Monday 11 July 2022

नैतिकतेचं सोवळं नेसून वावर....!

"हिंदू समाजात चारित्र्यवान, नीतिवान, समाजहितदक्ष, देशहिताचाच विचार करणाऱ्या कार्यकर्त्यांची संघटित शक्ती उभी करण्याचं काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ करतोय. पण ह्या शक्तीचं दर्शन भ्रष्टाचार, गैरव्यवहार, वशिलेबाजी, फसवणूक, संघटित स्वार्थासाठी केली जाणारी आम जनतेची पिळवणूक, या नेहमीच्या सामाजिक प्रश्नात दर्शन घडलंय का? बँकांतून मोठ्याप्रमाणात संघाचे कार्यकते आहेत. तिथं जो महाभयंकर भ्रष्टाचार झालाय, या भ्रष्टाचाराला थांबवण्यासाठी संघातून तयार झालेले चारित्र्यवान, नीतीवान, समाजहितदक्ष, देशप्रेमी का पुढं आले नाहीत? बँकेतल्या ह्या भ्रष्टाचारावर प्रकाश टाकण्यासाठी तिथं काम करणाऱ्या संघ स्वयंसेवकांनी संघटितपणे कसे प्रयत्न करावेत याचा विचार संघ का करू शकला नाही? ह्याशिवाय वेगवेगळ्या औद्योगिक, शैक्षणिक, सरकारी क्षेत्रातल्या भ्रष्टाचाराबद्धलही प्रश्न उपस्थित होईल.
---------------------------------------------------

