सुरू असताना 'व्हाईट कॉलर' जनतेची मुलं कधी कार्यकर्ता होतच नाही. एक तर ती होतात पदाधिकारी वा एकदम मंत्री म्हणूनच ! हे जमणं शक्य नसेल तर राजकारणात त्याला रस नाही असं मोठ्या दिमाखानं त्याचे मायबाप सांगतात. आपल्या पूर्वजांनी जपलेला कार्यकर्तावृत्तीचा संस्कारी ठेवा नव्या पिढीकडं हस्तांतरित करण्याची वेळ आलीय! जनता पक्षाच्या उदय आणि अस्तानंतर हळूहळू क्षीण झालेल्या कार्यकर्त्यावृत्तीनं आताशी माणूसकी राखली आहे. ही अशी स्थिती का झाली? याचा विचार करण्याची सत्ताधारी आणि सत्ताकांक्षी अशा सर्वच पक्षांची जबाबदारी आहे. गरज आहे ती पूर्वीप्रमाणे कार्यकर्ता
वृत्ती जोपासण्याची, तसं वातावरण निर्माण करण्याची. पण हे होईल का? आज सारे राजकीय पक्ष व्यक्तिसाक्षेप बनले आहेत. पूर्वी पक्षाचे नेते असत, आता नेत्यांचे पक्ष बनले आहेत! ध्येय, धोरण, विचार-आचार, तत्व-निष्ठा, लोकांप्रती बांधिलकी ह्यासारखे मुद्दे टांगले गेले आहेत! नेत्यांप्रमाणेच आता पक्षांचे कार्यकर्तेही उरले नाहीत तर ते नेत्यांचे कार्यकर्ते बनले आहेत! मूल्याधिष्ठित राजकारणाला तिलांजली दिली गेली, त्यामुळं कार्यकर्ता धुळीला मिळालाय. तो पुन्हा उभा राहणं ही केवळ राजकीय पक्षांची नव्हे तर समाजाचीही गरज आहे!

सध्या राजकारणात काहीही घडू शकतं इतकी अस्थिरता आहे आणि दाखविलं जातंय तेवढे वैचारिक मतभेद आता नाहीत. मुळात कुणीही कुठल्याही विचाराशी निष्ठेनं बांधलेला नाही. अगदी भाजपेयी नेते, कार्यकर्ते धरून हे म्हणता येईल. आज सर्वत्र चलती भुरट्या राजकारण्यांची आहे. सत्तेसाठी शक्य होईल ते सारे काही करण्याचा इरादा करूनच आता लोक राजकारणात येतात. सारं काही करून आव मात्र तत्व- निष्ठेचा, निस्वार्थी जनसेवेचा आणतात. जो मिळेल तिथं हात धुवून घेतो, तोच वारंवार माझे हात स्वच्छ आहेत अशी ग्वाही देतो. हे आता सगळेच जाणतात. कोण कुठं होते नि कुठं पोहीचले हे काय लोकांना दिसत नाही? महिना ओलांडताना खिशाचा तळ पुन्हा पुन्हा चाचपून भोकं पडलेल्या विजारी घालणारे आपण म्हणजे कंडक्टरनं बसचं तिकीट देताना साडेपांच रुपयाऐवजी पांच रुपये घेतले तर लॉटरी लागल्याचा आनंद होणारे! ज्यांना खरोखर लॉटरी लागलीय त्यांच्याकडं बघत 'देवा दया तुझीही, ही शुद्ध दैव लीला, लागो न दृष्ट आमची, त्यांच्याच वैभवाला!' असं म्हणत बसण्याखेरीज आणखी काय करणार! मुद्दा आहे सत्तेसाठी सारं काही करायला तयार असणाऱ्या सत्तानिष्ठ राजकारण्यांचा!

सध्या राजकीय क्षेत्र हे भंगाराचं दुकान झालेलंय. कोणीही लोकप्रतिनिधी येतो आणि तागड्यात बसून स्वतःला भंगार भावात विकतो. मतदारांना स्वतःची लाज वाटते की नाही ठाऊक नाही. पण प्रतिनिधी मात्र बेशरम आहेत. ऊरुसाच्या आधी तमासगीर मैदानात छावण्या टाकून रंगीत तालमी करतात. कोणाला कोणती भूमिका द्यायची हे ठरवतात. बाहेरुन कलाकार पळवून आणतात. प्रत्यक्ष तमाशाच्या आधीचा तमाशा त्या मैदानावरच होतो. आधी आदर करणाऱ्याची नंतर निंदा होते. ऊरुस संपला की सगळे थकून भागून गारेगार होतात. आपसात लग्नही जुळवून आणतात. पुढच्या ऊरुसापर्यंत छान संसार करतात. पटलं नाहीतर शेजारच्या छावणीत जातात. त्याला व्याभिचार नाही म्हणत. घरवापसी म्हणतात. सध्या राजकीय फडावर हाच भंगार मालाचा लिलाव सुरु आहे. मतदारांचं या दलालांना काही घेणं देणं नाही. त्याला गृहीत धरुन सगळा नासवा-नासवीचा धंदा राजरोसपणे सुरु आहे. मतदार थिएटरमध्ये बसल्यासारखं हे बघतो अन टाळ्या पिटतो. कपट कारस्थानाला हुशारी समजतो. कोणाला तरी शिव्या घालतो. कोणाला तरी मत देतो. पुन्हा पुढच्या खेळाचं तिकीट काढतो. आपल्या समाजाची मनोदशाच समजत नाही. सकाळी उठून पोटाची खळगी भरण्यासाठी त्याची रोजगार यात्रा सुरु होते. तो मजूर अड्डयावर स्वतःला भाकरीच्या भावात भाड्याने देतो. आणि राजकारणी तिकडं तारांकित हॉटेलात जनतेच्या पैशावर डुकरासारखे चरतात गाढवासारखे लोळतात. समाज हताशपणे कोणातरी सद्विचारी नेत्याची वाट पाहात बसतो. दररोज साने गुरुजी पैदा होत नसतात. समाज पुरुषानंच गांधी बनायचं असतं. पण आपला समाज पराभूत मनोवृत्तीचा आहे लढाईच्या आधीच हत्यार खाली ठेवणारा. कितीही दुर्धर प्रसंग आला तरी कोपऱ्यातल्या कोपऱ्यात जागा करून राहणारा. पण मानेवरचं जोखड भिरकावून देत नाही. 'ठेविले अनंते तैसेचि राहावे चित्ती असू द्यावे समाधान! परिस्थिती शरण समाजाचा निस्तेज चेहरा पाहावत नाही. गलितगात्र लोळागोळा झालेल्या समाजात दंगली घडविण्यासाठी प्राण कोण फुंकतो कोण जाणे. पण तो नक्कीच देशाचा हितचिंतक नाही. सामान्य नागरिकाला जोपर्यंत लोकशाहीतल्या मतांचं मूल्य समजत नाही. घटना साक्षर होत नाही. तोपर्यंत फडावर तमाशाची रंगीत तालीम होतच राहणार, दलाली आणि लिलावही होत राहतील. कोणीही शहाजोग नाही. सगळे एका आळीत आणि एकाच चाळीत राहतात. त्यांची संस्कृतीही एकच आहे. हे आम्ही नेहमीच म्हणतो आणि मतदार जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत म्हणत राहणार. राजकीय पक्षाची विचारधारा ह्या त्यावर चढवलेले पोषाख असतात. जात आणि पैसा याचं वास्तव राजकीय नेते कधीही दुर्लक्षित करत नाहीत. ते अधिक जोमानं त्याकडं पाहतात. मात्र पत्रकार आणि राजकीय विश्लेषक ते ठळकपणे मांडत नाहीत. राजकीय पक्षांच्या विचारधारेनुसार त्यांची धोरणं आणि कार्यक्रम असतात. हे इथं विसरलं जातं. मूल्याधिष्ठित राजकारणाचे तीनतेरा वाजवले जातात. 'निवडून येण्याची क्षमता' या गोंडस नावाखाली तमाम ध्येय, तत्व, निष्ठा ह्या पायदळी तुडविल्या जातात. पक्षविचारांशी बांधिलकी, कार्यकर्त्यानं तळागाळापासून केलेलं पक्षाचं काम मातीमोल ठरवलं जातं. पैसा खर्च करण्याची क्षमता, निवडणूक जिंकण्यासाठी साम, दाम, दंड, भेद ही आयुधं वापरण्याची ताकद असेल तर मग पक्षनिष्ठा हवी कशाला? आयुष्यभर अपमान, निंदा, टिंगलटवाळी प्रसंगी मार खाऊन काम केलेल्या संघाच्या स्वयंसेवकांना, जनसंघ, भाजपच्या कार्यकर्त्यांना पक्षाची झालेली ही अधोगती पाहून काय वाटत असेल? पक्षांत झालेल्या या भाऊगर्दीनं ती सुखावली असतील का? ज्या काँग्रेसी मार्गाला कार्यकर्त्यांनी आयुष्यभर विरोध केला त्याच मार्गावर आता पक्षाची सुरू असलेली ही वाटचाल आत्मक्लेश करणारी आहे.
हरीश केंची,
९४२२३१०६०९

