Sunday 17 October 2021

शृंगारवेल 'कमला'

'कमला' हे वस्तुतः अंक खंडकाव्य. पण त्याला महाकाव्याची ऐट आहे. त्यातली काही वर्णनं सांकेतिक आणि भाषाही कृत्रिम वळणाची आहे. पण या काव्याला महाकाव्याचा डौल मात्र आला आहे. कल्पनेची विविधता आणि विशालता सुंदर आणि भव्य यांचं उत्कृष्ठ आकर्षण ही महाकाव्याची वैशिष्ट्ये 'कमला'त जाणवत राहतात. कमलेच्या मनःस्थितीशी कवी समरस झाला तर आहेच, पण पुन्हा अलिप्त राहून तो तिला कांही संदेशही देत आहे. कमला आणि मुकुंद यांच्या पहिल्या प्रेममीलनाची रोमांचक कथा कवीच्याच जीवनाचा जणू अविष्कार आहे. राधाकृष्णाच्या माध्यमातून जुन्या संत आणि पंतकवींनी ज्याप्रमाणे आपल्याच मनात पिंगा घालणारी प्रेमभावना प्रकट केली. त्याप्रमाणे 'कमला' म्हणजे सावरकरांच्या अतृप्त उद्दीप्त आणि प्रमत्त शृंगारभावनेचे सुंदर, धुंद पण उदात्त चित्रण आहे. रम्याद्भूत कल्पनांचा त्यांनी या काळात तर पाऊसच पाडला आहे. अपूर्व वस्तूंची निर्मिती करणारी प्रज्ञा म्हणजे प्रतिभा या व्याख्येचे येथे पूर्ण प्रत्यंतर येते. सावरकर हे प्रकृतीने कवी आहेत. कवीच्या विलक्षण रोमॅन्टीक दृष्टीने त्यांनी राष्ट्रीय स्वातंत्र्याचे स्वप्न रंगविले आणि उदात्त स्वप्नाचा पाठलाग करीत जन्मभर वणवणत राहीले. अंदमानच्या अजस्त्र तुरुंगात म्हणून त्यांची बंडखोर प्रतिभा जखडून राहीली नाही. काळाला आवश्यक असलेली भावात्मकता यांच्या साहित्यालाच काय, पण त्यांच्या साऱ्या आयुष्यालाही व्यापून उरली. या काव्यावर अस्वाभाविकतेचा आक्षेप काही टीकाकारांनी घेतला आहे. पण कवीच्या जीवनात एकप्रकारची अद्भूतता आहे. 'कमला' काव्यात सृष्टीचा बाह्य वर्णनात अतिशयोक्ती वि अद्‌भुतता असली, तरी कमला आणि मुकुंद यांच्या मन:सृष्टीतील परिवर्तने कवीने अगदी सहज टिपली आहेत. कमला आणि मुकुंद या दोन्ही भूमिका एकाच भोगलालस मनाने घेतल्या आहेत. असे म्हणण्यात अतिशयोक्ती नाही.

