Friday 10 May 2019

गांधी टू हिटलर...!

"केंद्रातलं मोदी सरकार उठता-बसता महात्मा गांधींच्या विचारांची जपमाळ ओढत असतात पण एडॉल्फ हिटलरच्या मार्गावर वाटचाल करू पाहणाऱ्या सत्ताधाऱ्यांसाठी महात्मा गांधी यांनी हिटलरला पाठवलेली जी दोन पत्रं आहेत ती इथं दिली आहेत. त्यात गांधीजींनी, युद्धातून देशापुढं निर्माण होणाऱ्या समस्या सांगतानाच असा इशारा दिलाय की, 'तुमच्या सत्तेच्या ताकदीची मस्ती उतरवणारा जागा होईल तेव्हा, तुमची प्रजा स्वतःहून तुमचा धिक्कार करील....!' गांधीजींची ही पत्रं हिटलरला लिहिलेली असली तरी आजच्या राजकीय सद्यस्थितीला इशारा देणारी ठरताहेत हा केवळ योगायोग असला तरी सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यांत अंजन घालणारी आहेत!"
-------------------------------------------------
*यु* रोपच्या राजकीय आकाशात 'एडोल्फ हिटलर' नांवाचा एक धूमकेतू  प्रकटला आणि त्यानं चहूबाजूला विनाशक वादळ निर्माण केलं. 'नाझी' - राष्ट्रीय समाजवादी पक्षाचे नेते आणि जर्मनीचा 'फ्युरर' म्हणून त्यांनी अमर्याद अशी सत्ता उपभोगली. त्यांच्या सत्तेच्या आड येणाऱ्या हजारो विरोधकांना त्यांनी मारून टाकलं, नरसंहार केला. अनेकांना कारावासात टाकलं. चहूबाजूनं 'हिटलरचा विजय असो' असे नारे लगावले गेले. यहुदींची मोठ्याप्रमाणात कत्तल केली, सामूहिक हत्या केली गेली. त्यावेळी  आदेशच असा होता की, कुठल्याही प्रकारची दया-माया न दाखवता पाशवी बळाच्या जोरावर दुश्मनांचा नाश करा. परिणामी जगावर द्वितीय महायुद्धाचे वादळ घोंघावत आलं. दुसरी गोलमेज परिषद पूर्ण झाल्यानंतर महात्मा गांधी भारतात परतले. महाराष्ट्रातल्या वर्धातल्या आश्रमात ते आले. तिथून त्यांनी जर्मनीच्या प्रमुख एडॉल्फ हिटलरला दोन पत्रं लिहिली. या पत्रांमध्ये गांधीजींच्या स्वभावाचा एक वेगळा पैलू दिसून येतो. त्यांनी हिटलर शांततेचा मार्ग अवलंबावा यासाठी समजावणीच्या सुरात काही लिहिलेलं दिसत नाही. परंतू जगात युद्धामुळं निर्माण झालेल्या अशांतीनं यांनी किती गंभीर परिणाम भोगावे लागले आहेत याविषयी जाणीव करून दिलीय. या त्यांच्या समजावणीच्या स्वरात महात्मा गांधींच्या आत्मीयतापूर्ण स्वभावाचे दर्शन घडतं. शिवाय त्यांच्यासमोर तेवढ्याच कठोरपणे सत्य सांगण्याचा स्वभाव दिसून येतो. त्यांनी २३ जुलै १९३९ ला वर्ध्यातून पहिले पत्र लिहिलं. त्यावेळी जग महायुद्धाच्या झळात होरपळून निघत होतं. क्रूरकर्मा एडोल्फ हिटलरची मनमानी सर्वत्र सुरु होती. एका उद्दाम, हट्टी, एककल्ली, हेकेखोर बोलभांड अशा माणसापायी जगातली मानवता पणाला लागली होती. सारं जग अस्वस्थ बनलं होतं. सर्वत्र माणुसकीचे शिरकाण सुरु होतं. अशावेळी हिटलरला चार शब्द समजावून सांगणं म्हणजे खरं तर मृत्यू ओढवून घेणं अशी स्थिती होती आणि याशिवाय हिटलरला समजावून सांगेल अशा व्यक्तीही जगात कमी होत्या, असं नाही तर त्या जवळपास नव्हत्याच. महात्मा गांधींच्या विचारांनी प्रभावित झालेले त्यांचे काही जागतिक मित्र हे त्यांच्या मागे लागले होते की, त्यांनी हिटलरला समजावून सांगावं म्हणजे महायुद्धाचं वातावरण थोडंसं हलकं होईल. त्यावेळी गांधीजींच्या मनातही द्वंद्व सुरु होतं. हिटलरला काही सांगावं की नाही असा विचार सुरू असताना, अखेर हो नाही करत गांधीजी हिटलरला पत्र लिहायला तयार झाले. त्यांनी २३ जुलै १९३९ रोजी हिटलरला पहिलं छोटेखानी पत्र लिहिलं. त्यानंतर २४ डिसेंबर १९४० ला एक सविस्तर पत्र लिहिलं. त्यातलं पहिलं पत्र असं होतं.

