Friday 17 July 2020

नेहरूंची निवड : वास्तव आणि इतिहास

"संसदेत ३७० कलमावर बोलताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले की, "स्वातंत्र्यानंतर जवाहरलाल नेहरूंऐवजी वल्लभभाई पटेल यांना प्रधानमंत्री बनवलं गेलं असतं तर देशाचं चित्र वेगळं असतं...!" मोदी वा इतर भाजपेयीं नेते देशातल्या प्रत्येक समस्येला नेहरूंना जबाबदार धरत त्यांच्यावर टीका करतात. पण संविधानातल्या लोकशाही मूल्यांसाठी म्हणजे धर्मनिरपेक्षता, व्यक्तिस्वातंत्र्य, विज्ञाननिष्ठा, तंत्रज्ञानातील स्वयंपूर्णता-आत्मनिर्भरता यासाठी नेहरू आयुष्यभर झटले. भारतीयत्वाची आणि पर्यायानं भारताची आजची ओळख जगासमोर निर्माण करण्यात नेहरूंचा मोठा वाटा आहे. भारताला हिंदुराष्ट्र करण्याची सत्ताधाऱ्यांची मनीषा आहे. पण जोवर नेहरूंनीतीचा प्रभाव जनमानसावर आहे तोवर हे शक्य नाही म्हणून पदोपदी नेहरूंचा उद्धार केला जातोय. स्वातंत्र्योत्तर काळात तत्कालीन परिस्थितीत नेहरूंची केलेली निवड ही केवळ महात्मा गांधीजींनीच केली असं नव्हे तर रवींद्रनाथ टागोर, भगतसिंह, सुभाषचंद्र बोस, मौलाना आझाद यांचीही पसंती नेहरुच होते. त्या निर्णयाचं समर्थन खुद्द वल्लभभाई पटेल आणि गव्हर्नर जनरल सी.राजगोपालाचारी यांनीही केलं होतं. त्यामुळं सध्या नेहरूंवर केले जाणारे हल्ले म्हणजे हे त्या सगळ्यांवर केले जाणारे हल्ले आहेत! अगदी वल्लभभाई यांच्यावरही! पण हे सारं लक्षांत कोण घेतो? नेहरूंबाबत भ्रम निर्माण करून नव्यापिढीच्यासमोर त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न 'भक्तां'कडून केला जातोय. नेहरूंची निवड कधी, कशी आणि का झाली याचा घेतलेला हा धांडोळा!"
------------------------------------------------------------


*पं* डित जवाहरलाल नेहरू यांनी एकदा डॉ. राजेंद्रप्रसाद यांना लिहिलेल्या एका पत्रात त्या पांच जणांची नावं नमूद केली होती, जी महात्मा गांधींच्या अत्यंत जवळ होते. त्या दोघांशिवाय सी. राजगोपालाचारी म्हणजेच राजाजी, सरदार वल्लभभाई पटेल आणि मौलाना अबुल कलाम आझाद हे देखील गांधीजींचे अत्यंत विश्वासू सहकारी होते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या काळात भारताचं नेतृत्व करण्यासाठी केवळ नेहरू हेच एकमेव पर्याय होते का? असा प्रश्न काही दशकापासून भारतीय बुद्धिजीवी लोकांना सतत भेडसावत होता. माजी प्रधानमंत्री डॉ. मनमोहनसिंह यांच्यासमवेत एकाच व्यासपीठावर आलेल्या तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री आणि विद्यमान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यावेळी असं मत व्यक्त केलं होतं की, "देशांत कायमच एक तक्रार केली जातेय, देशाला ही एक वेदना राहिलीय, प्रत्येक देशवासियांच्या मनांत शल्य सलतं आहे की, स्वातंत्र्यानंतर नेहरूंऐवजी जर देशाचे प्रधानमंत्री सरदार वल्लभभाई पटेल झाले असते तर, देशाची प्रतिमा वेगळी बनली असती, देशाचं चित्रं वेगळं दिसलं असतं, शिवाय देशाचं नशीबही वेगळं असतं!" त्यांच्या या वक्तव्यानं काँग्रेसच्या, नेहरुवाद्यांमध्ये जणू भूकंप आला असं काही नाही. हे काही नवं वक्तव्य नव्हतं, यापूर्वीही अशी वक्तव्य अनेकदा केली गेली होती! प्रारंभी नेहरूंनी लिहिलेल्या ज्या पत्राचा उल्लेख केलाय, त्यात ज्या पांच नेत्यांचा गांधीजींचे निकटवर्तीय सहकारी म्हणून म्हटलंय. त्या प्रत्येकाशी गांधींनी नेहरूंना आपला उत्तराधिकारी नेमण्यापूर्वी चर्चा केली होती. याशिवाय त्या प्रत्येकाचा त्यादृष्टीनं विचारही केला होता. त्या परिस्थितीत या प्रत्येकाचं मूल्यमापन कसं झालं होतं, नेहरूंची निवड कशी झाली याचं विश्लेषण करू या.

