Friday 17 July 2020

शरद, नारद, पारध आणि गारद!

"राजकीय नेत्यांच्या मुलाखती या काही नव्या नाहीत. पण राजकीय नेता त्याच्या मुलाखतीचा काळ, वेळ आणि वातावरण यावर ते अवलंबून असतं. शरद पवारांची मुलाखत संजय राऊत यांनी घेणं याला एक विशेष महत्व आहे. तीन भागांतल्या या मॅरेथॉन मुलाखतीत पवारांनी लोकांच्या मनात सरकारबद्धल असलेल्या शंकांना, भाजप आणि त्यांच्या नेत्यांच्या आरोपांना, टीकांना परस्पर उत्तरं दिली आहेत. या मुलाखतीतील तिसरा भाग अत्यंत रंगतदार झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर शरद पवार यांनी आपल्या भात्यातून बाण सोडत चांगलीच टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेस भाजप बरोबर कधीही जाणार नाही हेही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. एकूण काय तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रतिमेचं संवर्धन आणि मधल्या काळात सरकारच्या पातळीवर जे मतभेद निर्माण झाले, त्याचं डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न या मुलाखतीतून झाल्याचं दिसलं. याशिवाय मुलाखतीतून सरकारच्या तीन पक्षांमधील वातावरण चांगलं आहे, हे सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे!"
--------------------------------------------------


*मुं* बईत १९९३ साली झालेले बॉम्बस्फोट, त्यानंतर उसळलेली दंगल, या काळात 'सामना'तल्या अग्रलेखातून, बातम्यांतून जे काही प्रसिद्ध होत होतं. जी जहाल भाषा वापरली जात होती, त्याची खूपच चर्चा त्यावेळी होती. मुख्यमंत्री असलेले शरद पवार यांना पुण्यातल्या पत्रकार परिषदेत एका पत्रकारानं 'सामना'तल्या अग्रलेखातल्या भाषेबाबत सवाल केला. त्यावर उत्तर देताना पवारांनी आपल्या नेहमीच्या शैलीत टीका केली. त्यातील भाषेचा उल्लेख करताना त्यांनी म्हटलं होतं की, "महाराष्ट्रात यापुढे 'संजय राऊत संस्कृती' वाचायला मिळेल...!" 'सामना'च्या पत्रकारितेवर टीका करणारे तेच शरद पवार आज संजय राऊत यांनाच मुलाखत देते झाले. तर शरद पवारांचा 'बारामतीचा म्हमद्या' पासून 'अफझलखान' पर्यंतची शेलकी विशेषणं वापरून उल्लेख करणारा 'सामना' पवारांचीच मुलाखत घेता झालाय! हा सारा काळाचा महिमा म्हणायला हवा. राजकारणात कधी कुणी कायमचा मित्र नाही की शत्रू, हेचं खरं!. 'सामना'चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची 'एक शरद सगळे गारद' या शिर्षकाखाली तीन दिवसांची मॅरेथॉन मुलाखत घेतली. ती सर्व मराठी दूरचित्रवाणीवरच्या वाहिन्यांवरून दाखविली गेली. त्यामुळं राज्यातील राजकारणात चर्चेचं वादळ उठलं. उलटसुलट मतं व्यक्त झाली!

