Friday 17 August 2018

अटलजींची चरित्रे आणि काव्य प्रतिभा!

 चौदावे प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी ह्यांचं आयुष्य आतापर्यंतच्या सर्व प्रधानमंत्र्यांपेक्षा जर वेगळं आहे. त्यांना आताशी स्मृतिभ्रंश झाला होता. पण काही वर्षांपूर्वी त्यांच्या आयुष्यातील एकेक घटना पाहिल्या की, त्यांचेच शब्द आठवतात. 'मला सगळ्या गोष्टी मिळतात, पण उशिरा!' हे आठवायचं कारण आता त्यांच्या आयुष्यातील अखेरच्या काळात त्यांची भराभर चरित्रं आणि पुस्तकं येऊ लागली आहेत. त्याची सुरुवात झाली 'मेरी एकावन्न कविताए' पासून! हा काव्यसंग्रह धडाक्यात खपला. मराठीत देखील 'गीत नवे गातो मी' नावानं त्याचा अनुवाद झाला. हे पुस्तक देखील झपाट्यानं खपलं. सध्या ते पुस्तक उपलब्ध नाही.
हा कवितासंग्रह चार आवृत्या झपाट्यानं खपल्या तरी वाजपेयींना त्याचं कारण चांगलंच माहिती असावं. कारण तिसऱ्या आवृत्तीला त्यांनी 'दोन शब्द' लिहावेत म्हणून आग्रह झाला तेव्हा ते म्हणाले, 'यह कैसे भाई दो संस्करण बिक गया तो फिर नये संस्करणके लिये दो शब्द की क्या आवश्यकता?' पण मग खूपच आग्रह झाल्यावर त्यांनी लिहिलं. ' मुझे यह जानकर खुशी हुई हैं कि मेरी कविताओंके इस संग्रहका तिसरा संस्करण प्रकाशित होणे जा रहा हैं। मैने कभी सोचाभी नहीं था कि मेरी ये कविताये छपेगी, चावसे पढी जायेगी और पढनेवाले उन्हे खरीदकर पढेंगे। यदी खुली अर्थव्यवस्थाके शब्दोमें कहना हो तो मेरा बाजारभाव उंचा हैं और फिलहाल उसके गिरनेकी कोई आशंका नहीं हैं। मै जानता हुं की मेरे पाठक कविताके प्रेमी इसलीये हैं कि वे इस बातसे खुश हैं कि मैने राजकीय रंगीस्तानमे रहते हुये भी, अपने ह्रदयमें छोटीसी स्नेह सलीला बहाए रखता हुं। मै अपने पाठकोको ह्रदयसे धन्यवाद देता हुं और उनके अपनत्वको जीवनका संबल मानकर चलता हुं।'
हा प्रकार सुरू असतानाच अटलजींची चरित्रे यायला सुरुवात झाली. सर्वप्रथम अटलजींचे एकेकाळचे लखनौतील सहकारी पत्रकार डॉ. चंद्रिकाप्रसाद शर्मा यांचं 'कवी राजनेता अटलबिहारी वाजपेयी' हे चरित्र आलं. त्याच्या जोडीलाच शर्मा यांनीच संपादित केलेलं अटलजींची भाषणं-लेख असलेलं पुस्तकही आलं. मग ह्याचाच आधार घेऊन थोडं इकडं तिकडं करून ८-१० पुस्तकं बाजारात आली. ह्या सगळ्या वातावरणाचा परिणाम म्हणून असेल, 'आपकी अदालत'फेम रजत शर्मा यांनी देखील जगविख्यात पेंग्विन प्रकाशनासाठी अटलजींचं चरित्र लिहिलं.

अर्थात, ही हवा मराठीत शिरणं साहजिकच होतं. अनेक प्रकाशकांची धावपळ सुरू झाली. उत्कर्ष प्रकाशनाच्या सु.वा.जोशी यांनी डॉ. चंद्रिकाप्रसाद शर्मा यांच्या पुस्तकाचे मराठी अनुवादाचे हक्क घेऊन इंदूरच्या बाळ उर्ध्वरेषे यांच्याकडं सोपवलं. दरम्यान प्रभात प्रकाशनाच्या शिवा घुगे यांना देखील वाजपेयींचं चरित्र काढावंस वाटू लागलं. ते त्याच्यासाठी चरित्रकाराचा शोध घेऊ लागले. मुंबईच्या 'रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी'च्या ग्रंथालयातील अटलजींच्या पुस्तकाची मागणी वाढली. त्यात पुण्याच्या चंद्रकला प्रकाशनाची वाजपेयी चरित्राची जाहिरात झळकली. लेखिका होत्या ज्येष्ठ पत्रकार जयश्री देसाई. इंदूरच्या उर्ध्वरेषे यांचं अनुवाद तयार झाला पण सु.व.जोशीकडं ते रखडलं. दरम्यान १२ जून ९८ ला नानाजी देशमुखांच्या हस्ते पुण्यात जयश्री देसाईंच्या पुस्तकाचं प्रकाशनही झालं.