*गांधीजींची आवड राजाजीही होते*
जवळपास ४० वर्षांपूर्वी, सी. राजगोपालाचारी जे भारताचे अखेरचे गव्हर्नर जनरल होते. ते जवाहरलाल नेहरू आणि वल्लभभाई पटेल यांचे स्वातंत्र्यलढ्यातील सहकारीही होते. त्यांनी नेहरू-पटेल यांच्याबद्धल आपल्या नियतकालिकेत 'स्वराज्य' मध्ये सविस्तरपणे लिहिलंय. राजाजींनी त्यात म्हणतात," मलाही निःसंदेहपणे असंच वाटत होतं की, जवाहरलाल नेहरूंना परराष्ट्रमंत्री आणि वल्लभभाई पटेलांना प्रधानमंत्री म्हणून जबाबदारी द्यायला हवीय. पण मला असं वाटत असलं तरी एकूण राजकीय परिस्थिती आणि त्यातील त्रुटी पाहता जवाहरलाल नेहरु हे त्या दोघांमध्ये अधिक प्रबुद्ध व्यक्ती होते. त्यामुळं नेहरू प्रधानमंत्री होणं हे देशाच्या दृष्टीनं श्रेयस्कर ठरलंय!" (स्वराज्य दि. २७ नोव्हे.१९७१) जर आपण इतिहासाची पानं उलटली अन त्याचा सखोल अभ्यास केला तर, नरेंद्र मोदी आणि राजाजी यांचं आकलन, मतं आणि दावा उलटून टाकू शकतो. आपल्यासमोर इतिहासाची एक वेगळी प्रतिमा दिसून येते. महात्मा गांधीजींनी सर्वप्रथम राजाजींना आपला उत्तराधिकारीच्या रुपात १९२७ मध्ये पाहिलं होतं. त्यांनी स्पष्टपणे म्हटलं होतं की, " माझे सी. राजगोपालाचारी हे एकमात्र संभावित उत्तराधिकारी आहेत!" ते वर्ष असं होतं की, महात्मा गांधी यांचे पुत्र देवदास आणि राजाजींची कन्या लक्ष्मी हे लग्न करणार होते. याची त्या दोन्ही नेत्यांना कल्पना होती. देवदास आणि लक्ष्मी या दोघांच्या वडिलांनी आपल्या मुलांना आपलं प्रेम सिद्ध करण्याबाबत सांगितलं होतं. पण त्यांच्या लग्नाच्या प्रस्तावाला नकारही दिला नाही. जर हा विवाह झाला असता तर राजाजी हे गांधी परिवाराशी संलग्न झाले असते. त्यावेळी गांधीजींनी राजाजींना आपला उत्तराधिकारी नेमलं तर आपण आपल्याच परिवारातल्या एका सदस्यालाच नेमलं असा अर्थ काढला गेला असता, ते गांधीजींना नको होतं. याशिवाय भारतातल्या बहुसंख्य लोकांची बोलीभाषा ही हिंदी आहे आणि राजाजींना हिंदी फारसं चांगलं येत नव्हतं ही देखील एक मोठी अडचण होती. देशभरात संपर्क असलेल्या गांधीजींशिवाय दुसरा कुठलाही नेता भारतातल्या अंतर्गत समस्यांबाबत फारसा जागरूक नव्हता, ज्ञात नव्हता अगदी राजाजीही! संपर्कासाठी मोठ्याप्रमाणात अशिक्षित असलेल्या देशात भाषेचं महत्व किती आहे हे गांधीजी जाणत होते. त्यामुळं इथं हिंदीचं महत्व आहे. आणि राजाजी मात्र हिंदी भाषेशी फारसे अवगत नव्हते. नेहरूंनी एका मुलाखतीत राजाजींबाबत असंही म्हटलं होतं की, "ते नेहमी गर्दीला घाबरत असत, त्यांच्या गोंधळापासून ते सतत दूर राहात. त्यामुळं आम्हाला जबरदस्तीनं राजाजींना घेऊन आंदोलनाला जावं लागत असे. शिवाय ते त्यांच्या व्यक्तिगत जीवनात इतके व्यस्त असत की, लोकांना सहजगत्या त्यांच्याजवळ जाता येऊ शकत नव्हतं. ते लोकांना चांगल्याप्रकारे भेटत पण त्यांच्याकडं ते फारसे व्यक्त होत नसत. त्यांच्याशी व्यक्तिगत संबंध ठेवत नसत!" (पृष्ठ क्र. ५५-५६, पंडितजी-पोटानेविशे, रामनारायण चौधरी संपादित, करिमभाई वोरा द्वारा अनुवादित)

