Tuesday 18 January 2022

साधूंच्या वेषातले सैतान...!

"सार्वजनिक जीवनात वावरताना काही माथेफिरू माणसं भेटतात, काही मध्ययुगीन मानसिकतेची माणसं भेटतात, ‘प्रतिगामी’ या शब्दालाही लाजवेल अशी माणसं भेटतात; तेव्हा त्यांच्याकडं दुर्लक्ष करणं हा बहुतांश वेळा योग्य पर्याय असतो. विशेषत: त्यांच्या तोंडून निघणारी मुक्ताफळं जोपर्यंत खासगी स्वरूपात आणि चारचौघात उधळली जातात तोपर्यंत तरी, त्यांना अदखलपात्र ठरवणंच योग्य असतं. मात्र ती माणसं संघटितपणे आणि जाहीर कार्यक्रमांतून अद्वातद्वा बोलू लागतात तेव्हा त्यांची दखल घ्यावी लागते, त्यांच्या वक्तव्यांमुळं समाजातलं वातावरण कलुषित होणार असेल तर त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाईचा आग्रहही धरावा लागतो. आणि तशी कारवाई करण्यास शासनसंस्था कचरत असेल किंवा जाणीवपूर्वक टाळत असेल तर न्यायालयीन आणि अन्य सनदशीर मार्गांनी लढा द्यावा लागतो. अन्यथा, लोकशाही प्रक्रियेलाच बाधा निर्माण होत असते!"
-----------------------------------------------

हे आता सांगण्याचं कारण, तशा प्रकारची मुक्ताफळं उधळणारी माणसं पूर्वीपासून सर्वत्र आहेत; पण गेल्या काही वर्षांत या देशात त्यांचं प्रमाण वाढत चाललंय, आणि गेल्या महिन्याच्या अखेरीस त्या प्रकारानं सर्व सीमारेषा पार केल्या आहेत. दि. १७, १८,१९ डिसेंबर २०२१ हे तीन दिवस उत्तराखंड राज्यातल्या हरिद्वार इथं झालेल्या धर्मसंसदेत तसा प्रकार घडलाय. ‘इस्लामिक भारत में सनातन हिंदू धर्म का भविष्य’ अशी विचित्र थीम घेऊन ती धर्मसंसद झालीय. हिंदू रक्षा सेनेने ही धर्मसंसद आयोजित केली होती, तिच्यात हजारांहून अधिक तथाकथित संत-महंत आणि साधू-साध्वी सहभागी झाले होते. त्यात विश्व हिंदू परिषद, हिंदू महासभा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्याशी संबंधित माथेफिरूंचं प्रमाण जास्त होतं. डोकी ठिकाणावर आहेत अशी माणसं तिथं अपवादानंच असावीत, कारण तिथली भाषणं असह्य होऊन केवळ एका साधूनं ती धर्मसंसद सोडून निघून जाण्याचा विवेक दाखवलाय, ‘इथली भाषणं समाजविघातक आहेत, म्हणून ही सभा सोडून मी जात आहे’ असं म्हणण्याचं धैर्य दाखवलंय. तिथं जी विषारी भाषणं केली गेली त्यातल्या काही भाषणांचं निवडकच तुकडे आतापर्यंत बाहेर आले आहेत. सर्व भाषणांचे संपूर्ण व्हिडिओ मिळाले तर किती भयानक वातावरणनिर्मिती तिथं झाली असेल याची कल्पना येईल. वस्तुत: सोशल मीडियावरून व्हायरल झालेल्या व्हिडिओंच्या दोन-चार मिनिटांच्या तुकड्यांतली वक्तव्यं शब्दांकन करून देणं म्हणजे, त्या वक्तव्यांना आणखी सर्वदूर पोहोचवण्यास हातभार लावणंच ठरणार आहे. पण तरीही, फोफावत चाललेल्या विषवल्लीचा धोका लक्षात यावा म्हणून त्यांनी जी गरळ ओकली, त्यातली काही विधानं तरी माहीत करून घेतली पाहिजेत. रा.स्व.संघाचे पूर्वीचे प्रचारक आणि हिंदू रक्षा सेनेचे प्रमुख प्रबोधानंद गिरी यांनी उघडपणे असं सांगितलं की, ‘म्यानमारमध्ये रोहिंग्या मुस्लिमांचं जसं शिरकाण करण्यात आलं तसं भारतातल्या मुस्लिमांबाबत करायला हवे.’ याला त्यांनी ‘सफाई अभियान’ असं संबोधलं आहे. हिंदू महासभेच्या सचिव अन्नपूर्णा भारती यांनी असं म्हटलं की, ‘आपल्यातले शंभर लोक असे तयार व्हायला हवेत, जे वीस लाख मुस्लिमांना ठार करू शकतील. स्वत: मरण्याची आणि तुरुंगात जाण्याची तयारी असणारे हिंदू लोक पुढं आल्याशिवाय हिंदू राष्ट्र अस्तित्वात येणार नाही.’ सांभवी धाम आखाड्याचे प्रमुख स्वामी आनंदस्वरूप म्हणाले, ‘हरिद्वारमध्ये ख्रिसमस साजरा करू देऊ नका आणि मुस्लिम विक्रेत्यांवर बहिष्कार टाका.’ ते पुढं असंही म्हणाले की, ‘धर्मसंसदेत बोलला गेलेला प्रत्येक शब्द ईश्वरी वाणी आहे, त्यामुळं सरकारनं ती ऐकलीच पाहिजे. अन्यथा १८५७ सारख्या युद्धाला तयार राहिले पाहिजे!’

