Tuesday 18 January 2022

स्वातंत्र्यलढ्याची बदनामी ही जुनी दुटप्पी खेळी

"स्वातंत्र्यलढ्यात आपलं योगदान शून्य आहे ही सल डॉ.हेडगेवार, गोळवलकरांच्या अनुयायांना सतत बोचत राहते. आपण त्या लढ्यात नव्हतो म्हणून संपूर्ण स्वातंत्र्यलढाच बदनाम करायचा, पण आपल्या अंगाला धक्का लागू नये म्हणून या गोष्टी कंगनासारख्या अभिनेत्रीच्या तोंडून वदवून घ्यायच्या आणि मग एक एक करून ‘हो माझं त्याला समर्थन आहे!’, असं म्हणत आपलेच लोक उभे करायचे ही यांची जुनी नीती. पण, विक्रम गोखलेंना हा संपूर्ण इतिहास १००% माहित आहे. पण एखाद्या मोठ्या पदाच्या किंवा पुरस्काराच्या लोभापायी त्यांनी त्यांना दिलेली स्क्रिप्ट वाचली. पण ज्यांच्या सांगण्यावरुन हे लोक बोलत आहेत ते यांचे बोलवते धनी १९४७ मध्येच मिळालेल्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहेत. म्हणजे एकीकडं स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करायचा आणि त्याचवेळी स्वातंत्र्यलढा बदनाम करायचा ही यांची जुनी दुटप्पी खेळी. बरं याविरोधात एकही भाजप किंवा संघाचा नेता बोलत नाही, हे विशेष!"
------------------------------------------------

*कं* गना राणावतला पद्मश्री पुरस्कार मिळाला आणि त्याचा बदला की मोबदला म्हणून तिनं एकामागोमाग काही वक्तव्यं केली आहेत. 'देशाला २०१४ साली खरं स्वातंत्र्य मिळालं, १९४७ साली जे मिळालं ती भीक होती!' '१९४७ साली कोणती लढाई झाली होती की ज्यामुळं स्वातंत्र्य मिळालं? हे सांगा, मी माझा पुरस्कार परत करते!' लगेच दुसर्‍या दिवशी विक्रम गोखलेंनी कंगनाला समर्थन देत जे देशासाठी लढले त्यांना फाशीपासून वाचविण्याकरिता राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांनी कोणतेही प्रयत्न केले नाहीत, असं म्हटलं. कंगनानं पुन्हा महात्मा गांधींची टिंगल टवाळी करत ‘दुसरा गाल पुढं करून भीक मिळते, स्वातंत्र्य मिळत नाही; भगतसिंगच्या फाशीला गांधींचा पाठिंबा होता, असे बरेच पुरावे आहेत!’ असंही तिनं म्हटलंय. या साऱ्या वक्तव्यांमागचं राजकारण आणि सत्य दोन्ही आपण पाहणं गरजेचं आहे. आपण एखाद्या भिकार्‍याला भीक देताना त्याच्याच कटोर्‍यातले पैसे लुटून त्याला भीक देतो का? तर याचं उत्तर नाही असं आहे! आपण आपल्या जवळचे, आपल्या कमाईचे पैसे त्याला भीक म्हणून देतो. मग इंग्रजांनी भिकेत स्वातंत्र्य दिलं म्हणजे काय, त्यांचा देश आपल्याला देऊन टाकला का? देश आपलाच होता, त्यांनी तो लुटला. त्यासाठी क्रांतिकारक इंग्रजांविरुद्ध प्राणपणानं लढत होते. फासावर जात होते. गांधी, नेहरू, पटेल, आझाद, सुभाषचंद्र बोस हे देश स्वतंत्र होण्यासाठी जीव तोडून लढत होते. अनेक आंदोलनं उभी करून इंग्रजांना हैराण करून सोडत होते. आयुष्याची १०-१० वर्षे यांनी तुरुंगात काढली. नेमकं याचवेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदू महासभा यासारख्या संघटना ब्रिटिशांना मदत करत स्वातंत्र्यलढ्याला विरोध करत होत्या. जे क्रांतिकारक आणि स्वातंत्र्यसेनानी देशासाठी लढत होते, त्यांच्याविरोधात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदू महासभेचे लोक इंग्रजांच्या बाजूनं लढत होते. सावरकरांसारखे लोक माफी मागून स्वतःची सुटका करून घेऊन इंग्रजांकडून महिना ६० रुपये पेन्शन घेत होते. अनेक दशकं असंख्य क्रांतिवीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. अनेक महापुरुषांनी आपलं संपूर्ण आयुष्य स्वातंत्र्यलढ्याला वाहून टाकलं तेव्हा कुठं हे स्वातंत्र्य आपल्या देशाला मिळालंय. हिंदू महासभा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, डॉ. हेडगेवार, गोळवलकर गुरुजी यांच्याप्रमाणे इंग्रजांची चाकरी करून हे स्वातंत्र्य मिळालेलं नाही. आता हा इतिहास कंगनानं वाचल्याची शक्यता कमी आहे. स्वातंत्र्यलढ्यात आपलं योगदान शून्य आहे ही सल डॉ.हेडगेवार, गोळवलकरांच्या अनुयायांना सतत बोचत राहते. आपण त्या लढ्यात नव्हतो म्हणून संपूर्ण स्वातंत्र्यलढाच बदनाम करायचा, पण आपल्या अंगाला धक्का लागू नये म्हणून या गोष्टी कंगनासारख्या अभिनेत्रीच्या तोंडून वदवून घ्यायच्या आणि मग एक एक करून ‘हो माझं त्याला समर्थन आहे!’, असं म्हणत आपलेच लोक उभे करायचे ही यांची जुनी नीती. पण, विक्रम गोखलेंना हा संपूर्ण इतिहास १००% माहित आहे. पण एखाद्या मोठ्या पदाच्या किंवा पुरस्काराच्या लोभापायी त्यांनी त्यांना दिलेली स्क्रिप्ट वाचली. पण ज्यांच्या सांगण्यावरुन हे लोक बोलत आहेत ते यांचे बोलवते धनी १९४७ मध्येच मिळालेल्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहेत. म्हणजे एकीकडं स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करायचा आणि त्याचवेळी स्वातंत्र्यलढा बदनाम करायचा ही यांची जुनी दुटप्पी खेळी. बरं याविरोधात एकही भाजप किंवा संघाचा नेता बोलत नाही, हे विशेष.

