Friday 14 April 2023

'मिसळी'तून जातीअंताची लढाई...!

'आकाश फाटलेलं असलं तरी, आपण जिथं राहतोय तेवढ्या भागाला ठिगळं लावायला काय हरकत आहे....?' असा विचार करत गेल्या आठवड्यात ११ एप्रिलला महात्मा जोतीराव फुले  जयंती आणि १४ एप्रिलला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं जातीअंतासाठी वेगळा उपक्रम राबविला. समाजसुधारकांच्या या स्मृतिस्थळावर यंदा मात्र इथं वेगळं वातावरण होतं. दलितांना आपल्या घरातली पाण्याची विहीर महात्मा फुले यांनी खुली करून जातीअंताच्या लढ्याला प्रारंभ केला होता. डॉ.आंबेडकरांनीही महाडच्या चवदार तळ्यातलं पाणी देऊन जातीअंतासाठी सत्याग्रह केला. त्या दोन्ही घटनांची स्मृती जागवत सर्व जात, धर्म, पंथ, विचारांच्या लोकांनी एकत्र येत जातीयता नष्ट व्हावी अशा आणाभाका घेतल्या. आणि इथं १० हजार किलो 'एकता मिसळ'चा आस्वाद घेतला. मिसळीत जसं मटकीची उसळ, विविध मसाले, तेल, खोबरं, कांदा, लिंबू, कोथिंबीर असं सर्व पदार्थ एकजीव होतात, तशीच ही 'एकता मिसळ' कुण्या एकट्याची नव्हती तर ती सर्वजातीधर्माच्या, विचारांच्या, विविध पक्षाच्या लोकांनी एकत्र येऊन केलेली होती. जणू जातीअंताच्या लढ्याला पुन्हा एकदा सुरुवात झालीय!
--------------------------------------------------

राज्यात दिवसेंदिवस राजकारणात, जात, धर्म, पक्ष राजकारण यातून कटुता येईल असं वातावरण असताना, ती कटुता दूर व्हावी यासाठी लोकसेवा प्रतिष्ठानच्या दीपक पायगुडे यांनी पुढाकार घेतला होता. पण त्यांनी त्यांचं स्वतःचं नाव कुठं येऊ दिलं नाही. ही १० हजार किलो एकता मिसळ आणि १ लाख लोकांसाठीचं ताक जगविख्यात शेफ विष्णू मनोहर यांनी बनवलं होतं. लोकसहभागातून दहा हजार किलो मिसळ बनविण्यासाठी मटकी १ हजार किलो, कांदा ६०० किलो, आलं २०० किलो, लसूण २०० किलो, तेल ७०० किलो, मिसळ मसाला २६० किलो, लाल मिरची पावडर ५० किलो, हळद पावडर ५० किलो, मीठ ४० किलो, खोबरा कीस १४० किलो, तमाल पत्र १० किलो, फरसाण २४०० किलो, पाणी ८००० लिटर, कोथिंबीर १००० जुडी अशी साधनसामुग्री लागली तर वितरणासाठी १ लाख डिस्पोजेबल डिश, पाणी पिण्यासाठी डिस्पोजेबल ग्लास, हजारो स्लाइस ब्रेडस, २०० मिली पाणी लाखभर बॉटल्स लागल्या. हे सारं करताना ही समाजानं समाजासाठी केलेली समाजसेवा आहे, जातीअंतासाठी केलेली धडपड आहे, अशी भावना त्यामागे होती. म्हणूनच या उपक्रमाची माहिती मिळताच अनेकांनी आपला मदतीचा हात पुढं केला होता. अगदी लहान मुलानंही आपल्या बचतीचा मातीचा गल्ला फोडून केलेली मदत, रमजान असतानाही सहकार्याला आलेले मुस्लिम बांधव, लाखो लोकांची वर्दळ, पण कुठेच गोंधळ नाही की, गैरव्यवस्था! सारं काही सुरळीत, त्याग भावनेनं प्रत्येकजण सहभागी होत होता. अशा निर्मोही, सदभावी वातावरणात जातीअंताची लढाई पुन्हा एकदा आरंभली गेली होती! सामाजिक विषमता, धर्माधता यांच्या विरोधात रान पेटविण्यासाठी सिद्ध व्हायला हवंय अशी सध्याची स्थिती असताना त्यांच्या विचारांचे पाईक असणारे मात्र  