Saturday 11 July 2020

सत्तेचा साज, भिक्षुकशाहीचा माज

अडल्याचे तेल आणले । सासूबाईचे न्हाणे झाले
मामंजीची शेंडी झाली । उरले-सुरले झाकून ठेवले
ते येऊन मांजराने सांडले । वेशीपर्यंत ओघळ गेला
पाटलाचा रेडा । त्यात वाहून गेला -


या दृष्टांताप्रमाणे सत्ताधारी भाजपेयीं कारभारी देशात , राज्यात वागत आहेत. त्यांच्या आगाऊ-आचरट तोंडाळपणानं 'अतिरेक' या शब्दांचीही सीमा ओलांडलीय. मंत्री, आमदार, खासदार तर अकलेचे तारे तोडतात, की त्यापुढे तंतुवाद्येही फिकी पडावीत. 'ज्यांना नरेंद्र मोदींना मतं द्यायची नाहीत, त्यांनी पाकिस्तानात निघून जावं' इथून सुरू झालेला वाचाळवीरांचा थुकवडा अजूनही गटारासारखा झरतो आहे. आता तर गोपीचंदानं आपल्या तोंडातली थुंकी समाजमनाच्या सूर्यावर उडवण्याचा प्रयत्न केलाय. पण त्या थुंका त्यांच्याच तोंडावर पडल्या. त्या चाटून पुसूनच माफी मागण्याची वेळ आली. अशा थुकरटात नवनिर्वाचित आमदार गोपीचंद पडळकर यांची भर पडलीय. नुकतंच त्यांनी शरद पवारांवर टीका करताना 'शरद पवार म्हणजे महाराष्ट्राला झालेला कोरोना!' असं म्हटलंय. टीका करण्याचं तसं काही कारण नव्हतं, पण त्यांनी पोटातलं ओठावर आणून आपला कार्यभाग साधलाय. हा त्यांचा कृतघ्नपणा आहे. 'मला असं काही म्हणायचं नव्हतं, बोलण्याच्या ओघात बोललो!' अशी चलाखी करत माफी मगितलीय. अशा चलाख्यांची मोठी चळत राजकारणात आणि भाजपत आहे. हा योगायोग नाही तर, सत्तेचा अवगुणच आहे. जिभेला हाड नसतेच; पण तिच्यावर टाळा नसल्यासारखं बोलायचं; वर मला तसं बोलायचं नव्हतं, कुणाला दुखवायचं नव्हतं, माझ्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ काढला गेला' असं म्हणत त्यांनी माफी मागितली. पण त्यांच्या वक्तव्याची सारवासारवी देवेंद्र फडणवीस-चंद्रकातदादा पाटील यांनी करायचं काही एक कारण नव्हतं. हे सारं म्हणणं आणि बाजू घेणं हा सारा चलाखीचा आणि लोकांत परस्पर विरोधी मतांचा झगडा लावणारा मामला आहे. मराठा-धनगर असा वाद रंगवण्याचा मानस असल्याचं नाकारता येत नाही.

