Saturday 4 July 2020

नेहरूं आणि इंदिराजी...!

"गेली सहावर्षे सतत भारतीय जनता पार्टीनं नेहरू आणि इंदिरा गांधी पर्यायानं काँग्रेसवर टीकास्त्र सोडलेलं आहे. देशातल्या प्रत्येक समस्यांना नेहरूंचं धोरण जबाबदार आहे असं म्हणत जनतेच्या मनातली नेहरूंची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न चालवलाय. नेहरूंची आंतरराष्ट्रीय धोरणं, विकासाच्या विविध योजनांनी भारताला एक प्रगत राष्ट्र म्हणून जगात सन्मानानं उभं राहता आलंय हे विसरता कामा नये. इंदिरा गांधींनी नेहरूंची धोरणं राबवितच एक सक्षम आणि सदृढ राष्ट्र म्हणून देशाची ओळख निर्माण केलीय. पण दुसऱ्याची रेघ पुसून आपली रेघ मोठी करण्या
चा प्रयत्न जो चालवलाय तो यशस्वी होणार नाही. कारण नेहरूंच्या धोरणांनीच देशाला जागतिक राजकारणात वाटचाल करावी लागणार आहे. तेव्हा नेहरू-इंदिरा यांच्यावर टीका, टिंगलटवाळी न करता त्यांना समजून घेतलं, जाणून घेतलं तर देशाची वाटचाल अधिक गतीनं होईल!"
------------------------------------------------------------------


*भा* रताचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांचं बहुचर्चित पुस्तक 'लेटर्स फ्रॉम फादर टू हिज डॉटर.…!' या पुस्तकाचा हिंदी अनुवाद प्रेमचंद यांनी केलंय. हे वाचल्यानंतर सध्या जे नेहरूंवर टीका करताहेत त्यांची कीव करावीशी वाटते. त्यांचा रागही येतो. अशा संवेदनशील, धोरणी, प्रगतिशील, देशाच्या विकासात झोकून घेणाऱ्या प्रधानमंत्र्याचं विशेष कौतुक करावंसं वाटतं. पण सध्या त्यांच्यावर आकसाने जी वक्तव्य केली जाताहेत त्यानं खरं तर वाईट वाटतं. हे पुस्तक पं. नेहरूंनी आपली कन्या इंदिरा प्रियदर्शनी हिला लिहिलेल्या पत्रांवर आधारित आहे. ही जी पत्रं लिहली आहेत त्यावेळी तिचं वय जवळपास दहा वर्षाचं होतं. त्या पुस्तकात नेहरूंनी लिहिलंय, "तू जेव्हा माझ्यासोबत असतेस तेव्हा सतत प्रश्न विचारून तू मला भंडावून सोडतेस; अशावेळी तुझ्या प्रश्नांना मी माझ्यापरीनं उत्तरं देण्याचा प्रयत्न करतो. पण आता तू मसुरीत आहेस आणि मी अलाहाबाद इथं आहे. त्यामुळं पूर्वीसारखं आपण एकमेकांशी प्रत्यक्ष बोलू शकत नाही. तू प्रश्न विचारू शकत नाहीस आणि मी उत्तरं देऊ शकत नाही. तेव्हा मी आता असं ठरवलंय की, कधी मधी तुझ्याशी पत्रांद्वारा संवाद साधू शकेन. तुला जगातल्या अनेक लहानमोठ्या गोष्टी कळविन. जगाच्या पाठीवर जी छोटी-मोठी राष्ट्रे आहेत त्यांची ओळख तुला लहान लहान गोष्टींच्या माध्यमातून लिहून करून देईन." ते पुढे लिहतात, "तू हिंदुस्थान आणि इंग्लंडमधील सध्याच्या घडामोडी इतिहासात वाचल्या असशील. परंतु इंग्लंड हा एक छोटासा भूभाग-टापू आहे तर हिंदुस्थान जो एक विशाल, मोठा खंडप्राय देश आहे, असं असलं तरी जगाच्यादृष्टीनं तो एक छोटासा भाग आहे. जर तुला जगाची माहिती घेण्याची इच्छा असेल तर, तुला या सर्व देशांचा आणि त्या सर्व जातींचा जे या देशात वास्तव्य करतात, त्यांचीही माहिती घेणं, त्यांच्या समस्यांकडं सहानुभूतीनं पाहावं लागेल; केवळ त्या एका छोट्याशा देशाचाच नव्हे ज्या देशात तुझा जन्म झालाय! मला माहिती आहे की, या अशा छोट्या छोट्या पत्रातून खूपच त्रोटक माहिती तुला देऊ शकेन. पण मला आशा वाटते की, या थोड्या छोट्याशा माहितीची पत्रंही तू उत्सुकतेनं वाचशील आणि समजशील की, जग हे एक आहे, आणि त्यात जे सर्व लोक राहतात ते आपले बांधव आहेत. तू जेव्हा मोठी होशील तेव्हा जगाला आणि त्यातल्या लोकांना मोठमोठ्या पुस्तकांतून, ग्रंथातून पाहशील, वाचशील. त्यात तुला इतका आनंद मिळेल की, तो इतर कुठल्याही कथा-कादंबऱ्यातून मिळणार नाही!"

