Saturday 17 August 2019

कमलेचा जवाहर ……… !

 *क* मला म्हणजे दिल्लीच्या मध्यम वर्गीय काश्मिरी पंडितांच्या कुटुंबातील  जवाहरमल कौल यांची सर्वात धाकटी मुलगी,  कमला म्हणजे  काश्मिरी सौंदर्याचे अस्सल प्रतिक ! पृकृती अतिशय नाजूक. अलाहाबादच्या नेहरू म्हणजे पूर्वीच्या कौल घराण्यातील  मोतीलाल नेहरू यांचे सर्वात थोरले अपत्य म्हणजे जवाहरलाल ! यांचा विवाह दिल्लीतल्या हक्सर हवेलीत ८ फेब्रुवारी १९१६ रोजी संपन्न झाला . त्यावेळी कमला १७ वर्षाच्या तर जवाहरलाल २६ वर्षाचे होते !  

विलायतेत वकिलीचे  शिक्षण घेवून जवाहरलाल १९१२ साली भारतात परतले होते आणि अलाहाबाद च्या न्यायलयात वकिली चालू केली होती. बालपण अलाहाबादच्या त्रिवेणी संगमच्या सानिध्यात व्यतीत झालेले होते . संस्कृत पंडित असणाऱ्या घराण्याच्या समृद्ध वारशा सोबत पाश्चात्य देशात  शिक्षण घेतल्यामुळे जवाहरलाल यांच्या युरोपियन संस्कृतीचा देखील प्रभाव होता. 

सनातनी काश्मिरी  ब्राह्मण कुटुंबात वाढलेल्या कमलेने आधुनिक विचाराच्या  जवाहर सोबत आपल्या आयुष्याची अनेक स्वप्ने रंगवली होती.  जवाहर बरोबर त्या पवित्र होमाभोवती  सात फेरे घेतले आणि भारताच्या जनतेचे सुखी संसाराचे स्वप्न साकारण्याच्या ध्येयासाठी प्रेरित झालेल्या राजकुमाराला एका प्रचंड मोठ्या प्रेरणा स्रोताची गाठ बांधली गेली !

हिंदी आणि संस्कृत भाषेत निपुण असणाऱ्या कमलेस इंग्रजी अजिबात येत नव्हते ,पण प्रेमाच्या भाषेने तिने सर्वांना आपलेसे केले. दोघांचा संसार सुरु झाला आणि  १९ नोव्हेंबर १९१७ रोजी या संसारवेलीवर प्रियदर्शनी अर्थात इंदिरा नावाचे सुंदर फुल फुलले ! पतीचा सहवास आणि संसार सुख म्हणजे काय तो एवढाच कालखंड. जवाहरने त्याच वर्षी स्वतःला कॉंग्रेस च्या कार्यात झोकून दिले. गांधीच्या संपर्कात आल्यावर जवाहरलाल यांनी खादी वापरायला सुरुवात केली . त्यांच्याबरोबर कमलेने देखील खादी घालायचे ठरवले. मध्यम वर्गीय कुटुंबातील मुलगी,  गडगंज संपती असणाऱ्या कुटुंबात काय काय आशा घेवून आली होती.  मात्र जवाहरच्या संसारात खादीची जाडीभरडी साडी तिला अत्यंत समाधान द्यायची. ती अतिशय आनंदी होती ,परंतु हळूहळू कामाचा व्याप वाढला ,देशभर दौरे ,सभा, आंदोलने ,सत्याग्रह यात कधी कधी महिना महिना दोघांची भेट देखील व्हायची नाही. त्यांनी एकमेकांसाठी दिलेला अवधी पहायचा म्हटला तर १९१६ ते १९१९ ही तीन वर्ष  , १९२४-२५ ही दोन वर्ष  आणि १९२९ चे दहा बारा महिने ,म्हणजे अवघा ६ ते ७ वर्षाचा आहे. देशकार्य करताना कमला मात्र उपेक्षितच राहिली याची खंत नेहरूंच्या मनाला लागली ती कायमची! 