केवळ पडळकरच नाही यापुढे रावसाहेब दानवे, राम कदम, प्रशांत परिचारक, अतुल भातखळकर, महादेव जानकर, सदाभाऊ खोत, रमेश पोखरियाल, नेपाळ सिंग, अनंत हेगडे, अनिलकुमार वीज, सत्यपालसिंह, साक्षी महाराज, गिरीराज सिंग आणि हो आपले रामदास आठवले हे असे एक से बढकर एक महामानव अनेकदा माध्यमामध्ये जागा व्यापत असतात. दहीहंडीच्या कार्यक्रमात राम कदम म्हणाले होते, 'तुम्हाला एखादी मुलगी आवडली, तुम्ही तिला प्रपोज केलं, तुमच्या आई वडिलांना आवडली, तर मी ती मुलगी पळवून आणून तुम्हाला देईन!' अगोदर बातमी कुठे आली नाही, दिसली नाही, राष्ट्रवादी काँग्रेसच्या जितेंद्र आव्हाड यांनी या वक्तव्याचा व्हिडिओ अपलोड केला, त्यानंतर मुख्य माध्यमांनी त्याची दखल घेतली. राम कदम यांच्या अकलेची हंडी फोडण्यापर्यंत या प्रकारचा भ्रष्टाचार झाल्याचे कदम यांनी तातडीने जाहीर केलं नाही. त्यांची बाजू सावरायला फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांना पुढे यावे लागले. हे त्या पक्षाचे खायचे आणि दाखवायचे दात एकच असल्याची साक्ष आहे. मोठा गदारोळ झाल्यानंतर सपशेल माफी मागितली. सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचारसभेत तोंडावर पडले प्रशांत परिचारक! ते तिकडे म्हणाले, 'सीमेवर सैनिक वर्षं वर्षभर असतात, इकडे गावाकडे त्याला मुलगा झाल्यावर तो तिकडे पेढे वाटतो!' या वक्त्यव्यातून त्यांनी सैनिकांच्या प्रती स्वतःची भावना व्यक्त केली. तरीही त्याचा पक्षातील जबाबदार व्यक्तींनी त्यांना खडसावले नाही. यांच्या निलंबनाचा कालावधी कमी करण्याचा प्रयत्न झाला. छत्रपतिंचा आशिर्वाद आहे असं म्हणत सत्तेवर येणाऱ्या भाजपच्या अहमदनगरचा उपमहापौर काय बोलला हे सारेच जाणतात. शिवछत्रपतींचा उपमर्द करणार्यांचा साधा निषेधही जेला गेला नाही. सोलापूरचे माजी खासदार शरद बनसोडे यांची व्यक्तव्य पुन्हा सांगण्याची गरज नाही. पार्श्वभूमीवर आमदार पडळकर यांना कसं पाहायचं?

पडळकर यांनी लोकसभा निवडणुकीत वंचित विकास आघाडी यांच्यावतीनं सांगलीत लढविली होती. त्यापूर्वी ते महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षात होते, त्यांनी निवडणुकीपूर्वी वंचितमध्ये प्रवेश केला. त्यावेळी त्यांनी गुजरातचे पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांना प्रचारासाठी आणलं होतं. यादरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही टीका केली होती. गोपीचंद पडळकर शिवराळ भाषेत मोदींवर टीका करत होते. अशा नेत्याला भाजपने विधान परिषदेची संधी दिली आहे. यातून भाजपचं सध्याचं राजकारण दिसून आलंय. विधानसभेच्या वेळीही पडळकर यांना अशा प्रकारचेच प्रश्न विचारले जात होते. त्यावेळी याबाबत बोलताना आपण फक्त जनसामान्यांचा आवाज लोकांसमोर मांडत असल्याचं, तसंच धनगरांच्या आरक्षणासाठी प्रयत्न करत असल्याचं स्पष्टीकरण पडळकर यांनी दिलं होतं. पण पडळकर यांच्या निवडणुकांना हजारो-लाखोंची गर्दी होत असूनसुद्धा त्याचं मतांमध्ये रुपांतर झाल्याचं आतापर्यंत कधीच दिसून आलं नाही. त्यामुळे लोकांमधून निवडून येण्याची संधी पडळकर यांच्या वाट्याला अद्याप आलेली नाही. पडळकर यांनी आतापर्यंत चार निवडणुका लढवल्या आहेत. पण या चारही निवडणुकांमध्ये त्यांना पराभवाचं तोडं पाहावं लागलं आहे

२०१९ च्या नोव्हेंबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपकडून बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांविरुद्ध लढत दिली होती. पण अजित पवारांच्या बालेकिल्ल्यात पडळकर यांचं काहीच चाललं नाही. त्यांच्यावर या निवडणुकीत डिपॉझिट जप्त होण्याच्या नामुष्की ओढवली होती. निवडणुकीत अजित पवार यांना १ लाख ९५ हजार ६४१ म्हणजे जवळपास दोन लाख मतं मिळाली. तर पडळकर यांना केवळ ३० हजार ३७६ मतांवर समाधान मानावं लागलं होतं. तर २०१९ एप्रिल-मे दरम्यान झालेल्या लोकसभा निवडणुकीत पडळकर सांगलीतून निवडणुकीस उभे होते. त्यांनी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळवत इथं वातावरण निर्मिती केली होती. पण इथंही त्यांना पराभव स्वीकारावा लागलां होता. याशिवाय २०१४ आणि २००९ मध्ये पडळकर सांगली जिल्ह्यातील खानापूर मतदारसंघातून रिंगणात उतरले होते. यात २०१४ मध्ये शिवसेनेचे अनिल बाबर यांच्याकडून तर २००९ ला काँग्रेसचे सदाशिवराव पाटील यांनी पडळकरांना मात दिली होती, पण पराभूत होऊनही पडळकर यांच्या लोकप्रियतेमध्ये घट झाली नाही. उलट त्यांचा राजकीय आलेख चढताच राहिल्याचं दिसून येईल. अखेर विधान परिषदेच्या माध्यमातून आता पडळकर यांना आमदारकीचं तिकीट मिळालं आहे.

