Saturday 11 August 2018

कुणा स्वातंत्र्य...कुठंय स्वातंत्र्य...!

आज स्वातंत्र्यासाठी वाहून घेतलेली पिढी संपली अन स्वातंत्र्यात वाहून गेलेली पिढी शिल्लक आहे! जगाच्या मयसभेत भारतमातेचं वस्त्रहरण होताना त्याला धृतराष्ट्रासारखं डोळ्यावर पट्टी बांधून आंधळं व्हावं लागतं आहे. एकाबाजूला पाकिस्तान, चीन, बांगलादेश, श्रीलंका या राष्ट्रांनी आपल्यासमोर सवतासुभा उभा केलाय. बाह्य सीमेवरील या शत्रूंचा मुकाबला तरुणांना करावा लागतोय, तर एतद्देशीय शत्रूंशीही सामना करावा लागतोय. देशात दहशतवादाला पूरक वातावरण करणाऱ्यांच्या विरोधात, अतिरेकी कारवाया करणाऱ्यांच्या, विरोधात लढावं लागतंय. सत्ताधाऱ्यांच्या नेभळट धोरणाशी मुकाबला त्याला करावा लागतो आहे. मघाशी म्हटल्याप्रमाणे स्वातंत्र्याच्या लढ्यात स्वातंत्र्यसैनिकांनी जो लढा दिलाय त्यातून अधिक तीव्रतेचा लढा देण्याची जबाबदारी तरुणांवर येऊन ठेपलीय! पण मनांत इच्छाशक्ती आहे की, 'बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो' अन त्यासाठीच आपल्याला वाटचाल करायची आहे, मार्गक्रमण करायचं आहे. पण धर्मवाद्यांनी, जातवाद्यांनी त्यांच्या मार्गात अडथळे निर्माण केले आहेत. त्याला रोखण्याची गरज आज निर्माण झालीय. स्वातंत्र्याची, रामराज्याची स्वप्न ज्यांची साठ-सत्तर वर्षांपूर्वी पाहिली त्यांच्या मनांत प्रश्न उभारतोय, याचसाठी हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिलीय का? त्यांना प्रश्न पडलाय कुणा स्वातंत्र्य? कुठेय स्वातंत्र्य...!"
----------------------------------------------

*ये* त्या बुधवारी स्वातंत्र्याचा एकाहत्तरावा वर्धापनदिन साजरा होतोय. स्वातंत्र्यलढ्याला देखील एकशे साठहून अधिक वर्षाचा कालावधी लोटलाय; पण देशांत स्वातंत्र्याचा अर्थ स्वैराचारानं घेतलाय. जाती-धर्माचा अभिनिवेश वाढीला लागलाय. या अभिनिवेषापायी देशाचं विघटन होईल की काय अशी भीती वाटू लागलीय. जातिजातीत युद्ध पेटेल की काय असं वातावरण निर्माण झालंय. सत्ताधारी आणि सत्ताकांक्षी देशाचं काय वाटेल ते होऊ दे, माझं भलं झालं पाहिजे अशा पद्धतीनं वागताना दिसतात. सत्ताधाऱ्यांकडून, सत्तेकडून आपलं भलं होईल ही सामान्य माणसाची आशाच नष्ट झालीय. आम्ही स्वातंत्र्य मिळवताना देशाचे तुकडे केले  आणि भारतीय समाजाचेही तुकडे तुकडे होऊन समाज विखुरला गेलाय. भारतीयांनी आपली अवस्था आपल्याच अंगावर आसूड ओढून घेत रक्तांच्या चिळकांड्या उडवणाऱ्या कडकलक्ष्मीसारखी करून घेतलीय! स्वतंत्र भारत हा एकात्म भारत आहे असं जाणवत नाही. धार्मिक, जातीय, भाषिक, वर्गीय, वर्णीय भेदांनी भारतीयांमध्ये परस्परांमध्ये द्वेष गैरसमज, अविश्वास निर्माण झालाय, तो वाढतोच आहे. खरा धर्म जाणून घेण्याची, त्या धर्मानुसार वागून समाजाचं सामर्थ्य, ऐक्य वाढविण्याची आमची कुवत राहिलेली नाही. नको त्या कर्मकांडात आणि समाजाला ज्याचा कुठलाच लाभ नाही अशा दाखवेगिरीच्या धार्मिकतेतच आम्ही अधिकाधिक गुंततो आहोत. स्वातंत्र्यपूर्व काळात आपण जेवढे भारतीय होतो, एकसंघ होतो तेवढे भारतीय, तेवढे एकसंघ आपण आहोत का? तेवढे एक नाही हे तपासण्याची सुद्धा जरुरी नाही, हे आपल्यातल्या लाथाळीनेच जगजाहीर झालं आहे. स्वातंत्र्य मिळविलं ते कशासाठी, कुणासाठी ह्याचं भान आमच्यातल्या सुशिक्षित, प्रस्थापित वर्गानं ठेवलं नाही. काँग्रेसचा भारतीय राजकारणातला मुख्य चैतन्यदायी स्रोत. ह्या स्रोताचा प्रभाव लक्षांत घेतला की, आपण देवाच्या आळंदीऐवजी चोरांच्या आळंदीला कसे पोहोचलो हे लक्षांत येईल.