Monday 13 June 2022

गोल्डी-लॉरेन्स गँगचा उच्छाद!

"देशातलं गुप्तचर खातं, इंटेलिजन्स ब्युरो, साऱ्या तपास यंत्रणा जणू उध्वस्त झाल्या आहेत की काय असं चित्र समोर आलंय. एखाद्याची हत्या करायची असेल तर फेसबुक, युट्युबसारख्या सोशलमीडियावरून त्याला खुलेआम धमक्या द्यायच्या, सांगून त्याची निघृण हत्या करायची; त्याचं लाईव्ह चित्रण, रनिंग कॉमेंट्री सोशल मीडियावर टाकायची ही गुन्ह्याची नवी मोडस ऑपरेन्डी बघायला मिळाली. गॅंगचा म्होरक्या कॅनडातला गोल्डी ब्रार यानं भारतातल्या लॉरेन्स बिष्णोईच्या साथीनं ७०० हून अधिक शार्पशूटर्सची एक गॅंग देशात उभी केलीय. त्याचं कनेक्शन थेट पुण्यापर्यंत पोहोचलंय. संतोष जाधव आणि सिद्धेश कांबळे उर्फ महाकाल यांना अटक केलीय. ब्रार-बिष्णोईच्या इशाऱ्यावर पंजाब अन उत्तरभारतात खुलेआम हत्या होताहेत. सलमान खानला याच गॅंगनं खुनाची धमकी दिलीय. कुख्यात दाऊद पाकिस्तानातून जे काही घडवतो ते सारं किरकोळ वाटावं असा उच्छाद कॅनडातल्या गोल्डीनं, भारतातल्या लॉरेन्सनं मांडलाय...!"
---------------------------------------------------

*रा*ज्यसभा निवडणुकांचा देशभरातला खेळ, त्याचबरोबर भाजपच्या प्रवक्त्यांचा वाचाळपणा आणि त्याविरोधात इस्लामी राष्ट्रांमधून उठलेला गदारोळ! हा गोंधळ सुरू असतांना भारतातल्या गुन्हेगारी जगतात धडकी भरवणारा प्रकार उघडकीस आलाय. माझ्या पत्रकारितेच्या चाळीस वर्षाच्या काळात अशाप्रकारची खतरनाक माफिया गॅंग मी पाहिलेली नाही. दाऊद, सलीम, छोटा शकील, छोटा राजन यांच्या टोळ्यांपासून पुण्यामुंबईतल्या छोट्यामोठ्या टोळ्या पाहिल्यात. पण ही गॅंग काही विचित्रच आहे. पंजाबी गायक सिद्धु मुसावाले या सेलिब्रिटीची ज्याप्रकारे हत्या केली तो अत्यंत भयानक निघृण प्रकार होता! "मै तेरे सरपे गोली मारुंगा.., ये मेरा वादा रहा..., तब तुम्हे पता चलेगा...!" अशी खुलेआम धमकी देऊन ज्याप्रकारे गायक सिद्धु मुसेवालाची हत्या केली त्यानं थरकाप उडायला झालं. पण त्याहून अधिक भयानक म्हणजे ज्या गॅंगनं हे सारं हत्याकांड घडवलं, त्यासाठीची योजना आखली ती सर्वसामान्यांच्या कल्पनेच्या बाहेरची आहे. पाकिस्तानात बसून दाऊद इब्राहिम जे काही घडवतो ते किरकोळ वाटावं असे अनेक गुन्हे कॅनडातून गोल्डी ब्रार नावाच्या गुंडानं घडवल्या आहेत. पंजाबी गायक आणि काँग्रेस कार्यकर्ता सिद्धू मुसावाले याला सांगून हत्या करण्यात आलीय. गोल्डी ब्रारच्या गॅंगची भारतातली सूत्रं लॉरेन्स बिष्णोई चालवतो. त्याच्या या गॅंगमध्ये ७०० हून अधिक शार्पशूटर्स आहेत. त्या गॅंगकडं अत्याधुनिक शस्त्र, हत्यारं आहेत. खुंखार समजली जाणारी केवळ एके ५६ नाही, एके ५७ चनाही तर एके ९४ असॉल्ट रायफल सारखी प्रगत हत्यारं आहेत. सुरक्षा यंत्रणेकडं लष्कर, पोलीस एवढंच काय दाऊद गॅंगकडंही अशी अत्याधुनिक हत्यारं नाहीत. यात आणखी एक भयानक बाब ही की, ज्याची हत्या केली जातेय त्याची 'लाईव्ह कॉमेंट्री' धावतं समालोचन सोशलमीडियावरुन केलं जातं. फेसबुकवर त्याची दृश्यं प्रसारित केलं जातं. यांचं फेसबुक अकौंट धुंडाळलं तर आढळून येईल की, हे गुंड बेधडकपणे हत्येची धमकी देताहेत. युट्युब, फेसबुकवर बिनधास्तपणे सांगितलं जातं की, आम्ही अमक्याला यादिवशी यावेळी मारणार आहोत आणि त्यावेळी त्याची हत्या केली जाते. मुसेवाले यालाही अशीच हत्येची धमकी देण्यात आली होती आणि ती प्रत्यक्षात आणली. हे सारं फेसबुकवर दाखवलं गेलं. अगदी लाईव्ह...! प्रश्न असा पडतो की, हे सारं सोशीलमीडियावर प्रसारित होत असताना पोलीस कुठं आहेत? इंटेलिजन्स ब्युरो काय करत होतं? गुप्तचर खातं कुठं हरवलं होतं? सायबर क्राईम शोधणार खातं कुठं विसावलं होतं. अशा या हत्याकांडाचं नियोजन आणि अंमल हे सारं जेलमधून होतं, आणि त्याचं संचलन लॉरेन्स करतो. एकेकाळी भव्य सांस्कृतिक वारसा आणि शूर पराक्रमी वीरांसाठी प्रसिद्ध असलेल्या पंजाबच्या भूमीत गेल्या काही वर्षांपासून शेतीमालाची विक्री आणि विदेशातून आलेल्या पैशाची रेलचेल सुरू झाल्यापासून तरुण पिढी बिघडू लागली. महागड्या कार-जीपमधून चंदीगड-अमृतसरच्या कॉलेज-खासकरुन गर्ल्स कॉलेजबाहेर रुबाब दाखवणाऱ्या तरुणांची दृश्य नित्याचीच आहेत. २०१६ मध्ये आलेल्या 'उडता पंजाब' या चित्रपटात ड्रगच्या विळख्यात अडकलेल्या पंजाबमधल्या युवा पिढीचं वास्तववादी चित्रण करण्यात आलं होतं. तरुणांना गुन्हेगारी क्षेत्रातलं ग्लॅमर खुणावत असतं. याचपायी पुणे जिह्यातले दोघे तरुण या गँगशी आकर्षिले गेले. त्याची नुकतीच धरपकड झालीय. संतोष जाधव आणि सिद्धेश हिरामण कांबळे उर्फ महाकाळ अशी अशी दोघा शूटरची नावं आहेत. मूसेवाला यांची हत्या करण्यासाठी एकूण आठ शूटर वापरण्यात आले होते. त्यापैकी तिघे पंजाबचे, तिन राजस्थानचे आणि दोघे महाराष्ट्राचे होते.