'प्रभंजन'मधून भारतीय जनता पक्षाबद्धल जे काही मी लिहितो त्यानं नाराज झालेले चार तरुण मला भेटायला आले होते. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निष्ठावंत स्वयंसेवक होते. त्यांच्या मते 'संघानं घडवलेल्या हजारो कार्यकर्त्यांना सत्तेसाठी भाजपनं देशात आणि राज्यात जो व्यवहार चालवलाय तो पटत नाही, रुचत नाही; पण जे काही चाललंय ते थांबवा असंही त्यांना म्हणवतही नाही. 'तोंड दाबून मुका मार' असं जे म्हणतात तशी या कार्यकर्त्यांची अवस्था झालीय. काही कार्यकर्त्यांना जे काही चाललंय ते पटत नसलं तरी त्याशिवाय अन्य पर्याय नसल्यानं चाललंय, ते चांगलंच आहे असं मानावं लागतंय. तसं म्हणायची वेळ येईल, तेच म्हणावंही लागतंय!' माझ्याकडं आलेले तरुण राष्ट्रीय स्वयंसेवक संघात आणि भाजपत फरक असायचाच असं म्हणत होते. सत्ता हेही परिवर्तनाचं एक साधन आहे. संघाला समाजात जे घडवून आणायचंय, त्याला सत्ता भाजपच्या हातात असण्यानं सहाय्यच होईल. सध्या संघाच्या विचार-आचारानुसार काही गोष्टी घडत नसल्या तरी हळूहळू भाजपला संघ आचार-विचार आणि सरकारचा व्यवहार यात सुसंगती आणावीच लागेल. आज भाजपत संघातून घडलेल्या कार्यकर्त्यांखेरीज अन्य अनेकजण आहेत. त्यांच्यामुळं आणि काही प्रमाणात काही घटना दोषास्पद घडत असतीलही, पण हळूहळू सर्वांनाच संघविचार-आचार मानावेच लागतील, असं मानणारे ते तरुण होते. त्यांना केंद्र सरकारनं घेतलेल्या काही निर्णयांचं समर्थन करणंही अशक्य होत होतं, राज्यातल्या नेत्यांचं वागणंही रुचत-पटत नव्हतं. केंद्र सरकारचं मूल्यमापन आणि सरकारविरोधात कठोर टीका करणं योग्य नाही. त्यांना सांभाळून घ्यायला हवंय. सुधारणा करायला वेळ द्यायला हवाय, असा त्यांचा आग्रह होता. आपल्या विचारांशी ही मुलं प्रामाणिक होती. त्यांना राजकारणी मतलबी बुद्धीचा विलास दाखवायचा नव्हता. भाजप चुकत असेल, पण त्याला राज्य करू द्यायला हवंय असं त्यांना वाटत होतं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत यांची वेळोवेळी होणारी वक्तव्ये, संसदेतला गोंधळ, कश्मिरमधली परिस्थिती, नोटबंदी, जीएसटी, न्यायाधीशांचं प्रकरण, पाकिस्तान-चीनची घुसखोरी, महागाई, बेकारी, राज्यातली आंदोलनं अशा काही बाबी बोलण्यातून निघाल्या. त्या मुलांना माझं लिहिणं डाचत होतं तसंच सत्ताधाऱ्यांचं, भाजप नेत्यानं वागणंही डाचत होतं. मी त्यांना म्हटलं, 'संघ वा भाजप विरोधात लिहिताना त्यांचं सरकार कोलमडून पडावं, त्यांची सत्ता जावी असा माझा उद्देश निश्चितच नाही. पण जे गैर आहे ते गैर म्हणणं हे पत्रकारचं काम आहे आणि ते करण्याचाच माझा प्रयत्न आहे. पण मोदी, शहा, फडणवीस, भागवत यांच्यासह सारे भाजप नेते हे तत्वाधिष्ठित, मूल्याधिष्ठित राजकारण करण्याची भाषा करत होते. आपण संघात घडलेले कार्यकर्ते आहोत हे दाखवत होते, म्हणत होते. मंत्री असले तरी संघ शाखेवर जाऊन ध्वजप्रणाम करत होते. हे सारे वरून कीर्तन करतानाच त्यांच्या कारभाराचा मात्र तमाशा सुरू आहे. खुर्ची मिळावी म्हणून त्यांनी तत्वशून्य तडजोडी केल्याच होत्या. आता खुर्ची मिळाल्यावर मूल्यांना डावलण्याची त्यांची धिटाई वाढतेय. काँग्रेसचा चोरबाजार संपावा, मूल्याधिष्ठित राज्य असावं म्हणून लोकांनी भाजपला आपलंसं केलं, सत्तेवर बसवलं. पण निवडणूक काळात दिलेली आश्वासनं 'जुमला' म्हणत धुळीला मिळालीत, सामान्य माणसाला जीवन जगणं असह्य होऊ लागलंय. सोशल मीडियावर सरकारची लक्त्तर काढली जाताहेत. केवळ जनतेशीच नव्हे तर आपल्या कार्यकर्त्यांशी त्यांनी प्रतारणा केलीय असंच म्हणावं लागेल. हे सगळं इतक्या सहजपणे होऊ देण्यानं भाजपचं परिवर्तन हे पक्क्या बनेल, बातामारु, धोकेबाज, स्वार्थी राजकारण्यांत होईल म्हणून जे तत्व मानतात, मूल्यांची कदर करतात, साधनशुचितेचा आग्रह धरतात अशा सर्वांनी आपली नाराजी व्यक्त करायला हवी. ती वृत्तपत्रातून टीका करूनच व्यक्त व्हायला हवी असं नाही. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना फोन करून, पत्रं लिहून त्याबाबत आपलं मत कळवूनही नाराजी व्यक्त करायला हवीय. तुम्ही तुमच्या बळानं नव्हे, आमच्या बळानं खुर्चीवर बसला आहात, स्वतःला सावरा, तुमच्यावर आमची नजर आहे हे लक्षात ठेवा. बहकू नका. तुम्हाला आम्ही मोकाट स्वार्थामागे धावू देणार नाही हे सातत्यानं लोकांनी लोकप्रतिनिधींना सांगायला हवंय. पक्षाचे धिंडवडे निघत घडताना सारे गप्प का? मी हे सांगण्याचं काम करतोय!'