*धर्मवाद्यांनी उच्छाद मांडलाय!*
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतीयांना 'भारतीय' म्हणून ओळख पटवून देण्यात आपण अयशस्वी झालो आहोत. स्वातंत्र्यदिनी लालकिल्ल्यावरून भाषण देताना पंतप्रधान भारत एक धर्मनिरपेक्ष-सेक्युलर स्टेट आहे, अशी नेहमीप्रमाणे आळवणी करतील. निधर्मीपणाची उजळणी करतील; पण प्रत्यक्षात काय आहे? भारताच्या निधर्मीपणाची ओळख सर्वधर्मसमभाव, समावेशकता अशी आहे. भारताचा निधर्मीपणा हा धर्म, धर्मवादाला संपविण्यासाठी नाही तर धर्मांधता आणि त्या आडोशानं पोसल्या जाणाऱ्या वर्णवर्चस्ववादाला, जातीवादाला संपविण्यासाठी आहे. अशा सेक्युलर भारतात सध्या धर्मवाद्यांचा, जातिवाद्यांचा खेळ जोरात सुरू आहे. देशाच्या पूर्वेकडील राज्यांत ओरिसा, केरळ, छत्तीसगढ, झारखंड, बिहार, पूर्वांचल या भागात धर्मातराचा खेळ सुरूच असतो. धर्म ही जशी व्यक्तिगत बाब आहे, तशीच ती विचारांनं करण्याची बाब आहे. पण यात लवचिकता पहा किती आहे, 'प्रभू येशू, या पामराचा तुझ्यावर विश्वास आहे, तू ह्यांच्या मागील सर्व पापांना माफ कर, त्यांच्या प्रार्थनेचा स्वीकार कर' या प्रार्थनेसरशी ख्रिस्ती झालेली व्यक्ती तशाच एक झटक्यांत 'हिंदव:सोदराह सर्वेन हिंदू पतितो भवेत' या मंत्रोच्चारणाने पुन्हा हिंदू होते. अल्लावर भरवसा दाखवला की मुस्लिम होते. 'बुद्धम शरणम गच्छामी... संघम शरणम गच्छामी' म्हणताच बौद्ध होते हा धर्मातराचा, पूर्वधर्मातराचा खेळ सुरू आहे. ख्रिस्त्यांच्या खुल्या, बौद्धांच्या छुप्या, इस्लामीच्या उन्मादी आणि हिंदूंच्या गर्वपर्वाच्या धर्मवादी चाळयांकडे पाहिले की, ग्लोबल मार्केटिंगच्या आजच्या जमान्यात 'धर्म'देखील एक प्रॉडक्ट मानून त्याचा प्रचार प्रसार केला जातो आहे. भारतात धर्मव्यापाराचा खुला खेळ होणं आणि राजकारणासाठी धर्मवादाचं समर्थन आणि विरोध असा दुधारी हत्यारासारखा वापर होणं हे भारताच्या सेक्युलर या ओळखीवर 'वार' करण्यासारखं आहे. अशा वार करणाऱ्यांना साथ देणारे जितके राष्ट्रघातकी आहेत; तितकेच त्यांच्याकडे सत्तासोयीसाठी दुर्लक्ष करणारे आणि त्यांना सहन करणारेही राष्ट्रघातकी आहेत.