अटलजींनी एम.ए च्या बरोबरीनं एल.एल.बी ची परीक्षा द्यायचं ठरवल्यावर नोकरीतून निवृत्त झालेल्या त्यांच्या वडिलांनाही कायद्याचं शिक्षण घ्यावसं वाटलं. त्यामुळं एल.एल.बीच्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी  तेही अटलजींबरोबर कानपूरला आले. ...दोघे होस्टेलमध्ये एकाच खोलीत राहत असत. अशी दुर्मिळ माहिती ह्या पुस्तकात आढळते. शिवाय ह्या पुस्तकात अटलजींच्या सर्व पुस्तकांची नोंद आढळते. अटलजींच्या नावावर गद्य लेखनाची पाच पुस्तकं तर कवितांची दोन पुस्तकं आहेत. 'कैदी कविराय की कुंडलिया' आणि 'मेरी एक्यावन कविताये' हे दोन कवितासंग्रह. 'मृत्यू या हत्या' हे पुस्तक श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या गूढ अपमृत्यूवर आहे. दुसरं पुस्तक 'जनसंघ और मुसलमान' असून त्यात जनसंघाच्या मुसलमानांविषयीच्या धोरणाची चर्चा आहे. पण हे आजही उपलब्ध होत नाही. अन्य तीन 'कुछ लेख, कुछ भाषण', 'राजनीती और रपरिली राहें', आणि 'बिंदू बिंदू विचार' ही पुस्तकं चंद्रिकाप्रसाद यांनीच संपादित केली आहेत.

बाळ उर्ध्वरेषे यांनी अनुवादित केलेल्या चंद्रिकाप्रसाद शर्मा यांच्या पुस्तकातून अटलबिहारी वाजपेयींच्या जीवनाची योग्य मांडणी झाली आहे. याचं कारण शर्मा वाजपेयींचे निकटवर्तीय असूनसुद्धा त्यांच्या दोषांवर बोट ठेवायला ते कचरले नाहीत. विशेष करन १९८१ मघ्ये 'वीर प्रताप' या साप्ताहिकात त्यांची मुलाखत प्रसिद्ध झाली होती. ती त्यांनी उद्धृत केली आहे
'आपको विवाह न करनेका खेद हैं?
त्यावर वाजपेयींचं उत्तर आहे.
'कई बार मुझे इस बातका खेद मुझे अवश्य होता हैं। यदि मै विवाहित होता तो कई प्रकारकी भ्रांतीया और भ्रामक कहानीया न फैलती। लोग समझते हैं हर कुंवारा आदमी महिलाओंका केंद्र होता हैं।'
दुसरा प्रश्न आहे. - क्या आप ब्रह्मचारी हैं? कुंवारे भी ...की दोनो हैं।'
त्यावर वाजपेयी म्हणतात, 'मै केवल कुंवारा व्यक्ती हुं।
वाजपेयींनी कुठलाही आडपडदा न ठेवता या खोट्या तत्वज्ञानाचा आडोसा न घेता जे उत्तर दिलं ते संस्मरणीय असंच आहे. ह्या उत्तरानं वाजपेयींबद्धलचं आपलं मत जरा देखील वाईट होत नाही. इतर मात्र कुणी वाजपेयी चरित्रकार या विषयकडं वळतच नाहीत. अटलबिहारी मात्र एकूणच सगळ्यांबाबतीत स्पष्ट आहेत. त्यांना भ्रमदेखील नाही. त्यांच्या पहिल्या कविता संग्रहाच्या प्रकाशनानंतर त्यांनी शिवमोहनलाल श्रीवास्तव यांना पत्र लिहिलं होतं ते त्या दृष्टीनं पाहण्यासारखं आहे. वाजपेयी लिहितात. मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाची संकल्पशक्ति, भगवान श्रीकृष्णाची राजनैतिक कुशलता और आचार्य चाणक्याची निश्चयात्मिका बुद्धि. त्यांनी आपल्या जीवनातील क्षण-क्षण आणि शरीरातील कण-कण राष्ट्रसेवासाठी यज्ञात समर्पित केलंय.....

