Sunday 21 June 2020

गांधी विचारांचा उलटा प्रवास

"गांधींचा मत्सर करणाऱ्या या वर्गात दिवसागणिक वाढ होऊ लागली आहे. मध्यंतरी तर एका महिलेने गांधीजींचा पुतळा बनवून त्याला गोळ्या घालण्याचा प्रमाद केला होता. गांधीद्वेष किती पराकोटीला पोहोचला, याचं हे प्रातिनिधिक उदाहरण आहे. गांधीजींचे पुतळे पाडा, त्यांची चित्रे नोटांवरून हटवा असं म्हणत त्यांना गोळी घालणाऱ्या, नथुराम गोडसेला धन्यवाद देणाऱ्या एक आयएएस महिला अधिकारी आहेत. त्यांच्या पुतळ्याला गोळी घालणारी पूजा पांडेय ही एक महिला आहे. गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेला देशभक्त म्हणणारी प्रज्ञासिंह ठाकूर हीदेखील महिलाच आहे. पुरुषी जोखडात दासींचं जीवन व्यतित करणाऱ्या महिलांच्या हक्कासाठी, त्यांना शिक्षित करण्यासाठी, पुरुषांबरोबरीचा हक्क मिळवून देण्यासाठी ज्या महात्मा गांधींनी आयुष्य वेचले, त्यांच्याविषयीच या महिलांनी असे कृत्य करावे, हे खूपच क्लेशदायक आहे. गांधी नसते तर याच पूजा किंवा प्रज्ञासारख्या कोट्यवधी महिला आजही सामाजिक संहितेच्या नावाखाली चार भिंतीत बंदिस्त असत्या, स्वत:चा चेहरा उघड करण्याचेही त्यांना स्वातंत्र्य नसते. त्यांची बुद्धिमत्ता पुरुषी अहंकाराच्या टाचेखाली चिरडून टाकली गेली असती.
---------------------------------------------------

*भा* रतीय स्वातंत्र्यलढ्याचं अहिंसेच्या मार्गानं नेतृत्व करणारा नेता इतकीच आजच्या पिढीला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची ओळख आहे. स्वातंत्र्य लढ्यातील गांधी हे हिमनगाच्या टोकासारखं आहेत. हिमनगाचा समुद्रातील अदृश्य भाग कैकपटीनं मोठा असतो. तो आपल्याला दिसतच नाही. गांधीजींचं अगदी तसंच आहे. त्यांनी अस्पृश्यता, जातीभेद, सामाजिक अन्याय, अंधश्रद्धा, महिलांना मिळणारे दुय्यम स्थान-पडदा प्रथा, ग्रामीण विकास, स्वच्छता, कष्टकरी वर्गाची होणारी पिळवणूक यासाठी केलेला संघर्ष स्वातंत्र्य लढ्यापेक्षाही खूप मोठा होता. देशाची इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्तता व्हावी, यासाठीचा लढा परकियांशी होता, पण देशातील कुप्रथा, सामाजिक अव्यवस्था, भांडवलशाहीविरुद्धचा लढा त्यांचा स्वत:च्याच माणसांशी होता, त्यामुळे तो अधिक अवघड आणि कठीण होता. तरीही त्यांनी धर्ममार्तंड, वतनदार-जहागीरदारांविरुद्ध संघर्ष केला. एकाच वेळी ते अनेक पातळ्यांवर लढत होते. एखादी व्यक्ती म्हणून ते कदापि शक्य नव्हते. म्हणूनच गांधी ही व्यक्ती नव्हती तर तो एक विचार होता, एकाच वेळी सर्वच आघाड्यांवर विचारांच्या माध्यमातून त्यांचा संघर्ष सुरू होता. गांधी यांना जाऊन सात दशके झाली, तरीही त्यांनी दिलेला विचार आजही जिवंत आहे. केवळ भारतच नाही तर जगातील अनेक देश आज गांधीजींनी दाखवलेल्या दिशेनं मार्गक्रमण करीत आहेत. अमेरिका-ब्रिटनसारखी बलाढ्य राष्ट्रेही गांधी विचारांचे अनुकरण करताना दिसताहेत. गांधी आज जगभरातील शोषित-पीडित वर्गाच्या आंदोलनाचे प्रेरणास्रोत आहेत. विश्वशांतीच्या संकल्पनेचे ते उगमस्थान आहे. महिला-मुलींच्या न्याय्य हक्कासाठी झगडणाऱ्या लोकांची ते ऊर्जा आहेत. अवघ्या जगावर आज गांधी विचारांनी गारुड केलेलं असताना ज्या भारतात ते जन्मले, इथल्या लोकांच्या कल्याणासाठी त्यांनी आयुष्य वेचलं, प्राणाची आहुती दिली, त्याच लोकांच्या पुढच्या पिढ्यांनी गांधींचा इतका द्वेष आणि तिरस्कार करावा, हा किती मोठा दुर्दैवविलास!