*वल्लभभाई पटेलांचं वय म्हातारपणाकडं झुकलेलं*
राजाजींनंतर आता आपण सरदार वल्लभभाई पटेलांविषयी बोलू या! पटेलांना एकदा मौलाना शौकत अली यांनी 'बर्फातला ज्वालामुखी' असं संबोधलं होतं. सरदार हे काँग्रेस पक्षाचे सर्वात मोठे, वरिष्ठ आयोजक आणि संचालक होते. पण नेहरुंच्या तुलनेत पटेलांची स्थिती काहीशी प्रतिकूल होती. कविवर्य रवींद्रनाथ टागोर यांच्यासारख्या बुद्धिजीवी लोकांच्या दृष्टीनं "युवा भारताच्या सिंहासनावर त्यांचा निःसंदेह अधिकार होता.' कारण त्यांचा 'दृढसंकल्प अदम्य आणि साहस अतूट होतं.' आणि देशाला एका विशिष्ठ उंचीवर नेण्यासाठी 'नैतिक सत्य आणि बौद्धिक चरित्र याचं अभूतपूर्व असं पालन करण्याची क्षमता त्यांच्यात होती!" आणखी एक गोष्ट गांधीजी जाणत होते की, पटेल दुसऱ्या क्रमांकाचं स्थान स्वीकारतील पण त्यांना हे ही माहिती होतं की, नेहरूंचा विद्रोही स्वभाव आणि अपार लोकप्रियता हे दुसऱ्या क्रमांकाचं स्थान स्वीकारायला अडचणी निर्माण करणारं आहे. महात्माजींनी एकदा म्हटलं होतं की, "जवाहर दुसऱ्या क्रमांकाचं स्थान स्वीकारणार नाही." ( ले.राजमोहन गांधी, द गुड बोटमन पृष्ठ ३७९) नेहरूंचं सेक्युलर आऊटलूक होतं त्यामुळं ते सर्वसमावेशक ठरत होते. सरदार पटेलांना अल्पसंख्याक समाज त्यातही विशेषतः मुसलमान समाज हा 'हिंदू नेता' म्हणूनच पाहात होता. नेहरूंना अल्पसंख्याकांसह सर्व समाजाचे लोक एक धर्मनिरपेक्ष नेत्याच्या रुपात पाहात होते. फाळणीनंतर या समाजांना पटेलांच्या तुलनेत नेहरूंबाबत अधिक विश्वास वाटत होता. पण गांधीजींना ही खात्री होती की, सरदारांजवळ सर्वांना सामावून घेण्याऐवढं विशाल मन आहे. ते कुणाचाही दुस्वास करत नाहीत. ('पटेल ए लाईफ', ले. राजमोहन गांधी, पृष्ठ ४६५). त्यांना हे देखील माहिती होतं की, हिंदू-मुस्लिम ऐक्याविषयी नेहरूंची प्रतिबद्धता इतरांच्या तुलनेत जरा अधिक होती. पटेलांच्या तुलनेत आंतरराष्ट्रीय विषयांवर नेहरूंची विषेश पकड होती. हे माहिती असल्यानं सरदार पटेल म्हणाले होते, "पंडित नेहरूंनी नेहमीच असा विचार व्यक्त केला होता की, भारतातल्या समस्यां ह्या जागतिक समस्यांचा एक हिस्सा आहे, परंतु अशावेळी एकमात्र योग्य व्यक्ति जो भारताच्या आशा-आकांक्षांना प्रभावीपणे प्रतिनिधित्व करू शकेल, आणि ती व्यक्ती म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू...! ( पटेल-नेहरू ऍग्रिमेंट विथ डीफरन्स १९३३-१९५०, संपादक नीरजा सिंह, पृष्ठ २६-२७) गांधीजींनी उत्तराधिकारी नेमण्याबाबत आपलं मत व्यक्त करताना याशिवाय वेगवेगळ्या अप्रत्यक्ष संदर्भावरही जोर दिला होता. १३ वर्षांपूर्वी गांधीजींना जाणवलं होतं की, पटेल आता म्हातारे होताहेत त्यावर पटेल म्हणाले होते की, "मला आता म्हातारपण आलंय!" (नवजीवन, १५ डिसेंबर १९२९, महात्मा गांधीके संग्रहित कार्य, खंड ४८, पृष्ठ ९२) त्याच्या अकरा दिवसानंतर जवाहरलाल नेहरूंना काँग्रेस अध्यक्ष म्हणून निवडलं गेलं. गांधीजींनी त्यावेळी व्यक्त केलेल्या भाषणातून हे स्पष्ट होतं की, त्यावेळीच त्यांनी नेहरूंना आपला उत्तराधिकारीच्या रुपात पाहिलं होतं. त्यांनी आपल्या प्रभावात त्यांना सावरणं सुरू केलं होतं. उत्तराधिकारीना आपलं स्वतःचं मन असावं तरी देखील त्याची नाळ भारताच्या लोकांशी जुळलेली असावी ती अलग होता काम नये. असं गांधीजींना वाटत होतं.