पानिपतच्या युद्धापूर्वी मुकुंद आणि कमला यांचा बालपणीच विवाह झाला आहे. मुकुंद आणि त्याचा मित्र मुकुल दोघे सैनिक आहेत. पाडव्याच्या सणासाठी घरी आलेल्या मुकुंदाला आपली 'किशोरयौवना' पत्नी कमला दिसते. आणि तो तिला भेटण्यासाठी अत्यंत आतुर होतो. बागेत फुलं तोडण्यात गर्क झालेल्या कमलेचे तो पहिले चुंबन- चोरटे चुंबन घेतो. त्या विलक्षण उन्मादक अनुभवाने कमला अंर्तबाह्य रोमांचित होते. इनकी की ते चुंबन तिला जीवनाच्या आणि तारुण्याच्या यक्षसृष्टीत घेऊन जाते. भ्रमराच्या गोड दंशाने फुलत चाललेल्या कळीचे दर्शन रात्री तिला स्वप्नात सुद्धा घडत राहते. या अनुभवाने कमला ऋतूमती होते आणि यौवनाच्या कांतीने ती अधिकच मोहक दिसू लागते. तारुण्याच्या सीमेवर उभ्या असलेल्या कमलेच्या मनातील ही अनोखी कंपने इतक्या हळूवारपणे, इतक्या रसिकतेने आणि इतक्या सचित्रपणे साकार केली आहेत की, क्रांतीचा अंगार ज्यावाणीने उधळला तीच वाणी हा सूक्ष्मतरल प्रणयानुभव कसा रेखाटित आहे याचे नवल वाटते. सावरकर म्हणाले,
प्रियेच्या पहिल्याची हे लज्जाचंचल चुंबना
कोण प्राणी जगी की जो विसरीन तुझ्या क्षणा!
असुनी पल जो पाजी चुंबना तुझिया रसा
शताब्दाहुनीही ही होई तरी अपल तो कसा
तुझ्यात दिव्य जी चोरी, गार जो चटकाही की
या आणि नंतरच्या ओळीतून त्यांनी पहिल्या चुंबनाची मादकता कोणत्याही मद्याहून कशी अधिक बेहोशी देऊ शकते याचे वर्णन केले आहे. त्यानंतर कवी म्हणतो.
स्नेहशून्य साहरा वाळवंटात काळखोलीत
प्रियेच्या पहिल्याची हे मुग्ध प्रेमल चुंबना !
तुझीच स्मृती जावो नि भेटवी विरही मना ।
पूर्वी अनुभवलेली आणि आता पारखी झालेली ही चंचल अनुभूती कवी आपल्या मनात जागी करीत आहे. आपल्या कल्पनेच्या राज्यात मुकुंदाच्या रूपाने तो कमलेच्या सहवासाचा आस्वाद घेत आहे. भीषण वास्तवता त्याच्याभोवती दगडी तुरुंगाच्या आणि अंधार कोठडीच्या माध्यमातून त्याला वेढा देऊन बसली आहे. पण कवीची प्रतिभा कारागृहाच्या उंच भिंतीवरून उड्डाण करू शकते. कारण ती स्वच्छंद आहे. मुक्त आहे. सावरकरांचे शरीर त्या अंधारलेल्या स्नेहशून्य भिंतीच्या आत जखडले असले तरी त्यांच्या मनाचा पक्षी केव्हाच जुन्या आठवणींच्या आभाळात भरारी घेत होता. व्यावहारिक सत्य आणि वाङमयीन सत्य यातील अंतर ज्यांच्या लक्षांत येत नाही त्यांना 'कमला' काव्य हा केवळ कल्पनेचा कृत्रिम खेळ वाटतो. पण ही 'कमला' मुकुंद होऊन या कवीने पुन्हा पुन्हा चुंबली आहे. सावरकरांच्या मानसिक स्थितीगतीचे हे एक अस्सल चित्र आहे. तपशील कल्पनेतला असेल पण काव्यातले तत्व पूर्णअंशाने वास्तव आहे यात वाद नाही.
कमला आणि मुकुंद यांच्या पहिल्या मीलनाचा शब्दाविष्कार सावरकर सहजतेने करतात.
ऋतुमती झालेली कमला
सुरम्य मखरामाजी रमणी मग जै बसे
श्लोकात कालीदासाच्या उपमा जशी दिसे
कालीदासाच्या श्लोकातल्या उपमेची अनुरूप उपमा कमलेला देण्यातले औचित्य रसिकांना सांगण्याचे कारण नाही. कालीदासाच्या शृंगारातली अभिजातता आपल्या काव्यात आणण्याचा प्रयत्न सावरकरांनी केला आहे. पुढील वर्णन काव्याच्या सौंदर्यात किती समृद्ध भर घालते हे पहिल्याशिवाय या काव्याची काव्यमयता लक्षांत येणार नाही
वेणी होताच दे सासू जी पाठीस तया दिशी
थाप जी आईच्या लागे चुंबनाहुनी गोडशी.....किंवा
न्हाता एकासनी ऐसे किती चोरियली तरी
अंगे स्वयेची अंगाशी लागताति परस्परी
मऊ मऊ असे काही मऊ ते सुख लागले.
घरीच वक्षी ते ती ते, झोक जाऊनिया बरे....
पडद्यात गुलालांच्या जळांच्या गळत्यामधी
घेववे न तिला दे ती संधी साधुन तो कधी
अशी परिचिता होता प्रियमूर्ती अनुक्रमे
दुरोनि नच ओठीही प्यावी चंद्रकला गमे
कल्पनेचे नवनवीन उन्मेष हे या काव्यांचे एक आगळे वैशिष्ट्य. फुलबागेच्या वर्णनात कवी रंगून गेला आहे. बागेतील भृंग हा मदनाचा दलाल आहे आणि निशिगंधाची फुले ही मदनाच्या सेनेची पुढे आलेली रौप्यशृंगे आहेत. कारंजाच्या उफाळणाऱ्या जलधारा म्हणजे इंद्रधनुष्याची पिल्ले आहेत. अशा कल्पनांची धुंदी अनुभवताना कवी त्या बागेत किती मनःपूर्वक रमला आहे याची जाणीव होते. नवनवीन शब्दांचे आणि
कल्पनांचे घुंगरु पायात बांधण्याचा प्रयत्न या काव्याने केला आहे. सावरकरांची काव्याभिरूची संस्कृतातील अभिजात काव्यावर आणि मराठीतील पंडिती प्रकृतीच्या कवितेवर पोसली गेल्यामुळे 'कमला' मधील प्रत्येक वर्णने संस्कृत वळणाची ठराविक पद्धतीची वाटतात. शब्दांची रचना कांही ठिकाणी अतिसंस्कृतनिष्ठ असल्यामुळे क्लिष्टता आणि दुर्बोधता जागवत राहते. पण अशा काही वैगुण्यांना बाजूला सारून सावरकरांची कविता प्रत्येक स्थळी काळजाला हात घालते. शृंगार आणि प्रेम यांच्या बेहोश अनुभवाची रसरसीव चित्रे अत्यंत तन्मयतेने रेखाटते. या खंडकाव्याचा आणखी एक भवितिय विशेष सांगीतलाच पाहिजे,