त्या तरुणांनी हे ऐकल्यावर अशाप्रकारे सांगून काय होणार, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. तेव्हा मी त्यांना गोळवलकर गुरुजी सांगत ती गोष्ट ऐकविली. ती गोष्ट अशी, एक विमानात एक पायलट आणि एक हवाईसुंदरी असे दोघेच योगायोगानं होते. पायलट त्या हवाईसुंदरीला वश करण्याची संधी शोधत होता, पण ती दाद देत नव्हती. त्याला आज संधी प्राप्त झाली होती. त्याने आपोआप विमान उडत राहण्याची व्यवस्था करून त्या हवाईसुंदरीवर झडप घातली. झटपट उरकून घ्यायची त्याची धडपड होती आणि ती हवाईसुंदरी जिवाच्या आकांतानं धडपडत ओरडत होती. पायलट तिला म्हणाला, 'कशासाठी एवढी बोंबाबोंब करतेस? कोण येणार तुझ्या मदतीला? आपण पंचवीस हजार फुटावर आहोत. विमानात आपण दोघेच आहोत. निमूटपणे माझी इच्छा पूर्ण कर. कुणाला काही कळणार नाही'. हवाईसुंदरीनं म्हटलं, 'माझ्या मदतीला कुणी येणार नाही, माझी बोंब कुणाला ऐकायला जाणार नाही हे सगळं मला कळतंय, पण हे तुझं विमान कधीतरी खाली उतरणार आहे. मी निमूटपणे तू जे करतो आहेस ते करू दिलं तर तुझ्या या करण्याला माझी संमती होती असंच म्हटलं जाईल. मी विमान उतरल्यावर तुझ्याविरुद्ध तक्रार करणारच. तेव्हा मला पहिला प्रश्न विचारला जाईल, तू काय केलंस? त्यावेळी मला ही बोंब मदत करेल. माझी तुझ्या कृत्याला मान्यता नाही हे दाखविण्यासाठी मला बोंब मारायलाच हवी. माझ्या सद्सदविवेक बुद्धीसाठी हे आवश्यक आहे...!' गैरगोष्टींबद्धलचा आपला संताप-विरोध व्यक्त झाला नाही तर गैरगोष्टीला आपलीही संमती आहे असं मानलं जाईल. म्हणून आपला विरोध, आपला निषेध व्यक्त व्हायला हवाय, नोंदला जायला हवाय. गुरुजींची ही गोष्ट लक्षात घेऊनच भाजपच्या कारभाराबद्धलची नाराजी नोंदवण्याची काळजी घेतली जायला हवीय. वाकडं पाऊल पडतानाच त्याला अडवायला हवंय, नाहीतर सरळ वाटही वाकडी होऊन जाते. महात्मा गांधी आपल्या विचारांशी प्रतारणा करणाऱ्या मातब्बरांनाही मोकळे सोडत नसत. गांधींजीच्या नंतर गांधीवादी म्हणवणाऱ्यांनी हाच आग्रह ठेऊन सत्तेवरच्या खादीधाऱ्यांना लोकांपुढं उभं करण्याचं धैर्य दाखवलं असतं तर काँग्रेसमध्ये खादी घालून काळे धंदे करणाऱ्यांची गर्दी झालीच नसती. पण सत्ता हातात ठेवण्यासाठी काही तडजोडी करायलाच हव्यात असं मानून गांधीवादी, गांधीजींच्या तीन माकडांप्रमाणे कान-डोळे-तोंड बंद करून सर्वोदय साधू लागले आणि त्यांना गुंडाळून ठेऊन काँग्रेसवर व्यवहारी, व्यावसायिक मंडळींचा कब्जा झाला. तत्वनिष्ठ, मूल्याधिष्ठित राजकारण दूर ठेऊन तडजोडी करण्याची चटक जशी वाढेल तसे संघवाले राजकारणात लुडुबुडू नयेत हा आग्रहही वाढणार. तुमचं सुसंस्कृत, राष्ट्रनिष्ठ नागरिक बनवण्याचं काम सुरक्षितपणे चालावं म्हणूनच आम्ही आम्हाला वाटेल तशी सत्ता राबवतो आहोत. आमच्याकडं फार लक्ष देऊ नका, तुमचं काम संघस्थानावर चालू ठेवा, असं सांगून संघाच्या कार्यकर्त्यांना गुंडाळलं जाईल. याचा अनुभव अलीकडच्या काळात अनेकदा आलाय. भाजपची सत्ताधारी मंडळी, मंत्रीगण संघस्थानावर ध्वज प्रणामासाठी, कर्मकांड उरकायला अगदी गाजावाजा करून येत राहतील. पण खुर्ची कायम राहण्यासाठी नको त्या माणसांशी, नको त्या तडजोडी करून, नको तेवढी लाचारी आणि नको तेवढा उन्मतपणा दाखवीत काँग्रेसवाल्यांच्या थाटात कारभार करत राहतील. हे अनेक प्रकरणात दिसून आलंय.