'डिस्कवरी ऑफ इंडिया ' अर्थात भारताचा शोध हा ग्रंथ नेहरूंनी १९४४ साली लिहिला . त्यावेळी कमला यांना जावून १० वर्ष झाली होती. कमलेवर अन्याय झाला असे त्यांना वाटे. खूप कांही साठले होते. मन  मोकळे कुठे करणार आणि कोणासमोर ? म्हणून नेहरू 'डिस्कवरी ऑफ इंडिया ' या ग्रंथात  आपल्या प्रिय पत्नी बद्दल मनात साठलेल्या भावनांना अभिव्यक्त करतात. या ग्रंथातील ' आमचा विवाह आणि नंतर ' या प्रकरणात जवाहरलाल नेहरू कमलेबद्दल लिहितात " ती मला खूप आवडे तरी ही  मी तिला विसरून जात असे. सहचारिणी म्हणून माझ्या जीवनात वावरण्याचा तिचा हक्क  मी कैक रीतीने बजावू दिला नाही. कारण त्यावेळी मी भारल्यासारखा झालो होतो. जे कार्य मी हाती घेतले, त्या कार्याशी मी  एकरूप झालो होतो ,इतर सारे विसरून गेलो होतो. मी माझ्या स्वप्नसृष्टीत गुंग होतो. माझ्या भोवतालच्या माणसांकडे स्वप्नमय छाया म्हणून मी पाहत होतो. ज्या कार्याने मला भारले  होते त्या कार्याने माझे मनही व्यापले होते. माझी सारी उत्साह शक्ती त्या कार्याला मी दिली होती आणि इतरत्र द्यायला शिल्लकच काही उरत नसे. इतके असूनही मी तिला विसरणे का शक्य होते? मी पुन्हा पुन्हा तिच्याकडे येत असे. तारू  बंदरात यावे त्याप्रमाणे मी तिच्याजवळ आश्रयार्थ येत असे. मी कित्येक दिवस दूर राहिलो तरी तिचा नुसता विचारही माझ्या मनाला गारवा देई . कधी घरी जाता येईल याची उत्सुकतेने वाट पाहत असे. मला सुख समाधान,मला सामर्थ्य द्यायला कमला नसती तर खरोखर मी काय केले असते ? शरीराची आणि मनाची रिती झालेली माझी बॅंटरी पुन्हा भरून द्यायला कमला नसती तर ? तिच्यामुळेच मी माझी विद्युत शक्ती पुन्हा पुन्हा मिळवून घेत असे "

नेहरूंना वयाच्या ३२ व्या वर्षापासून  तारुण्यातील ९ वर्षाचा कालावधी  बंदिवासात व्यतीत केला आहे. यात कमला यांच्या त्याग खरोखरच महान आहे. अगदी सुरवातीच्या काळातील  कमला नेहरूंचे वर्णन करताना नेहरू  म्हणतात " ती आमच्याकडे आली एक साधी सरळ मुलगी. आजच्या सुशिक्षित मुली मध्ये मनोविश्लेषणशास्त्रातले गंड असतात,असे म्हणतात. पण तसा काहींसा प्रकार नव्हता. तिच्या चेहऱ्यावरील अल्लडपणा अगदी आहे तसाच होता. वय वाढेल तसे तिच्या डोळ्यात गंभीरपणा आणि तेज मात्र निर्माण झाले. नवीन मुलीत संयमीपणा नसतो असे म्हणतात ,पण कमला तशी नव्हती ,तिने आधुनिकता सहज स्वीकारली. कारण ती खरी भारतकन्या होती. ती अतिसंवेदनशील ,स्वाभिमानी तसीच पोक्त आणि तेवढीच अल्लड, तेवढीच शहाणी आणि मला तेवढीच वेडीही भासत असे. ती मनाने खूप निर्मळ होती. प्रामाणिक पणाचा जेवढा ठसा कमलाने माझ्या मनावर उमटवला  तेवढा क्वचितच कोणी उमटवला असेल"