वर्धा, भारत.
२३ जुलै १९३९.     

*प्रिय मित्र,*

मानवतेच्या भल्यासाठी मी तुम्हाला पत्र लिहिलं पाहिजे अशी आर्जवं मित्र मला काही काळापासून करत होते. परंतू मी त्यांच्या विनंतीस विरोध केला होता, किंबहुना ते मी टाळत होतो. कारण अशा कोणत्याही अनाहूत पत्रामुळे माझ्याकडून उद्धटपणा होत असल्याची भावना माझ्या मनात येत होती. मात्र अज्ञात जाणीवांनी मला सुचवले की मी इतकं हिशोबी होऊ नये आणि मी नक्कीच आवाहन केलं पाहिजे ज्याची किंमत काहीही असू शकते. त्याला सामोरं जायला हवं!
आजच्या जगात आरंभलेलं युद्ध थांबवून मानवतेला निष्ठुर होण्यापासून वाचवण्याची क्षमता असणारे तुम्हीच सर्वाधिक पात्र अशा व्यक्ती आहात हे अगदी स्पष्ट आहे. त्याकरिता तुमच्यासाठी मौल्यवान वाटणाऱ्या एखाद्या वस्तूची किंमत चुकवाल का ? ज्या युद्धपद्धतीत अर्थपूर्ण यश लाभत नाही तिचा जाणीवपूर्वक त्याग करणाऱ्या व्यक्तीचं आवाहन तुम्ही स्वीकाराल का? असो, जर माझ्या लेखनात कुठे अनुल्लेख झाला असल्यास मी तुमच्या क्षमाशीलतेचे कौतुक करतो. मी आधीच तुमची माफी मागतो की, तुम्हाला अशाप्रकारे पत्र लिहिण्याची चूक केली असेल तर!