स्त्रीपुरुषाचा शृंगार अनेक कवींनी आजपर्यंन वर्णिला आहे. ह्याचे वर्णन पुढेही साहित्यात सदैव होत राहील. शृंगार हा जीवनाला रुची देणारा अत्यंत आकर्षक आणि गूढ विषय आहे. यात शंका नाही. कालीदासाने 'मेघदूता'त विप्रलंभ शृंगार रेखाटला आहे. 'कुमारसंभवा'त संभोगशृंगार रंगवला आहे. शृंगाराची प्रमत्त चित्रे जुन्या मराठी काव्यात पुष्कळ सोपडतात. . मुक्तेश्वर आणि वामन यांनी उघडा शृंगार कित्येक स्थळी वर्णिला आहे. राम जोशी, होनाजी बाळा, सगनभाऊ, पठ्ठे बापुराव वगैरे शाहिरांच्या लावण्यांतून हा रस भरभरून वाहात आहे. भारतात पसरलेल्या अनेक प्राचीन मंदिरांच्या दगडी भिंतींवर कित्येक शृंगारचित्रे खोदलेली दिसतात. हा एक सनातन आणि अवीट मधूर असा विषय आहे. पण या विषयाच्या रेखाटनाला कलावंताची कलाशक्ती जिवंत आणि निकोप असेल आणि समरसता आणि तटस्थता यांचा कलात्मक तोल सांभाळता येत असेल तर हा विषय सुंदर रितीने मांडता येतो. कालीदासासारख्या महाकवीचे पाऊलसुद्धा अशा विषय चित्रणात कळत नकळत घसरते आणि काममीलनात त्याची प्रतिभा अतिरेकी विकृत रस घेऊ लागते. मुक्तेश्वराची अशीच अवस्था झाली आहे. शाहिरांबद्धल बोलण्याचे कारणच नाही. सर्व भावनांत रतिभावनेसारखी उन्मत आणि उत्कट भावना नाही दुसरी. दुःख आणि आनंद याची पेरणी करून मनुष्याला घडविणारी किंवा उध्वस्त करणारी ही विषय भावना साऱ्याच प्रतिभावंतांच्या लेखनाचा महत्वपूर्ण विषय बनला तर यात आश्चर्य नाही. कलात्मकतेने करणे हे एक मोठे आव्हान असते. कमला आणि मुकुंद यांचा प्रथम समागम घडल्यानंतर कमला झोपेत असतानाच तिला सोडून मुकुंदाला लढाईवर जावे लागते. कमलेच्या स्वप्नात काही भीतीदायक दृश्ये तिला दिसतात. येथे या काव्याचा शेवट झाला आहे. पण सावरकरांनी कमला आणि मुकुंद यांच्या संगमाच्या चित्रणाला उदात्त जाणीवेचा जो स्पर्श दिला आहे, त्यामुळे या कामाला एक नवीन आणि स्तिमित करणारे आहे. फुलांच्या शेजेवर भीत भीत बसणाऱ्या कमलेला उद्देशून सावरकरांमधल्या श्रेष्ठ कवीने आणि तत्वचिंतकाने जे भाष्य केले आहे ते केवळ अपूर्वच नाही तर नितांत माननीयही आहे. या तत्वचिंतनात तत्वजडता नाही, तत्वसुंदरता आहे. काव्याच्या चैतन्ययुक्त गाभ्याला या चिंतनाने अधिकच जिवंत आकर्षक बनविले आहे. जीवनाकडे रसिकतेने आणि शोधकतेने नीटपणे आणि धीटपणे पाहू शकणाऱ्या चिंतनप्रिय कवीलाच या प्रकारचे भाष्य करता येणे शक्य आहे. शृंगारात अडकलेला, लडबडलेला कवी असे 'चिंतन' कधीच करू शकणार नाही. शरीर पातळीवरचाा प्रमत्त भोग साकार करताना तात्विक पातळीवरील विवेक जेव्हा हा कवी प्रकट करतो तेव्हाच त्याच्या प्रतिभेचे रसायन साधे सोपे नसून त्यात अनेक रंग मिसळले आहेत व साऱ्या रंगांपेक्षा कवींच्या विशिष्ट व्यक्तिलाचा रंगच अधिक प्रभावी झाला आहे. याची जाणीव होऊ शकते. कवी सावरकरांनी म्हटलं आहे,