पंजाबमधल्या सुस्थितीत कुटुंबातला सुशिक्षित गोल्डी ब्रार आपल्या आयुष्यात चांगले दिवस यावेत यासाठी नोकरीच्या शोधात कॅनडात गेला. तिथं त्याच्या आयुष्याला वेगळंच वळण लागलं. तो ड्रग माफियांच्या हाती सापडला आणि फसला. आज तो 'कॉन्ट्रॅक्ट किलिंग' करतोय. त्याचाच एक साथीदार लॉरेन्स बिष्णोई ज्याचं नांव पोलीस आणि मीडियामध्ये आज गाजतंय. शिकली सवरलेली पण वाईट मार्गाला लागलेली ही मुलं सोशीलमीडिया सर्रास वापरतात. युट्युब, फेसबुक पोस्ट करतात, बंदूक चालवताना, पिस्तुल हाताळताना, गोळ्या झाडताना, ड्रॉईंगरूममध्ये बसले असताना, बागेत फिरताना , गुन्हे घडवताना, एखाद्याचा मुडदा पडताना अशा अनेक प्रकारची ही व्हिज्युअल्स आपल्याला सहजपणे पाहायला मिळतात. केवळ मौजेखातर ते करत नाहीत तर ते जी हिंसा करतात, गुन्हे करतात ते दहशत निर्माण करण्यासाठी! हे गँगस्टर्स या कारवाया कधी, केव्हा, कुठं करणार हे ते सांगतात. गोळ्या घालून ठार मारतानाचे फुटेज ते फेसबुक, युट्युबवर पोस्ट करतात. मग त्या गुन्ह्याची जबाबदारीही घेतात. आव्हानही देतात. ही लाईव्ह कॉमेंट्री आहे गुन्ह्यांची! प्रधानमंत्री, गृहमंत्री, मुख्यमंत्री यांच्या तोंडून एक नाव ऐकलं असेल, मुख्तार अन्सारी, अतिक अहमद..! त्यांच्या दृष्टीनं हे देशातले सर्वात मोठे माफिया आहेत. योगीजींनी यांच्यावर बुलडोझर चालवलेत. अशा हाय प्रोफाइल गँगमध्येही ३०-४० हून अधिक शार्पशूटर्स नाहीत. पण गोल्डी ब्रार-लॉरेन्स बिष्णोईच्या गँगमध्ये ७००...हो, हो सातशेहून अधिक शार्पशूटर्स आहेत. हे दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलचं म्हणणं आहे. यांच्याकडं अशी अत्याधुनिक हत्यारं, शस्त्रं आहेत जी दाऊद, मुख्तार अन्सारीच काय कुठल्याही गँगच्या म्होरक्याकडं नसेल. एके ९४ असॉल्ट रायफल! ज्याला एके टीएन ९४ असंही म्हटलं जातं. अशाप्रकारे 'सोफेस्टिकेशन वेपन' रशियाच्या डिफेन्स लॅबमधून बाहेर पडलेलं आहे! सिद्धूची हत्या याच रशियन मेक एके टीएन ९४ असॉल्ट रायफलनं करण्यात आलीय. त्यात काडतुसांचा पूर्ण पट्टा ठेवला तर एकावेळी १,८०० राऊंड फायर करता येतात. सिद्धु मुसेवालाच्या हत्येच्यावेळी तिथं आठ शूटर होते. काहींच्या जवळ .४५ पिस्तुलं होती. तर काहींकडं ९ एमएम पिस्तुलं होती. तिघांकडं मोठी मशिनगन्स हत्यारं होती. पोलिसही हे मानायला तयार नाहीत. पण लोक सांगताहेत, जाणकार सांगताहेत की, तीन एके ९४ असॉल्ट रायफल्स होत्या. अशी हत्यारं जी जैश ए महंमद, लष्कर ए तोयबा अशा अतिरेकी संघटनांनाही मिळालेल्या नाहीत. ही हत्यारं यांच्या हाती कशी, कुठून आली हे देखील एक रहस्यच आहे. २९ वर्षाच्या मुसेवालाची कारमधून घरी परतत असताना निर्घृण हत्या करण्यात आली. तो घरापासून चार किलोमीटर अंतरावर असताना त्यांच्या मोटारीला पुढून मागून घेरून त्याच्यावर गोळ्यांचा वर्षाव केला. हत्येनंतर काही तासांत कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई आणि कॅनडात राहणाऱ्या गोल्डी ब्रार यांनी फेसबुक पोस्ट टाकून ही हत्या आपण केल्याची कबुली दिली. लॉरेन्स सध्या तुरुंगात आहे, तिथूनच तो आपल्या गुन्हेगारी कारवाया करतो. तो आपल्या मर्जीनं तुरुंगात गेलाय. सिद्धू मुसेवाला लोकप्रिय होता, पण तो चंदीगड वा मुंबईला गेला नाही. पंजाबातले तरुण अमेरिका, कॅनडाला जाण्यासाठी धडपड करत असतात. परंतु सिद्धू कॅनडातून परत येऊन आपल्या गावात शेती करत होता. सर्वाधिक टॅक्स भरणारा युवा शेतकरी सिद्धू शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सिस्टम विरोधात लढत होता.

