Thursday 28 October 2021

हिंदुत्व : प्रबोधनकारांचं आणि बाळासाहेबांचं..!

'प्रबोधन' पाक्षिकाच्या शताब्दीनिमित्तानं राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्यावतीनं 'प्रबोधनमधील प्रबोधनकार' या प्रबोधन पाक्षिकातल्या अग्रलेखाच्या तीन खंडाचं प्रकाशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते नुकतंच झालं. त्यावेळी आणि त्यापूर्वीही सत्ता होती घेतल्यानंतर वेळोवेळी त्यांनी 'आमचं हिंदुत्व हे प्रबोधनकारांचं आहे!' असं म्हणतानाच त्यांनी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आता आपल्या मूळ ध्वजाचा रंग बदलून भगवा केला आणिहिंदुत्व स्वीकारलंय हे दाखवून दिलं त्यावर टीका करताना त्यांनी 'नवंहिंदुत्व' स्वीकारल्याचे म्हटलं. उद्धव ठाकरे यांनी सत्ता हाती घेतल्यानंतर 'शिवसेनेनं हिंदुत्व सोडलं!' अशी टीका होत होती. उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याच्या निमित्तानं हिंदुत्वाचं दोन मार्ग दिसून आलं. एक प्रबोधनकारांचं जे उध्दव यांनी स्वीकारलंय तर दुसरं बाळासाहेबांचं जे राज ठाकरे यांनी स्वीकारलंय! आगामी काळात याच हिंदुत्वाची चर्चा सुरू राहील असं दिसतंय!
---------------------------------------------

उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि ‘शेंडी-जानव्याचं’ हिंदुत्व
प्रबोधनकार ठाकरे यांच्या लेखांच्या संग्रहाचं प्रकाशन करतांना उद्धव ठाकरे यांनी त्यांना अभिप्रेत असणारं हिंदुत्व काय आहे याचा पुनरुच्चार केला आणि त्यांच्या हिंदुत्वाचं मूळ 'प्रबोधनकारां'शी कसं जोडलेलं आहे हेही सांगितलं. प्रबोधनकार ठाकरे हे नास्तिक नव्हते, पण धर्माच्या नावावर चालणारी भोंदूगिरी त्यांना मान्य नव्हती असं सांगत सध्याचे इतर हिंदुत्ववादी आणि त्यांच्यात फरक कसा आहे हेही उद्धव यांनी सांगितलं. "हिंदुत्वाचा विचार एक असला तरी धारा वेगळ्या आहेत. म्हणजे आम्ही आणि दुसरे जे हिंदुत्ववादी आहेत. आमचं हिंदुत्व जे आहे ते नुसतं शेंडी-जानव्याचं हिंदुत्व नाही. नुसती घंटा वाजवली म्हणजे हिंदू झालो असं नाही," असं उद्धव ठाकरे म्हणाले. दुसरीकडं, उद्धव यांच्या भाषणाच्या दुसऱ्याच दिवशी साध्वी कांचनगिरी आणि महंत सूर्याचार्य या उत्तरेतून आलेल्या महंतांनी मुंबईत येऊन 'मनसे'प्रमुख राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. जुना आखाड्याशी संबंधित असणाऱ्या या महंतांची हिंदुराष्ट्राबद्धलची मतं जाहीर आहेत. 'राज हे हृदयातून हिंदू आहेत' असं कौतुक करतांनाच कांचनगिरी यांनी राज यांना अयोध्येत येण्याचं आमंत्रण दिलं आणि त्यानुसार गेल्या काही काळापासून हिंदुत्वाच्या राजकारणाकडं वळलेले राज काहीच दिवसांत अयोध्येचा दौरा करणार असल्याचंही वृत्त आहे. दोन ठाकरे बंधू आणि त्यांच्याशी संबंधित लागोपाठ घडलेल्या या दोन घटना. पण या दोन घटनांमधून, जसं उद्धव म्हणतात तसं, हिंदुत्वाच्या दोघांच्या धारा वेगवेगळ्या होत आहेत, असं दिसतंय का? प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या वारसासोबतच त्यांचे विचार आणि राजकारण यांच्यावरही दावा या दोघांकडूनही होत आला आहे. पण सध्याच्या देशातल्या हिंदुत्वाच्या राजकारणाच्या वाहत्या वाऱ्यांमध्ये या दोन नेत्यांच्या धारा बदलताहेत का?

