Saturday 23 December 2017

प्रक्षोभाची धुरी पेटवा...!

*प्रक्षोभाची धुरी पेटवा*

"बिळात दडलेल्या जनावरांना बाहेर काढण्यासाठी मिरच्या पेटवून धुरी दिली जाते. जनक्षोभाची धुरी धगधगत ठेवून बिळात दडलेल्या बलात्काऱ्यांना, अत्याचार करणाऱ्यांना बाहेर खेचण्यासाठी महिला रणरागिण्या बनून रस्त्यावर का येत नाही? बुवांच्या, बाबांच्या, स्वामींच्या, गुरूंच्या बनवेगिरीबद्धल कोणी बोललं,लिहिलं, सुरक्षिततेसाठी अडवलं तर हजारोंच्या संख्येनं रस्त्यावर येणाऱ्या सांप्रदायी भक्तांनी निरपराध महिलांना नुसते बदनाम करून नव्हे तर बरबाद करणाऱ्या विरुद्धही संतापाने खदखदत हजारोंच्या संख्येने पुन्हा पुन्हा रस्त्यावर का येऊ नये? महिलांना बरबाद करणाऱ्यांना हुडकून चेचून सरळ करा. आमच्या मुलाबाळांना नासवणारे साप ठेचून काढण्यासाठी अशी जागरूकता, ऐक्य दाखवू शकलो तरच सत्ता आणि मत्ता याचा कैफ चढलेली कारटी ताळ्यावर येतील."

*डोक्याला मुंग्या आणणारी घटना*
केवळ गुजरातीच नव्हे तर मराठी, हिंदी, आणि इंग्रजी चॅनल्सवर गुजरातच्या निवडणुकीतील एक्झिट पोलच्या बातम्या आणि चर्चा सुरू होत्या, त्याचवेळी टाईम्स नाऊ चॅनेलवर एक मेंदूला मुंग्या आणणाऱ्या घटनेवर चर्चा सुरू होती. 'बंगळुरू शहरात पुन्हा एकदा 'निर्भया' प्रकरण घडलं होतं, भर दिवसा एका तरुणीवर मद्यधुंद झालेल्या सहा तरुणांनी पाशवी बलात्कार केला. हे नराधम एवढ्यावरच थांबले नाहीत तर तिला विवस्त्र केलं, तिचे ते अंगावरचे कपडे जाळून टाकले. तिचे हात-पाय दगडाने ठेचुन तिला जखमी केलं. या साऱ्या घटनेचा व्हिडीओ चित्रणही त्या नराधमांनी केलं आणि त्या मुलीला असहाय अवस्थेत तिथंच टाकून ते पळाले. ती तरुणी त्या जखमी अवस्थेत सरकत सरकत जवळच असलेल्या कचरा पेटीत गॅरेजवाल्यांनी टाकलेले ऑईलचे गलिच्छ कापड आपल्या लज्जारक्षणासाठी वापरले. तिथल्या बसस्टॉपवर जाऊन ती मृतवत अवस्थेत पडून राहिली. तब्बल ४८ तास ती तरुणी तिथं होती जाणारे येणारे पाहात होते पण कुणीही तिला मदतीचा हात दिला नाही. संवेदनाहीन समाज, थिजलेली मनं याचं दर्शन इथं घडत होतं. एका समाजसेवी संस्थेच्या अनोळखी महिलेनं तिला रुग्णालयात दाखल केलं, तेव्हा ही दुर्दैवी घटना उघडकीला आली'

*घराचं थिएटर झालंय*
विजापूरच्या विजयानगर परिसरात अशाच एका शालेय मुलीवर चार जणांनी पाशवी बलात्कार तर केलाच शिवाय तिची निघृण हत्याही केलीय.
पुण्यातही वडगाव शेरीत तिघा मद्यधुंद तरुणांनी एका तरुणीला अशाचप्रकारे छेडलं होतं. तिला त्यांनी मारहाण केली. अशा दुर्दैवी घटना दररोज दुरचित्रवाणीवर आणि वृत्तपत्रातून पाहतो वाचतो. सामाजिक संवेदना तर केव्हाच मेल्यात. अशा प्रकारानंतर प्रतिक्रिया उमटायला हव्या होत्या पण तसं झालंच नाही. घराचं थिएटर आणि टीव्हीवरच्या नंगानाच सहकुटुंब सहपरिवार पाहणाऱ्या समाजाला त्यातली बीभत्सता कशी जाणवणार? त्या निरागस मुलीवर झालेला अत्याचार हा माणुसकीला काळिमा फासणारा आहे. स्त्रियांवर अत्याचार करणारा स्त्रीला माणूस मानतच नाही. सामुहिक बलात्कार, फसवणुकीनं बलात्कार, चंदेरी दुनियेतील झगमटावर भाळलेल्यांचा घेतलेला गैरफायदा या सगळ्या गोष्टी पुरुषात पशुत्व असल्याचं दर्शवतात. अशावेळी तो स्त्रीशरीराची, मनाची पर्वाच करीत नाही. स्त्री शुद्धीवर आहे की मेलीय याचाही तो विचार करत नाही. बंगळुरातला सामूहिक बलात्कार या गोष्टी समाज किती सडलाय, रसातळाला गेलाय हे दर्शवतात. एका तरुणीवर सहा सहा जण अत्याचार करतात, तिच्या देहाचा चोळामोळा करतात, तिची तडफड त्यांना दिसत नाही, त्यांचं मन द्रवत नाही. एकाकी असहाय स्त्रीवर ते झडप घालतात. सत्ता, पैसा आणि ताकद या तिन्हींचा या दुष्कार्मासाठी वापर केला जातो. सारं करून साळसूदपणे मिरवायला पुरुषपशु मोकळे सुटतात याविरुद्ध संघटित आक्रदन व्हायला हवं.