१९४७ ला कोणतं युद्ध झालं? असं विचारणारी कंगना २०१४ साली कोणतं युद्ध झालं? हे सांगत नाही. कंगनाला २०१४ साली कोणते खरे स्वातंत्र्य मिळाले हा प्रचंड संशोधनाचा विषय आहे. कारण २०१४ सालापासून स्वातंत्र्य मिळणं तर दूरच, जे स्वातंत्र्य, हक्क, अधिकार होते तेसुद्धा कमी झाले आहेत. देशातली महागाई, बेरोजगारीनं उच्चांक गाठलाय, अर्थव्यवस्था ढासळलीय, परराष्ट्र धोरण सपशेल फेल झालंय. विरोधकांना नामोहरम करण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा प्रचंड गैरवापर होतोय. माध्यमं तर सरकारपुरस्कृत झालेली आहेत. मोठे नेते, मंत्री, पोलीस अधिकारी, न्यायाधीश जिथं सरकारच्या विरोधात बोलायला घाबरतात तिथं सामान्य माणसाची अवस्था तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी झाली आहे. शेतकरी-मजुर, नोकरदार, व्यावसायिक सर्वांची परिस्थिती वाईट आहे. यात कंगनाला खरं स्वातंत्र्य कोणतं दिसलं हे कळायला मार्ग नाही. पण जिथं स्वतःचं काहीच कर्तृत्व नसलं की ज्यांनी कर्तृत्व गाजवलं त्यांना बदनाम करायचं हेच संघाने आजपर्यंत केलेलं आहे. त्रिपुरामधल्या हिंसेमुळं देशात काही ठिकाणी दंगेधोपे, जाळपोळ झाली. अशाचवेळी विक्रम गोखले देशात अगदी मुगलांचं राज्य असल्याच्या आवेशात बोलले की, हा भारत हिरवा होऊ देणार नाही. अहो, ६०० वर्षे संपूर्ण देश मोगलांच्या ताब्यात असताना हा देश हिरवा झाला नाही, मग आज तर हिंदू धर्माचा ठेका घेतलेल्यांचेच राज्य आहे. पण गोखलेंवर त्यांच्या स्वामींनी सोपविलेली जबाबदारी त्यांनी चोख पार पाडलीय. भाजपेयींचा देशात आणि राज्यात सध्या कठीण काळ सुरू झालाय. सर्वच आघाड्यांवर सपशेल आपटलेलं केंद्र सरकार आणि राज्यात नवाब मलिक यांनी भाजप नेत्यांची केलेली पोलखोल यातून कंगना आणि गोखले यांनी विरोधकांना गुंतवून भाजपला सावरण्यासाठी, नवीन डावपेच आखण्यासाठी वेळ दिलाय. आता सर्व मुद्यांवर फेल झाल्यानंतर त्यांच्याकडं देशात दंगली घडविण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. ते येणाऱ्या काळात आपल्या सर्वांना दिसेलच.