या धर्मसंसदेचे आयोजक नरसिंहानंद सरस्वती यांनी म्हटलं आहे की, ‘हिंदूंनी भरपूर मुलं जन्माला घालावीत आणि चांगली शस्त्रं जवळ बाळगावीत. मुस्लिम व्यक्ती २०२९ मध्ये पंतप्रधान होण्यापासून रोखायचं असेल तर हे करायला हवं.’ ते आणखी एका व्हिडिओत म्हणतात, ‘हिंदूंचा प्रभाकरन होऊन एलटीटीईप्रमाणे काम करणाऱ्या हिंदू तरुणांना मी एक कोटी रुपये देईन आणि हे काम तो जर एक वर्षाहून अधिक काळ करणार असेल तर १०० कोटी रुपये उभे करीन.’ पाटणा इथले धर्मदास महाराज म्हणाले, ‘मी जर खासदार असतो तर मनमोहनसिंग पंतप्रधान होते त्याच काळात संसदेत जाऊन त्यांच्यावर रिव्हॉल्व्हरमधून सहा गोळ्या झाडल्या असत्या!’ भारताचं संविधान हटवलं पाहिजे आणि भगवे संविधान आणलं पाहिजे, असं म्हणण्यापर्यंतची मजल तिथल्या अनेकांनी मारलीय. या सर्व भाषणांना तिथं उपस्थित असलेल्या हजारोंनी जोरदार प्रतिसाद दिला आहे. अलीकडंच वसिम रिझवी नावाच्या व्यक्तीनं उत्तर प्रदेश शिया वक्फ बोर्डाचा प्रमुख राहिलेल्या मुस्लिम धर्माचा त्याग करून हिंदू धर्म स्वीकारला आणि जितेंद्र नारायण त्यागी असं नाव धारण केलं आहे. धर्मसंसदेत सहभागी झालेल्या या व्यक्तीच्या मनातला मुस्लिमांबद्दलचा विखार तर आणखी अचंबित करणारा आहे. त्याचदरम्यान योगी आदित्यनाथ यांनी स्थापन केलेल्या हिंदू युवा वाहिनीचं संमेलन दिल्लीत झालं. तिथं नाझी पद्धतीनं सलामी देत एक प्रतिज्ञा उपस्थितांना देण्यात आली. ‘आम्ही आमच्या अंतिम श्वासापर्यंत लढत राहू. मुस्लिमांना मारू, स्वत: मरू, पण असे हिंदू राष्ट्र अस्तित्वात आणू, जिथे फक्त हिंदूंचेच वास्तव्य असेल!’ ही प्रतिज्ञा देणारी व्यक्ती म्हणजे ‘सुदर्शन न्यूज’ या टीव्ही वाहिनीचे मुख्य संपादक सुरेश चव्हाणके, नंतर त्यांनी ही प्रतिज्ञा ट्वीट करून त्यांच्या पाच लाख फॉलोअर्सपर्यंत पोहोचवली आहे. या धर्मसंसदेच्या दरम्यानच छत्तीसगढमध्ये एका संमेलनात कालीचरण दास या साधूनं नथूराम गोडसेंचा गौरव केला आहे. ‘मोहनदास गांधी यांची हत्या करून नथूरामनं खूपच मोठं काम केलं आहे, त्याला मी वंदन करतो.’ असं हे कालीचरण म्हणाले आहेत. आणखी विशेष हे आहे की, हे व्हिडिओ बाहेर आल्यावर आणि प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी त्यांच्यापर्यंत पोहोचल्यावर त्या प्रत्येकानं ‘आम्ही जे बोललो त्यावर ठाम आहोत’ असं म्हटलं आहे. ‘आम्ही पोलिसांना घाबरणार नाही, आमचे कोणीही काही वाकडे करू शकत नाही’ असं निर्लज्जपणे म्हटलं आहे. ती प्रतिज्ञा देऊन झाल्यावर सुरेश चव्हाणके तर लगेच म्हणाले की, ‘या प्रतिज्ञेतील काही शब्दांमुळं कोणाला वाईट वाटलं असेल तर चांगली गोष्ट आहे, कारण तसं वाटावं अशीच आमची इच्छा आहे!’