*परदेशी बाहुली जाळून टाकली*
इंदिराजींच्या लहानपणीच्या आठवणींमध्ये पहिली आठवण आहे ती घरातील परदेशी भरजरी वस्त्रं जाळून टाकल्याची. जाळण्यासाठी कपड्यांचा ढिगारा करण्यात आला होता. तो त्यांना बघायचा होता म्हणून त्यांनी आजोबांकडे विनवणी केली आणि आजोबा त्यांना तिथं घेऊन गेले. एकदा कोणीतरी त्यांच्यासाठी पॅरिसवरून भरजरी वस्त्रं आणली होती. पण आम्ही केवळ खादी वापरतो, असं सांगून त्यांच्या आई कमला नेहरूंनी ती परत केली. आईनं त्यांना विचारले की, ‘‘इंदू, तुझ्यासाठी ही भेट आणली आहे. तुला हवी असेल तर ती तू स्वीकारू शकतेस. पण तो कपड्यांचा ढिगारा आठव ज्यात परदेशी कपडे जाळून टाकले होते. आम्ही सारे खादी वापरत असताना तुला हे कपडे वापरायचे आहेत का?’’ तेव्हा छोटय़ा इंदूनं त्यास नकार दिला. त्यावर आलेली पाहुणी म्हणाली, ‘‘मग तू परदेशी बाहुली वापरतेस तिचं काय?’’ ती बाहुली इंदिराजींची आवडती होती. तरी त्यांनी ती गच्चीवर नेऊन जाळून टाकली.

