Friday 28 January 2022

गांधीजींना मरणच नाही....!


"आज महात्मा गांधी यांची पुण्यतिथी...! स्वातंत्र्यानंतर लगेचच ७४ वर्षांपूर्वी महात्मा गांधी यांची हत्या करण्यात आली. पण गांधीजी संपले नाहीत. 'राष्ट्रपित्या'ची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेशी आपला काहीही संबंध नाही, अशी भूमिका संघानं अनेक दशकं घेतली होती परंतु अलीकडच्या काही वर्षांत हिंदू गटांनी गोडसेचं गौरवीकरण करत त्याच्या कृत्याचं उदात्तीकरण सुरू केलंय आणि गांधीहत्येचीही ते उघडपणे प्रशंसा करताहेत. भडक भाषणं करणाऱ्या भाजपच्या एका खासदारानं गोडसेला 'देशभक्त' म्हटलं होतं. बहुतांश भारतीयांनी याबाबत रोष व्यक्त केला असला, तरी संघानं आपली भूमिका सोडलेली नाही. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी शंभरहून अधिक परदेश दौरे केले आहेत. त्यात त्यांनी गांधीजींचा आवर्जून उल्लेख केलाय. कधी बुद्धाचा उल्लेख केलाय. तो करताना प्रधानमंत्र्यांना किती त्रास होत असेल, परंतु, त्यांचाही नाइलाज आहे!"
---------------------------------------------------------

*३०* जानेवारी १९४८....! दिल्लीतल्या बिर्ला हाऊसमध्ये संध्याकाळी ५.१० वाजता महात्मा गांधी त्यांच्या खोली बाहेर पडले. महात्म्याला पाहायला, भेटायला, गाऱ्हाणं मांडायला, चर्चा करायला त्या दिवशी जरा जास्तच लोक आले होते. काही वेळातच पिस्तुलातून सुटलेल्या गोळ्यांचा आवाज आला आणि सगळेच काही क्षण थबकले. कानठळ्या बसवणारी ती शांतता संपल्यावर लोक भानावर आले. महात्मा गांधी खाली कोसळले होते आणि नथुरामच्या पिस्तुलातून अजूनही धूर येतच होता...! नथुरामला तात्काळ पकडण्यात आलं आणि लोकक्षोभापासून दूर ठेवण्यासाठी एका बाजूला नेण्यात आलं. नथुराम विनायक गोडसेनं भारताचे सर्वांत आदरणीय नेते असणाऱ्या मोहनदास करमचंद गांधी यांच्यावर आजच्या दिवशी ३० जानेवारी १९४८ रोजी काही फुटांच्या अंतरावरून गोळ्या झाडल्या. दिल्लीत प्रार्थनासभेवेळी झालेल्या या हल्ल्यात गांधींजींचा मृत्यू झाला. गांधींजींच्या हत्येच्या १० दिवस आधीही म्हणजे २० जानेवारीला नथुराम आणि त्याच्या साथीदारांनी गांधींजींवर हल्ला केला होता. २० जानेवारीच्या त्या घटनेनंतर जर पुरेशी दक्षता घेतली असती तर आजचा इतिहास काही वेगळा असता. २० जानेवारी रोजी ते बिर्ला हाऊसच्या बागेत प्रार्थनेसाठी पोहचले. प्रार्थनेसाठी शेकडो लोक जमा झाले होते. इथं गांधींजींसाठी एक छोटंसं व्यासपीठ तयार करण्यात आलं होतं. त्या व्यासपीठावरुन ते बोलू लागले पण माइक खराब होता. तरी देखील त्यांनी आपलं भाषण सुरू ठेवलं, 'जे मुस्लिमांचे शत्रू आहेत ते भारताचेही शत्रू आहेत' असं ते म्हणाले. तितक्यात एक स्फोट झाला. इम्प्रोव्हाइज्ड एक्स्प्लोजिव्ह डिव्हाइसनं-ईआयडीनं हा स्फोट घडवून आणला होता. व्यासपीठापासून काही अंतरावरच हा स्फोट झाला होता!' अशी माहिती तुषार गांधी यांनी 'लेट्स किल गांधी' हे पुस्तकात दिली आहे. नथुराम गोडसेचा सहकारी दिगंबर बडगे सर्व्हंट क्वार्टरमध्ये लपला होता. तिथून त्यानं गोळीबार करायचा, असा कट होता. पण त्याचं धाडस झालं नाही आणि सर्वांनी तिथून पळ काढला. हा कट नथुराम गोडसेनं रचला होता. नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे आणि नारायण आपटे यावेळी इथं उपस्थित होते. हॅंडग्रेनेड टाकणाऱ्या मदनलाल पाहवाला पोलिसांनी अटक केली. पण त्याचे सर्व साथीदार मात्र पळून गेले. या घटनेच्या १० दिवसांनंतर म्हणजे ३० जानेवारी १९४८ ला बिर्ला हाऊसमध्येच नथुराम गोडसेनं प्रार्थनेच्या वेळीच गांधींजींवर गोळ्या झाडल्या.