*गांधी विचारांचा महिमा जगभर पसरलाय*
जग आज गांधींचा अनेक पैलूंनी अभ्यास करतेय. एखादी व्यक्ती रक्तपाताशिवाय एवढी मोठी क्रांती घडवू शकते, हे जगातील लोकांना आजही अविश्वसनीय वाटते. त्यामुळे गांधी एक आश्चर्य होते, या निष्कर्षावर आजचे तत्त्वज्ञानी पोहोचले आहेत. गांधींकडून प्रेरणा मिळाल्यामुळेच अमेरिकेतील कृष्णवर्णीय लोकांच्या हक्कासाठी डॉ. मार्टिन लुथर किंग ज्युनियर मोठे आंदोलन उभारू शकले. गांधीजींच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांनी प्रदीर्घ लढा देत अहिंसेच्या मार्गानं यश मिळवलं. त्यामुळेच त्यांना अमेरिकेतील गांधी अशी उपाधी मिळाली. एकटे मार्टिन लुथरच नव्हे, दक्षिण आफ्रिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्रपती नेल्सन मंडेला गांधीजींना आपले गुरू मानत. त्यांनी गांधीजींच्या विचारांचे अनुकरण करीत संघर्ष केला. त्यांचा कृष्णवर्णीयांसाठीचा लढा, २७ वर्षांचा तुरुंगवास, त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपतीपद हे सर्व गांधींच्या सहिष्णुतेच्या विचारांचाच परिपाक असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. झांबियाच्या स्वातंत्र्य आंदोलनाला गांधी विचारानेच चालना दिली. जगाला सापेक्षवादाचा सिद्धांत देणारे महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन यांचे गांधी हेच आदर्श होते. गांधीजींच्या अहिंसावादी विचारांचा त्यांच्यावर पगडा होता. गांधीजींचे विचारच जगाला उद्ध्वस्त होण्यापासून वाचवू शकतील, हे त्यांनी आजपासून ८०-९० वर्षांपूर्वी म्हटले होते. ज्या इंग्रजी राजसत्तेविरुद्ध गांधींनी लढा दिला, तेच इंग्लंड आज गांधीजींच्या शांततेच्या मार्गावर आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी आफ्रिका खंडातील तब्बल ५० देशांतील युवकांना व्हाईट हाऊसमध्ये संबोधित करताना गांधीजींच्या विचारांतून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले होते. याच अमेरिकेच्या संसदेने गांधींना त्यांच्या १५० व्या जन्मवर्षानिमित्त त्यांच्या देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरव करण्याचे निश्चित केले होतं मात्र तसं घडलं नाही. गांधी विचारांचा हा जगभर पसरलेला महिमा नाहीतर दुसरं काय?

*भारत गांधी विचारापासून दूर चाललाय*
जगातील प्रत्येक देश आज गांधी विचारांचा अनुयायी बनत चालला असताना भारत मात्र या विचारापासून दूर चाललाय. ज्या गांधींमुळे भारताची जगात ओळख निर्माण झालीय त्या गांधींचे विचार येथील एका वर्गाला बोचणारे काटे वाटू लागले आहेत. गांधींचा मत्सर करणाऱ्या या वर्गात दिवसागणिक वाढ होऊ लागली आहे. मध्यंतरी तर एका महिलेने गांधीजींचा पुतळा बनवून त्याला गोळ्या घालण्याचा प्रमाद केला होता. गांधीद्वेष किती पराकोटीला पोहोचला, याचं हे प्रातिनिधिक उदाहरण आहे. गांधीजींचे पुतळे पाडा, त्यांची चित्रे नोटांवरून हटवा असं म्हणत त्यांना गोळी घालणाऱ्या, नथुराम गोडसेला धन्यवाद देणाऱ्या एक आयएएस महिला अधिकारी आहेत. त्यांच्या पुतळ्याला गोळी घालणारी पूजा पांडेय ही एक महिला आहे. गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेला देशभक्त म्हणणारी प्रज्ञासिंह ठाकूर हीदेखील महिलाच आहे. पुरुषी जोखडात दासींचं जीवन व्यतित करणाऱ्या महिलांच्या हक्कासाठी, त्यांना शिक्षित करण्यासाठी, पुरुषांबरोबरीचा हक्क मिळवून देण्यासाठी ज्या महात्मा गांधींनी आयुष्य वेचले, त्यांच्याविषयीच या महिलांनी असे कृत्य करावे, हे खूपच क्लेशदायक आहे. गांधी नसते तर याच पूजा किंवा प्रज्ञासारख्या कोट्यवधी महिला आजही सामाजिक संहितेच्या नावाखाली चार भिंतीत बंदिस्त असत्या, स्वत:चा चेहरा उघड करण्याचेही त्यांना स्वातंत्र्य नसते. त्यांची बुद्धिमत्ता पुरुषी अहंकाराच्या टाचेखाली चिरडून टाकली गेली असती. १८-१९ व्या शतकातील महिलांसारख्या पुरुषसत्ताक व्यवस्थेत त्या नरकयातना भोगत खितपत पडल्या असत्या. याचेही त्यांना भान नसावे, याचेच मोठे दु:ख आहे.