वरील वक्तव्ये केवळ काही तुकडे आहेत, अशी शेकडो विधानं पुढे आली आहेत आणि आश्चर्य म्हणजे ही वक्तव्ये बाहेर येऊन व्हिडिओ प्रसारित होऊन आठवडा उलटला तरी एकाही व्यक्तीला अटक झालेली नाही. तीन-चार व्यक्तींच्या नावानं पोलिसांत तक्रार दाखल झाली आहे एवढेच. वेगवेगळ्या काळात सुट्या सुट्या व्यक्तींनी किंवा एकाच कार्यक्रमात एखाद-दुसऱ्या व्यक्तीने अशी भाषणे करण्याची उदाहरणे खूप आहेत, पण अशा प्रकारची आणि इतकी विखारी वक्तव्ये एकाच कार्यक्रमात आणि एकाच काळात होण्याची स्वातंत्र्योत्तर भारताच्या इतिहासातली ही पहिलीच वेळ असावी. विशेष म्हणजे धर्मसंसद पार पडल्यावर हे व्हिडिओ तुकडे बाहेर आले आहेत आणि त्यानंतरच्या आठवड्यात जगभर पसरत चालले आहे. इंग्रजी आणि हिंदी प्रसारमाध्यमांनी त्यातही डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी त्यांची अधिक दखल घेतली आहे. विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि काही राजकीय पक्षांनीही निषेध केला आहे. भारतीय नौदलाचे माजी प्रमुख ॲडमिरल अरुण प्रकाश यांनी ‘हा सर्व प्रकार म्हणजे भारताच्या अंतर्गत सुरक्षिततेला आव्हान आहे’ असं म्हटलं आहे. त्यांच्याशी सहमती दाखवणारी प्रतिक्रिया भारताचे माजी लष्करप्रमुख वेदप्रकाश मलिक यांनी दिली आहे आणि ‘संबंधितांवर कठोर कारवाई तातडीनं केली पाहिेजे’ असंही म्हटलं आहे. याशिवाय देशातल्या ७५ नामवंत वकिलांनी आणि न्यायाधीशांनी देशाचे सरन्यायाधीश रमणा यांच्याकडं पत्र पाठवून ‘सर्वोच्च न्यायालयानं हे प्रकरण स्वत:कडं घ्यावं’ असं म्हटलं आहे. त्यांनी असंही म्हटलं आहे की, ‘हा केवळ भारताच्या एकतेचा आणि एकात्मतेचा प्रश्न नसून, भारतातील कोट्यवधी मुस्लिमांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे.’ जगभरातल्या अनेक राष्ट्रांकडून या प्रकाराबद्दल आणि दहा दिवस उलटून गेल्यानंतरही कोणतीच कारवाई केंद्र आणि राज्य सरकारनं न केल्याबद्दल कठोर टीका केली आहे.