*लोकांची मनही नेहरूंनी जिंकली होती*
गांधीजींवर नेहमीच आरोप केला जातो की, त्यांनी भारतात जवाहरलाल नेहरूंना नेहमीच अधिक प्रोत्साहन दिलंय. यात काही तथ्य नाही. आपल्या व्यक्तिगत पसंतीबरोबरच लोकांची मनही नेहरूंनी जिंकली होती. ऑगस्ट १९२९ मध्ये गांधीजींनी मोतीलाल नेहरू यांना एक पत्र लिहून स्पष्ट केलं होतं की, "मी कधीही त्याला भारतावर थोपणार नाही, त्यासाठी जबरदस्तीही करणार नाही!" (मेरे पत्र, ले. एम.के.गांधी, संपादक प्रा. प्रसून, पृष्ठ ४०) गांधीजींनी १९२९ मध्ये असं केलं नाही. आणि १९४६ मध्येही निश्चितपणे असं केलं नाही, हे खरं आहे. ज्यावेळी बहुसंख्य प्रांतीय कार्यसमितीनं सरदार पटेलांना काँग्रेस अध्यक्ष बनविण्याची इच्छा व्यक्त केली होती. याचं उत्तर एक पटेल समर्थक नेता डी.पी.मिश्रा यांनी दिलंय. त्यांनी लिहिलं होतं, "जेव्हा आम्ही हिंदी पट्ट्यातील काँग्रेस समित्यांचे सदस्य होतो तेव्हा काँग्रेसच्या कार्यसमितीनं पटेलांना अध्यक्ष म्हणून मनोनीत केलं होतं. आमचं त्यावर काहीच म्हणणं नव्हतं. नेहरूंना भविष्यातील मोठ्या जबाबदारीचं पद देण्यापासून वंचित करायचं नव्हतं. वयानं छोटे असतानाही नेहरूंना तीनवेळा काँग्रेसचं अध्यक्ष म्हणून त्यापूर्वी नेमलेलं होतं. त्यामुळं पटेलांसारख्या ज्येष्ठ नेत्याकडं दुसऱ्यांदा अध्यक्षपदाची संधी सोपविण्यात यावी. असं आम्हाला वाटलं! स्वातंत्र्यानंतर मुक्त भारताच्या जबाबदारीचा तिथं संबंध होता. आम्हाला असं वाटत होतं की, महात्मा गांधींद्वारा आपला उत्तराधिकारी म्हणून नेहरूंना घोषित केल्यानंतर स्वातंत्र्याच्या पहाटे त्या महत्वाच्या पदाची गरिमा वाढविण्यासाठी कटिबद्ध राहावं लागेल. यासाठी जेव्हा सरदार पटेलांनी महात्मा गांधींच्या सांगण्यावरून अध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घेतली, त्यामुळं तेव्हा आम्ही कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही!" (पटेल ए लाईफ, ले.राजमोहन गांधी, पृष्ठ ३७२ ). नेहरू पटेलांना म्हणतात, "जवळपास ३० वर्षापर्यंत मी कोणतीही औपचारिकता मानली नाही. मी माझं कर्तव्य आपल्या नेतृत्वाखालीच होईल. मला आशा आहे की, माझ्या जीवनातील उरलेल्या काळासाठी आपल्याकडं माझ्यासाठी निर्विवाद निष्ठा आणि प्रामाणिकता असेल. भारतात कोणत्याही व्यक्तीनं इतका त्याग केला असेल जेवढा तुम्ही केला आहे. आमचं संयोजन अतूट आहे आणि यातच आमची ताकद आहे!" ( नेहरु-पटेल ऍग्रिमेंट विथ डीफरन्स १९३३-१९५०, सं. नीरजा सिंह, पृष्ठ १६ ) त्यानंतर सरदार पटेलांनी अनेकवेळा वेगवेगळ्या ठिकाणी हे स्पष्ट केलं होतं की, भारताचं नेतृत्व करण्यासाठी नेहरू हेच योग्य व्यक्ती आहेत! पटेल म्हणतात, "या परिपेक्षात स्वातंत्र्यानंतरच्या प्रारंभीच्या अडखळणाऱ्या काळात आम्हाला मार्ग दाखविणारे प्रकाशवान व्यक्ती व्हावेत. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर जेव्हा भारताला एकापाठोपाठ एक संकटांना सामोरं जावं लागलं, तेव्हा त्यांनाच आमच्या आशाआकांक्षाचं रक्षक, आमच्या श्रेष्ठतम स्वातंत्र्यसेनानींना व्हायचं होतं. माझ्याशिवाय इतर कुणालाच चांगलं माहिती नाही की, आमच्या अस्तित्वाच्या मागील काही वर्षातल्या कठीण काळात देशासाठी त्यांनी किती मेहनत केलीय, कष्ट उपसलेत!" (नेहरू अभिनंदन ग्रंथ, १४ ऑक्टोबर १९४९)