निद्रिस्तावस्थेतच आहेत. त्यांना जागं करण्यासाठी सामाजिक समतेची लढाई ही नेहमीच समाजाची मानसिक उंची वाढविणारी ठरलीय. या समतेच्या लढाईत अस्पृश्यतेची खांडोळी झाली, वर्णाभिमान धुडकावला गेला. जातीयतेला चाप बसला, स्त्रिया स्वयंसिद्ध झाल्या, परंतु हे परिवर्तन हिंदुधर्माचा शक्तिपात करणाऱ्या जातीसंस्थेचा नायनाट करणारं ठरायला हवंय! कारण पूर्वी जातीअंताची लढाई ही स्वार्थसाधकांच्या हातात गेल्यानं ती जाती अहंकाराची झाली. विशेष म्हणजे ही लढाई सामाजिक समतेचा आग्रह धरणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज यांची नावं घेत लढली गेली होती. ती आता नेत्यांप्रमाणे अनुयायांनी आत्मसात केलीय. त्या सोंगाढोंगावर तुटून पडण्याचं काम आता करायला हवंय. भारतीय घटनेनं जातीयता नष्ट करण्याचा आग्रह धरलेलाय. परंतु शासकांनी आणि राजकारण्यांनी त्याउलट व्यवहार करण्यासाठी त्यांनी जाती संघटनांचा आधार घेतलाय. सत्ता मिळविण्यासाठी आणि टिकविण्यासाठी सोशल इंजिनिअरिंगच्या नावाखाली जाती अहंकार माजविला जातोय. असत्य, अन्याय, भ्रष्टाचार, अपमार यांच्याविरोधासाठीच नव्हे, तर सत्याच्या आग्रहासाठी आणि हक्काच्या, मानाच्या पानासाठीही इथली माणसं एकत्र येऊ शकत नाहीत. इतकी जाती, प्रदेश, पक्ष अहंकारात तुटलेली, फुटलेली आहेत. या स्वार्थी तुटीफुटीवर प्रकाश टाकावा आणि अवघा समाज एकवटावा या अपेक्षेनं सामाजिक कार्य फुले आणि आंबेडकर यांना मानणाऱ्यांकडून व्हायला हवंय. त्याची ही नव्यानं एकता मिसळच्या माध्यमातून सुरुवात होती.

जातीयतेचा नायनाट करण्यासाठी महाराष्ट्रातल्या अनेक समाज सुधारकांनी आपल्या आयुष्याची राख केली. स्वतःला पुरोगामी म्हणवणाऱ्यांनी ती विभूती मानली. पुरोगाम्यांकडं सामाजिक समतेचं चांगलं बियाणं होतं पण ते त्यांनी आपसातल्या भांडणात रुजण्यापूर्वीच सडवलं म्हणूनच जातीयवादी पक्ष-संघटनांचं निवडुंग महाराष्ट्रात फोफावलं. आत्मनाशी आणि कार्यनाशी यात फरक करणाऱ्यांची गरज नाही. जातीचा अहंकार आणि अस्मिता हुंडारत हुंदडणारे सगळेच मनुवादी आहेत. स्वार्थासाठी त्यांना मनुनं केलेली जातीय मांडणी हवीच असते. ब्राह्मणांचा बडेजाव, मराठापणाचा माज, बहुजनांची बनेल बलुतेदारी, आणि दलितत्वाची दळभद्री दडपणं या साऱ्याची निर्मिती मनुवादाच्या आधारात आहे. ज्यांना हा आधार नको त्यांना पांचवा वर्ण आहे. चारही वर्णांना धिक्कारणारा, गुणवंतांना योग्यवेळी संधी आणि गरजवंताला योग्यवेळी सहाय्य हेच लोकशाहीचं अर्थात स्वराज्याचं आद्य आणि अंतिम कर्तव्य आहे असं मानणारा पाचवा वर्ण आहे. तो अनुसरण्याचा निर्धार केला गेला. एखादी माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली किंवा देवाधर्माच्या नावानं कुणी नंगानाच सुरू केला की, पुरोगामी विचारवंत वा नेत्यांना इथल्या संस्कृतीची, प्रबोधनाच्या चळवळीची पार्श्वभूमी हमखास आठवते. मग त्यावर भाष्य करताना ते, 'या फुले-शाहू-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात...! अशी सुरुवात करून आपलं मत मांडतात. 'शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर' हा आज परवलीचा शब्द झालाय. डॉ.आंबेडकर यांनी, 'माझ्या वैचारिक जडण-घडणीसाठी बुद्ध, कबीर आणि फुले यांचा विचार प्रेरणादायी ठरला; त्यांना मी गुरू मानतो..!' असं जाहीरपणे सांगितलंय. हे तीनही महापुरुष त्यांच्या जातीचे नव्हते, तसंच, या तिघांना त्यांनी कधी पाहिलंही नव्हतं. म्हणजे, प्रत्यक्षपणे त्यांच्यात गुरु-शिष्य संबंध प्रस्थापित झाले नव्हते. तरीही त्यांनी या तीन महापुरुषांना गुरुस्थानी मानलं, यामागं डॉ.आंबेडकरांची जी भूमिका होती, ती समजून घेतली पाहिजे.
सत्य तोच धर्म करावा कायम।
मानावा आराम। सर्वाठायी।
मानवांचा धर्म, सत्य हीच नीती।
बाकीची कुनीती। जोती म्हणे।।
यासारख्या अखंडातून महात्मा फुलेंचं हे विचारवैभव लिखित स्वरूपात उपलब्ध आहे. महात्मा फुलेंची आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्तानं त्यांचे विचार स्वीकारणं, रुजवणं, वाढवणं आणि मानव्याला जे अनिष्ट ते नष्ट करण्यासाठी त्याचा वापर करणं हाच फुले आणि आंबेडकर यांच्या विचारांचा सार्थ गौरव आहे. महात्मा फुले यांच्या निवासस्थानी गंजपेठेतल्या समताभूमीवर आणि जिल्हाधिकारी कार्यालयाजवळच्या आंबेडकरांच्या स्मारक परिसरात जमलेली गर्दी हे स्पष्ट करणारीच असते. वैयक्तिक स्वार्थासाठी महात्मा फुलेंचा वापर करण्याला सरसावल्या मंडळींनी त्यांचा विचार कधीच गुंडाळून ठेवलाय. सध्याचा काळ मोठा विचित्र आहे. जे गाडण्यासारखं आहे ते मिरवलं जातंय आणि मिरवावं ते दडवलं जातंय. दिवसेंदिवस देवाला मानणाऱ्यांची संख्या, देवादिकांचे स्तोम कमी करण्याऐवजी वाढतंच चाललंय. आपण एका बाजूला सुधारणेचा आव आणतो आणि दुसऱ्या बाजूला देवाला नवस घालतो, हे ढोंग आहे. अशा ढोंगी व्यक्तींकडून सामाजिक सुधारणा होण्याची सुतराम शक्यता नाही. अशा समाजाला जोतिराव फुले कळलेच नाहीत आणि त्यांची बहुजन समाजाची चळवळही कळली नाही. कारण 'बहुजन' या शब्दाचा अर्थच आपल्याला कळलेला नाही. काहींनी 'बहुजन' म्हणजे मराठा असा सोयीस्कर अर्थ लावून महात्मा फुले-डॉ.आंबेडकरांचा आणि त्यांच्या चळवळींचा आपल्या सोयीसाठी, स्वार्थासाठी राजकारणात तरून जाण्यासाठी वापर करून घेतलाय. वास्तविक फुले-आंबेडकरांचा विचार केवळ तळाच्या माणसांनाच नव्हे तर, राष्ट्राला समर्थ बनवणारा आहे. भारतातल्या अनेक सामाजिक विकासाची बीजंही फुले-आंबेडकरांच्या सामाजिक क्रान्तीत आहेत. स्त्री शिक्षण, अस्पृश्यता निवारण, आरोग्यविषयक सेवाकार्य, सामाजिक-आर्थिक समानता, श्रममूल्यांचा पुरस्कार यासारखे अनेक उत्क्रांतीकारक विषय फुले-आंबेडकर यांच्या विचारात सामावलेले आहेत. आजही सामाजिक सुधारणांचे निर्णय सरकार घेतं, तेव्हा त्यावेळी होणाऱ्या चर्चेचं दुसरं टोक हे फुले-आंबेडकर विचारांपर्यंत असतं. त्यांचे विचार पेलवण्याचं आणि समाजाच्या, सत्ताधीशांच्या गळी उतरवण्याचं सामर्थ्य केवळ छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवलं. जोतीराव