गुंड लॉरेन्स बिष्णोई याची युट्युबवरची वक्तव्य पहा, किती खुंखार आहे, यानंच सलमान खानला मुंबई आणि जोधपूर इथं उडवण्याची धमकी दिलीय. त्यासाठी त्यानं संपत मेहरा आणि नरेंद्र शेट्टी हे दोन शार्पशूटरांची नेमणूक केलीय. सलमानच्या मुंबईतल्या घराचा नकाशा त्याचा एप्रोच आणि एक्झिट रोड दाखवले, एन्ट्री कशी करायची हे दाखवलं. याशिवाय तो जोधपूर इथं येणार समजल्यानं तिथं त्याचीही तयारी केली होती. पण पोलिसांनी मोबाईलवर यांचा संवाद ऐकला आणि संपत मेहरा आणि नरेंद्र शेट्टी यांना ताब्यात घेतलं. प्रश्न सलमान खानचा नाही, मुसेवाला वा इतर कुणाचा नाही, तर इथल्या सामान्यांचं संरक्षण कोण करणार? चंदीगडमधून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची लॉरेन्स बिष्णोईनं एक ग्लोबल अंडरवर्ल्ड गॅंग बनवलीय. कॅनडात गोल्डी ब्रार आणि इतर साथीदार त्याच्याशी जोडलेले आहेत. गोल्डीची लाईफस्टाईल एखाद्या चित्रपटातल्या गँगचा म्होरका जसा दाखवतात तशी आहे. ती युट्युबवर पाहायला मिळेल. आलिशान मोटारीतून फिरणाऱ्या या गोल्डी ब्रारनं मुसेवालाची हत्या आपणच केली असल्याची फेसबुकवर सांगितलं आणि त्या हत्येची जबाबदारी स्वीकारली. पंजाबच्या डीजीपींनी त्याला दुजोराही दिलाय. कॅनडात गोल्डी ब्रार गुन्हेगारी साम्राज्य सांभाळतो तर थायलंडमधला त्याचा कारभार काला राणा हा पाहतो. काला राणा देखील सुशिक्षित, उच्चशिक्षण घेतलेला तरुण आहे. त्याचंही फेसबुक, युट्युब अकौंट आहे. काही दिवसांपूर्वी त्याला थायलंडहून भारतात आणलं गेलंय. एकूण या गँगचा कारभार ऑस्ट्रेलिया, लंडन, जर्मनी अशा अनेक ठिकाणी पसरलेला आहे. उत्तरप्रदेश, दिल्ली, राजस्थान, हरियाणा, मध्यप्रदेश, महाराष्ट्र या राज्यातून या गॅंगचे शार्पशूटर्स तैनात आहेत. सुपर शार्पशूटर्सही आहेत. याचं कामकाज दाऊद, छोटा राजन वा इतर कुठल्याही गँगपेक्षा कमी नाही. पोलिसांच्या माहितीनुसार, अंडरवर्ल्ड, खूनखराबा, एक्स्ट्रोशन यासह हत्यारांचा व्यापार, ड्रग वाहतूक यासारख्या गुन्ह्यात ही गॅंग कार्यरत आहे. ते दिवसाढवळ्या खुलेआमरित्या अत्याधुनिक हत्यारं, शस्त्रांच्या साथीनं गुन्हे घडवताहेत. गोळ्या झाडताना, पिस्तलं, एके रायफल्स चालवत या गुंडांनी धमक्या दिल्या आहेत. ही मंडळी सतत सोशल मीडियावरची अकौंटस बदलत असतात. लॉरेन्स बिष्णोई ग्रुप नावाच्या फेसबुक पेजशी ६० हजार ८०० सदस्य संलग्न आहेत. जे लॉरेन्सला फॉलो करतात. एवढे फॉलोअर्स जगात दुसऱ्या कुठल्या गॅंगचे नसतील. याशिवाय यांची इतर अनेक खाती दिसतात, यांच्या काही ग्रुपवर भगतसिंग, चंद्रशेखर आझाद यांचेही फोटो आहेत. हे तुरुंगात प्रजासत्ताकदिन साजरा करतात. त्यासाठी तिथं पोस्टर्सही लावले जातात. त्यावर पूर्ण गॅंगची नांवं फोटोसह प्रसारित केली जातात. यांची डायलॉगबाजीही फेसबुकवर बिनधास्तपणे करतात, लॉरेन्स बिष्णोई आपल्या फेसबुकवर लिहितो, "जबतक हमारा नाम रहेगा, तबतक कांड होते रहेंगे...!" २१ फेब्रुवारी २२ ला, यांचा आणखी एक गँगस्टर, साथीदार काला जठेरी हाही कुख्यात गुंड आहे, त्यानं ३० हून अधिक खून केले आहेत. तो लिहितो, "जो हमारे खिलाफ हैं, वोह अपना ख्याल रखे l क्यूँकी गोलिया कहीसेभी बरस सकती हैं l...!" यासोबत त्यानं आपल्या काही साथीदारांचे फोटो टाकलेत, नावं लिहिलीत. कोणकोणते गुन्हे केलेत त्याचे फुटेज टाकलेत. काला राणा हा आणखी एक गँगचा सदस्य असलेला शार्पशूटर फेसबुकवर लिहितोय, "हर जखम गहरे देंगे, तुम थोडा सब्र तो करो....!" एकेठिकाणी तो लिहितो, "जिंदगी तो खुदके दमपर जी जाती हैं....!" समाजमाध्यमावर अशाप्रकारे लिहीत कुणाच्या हत्येबाबत बोलणं, त्यानंतर त्यांची अंमलबजावणी करणं, आणि त्याची जबाबदारी स्वीकारणं. हे अगदी सहजरीत्या होतं. असं गुन्हेगारी धाडस दाऊद, छोटा राजन वा दुनियातली कोणतीही गॅंग करत नाही. हे सारे गँगस्टर्स सुशिक्षित, पदवीधर, द्विपदवीधर आहेत. हे सारे विज्ञानाचे विद्यार्थी आहेत. ही टेक्नोसॅव्ही गॅंग आहे. फायरपॉवर यांच्याकडं आहे. परदेशी फेरारी, लंबोर्डीनी गाड्यातून हे फिरतात. पंजाबमध्येही मोठ्या किंमती मोटारी यांच्याकडं आहेत. हे लोक मॅसेजिंग एपचा वापर करतात, एका पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, एका व्यक्तीचं तिहार जेलमधल्या एकाशी संभाषण सुरू असतानाच त्याला ताब्यात घेतलं. तो एका मॅसेजिंग एपच्या माध्यमातून गोल्डी ब्रारशी बोलत होता. तिहार जेलमध्ये या गुंडांचं बस्तान आहे, तिथून गुन्हेगारी साम्राज्य चालवलं जातं. लॉरेन्सचे संबंध या तिहार जेलशी निगडित आहेत.