बाळासाहेब ठाकरेंच्या काळातल्या शिवसेनेपेक्षा आताची शिवसेना मवाळ झालीय अशी टीका गेल्या काही काळात सतत उद्धव ठाकरेंना झेलावी लागलीय. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन केल्यावर तर शिवसेनेनं हिंदुत्व सोडलं अशी टीका भाजप आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांकडून सतत होत असते. प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब या दोघांचाही पिंड आक्रमक होता. पण प्रबोधनकारांची भूमिका ही समाज सुधारकाची होती. हिंदू धर्मातल्या अनिष्ट परंपरा, चालीरिती, जातीय निष्ठा यांच्यावर कठोर शब्दांत टीका करणाऱ्या विचारवंताची होती. जिथं ढोंग वा विरोधाभास दिसला तिथं प्रबोधनकारांनी प्रहार केला. बाळासाहेबांची भूमिका ही तशी राजकीय होती, आक्रमक हिंदुत्वाची होती. त्यांची भूमिका ही जहाल भाषेची, कधी वादग्रस्त, इतर धर्मियांविरुद्ध आक्रमक अशीही होती. आक्रमक हिंदुत्वाच्या याच भूमिकेनं त्यांना भाजपचा मित्र केलं. शिवसेनेची हिंदुत्वाची भूमिका सोडली या टीकेचा उद्धव ठाकरे यांनी सातत्यानं प्रतिवाद केलाय. 'हिंदुत्व शिवसेनेच्या रक्तात आहे' असंही सातत्यानं सांगितलंय. पण आता नव्या राजकीय रचनेच्या पार्श्वभूमीवर ते त्यांच्या हिंदुत्वाचीही नव्यानं मांडणी करतांना दिसताहेत. ती मांडणी प्रबोधनकार ठाकरेंच्या भूमिकेच्या अधिक जवळ जाणारी आहे असं निरिक्षण आहे. भाजपच्या हिंदुत्वापेक्षा ते वेगळं आहे हे दाखवण्याचाही तो प्रयत्न आहे. 'देश हाच माझा धर्म' असं दसरा मेळाव्याच्या आणि प्रबोधनकारांच्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमातही उद्धव म्हणाले. 'हिंदुराष्ट्रवादा'ची जी चर्चा सध्या देशभरामध्ये घडून येतेय तिच्या पार्श्वभूमीवर हे वाक्य महत्वाचं आहे. 'हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व' ही शिवसेनेनं आधीपासून घेतलेली भूमिका होती. मुस्लिमविरोधी किंवा द्वेषावर आधारित राजकारण करण्यापेक्षा सर्वांना जोडणारी वा सॉफ्ट हिंदुत्वाची भूमिका उद्धव घेतांना दिसत आहेत. इथं त्यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांच्या उदारमतवादी, सुधारणावादी विचारांचा आजच्या राजकारणात त्यांना उपयोग होतोय. जेव्हा कॉंग्रेसशी राजकीय आघाडी करण्याची वेळ आली तेव्हाही या विचारांची पूर्वपीठिका अगोदर तात्विक पातळीवर एकत्र येण्यासाठी कामी आली. हिंदुत्वाच्या धाग्यावरच दोन दशकांपेक्षा अधिक काळ मैत्री असलेल्या भाजपविरुद्ध आता राजकीय युद्ध लढतांना उद्धव ठाकरे विरोधकांसाठी 'नवहिंदू' अशी नवी व्याख्या करत आहेत. ही व्याख्या करत ते मूळ हिंदुत्वावर त्यांचाच दावा सांगताहेत. "मी दसरा मेळाव्याच्या भाषणात एक नवा शब्द उच्चारला, 'नवहिंदू' हा जो नवा प्रकार येतो आहे, तो खरा हिंदुत्वाला घातक आहे. प्रत्येक वेळेला मी म्हणेन तेच खरं, तेच बरोबर असं असेल तर ठीक आहे, पण ते पहिलं तुला ते कळलं आहे का? ते हत्ती आणि आंधळ्यांच्या कथेसारखं आहे. हत्तीचा कोणता भाग तुमच्या हाताला लागतो तसा तुम्हाला तो आहे असा वाटतो. पण ते तुमचं दुर्दैवं आहे, हत्तीचं नाही," असं उद्धव पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात म्हणाले. पण अशा हिंदुत्वाच्या धारेकडं जातांना "त्याच वेळेस 'दुसऱ्या धर्माचा कोणी मस्ती घेऊन माझ्यासमोर उभा राहिला तर देशाभिमानी कडवट हिंदू म्हणून त्याच्यासमोर उभं राहण्याशिवाय मला पर्याय नाही" असं म्हणत उद्धव ठाकरे आक्रमकता कमी झाली नाही हेही सांगण्याच्या प्रयत्न करताहेत. मुंबईतल्या दंगलींच्या काळात शिवसेनेनं काय भूमिका घेतली होती याची आठवणही करुन देतात.