अटलजींची काव्यप्रतिभा
अटलजी यांचे एक राजकारणी त्यातही पंतप्रधान म्हणून मुल्यमापन अनेक आयामांमधून करण्यात आले आहे. त्यांची भाषणे, कविता तसेच अन्य लिखाण आणि एकंदरीतच व्यक्तीमत्वाचाही विविधांगी मागोवा घेण्यात आला आहे. मात्र अटलजींचे काव्य, त्यांचे जीवन आणि आजचे राजकीय संदर्भ नव्याने तपासून पाहिले असता काही अभिनव बाबींचे आपल्याला आकलन होते. आज याबाबतच….

अटलजींनी आपले काव्य, त्याप्रती असणारे प्रेम आणि अंत:स्फुर्तीवर अनेकदा भाष्य केले आहे. यातच एकदा ते म्हणतात, “मेरी कविता जंग का ऐलान है, पराजय की प्रस्तावना नही। वह हारे हुए सिपाही का नैराश्य-निनाद नहीं, जूझते योद्धा का जय-संकल्प है। वह निराशा का स्वर नहीं, आत्मविश्वास का जयघोष है” यामध्ये त्यांनी आपले जीवन आणि काव्यातील अतुट संबंध काही शब्दांमध्ये अतिशय चपखलपणे नमुद केला आहे. काव्यातील हाच ‘आत्मविश्‍वासाचा जयघोष’ त्यांना आपल्या वाटचालीत उभारी देणारा ठरला. अनेक चढउतार अनुभवत आणि हलाहल पचवून यशाचे गौरीशंकर गाठतांनाही त्यांना कधी अहंकाराने ग्रासले नाही. खरं तर अटलजी हे फार मोठे कवि नाहीत. त्यांच्याकडे उत्तुंग प्रतिभा आणि जगाला चकीत करणारे शब्द भांडारही नव्हते. काव्याच्या कसोटीवर मूल्यमापन केले असता हे अन्य मान्यवरांच्या तुलनेत कुठेही टिकू शकणार नाहीत. मात्र सहा दशकांपेक्षा जास्त राजकीय आणि सामाजिक वावरतांना संवेदनशीलपणे अनुभवलेल्या क्षणांसाठी त्यांनी विलक्षण सुलभ अभिव्यक्तीचा वापर केला आहे. वाजपेयी घराण्यातच काव्याचा तेजस्वी वारसा होता. त्यांचे आजोबा हे संस्कृत तर वडील खडीबोली आणि ब्रज भाषेतील रचियते होते. अर्थात कालानुरूप अटलजींनी सुलभ हिंदीचा वापर केला. जी अगदी प्रवाही अगदी समर्पक शब्दांत सांगायचे तर प्रासादिक म्हणून वाखाणण्यात आली. त्यांच्या प्रारंभीच्या सृजनावर हिंदीतील विख्यात कवि तथा त्यांचे मित्र डॉ. शिवमंगलसिंग सुमन यांचा प्रभाव असल्याचे समीक्षकांचे मत आहे. अगदी त्यांची विख्यात ‘गीत नया गाता हू’ ही कविता तर थेट सुमन यांच्याच शैलीत सादर करण्यात आली आहे.

टूटे हुए तारों से फूटे बासंती स्वर,
पत्थर की छाती में उग आया नव अंकुर,
झरे सब पीले पात,
कोयल की कूक रात,
प्राची में अरुणिमा की रेख देख पाता हू्ं।
गीत नया गाता हूँ्।

टूटे हुए सपनों की सुने कौन सिसकी?
अंतर को चीर व्यथा पलकों पर ठिठकी।
हार नहीं मानूँगा,
रार नहीं ठानूँगा,
काल के कपाल पर लिखता मिटाता हूँ्।
गीत नया गाता हूँ्।