*पटेलांनी मानलं नेहरुच योग्य व्यक्ती*
आणखी एका प्रसंगी सरदार पटेलांनी महात्मा गांधी यांचा निर्णय योग्य ठरवला होता. गांधीजींनी नेहरूंना आपला उत्तराधिकारी नेमलं होतं त्यावेळी पटेल म्हणतात, "गांधीजींच्या मृत्यूनंतर आम्ही अनुभवलं की, आमच्या नेत्यांची निवड आणि निर्णय अगदी योग्य होता. (पटेल ए लाईफ, ले. राजमोहन गांधी, पृष्ठ ४९०) त्यामुळं पटेलांनी नेहरूंसाठी उच्चारलेले शब्द भारतीय लोकांच्या बरोबरच त्यांच्या मनातलेही विचार होते. जे जवाहरलाल नेहरूंना महात्मा गांधी यांच्यानंतरचा 'भारताचा नेता' या रुपात पहात होते. अखिल भारतीय काँग्रेस महासमितीच्या बैठकीत गांधीजींनी केवळ सरदार पटेलांचंच नव्हे तर राजाजीचं नावही घेतलं होतं. राजाजींनाही असंच वाटत होतं की, नेहरू हेच भारताचं नेतृत्व, प्रतिनिधित्व करण्यासाठी सर्वात योग्य व्यक्ती आहेत. असं असलं तरी तेही गांधीजींप्रमाणेच नेहरू-पटेल या संयुक्त नेतृत्वाच्या पक्षात होते. याबाबत २९ ऑक्टोबर १९४८ रोजी सरदार पटेलांना लिहिलेल्या पत्रात राजाजी स्पष्ट करताना म्हटलं होतं की, "आमचे प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांनी जगातल्या विविध देशातल्या राजनेत्यांकडून प्रशंसा प्राप्त केलीय, शिवाय ते भारतातही लोकप्रिय आहेत. त्यांच्या उद्देशांप्रति असलेली इमानदारी याला कोण विरोध करू शकणार आहे? ते आमच्यासाठी शक्तीचं प्रतीक आहेत, तुम्ही आणि ते परराष्ट्र आणि देशांतर्गत सगळ्या अडचणी दूर करू शकता. परमेश्वराचा आशीर्वाद तुम्हा दोघांवर कायम राहो. कारण भारत मजबूत आणि सशक्त व्हावा आणि शांततेसाठी एक शक्ती बनो!" ( सरदार पटेल सिलेक्टेड कोरिस्पॉन्ड्स, १९४५-१९५०, खंड २ सं. विद्याशंकर, पृष्ठ ३६८) भारताचे गव्हर्नर जनरल म्हणून केलेल्या अंतिम भाषणातही राजाजींनी पुन्हा संयुक्त नेहरू-पटेल नेतृत्वाबाबत मत व्यक्त केलं होतं आणि त्या दोघांच्या कार्यकर्तृत्वाचा, ताकदीचा उल्लेख केला होता. "प्रधानमंत्री आणि त्यांचे सर्वप्रथम सहकारी, उपप्रधानमंत्री हे दोघे मिळून एक असा अधिकार गाजवतील जे भारताच्या दृष्टीनं देशाला समृद्ध करणारं असेल....