पंजाबात गेल्या दीडदोन वर्षाच्या कालावधीत बऱ्याचशा हत्या झाल्या आहेत. राजकारण्यांच्या, जमीनदारांच्या, तरुणांच्या हत्या झाल्यात. मारले गेलेत. अचानक असे गुन्हे राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्लीत होऊ लागले. टोळीयुद्धदेखील होताहेत. त्यांच्यामागे महत्वाचं कारण हे आहे की, रॉयल कॅनडीयन माउंटेड पोलीस-आरसीएमपी, लंडनमध्ये ज्याप्रकारे स्कॉटलंड यार्ड पोलीस आहे, आपल्याकडील सीबीआय आहे, तशाप्रकारे आरसीएमपी ही एक फेडरल पोलीस यंत्रणा आहे. या यंत्रणेनं कॅनडातल्या भारतीय पंजाबी गॅंगची लिस्ट करायला सुरुवात केलीय. कारण तिथं अशा खूपशा घटना घडल्यात. नाईटक्लबमध्ये, शहरात, होटेल्समध्ये ड्रगच्या निमित्तानं हत्या झाल्या आहेत. गोल्डी ब्रार आणि त्यासारख्यांची नावं समोर आल्यानं काहींना अटक केलीय. आरसीएमपीनं हरेक शहरात, राज्यात क्रॅकडाऊन करायला सुरुवात केली. व्हॅनक्यूहूर, टोरंटो, ओंटारी जिथं प्रामुख्यानं भारतीय राहतात. अशा ठिकाणी आरसीएमपीनं नाकेबंदी केल्यानं तिथले बरेचशे गुंड भारतात परतलेत. काही गोल्डी ब्रारप्रमाणे तिथंच राहिलेत. त्यांनी इथं आंतरराज्य टोळी बनवलीय. इथं 'ओव्हरसिज एक्स्ट्रोशन' केलं जातंय. राज्याचे पोलीस यांचं कार्यक्षेत्र केवळ त्या राज्यापुरतं असतं. ते अशा विविध राज्यात विस्तारलेल्या खतरनाक गँगशी कसे लढू शकतील? यासाठी गरज आहे की, सरकारनं केंद्रिय स्तरावर काही पावलं उचलायला हवीत. नॅशनल इन्व्हेस्टीकेशन एजन्सी-एनआयए ही तपास यंत्रणा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अतिरेकी कारवाया, गुन्हेगारी, हत्यारं, ड्रग वाहतूक तपासाचं काम करते. आंतरराज्य गुन्हेगारीचा तपास करण्यासाठी वेगळ्या पोलिसी इन्फ्रास्ट्रक्चर गरज आहे. ती निर्माण करून त्यांच्याकडं हे गुन्हे सोपवले जायला हवेत. राज्यातले पोलीस, एसआयटी यांच्या क्षमतेच्याबाहेर या गँगच्या कारवाया आहेत. ७०० हून अधिक शूटर्स, मल्टिनॅशनल कंपनीसारखी गुन्हेगारी टोळी याला रोखायला हवंय. मुसेवाला याच्या हत्येचं दुःख आहेच, पण सलमान व इतर बॉलिवूडच्या ज्या लोकांना धमक्या आल्या आहेत त्यांना कडक सुरक्षा द्यायला हवीय. त्याचबरोबर या गँगच्या घडामोडीवर लक्ष ठेवायला हवंय. हे ७०० शार्पशूटर्स आहेत त्यांचाही शोध घेऊन त्यांच्या मुसक्या आवळायला हव्यात. जे कॅनडात आहेत त्यासाठी आरसीएमपीशी बोलायला हवंय.
हरीश केंची,
९४२२३१०६०९
 

Monday 6 June 2022

देशके हम दंडीत हैं l....!

"कश्मीरमधलं वातावरण शांत झालंय असं वाटत असतानाच इथल्या दहशतवाद्यांकडून 'चुन चुन के' सरकारी हिंदू कर्मचाऱ्यांना गोळ्या घातल्या जाताहेत. पंडितांच्या पलायनाची जखम भरतेय, एवढ्यात 'कश्मीर फाईल्स'नं त्याची खपली काढलीय. पंडितांच्या खोऱ्यात परतण्याला खीळ घालण्याचा प्रयत्न सुरू झालाय. त्यांना सुरक्षित वाटेल अशी यंत्रणा द्यायला हवीय. इथल्या निवडणुका लवकरात लवकर घ्यायला हव्यात म्हणजेच ३७० कलम रद्द करण्यावर जनतेनं शिक्कामोर्तब केलंय असा त्याचा अर्थ काढला जाईल. इथं लष्कराचं नव्हे तर लोकांचं राज्य आहे. या दोन्ही गोष्टी सिद्ध झाल्या तर दहशतवाद्यांची हवा निघून जाईल. जनतेचं मनोधैर्य उंचावेल. 'जगमोहनी' पवित्रा इथलं वातावरण अधिक गढूळ करील याकडं लक्ष द्यायला हवंय! गेल्या काही दिवसातल्या ह्या निघृण हत्येनं पंडित भयभीत झालेत. जवळपास ३ हजार जणांनी इथून पुन्हा पलायन केलंय!"
---------------------------------------------