हिंदुत्वाची अशी मांडणी आणि नवी राजकीय भूमिका त्यांना बाळासाहेबांपेक्षा प्रबोधनकारांच्या जवळ नेते आहे असं म्हटलं जातंय याची जाणीव उद्धव ठाकरेंना आहे. पण बाळासाहेबांपासून ती दूर नेणारी नाही हेही ते सांगताहेत. "अनेक जण असं म्हणतात की उद्धव ठाकरे यांनी आता प्रबोधनकारांचं हिंदुत्व घेतलं आहे. पण तसं नाही आहे. जो मधला मोठा काळ बाळासाहेबांचा आहे, ते विचार घेऊन आम्ही पुढे जात आहोत," उद्धव म्हणाले. उद्धव यांची नवी भूमिका सध्याच्या राजकीय स्थितीत उपयोगाची ठरते आहे असं राजकीय निरीक्षकांना वाटतं. जेव्हा महाविकास आघाडी बनत होती, तेव्हा कॉंग्रेसच्या राज्यातल्या नेत्यांना सोनिया गांधींनी भिंतीवरचे नेहरु, गांधी यांचे फोटो दाखवून विचारलं होतं की शिवसेनेबरोबर गेलो तर यांना मी काय उत्तरं देऊ? तेव्हा बाळासाहेब थोरातांनी त्यांना प्रबोधनकार ठाकरेंबद्धल सांगितलं होतं आणि त्यांचा वारसा उद्धव पुढे नेऊ शकतील असं म्हटलं होतं. आपण आजची उद्धव यांची भाषणं आणि वक्तव्यं पाहिली, तर तोच धागा आपल्याला दिसेल, आपल्या वडिलांच्या भूमिकेपासून फारकत घेऊन नवी मांडणी ते करताहेत. प्रसंगी रा. स्व. संघावरही टीका करताहेत. असं अगोदर त्यांनी केलं नव्हतं. एका प्रकारे ते स्वत: उत्क्रांत करताहेत. महाराष्ट्राबरोबर भारतातही त्यांना महत्त्व येतं आहे. भाजपविरोधी जे पक्ष आहेत, त्यांना वाटतं की भाजपच्या हिंदुत्वाला उत्तर देण्यासाठी उद्धव योग्य आहेत. त्यामुळं त्यांच्याकडं दोन वारसे आहेत. एक प्रबोधनकारांचा, आणि एक बाळासाहेबांचा! आवश्यक राजकीय स्थितीनुसार उद्धव त्याचा वापर करताहेत.

राज यांचं हिंदुत्व; शिवसेनेच्या जवळचं की भाजपच्या?
उद्धव ठाकरेंनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी केल्यावर आक्रमक हिंदुत्वाची जी शिवसेनेची पॉलिटिकल स्पेस होती ती राज ठाकरे आणि त्यांची 'मनसे' घेऊ शकते असं म्हटलं जाऊ शकतं. राज ठाकरेंनी पावलंही त्या दिशेनं टाकली आहेत. पक्षाचा झेंडा बदलण्यापासून भाजपशी बोलणी करण्यापर्यंत हालचाली मनसेच्या गोटात सुरू झाल्यात. आक्रमक राजकीय हिंदुत्वाकडं मनसे झुकू लागलीय हे दिसू लागलंय. म्हणजेच, जी हिंदुत्वाची दुसरी धारा आहे, त्याकडं राज ठाकरे चालले आहेत! राज ठाकरेंनी वर्षभरापूर्वी त्यांच्या पक्षाचा झेंडा पूर्णपणे भगवा रंगाचा करुन हिंदुत्वाच्या राजकारणाकडं जाण्याअगोदरही काही त्याला पूरक आक्रमक भूमिका घेतल्या होत्या. मुंबईतल्या अवैध बांगलादेशी नागरिकांबद्धल ते सातत्यानं बोलत होते, मोहिमा राबवत होते. त्याअगोदर जेव्हा रझा अकादमीबाबत मुंबईत जी घटना घडली होती, तेव्हा राज यांनी आक्रमक आंदोलन केलं होतं, मोर्चाही काढला होता. पण तेव्हा त्यांच्या राजकारणाकडं हिंदुत्वाकडं झुकलेलं राजकारण असं म्हटलं गेलं नव्हतं. पण २०२० च्या सुरुवातीला ध्वजबदलापासून राज यांनी हिंदुत्ववादी भूमिका घेतली. त्यांच्या भाषणांमध्येही तशी भूमिका दिसली. जेव्हा कोरोनाच्या काळात लॉकडाऊननंतर एकेक गोष्टी खुल्या होऊ लागल्या, पण मंदिरं बंद ठेवली गेली, तेव्हा मनसेनं सरकारविरुद्ध भूमिका घेतली. आंदोलनं केली. गेल्या काही काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद या संघटनांच्या नेत्यांनीही राज ठाकरे यांच्या भेटी घेतल्या आहेत. आता साध्वी कांचनगिरी आणि महंत सूर्याचार्य हेही त्यांना भेटायला आले. राज ठाकरे यांना अयोध्येचंही आमंत्रण आहे. पण राज यांचं हे हिंदुत्वाच्या दिशेनं जाणं हे भाजपच्या जवळ जाण्यासाठी आहे असं म्हटलं जातं आहे. भाजप नेते आणि मनसे यांच्यात युती होण्याबद्धल सध्या सतत चर्चा सुरु आहेत. महापालिका निवडणुकांपूर्वी ही युती होऊ शकते असं म्हटलं जातंय. त्यामुळं हिंदुत्वाची एक धारा जशी उद्धव यांना कॉंग्रेस आणि इतर पक्षांच्या जवळ नेते आहे, तशी दुसरी धारा राज यांना भाजपच्या जवळ नेते आहे, असं चित्रं आहे. पण हे हिंदुत्व राज यांना बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या अधिक जवळ नेईल का? बाळासाहेबांच्या भाषणातली आक्रमकता राज यांच्याकडं आहे, पण हिंदुत्वाबद्धल बोलतांना, काही अल्पसंख्याक समुदायांबद्धल बोलतांना जसं बाळासाहेब बोलले, तसं अद्याप राज बोलले नाहीत. आक्रमक राजकीय हिंदुत्वाची पॉलिटिकल स्पेस जी राज घेऊ शकतील असं म्हटलं जातं आहे, ती भाजपा सोडेल का, असेही प्रश्न आहेत.