यातील ‘हार नहीं मानूँगा, रार नहीं ठानूँगा’ या दुर्दम्य आशावादाने काळाच्या कपाळावर आपली कर्तृत्वगाथा लिहण्याचा संकल्प त्यांच्या काव्यात सर्वत्र आढळतो. अगदी भाजपची स्थापना झाल्यानंतर त्यांनी उत्स्फुर्तपणे काढलेले ‘अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा और कमल खिलेगा’ हे वाक्य तर काळानेच पुढे खरे ठरविल्याचे आपण पाहिले आहे. याचप्रमाणे ‘दांव पर सब कुछ लगा है, रूक नही सकते । टूट सकते है मगर हम झुक नही सकते ॥’ अशा पध्दतीने परिस्थितीशी निकराने झुंज घेण्याची सकारात्मकता त्यांच्या काव्यात आहे. अटलजी स्वत: ज्या विचारांच्या मुशीत घडले त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सांस्कृती राष्ट्रवाद हा त्यांच्या काव्यात आपसूकच स्त्रवला. यात राष्ट्र आराधनासह भारतमाता, आसेतु-हिमाचल राष्ट्रीय ऐक्य, बलशाली राष्ट्राची उभारणी, अखंड भारत आदी प्रतिमांचा मुक्त वापर करण्यात आला आहे. मात्र यात फक्त इतिहासाचेच गौरवगान नसून दाहक वर्तमान आणि उज्ज्वल भविष्यालाही तितकेच महत्वाचे स्थान देण्यात आले आहे. ‘दिन दूर नहीं खंडित भारत को पुनः अखंड बनाएँगे। गिलगित से गारो पर्वत तक आजादी पर्व मनाएँगे॥’ या पंक्ती याच्याच निदर्शक आहेत. तर त्यांच्या काव्यात काही वैयक्तीक अनुभुतीदेखील आहेत.

चौराहे पर लुटता चीर
प्यादे से पिट गया वजीर
चलूँ आखिरी चाल कि बाजी छोड़ विरक्ति सजाऊँ?
राह कौन सी जाऊँ मैं?

सपना जन्मा और मर गया
मधु ऋतु में ही बाग झर गया
तिनके टूटे हुये बटोरूँ या नवसृष्टि सजाऊँ मैं?
राह कौन सी जाऊँ मैं?

दो दिन मिले उधार में
घाटों के व्यापार में
क्षण-क्षण का हिसाब लूँ या निधि शेष लुटाऊँ मैं?
राह कौन सी जाऊँ मैं ?

या कवितेत निर्णयातील जटिलतेचा सनातन मनोसंघर्ष रंगविण्यात आला आहे. मात्र भावना आणि कर्तव्यातील संघर्षात कुठल्या मार्गाचा अंगिकार करावा हे त्यांना ज्ञात आहे. म्हणूनच ते स्पष्टपणे म्हणतात:-

आग्नेय परीक्षा की
इस घड़ी में-
आइए, अर्जुन की तरह
उद्घोष करें :
“न दैन्यं न पलायनम।”

अर्थात आयुष्यातील अनेक कटू प्रसंगांमधूनही त्यांनी कधी पलायनवाद स्वीकारला नाही. मात्र समकालीन राजकारणातील काही बाबींमुळे त्यांची अस्वस्थता काव्यातून स्त्रवते तेव्हा कठोर प्रहारदेखील करते.

कौरव कौन
कौन पांडव,
टेढ़ा सवाल है।
दोनों ओर शकुनि
का फैला
कूटजाल है।
धर्मराज ने छोड़ी नहीं
जुए की लत है।
हर पंचायत में
पांचाली
अपमानित है।
बिना कृष्ण के
आज
महाभारत होना है,
कोई राजा बने,
रंक को तो रोना है।

या ओळी आजच्या स्थितीवर मार्मिक भाष्य करणार्‍या नव्हेत काय? अर्थात आजच्या युगातल्या ‘कृष्णाविना महाभारता’तल्या कोलाहलात अटलजींसारख्या उत्तुंग व्यक्तीमत्वांची महत्ता अजूनच ठसठशीतपणे अधोरेखित होते. आपल्या आयुष्यात यशासाठी काळाशी झुंज घेत शिखर गाठण्याचा आशावाद बाळगणारे अटलजी हे मात्र यशस्वी झाल्यावर जमीनीशी जुळलेली नाळ तुटू नये अशी ईश्‍वराजवळ प्रार्थना करतात.