कारावासाचा पहिला कालावधी संपल्यावर १९२४ च्या नोव्हेंबर महिन्यात कमला आणि जवाहरलाल यांना पुत्ररत्न झाले मात्र  अवघ्या आठवड्यात ते गेले ! कमला यामुळे खचल्या ,तशातच आजारपण सुरु झाले आणि  शेवटी क्षयरोग असल्याचे समजले. त्यावेळी वडील मोतीलाल सतत आजारी असायचे  आणि त्यांच्या  स्वतःसमोर  देशाची जवाबदारी ,इंदिरा गांधी त्यावेळी मसुरी मध्ये वसतिगृहात शिकत होती. जवाहरलालजींच्या आई स्वरूपराणी यांनी पुणे ,मुंबई इथे जावून कमलाजींवर उपचार सुरु केले पण फरक काहींच पडत नव्हता. कधी बरे वाटत असे कधी आजार बळावत असे. असे दोन तीन वर्ष उलटली. आजार हळू हळू वाढत होता .  नेहरू १९२८ मध्ये  ब्रुसेल्स इथल्या जागतिक साम्राज्यवाद विरोधी परिषदेत कॉंग्रेस चे प्रतिनिधी म्हणून गेले होते. भारतात परतल्यावर देखील पुढची दोन वर्ष अशीच नेहरू अहवाल ,कलकत्ता कॉंग्रेस ,पूर्ण स्वातंत्र्याची मागणी ,रवि नदीच्या किनाऱ्यावरील पूर्ण स्वातंत्र्याचा ठराव , २६ जानेवारी १९३० चा पहिला स्वातंत्र्य दिन, अटक आणि कारावास यात कसे निघून गेले समजलेच नाही !

याच काळात कमला नेहरू यांना उपचारासाठी उत्तरखंड प्रदेशातील भोवाली येथे नेण्यात आले आणि तिथून तज्ञांच्या सल्ल्यानुसार युरोपात उपचार घ्यायचे ठरले . त्यांच्यासोबत  आई  स्वरूपराणी, इंदिरा होत्या . नेहरू त्यावेळी अल्मोराच्या कारागृहात होते. नेहरू सदगदित होवून  लिहितात ' कमला कशाची तरी वाट पाहते आहे ,कांही अपेक्षा करत आहे , याकडे मी कधी लक्षच दिले नाही. कॉंग्रेस चे काम आणि तुरुंगवास माझ्यासाठी नित्याचा होता. कधी  मी दूर असायचो, कधी आजारपणामुळे ती दूर असायची ! रवींद्रनाथांच्या नाटकातील चित्रा प्रमाणे कमलाही जणू मला म्हणत असेल " मी चित्रा आहे. जिची पूजा करावी अशी एखादी मी देवता नाही. दिव्यावर होरपळलेल्या पतंगाची कीव वाटूनही शेवटी त्याला सहज झटकून टाकतात तशी उपेक्षणीय कीटक देखील नाही. संकटाच्या  आणि साहसाच्या मार्गात स्वतःच्या शेजारी जर मला उभे राहण्याची कृपा केली, तुमच्या जीवनातील थोर आणि महान कर्तव्यात मलाही भाग घेण्याची परवानगी दिली तर माझे खरे स्वरूप तुम्हाला समजून येईल " परंतु कमला अशा प्रकारे प्रत्यक्ष शब्दांनी माझ्याजवळ कधी बोलली नाही. पुढे हळूहळू तिच्या डोळ्यातला संदेश मी वाचला'