पुष्यमंचकशय्या ही बैस बैस शुभे, नभी;
चुंबिता का मधेचि तू राहती सुटूनी उभी !
बैस शेजेशी ये तू ये; स्वये जनककन्यका !
स्पर्शली जीस ती झाली रतिसेज न धन्यका !
देहधर्म कसासाची! पावने प्रकटी अजी
' ज्या रतिशेजेला तू स्पर्श करीत आहेस ती शेज सीतेनेही धन्य केली आहे. तिला तू टाळू शकत नाहीस. ही जीवनाची स्वर्गीय गंगा आहे. तो केवळ देहधर्म नाही. स्वतः परमेश्वरानेच ही जीवनगंगा तुझ्या ठायी निर्माण केली आहे म्हणून
अलिंगनामृती गोडी; पिऊनी तर तू पहा
अंगी अंगी समलिंगी, विलंब पल ना करी
की असामान्य गे देवी पल हा !
या शुद्ध नैसर्गिक क्रमप्राप्त ईश्वरी प्रेरणेतून मदन नवी पेरणी करीत असतो. हे केवळ दोन शरीराचे मीलन नव्हे. या मीलनामागे एक शक्ती उभी आहे. याच दिव्य मीलनातून उद्याचा रामचंद्र, गीतेचा कर्ता श्रीकृष्ण, एखादा बृहस्पती, एखादा महारथी भीष्म किंवा कोणी मुक्त मीरा, पार्वती जन्म घेण्याच्या क्षणाची वाट पाहात असेल. कोणी नवप्रतिभेचा नाटककार, शिल्पकार किंवा आसन्नमरण राष्ट्राला तारणारा कोणी चंद्रगुप्त, विक्रमादित्य या 'दिव्य पेरणीतून' प्रकट होण्याची वाट पाहात उभा असेल सावरकरांचे या संदर्भातले चिंतन त्यांच्याच शब्दातून वाचावे आणि रोमांचित व्हावे. ते म्हणतात.
'हिंदू छत्रपती श्रीमान शिव वीरवराग्रणी
गुरु गोविंद वा बंदा, धर्मवीर नवा कुणी
मंगलाची परा सीमा ! पेरणी तचि संभवा
घेणे असेल या दिव्या देवभूमी तुझ्यात या
जन्मजन्मांतरीचा यज्ञतप: सिद्धी फलोन्मुखा' सावरकरांच्या दृष्टीने स्त्री पुरुष संगमाचा केवढा व्यापक तात्विकअर्थ आहे हे संभोगशृंगाराचे काव्य राहात नाही. 'कमला' हे केवळ कल्पनेच्या भराऱ्या मारणारे, अद्भूत वर्णनात रमलेले मनोरंजक, कृत्रिम काव्य वाटत नाही. अंदमानच्या अंधारलेल्या जगात स्वतःचे रंजन करून घेण्यासाठी कवीने केलेला हा काव्यमय खेळ राहात नाही. त्यात त्याने आपले स्वतःचे रस डोळसपण समर्पित, क्रांतिकारक आणि तत्वचिंतक व्यक्तिमत्व ओतले आहे. हे काव्य भोगाचे आहे. स्त्रीपुरुषाच्या मीलनाचे आहे. तारुण्याच्या आणि देहासक्तीच्या जयघोषाचे आहे यात शंकाच नाही. पण प्रेममीलनात शरीरभोगात जो एक चिरंतन महत्वाचा रस सामावला आहे यात शंकाच नाही. पण प्रेममीलनात, शरीरभोगात जो एक चिरंतन महत्वाचा रस सामावला आहे त्याचा विचार कवी अत्यंत सखलपणे करतो, भोगविचारांकडे एक सुसंस्कृत, उन्नत व सौंदर्यवादी दृष्टीने कसे पाहता येते आणि यातून नवा अधिक सुंदर अर्थ करता निर्माण करता येतो याचे हे अपवादात्मक उदाहरण आहे. सावरकरांच्या काव्याला कोठेही अश्लीलतेला थारा नाही. जे आहे ते सुभग आणि शुचिमान आहे. एका निकोप तरुण मनांत उचंबळून आलेली प्रतिभा येथे आविष्कृत झाली आहे. मराठी काव्य साहित्यात 'कमला' आपल्या अंगभूत वैशिष्ट्यांनी रसिकांना सदैव प्रसन्न करीत राहील यात काय संशय?