राज त्यांचं नेतृत्व सिद्ध करण्यासाठी काही प्रयोग करताहेत. लोकसभा निवडणुकीच्यावेळी त्यांनी भाजप आणि मोदींवर कडाडून टीका केली होती. त्यांच्या योजनांचे वाभाडे काढले होते. त्यावेळी असं वाटत होतं की, ते कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या जवळ जाताहेत, आता पुन्हा भाजपाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करताहेत. त्यासाठी आता ते हिंदुत्वाचे बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याचा प्रयत्न करताहेत. पण एक आहे की घराण्याचा आणि पक्षाचा वारसदार म्हणून उद्धव यांना लोकांनी स्वीकारलं आहे. त्यामुळं आता राज यांचा हा हिंदुत्वाचा प्रयत्न किती यशस्वी होतो ते पहावं लागेल. इथं एक गोष्ट स्पष्ट आहे की जोपर्यंत मनसेचं इंजिन हिंदुत्वाच्या ब्रॉडगेजवर जात नाही तोपर्यंत भाजप काही युती करणार नाही. त्यामुळं राज ठाकरेंकडून ते प्रयत्न आता होतांना पहायला मिळताहेत. पण बाळासाहेबांचा करिश्मा, मुख्य म्हणजे त्याकाळाची राजकीय परिस्थिती पाहता, त्यांना जे जमलं ते आज राज यांना जमेल का हा प्रश्न आहे. पण त्यापेक्षा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हिंदुत्वापुर्वी बाळासाहेबांनी दक्षिण भारतीयांविरुद्ध आंदोलन केलं होतं. त्या काळात भाजपाचं दक्षिणेतलं अस्तित्व जवळपास नव्हतं. त्यामुळं तेव्हा शिवसेनेबरोबर युती करतांना भाजपाला दक्षिण भारतीयांच्या नाराजीची अडचण नव्हती. पण राज यांचं आंदोलन उत्तर भारतीयांविरोधात होतं आणि आज भाजपला उत्तर भारतात कुठलीही नाराजी परवडणारी नाही. त्यामुळं हिंदुत्वापेक्षा या मुद्द्यावर राज यांच्याशी युती करतांना त्यांना खूप विचार करावा लागेल. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यासाठी हिंदुत्वाचा मुद्दा वारसा आणि विचारधारांचा असला तरीही सध्याच्या वर्तमान राजकीय स्थितीचा अधिक आहे. त्या स्थितीनुसारच त्यांची भूमिका आणि निर्णय तोलला जाणार आहे. उद्धव यांच्याकडं प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांचा तर राज ठाकरे यांच्याकडं बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा येतोय असं दिसतंय!
हरीश केंची,
९४२२३१०६०९

No comments:

Post a Comment

लोकशाही की एकाधिकारशाही...!

"देशात लोकशाहीचा उत्सव सुरू आहे, पण सत्ताधारी  लोकशाही संसदीय ऐवजी अध्यक्षीय असल्यासारखे वागताहेत. सामूहिक नेतृत्व सांगणारा...