*'देशके हम दंडित हैं l हम कश्मिरी पंडित हैं ll'*
अशा घोषणा देत तब्बल ३४ वर्षांनंतर संतप्त कश्मिरी पंडितांनी श्रीनगरच्या लालचौकात निदर्शनं करत आम्हाला आमच्या घरी जम्मूत जाऊ द्या अशी मागणी केली. ते कश्मीर खोऱ्यातून बाहेर पडण्यासाठी आक्रोश करताहेत पण इथलं प्रशासन त्यांना बाहेर पडू देत नाही. गेल्या २६ दिवसात १० जणांच्या हत्या झाल्यात. एक असं राज्य जिथं लष्कराच्या ठाणी आहेत, अर्धसैनिक दल आहे, पोलीस तैनात आहेत. इथं विधिमंडळ अस्तित्वात नाही. इथं राजकारण्यांचं नाहीतर नायब राज्यपालांचं नियंत्रण आहे. दिल्लीच्या इशाऱ्यावर, दिल्लीनं ठरवलेल्या नीती आणि धोरणांनुसार सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून इथं कारभार चालतो. इथल्या होणाऱ्या हत्याशिवाय, तरुणांची बेकारी, कुटीरोद्योगातली कास्तकारी, शेती, पर्यटन उद्योग या सगळ्यांच्या जीवनमरणाचा अन अस्तित्वाचा झगडा उभा ठाकलाय. सरकारच्या हाती सारं काही आहे मग इथं असं का घडतंय! इथल्या पंडितांनी पुन्हा पलायन करण्याचा निर्णय का घ्यावा लागतोय. पंडितांच्या सरकारी वसाहतीतून लोक जीवाच्या आकांतानं बाहेर पडताहेत. बडगाममध्ये अतिरेक्यांनी कश्मिरी पंडित असलेले महसूल अधिकारी राहुल भट्ट यांची त्यांच्या कार्यालयात घुसून गोळ्या घालून हत्या केली. या दरम्यान १० सरकारी कर्मचाऱ्यांच्या हत्या झाल्यात. या हत्यांमुळे खोऱ्यातल्या हिंदू पंडितांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. पंडित संतापलेत, त्रासलेत. ते आक्रोश करताहेत. खोऱ्यात परतलेल्या हिंदूंची सरकारच्या हट्टापायी ही फरफट झालीय. अशी त्यांची भावना झालीय. श्रीनगर, बडगाम इथं हिंदूंनी रस्त्यावर उतरून आंदोलनं केलीत. हिंदूंना संरक्षण न दिल्याचा आणि बळीचा बकरा बनवल्याचा आरोप सरकारवर केला. राहुलचं पार्थिव ताब्यात घ्यायला नातेवाईकांनी नकार दिला. नायब राज्यपाल मनोज सिन्हा रुग्णालयात येत नाहीत तोवर राहुल यांचे पार्थिव घरी नेणार नाही अशी भूमिका लोकांनी घेतली. सरकार आणि नायब राज्यपाल यांच्या विरोधात घोषणाबाजी झाली. घोषणाबाजीनं सरकारची प्रतिष्ठा धुळीला मिळाली, सरकारची अब्रू वेशीवर टांगली गेली. पोलिसांनी जमलेल्या संतप्त हिंदूंची पार्थिव स्वीकारण्यासाठी समजूत काढली. राहुलच्या अंत्ययात्रेला केवळ काश्मीर खोऱ्यातूनच नाही तर जम्मू आणि इतर भागातूनही गर्दी झाली होती. इथं कश्मीर खोऱ्यात सरकारी कर्मचारीच सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य हिंदू पंडित कसा काय सुरक्षित राहील. असा सवाल केला गेला. सरकारी कर्मचाऱ्यांच्या हत्या झाल्यानं पुन्हा स्थलांतराचे संकेत मिळताहेत. सरकारी नोकरी करणाऱ्या पंडितांनी त्यांच्या कुटुंबियांना सुरक्षितपणे जम्मूला परतण्यासाठी सरकारनं संरक्षण नाही दिलं तर ते सामूहिक राजीनामा देतील, असे संकेत दिले जाताहेत. तर ३५० हून अधिक कर्मचाऱ्यांनी नायब राज्यपालांकडं आपल्या नोकरीचे राजीनामे पाठवलेत. अतिरेक्यांनी काही शाळांवर हल्ला केल्यानंतर आता सरकारनं सुरक्षितता म्हणून १७७ शिक्षकांची श्रीनगरमधून बदली केलीय.

कश्मीर खोऱ्यातल्या दहशतवाद्यांचा म्होरक्या यासिन मलिकला जन्मठेप झाल्यानंतर, कुलगाममध्ये काही तासांत कश्मिरी पंडितासह दोघा हिंदूंची हत्या झाली. रजनी बाला ह्या शालेय शिक्षिका होत्या, तर विजय कुमार हे राजस्थानातून आलेले बँक कर्मचारी होते. गेल्या काही महिन्यात १८ कश्मिरी पंडितांच्या हत्या झाल्यात. कश्मीरमधला दहशतवाद निपटून काढण्यासाठी केंद्र सरकारकडून कठोर पावलं उचलल्याचा दावा होत असताना पंडितांचा हकनाक बळी जातोय. या हत्यांमुळं पंडितांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली असून ते पुन्हा पलायनाच्या मन:स्थितीत आहेत. १९९० च्या दशकात हजारो पंडितांना एका रात्रीत कश्मीर खोरं सोडावं लागलं होतं, त्या क्रूर आठवणी जणू ताज्या होऊ लागल्यात. जम्मू-कश्मीरच्या विधानसभा मतदारसंघांची फेररचना पूर्ण झालीय तिथं निवडणुका घेण्याच्या हालचालीही सुरू झाल्यात. २०१९ मध्ये कश्मीरचा विशेषाधिकार रद्द केल्यानंतर नव्या केंद्रशासित प्रदेशात राजकीय प्रक्रियेला वेग येऊ लागलाय. ही प्रक्रिया जसजशी गतिमान होईल तशा दहशतवादी घटनाही वाढण्याची भीती कश्मिरी पंडितांना वाटू लागलीय. म्हणूनच स्वत:ला वाचवण्यासाठी त्यांना रस्त्यावर उतरून सरकारचं लक्ष वेधावं लागतंय. २००८ मध्ये तत्कालीन प्रधानमंत्री मनमोहनसिंग यांनी प्रधानमंत्री पुनर्वसन योजनेअंतर्गत जम्मू-कश्मीरमध्ये सहा हजार नोकऱ्या निर्माण करून कश्मिरी पंडितांच्या पुनर्वसनाचा प्रयत्न केला, सुमारे चार हजार पंडित खोऱ्यात येऊन सरकारी कार्यालयांमध्ये कार्यरत झाले. दशकाहून अधिक काळ इथं शांततेत आयुष्य जगणाऱ्या कश्मिरी पंडितांनी दहशतीच्या नव्या लाटेत खोऱ्यातून पुन्हा पलायन केलं तर ती केंद्र सरकारची नामुष्की ठरेल. सरकारच्या ‘कश्मीर धोरणा’चा फोलपणा उघड होईल. याच भीतीपोटी इथलं प्रशासन कश्मिरी पंडितांना खोऱ्यातून जाण्यापासून परावृत्त करतेय. खोऱ्यातल्या पंडितांच्या तात्पुरत्या निवासी ठिकाणांभोवती सुरक्षा वाढवून पंडितांना तिथून बाहेर पडू न देण्याची दक्षता घेतली जातेय. पंडितांना ‘सुरक्षित ठिकाणी’ नेले जात असलं तरी हा तात्पुरता उपाय आहे, त्यातून कश्मीर खोऱ्यातली अशांतता, असंतोष, भयावह परिस्थिती लपवता येत नाही. कश्मीरच्या विकासाचे गोडवे गाणाऱ्या एकाही भाजप नेत्यानं कश्मिरी पंडितांच्या होणाऱ्या या हत्यांबाबत चकार शब्दही न काढणं हे सरकारच्या कश्मीर धोरणातलं वास्तव उघड करतं! केंद्र सरकार आणि भाजपनं कश्मीर खोऱ्यात लोकसंख्या बदलाचा घाट घातल्याची भावना खोऱ्यात सार्वत्रिक असून त्याचे कश्मिरी पंडित हे बळी ठरताहेत. मात्र, सरकारला धोरणात्मक चुकांची कबुली देता येत नाही. तीन दशकांपूर्वी पलायन केलेल्या पंडितांच्या पुनर्वसनाचं आश्वासन दूरच राहिलंय, निदान आता तिथं असलेल्या कश्मिरी पंडितांचे जीव वाचवता आले तरी ते केंद्र सरकारसाठी मोठं यश ठरेल!