त्यापूर्वी गांधीजींच्या हत्येचा ४ वेळा प्रयत्न झाला होता आणि सर्वांत धक्कादायक गोष्ट म्हणजे हे प्रयत्न नथुराम गोडसे आणि त्याच्या साथीदारांनीच केले होते. पुण्यात टाऊन हॉलजवळ गांधींजींच्या ताफ्यातल्या गाडीवर हॅंडग्रेनेड टाकण्यात आलं होतं. १९३४ मध्ये गांधी हरिजन यात्रेनिमित्त पुण्यात आले होते. दोन कारमधून गांधी आणि त्यांचे सहकारी येत होते. गांधींची कार टाऊन हॉलला उशिरा पोहचली. पण हल्लेखोरांना वाटलं की पहिल्याच कारमध्ये गांधी आहेत. त्यांनी त्यांच्या गाडीवर हॅंडग्रेनेड टाकलं. हे ग्रेनेड गाडीच्या बॉनेटवर पडलं आणि बाजूला जाऊन त्याचा स्फोट झाला. या हल्ल्यात कुणाला दुखापत झाली नव्हती. दुसरा हल्ला पाचगणी इथं झाला होता. १९४४ मध्ये गांधींची प्रकृती खालावली होती. त्यांना विश्रांतीसाठी पाचगणीत नेण्यात आलं होतं. दिलखुश नावाच्या एका बंगल्यात त्यांची व्यवस्था करण्यात आली होती. इथं ते गावकऱ्यांसोबत रोज संध्याकाळ प्रार्थना करत असत. एकदा प्रार्थनेच्या वेळी त्यांच्यावर एक युवक चालून आला. त्याच्या हातात खंजीर होता. गांधींजींचे रक्षक भिलारे गुरूजी यांच्या लक्षात आलं की समोरून कुणी चाल करून येत आहे. त्यांनी त्या युवकाला जेरबंद केलं आणि त्याच्या हातातून खंजीर हिसकावून घेतला. त्या युवकाला सोडून द्या, असं गांधींनी सांगितलं होतं. त्यामुळं त्याच्यावर कारवाई झाली नाही. तो युवक नथुराम गोडसे होता, असं भिलारे गुरूजींनी म्हटलं होतं. गांधींजींच्या हत्येचा तिसरा प्रयत्न झाला तो सेवाग्राममध्ये. १९४४ मध्ये गांधी वर्धा स्टेशनहून रेल्वेनं जाणार होते. त्यावेळी एक युवक गांधींवर चालून आला. पोलिसांनी तत्परतेने त्याला पकडलं. त्याची प्राथमिक चौकशी करून त्याला सोडून देण्यात आलं. त्याची नोंद देखील घेतली गेली नाही, असं गांधींचे चरित्र लेखक प्यारेलाल यांनी म्हटलं आहे. चौथा प्रयत्न पुढच्याच वर्षी म्हणजे १९४५ मध्ये गांधींजी मुंबईहून पुण्याकडं रेल्वेनं येत होते. एक गार्डचा डबा, एक इंजिन आणि एक तिसऱ्या वर्गाचा डबा अशी ही रेल्वे होती. रात्रीची वेळ होती. रेल्वे कसारा घाटात पोहचली. तेव्हा तिथं रुळांवर काही ओंडके ठेवण्यात आले होते. तसेच दगडांचा एक ढिगारा करण्यात आला होता. तो ढिगारा चालकाला दिसला आणि त्यानं करकचून ब्रेक दाबला. त्या इंजिनाचा हलका धक्का त्या ढिगाऱ्याला बसला पण एक मोठा घातपात टळला.
गांधीजी पुण्याला आले आणि म्हणाले ज्या लोकांना मला मारावयाचं आहे त्यांनी मला खुशाल मारावं. पण माझ्या सोबतच्या लोकांना नुकसान पोहोचवू नये.
अडतीस वर्षांचा नथुराम हिंदू महासभेचा सदस्य होता. गांधी मुस्लिमांचा अनुनय करत असून पाकिस्तानला झुकतं माप देत आहेत आणि त्यांनी हिंदूंचा विश्वासघात केला आहे, असा आरोप हिंदू महासभेनं केला होता. हिंदू महासभेनं फाळणीमधल्या रक्तपातासाठीसुद्धा गांधींना दोषी ठरवलं. गांधीहत्येनंतर वर्षभरानं न्यायचौकशी न्यायालयात गोडसेला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. उच्च न्यायालयानं हा निकाल कायम ठेवल्यानंतर नोव्हेंबर १९४९ मध्ये त्याला देहदंडाची शिक्षा झाली. या गुन्ह्यातला त्याचा साथीदार नारायण आपटे यालाही देहदंड झाला आणि इतर सहा जणांना जन्मठेपेची शिक्षा झाली. हिंदू महासभेत दाखल होण्यापूर्वी गोडसे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सदस्य होता. सध्या केंद्रात सत्ता गाजवणाऱ्या भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था असणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवार ९५ वर्षं हिंदू राष्ट्रवादाची पताका घेऊन चालतो आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी स्वतः संघप्रचारक राहिले आहेत, आणि त्यांच्या सरकारमध्ये आणि सरकारच्या बाहेरही संघाचा खोलवर प्रभाव आहे. 'राष्ट्रपित्या'ची हत्या करणाऱ्या गोडसेशी आपला काहीही संबंध नाही, अशी भूमिका संघानं अनेक दशकं घेतली होती परंतु अलीकडच्या काही वर्षांमध्ये उजव्या हिंदू गटांनी गोडसेचं गौरवीकरण त्याच्या कृत्याचं उदात्तीकरण सुरू केलंय आणि गांधीहत्येचीही ते उघडपणे प्रशंसा करताहेत. गेल्यावर्षी, भडक भाषणं करणाऱ्या भाजपच्या एका खासदारानं गोडसेचं वर्णन 'देशभक्त' असं केलं होतं. बहुतांश भारतीयांनी याबाबत रोष व्यक्त केला असला, तरी संघानं आपली भूमिका सोडलेली नाही. गांधींजींची हत्या करण्याच्या कितीतरी आधी गोडसेनं संघाला सोडचिठ्ठी दिली होती. परंतु, संघाचं हे म्हणणं वस्तुस्थितीला धरून नसल्याचा दावा एका पुस्तकात करण्यात आला आहे.