सदैव आपला मित्र,
*एम. के. गांधी.*

२३ जुलै १९३९ च्या त्या पत्रानंतर २४ डिसेंबर १९४० रोजी गांधीजींनी एक मोठं आणि सविस्तर पत्र वर्ध्यातून हिटलरला लिहिलंय. गांधीजींनी लिहिलेलं पहिलं पत्र आणि दुसरं पत्र यात जवळपास पांच महिन्याचा कालावधी आहे. या कालावधीत जगात खूप मोठ्या उलाढाली झाल्या. सारी परिस्थिती बदलली गेली होती. ब्रिटन, फ्रान्स आणि रशिया हे युद्धाला घाबरतात वा त्यांना युद्ध नकोय, असं समजून हिटलरनं त्यांच्याकडील इतर राज्यांची सत्ता मागायला सुरुवात केली. वरसेल्स कराराचा त्यानं भंग केला. ऑस्ट्रियावर आक्रमण करून जिंकलं होतं. ब्रिटननं चेकोस्लोव्हाकियाच्या जर्मन भाषिक परिसर स्वतः जर्मनीला देऊन टाकला होता. वचनभंग करून हिटलरनं चेकोस्लोव्हाकियाचा उरलेला प्रदेशही जिंकून घेतला. आपणच दिलेली खोटी वचनं, विश्वास, शब्द देऊन तो शब्द फिरवण्यात त्याला कोणतीही वंचना, क्षोभ, खेद वाटत नसे. १ सप्टेंबर १९३९ मध्ये पोलंडवर त्यानं आक्रमण केलं. सप्टेंबर १९३९ मध्ये दुसरं महायुद्ध सुरू झालं. डेन्मार्क, नार्वे, नेदरलँड, बेल्झीयम आणि लक्समबर्गवर आक्रमण करण्याचा तयारीत असताना महात्मा गांधींनी दुसरं पत्र हिटलरला लिहिलं.