एकजण सार्वभौमिक प्रेम मिळवील तर दुसरे सार्वभौमिक विश्वास!" (राजाजी ए लाईफ ले. राजमोहन गांधी, पृष्ठ ३१२) राजाजीचं म्हणणं होतं की, नेहरूंनाच प्रधानमंत्री बनवलं जावं. १९७१ मध्ये नेहरूंची कन्या इंदिरा गांधींना असलेल्या त्यांच्या विरोधामुळं राजाजी इतिहासात पुन्हा परततात आणि नेहरूंच्या ऐवजी पटेलांना पसंत करतात. नेहरूंशी आर्थिक विषयांबाबत टोकाचे मतभेद असतानाही, नेहरु प्रधानमंत्री असताना अशाप्रकारचं मतप्रदर्शन राजाजींनी कधीही केलेलं नव्हतं हे इथं नमूद करायला हवंय. नेहरुंच्या निधनानंतर त्यांना श्रद्धांजली अर्पण करताना ते म्हणाले होते, "माझ्याहून अकरा वर्षाहून लहान, पण देशासाठी अकरापट अधिक महत्वपूर्ण, अकराशे पट देशात अधिक लोकप्रिय असे श्री नेहरू अचानक आपल्याला सोडून गेले...! मी या सगळ्या दहा वर्षांत नेहरूंशी भांडलोय, वाद घातलाय, ज्याला मी सार्वजनिक नीतींना दोषी मानतोय परंतु, मी हेही जाणतो की, ते एकटेच त्या साऱ्या बाबी ठीकठाक करीत. दुसरं कुणी नाही. आता ते नाहीत. मला माझ्या लढ्यात कमकुवत करून टाकलंय. एक जानी दोस्त मी गमावलाय. आपल्या सगळ्यांमध्ये सर्वाधिक सभ्य असे ते एकटेच होते. आपल्यात आजही अनेक लोक सभ्य नाहीत...! (राजाजी ए लाईफ, के. राजमोहन गांधी, पृष्ठ ४०७) म्हणू हे स्पष्ट आहे की, केवळ महात्मा गांधीच नव्हे तर रवींद्रनाथ टागोर, भगतसिंह, आणि सुभाषचंद्र बोस, मौलाना आझाद यांचीही पसंती नेहरु हेच होते. या साऱ्यांनी आमच्या प्रयत्नांना आकार देण्याचं स्वप्न पाहिलं. आणि त्या निर्णयाचं समर्थन वल्लभभाई पटेल आणि राजाजी यांनी केलं होतं. त्यामुळं सध्या नेहरूंवर केले जाणारे हल्ले त्या सगळ्यांवर केलेले हल्ले आहेत! असं मानणं योग्य ठरेल!