भारताला स्वातंत्र्य मिळून काही महिनेच झाले होते. आणि देशात ठिकठिकाणी धार्मिक तणावाचं वातावरण होतं. 'हिंदू, शीख आणि मुस्लिमांमध्ये एकेकाळी बंधुभाव होता. आता तो राहिला नाही, हे पाहून माझ्या मनाला यातना होत आहेत!' असं गांधीजींनी म्हटलं होतं असं ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसनं प्रकाशित केलेल्या आणि स्टॅनेले वॉलपर्ट यांनी लिहिलेल्या 'गांधीज मिशन' या पुस्तकात म्हटलंय. 'सर्वांनी एकत्र यावं यासाठी मी आमरण उपोषण करणार आहे!' अशी घोषणा गांधींजींनी १२ जानेवारीला केली होती आणि दुसऱ्याच दिवशी त्यांनी उपोषण सुरू केलं. 'तुम्ही तुमचं उपोषण सोडा,' अशी विनंती करण्यासाठी देशभरातून लोक येत असत. या लोकांसमवेत महात्मा गांधी नित्यनेमानं प्रार्थना करत. पण त्यांनी आपलं उपोषण काही सोडलं नाही. 'जेव्हा मला खात्री होईल की सर्व धर्मांच्या लोकांमध्ये सलोखा निर्माण झालाय, तेव्हाच मी माझं उपोषण सोडणार आहे!' असं त्यांनी निग्रहानं सांगितलं, अशी नोंद वॉलपर्ट यांच्या या पुस्तकात आहे. 'जर माझ्या अकार्यक्षमतेमुळं या देशातला हिंसाचार नियंत्रणात येत नाही, असं बापूंना वाटत असेल तर मी माझ्या पदाचा राजीनामा देतो!' असं गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी म्हटलं होतं. पण गांधींजींनी त्याही गोष्टीला नकार दिला. १०० हून अधिक नेत्यांनी महात्मा गांधींना उपोषण सोडण्यासाठी विनंती केली होती. आम्ही शपथ घेऊन सांगतो की आम्ही धार्मिक सलोखा ठेऊ, असं आश्वासन त्यांनी वारंवार दिलं. त्यानंतर १८ जानेवारीला त्यांनी आपलं उपोषण सोडलं. त्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद असे प्रमुख नेते उपस्थित होते. 'आम्ही या पुढं बंधुभावानं राहू, असं सात कलमी आश्वासन सर्व गटांच्या नेत्यांनी लिहून दिलं. कोणत्याही स्थितीत आम्ही ही प्रतिज्ञा मोडणार नाही, असं ही त्यात म्हटलं होतं!' अशी नोंद या पुस्तकात आहे.