*प्रिय मित्र,*

मी तुम्हाला मित्र म्हणून संबोधतो आहे त्यामागं कोणतीही औपचारिकता नाही. माझा कोणी शत्रूच नाही. गेली ३३ वर्षे माझ्या जीवनाचं एकच ध्येय राहिलंय की, जात, वर्ण, वा रंगभेद याकडं लक्ष न देता, संपूर्ण मानवजातीशी मैत्री करून माझ्या मित्रांच्या संख्येत वाढ करण्याचा माझा आजवर प्रयत्न असतो.
मला विश्वास आहे की, तुमच्याकडं हे समजून घेण्यासाठी वेळ आणि उत्सुकता असेल की, वैश्विक मैत्रीच्या सिद्धांताच्या प्रभावावर जगणाऱ्या मानवांचा एक मोठा भाग तुमच्या या कृत्याला कसा बरं विसरेल? आम्हाला तुमच्या बहादुरीबद्धल वा तुमच्या मातृभूमीबद्धलच्या श्रद्धाबाबत माझ्या मनांत अजिबात शंका नाही. तुमचे विरोधक तुम्हाचा उल्लेख 'राक्षस' असा करतात, पण तसं आम्ही मानत नाही. तुमच्याबद्धल तुमचे मित्र, प्रशंसक यांनी उच्चारलेले, लिहिलेले, वापरलेले शब्द, घोषणा पाहिलं तर माझ्यासारख्या विश्वामैत्रीचा आग्रह धरणाऱ्याला असं आकलन होतंय की, तुमचं कर्म हे दैत्यासारखं, राक्षसासारखंच  आहे. शिवाय ते मानवतेच्या दृष्टीनं अत्यंत हीन असं दिसून येतं.
तुम्ही चेकोस्लोव्हाकियाला अपमानित केलंय. पोलंडला नेस्तनाबूत करून टाकलंय, डेन्मार्कलाही धूळ चारलीय. मी हे जाणून आहे की, मानवाच्या जीवनाप्रती तुम्ही जो दृष्टिकोन ठेवता त्यानुसार या साऱ्या छोट्याशा घटना या तुमच्यासाठी मोठ्या बहादुरीच्या वाटतात. पण आम्हाला आमच्या बालपणापासून अशी शिकवण दिलीय की, अशाप्रकारची कामं ही मानवतेला लज्जित करणारी आहेत; त्यामुळंच आम्ही तुम्हाला यश, सफलता मिळो अशी भावना व्यक्त करु शकत नाही.
पण आमची गोष्ट थोडीशी वेगळी आहे आम्ही ब्रिटिश साम्राज्यवादाच्या विरोधात लढा देतो आहोत. तो लढा कोणत्याही दृष्टीने नाझींच्यापेक्षा कमी नाही. पण या दोन्ही लढ्यामध्ये थोडा फरक असेल तर तो अल्पसा असेल. समग्र मानवजातीतला पाचवा हिस्सा हा ब्रिटिश शासनानं आपल्या अधिपत्याखाली आणलाय. दमनचक्र आरंभीत तो त्यांनी आपल्या कब्जात ठेवलाय. त्याबाबत कुठेच सुनावणी होत नाही. त्यांचं ऐकून घेतलं जातं नाही.
त्यांच्यासाठी आम्ही करत असलेला विरोध हा ब्रिटिश नागरिकांना नुकसान पोहोचणारा नाही. आम्ही बदल इच्छितो आहोत. युद्धभूमीवर त्यांना पराभूत करू इच्छित नाही. ब्रिटिश साम्राज्याच्या विरोधात आम्ही निशस्त्र संघर्ष करीत आहोत. आम्हाला माहीत नाही की त्यांचे हृदय परिवर्तन कशाप्रकारे आम्ही करू शकू की नाही! परंतु आमचा दृढनिश्चय आहे की, आम्ही अहिंसा आणि असहकार या शक्तीच्या बळावर आम्ही त्यांच्या शासनाला त्यात यशस्वी होऊ देणार नाही. ते त्यांच्यासाठी असंभव बनवून टाकू. हे सारं अशा ज्ञानावर आधारित आहे की, कुणी शोषक व्यक्ती शोषित व्यक्तीच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने सहयोगच्या एका विशिष्ट प्रमाणात मागत असेल तर ते त्यातून मिळू शकत नाही.
आमच्या शासकांनी आमचा केवळ भूभाग जमीनच खेचून घेतली असं नाही, तर आमच्या शरीरावर राज्य करताहेत.पण आमच्या आत्म्याच्या ते जवळही जाऊ शकत नाहीत, त्याला आपल्या ताब्यात घेऊ शकत नाहीत. शारीरिक दृष्ट्या भारतातल्या प्रत्येक पुरुष-स्त्रियांना आणि मुलांना संपवूनच ते त्यांचं साध्य साधू शकतात. हे खरं आहे की सगळेचजण अशा धैर्यापर्यंत पोहचू शकतात असं नाही पण हे शक्य आहे की, भल्या मोठ्या भीतीच्या भावनेला त्यांचा हा विद्रोह कमकुवत करून टाकू शकतो. पण हा तर्क मुळ मुद्द्यापासून वेगळा आहे. कारण की भारतात तुम्हाला मोठ्यासंख्येने अशाप्रकारचे स्त्री आणि पुरुष आढळतील की, जे त्यांच्या शासकासमोर गुडघे टेकवण्याऐवजी कोणत्याही प्रकारची वैर भावना व्यक्त न करता स्वतःचा प्राण समर्पित करण्यासाठी तयार असतात. अशीच माणसं हिंसेच्या तांडवांसमोर स्वातंत्र्यतेचे बिगुल वाजवू शकतात. गेली तीस वर्षे अशा प्रकारच्या शिक्षण देण्याचा आम्ही काम करतो आहोत. आम्ही गेली पन्नास वर्षे ब्रिटिश शासनाला आणि त्यांच्या अत्याचारांना उखडून फेकून टाकण्याचे प्रयत्न करतो आहोत. स्वातंत्र्याचं आंदोलन आज जेवढं मजबूत आहे तेवढं यापूर्वी कधीच नव्हतं. सर्वात शक्तिशाली राष्ट्रीय संघटन म्हणजेच 'इंडियन नॅशनल काँग्रेस'! आमचं लक्ष गाठण्यासाठी प्रयत्न करत आहोत त्यामुळे आम्हाला आमच्या या अहिंसात्मक प्रयत्नामुळे खूप मोठं यश मिळालेलं आहे.