फुले यांच्या निधनानंतर क्षीण झालेली सत्यशोधक समाजाची चळवळ छत्रपती शाहू महाराजांनी समर्थ केली. परंतु अतिरेकी शिवराळपणामुळं ही चळवळ ब्राह्मण्याकडून ब्राह्मणांकडं सरकली आणि ती चळवळ ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादात फसली. या मोडीत निघालेल्या चळवळीला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतःला जोतीराव फुले यांचे अनुयायी मानल्यामुळं जीवनदानाबरोबरच व्यापकता मिळाली. आज या चळवळीची आणि फुले-आंबेडकरांच्या विचारांची, खुद्द जोतिरावांनी ज्यांच्या उद्धारासाठी सपत्निक शेणधोंड्याचा मार खाल्ला. त्या बहुजनांनी तरी काय पत्रास ठेवलीय? आज महाराष्ट्रात जे घडतंय ते पाहिलं तरी याची जाणीव साऱ्यांनाच होईल. फुले-आंबेडकरांच्या विचारांनी अनेकजण घडले. ते स्वतः समाजसुधारकच नव्हते तर त्यांच्या कृतिशील विचारांनी असंख्य सुधारक घडवले. फुले यांच्या विचारांनी सयाजीराव गायकवाड, राजर्षी शाहू महाराज, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगे महाराज यांच्यासारख्या अनेकांची सामाजिक परिवर्तनाच्या ऐतिहासीक कार्याची प्रेरणा जोतिबा फुलेंचे विचार हीच होती. या साऱ्यांनी फुले यांच्या विचाराचं ऋण जाहीरपणे मानलं होतं. शुद्रातिशूद्र माणसाच्या उन्नतीचा, त्यांच्या सन्मानाचा विचार फुले-आंबेडकरांनी सांगितला त्यासाठी समाजाला धर्मकर्मकांडात घोळवून फसवणाऱ्या पोटभरुवृत्तीचा त्यांनी तडाखेबंद समाचार घेतला. सामाजिक समानतेबरोबरच स्त्रीशिक्षणाचा पुरस्कारही केला. फुले यांनी तर हा विचार कृतीत आणण्यासाठी या व्यापात आपल्या कुटुंबियांनाही गुंतवलं. सावित्रीबाईंनी जोतिबांच्या विचाराला कृतीत आणण्याचं काम अगदी मनापासून केलं. जीवघेणे हल्ले सोसले. पण हटल्या नाहीत. फुले यांच्या निधनानंतर इतकी वर्षे लोटली, पण तरीही सामाजिक परिवर्तनाच्या कार्यात त्यांचे विचार आपलं सर्वश्रेष्ठत्व टिकवून आहेत. हा फुले-आंबेडकर यांच्या समर्थ विचारांचा गौरव असला तरी, सामाजिकदृष्ट्या ते लांच्छन आहे. कारण फुले-आंबेडकर यांच्या विचारांचा आधार वाटू नये, अशी सामाजिक स्थिती अजून निर्माण झालेली नाही. किंबहुना यांच्याच विचारांची आवश्यकता तीव्रपणे जाणवतेय. देवळं वाढलीत, त्या पुढच्या रांगाही वाढल्या आहेत. लांबल्या आहेत. अफरातफर व्हावी इतका गल्ला देवळात जमू लागलाय. हे सारं चित्र पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या महाराष्ट्रात दिसतंय. तरीही फुले-आंबेडकर यांचं नांव घेऊन राजकारण करणाऱ्यांची संख्या कमी नाही. फुले-आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्यांनीही आपली वागणूक बदललीय. फुले-आंबेडकर नावाचा डिमडिम वाजवत आपला स्वार्थ साधण्यातच ते धन्यता मानू लागलेत. सदासर्वदा त्यांचेच नांव घेऊन, त्यांच्याच विचाराला हरताळ फासणाऱ्या त्यांच्या अनुयायांनी फुले-आंबेडकर यांच्या विचारांचा पराभव केलाय. हे सारं बदलण्यासाठी त्यांचे विचारच समर्थ आहेत. यासाठी हवी केवळ जिद्द आणि इच्छा!