शाळा सोडलेला, भिडस्त स्वभावाचा नथुराम काही काळ टेलर म्हणून काम करत होता, त्यानंतर त्यानं फळं विकण्याचाही व्यवसाय केला, मग तो हिंदू महासभेत दाखल झाला. तिथं तो संघटनेच्या वर्तमानपत्राचं संपादन करत असे. गांधीहत्येवरच्या न्यायालयीन सुनावणी दरम्यान त्यानं पाच तासांहून अधिक वेळ घेत १५० परिच्छेदांचं निवेदन वाचून दाखवलं होतं. गांधींना मारण्याचा 'कोणताही कट झालेला नव्हता', असं तिथं तो म्हणाला. आपल्या सर्व साथीदारांवरचा ठपका पुसण्याचा प्रयत्न त्यानं केला. हिंदुत्व या संकल्पनेचे प्रणेते आणि आपले नेते विनायक दामोदर सावरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे कृत्य केल्याचा आरोपही त्यानं नाकारला. या खटल्यात सावरकरांची सर्व आरोपांमधून निर्दोष मुक्तता करण्यात आली असली, तरी गांधींजींचे कट्टर विरोधक असणारे जहाल उजव्या विचारांचे सावरकर या हत्येशी संबंधित होते, असं त्यांचे टीकाकार मानतात. गांधींजींची हत्या करण्याच्या कितीतरी आधी आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेले संबंध तोडले होते, असं गोडसेनं न्यायालयाला सांगितलं. 'गांधीज् असॅसिन' या पुस्तकाचे लेखक धीरेंद्र झा लिहितात की, गोडसेचे वडील टपाल कार्यालयात कर्मचारी होते, तर आई गृहिणी होती. गोडसे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक 'महत्त्वाचा स्वयंसेवक' होता. त्याला संघातून काढून टाकल्याचा कोणताही 'पुरावा' नाही. सुनावणीपूर्वी नोंदवण्यात आलेल्या जबानीत त्यानं 'हिंदू महासभेत दाखल होण्यापूर्वी संघापासून फारकत घेतल्याचा कुठेही उल्लेख केला नव्हता.' 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सोडल्यानंतर आपण हिंदू महासभेचे सभासद झालो' असं त्यानं न्यायालयातल्या निवेदनात म्हटलं असलं, तरी 'हे त्यानं नक्की कधी केलं याबद्धल तो काही बोलत नाही! हा दावा गोडसेच्या आयुष्यातला सर्वांत वादग्रस्त पैलूंपैकी एक आहे,' असं झा लिहितात. संघस्नेही लेखकांनी या दाव्याचा वापर करून गुपचूप असा समज पसरवला की, गोडसेनं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सोडचिठ्ठी दिली होती आणि गांधींची हत्या करण्याच्या जवळपास दशकभर आधी तो हिंदू महासभेत दाखल झाला होता! गोडसे १९३० साली संघात आला आणि चार वर्षांनी त्यानं संघ सोडला, असा दावा अमेरिकी संशोधक जे.ए. कुर्रन ज्युनियर यांनी केला आहे. पण या प्रतिपादनासाठी त्यांनी कोणताही पुरावा दिलेला नाही. सुनावणी सुरू होण्यापूर्वी पोलिसांसमोर दिलेल्या जबानीत गोडसेनं दोन्ही संघटनांसोबत एकाच वेळी काम करत असल्याचं कबूल केलं होतं, असं झा लिहितात. या संदर्भातल्या वादात गोडसे कुटुंबियांनीही पूर्वी मतं मांडलेली आहेत. नथुरामचे बंधू जे २००५ साली मरण पावले, ते गोपाळ गोडसे मृत्यूपूर्वी म्हणाले होते की, त्यांच्या भावानं 'संघापासून फारकत घेतलेली नव्हती!' याशिवाय, नथुराम गोडसेच्या चुलत नातवानं २०१५ साली एका पत्रकाराला सांगितल्यानुसार, नथुराम गोडसे १९३२ साली संघात दाखल झाला आणि त्याला 'कधीही संघातून काढून टाकण्यात आलं नव्हतं आणि त्यानं कधीही संघापासून फारकतही घेतलेली नव्हती!' झा यांनी अभिलेखागारं पालथी घालून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदू महासभा या दोन संघटनांमधल्या संबंधांचाही शोध घेतला आहे. हिंदू महासभा आणि रा. स्व. संघ यांच्यातले संबंध 'परस्परव्याप्त आणि प्रवाही' स्वरूपाचं होतं आणि त्यांची विचारसरणी जवळपास सारखी होती, असं झा लिहितात. या दोन संघटनांचं 'कायमच जवळचे संबंध होते आणि काही वेळा त्यांचे सभासदही सारखे असत!', गांधीहत्येपर्यंत ही स्थिती टिकून होती, असं झा नमूद करतात. गांधीहत्येनंतर वर्षभराहून अधिक काळ रा. स्व. संघावर बंदी घालण्यात आली. आपण १९३० च्या दशकात संघापासून फारकत घेतली होती, हे गोडसेचं न्यायालयातलं विधान संघ कायम उर्द्धृत करत आला आहे आणि संघाचा या हत्येशी काहीच संबंध नसल्याचं न्यायालयीन निकालातही म्हटलं होतं.