ब्रिटिश शासनयंत्रणा ही जगात सर्वाधिक संघटित हिंसक यंत्रणांपैकी एक आहे आणि आम्ही त्याचा सामना करतो. त्या विरोधात कसा लढा द्यायचा याचा योग्य उपाय आम्ही शोधतो आहोत. त्याला तुम्ही छेद देताहात. आता हे पाहावं लागेल की ब्रिटिश आणि जर्मनी या दोघांच्या कोणतं हिंसकतंत्र जास्त संघटित आहे. आम्ही जाणतो ब्रिटिश विचारधारा आमच्यासाठी कोणता अर्थ प्राप्त करून देते आणि जगातील युरोपीय शिवाय इतर लोकांसाठी काय असू शकतं. परंतु आम्ही जर्मनीच्या मदतीने कधीही ब्रिटिश शासनाला पासून मुक्ती घेऊ इच्छित नाही. आम्ही अहिंसेचा मार्ग शोधलाय. ही अहिंसा ही अशी एक शक्ती आहे की  ती संघटित झाली तर जगातल्या मोठ्यातमोठ्या हिंसक ताकदीला व त्यांच्या एकत्रित समूहाचा खंबीरपणे निःसंशय मुकाबला करू शकते.
 अहिंसेचं हे जे टेक्निक सांगितलं त्यात पराजय नावाची गोष्टच नाही. कोणाची हत्या केल्याविना, कोणालाही जखमी केल्याशिवाय 'करो या मरो' यावर विश्वास ठेवते. यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की यासाठी संपत्ती किंवा विनाशाचं तंत्रज्ञान याचा आधार घेतल्याशिवाय याचा उपयोग करता येऊ शकतो. आम्ही त्या दोन्हीही पर्यायांचा वापर केलाय. यासाठी मला खूप दुःख होतं की तुम्ही ह्या मार्गाचा अवलंब करू शकत नाही.  अहिंसा ही कोणाची मालकी असू शकत नाही. ब्रिटिशच नव्हे कुणीही निश्चितपणे ताकद बनून बाहेर येईल, आणि तुमच्या प्रयत्नांचा पोल-खोल करून टाकेल. तुमच्याच हाती तुम्हाला संपवतील! तुमची जनता जे तुमचा अभिमान बाळगत असेल व अशी कोणतीही विरासत तुम्ही सोडून जाऊ शकत नाही.  हव्या तेवढ्या प्रमाणात आणि क्रूर कार्य  घडवल्या असतील, तरी देखील लोक त्याचं गुणगान करणार नाहीत. यासाठी मी मानवतेच्या दृष्टीने तुम्हाला निवेदन करू इच्छितो की तुम्ही हे युद्ध थांबवा, बंद करा हे युद्ध. तुम्ही तुमच्या पसंतीच्या कोणत्याही आंतरराष्ट्रीय ट्रिब्युनलकडे जा. तुम्ही आणि ग्रेट ब्रिटन यांच्यातील कोणताही वाद न्या. तिथं विवाद मिटू शकतात. अशा कामात तुमचं काहीही नुकसान होणार नाही. पण युद्धामध्ये तुम्हाला जे यश मिळाल्याचे मिळालंय याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही सच्चे आहात. त्यानं एकच सिद्ध होईल की तुमच्या जवळ विनाशाची ताकत मोठी होती. कुठल्याही निष्पक्ष ट्रॅब्युनलने दिलेला निर्णय हे दाखवून देईल कि मानवतेच्या दृष्टीने कोणता पक्ष अधिक खराब आणि कोण सच्चा होता. तुम्हाला माहिती आहे थोड्याच काळापूर्वी मी प्रत्येक ब्रिटिश नागरिकांना अपील केलं होतं की, माझ्या अहिंसात्मक विरोधाचा स्वीकार करावा. मी हे अशासाठी केलं की, ब्रिटिशर मला एक मित्र कदाचित एक हट्टाग्रही मित्र या रूपात पाहतो. मी तुमच्यासाठी आणि तुमच्या जनतेसाठी पुरबपणे अनोळखी आहे. त्यामुळे माझ्यात एवढं धाडस नाही की, मी अशा प्रकारे आवाहन प्रत्येक ब्रिटिश नागरिकांना करू शकेन. तशाचप्रकारे आपल्या नागरिकांनाही करू शकेन. ब्रिटिश लोकांबाबत माझ्या आवाहनाचा त्याचा परिणाम झाला तसा परिणाम आपल्या इथल्या नागरिकांवर होईलच असं काही सांगता येत नाही. परंतु हा माझा प्रस्ताव अत्यंत व्यावहारिक आणि प्रामाणिक असा राहिलेला आहे.
 सध्या युरोपमध्ये असलेल्या नागरिकांच्या हृदयात शांततेच आवड निर्माण झालीय. आम्ही तर आमच्या शांततापूर्ण संघर्ष त्यासाठी हे थांबवलेलं आहे. तुमच्याजवळ अशा प्रकारची आशा ठेवू इच्छितो आहोत की, अशावेळी आपण शांततेसाठी प्रयत्न करा. तुमच्यासाठी व्यक्तिगतरीत्या याला फारसा अर्थ असणार नाही पण लाखो युरोपवासीयांसाठी मात्र ही खूप मोठी गोष्ट ठरणार आहे. ज्यांचा शांततेसाठीची हाक मी ऐकतो आहे. माझ्या कानांना त्या लाखो मुक्या हाकांना ऐकण्याची सवय झालेली आहे. पण मी इच्छितो की तुम्हाला आणि मुसोलिनीमहाशयांना संयुक्तरित्या आवाहन करू. गोलमेज परिषदेमध्ये एक प्रतिनिधी म्हणून मी इंग्लंडला गेलो होतो. तेव्हा रोममध्ये मला मुसोलिनी यांना भेटणार सौभाग्य प्राप्त झाला होतं. मी आशा करतो की हे पत्र त्यांच्या मन आणि मतपरिवर्तनासह त्यांनाही संबोधित केलेलं आहे असं मानाल.