*राष्ट्रपुरुषांची चरित्रे वाचून भारावून जात*
इंदिराजींचे आजोबा पं. मोतीलाल नेहरू आणि वडील जवाहरलाल हे दोघेही राजकारणात सक्रिय होते. इंदिराजी चार वर्षांच्या असताना या दोघांना तुरुंगात टाकण्यात आले. काँग्रेसच्या नियमाप्रमाणे त्यांनी दंड न भरल्यामुळे घरातील फर्निचर न्यायला पोलीस आले. इंदिराजींची लहान असतानाची ‘आनंदभवन’ची ही आठवण. ‘आनंदभवन’ या ४८ खोल्या असलेल्या प्रचंड मोठ्या घरात त्या राहत होत्या. बालपणीच राजकारणाची त्यांना ओळख झाली. काँग्रेसनं देशभर आंदोलन केले तेव्हा त्यांनीही स्वत:ची ‘वानरसेना’ काढली. पं. नेहरूंनी त्यांना पत्रात गमतीनं लिहिलं की, ‘या वानरसेनेतल्या सर्वानी शेपट्या लावाव्यात आणि अधिकारानुसार शेपट्याची लांबी कमी-जास्त व्हावी!’ वानरसेनेचे प्रमुख असलेल्या इंदिराजींचं वेळापत्रक पुपुल जयकर यांनी त्यांच्या चरित्रात दिलंय. ते वाचताना कळतं, की त्याही काळात त्या किती व्यग्र असत. अलाहाबादमधल्या रोमन कॅथलिक शाळेत त्या शिकत होत्या. ज्यात प्रामुख्यानं ब्रिटिशधार्जिणी मंडळी होती. या मंडळींना भारतीय सण आवडत नसत. पुढं इंदिराजींचं शिक्षण शांतिनिकेतनमध्ये करावं का, असा प्रश्न पं. नेहरूंनी आपल्या केंब्रिजमधल्या एका सहकाऱ्याला पत्रातून विचारला. त्यावर त्याचं उत्तर आलं की, आधी तिला जहांगीर वकील आणि त्यांच्या पत्नीनं चालवलेल्या पुण्यातील ‘चिल्ड्रन्स ओन स्कूल’मध्ये पाठवावं. या शाळेत त्यांना टाकण्यात आलं. मात्र, तिथं त्यांना एकाकी वाटू लागले. कारण ‘आनंदभवन’मध्ये त्यांची स्वत:ची वेगळी खोली होती, तर इथे त्यांना अन्य मुलांच्यात राहावं लागत होतं. इंदिराजींवर उत्तम वाङ्मयाचे संस्कार जवाहरलालनी केलं. ‘अ‍ॅलीस इन वंडरलँड’पासून गॅरीबाल्डीच्या चरित्रापर्यंत अनेक पुस्तकं त्यांना वाचायला दिली. टेनिसनची ‘इन मेमोरियम’ ही कविता त्यांची आवडती होती. राष्ट्रपुरुषांची चरित्रे वाचताना त्या भारावून जात. त्याचा खोलवर संस्कार त्यांच्यावर झाला. पुण्यातील शाळेत १९३२ साली त्या दाखल झाल्या. १९३४ साली मॅट्रिक झाल्यावर त्या शांतिनिकेतनला गेल्या.

*पत्रातून इंदिराजींवर राष्ट्रीय संस्कार*
या पुस्तकातील नेहरूंची पत्रं पाहिली की, नेहरूंची रचनाधर्मीता, कल्पनाशीलता, दूरदृष्टी आणि सर्वसमावेशक वृत्ती याचा अंदाज येतो. ते किती साधे, सरळ आणि उच्च विचार करणारे होते हे दिसून येतं. आज त्यांच्याबाबत जे काही बोललं जातंय, नको ती बडबड केली जातेय. ते बोलणाऱ्यांनी आधी त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करावा. नेहरूंचं व्यक्तिमत्व हे एखाद्या ग्रंथापेक्षा कमी नाही. ज्या कुणी नेहरूंना समजून घेतलंय, त्यांचा आचार-विचार पाहिलाय अशांची जगण्याची पद्धतच बदलून गेलीय! हे इथं नमूद करायला हवंय! इंदिराजींना लिहलेल्या आपल्या पत्रांच्या साहाय्यानं नेहरूंनी एका प्रसंगात सांगितलं आहे की, ' जगातल्या देशांचा इतिहास वाचायला लागशील तेव्हा लक्षात येईल तेव्हा सर्व मोठमोठ्या कामांची, वस्तुस्थितीची माहिती मिळेल, जी चीननं, रशियानं केली आहेत. त्याकाळी युरोपात जंगली आदिवासी लोक असत. तुला हिंदुस्तानच्या त्या वैभवशाली कालखंडाचीही माहिती मिळेल ज्यावेळी रामायण आणि महाभारत लिहिलं गेलं, आणि तुझ्या लक्षांत येईल की, हिंदुस्थान हा किती बलवान आणि धनवान देश होता. आज आपला देश खूप गरीब आहे आणि एक विदेशी जातीचे लोक आपल्यावर राज्य करीत आहेत. आम्ही आमच्याच देशात स्वतंत्र नाही आहोत, जे काही आम्ही करू इच्छितो आहोत ते करू शकत नाहीए. पण अशी परिस्थिती आमच्यवर कधी कायमरित्या नव्हती. जर आम्ही एकत्रितपणे स्वातंत्र्यासाठी झगडू तर आपला देश पुन्हा एकदा स्वतंत्र होऊ शकतो. ज्याआधारे आम्ही आमच्या देशातील गरिबांची स्थिती बदलू शकतो आणि त्यांना भारतात राहणं सुसह्य होईल जसं की, युरोपातील काही देशात लोक राहताहेत!"