वाड.मयाचे मूल्यमापन केवळ वाडमयीन निकषावर करण्यात अर्थ नाही. कारण वाङ्मय हे निव्वळ वाड्मय नसून त्यात समाजजीवनाचे अनेक प्रवाद मिसळलेले असतात. त्यामुळे साहित्यबाह्य करतो यांचाही विचार करावा लागतो. 'कमला' काव्यातल्या शरीरभोगाकडे अभिनव आणि रुचिर वृतीने कवी पाहू लागला म्हणून तर या काव्याला नवे परिमाण लाभले. साचेबंद प्रणयाची कथा उगाळणारी ही कविता नाही. तिच्या भोवती भोगातून निर्माण होणाऱ्या नव्या सृष्टीची जाण आहे. ही नवी निर्मिती सुद्धा कवीला आपल्या जीवन विचाराच्या संदर्भात व्हावी असे वाटते. अशी कविता स्फुरायला जीवनचिंतनाच्या खोल पाण्यात जाणीवपूर्वक बुडी मारण्याची क्षमता असावी लागते. वाङ्मयाला जीवनभाष्याची पदवी व प्रतिष्ठा यातूनच मिळते. सभोवताली अंधाराने आणि मरणाने वेढा घातला असतानाही प्रेम, तारुण्य, सौंदर्य, उपभोग, नवनिर्मिती आणि जीवन यांच्या जयजयकाराची प्रकाशमान, जिवंत कविता लिहिणारी जयिष्णू प्रतिभा मराठी सारस्वतात प्रकट झाली याचा आनंद आणिअभिमान रसिकांना सदैव वाटेल.