*पवारांच्या भूमिकांना विशेष महत्व*
राजकीय नेते आणि सेलिब्रिटिंच्या मुलाखती हा प्रकार प्रसिद्धीमाध्यमासाठी काही नवा नाही. अशा मुलाखती होतच असतात. निवडणुकांच्या काळात तर राजकीय नेत्यांच्या मुलाखतींना बहर आलेला असतो. एखाद्या मोठ्या नेत्यानं मुलाखत दिल्यानंतर त्यातील वक्तव्यामुळं अनेकदा वादळंही उठतात. देशात यापूर्वी असं अनेकदा झालंय. मात्र, शरद पवारांच्या झालेल्या या मुलाखतीची सर्वत्र जोरदार चर्चा होती. ही चर्चा फक्त प्रसिद्धिमाध्यमातच होती असं नाही तर देशभरातल्या राजकीय वर्तुळातही होती. शरद पवार हे तसे काही वादग्रस्त किंवा सनसनाटी वक्तव्य करणारे नेते म्हणून ओळखले जात नाहीत. तरीही त्यांच्या मुलाखतीबाबत सर्वांनाच उत्सुकता होती. अर्थात याला कारणंही बरीच होती. बदललेल्या महाराष्ट्रात आणि देशातही बदललेल्या राजकीय परिस्थितीत पवारांच्या प्रत्येक भूमिकेला कमालीचं महत्त्व आहे. मागच्या काही महिन्यात शरद पवार-उद्धव ठाकरे आणि शिवसेना या तिन्हींच्या मधला दुवा संजय राऊत राहिलेले आहेत आणि काँग्रेस - शिवसेना या दोघांना जोडण्याचं काम शरद पवारांनी केलेलं आहे. ही तिघांची आघाडी जुळवण्यासाठी शरद पवार हा जसा मुख्य दुवा राहिला, त्यांच्या पाठोपाठचा दुसरा महत्त्वाचा दुवा संजय राऊत राहिलेले आहेत. संजय राऊत आणि शरद पवार यांचे संबंध पूर्वीपासूनच चांगले राहिलेले आहेत. दोघेही परस्परांचं फार कौतुक करत आलेले आहेत. आणि पवारांचे ठाकरे घराण्याशीही खूप चांगले संबंध आहेत. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनाही 'सामना' चालवताना थोडा अधिक बॅलन्स साधावा लागलाय, मतांना मुरड घालावी लागलीय. अन्यथा, या आघाडीमध्ये बिघाडी निर्माण करण्याचं काम जाणतेपणानं किंवा अजाणतेपणानं 'सामना'तूनच होऊ शकतं. हे इथं लक्षांत घ्यायला हवंय. त्यादृष्टीनं या मुलाखतींकडे पाहायला हवं!

*फडणवीसांचं म्हणणं खोडून काढलं*
महाराष्ट्रात शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीचं सरकार आणण्यात शरद पवार यांचा सिंहाचा वाटा आहे. गेले सात महिने हे सरकार राज्यात सत्तेवर आहे. उद्धव ठाकरे हे सरकारचं नेतृत्व करताहेत. वर्षानुवर्षे सत्तेत राहिलेले आणि सत्तेचा मोठा अनुभव असलेले काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते तुलनेनं नवख्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करताहेत. त्यातून आघाडीत सातत्यानं कुरबुरी होत असतात. शरद पवार हे वेळोवेळी प्रत्येक प्रश्नावर मध्यस्थी करताना दिसतात. शिवाय, राज्यातील महत्त्वाच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री आणि सरकारला सल्ले देत आहेत. हे सगळं नेमकं काय गौडबंगाल आहे यावरही मुलाखतीत पवार बोलले आहेत. महाराष्ट्रात भाजपला वगळून एखादं सरकार येईल असं निवडणुकीच्या निकालानंतरही काही दिवस कुणालाही वाटलं नव्हतं. पडद्याआड बऱ्याच घडामोडी होऊन अखेर ते सरकार प्रत्यक्षात आलं. मात्र, त्यावेळच्या घडामोडींबद्धलच्या चर्चा अद्याप थांबलेल्या नाहीत. विरोधी पक्षातले नेते अजूनही अधूनमधून याबाबत बोलत असतात. अलीकडेच विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत असा गौप्यस्फोट केला होता की, 'शरद पवार यांनी स्वत: भाजपशी युतीचा प्रस्ताव दिला होता...!' पवारांनी त्यावर सविस्तर उत्तर दिलंय. फडणवीस राष्ट्रीय राजकारणात नाहीत त्यामुळं त्यांना यातलं फारसं माहीत नाही, उलट भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वानं आपल्याला प्रस्ताव दिला होता, असं सांगत फडणवीसांना उघडं पाडलं! कदाचित पवारांचं हे म्हणणं ऐकून फडणवीसांनी दिल्ली गाठलेली दिसतेय. राज्यातल्या साखर उद्योगाबाबत अमित शहांशी चर्चा केल्याचा बातम्या प्रसिद्ध झाल्यात. शरद पवार हे देशाचे संरक्षणमंत्री राहिलेले आहेत. गेली अनेक वर्षे ते दिल्लीच्या राजकीय वर्तुळात वावरत आहेत. देशातील सर्वच पक्षाच्या नेत्यांमध्ये त्यांच्याबद्धल एक आदराची भावना आहे. त्यामुळं महाराष्ट्राशिवाय देशपातळीवरील विषयांवर त्यांनी व्यक्त केलेली मतं ही महत्त्वाची ठरतात. त्यातील देशाच्या राजकीय इतिहासाला कलाटणी देणारी घटना म्हणजे अयोद्धेतलं राम मंदिर आंदोलन. पवार हे या आंदोलनाबद्धलही बोलले आहेत. त्याच अनुषंगानं त्यांनी भाजपविषयी देखील मतं मांडली आहेत.

