Saturday 17 August 2019

पाकिस्तान -PAKISTAN : एक अर्थ नुरलेलं नांव


एकदा अहमदाबादच्या वाटेवर असताना प्रवासात श्रीमती अनुराधा गोरे यांनी लिहीलेलं 'ओळख सियाचेनची' हे पुस्तक वाचत होतो. भारत-पाकिस्तानात वाढलेला तणाव, काश्मिरातली परिस्थिती या सर्व अस्वस्थतेच्या पार्श्वभुमीवर हे पुस्तक वाचण्याला आपोआप एक अर्थ प्राप्त झाला होता. काश्मिर, सियाचेन या भारताच्या पाकिस्तान आणि चीन या देशांना भिडलेल्या संवेदनशील सीमावर्ती भागाची अत्यंत सुंदर माहीती या पुस्तकांत श्रीमती गोरे यांनी दिली आहे..हे पुस्तक वाचल्यावर भारत-पाक या दोन जुळ्या भावंडांमधे चाललेलं भांडण नेमकं का आणि कशासाठी व त्याचा लाभ चीन नांवाचा बोका कसा उठवतो आहे याचं थोडंसं का होईना पण आकलन होतं..

याच पुस्तकात मला 'पाकिस्तान' या शब्दाचा अर्थ सापडला आणि पाकिस्तान 'काश्मिर'साठी का येवढा आटापिटा करतंय ते लक्षात आल्यासारखं वाटलं..सन १९३० साली  अलाहाबाद येथे भरवलेल्या मुस्लीम लीगच्या अधिवेशनात मुस्लीमांसाठी स्वतंत्र राज्याची मागणी इक्बाल ('सारे जहाॅं से अच्छा हिंदोस्तां...' या गीताचे कवी आणि पूर्वाश्रमीचे हिन्दू) यांनी जोरदारपणे मांडली आणि त्या मागणीला मुसलमानांचा भरघोस पाठींबा मिळाला. ही मागणी पुढे रेटताना चौधरी रहमान अली यांनी पंजाब, अफगाणीया, काश्मीर, सिंध आणि बलुचीस्तान ही राज्ये मुस्लीमांना देऊन त्याचे स्वतंत्र फेडरेशन असावे असा आग्रह धरला..ह्याच पाच राज्यांचा पुढे पाकिस्तान नांवाचा देश जन्माला आला..

P-unjab, A-fgania, K-ashmir, S-indh and Baluchi'STAN' या चार राज्यांच्या आद्याक्षरांवरून '*PAKSTAN*' हा शब्द तयार झाला आहे..('पाक' म्हणजे पवित्र हा अर्थ या देशाला योगायोगाने प्राप्त झाला आहे. एरवी या देशाचा आणि पवित्रतेचा जराही संबंध नाही, कधीही नव्हता..!!) या नविन देशाचे नांव "*पाकस्तान*" असे असले तरी इंग्रजी नांवातला 'I' उच्चाराच्या सोयीसाठी घुसवलेला आहे. (इथे पाकिस्तानच्या 'आय' घालण्यावरून कोटी करायचा मोह मी मोठ्या मुश्कीलीने आवरलाय.)

पाकिस्तानचं नांव वरील चार राज्यांच्या आद्याक्षरांवरून जरी बेतलेले असले तरी पांचवं राज्य 'बलुचीस्तान'ची मात्र शेवटची अक्षरे त्यात आहेत..नांवं किती बोलकी असतात बघा, पाकिस्तानने बलुचीस्तानाला नेहमी सावत्र वागणूक दिली आहे..रेल्वेच्या मालगाडीचा सर्वात शेवटचा गार्डचा उघडा डब्बा कम केबीन असते ना, तशी..!! एरवीही मालगाडी जोरात धावत असताना तो शेवटी बसलेला गार्ड असतो, त्याला कसलीच सुविधा नसते..एका चार दीशांनी उघड्या केबिनीत उन-पाऊस-वारा-थंडी सहन तरत गाडीबरोबर गुमान जायचं, ना खाण्या-पिण्याची सोय ना निसर्गाच्या हाकेला ओ द्यायची..! बलुचि'स्तान'चं काहीसं तसं झालंय. मला तर वाटतं गाडी पुढे निघून जाणार आणि हा शेवटचा डब्बा गाडीपासून सुटणार बहुदा..!!

आणि बांगला देश (पूर्वीचा पूर्व पाकिस्तान) हा पाकिस्तानने कधीच आपला मानला नव्हता आणि त्यामुळे त्याला नांवातही स्थान दिलं गेलं नाही..केवळ धर्म एक म्हणून पूर्व पाकिस्तान पाकिस्तानाशी जोडला गेला येवढंच..! देश कधीही धर्माने जोडला जात नाही, जोडला जातो तो भाषा-संस्कृती-वेष यामुळे..बांगला देशाचं 'बागला' भाषा आणि संस्कृतीवरील अनावर प्रेम त्या देशाच्या 'धर्मा'पेक्षा सरस ठरलं आणि त्या अनावर उर्मीने बांगला देशाला  प्रसंगी असंख्य जीवाचे मोल देऊन पाकिस्तानपासून फारकत घेण्यास भाग पाडलं..

जगभराचा राजकीय इतिहास पाहीला असता 'धर्मा'ने जोडण्यापेक्षा तोडण्याचंच काम अधिक केल्याचं लक्षात येतं..आता पाकिस्तानला धर्माच्याच मुद्द्यावर काश्मीर हवं आहे.  काश्मीरला पाकिस्तानच्या नांवातही त्यांनी स्थान दिलं आहे आणि जो पर्यंत संपूर्ण काश्मीर त्यांना मिळत नाही तोवर त्यांच्या PA'K'ISTAN या नांवाला अर्थ मिळणार नाही असा शेख महंमदी विचार पाकी करतायत.

पाकिस्तानातून बलुचीस्तान  फुटणार, सिंधचीही गॅरंटी उरलेली नाही आणि काश्मीर तर कधीच मिळणार नाही उलट 'पीओके'ही भरताशी संलग्न होईल या परिस्थितीत PAKISTAN हे नांवही उरणार नाही असा निष्कर्ष काढला तर चुकीचे ठरू नये.

Note-
(Afgania हा भाग पाकिस्तान -अफगाणीस्तान बाॅर्डरवरचा खैबर खिंडीच्या आसपासचा भाग-प्राॅव्हीन्स-आहे. या भागाला आंतरराष्ट्रीय स्तरावर Federally Administered Tribal Areas {FATA} म्हणून ओळखतात. एरवीच्या बोलण्यात या प्रदेशाती ओळख 'खैबर पख्तुनख्वा' अशी आहे. पाकिस्तान आर्मीही या भागातील पठाणांच्या नादाला फारशी लागत नाही)

No comments:

Post a Comment

लोकशाही की एकाधिकारशाही...!

"देशात लोकशाहीचा उत्सव सुरू आहे, पण सत्ताधारी  लोकशाही संसदीय ऐवजी अध्यक्षीय असल्यासारखे वागताहेत. सामूहिक नेतृत्व सांगणारा...