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सत्ताकांक्षा नाही. त्याला सांस्कृतिक-सामाजिक पुनरुथानाचं कार्य करायचं आहे आणि सुसंस्कारित, सुजाण, शिस्तबद्ध नागरिकांची समर्पित भावनेनं सर्व कार्य करणारी संघटित अशी शक्ती समाजात उभी करायचीय. ह्यासाठी आवश्यक तर सत्ताही हवीय असं मानणाऱ्यांनी भाजपला यासाठी निवडलंय. भाजपनं याचं भान ठेवलंय असं मात्र दिसत नाही. भाजपत सत्तातुरांची गर्दी झाली असून 'भय ना लज्जा' अशा थाटात ही मंडळी वागताहेत. त्यांच्या या वागण्याकडं संघाचे कार्यकर्ते डोळेझाक करणार आहेत का? संसदेत आणि विधिमंडळात आणि बाहेरही जे काही घडतंय ते पाहिल्यावर संस्कृतीचा सदासर्वदा उच्चार करणाऱ्या मंडळींनी जो शिमगा चालवलाय ते दिसून येतं. पत्रकारांतही 'संस्कृतीचा संस्कार' घडलेली बरीच स्वयंसेवक मंडळी असल्यानं आणि त्यांनी विविध प्रसिद्धीमाध्यमातून बालेकिल्ले बनविले असल्यानं अनेक गोष्टी सर्वसामान्य माणसांपर्यंत जाऊ न देण्याचं अथवा विशिष्ट पद्धतीनंच ठेवण्याचं काम चोखपणे पार पाडलं जातंय. बेफाम, बेताल बोलणाऱ्यांना लोकांपुढं जाहीरपणे क्षमायाचना करायला लावण्याची शिक्षा भाजपनेत्यांना द्यायला हवी होती. आम्ही उतणार नाही, मातणार नाही, स्वतःचा तोल जाऊ देणार नाही, विरोधकांबद्धल अपशब्द उच्चारणार नाही. लोकसेवेचं व्रत सोडणार नाही. संशय येईल अशाप्रकारे व्यवहार करणार नाही. असं वचन लोकांना देऊन त्यानुसार वागणारे आदर्श लोकप्रतिनिधी भाजपनं दिले असते तर खरोखरच राजकारणाचाच नव्हे तर देशाचा चेहरामोहरा बदलला असता. लोकांनी अन्य राजकारण्यांना मूठमाती दिली असती. सगळ्याच राजकारणी पक्षांना उमेदवार निवडताना विचार करावा लागला असता, पण दुर्दैवानं भाजपनेही 'आज रोख उद्या उधार' पाटी लावून दीड दांडीच्या तराजूनंच आपला धंदा चालवायचं ठरवलेलं दिसतं. रोज नव्या घोषणा आणि नवे वायदे सुरू आहेत. 'एक ना धड भराभर चिंध्या' ही म्हण आपलं घोषवाक्य बनवलं असतं तरी बिघडलं नसतं. असं वाटण्याइतपत धोरणांच्या फुलबाज्या उडवल्या जाताहेत. गेली अनेक वर्षे संघ हिंदू समाजात चारित्र्यवान, नीतिवान, समाजहितदक्ष, देशहिताचाच विचार करणाऱ्या कार्यकर्त्यांची संघटित शक्ती उभी करण्याचं काम करतोय. ह्या शक्तीचं संघटित दर्शन कुठल्या भ्रष्टाचार, गैरव्यवहार, वशिलेबाजी, संघटित स्वार्थासाठी केली जाणारी आम जनतेची पिळवणूक, फसवणूक या नेहमीच समोर येणाऱ्या सामाजिक प्रश्नात घडलं आहे, असं आजवर दिसून आलेलं नाही.