कंगना आणि गोखले या दोघांचंही म्हणणं आहे की, भगतसिंगांची फाशी थांबविण्यासाठी गांधी आणि नेहरूंनी काहीच केलं नाही, मग भगतसिंगांची फाशी थांबावी म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं आणि हिंदू महासभेनं काय केलं? नेहरूंप्रमाणे किती संघाचे लोक भगतसिंगांना भेटण्यासाठी लाहोर जेलमध्ये गेले होते? केशव हेडगेवार, माधव गोळवलकर, श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी भगतसिंगांची फाशी थांबावी म्हणून इंग्रजांना किती पत्रं लिहिलीत? उलट इंग्रजांच्या ब्लॅक लिस्टमध्ये आपण नको म्हणून फक्त भगतसिंगच नाही तर प्रत्येकच क्रांतिकारकांपासून कायम चार हात हे लोक दूरच राहिलेत. हेडगेवारांनी तर दोन वेळा स्वतः सुभाषबाबू भेटायला उत्सुक असल्यानंतर सुद्धा इंग्रजांच्या भीतीनं त्यांची भेट टाळली. ह्या कट्टरवाद्यांनी स्वतः स्वातंत्र्यासाठी काही करणं सोडा, पण जे युवक स्वतःला स्वातंत्र्यलढ्यात झोकून द्यायला तयार होते त्यांनाही संघानं परावृत्त केलं. इंग्रजांशी लढू नका सांगितलं. इंग्रजांविरोधात कुणीच लढलं नसतं तर स्वातंत्र्य कसं मिळालं असतं? असा प्रश्न त्याकाळी इंग्रजांची चाकरी करणार्‍यांना आणि त्यांच्या समर्थकांना विचारण्याची हिंमत आहे का तुमच्यात श्रीमान गोखले? गांधींनी भगतसिंगांची फाशी टळावी म्हणून व्हॉईसरॉय इर्विन यांच्यासोबत पूर्ण ताकदीनिशी चर्चा तर केलीच सोबतच इर्विन यांना गांधीजींनी पाच पत्रेसुद्धा लिहिलीत. ती आजही गांधी वाङ्ममयात उपलब्ध आहेत. गांधींच्या तगाद्यानं शेवटी इर्विन यांनी वैतागून गांधींना विचारलं की हिंसक कृत्यांमध्ये प्रत्यक्ष सहभागी असलेल्यांची बाजू तुम्ही घेता तरी कसं? त्यावर गांधी बोलले, इथं हिंसा, अहिंसेचा मुद्दा येतो कुठं? देशासाठी प्राण देण्याची तयारी असलेल्या हिंमतवान, बहादूर लोकांसाठी मी प्रयत्न करतोय. गांधींना इतकेच अधिकार असते तर त्यांच्या पत्नी कस्तुरबा आणि त्यांचे मानसपुत्र महादेव देसाई दोघांचाही तुरुंगात मृत्यू झाला नसता हे सुद्धा लक्षात घ्या.
पंजाब आणि आजूबाजूच्या प्रांतातील जे इंग्रज आयसीएस अधिकारी होते त्यांनी ब्रिटिश सरकारला स्पष्ट शब्दात कळवलं की, ‘वरील लोकांची फाशी आपण टाळली तर आम्ही सामूहिक राजीनामे देऊ.’ त्यामुळं फाशी टाळणं हे ब्रिटिश सरकारसाठी कठीण झालं होतं. हा निर्णय ब्रिटिश सरकारचा असल्यानं लॉर्ड इर्विन काहीच करू शकले नाहीत. लॉर्ड इर्विन आपल्या आत्मचरित्रात स्वतः कबूल करतात की, "There was one man who want to save Bhagatsing, Sukhdev and Rajguru but I could not do anything because of my Administration and that man was Gandhi!". म्हणजेच भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांची फाशी टळावी म्हणून भारतातल्या एकाच माणसानं प्रयत्न केला आणि तो माणूस म्हणजे महात्मा गांधी होते. पण मी काही करू शकलो नाही, माझे हात प्रशासनानं बांधलेले होते. भगतसिंगांना वाचविण्याकरिता गांधींनी जिवापाड तर प्रयत्न केलेच सोबत जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस यांनीसुद्धा त्यांच्या कोर्ट केसमध्ये त्यांना मदत केली. जवाहरलाल नेहरू स्वतः भगतसिंग, बटुकेश्वर दत्त यांना भेटण्यासाठी लाहोर जेलमध्ये गेले होते. भगतसिंगांनी आपल्या शेवटच्या क्षणांमध्ये आपले कायदेविषयक सल्लागार प्राणनाथ मेहतांना सांगितलं होतं की, माझ्या खटल्यात जातीनं लक्ष घालण्याकरिता जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस यांना माझ्याकडून धन्यवाद सांगा.