सावरकरांच्या हृदयातली प्रतिभा जागी झाली. तिची तार छेडली गेली. एक प्रेमधुंद लयकारी उमटली, फुलबागेतल्या फुलांचा सुगंध वाऱ्याबरोबर वाहत यावा, त्याप्रमाणे या कवीच्या जीवनासक्त मनात उत्कटपणे भोगलेल्या प्रीतीचा सुवास दरवळू लागला. त्या सुवासात अंक आगळी जादू होती. कारण आता यमयातना देणारी ती अंदमानाची राक्षसी कोठडी उरली नव्हती. पायातल्या साखददंडाचेही फुले झाली होती. आजूबाजूच्या रुक्ष वातावरणाला शृंगाराचे संगीत आठवु लागले. सावरकरांच्या ताज्या तरुण संगमोत्सुक हृदयाच्या सतारीवर उन्मत शृंगाराची सजावट, सुरावट उचंबळून येऊ लागली. सापडलेले हे सूर आणि शब्द कोठेतरी गुंफले पाहिजेत. शब्द कोठेतरी लिहिले पाहिजेत. कवी इकडे तिकडे पाहू लागला. त्या भयाण तुरुंगातली ती उदास कोठडी विषण्ण आणि जड झालेली वर्षानुवर्ष नैराश्याची ओझे घेऊन उभी होती. कोठडीच्या जाडजुड काळसर भिंती कशाने कुणास ठावूक काळवंडून गेल्या होत्या. उंचावरील एका लहानशा झरोक्यातून एकच चुकार किरण त्या धुरकट भिंतीवर रेंगाळत होता. सावरकरांच्या दृष्टीसमोर किशोरावस्था आणि यौवन यांच्या संधिप्रकाशात उभी असलेली 'कमला' दिसू लागली. त्या कोवळ्या तरुणांच्या अंगोपांगावर निसर्ग आपली मोहक जादू एका अदृष्य कुंचल्याने चितारीत होता. कोठडीत डांबला गेलेला हा कवी तिच्या फुलल्या देहसौंदर्यात प्रेमिकाच्या आणि कवीच्या धुंददृष्टीने पाहात होता. कमलेच्या नवतारुण्याचे चांदणे तिच्या गात्रागात्रात कसे खेळते आहे याचे चित्र आपण रेखाटले पाहिजे. सौंदर्याची आणि यौवनाची ही मूर्ती आपण आपल्या शब्दातून मूर्त केली पाहिजे. या तीव्र जाणीवेने नवे शब्द प्रकट होऊ लागले. शृंगार, प्रेम रसिकता यांनी रसरसलेली कविता आकार घेऊ लागली. प्रणयोन्मदाची मदिरा प्यालेले रसिक शब्द या भयाण अंधार कोठडीत गात गात अवतीर्ण झाले.

'कमला' खंडकाव्य वाचताना आपल्याभोवती एक धुंद वातावरण तयार होते. पण तुरुंगाच्या निर्देश, रुक्षकोठडीत लिहली गेलेली शृंगाररसाची ही सळसळती अक्षरे आहेत याची जाणीव मनाला होत राहते. ही पार्श्वभूमीही रोमांचक आहे. मराठीतील ही प्रेममदिर कविता एका जहाल क्रांतीकारकाने घायपाताच्या काट्याने बंदिखानातल्या अंधारकोठडीच्या भिंतीवर खरडून लिहली केवढी विलक्षण घटना आहे. 'कमला' विसरणे शक्यच नाही.

- हरीशकेंची.
'अक्षर' ४६, विणकर सोसायटी,
पद्मावती, पुणे ४११०४३
९४२२३१०६०९

No comments:

Post a Comment

लोकशाही की एकाधिकारशाही...!

"देशात लोकशाहीचा उत्सव सुरू आहे, पण सत्ताधारी  लोकशाही संसदीय ऐवजी अध्यक्षीय असल्यासारखे वागताहेत. सामूहिक नेतृत्व सांगणारा...