*उद्धव ठाकरे यांच्याबद्धलची ग्वाही*
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रतिमेचं संवर्धन आणि मधल्या काळात सरकारच्या पातळीवर जे मतभेद निर्माण झाले, त्याचं डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न या मुलाखतीतून झाल्याचं टीकाही होतेय. याशिवाय शरद पवारांची सामनातील मुलाखतीत सरकारच्या तीन पक्षांमधील वातावरण चांगलं आहे, हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे आणि ते योग्य आहे. असंही म्हटलं गेलंय.
महाविकास आघाडीचं सरकार स्थिर राहणार नाही, असा समज पसरवण्यात भाजप यशस्वी झालं होतं. हाच समज शरद पवारांनी या मुलाखतीतून दूर केलाय. याउलट शिवसेना सोबत नसती, तर भाजपला ४० ते ५० जागा मिळाल्या असत्या, असं म्हणून त्यांनी देवेंद्र फडणवीसांचं स्थान कमी करण्याचा प्रयत्न केलाय. सोशल मीडियावर देवेंद्र फडणवीस ट्रोल होताहेत असं दिसून आल्यावर भाजपेयींनी नारायण राणेंना आपलं कार्यालय खुलं करून दिलंय. त्यांनी नेहमीच्या शैलीत मुख्यमंत्री सरकार, शिवसेना, संजय राऊत यांच्यावर टीका करताहेत. पवारांनी या मुलाखतीत विधानसभेत भाजपच्या आमदारांची जी १०५ संख्या झाली, त्यात शिवसेनेचं योगदान मोठं आहे. त्यातून तुम्ही शिवसेना वजा केली तर हा आकडा तुम्हाला ४०-५० च्या आसपास दिसला असता, असं म्हटलंय. भाजपची मंडळी सांगतात की आम्हाला शिवसेनेनं दुर्लक्षित केलं किंवा सत्तेपासून दूर ठेवलं, पण ज्यांनी भाजपाला १०५ पर्यंत पोहोचवलं, त्यांना भाजपनं गृहीत धरलं. असं शरद पवार यांनी या मुलाखतीत स्पष्ट केलंय. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांतील मतभेद वेळोवेळी समोर आले आहेत. विधानपरिषद निवडणूक असो, पोलीस आयुक्तांच्या बदल्या असो की पारनेरमधील नगरसेवकांचं प्रकरण असो, या तिन्ही घटननांच्या काळात पक्षांतील मतभेद चव्हाट्यावर आले होते. काँग्रेसच्या काही नेत्यांनी तर सरकारमध्ये आपल्याला विश्वासात घेतलं जात नसल्याची तक्रारही केली होती. असं असलं तरी या मुलाखतीतून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची एकजूट आहे, असा इशारा काँग्रेसला देण्याचा प्रयत्न झालेला दिसतो. याशिवाय आमच्यात मतभेद असले, तरी ते काही सरकार तुटेपर्यंत असणार नाहीत, अशीही सारवासारव करण्याचा प्रयत्न झाल्याचा दिसतो. शिवाय या मुलाखतीतून शरद पवार शिवसेनेच्या म्हणजेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहेत, असा इशारा काँग्रेसला देण्यात आलाय. या मुलाखतीत शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या पक्षांमधील मतभेदांविषयी, "लॉकडाऊनसंदर्भात माझे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात काहीएक मतभेद नाहीये, असं पवारांनी स्पष्ट केलं. "या सगळ्या काळात माझा मुख्यमंत्र्यांशी उत्तम संवाद होता आणि आजही आहे. प्रसिद्धी माध्यमांत काय आलंय ते येऊ द्या. दोन-तीन दिवसांत मी वाचतोय की, आमच्यात म्हणजे काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेत मतभेद वाढताहेत, अशा बातम्या आहेत. त्यात यत्किंचितही सत्य नाही. पण बातम्या येताहेत. येऊ द्या." असं पवारांनी म्हटल्यावर महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये विसंगती निर्माण झाल्यामुळेचं ही मुलाखत घ्यावी लागली, अशी टीका यावेळी झालीय.