धरती को बौनों की नहीं,
ऊँचे कद के इन्सानों की जरूरत है।
इतने ऊँचे कि आसमान छू लें,
नये नक्षत्रों में प्रतिभा की बीज बो लें,
किन्तु इतने ऊँचे भी नहीं,
कि पाँव तले दूब ही न जमे,
कोई कांटा न चुभे,
कोई कलि न खिले। न वसंत हो, न पतझड़,
हों सिर्फ ऊँचाई का अंधड़,
मात्र अकेलापन का सन्नाटा।

मेरे प्रभु!
मुझे इतनी ऊँचाई कभी मत देना,
गैरों को गले न लगा सकूँ,
इतनी रुखाई कभी मत देना।

यशाच्या शिखरावरील विलक्षण एकीकीपणाची अनुभुती घेणार्‍या वाजपेयींच्या या ओळीला स्वानुभुतीचा आयाम आहे. आकाशाला गवसणी घालतांना जमीनीचे नातेदेखील तितकेत महत्वाचे असल्याचेही त्यांनी यातून स्पष्ट केले आहे. विशेषत: सध्याच्या राजकारणातील स्वमग्न उन्मत्तपणाच्या पार्श्‍वभूमिवर त्यांचा हा नम्रपणा विशेष उठून दिसतो. त्यांच्या ‘आओ फिर से दिया जलाये’ आदींसारख्या काही कविता तर जनमानसात चांगल्याच रूजल्या आहेत. अनेकदा त्यांचे उध्दरण होते. यातील ओळी दुर्दम्य आशावादाच्या प्रतिक बनल्या आहेत. आज अटलजी अत्यंत विकल अवस्थेत आहेत. आयुष्यभर सार्वजनिक जीवनात व्यतीत केलेल्या आणि विशेषत: आपल्या ओजस्वी भाषणांनी देशवासियांना मंत्रमुग्ध करणार्‍या या महान व्यक्तीमत्वाचा ‘आवाज’ व्याधींनी हिरावून घेतलाय, काळाचा हा क्रूर खेळच मानावा लागेल. स्वत: त्यांनी आपल्या एका कवितेत वार्धक्याची चाहूल अशी व्यक्त केली आहे.

जीवन की ढलने लगी सांझ
उमर घट गई
डगर कट गई
जीवन की ढलने लगी सांझ।

बदले हैं अर्थ
शब्द हुए व्यर्थ
शान्ति बिना खुशियाँ हैं बांझ।

सपनों में मीत
बिखरा संगीत
ठिठक रहे पांव और झिझक रही झांझ।
जीवन की ढलने लगी सांझ।

आज आयुष्याच्या उत्तरायणात या नेत्याच्या मनात नेमके काय असेल हो? मला तर अटलजींसोबत आज अशाच जर्जरावस्थेच्या स्थितीत असणारे जॉर्ज फर्नांडीसही अवचितपणे आठवले…आणि काळाचा महिमाही जाणवला !

यातच अत्यंत विकल अवस्थेत असणार्‍या अटलजींची ही कविता बरेच काही सांगून जाणारी आहे.

मैंने जन्म नहीं मांगा था,
किन्तु मरण की मांग करुँगा।

जाने कितनी बार जिया हूँ,
जाने कितनी बार मरा हूँ।
जन्म मरण के फेरे से मैं,
इतना पहले नहीं डरा हूँ।

अन्तहीन अंधियार ज्योति की,
कब तक और तलाश करूँगा।
मैंने जन्म नहीं माँगा था,
किन्तु मरण की मांग करूँगा।

बचपन, यौवन और बुढ़ापा,
कुछ दशकों में ख़त्म कहानी।
फिर-फिर जीना, फिर-फिर मरना,
यह मजबूरी या मनमानी?

पूर्व जन्म के पूर्व बसी—
दुनिया का द्वारचार करूँगा।
मैंने जन्म नहीं मांगा था,
किन्तु मरण की मांग करूँगा।