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी माणूसपण गमावलेल्या माणसात जो आत्मविश्वास, स्वाभिमान जागवला तसा आत्मविश्वास, स्वाभिमान पुन्हा जागवण्यासाठी सर्वंकष प्रयत्न व्हायला हवेत. महात्मा फुले यांनी ज्या त्वेषानं अन्यायाला टकरावर टकरा देऊन समानतेचं वारं समाजात खेळतं ठेवलं, ती तडफ लोकांत निर्माण होईल असं वातावरण जाणीवपूर्वक ठेवण्याचं भान आपण दाखवलं पाहिजे. सत्ताधाऱ्यांच्या वृत्तीत बदल घडला तर सत्तेत बदल घडणं कठीण नाही. पुरोगामी विचारात जनआंदोलन उभं करण्याची ताकद आहे. रामकृष्णांना रथात घालून भाजपेयींनी दौड केली. शिवाजी महाराजांना शिवसेनेच्या मावळ्यांनी कडेकोट किल्ल्यात ठेवलंय. आंबेडकरांना दलित दुसऱ्या कुणाच्या हाती लागू देत नाहीत. महात्मा गांधींना तर आपण कधीच 'हे राम' म्हणायला लावलंय. आता काँग्रेसला आधार केवळ या विचारांचाच आहे. कर्मकांडाच्या, पुरोहितशाहीच्या, जन्माधिष्ठित उच्च नीचतेच्या, विषमतेच्या चक्रव्यूहात राष्ट्रीय पुनरुत्थानाच्या नावानं कुणी समाजाला गुंतवू बघत असेल तर त्याचा प्राणपणानं मुकाबला करण्याची तयारी पुरोगामी विचारांवर श्रद्धा ठेवणाऱ्यांना करावीच लागेल.

समाजवादानं उन्नत आणि समृद्ध समाजाचं स्वप्न दिलंय. महाराष्ट्र हा राष्ट्रवाद आणि मानवी समता या दोन्हीमध्ये या देशाला मार्गदर्शक ठरेल असं आजवर मानलं जात होतं. महात्मा फुले, लोकहितवादी गोपाळराव देशमुख, सुधारकाचार्य गोपाळराव आगरकर,  डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सानेगुरुजी, आचार्य जावडेकर, प्रबोधनकार ठाकरे या सगळ्यांनी मराठी माणसाला रूढी, परंपरा, कर्मकांड यांच्या फेऱ्यातून बाहेर आणलं. जन्माधिष्ठित उच्चनीचतेचा अहंगंड सुटावा, माणसामाणसात बंधुभाव जागावा म्हणून आयुष्यभर या सर्वांनी जे प्रयत्न केले त्यामुळंच महाराष्ट्रातल्या अठरापगड जातीतल्या शतकानुशतके मुकाट दबून आला दिवस ढकलत जगणाऱ्या लोकांना जाग आली. कर्मवीर भाऊराव पाटलांनी गावोगाव शिक्षणाची ज्योत नेली. महर्षी कर्वे यांनी स्त्रीला हिंमत दिली. लोकांच्या उद्धाराचा ठेका परमेश्वरानं आपल्यालाच दिलाय अशा गुर्मीत जगणारे आणि वर्णवर्चस्वाचा प्रत्यय पावलोपावली देणारे एकाकी पडत गेले. आपली वाट आपण शोधू, आपलं भाग्य आपण घडवू, या निर्धारानं गावोगाव नव जोमानं तरुण उभे झाले. गांधी टोपीबरोबरच मानवी समता, बंधुभाव सर्वसामान्य माणसानं स्वीकारला. अर्थात सर्वत्र शिवाशिव संपली. रोटी