कश्मीर खोऱ्यात ऑक्टोबरपासूनच हिंदू, शीख व्यापारी, सरकारी नोकर यांना अतिरेकी लक्ष्य करताहेत. पॉइंट ब्लँक रेंजमधून माखनलाल बिंद्रा यांची गोळ्या झाडून हत्या केली गेली. माखनलाल हे इक्बाल बिंद्रा पार्क भागात फार्मसी डीलरशिप चालवत होते. अतिरेक्यांच्या धमक्यांना न भीता ते व्यवसाय करीत होते. या घटनेच्या दोन दिवसांनी बिहारच्या भागलपूर इथल्या वीरेंद्र पासवान या फळविक्रेत्याची श्रीनगरमधल्या हवाल चौकात हत्या केली. त्यानंतर श्रीनगरच्याच संगम इदगाह भागातल्या सरकारी शाळेत घुसून मुख्याध्यापिका सतींदर कौर आणि एक शिक्षक दीपकचंद यांची हत्या केली गेली. दीपकचंद हे जम्मूचे असून सरकारी कामावर इथं आले होते. दहशतवादी शाळेत घुसले तेव्हा तिथं शिक्षक उपस्थित असलेल्या मुस्लिम शिक्षकांना बाजूला करून अतिरेक्यांनी फक्त कौर आणि दीपकचंद यांनाच गोळ्या घातल्या. हा दहशतवादी हल्ला पाकिस्तानस्थित 'द रेझिस्टन्स फोर्स' या संघटनेनं केल्याचा दावा पोलिसांनी केला. या अशा घटनांमुळं इथली परिस्थिती स्फोटक बनलीय. जर शाळेत, सरकारी कार्यालयात दहशतवादी घुसून हिंदू कर्मचाऱ्याला गोळ्या घालू शकतात, तर मग ते बाहेर काय हवं ते करू शकतील. ऑगस्टपासून १८ कश्मिरी पंडित-हिंदू मारले गेलेत. असं 'टार्गेट किलिंग' का करताहेत, हे आता स्पष्ट झालंय. कलम ३७० रद्द केल्यानंतर इथं फारसा विरोध वा निषेध झालेला नाही. मात्र इथं लष्कराचं राज्य असल्याचा अपप्रचार केला जातोय. हा अपप्रचार मोडून काढण्यासाठी केंद्र सरकारनं जम्मू-कश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका घेऊन जनतेनं निवडून दिलेलं सरकार स्थापन करण्याची कसरत चालवलीय. इथल्या विधानसभा मतदारसंघाची फेररचना प्रक्रिया संपलीय. जम्मू आणि कश्मीरमध्ये प्रत्येकी १० जिल्हे तयार करण्यात आलेत. आजवर इथल्या रचनेनुसार कश्मीरमध्ये जम्मूहून अधिक जागा होत्या त्यामुळं इथं कायम कश्मीरीचंच राज्य राहिलंय. कश्मीरात विधानसभा निवडणुका पार पडल्या आणि लोकनियुक्त सरकार अस्तित्वात आलं म्हणजे ३७० कलम रद्द करण्यावर जनतेनं मान्यतेचं, संमतीचं शिक्कामोर्तब केलं असा अर्थ होईल. शिवाय जनतेनं मतदानातून सरकार निवडलंय. याचा अर्थ कश्मीरमध्ये लष्कराचं नाही तर जनतेचं राज्य आहे. या गोष्टी सिद्ध झाल्या तर अतिरेक्यांची हवा निघून जाईल. लोकनियुक्त सरकारमुळं पंडितांना विश्वास वाटेल ते परतू लागतील, बाहेरूनही लोक येऊन स्थायिक होऊ शकतील आणि अतिरेक्यांना इथून पळून जावं लागेल. अतिरेक्यांना ही परिस्थिती नकोय म्हणून ते हिंदूंनी इथं परतू नये त्यासाठी या हत्या केल्या जाताहेत. ते त्यांना घाबरवून हुसकावून लावू इच्छितात. निवडणुका झाल्या नाहीत, तर हिंदू पंडितांच्या पुनर्वसनासाठीच्या सरकारच्या प्रयत्नाला खीळ बसेल. पंडितांच्या पलायनाला ३२ वर्षे झालीत. पिढी बदललीय नव्या पिढीनं पलायनाची घटना, त्यावेळी झालेले अत्याचार, छळ याच्या अनुभवलेले नाहीत. मात्र ऐकून त्यातली दाहकता अनुभवलीय. त्यांच्यात जागृती आलीय. पंडित पुन्हा 'अपने वतनमें' परतत आहेत. पण हत्यांच्या या घटनांमुळं खोऱ्यात परतलेल्यांमध्ये दहशत, अस्वस्थता, भीती निर्माण झालीय. त्यामुळं खोऱ्यात परतण्यास ते कचरताहेत. ही प्रक्रिया आता थांबलीय. त्यानं आतापर्यंत कश्मीरमध्ये सरकारनं जे काम केलंय त्यावर पाणी फिरवलं जाईल.'कश्मीर फाइल्स २' साठी पुन्हा दहशतवाद्यांचे वाईट इरादे व्यक्त होतील.