बँकांतून मोठ्याप्रमाणात संघाचे कार्यकर्ते काम करताहेत. बँकांमध्ये जो महाभयंकर असा भ्रष्टाचार घडला, या भ्रष्टाचाराला थांबविण्यासाठी संघातून तयार झालेले चारित्र्यवान, नीतीवान, समाजहितदक्ष, देशप्रेमी का पुढं आले नाहीत? ठीक आहे, हा भ्रष्टाचार उघड झाला नव्हता तेव्हा तो उघड होईल की नाही याचं भय वाटून हे लोक गप्प बसले असतील. पण तो भ्रष्टाचार हुडकण्यासाठी आज प्रयत्न होत आहेत. बँकेतल्या ह्या भ्रष्टाचारावर प्रकाश टाकण्यासाठी बँकातून काम करणाऱ्या सर्व संघ-स्वयंसेवकांनी संघटितपणे कसे प्रयत्न करावेत याचा विचार संघ का करू शकला नाही? ह्या सगळ्याच वेगवेगळ्या औद्योगिक, शैक्षणिक, सरकारी क्षेत्रातल्या भ्रष्टाचाराबद्धलही उपस्थित होईल. कुठल्या क्षेत्रात भ्रष्टाचार, अन्याय, लाचखोरी, वशिलेबाजीला विरोध करण्याचा संघानं संघटितपणे प्रयत्न केलाय? हा प्रश्न संघालाच विचारायचा, कारण संघ हिंदू समाजाचं एका आदर्श, समर्थ, संघटित समाजात परिवर्तन करण्याचं व्रत घेऊन उभा आहे. संघाला अन्य संघटनांसारखं 'सत्ताकारण' करायचं नाही. संघ तत्वचर्चेपेक्षा आचरणावर अधिक भर देतो असं संघ प्रचारक सतत सांगतात. नैतिकतेचा टेंभाही ते सतत मिरवतात. संघ संस्थापक डॉ. हेडगेवार, द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी, बाळासाहेब देवरस आणि सध्याचे सरसंघचालक मोहनराव भागवत या सर्वांनी नैतिकतेचा मापदंड समाजापुढं आजवर ठेवलाय. 'समाज जीवनात कितीही भ्रष्टाचार असला तरीही सर्वसामान्यपणे संघ स्वयंसेवक, संघ संचालित संस्था भ्रष्टाचारापासून दूरच आहेत' असंही संघ प्रचारक, संघ पुरस्कर्ते म्हणतात. ज्याप्रमाणे राममंदिराच्या प्रश्नावर संघाचे स्वयंसेवक जिथं जिथं असतील तिथं तिथं प्रत्यक्ष कार्यासाठी उभे झाले; तर समाजाची आंतरिक शक्ती जागविण्यासाठी, सर्वसामान्य माणसांमध्ये नैतिक बळ वाढविण्यासाठी, देशाला पोखरणारा भ्रष्टाचार संपविण्यासाठी, निदान तो उघड्यावर आणण्यासाठी जिथं जिथं संघ स्वयंसेवक आहे तिथं तिथं तो कार्यक्षम का झाला नाही? सरकारी नोकरांमध्येही संघ स्वयंसेवक मोठ्या संख्येनं आहेत. सरकारी कचेऱ्यातली उदंड दप्तरदिरंगाई, भ्रष्टाचार, गैरव्यवहार थांबविण्यासाठी शक्य नसेल, पण उघड्यावर आणण्यासाठी संघ स्वयंसेवक संघटितपणे काही करू शकले नसते का? देश आणि राज्यातल्या परिस्थितीचा इथं उहापोह केला गेला. मात्र सर्वत्र अशीच परिस्थिती आहे. खासदार, आमदार, मंत्री अनेक ठिकाणी संपूर्ण महापालिका ताब्यात असतानाही इथल्या लोकांचं जीवन सुसह्य होईल असं काही घडताना दिसत नाही. जातीचा दाखला रद्द झालेल्या खासदारांना उन्माद चढलाय. ते आपल्यातच 'धर्मकार्या'त मश्गुल आहेत. त्यांना आवरणार कोण? दोन भाऊ एकमेकांविरुद्ध शीतयुद्ध खेळताहेत. महापालिकेत सत्ता कुणाची आणायची यासाठी दंड थोपटताहेत. सगळा कारभार रामभरोसे सुरू आहे. त्यामुळं नोकरशाही माजलीय. जनतेनं एवढं भरभरून दिलं असताना त्यांच्या नशिबी हा कर्मदारिद्रीपणा आलाय. इथं संघ स्वयंसेवकांनी, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी या नेत्यांना आजवर का जाब विचारला नाही? कुणालाही न जुमानणारे हे नेते कार्यकर्त्यांना कसे जुमानणार? या सत्तातुरांना कोण आवरणार? संघाची शिस्त, वैचारिक बैठक, तत्वनिष्ठा, मूल्याधिष्ठित राजकारण आज कुठंतरी हरवलंय असं वाटण्यासारखी स्थिती दिसून येतेय!
हरीश केंची,
९४२२३१०६०९

No comments:

Post a Comment

बदसूरत ’पॅटर्न'

‘ ‘अब की बार चारसौ पार’ ची घोषणा देऊन तिसऱ्यांदा सत्ताप्राप्तीसाठी लोकसभा निवडणुकीत शड्डू ठोकून उतरलेल्या भाजपची जोडी मोदी-शहा य...