कमला नेहरूंची प्रकृती तशी खूप नाजूक होती . पण मनाने त्या  खूप कणखर होत्या ! सविनय कायदेभंगाच्या चळवळीत सासरे मोतीलाल आणि पती  जवाहर कारावासात असताना कॉग्रेस ची धुरा त्यांनी सांभाळली. एकवेळ तर  इंग्रजांच्या काठ्या देखील खाव्या लागल्या आणि  एक वर्ष कारावास  देखील भोगला ,तेंव्हा जवाहरलाला त्यांच्या क्षमतेचा पहिल्यांदा अनुभव आला . त्यावेळी नेहरू नैनीच्या तुरुंगात होते . त्यांना हे समजले तेंव्हा खूप आनंद वाटला . नेहरू लिहितात ' संपूर्ण शरीरभर आनंदाच्या लहरी  उमटत होत्या , अभिमाने डोळ्यात आनंदाश्रू एवढे होते कि एकमेकात बोलायला शब्द देखील  फुटेना ' मोतीलाल नेहरू आणि जवाहरलाल कारावासात असतना कमला यांनी केलेली कामगिरी  पतीचा उर अभिमानाने भरून जावा अशीच होती!
मोतीलाल नेहरूंचे निधन फेब्रुवारी १९३१ मध्ये झाले आणि कमला यांच्यावर घराची सर्वच जवाबदारी पडली. प्रकृतीची हेळसांड सुरु झाली आणि आजार पुन्हा गंभीर रूप धारण करू लागला. फेब्रुवारी १९३४ मध्ये कलकत्ता कोर्टाच्या वारंट अन्वये जेंव्हा जवाहरलाल यांना पकडण्यासाठी पोलिस घरी आले ,तेंव्हाचा प्रसंग नेहरूंनी खूप भावूक रित्या मांडला आहे, " मला अटक करायला पोलिस आल्यावर माझे कपडे गोळा  करायला कमला वरती गेली ,निरोप घ्यायचा म्हणून मी तिच्या पाठोपाठ गेलो. एकदम  तिने मला मिठी मारली आणि तिला घेरी आली, ती पडली .तिच्या बाबतीत  पूर्वी असे कधी झाले नव्हते. एखादी नित्याची बाब समजून  तुरुंगाच्या यात्रेकडे आनंदाने बघायला आम्ही शिकलो होतो ,त्याचा गाजावाजा देखील करत नसू . परंतु आज असे का झाले ? आपली हि नित्याची सर्वसाधारण भेट ,शेवटचीच भेट आहे असे भविष्य तिला दिसले होते कि काय ? 

कमला यांना  उपचारासाठी जर्मनीत घेवून गेल्यावर जवळपास चार महिन्यांनी ४ सप्टेंबर १९३५ ला नेहरूंची अल्मोरा कारागृहातून सुटका झाली आणि ते  सप्टेंबर च्या ९ तारखेस ते बेडेनवेलर येथे पोचले . यावेळी नेहरूंनी केलेले कमलेच्या भेटीचे वर्णन खूप भावनोत्कट  आहे ' मी कमलाला भेटलो ,तिला पहिले . तिच्या मुखावर तेच चिरपरिचित असे दुर्दम्य स्मित होते . ती फारच खंगली होती ,दुख विव्हल असल्यामुळे ती फार बोलू शकली नव्हती. कदाचित माझ्या येण्याचा परिणाम म्हणून की काय ,दुसऱ्या दिवशी तिला जरा बरे वाटले आणि थोडे दिवस खरेच जरा बरे गेले. परंतु धोका होताच,आणि हळू हळू परंतु निश्चितपणे जीवनाचा झरा सुकत जात होता. तिच्या मृत्यूचा विचार माझ्या मनाला पटणे अशक्य होते ,म्हणून तिची प्रकृती सुधरत आहे ,अशी कल्पना मी करत असे'  नेहरू यावेळी खूप भावूक झाले होते आणि ते स्वाभाविकही होते . जीवनाकडे आशेने पाहताना , दिलासा हवा असतो ! त्यावेळी  कमला यांना नेहरूंनी पर्ल बक ची 'गुड अर्थ ' ही कादंबरी वाचून दाखवली आणि नियमित काही पुस्तकातील उतारे ,कविता ते वाचून दाखवत असत. त्या  अखेरच्या दिवसात कमला यांचाच विचार नेहरूंच्या मनात असे. डोळ्यासमोर सतत आठवणी यायच्या, नेहरूंचे हे आत्मनिवेदन त्यांच्या जीवनातील कमला नेहरू यांच्या अतुलनीय  त्यागाची अभिव्यक्ती आहे!  आपण कमलेला कांही देवू शकलो नाही ,याची खंत त्यांच्या मनात कायम राहिली , तीच त्यांनी शब्दरूपात खूप भावूक होवून व्यक्त केली आहे. नेहरूंनी लिहिले आहे ' तिने मला जे दिले ते मी घेतले होते ,परंतु त्या आरंभीच्या वर्षात तिला मी काय दिले होते ,कोणता मोबदला दिला होता ? खरोखरच याबाबतीत मी अपराधी आहे '