*पत्रातून आपल्या मुलीशी नेहरूंचा संवाद*
सध्याच्या वातावरणात नेहरू यांच्यासारख्या नेत्याची आज देशाला मोठी गरज आहे. पण आजच्या या त्यांच्याबद्धलच्या नकारात्मक वातावरणात हे सहज शक्य नाहीये. आज देशात नेहरूंच्या नेतृत्वगुणांच्या जवळपास जाणारा नेता दिसत नाही, पण अशीच माणसं आज नेहरूंवर टीकाटिपणी करताहेत की, ज्यांनी कधी नेहरूंना समजूनच घेतलं नाही. आज देशात जो विकास झालाय त्याची पायाभरणी नेहरूंनी केलीय, हे विसरता कामा नये. नेहरुंची दूरदृष्टी हीच आजच्या हिंदुस्थानच्या या या विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी सहाय्यभूत आणि कारणीभूत ठरलेली आहे. आजचे काही नेते नेहरूंना ते अहंकारी आणि घमंडी असल्याची टीका करतात. पण त्यांना हे माहीत नाही की नेहमीसारखं बनण्यासाठी त्यांना किती मेहनत घ्यावी लागेल. नेहरूंचे सचिव असलेले एम.ओ.मथाई यांनी आपल्या पुस्तकात 'रेमिनीसेन्सेस ऑफ नेहरू' यात लिहिलंय की 'नेहरू इतके सुसंस्कृत होते की त्यांना अहंकारी म्हणणं त्यांच्यावर अन्याय करणारं ठरू शकतं. पण त्यांना कुठल्या गोष्टीचा धीर धरता येत नव्हता, ते आपल्या उद्दिष्टासाठी अधीर असत. त्याचबरोबर मूर्खांना ते आपल्याजवळही उभं करत नसत. त्यांना सहन करत नव्हते. त्यामुळंच अशी मंडळी त्यांच्यावर टीका करीत!'

*नेहरूंचे किस्से*
नेहरूंच्या रागाबद्धल माजी परराष्ट्रमंत्री नटवरसिंह यांनी एक किस्सा सांगितला होता. 'एकदा नेहरू त्यांच्यावर एका गोष्टीवरून खूपच रागावले होते, त्यांनी माझी खरडपट्टी काढली होती. त्याच कारणही तसंच होतं. नेहरूंनी नेपाळचे नरेश महेंद्रना लिहलेलं एक पत्र परराष्ट्र मंत्रालयातील मुख्यसचिवांना न दाखवता आपण ते आपल्या कपाटातच ठेऊन दिलं होतं. त्यावेळी नटवरसिंह हे मुख्यसचिवांचे सहाय्यक होते. ते आठवून सांगतात की, संध्याकाळी साडेसहा वाजता नेहरूंचं नेपाळ नरेश महेंद्र यांना लिहिलेलं पत्र माझ्याक विमानाला उशीर झाला. मुख्यसचिव परदेश दौऱ्यावर गेल्यानं ते त्यांना दाखवलं गेलं नाही. साहजिकच ते नेपाळ नरेशापर्यंत पोहोचलं नाही!" नेहरुंच्या कालखंडातील एक ज्येष्ठ पत्रकार, संपादक राजेंद्र माथूर यांनी आपल्या 'बगावती शिष्यतंत्र' या लेखात लिहिलंय की, 'नेहरूंसारखा सैनिक महात्मा गांधींना त्यांच्या स्वातंत्र्यलढ्यात मिळाला नसता तर, १९२७-२८ नंतर भारतातील तरुणांना त्यांच्या बंडखोरवृत्तीतून आणि नाराज वातावरणातून गांधीजींच्या आंदोलनात खेचून आणण्याचं काम नेहरूंशिवाय कुणीच केलं नव्हतं. नेहरूंनी त्या सर्व तरुणांना एकत्र केलं होतं की, जे गांधीजींच्या भूमिकेवरून, त्यांच्या कार्यपद्धतीवरून नाराज झाले होते. त्यांनी तीसच्या दशकातील त्या तरुणांना सावरलं होतं. त्याकाळात बालकेशिव क्रांतीनं प्रभावित होऊन काँग्रेसमधल्या शांतवृत्तीच्या कार्यकर्त्यांना एक हत्यार बनविण्याचा विचार करीत होते. पण नेहरूंनी हे सारं काम काँग्रेसच्या कार्यपद्धतीत, केमिस्ट्रीत राहून त्याचा सन्मान करीत केलं होतं. जर १९३२-३३ मध्ये सनकी लोहियावादींप्रमाणे वागले असते आणि आपली वेगळी समाजवादी पार्टी बनवून गांधीजींशी असलेलं नातं तोडलं असतं तर सुभाषचंद्र बोस यांच्यासारखं तोडले गेले असते. त्यानं समाजवादाचं त्यात काही भलं झालं नसत. हो पण गांधीजींची फौज नक्कीच कमकुवत झाली असती! गांधीजींशी असहमत असतानाही नेहरूंनी गांधींजीसमोर आत्मसमर्पण केलं, कारण आपल्याला समजून येऊ न शकणाऱ्या जादूसमोर व्यक्त केला जाणारा भारतीय भक्तिभाव नेहरूंमध्ये शिल्लक होता. आपल्या सतत बिघडणाऱ्या पण आवडत्या शिष्याला समजून घेणं, त्यांचं लाड करणं हे गांधीजींना येत होतं. हे सारे प्रांग इथं यासाठी उद्धृत करतोय की, नेहरूंबद्धल त्यांना जाणून घेण्याची जिज्ञासा लोकांमध्ये वाढीला लागावी. सध्याच्या राजकारण्यांकडून नेहरूंची जेली जाणारी बदनामी, त्यांच्याबाबत केला जाणार अपप्रचार यामुळं नेहरूंबद्धल त्यांचा गैरसमज होऊ नये. नेहरूंना समजून घ्या जाणून घ्या....!