काल के कपाल पर लिखता मिटाता हूँ ।*
इतक्या भव्यदिव्य व्यक्तीमत्वाच्या जीवनाचा आढावा हा खंडप्राय ग्रंथाचा विषय असतो आणि त्यातल्या चढउतार वा घडामोडींचा आलेख एका लेखाच्या मर्यादेत बसणारा नसतो. नेहरूयुगाचा साक्षीदार आणि त्यांच्या नातसुनेच्या विरोधाला सामोरे जाण्यापर्यंतचा कालखंड, अफ़ाट लांबीचा व प्रदिर्घ आहे. त्यातली शालीनता आजच्या राजकारणी पिढीला कितपत समजू शकेल? त्यांच्यातला नेहरूवाद आणि हिंदूत्व कसे वेगळे काढायचे, तेही समजू शकणार नाही. डाव्या आणि उजव्या राजकीय मतप्रवाहांचा मध्यबिंदू, असे हे राजकीय व्यक्तीमत्व होते. राजकीय भूमिकांच्या बाबतीत कडव्या मानल्या जाणार्‍या मतप्रवाहाच्या मुशीत घडलेला उदारमतवादी नेता, हाच मुळातला चमत्कार आहे. पण त्याची आणखी एक दुसरी बाजू म्हणजे कोवळ्य़ा तरूण वयात त्यांनी ज्या विचारांची कास धरून नेहरूयुगाला आव्हान उभे केलेले होते, त्याची पाळेमुळे भारतीय समाजमनात खोलवर रुजवण्यात त्यांची हयात खर्ची पडली. आज भाजपा पुर्ण बहूमताने सत्तेत आहे, त्याचे श्रेय अटलजींना द्यावे लागेल. जनसंघाच्या रुपाने जो नवा राजकीय मतप्रवाह १९५० च्या दशकात आरंभ झाला होता, त्याच्यासमोर कॉग्रेस हे अक्राळविक्राळ आव्हान होते. सात दशकानंतर उलटी स्थिती आलेली आहे. हा आमुलाग्र फ़रक समजून घ्यायचा, तर अटलजींचेच शब्द समजून घेतले पाहिजेत. काळाच्या कपाळावर विधीलिखीत मी लिहीतो, असा त्यातला आशय आहे. तो दुर्दम्य आत्मविश्वास किंवा इच्छाशक्तीच त्यांच्या पक्षाला इथवर घेऊन आलेली आहे. त्यांच्या भक्त अनुयायांना त्यातली तपस्या किती उमजली आहे? मग त्यांच्याच विरोधकांना तरी कितपत समजू शकेल? राजकारणात वा समाजकारणात बदलाचे कंकण हाती बांधलेल्यांना अशक्य कोटीतल्या गोष्टी शक्य करण्याची आकांक्षा मनाशी बाळगावी लागते. त्यात नियती वा नशिब या शब्दांना कुठलेही स्थान नसते, ह्याचे मुर्तिमंत स्वरूप म्हणून अटलजी राजकीय जीवन जगले. अखेरच्या काही वर्षात त्यांना विस्मरणाच्या स्मृतीभ्रंशाच्या व्याधीने ग्रासलेल्या अवस्थेत काढावे लागले. पण त्यांच्यापुरती ही विस्मृती मर्यादित होती काय? की अवघ्या राजकारणालाच विस्मृतीच्या व्याधीने आज ग्रासलेले आहे? राजकीय क्षेत्रात वावरणा‍र्‍यांना नेहरूंची उदात्तता समजत नाही, की अटलजीं जगलेल्या उदारतेचा लवलेश प्रभावित करत नाही. एकमेकांच्या उरावर बसणारे व एकमेकांना हीन लेखण्यात धन्यता मानणारे आजचे राजकारण, अटलजींना किती भावले असते? अशा काळात आपल्या प्रगल्भ राजकीय स्मृती व अनुभवांना किड लावणार्‍या राजकारणाने ते अधिकच व्यथित झाले नसते काय? काळाच्या कपाळावर आपण कुठले भाकित लिहून बसलो, अशा विचारांनी त्यांना अधिकच दु:खी केले नसते काय? की त्यात पडण्यापेक्षा त्यांनी विस्मृतीत स्वत:ला लपेटून काळाच्या कुशीत विसावण्य़ाची मानसिक तयारी खुप आधी केली होती? सत्तेच्या कुठल्याही पदावर आरुढ नसताना आज त्यांच्यासाठी हळहळणारा भारत म्हणूनच त्या स्मृती परत जागवत असेल ना?

-हरीश केंची
९४२२३१०६०९

No comments:

Post a Comment

मोदींचं ठाकरे प्रेम.....?

"गोध्रा हत्याकांड, दंगलीनंतर मोदींची गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावरून उचलबांगडी करायचं वाजपेयी अडवाणी यांनी ठरवलं होतं. पण शिव...