कमलाजी  मृत्यू शय्येवर असताना भूतकाळातील घटनेचा सारा  चित्रपट त्यांच्या डोळ्यासमोर झरझर येत असे. प्रत्येक वेळी कमला त्यांच्यासमोर उभ्या  असल्याचा भास त्यांना होई .आनंदात घालवलेले शेवटचे क्षण म्हणजे १९२९ च्या सुरवातीस तत्कालीन सिलोन म्हणजे आताच्या श्रीलंकेत घालवलेले कांही दिवस  ! एका आनंदाच्या क्षणी ते कमला यांना म्हणाले "  जीवनात अनेक अडचणी येवून देखील आपण सुखी आहोत हे खरे". नेहरू लिहितात ' कधी कधी आमचीही भांडणे व्हायची ,आम्ही एकमेकांवर रागावत असू तरीही प्रेमाची स्वयंभू ज्योत आम्ही कधी विझू दिली नाही. जीवनात दोघांच्याही समोर नवीन नवीन साहसाचे प्रसंग येत, आणि त्यातून एकमेकांचे नवीनच एखादे रूप पाहण्याची संधी मिळून एकमेकांस समजून घेण्याची नवीन अंतर्दृष्टी आम्हास लाभत असे ' पत्नीशी झालेला प्रत्यक्ष संवाद आणि हृदय संवाद नेहरूंनी खूप मनमोकळेपणाने मांडला आहे.

बेडेनवेलर येथील उपचारानंतर १९३६ च्या जानेवारीच्या शेवटी कमला नेहरू यांना  लॉसेल येथील हॉस्पिटल मध्ये दाखल  करण्यात आले, इथे मात्र त्यांची प्रकृती खूपच बिघडली आणि  तिथेच २८ फेब्रुवारी ला कमला नेहरू यांचे निधन झाले . नेहरू लिहितात 'फेब्रुवारीची २८ तारीख ,दिवस उजाडताच कमला गेली. सोबत असणारे कांही स्नेही आणि आम्ही नातेवाईक यांनी मिळून लॉसेल मधील स्मशान भूमीत  तिला नेले. एका  क्षणात त्या सुंदर शरीराची ,त्या सदैव हसऱ्या चेहऱ्याची चिमुटभर राख बनली. इतके चैतन्य ,इतका उत्साह ,इतके तेज सारे निघून गेले व राहिलेल्या नश्वराचा अवशेष एका लहानशा कुंभात मावला'