गांधींजींच्या हत्येची चौकशी करण्यासाठी नंतर कपूर आयोगाची स्थापना झाली होती. १० दिवस आधी एवढा मोठा हल्ला झाल्यानंतर पोलिसांनी सावध व्हायला हवं होतं, असं न्यायाधीशांनी सुनावणीवेळी म्हटलं होतं. याची नोंद कपूर आयोगाच्या अहवालात आहे. या देशाला एकत्र ठेवण्यासाठी, या देशाची शांतता अबाधित राखण्यासाठी गांधींजी सर्व शक्तिनिशी प्रयत्न करत होते. ऊर्वरित आयुष्यातही त्यांनी हेच कार्य सुरू ठेवलं असतं! असं सामाजिक कार्यकर्त्या तीस्ता सेटलवाड यांनी गांधींच्या हत्येची पार्श्वभूमी कशी होती, या विषयावर एक पुस्तक 'बियाँड डाउट- ए डॉसिएर ऑन गांधीज असासिनेशन' हे पुस्तक संपादित केलंय त्यात त्यांनी म्हटलंय. या पुस्तकात विविध लेखकांनी लिहिलेल्या लेखांचा समावेश आहे. ३० जानेवारी १९४८ रोजी गांधीजींची हत्या झाल्यानंतर २ फेब्रुवारी रोजी नारायण आपटे आणि विष्णू करकरे मुंबईला पोहोचले, त्यांना १३ फेब्रुवारी रोजी पकडण्यात आले. ५ फेब्रुवारी रोजी नथुरामचा भाऊ गोपाळ गोडसेलाही पकडण्यात आलं. २२ जून रोजी लाल किल्ल्यातल्या विशेष न्यायालयात न्यायाधीश आत्माचरण यांच्यासमोर सुनावणीला सुरुवात झाली. १० फेब्रुवारी १९४९ रोजी न्यायालयानं निकाल दिला. यामध्ये नथुराम गोडसे आणि नारायण आपटेला फाशी सुनावली गेली. तर विष्णू करकरे, मदनलाल पहावा, गोपाळ गोडसे, दत्तात्रय परचुरे, शंकर किष्टय्या यांना जन्मठेप ठोठावली गेली. २ मे १९४९ रोजी न्यायाधीश जे. डी. खोसला यांच्या न्यायालयात अपिलावर सुनावणी सुरू झाली. २ जून रोजी इथंही फाशीची शिक्षा कायम ठेवली गेली आणि १५ नोव्हेंबर रोजी गोडसे, आपटेला फाशी देण्यात आली.
हरीश केंची
९४२२३१०६०९

No comments:

Post a Comment

लोकशाही की एकाधिकारशाही...!

"देशात लोकशाहीचा उत्सव सुरू आहे, पण सत्ताधारी  लोकशाही संसदीय ऐवजी अध्यक्षीय असल्यासारखे वागताहेत. सामूहिक नेतृत्व सांगणारा...