हरीश केंची
९४२२३१०६०९

-

5 comments:

  1. आजच्या गुडग्यात मेंदू असणाऱ्या अंधभाक्ताना इतिहासातील सत्य उलगडून दाखविल्या बद्धल आपले मनःपूर्वक आभार. विशिष्ट गटाचे हित पाहणे या पलीकडे काहीही बघण्याची दृष्टी किंवा विद्वत्ता नसलेली वाचाळ फेकू नेतृत्वाला तूम्ही दाखवलेले वरील सत्य कळेल या विषयी मी साशंक आहे व जरी स्वयंघोषित विद्वानांकडून कळाले तरी हेकेखोरपणा, दुराग्रः व संकुचित वैचारिक बैठकीमुळे वागण्या/बोलण्यातील चूक सुधारण्याची क्षमता त्यांच्यात दिसत नाही. भारताचे हिंदुस्तानाकडे वाटचाल ..........होत असताना दिसत आहे.

    ReplyDelete
  2. हरिशजी खूप सुंदर, सत्य व वास्तव लिहालात। देशात एक अज्ञानी ने सोशल मैद्याचा वापर करून लोकांच्या मनात खोटेनाटे विष कालवून सत्तेत येऊन देशाची पूर्ण वाट लावली आहे। आपण असेच निखळ सत्य लिहीत राहावे। धन्यवाद।
    जब भी मौका मिलता है तब मैं एक लाइन जरूर लिखता हूँ : एक गधे को दिव्यज्ञानी मानने का नतीजा पूरा देश भुगत रहा है.

    ReplyDelete
  3. सोशल मीडिया खोटेनाटे करून सोशल मैदा केलाय।

    ReplyDelete
  4. आपण खूपच छान विश्लेषण केले आहे सर हा लेख खूप गरजेचे होते कारण आजच्या पिढीला आणि अंधभक्त याना काहीच माहीत नसताना नेहरू यांच्या वर टीका टिप्पणी करत आहेत . देशाचे पंतप्रधान जर खोटं आणि फेकत असेल तर देशाची जनता हे अंधभक्त होणारच . आपण असले अजून लेख लिहावे आणि लोकांना जागृत करावे. धन्यवाद

    ReplyDelete

लोकशाही की एकाधिकारशाही...!

"देशात लोकशाहीचा उत्सव सुरू आहे, पण सत्ताधारी  लोकशाही संसदीय ऐवजी अध्यक्षीय असल्यासारखे वागताहेत. सामूहिक नेतृत्व सांगणारा...