कट्टर हिंदुत्ववादी संघटना असलेल्या 'शिवप्रतिष्ठान संस्थाना'चे प्रमुख संभाजी भिडे यांच्याशी तसंच राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत पडळकर यांचा संबंध असल्याचा आरोप पडळकर यांच्यावर वारंवार होत आला आहे. १ जानेवारी २०१८ रोजी भीमा कोरेगाव दंगल प्रकरण घडल्यानंतर आणि त्यामध्ये संभाजी भिडेंचं नाव आल्यावर प्रकाश आंबेडकर यांनी भिडेंना या प्रकरणाचा मास्टरमाइंड म्हटलं होतं. लोकसभा निवडणुकीत पडळकर यांना वंचितची उमेदवारी मिळाल्यानंतर याच संभाजी भिडे यांच्यासोबतचे आणि संघाच्या गणवेशातील फोटो व्हायरल झाले होते. त्यामुळे वाद निर्माण झाला होता. पण या दोन्ही संघटनांशी आपला काहीएक संबंध नसल्याचं स्पष्टीकरण गोपीचंद पडळकर यांनी त्यावेळी दिलं होतं. तसंच सांगली जिल्हातील सर्वपक्षीय नेत्यांचे संभाजी भिडे यांच्याशी संबंध आहेत. तसेच संबंध आपलेही आहेत. ते दोषी असतील तर कारवाई व्हायला हवी, असं ते म्हणाले होते. पण हिंदुत्ववादी राजकारणाच्या अवतीभोवतीच पडळकर यांच्या राजकारणाला सुरूवात झाल्याचं दिसून येतं. पडळकर यांचे भिडे गुरूजी यांच्याशी अतिशय चांगले संबंध आहेत. त्यांच्या अनेक कार्यक्रमांमध्ये पडळकर दिसले आहेत. पडळकर यांचा पाया हिंदुत्त्ववादी राजकारणाचा आहे. याचा त्यांना भाजपमध्ये फायदा झाल्याचं पाहायला मिळालं आहे. गोपीचंद पडळकर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू असल्याने त्यांना भाजपमध्ये संधी मिळत आहेत. सध्याच्या भाजपच्या राजकारणात फडणवीसांचा वरचष्मा असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यांनी आपल्या स्पर्धकांना अलगद बाजूला केलं आहे. त्यांनी अनेक नव्या फळीच्या नेत्यांना पुढे आणलं आहे. नव्या नेत्यांना संधी देऊन नेतृत्व आपल्या हातात ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्याचाच एक भाग म्हणून पडळकरांची निवड करण्यात आलेली असू शकते. भारतीय जनता पक्षाकडे सध्या मोठा धनगर चेहरा नाही. पूर्वी प्रकाश शेंडगे काही काळ होते. पण ते बाजूला झाले. राम शिंदे विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले. ज्याप्रकारे आयात मराठा नेत्यांना भाजपने मोठ्या प्रमाणात संधी दिली. त्याचप्रमाणे धनगर समाजातील पडळकर यांना राजकीय समीकरण डोक्यात ठेवून संधी देण्यात आल्याची शक्यता आहे.