महाआघाडी सरकारला ७ महिने पूर्ण झाले आहेत. आता उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून अधिकार दाखवायला सुरुवात केलीय. पोलीस आयुक्तांच्या बदल्यावरून ते स्पष्ट दिसून आलंय. पण, उद्धव ठाकरे यांना हे सरकार टिकवायचं असेल, तर त्यांना बहुमताकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत म्हणा, की भाजपसोबत म्हणा, कुठेही गेले तरी त्यांना दुय्यम स्थानच स्वीकारावं लागणार आहे. सध्या कोरोनाचा काळ सुरू आहे. सरकार त्यात व्यस्त आहे. जेव्हा केव्हा ते मुख्यमंत्री म्हणून अधिकार गाजवायला सुरुवात करतील, त्याक्षणी तिन्ही पक्षांमध्ये विसंगती सुरू होतील आणि ह्या सरकारला धोका निर्माण होईल. यासाठी पवारांना दक्ष राहावं लागेल. राज्य सरकारवर जे जे म्हणून काही आरोप भाजपकडून करण्यात आले, त्यावर शरद पवारांच्या तोंडून या मुलाखतीत उत्तरं मिळवण्याचा प्रयत्न झालेला दिसतो. याशिवाय या मुलाखतीची सोशल मीडियावर टीझर टाकून एक हवा तयार करण्यात आली होती, त्यामुळं सर्वच थरातून उत्सुकता निर्माण झाली होती. सामना आणि इतर वृत्तवाहिन्यांसाठी ही मुलाखत घेतली जात असल्याचं सांगण्यात आलं. इतर इलेक्ट्रॉनिक्स मराठी प्रसार माध्यमांनीही ही मुलाखत जशीच्या तशी वापरली. त्यामुळे मग ही मुलाखत आहे की, नियोजित प्रचार आहे, अशी शंका उपस्थित केली गेली. शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस प्रमाणेच महाविकास आघाडीचेही शिल्पकार आहेत. मुलाखतींच्या पूर्वी ते दोनदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटले आहेत. दुसरीकडे भाजपसारखा प्रबळ विरोधी पक्ष आहे. त्यामुळे माध्यमं शरद पवार जे म्हणतील ते दुर्लक्षित करू शकत नाहीत. माध्यमांना ही मुलाखत वेळेवर आणि आयती मिळाली आणि त्यांनी ती वापरलीही. जर ती सामनाकडून नसती मिळाली, तर त्यांनी ती दुसरीकडून मिळवली असती. तसं पाहिलं तर या मुलाखतीत फारसं विशेष असं काही नव्हतं, पण या मुलाखतीचं राजकारण मात्र उत्तमरीत्या करण्यात आलं होतं. त्यातून जो संदेश द्यायचा, तो स्पष्टपणे देण्यात आलाय.