*इंदिराजींनी कामाचा ठसा उमटविला*
इंदिराजीकडे जे लोक केवळ नेहरूंची मुलगी म्हणून पाहतात. कारण त्यांना घराणेशाहीचा आरोप नेहरूंवर करायचा असतो. तर काही प्रखर लोकशाहीवादी जवाहरलाल नेहरूंच्या विचारांना तिलांजल्या देणाऱ्या वृत्तीच्या नेत्या म्हणूनही पाहतात आणि पुन्हा घराणेशाहीचा आरोपही करतात. आपल्या वडिलांनी काँग्रेससाठी कार्य केले देशासाठी कारावास भोगला म्हणून नेहरूंच्या त्याच कर्तृत्वावर त्या स्वार झाल्या, असं म्हणणाऱ्या अनेकांना हे माहीत नसते की त्यांनी स्वतंत्रपणे अडीच वर्षे कारावास भोगला आहे. नेहरू स्वातंत्र्यसंग्रामात वयाच्या २७व्या वर्षी आले. मात्र इंदिराजींचा सहभाग हा वयाच्या १३व्या वर्षापासून आहे. त्यांचं बालपणदेखील स्वातंत्र्यसंग्रामात होरपळून निघालेले आहे. नेहरूंनी आयुष्याच्या सुरुवातीचा एक कालखंड तरी सुखात काढला, पण इंदिरेने बालवयातही पारतंत्र्याच्या झळा सोसल्या आहेत. हजारो भारतीयांचे कल्याण पाहणाऱ्या बापाचा सहवास एक बाप म्हणून त्यांना कधीच मिळाला नाही. विशेष म्हणजे नेहरूंच्या हयातीत इंदिराजी ना राज्यसभेच्या सदस्य होत्या ना लोकसभेच्या! त्यातूनच विलक्षण असे धाडसी व्यक्तिमत्व तयार झाले आहे. ज्याचा ठसा त्यांनी भारतीय अथवा भारतीय उपखंड नव्हेतर जगाच्या राजकारणावर निडरपणे उमटवलेला आहे.
हरीश केंची
९४२२३१०६०९




1 comment:

लोकशाही की एकाधिकारशाही...!

"देशात लोकशाहीचा उत्सव सुरू आहे, पण सत्ताधारी  लोकशाही संसदीय ऐवजी अध्यक्षीय असल्यासारखे वागताहेत. सामूहिक नेतृत्व सांगणारा...