लॉसेल हून रोम मार्गे कैरो हून नेहरूंचा परतीचा प्रवास सुरु झाला आणि मनात सतत 'कमला नाही' आता कमला नाही या विचारांनी थैमान माजवले ,या विचाराचे  खूप उत्कट वर्णन नेहरूंनी केले आहे  ' कैरो सोडल्यावर तासचे तास त्या ओसाड वाळवंटातून  जात असता माझ्या मनाला आता कमला नाही , यापुढे  आपण एकटेच ,या भयंकर विचाराची एकदम मगरमिठी बसली व सारे शून्य ,उदास वाटू लागले. मी घरी एकटा परत जात होतो. पण आता माझे घर ते कुठे राहिले होते ? पूर्वीचे का आत्ता ते घर होते ? माझ्या शेजारच्या करंडीत रक्षाकुंभ होता ,तेवढेच काय ते कमलाचे शिल्लक राहिले , आणि आमच्या दोघांची अशा स्वप्ने मरून त्यांचीही राखच राहिली. ' यापुढे कमला नाही ' 'यापुढे कमला नाही' हेच शब्द मन पुन्हा पुन्हा म्हणत होते.

कैरोमध्ये पोचल्यावर लंडन मधील प्रकाशकांना त्यांनी  तार केली , आणि त्यांचे  आत्मचरित्र त्यांनी कमला नेहरूंना अर्पण केले
' To Kamla..... who is no more'..........

नेहरू शेवटी लिहितात ' अलाहाबादला पोचलो आणि कमलेच्या रक्षेचा तो अमोल असा करंडक घेवून धावत्या गंगेच्या प्रवाहात शिरलो आणि ती रक्षा त्या पवित्र गंगा माईच्या स्वाधीन केली. आमच्या  कितीतरी पूर्वजांचे अवशेष तिने आतापर्यंत सागराकडे नेले असतील आणि इथून पुढेही आणखी कितीतरी जणांची अखेरची यात्रा तिच्या प्रवाहाच्या कडेखांद्यावरून  होईल' ( 'Allahabad ,where we carried the precious urn to the swift flowing Ganges and poured the ashes into the bosom of that noble river. How many of our forebears she had carried thus to the sea,how many of those who fallow us will take that last journey in the embrace of her water' - Discovery of India, page no.39 )

गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांच्या " चित्रा " नाटकातील  चित्रांगदेचे पराक्रमी अर्जुनावर प्रेम बसते परंतु १२ वर्षाच्या वनवासात त्याने ब्रह्मचर्य आचरणाचे वृत्त स्वीकारलेले असते ,तरच त्यास कुरुक्षेत्रावरील युद्धासाठी  इंद्राकडून दिव्य अस्त्र प्राप्त होणार असते. पुढील कथानक वेगळे आहे मात्र नेहरूंनी कमलेच्या मनातील भाव चित्रांगदा हिच्या मनातील भावनेशी तुलना करून  प्रकट केले आहेत ! जवाहर आणि कमला यांचा १९१६ साली सुरु झालेला हा प्रवास, ६ ते ७ वर्षाच्या सहजीवनाचा कालावधी सोडला तर, अवघ्या १८ वर्षाच्या कालवधीत कमला यांच्या वयाच्या केवळ  ३४ व्या वर्षी संपला. जो प्रामुख्याने देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी भोगलेल्या   कारावासात , समाजकार्यात, आंदोलनात आणि जनजागृतीत व्यतीत झाला होता.
कमलेचा जवाहर हा असाच आहे , तिच्या त्यागाच्या ज्योती तून प्रेरणा घेवून भारतातील जनतेच्या अंधकारमय जीवनाला प्रकाशमान करू पाहणारा !  कदाचित कमला जाताना जवाहरला तिच्या वाटणीचे सारे चैतन्य आणि  उत्साह देवून गेली असावी .

No comments:

Post a Comment

लोकशाही की एकाधिकारशाही...!

"देशात लोकशाहीचा उत्सव सुरू आहे, पण सत्ताधारी  लोकशाही संसदीय ऐवजी अध्यक्षीय असल्यासारखे वागताहेत. सामूहिक नेतृत्व सांगणारा...