डॉ. हेडगेवार, गोळवलकरांना धन्यवाद सांगा असं भगतसिंगांनी का म्हटलं नाही? कारण डॉ. हेडगेवार आणि गोळवलकरांची भगतसिंगांच्या फाशीला मूक संमती होती. छुपा पाठिंबा होता तो नसता तर ह्या लोकांनी भगतसिंगांची फाशी थांबविण्यासाठी एकतरी प्रयत्न केला असता. पण प्रयत्न सोडा यांनी साधं आंदोलन केलं नाही किंवा साधं निवेदनसुद्धा दिलं नाही. भगतसिंगांची फाशी थांबविण्यासाठी सोडा, पण त्यांना फाशी दिल्यानंतरसुद्धा यांनी त्याचा साधा निषेध केला नाही. फक्त भगतसिंगांच्या फाशीचाच नाही तर जालियनवाला बाग हत्याकांडात शेकडो भारतीय शहीद झाल्यानंतर सुद्धा ह्या लोकांनी त्या घटनेचा इंग्रजांच्या भीतीनं साधा निषेध केलेला नाही. भगतसिंगांचे सहकारी प्रसिद्ध बंगाली क्रांतिकारक जतींद्रनाथ संन्याल यांंनी भगतसिंगांची फाशी रोखण्यासाठी गांधीजींनी केलेल्या प्रयत्नांची माहिती देशाला झाली नाही याबद्धल आपल्या चरित्रात खंत व्यक्त केली आहे आणि गांधींनी केलेल्या प्रयत्नांची हकीकत सविस्तरपणे नोंदविलीय. १९२१ ते १९४२ हा भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास ‘अ‍ॅन इंडियन स्ट्रगल’ या पुस्तकात लिहिल्या गेलाय. त्यात सुभाषचंद्र बोस म्हणतात, ‘इट मस्ट बी अ‍ॅडमिटेड दॅट गांधीजी डिड ट्राय हिज बेस्ट टू सेव्ह भगतसिंग’. स्वतः सुभाषबाबू सांगत आहेत. अजून कुठला पुरावा हवाय? भगतसिंगांसाठी फक्त गांधी आणि काँग्रेसनंच प्रयत्न केलेत. बाकी हिंदुत्ववादी म्हणवणार्‍या संस्था, संघटना इंग्रजांच्या भीतीनं मूग गिळून गप्प होत्या. त्या फक्त गप्प असत्या तरी हरकत नव्हती, परंतु त्या इंग्रजांना अनुकूल वातावरण निर्मिती देशात करत होत्या. इंग्रजांना मदत करत होत्या आणि त्यावेळी जे इंग्रजांविरोधात लढले त्यांना बदनाम करण्याकरिता सतत प्रयत्नशील होत्या आणि आहेत. शेवटी कंगनाला सुद्धा प्रश्न विचारला पाहिजे की १९४७ ला जर खरं स्वातंत्र्य मिळालं नसतं तर आज तुला पुरस्कार आणि झेड सिक्युरिटी देणारं सरकार अस्तित्वात आलं असतं? आणि ओबीसी समाजातून आलेले मोदी पंतप्रधान बनू शकले असते? विचार करा खा.ओवेसी म्हणतात तसं हेच वक्तव्य स्वातंत्र्यसेनानींसाठी जर कुण्या मुस्लिमानं केलं असतं तर? यांनी संपूर्ण देश भडकवून टाकला असता. मग कंगना, गोखले आता सांगा की स्वातंत्र्य इंग्रजांना कायम मदत करणार्‍या डॉ.हेडगेवार, गोळवलकरांमुळं मिळालं की इंग्रजांविरोधात लढणार्‍या गांधी, सुभाषबाबू, पटेल-नेहरू आणि भगतसिंगांसारख्या क्रांतीकारकांमुळं?
हरीश केंची,
९४२२३१०६०९

No comments:

Post a Comment

लोकशाही की एकाधिकारशाही...!

"देशात लोकशाहीचा उत्सव सुरू आहे, पण सत्ताधारी  लोकशाही संसदीय ऐवजी अध्यक्षीय असल्यासारखे वागताहेत. सामूहिक नेतृत्व सांगणारा...