*सारेच मुखवटाधारी बनलेत*
माणूस हा बुद्धिजीवी प्राणी आहे. तसाच तो परिवर्तनशील आणि प्रगतिशील आहे. धर्मकल्पना कितीही उदात्त असली तरी ती स्थितिशील आहे. धर्माचा वाढ, विस्तार झाल्यानं संबंधित समस्त धर्मियांचा विकास झालाय असा इतिहास नाही. आणि वर्तमानही नाही. किंबहुना धर्मबंधनाने आंतरिक वर्चस्ववाद वाढला. भेद-पोटभेद माजले, लोकांचा मानसिक विकास खुंटला. राष्ट्र हुकूमशहांच्या, विदेशी साम्राज्यशाहीच्या कब्जात गेलाय. असा इतिहास आहे. भारताच्या स्वातंत्र्याचा लढा कुण्या धर्मवाद्यांनी अथवा धर्मवादी संघटनांनी लढलेला नाही. तो धर्माला राजकारणापासून, सत्तेपासून दूर ठेवणाऱ्यांनीच लढलेला आहे. तेव्हा धर्मातीत विचाराने राजकारण आणि राज्यकारण होईल तेव्हाच भारताची 'सेक्युलर' ओळख उजाळेल, अशी वस्तुस्थिती नाही. कारण सत्ताधारी आणि सत्ताकांक्षी दोघेही सेक्युलरवादाचा मुखवटा धारण करून वावरताहेत. धर्म आणि धर्मवाद कुठलाही असो; त्याचं दुसरं टोक धर्मबांधवांचं शोषण आणि दहशतवाद हेच आहे. लोकशाहीचा व्यवहार आणि कायदा हा लोकांना सामाजिक सुरक्षा देणारा, विकासाची हमी देणारा, समाजातील भेदभाव नष्ट करणारा, आधुनिक जीवनदृष्टी देणारा असतो. त्याला छेद देण्याचं काम लोकशाही विरोधक करीत असतात. पूर्वी त्यासाठी सामाजिक उच्च नीचता जोपासणाऱ्या नि भांडवलदारांच्या पैशाचा आणि वतनदार, जमीनदारांचा वापर केला गेला. सध्या त्यासाठी धर्म, धर्मवाद आणि धर्मातराचा खेळ खेळला जातो आहे. यावर भारतीय संविधानातल्या तरतुदी कठोरपणे वापरण्याचा आग्रह हाच जालीम उपाय आहे, तरच भारताची सेक्युलर स्टेट आणि त्याच बरोबर प्रजासत्ताक राष्ट्र अशी ओळख होऊ शकेल.