*आज काही महिला गांधीद्वेष का करताहेत*
तहहयात महात्मा गांधींनी अहिंसेचा पुरस्कार केला असला तरी महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांप्रसंगी महिलांनी या तत्त्वाला तिलांजली द्यावी, अशी त्यांची भूमिका होती. एखादी महिला अत्याचाराची शिकार होत असल्यास तिला आत्मरक्षणाचा अधिकार आहे, त्यासाठी तिने नखे, दात या आयुधांचा वापर करून समोरच्यावर हल्ला करीत स्वत:चे रक्षण करावे, या मताचे गांधी होते. यावरून गांधी महिलांविषयी किती संवेदनशील होते, यांचा अंदाज येतो. महिला सशक्त आणि सुशिक्षित झाली तरच राष्ट्र बलशाली बनू शकतं, हे गांधीजींनी १०० वर्षांपूर्वी जाणले होतं आणि त्या दृष्टीनं त्यांनी प्रयत्नही केले होते. त्यामुळे महिलांमध्ये गांधीजींचं स्थान पूज्यनीय आहे, असं असताना आज काही महिला गांधीद्वेष का करताहेत, हेच मोठे कोडे आहे.

*अभ्यासातूनच गांधींचं बहुआयामी रूप उलगडेल.*
गांधी ही भारताची ओळख आहे, मागील काही वर्षांतील घटनाक्रम पाहता गांधींची ही ओळख पुसण्याचा पद्धतशीर प्रयत्न सुरू नाही ना? असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही. जगाला विश्वबंधुत्वाचा संदेश देणाऱ्या गांधी विचारांवरच आधुनिक भारताचा पाया आहे. धर्मनिरपेक्षता, सहिष्णुता, परोपकार, स्त्री-पुरुष समानता या गांधींच्या तत्त्वांनाच सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. गांधींविषयी अपप्रचार करून त्यांच्याविषयी आजच्या पिढीत कमालीचा द्वेष भरण्याचं षडयंत्र रचलं जात आहे. भारताची प्रगल्भ विचारसरणी संकुचित होत चालल्याचं हे निदर्शक आहे. आपल्या देशातील आजच्या तरुणाईनं यापासून वेळीच सावध होण्याची गरज आहे. गांधींचे विचार तिमिराकडून तेजाकडे नेणारे आहेत. त्यामुळेच अवघ्या विश्वाला आज गांधी विचारांची आस लागली आहे. विदेशातील युवक गांधी विचारांनी भारावून जात आहेत. प्रत्येक देशात गांधींचा नामघोष सुरू आहे. याचाच अर्थ या विचारांत नक्कीच काहीतरी जादू आहे. परिवर्तनाची क्षमता आहे. हे नवयुवकांनी जाणलं पाहिजे. मात्र त्यासाठी गांधी अभ्यासावा लागेल. नुकतंच महात्मा गांधींचं १५० वे जन्मशताब्दी वर्ष संपलंय. त्यासाठी ही एक पर्वणीच होती. त्यांच्याविषयीच्या अभ्यासातून निश्चितच गांधींचं बहुआयामी रूप उलगडेल. त्यांच्या विचारांचा अनमोल खजिना गवसेल आणि तो नक्कीच डोळे दिपवणारा असेल. त्यातून गांधींचे उत्तुंग व्यक्तिमत्त्व दृष्टीस पडेल तेव्हा निधी, प्रज्ञा, पूजा किंवा त्यांच्यासारखे गांधींचा द्वेष करणारे लोक किती खुजे आहेत, याचा प्रत्यय आलेला असेल. समाजातील एक वर्ग गांधीजींचा कमालीचा द्वेष करताना दिसून येत आहे. त्यातून मागील एक-दोन दशकांत गांधीजींचा अनादर-अवमान करण्याचे प्रमाण वाढले आहे. गांधींपासून प्रज्ञापर्यंतचा मागील सात दशकांतील प्रवास भारतीय विचारांच्या अधोगतीचं द्योतकच म्हणावे लागेल..

No comments:

Post a Comment

मोदींचं ठाकरे प्रेम.....?

"गोध्रा हत्याकांड, दंगलीनंतर मोदींची गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावरून उचलबांगडी करायचं वाजपेयी अडवाणी यांनी ठरवलं होतं. पण शिव...