उत्तरप्रदेशच्या निवडणुका तोंडावर असल्यानं भाजप, रा.स्व.संघ, उत्तर प्रदेश सरकार, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या सर्वांनीच हा प्रकार घडवून आणला आहे किंवा पाठिंबा दिला आहे, किंवा मूकसंमती दिली आहे असं सर्वत्र बोललं जात आहे. तरीही औपचारिकता किंवा ढोंग म्हणूनही त्या घटनांचा निषेध करायला पंतप्रधान आणि गृहमंत्री तयार नाहीत. दाखवण्यापुरती कारवाई करायचंही नाव घेत नाहीत. याचा अर्थ उघड आहे, हिंदू राष्ट्र हे त्यांचं अंतिम स्वप्न आहे आणि उत्तरप्रदेश विधानसभेची निवडणूक हे तत्कालीन उद्दिष्ट आहे. कोणत्या वेळी काय उपयुक्त ठरेल याबाबत त्यांचे आडाखे पक्के आहेत. म्हणजे तात्त्विक आणि व्यावहारिक या दोन्ही बाजूंनी त्यांना हे हवेच आहे! अन्यथा साधूंच्या वेषातील सैतान त्यांनी मैदानात उतरवलेच नसते. या पार्श्वभूमीवर कोणत्याही सुबुद्ध माणसाला प्रश्न पडेल, ‘मग आता करायचं काय? प्रसारमाध्यमं आवाज उठवतील, न्यायालयीन कारवाई संथ गतीनं होत राहील, विरोधी पक्ष आणि काही संघटना आंदोलनं करतील, जगभर मोदी सरकारची छी: थू होईल; पण निगरगट्ट आणि जनमताचा मोठा पाठिंबा असलेल्या मोदी सरकारवर त्याचा काय परिणाम होणार? विरोधी पक्ष दुर्बल आहेत, केंद्रिय सत्ता हटवता येणार नाही आणि हटवली तरी ही विषवल्ली नष्ट होणार नाही मग पुढे काय?’ या चिंतेवर ठोस असं उत्तर निश्चितच नाही, पण स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील या देशाच्या वाटचालीवर पुन्हा एकदा दृष्टिक्षेप टाकला आणि देशाची अवाढव्यता लक्षात घेतली तर पुढे येईल ते हेच की, असे अनेक समाजविघातक घटक या देशानं पचवले आहेत. हे समाजविघातक घटक एकूण लोकसंख्येचा विचार केला तर अत्यल्प आहेत. जसे सत्प्रवृत्त लोक अल्प एक टक्का आहेत, तसेच असत्‌ प्रवृत्तीचे लोकही अल्पच एक टक्का आहेत. उरलेला खूप मोठा समूह ९८ टक्के या दोहोंच्या सीमारेषेवर आहे. हा समूह इकडं तिकडं झुकत असतो. पण वेळ येते तेव्हा मोठी मोठी सिंहासनं उलथवून टाकू शकतो, त्यामुळं विद्यमान केंद्रिय राजवटीचेही शंभर दिवस भरणार आहेत हे निश्चित!

No comments:

Post a Comment

लोकशाही की एकाधिकारशाही...!

"देशात लोकशाहीचा उत्सव सुरू आहे, पण सत्ताधारी  लोकशाही संसदीय ऐवजी अध्यक्षीय असल्यासारखे वागताहेत. सामूहिक नेतृत्व सांगणारा...