व्यवहार सुरू झाला आणि एकमेकांशी माणुसकीचं वर्तन सुरू झालं असा याचा अर्थ नाही. आपण माणूस आहोत, या समाजाच्या जडणघडणीत आपलाही काही वाटा आहे, आपले काही हक्क आहेत, आपण एकजुटीनं आपले हक्क मिळवू शकतो, आपला विकास साधू शकतो, त्यासाठी कुणाची परवानगी त्यासाठी आवश्यक नाही, कुणाच्या कृपेचीही आवश्यकता नाही हा विश्वास काही प्रमाणात तरी सर्वत्र आला. महाराष्ट्राच्या राजकारणावर आणि सामाजिक व्यवहारावर याचा फार मोठा परिणाम झाला. इतिहास-पुराणांचा आधार घेऊन उभ्या झालेल्या नेत्यांचा प्रभाव यामुळं मर्यादितच राहिला. भारतामध्ये फुलेंना अभिप्रेत असलेली लोकशाही समाजवादी विचारसरणीची मूलतत्त्वे काँगेसांतर्गत स्थापन झालेल्या समाजवादी गटात आढळतात. १९३४ मध्ये जयप्रकाश नारायण, अशोक मेहता, आचार्य नरेंद्र देव प्रभृतींनी हा गट स्थापन केला. पहिले प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांच्या १९४७ -६४ या कार्यकाळात त्यांची लोकशाही समाजवादावर निष्ठा आणि विश्वास होता. समाजवादी समाज स्थापन करणं, हे काँग्रेसचं उद्दिष्ट आहे, अशी घोषणा त्यांनी केली. त्यांचा समाजवाद महात्मा फुले यांच्या विचारांशी होता तरी, तो इंग्लंडमधील मजूर पक्षाच्या धाटणीचा होता. भारताच्या मूळ संविधानात समाजवाद या शब्दाचा उल्लेख नव्हता. तो पुढे १९७६ मध्ये झालेल्या बेचाळीसाव्या घटना दुरूस्तीव्दारा प्रथमच सरनाम्यात करण्यात आला. सरनाम्यातून भारतीय संविधानात अभिप्रेत असलेल्या लोकशाही समाजवादाचा आशय व्यक्त होतो. भारतातला गांधींच्या तत्त्वज्ञानाचा अंगीकार करीत केलेला कारभार, समाजवादाला नकार देत जनतेच्या सहभागावर आणि विकेंद्रीकरणावर भर देणारे समाजवादी पक्ष, ही समाजवादाचीच वेगवेगळी रूपे आहेत; कारण फुले यांच्या विचारानं देशांत कार्यरत असणाऱ्या लोकांना एका उन्नत आणि समृद्ध समाजाची स्थापना करण्याचं स्वप्न दिलं आहे, याची जाणीव राज्यकर्त्यांनी ठेवायला हवीय. आज ती अवस्था राहिलीय का? आदर्शवत समाजवादी विचार कुरतडला जाऊ लागलाय. जातीधर्माच्या नावानं चांगभलं म्हणणाऱ्यांची संख्या वाढतेय ते रोखायला हवंय! त्यासाठी पुण्यातल्या 'एकता मिसळ'च्या निमित्तानं केलेलं हे स्मरण...!
हरीश केंची
९४२२३१०६०९

No comments:

Post a Comment

लोकशाही की एकाधिकारशाही...!

"देशात लोकशाहीचा उत्सव सुरू आहे, पण सत्ताधारी  लोकशाही संसदीय ऐवजी अध्यक्षीय असल्यासारखे वागताहेत. सामूहिक नेतृत्व सांगणारा...