*चित्रपटांनी समाज नासवला*
कायद्याचे रक्षक, न्यायाधीश, आणि ज्यांच्याबद्दल आदरभाव जोपासला गेला, अशा शिक्षक-प्राध्यापक यांचे अत्यंत गैरचित्रण पद्धतशीरपणे चित्रपटातून असते आणि त्याबद्दल कुणीही संताप व्यक्त करीत नाही. अशा घटना घडतात तेव्हा या चित्रपटांनी समाजमनाला किती विकृत वळण दिलंय, हे दिसून येतं. रस्त्यात जाणाऱ्या अनोळखी मुलीला अडवून तिला पटविण्याची हिंमत या चित्रपटातल्या नायकांनी दिली. आणि त्या मुलींना रांडबाजी करायला लावून त्यांच्या सहाय्याने मौजमजा करण्याइतपत पैसे कमावण्याची शक्कल या चित्रपटातल्या खलनायकांनी दिली. तरुण-तरुणींचे अर्धनग्न तांडे कामक्रीडांची आठवण व्हावी, अशी झटकाझटकी करत नाचताहेत आणि चोळीच्या आंत के दडलंय ते तपासत आहेत. आपल्या खटिया जवळ सरकवताहेत, ओले-ओले कोरडे-कोरडे किंचाळताहेत. हे सारं आपण मिटक्या मारत बघत आलो. घरातल्या दुरदर्शनपुढं आई-बाप-मुलं या सगळ्यात रंगू लागली, तर आपल्या घराचा सिनेमा का नाही होणार?

*पौरुष्य कापायला हवंय*
असा नीच प्रकार करण्याचं धाडस... धाडस कसलं ते कुकर्म करताना कायदा, समाज यांची कसलीच भीती त्यांना वाटली नाही? या साऱ्या नीच प्रकाराविरुद्ध स्त्रियांनी, त्यांच्या संघटनांनी, विविध पक्षात काम करणाऱ्या स्त्रियांनी एकत्र यायला हवं. अत्याचारी पुरुषांच्या छाताडावर काली होऊन स्त्रीशक्ती थयथया नाचू शकते. जोवर आपल्या अब्रूच्या अंगाराने ज्वाला ओकत स्त्री उभी राहत नाही तोवर अशाना भीती वाटणार नाही. अब्रू लुटली गेली की, स्त्री असहाय होते, मन मारून जगते. इंद्र भोगून जातो आणि अहिल्या दगड होऊन पडते. ही नुसती पुराणकथा नाही तर वर्तमानकथाही आहे. स्त्री जोवर हिंमत दाखवणार नाही तोवर असंच होणार. माझी अब्रू तू लुटलीस तुझी अब्रू मी चव्हाट्यावर लुटणारम्हणून स्त्री बेडरपणे उभी राहिली, तर भल्याभल्याची पाचावर धारण बसेल. आज ना उद्या हे होणारच! त्यासाठी डॉ. राममनोहर लोहिया जे सांगत ते प्रत्येकीने लक्षात घ्यायला हवं. ' पावित्र्य हे केवळ कौमार्याशी संबंधित नाही बलात्कार करणाऱ्याला बरबाद करण्याची जिद्द धरायला हवी.' अत्याचारी पुरुषाचे पौरुष्य कापून टाकण्याचा प्रकार घडल्याचे अधूनमधून वृत्तपत्रातून वाचनात येतं. जयवंत दळवींच्या 'पुरुष' नाटकात हे केव्हाच सांगितलं आहे

No comments:

Post a Comment

आपलं ठेवायचं झाकून......!

"एकचालुकानुवर्तीत पक्ष आणि सत्ताधारी असं रूप 'लोकशाहीची जननी' म्हणवणाऱ्या देशात आकाराला येतंय. सामूहिक नेतृत्वाची प...