*तरुणांवर दुहेरी जबाबदारी येऊन ठेपलीय*
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर धर्मवाद्यांनी उचल खाल्ली. स्वातंत्र्य आल्याने इथल्या पिचलेल्या लोकांमध्ये चैतन्य खुलेल अस वाटत होतं. जे जे व्हायला हवं असं वाटत होतं, त्या सगळ्याचा विध्वंस झालाय, साऱ्या इच्छा, आकांक्षा, कल्पनांचा दारुण पराभव झालाय. स्वातंत्र्यात माणसं अंधश्रद्ध, अज्ञान यांच्यापासून मुक्त झालेलं असतील, आपले हक्क, आपली बुद्धी याचा या माणसाला विचारपूर्वक जाणीव झालेली असेल. कर्मसिद्धांत न मानणारा, विभूतीपूजेत न गुंतलेला, ईश्वरी संकेतांची पळवाट दाखवून प्रत्येक मैदानातून ऐनवेळी पसार न होणारा, स्वकर्तृत्वावर, स्वबुद्धीवर विश्वास असलेला जागृत झुंजार मानवतावादी माणूस स्वातंत्र्यात असेल, असा आमचा समज होता. लोकशाही कशी असावी याचा आदर्श आम्ही जगापुढं ठेवू, असं आम्ही म्हणत असू, मानत असू. स्वातंत्र्य आले आता गांधीबाबांना हवं असलेलं रामराज्य येणार असं वाटत असतानाच गांधीजींना 'राम' म्हणावं लागलं. आणि गांधीजी गेल्यानंतर या देशात गरिबांची वास्तपुस्त करणारा, त्यांच्यासाठी प्राण लावून उभा राहणारा, त्यांचे अश्रू पुसणारा कुणी राहिलाच नाही. आज सर्वत्र दिसताहेत ते सत्तापिपासू! त्यांच्या या सत्ता लालसेनं सगळेच पणाला लागलेलं आहे. आज देशातील तरुणासमोर स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसैनिकांपेक्षा मोठी जबाबदारी येऊन पडली आहे. सुदैवाने स्वातंत्र्यपूर्व काळातील तरुणांसमोर स्वातंत्र्यप्राप्ती हेच केवळ ध्येय्य होते अन शत्रू देखील एकच होता...इंग्रज! आज ती परिस्थिती नाही. जगाच्या मयसभेत भारतमातेचं वस्त्रहरण होताना त्याला धृतराष्ट्रासारखं डोळ्यावर पट्टी बांधून आंधळं व्हावं लागतं आहे. एकाबाजूला पाकिस्तान, चीन, बांगलादेश, श्रीलंका या राष्ट्रांनी आपल्यासमोर सवतासुभा उभा केलाय. बाह्य सीमेवरील या शत्रूंचा मुकाबला तरुणांना करावा लागतोय, तर एतद्देशीय शत्रूंशीही सामना करावा लागतोय. देशात दहशतवादाला पूरक वातावरण करणाऱ्यांच्या विरोधात, अतिरेकी कारवाया करणाऱ्यांच्या, विरोधात लढावं लागतंय. सत्ताधाऱ्यांच्या नेभळट धोरणाशी मुकाबला त्याला करावा लागतो आहे. मघाशी म्हटल्याप्रमाणे स्वातंत्र्याच्या लढ्यात स्वातंत्र्यसैनिकांनी जो लढा दिला त्याहुन अधिक तीव्रतेचा लढा देण्याची जबाबदारी तरुणांवर येऊन ठेपलीय! पण मनांत इच्छाशक्ती आहे की, 'बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो' अन त्यासाठीच आपल्याला वाटचाल करायची आहे, मार्गक्रमण करायचं आहे. पण धर्मवाद्यांनी, जातवाद्यांनी त्यांच्या मार्गात अडथळे निर्माण केले आहेत. त्याला रोखण्याची गरज आज निर्माण झालीय. स्वातंत्र्याची, रामराज्याची स्वप्न ज्यांची साठ-सत्तर वर्षांपूर्वी पाहिली त्यांच्या मनांत प्रश्न उभारतोय, याचसाठी हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिलीय का? त्यांना प्रश्न पडलाय कुणा स्वातंत्र्य? कुठेय स्वातंत्र्य...!

- हरीश केंची
९४२२३१०६०९

No comments:

Post a Comment

आपलं ठेवायचं झाकून......!

"एकचालुकानुवर्तीत पक्ष आणि सत्ताधारी असं रूप 'लोकशाहीची जननी' म्हणवणाऱ्या देशात आकाराला येतंय. सामूहिक नेतृत्वाची प...