चौकट
*उद्धव ठाकरे, फडणवीस यांना शुभेच्छा*
सध्या आघाडी सरकारचे शिल्पकार, शरद पवार यांना सतत दक्ष राहावे लागत आहे. कारण हे सरकार आपसातील मतभेदांमुळे कोसळायला हवंय, अशी तीव्र इच्छा फडणवीस आणि दरेकर यांची आहे. फडणवीस यांची उर्जा वाखाणण्याजोगी आहे. दरेकरही त्यांच्या पाठोपाठ फिरताहेत. आशिष शेलार आणि राम कदम हे डफली घेऊन सरकारच्या नावानं होळीचा शिमगा साजरा करीत आहेत. फडणवीस सत्ता हातातून निसटल्यानं कासावीस झालेले आहेत. पण त्यांना याची लाज वाटत नाही, की आपण इतर छोट्या राजकीय पक्षांप्रमाणे, शिवसेनेलाही संपवायला निघालो होतो. शिवसेनेनं अनेकदा प्रामाणिकपणे, सहकार्य केले होते. परंतु भाजप जणू बाळासाहेब जाण्याचीच वाट पाहत होती. कॉंग्रेस, सेना, राष्ट्रवादी ही अविश्वसनिय आघाडी होईल, असं स्वप्नातही फडणवीसांना वाटलं नव्हतं. त्यामुळंच त्यांचा तिळपापड झाला आहे. फडणवीस एवढे उध्दट आणि किंचाळणारे असतील असं वाटलं नव्हतं. त्यांनाही हे ठाऊक आहे, की आपण सत्तेवर असतो तरी सध्याचं सरकार जे करतंय, त्यापलिकडे आपण फार काही करु शकलो नसतो. परंतु सत्ता हातातून निसटल्याचं शल्य, त्यांना बोचतंय. त्यांनी फार मनाला लावून घेतलंय. त्यामुळंच सरकारला कोंडीत पकडण्याची, एकही संधी ते सोडत नाहीत. एक विरोधी पक्ष नेता कसा असावा, याचं आदर्श उदाहरण आहे. खरोखरच ते याही परिस्थितीत, सरकारला जेरीस आणता येईल, तेवढं आणत आहेत. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे अचानकपणे घेतलेली जबाबदारी चांगली पार पाडत आहेत. त्यांचा संयम आणि विवेक वाखाणण्याजोगा आहे. ते फडणवीस आणि दरेकर यांच्या टीकेमुळे बिथरले नाहीत, की आततायीपणा दाखवत नाहीत. त्याचबरोबर आघाडीतील बेताल मंत्र्यांना जाहीरपणे न खडसावता त्यांच्या नेत्यांशी चर्चा करून प्रश्न सोडवताहेत. शरद पवारांवर फार मोठी जबाबदारी आहे. कारण सरकारचे शिल्पकार तेच आहेत. सरकार पडलं तर,त्यांच्या कौशल्यावर प्रश्नचिन्हं उभं राहिल. आणि आयुष्याचा मावळतीला ते अपयश पदरात घेऊ इच्छित नाहीत. सरकार पडणं, राहणं यापेक्षाही त्यांच्या जाणतेपणाची कसोटी पाहणारा काळ आहे. त्यामुळंच हे सरकार पाच वर्षे चालेलच, पण फडणवीस यांचे रंग, या निमित्तानं दिसले. त्याचबरोबर तावडे, खडसे, मुंढे, बावनकुळे, मुनगंटीवार यांना सत्ता असो वा नसो कटवायचंच होतं हेही स्पष्ट झालं. नागपूरचे त्यांचे सत्तेतील स्पर्धक मित्र नितीन गडकरी, हे मात्र अधूनमधून चावे घेत राहतात. त्यामुळं फडणवीस दुखावले जातात. पण तरीही त्यांचा संयम, वाखाणण्याजोगा आहे. उध्दव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांनाही आपापल्या भूमिका योग्य प्रकारे निभावताहेत त्याबद्दल धन्यवाद आणि पुढेही अशीच कामगिरी बजावतील यासाठी राज्याचा नागरिक म्हणून शुभेच्छा!

हरीश केंची
९४२२३१०६०९

No comments:

Post a Comment

लोकशाही की एकाधिकारशाही...!

"देशात लोकशाहीचा उत्सव सुरू आहे, पण सत्ताधारी  लोकशाही संसदीय ऐवजी अध्यक्षीय असल्यासारखे वागताहेत. सामूहिक नेतृत्व सांगणारा...