कश्मीर खोऱ्यातल्या तरुणांच्या हाती काम नाही. त्याचा फायदा अलगाववादी घेताहेत. बेकार तरुणांची संख्या इथं खूप मोठी आहे. थोड्याशा पैशासाठी हे कुणाचाही मुडदा पाडताहेत. त्यांच्यामते कश्मिरी खोऱ्यातल्या आमच्या हक्काच्या सरकारी नोकऱ्या जम्मूतून येणाऱ्यांना दिल्या जाताहेत. किंबहूना त्यासाठी पंडितांच्या पुनर्वसनासाठी इथं पाचारण केलं जातंय. याचा राग या तरुणांना आहे. यांना इथून हुसकावून लावलं तरच आम्हाला त्या रिक्त झालेल्या नोकऱ्या मिळतील. इथल्या १५ ते २९ वयोगटातल्या बेकारांची संख्या सीएमईच्या एका अहवालानुसार ४७ टक्के इतकी आहे. यातही सुशिक्षित तरुणींची संख्या ६७ टक्के आहे. कलम ३७० हटविल्यानंतर सरकारनं इथं पाच लाख नोकऱ्या उपलब्ध होतील असं सांगितलं होतं पण प्रत्यक्षात इथल्या असलेल्यापैकी १ लाख २० हजार नोकऱ्याच संपुष्टात आल्यात. मनमोहनसिंग सरकारनं कश्मीर खोऱ्यात सहा हजार पंडितांना नोकऱ्या देऊन पुनर्वसन केलं होतं. त्यातल्या १ हजार ३७ जणांना वसाहत उभारून राहण्याची सोय केली पण तिथं आजही प्राथमिक सुविधा नाहीत. शाळेत जाणाऱ्या मुलांना शाळा ते घर एवढंच माहिती आहे. इतर परिसरच माहीत नाही. ते कायमच असुरक्षित असतात. इतर पंडित सरकारी निवासाव्यतिरिक्त भाड्याच्या घरात राहताहेत त्यांची अवस्था तर आणखीनच भीषण आहे. ते कायम भीतीच्या सावटाखाली राहताहेत. 'जगण्यासाठी नोकरी हवीय पण नोकरीमुळं जीवच धोक्यात आलाय!' गेली ३४ वर्षे झगडणाऱ्याना अद्यापि न्याय मिळत नाहीत, सुरक्षा मिळत नाहीये. देशात, राज्यात अनेक सत्तांतरे झाली पण तीच विपन्नावस्था कायम राहिलीय. पोटापाण्यासाठी इथं परतलेल्यांचा जीव टांगणीला लागलाय. पंडित चक्रव्यूहात सापडलेत. सरकार 'सांस्कृतिक पुनर्जागरण' करण्याचा घोषणा करते पण इथं सारंच उध्वस्त होण्याची वेळ आलीय. इथला अंतर्विरोध कधी संपणार? इथल्या रिकाम्या हातांना काम हवंय त्यांना रोजगार हवाय पण दहशतवादी त्यांच्या हातात दगडधोंडेच नाहीत तर पिस्तुल-बंदुका देताहेत. हे थांबायला हवंय. दिल्ली बैठका घेतेय, त्यांच्यात बेचैनी दिसत नाही. इथलं सरकार खामोश बसलेलं आहे. इथली नोकरशाही सुस्त अजगरासारखी पहुडलीय. त्यामुळं सर्वसामान्यांचा जीव पणाला लागलाय. आता कुणी वाली राहिलेला नाही असं त्यांना वाटतंय हे अधिक भयानक आहे.

हिंदुत्ववाद्यांची राजवट देशात असतानाही कश्मिरमधून बेदखल झालेल्या पंडितांना हक्काच्या जागेसाठी सरकारकडं साकडं घालावं लागतं, हेच मुळात संतापजनक आहे. 'आम्हाला आमच्या मालकीची हक्काची घरं द्या!' अशी मागणी ‘पनून कश्मीर’कडून होतेय. अनेक सरकारं आली आणि गेली; पण कश्मीरचे कधी काळी ‘मालक’ असणार्‍या पंडितांच्या नशिबी आलेलं भिकाऱ्यांचं जिणं काही बदललं नाही. पंडितांच्या मुद्द्यावरून काँग्रेस सरकारांच्या राजवटीत वर्षानुवर्षे रान उठवणार्‍या भारतीय जनता पक्षाचं आज केंद्रात सरकार आहे. तरी पण पंडित आजही दहा बाय दहाच्या निर्वासित छावण्यांमध्येच विपन्नावस्थेत जगताहेत. मग सरकार बदलून उपयोग तरी काय झाला? खोर्‍यातल्या मुस्लिमांनी पाकिस्तानच्या पाठिंब्यावर पंडितांवर केलेले अनन्वित अत्याचार आणि हत्याकांडाचा नुसता विचार जरी केला तरी पण अंगावर काटा येतो. खोर्‍यातून लाखो पंडितांना इस्लामी दहशतवादामुळं बेघर व्हावं लागलं ही सार्वभौम भारतावर झालेली सर्वात मोठी जखम आहे. दुर्दैव असं की, पंडितांच्या अश्रूंसह झेलमचं पाणी गेल्या ३२ वर्षांत पाकिस्तानात वाहून गेल्यानंतरही ही जखम आजही भळभळतीच आहे. १९८९ च्या डिसेंबरपासून १९९५ पर्यंत सलग सहा वर्षे कश्मीर खोर्‍याचं इस्लामीकरण करण्यासाठी पंडितांचं, हिंदू आणि शिखांचं शिरकाण झालंय. आजवर ६ हजार पंडित यात मारले गेलेत. पंडितांच्या घरांवर 'तुमच्या स्त्रिया आणि मालमत्ता सोडून चालते व्हा!' अशी पत्रकं चिकटवण्यात आली होती. असंख्य पंडितांच्या स्त्रियांवर त्यांच्या कुटुंबासमोरच बलात्कार केले गेले. इस्लामी दहशतवादी बंदुकीच्या जोरावर क्रूर अत्याचार करत असताना ७ लाख ५० हजार पंडितांनी जीव मुठीत धरून कश्मीर सोडलं. दीड हजार मंदिरं मुस्लिमांनी आणि अतिरेक्यांनी उद्ध्वस्त केली. पंडितांच्या सहाशे गावांची नावं बदलून त्यांना इस्लामी नावं देण्यात आली. आपल्याच देशात आपलं घरदार, सफरचंदाच्या बागा, मालमत्ता आणि पृथ्वीवरचं स्वर्ग म्हणून ओळखलं जाणारं कश्मीर सोडून पंडितांना कायमचं परागंदा व्हावं लागलं. हा सगळा अमानुष नरसंहार आपला देश हताशपणे बघत राहिला. या राक्षसी अत्याचारानंतर कश्मीरी पंडितांच्या नशिबी आल्या त्या फक्त नरकयातना. आजही त्या छळताहेत!
हरीश केंची,
९४२२३१०६०९



'इंडिया शायनिंग' ते 'मोदी की गॅरंटी...!'

"एकचालुकानुवर्तीत पक्ष आणि सत्ताधारी असं रूप 'लोकशाहीची जननी' म्हणवणाऱ्या देशात आकाराला येतंय. सामूहिक नेतृत्वाची प...