*मुलाखतीतून प्रचार मोहीम राबविली*
शरद पवारांच्या मुलाखतीतून हे स्पष्ट झालं की, राज्यात सत्तेवर आलेली ही आघाडी इतकी अनैसर्गिक आहे की, ती टिकण्यासाठीच्या काही अंगभूत मर्यादा आहेत. उद्धव ठाकरेंसह शिवसेनेच्या सगळ्या नेत्यांना अन्य दोन पक्षांशी जुळवून घेणं हीच मुळात अवघड गोष्ट आहे. पण जुळवून घ्यावं लागेल. काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं सुद्धा आपापले मतलब बाजूला ठेवून, भाजप या प्रबळ विरोधी पक्षापासून बचाव करण्यासाठी काही काळ तरी राज्य सरकारला स्वस्थता मिळू दिली तर आघाडीला फायदा होईल. त्यासाठी पहिलं मुख्य काम म्हणजे त्यांनी कमी बोललं पाहिजे. मग राष्ट्रवादीतले भुजबळ किंवा अजित पवार असतील किंवा उद्धव ठाकरे स्वतः आणि संजय राऊत असतील, त्या सर्वांनी कमी बोलणं, काहीवेळा अजिबात न बोलणं किंवा जे बोलायचं ते जबाबदारीनं आणि संसदीय आणि संवैधानिक भाषेमध्ये बोललं पाहिजे. यामुळे ही आघाडी जास्त दिवस टिकू शकेल. फक्त नीट 'बोलण्या'मुळेही या आघाडी टिकवता येऊ शकेल. एकीकडे महाविकास आघाडीत मतभेद असल्याचं चित्र असताना दुसरीकडे महाविकास आघाडीत कोणतेच मतभेद नाहीत, असं स्पष्टीकरण महाविकास आघाडीचे प्रणेते शरद  पवार यांनीच केलं आहे. विशेष म्हणजे शरद पवार यांची ही मुलाखत महाविकास आघाडीचे दुसरे प्रणेते संजय राऊत यांनी घेतली असून त्याचं टायमिंगही लक्षात घ्यायला हवं. महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येऊन सात महिने झाले आणि या सरकारमधील विसंवाद, असमन्वय समोर येऊ लागला. सुरुवातीला काँग्रेसनं तक्रारीचा सूर लावला. सरकारमध्ये निर्णय घेताना काँग्रेसला विश्वासात घेतलं जात नाही, काँग्रेसच्या मंत्र्यांच्या खात्यातील निर्णय परस्पर घेतले जातात, अशी तक्रार काँग्रेसनं लावली. खरं तर राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या खात्यातही अधिकारी परस्पर निर्णय घेत असल्याची तक्रार मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्रीमंडळ बैठकीतच केली होती. मात्र काँग्रेसची नाराजी जास्त होती, कारण काँग्रेस सरकारमध्ये असूनही निर्णय प्रक्रियेत नव्हती. याबाबत काँग्रेसच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आपलं गाऱ्हाण त्यांच्या कानी घातलं. काँग्रेसची ही तक्रार ताजी असतानाच राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील संघर्षही वाढू लागला. मुंबईत लॉकडाऊन कडक करण्याबाबत पोलीस आयुक्तांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल गृहमंत्री अनिल देशमुख अंधारात होते, तर पोलीस उपायुक्तांच्या बदल्यांवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादीला दणका दिला. हे  प्रकरण शांत करण्यासाठी थेट शरद पवार आणि अनिल देशमुखांना मातोश्री गाठावी लागली होती. या सगळ्यावर भाजपचे नेते वारंवार टीका करत आहेत, हे सरकार अंतर्विरोधामुळे कोसळेल अशी विधानं देवेंद्र फडणवीस करताहेत. महाविकास आघाडीतील चव्हाट्यावर येणाऱ्या या मतभेदांमुळे साहजिकच संजय राऊत अस्वस्थ असणार, कारण महाविकास आघाडी स्थापन करण्यात त्यांची मोलाची भूमिका होती. त्यामुळे हे मतभेद दूर व्हावेत आणि या वादावर पडदा पडावा, तसंच महाविकास आघाडी भाजपविरोधात भक्कम आहे हा संदेश देण्याचा प्रयत्न या मुलाखतीतून केला गेला. पवार-राऊतांनी जशी आघाडी एकत्र आणली तशी ती टिकवण्यासाठीही या दोन्ही नेत्यांना डोळ्यात तेल घालून पहारा द्यावा लागणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील मतभेदांच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर ही मुलाखत होणं, या मुलाखतीत शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाचं कौतुक करणं, महाविकास आघाडीत मतभेद नसल्याचं सांगणं यालाही एक वेगळं महत्त्व आणि कारण आहे
हरीश केंची
९४२२३१०६०९

No comments:

Post a Comment

लोकशाही की एकाधिकारशाही...!

"देशात लोकशाहीचा उत्सव सुरू आहे, पण सत्ताधारी  लोकशाही संसदीय ऐवजी अध्यक्षीय असल्यासारखे वागताहेत. सामूहिक नेतृत्व सांगणारा...