सदैव आपला मित्र,
*मोहनदास करमचंद गांधी*

*आपण असा प्रयत्न का करू नये*
भारतात स्वातंत्र्यलढा सुरू असताना गांधीजींनी असा पत्रव्यवहार का केला असावा? काय पडलं होतं गांधींना ? हिटलर आपलं ऐकणार नाही हे त्यांना माहीत होतं. जो आपलं ऐकणार नाही त्याला सांगावं तरी कशासाठी? गांधीजींची भाषा किती संयमाची आणि सबुरीची आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरं गांधीजींच्या विचारसरणीत आढळतात. पत्रातल्या मजकुराचा संदर्भ ज्याने त्याने आपआपल्या परीने शोधावीत आणि आपल्या वकुबाप्रमाणे त्याचा अन्वयार्थ लावावा. सध्याच्या राजकारणात एखादा माणूस चुकतो आहे हे पाहून डोळे मिटण्याऐवजी किमान एकदा तरी त्याला आपण सांगावं की बाबा रे तू चुकतो आहेस वा तुझा मार्ग चुकीचा आहे. ऐकणं न ऐकणं ही त्याची मर्जी. पण आपण कर्तव्यविन्मुख का व्हावं ? आपण निदान सांगण्याचा प्रयत्न तरी का करू नये? आणि आत्मिक समाधान तरी का मिळवू नये! आपल्याला आपल्या वृत्तीत सुधारणा करायचीय की अधःपतन होऊ द्यायचेय हा ज्याचा त्याचा प्रश्न! 

- हरीश केंची
९४२२३१०६०९

1 comment:

'इंडिया शायनिंग' ते 'मोदी की गॅरंटी...!'

"एकचालुकानुवर्तीत पक्ष आणि सत्ताधारी असं रूप 'लोकशाहीची जननी' म्हणवणाऱ्या देशात आकाराला येतंय. सामूहिक नेतृत्वाची प...