Friday 9 February 2018

रेणुकाजीचं विकट हास्य...!

*रेणुकाजीचं विकट हास्य....!*
'रामायण सिरिअल संपल्यानंतर असं विकट हास्य प्रथमच ऐकतोय.....! तेव्हा त्यांना अडवू नका...!'
प्रधानममंत्री नरेंद्र मोदी यांनी सभापतींना विनंती केली. संसदेच्या एकत्रित सभागृहात राष्ट्रपतींनी केलेल्या अभिभाषणावर बोलताना मोदी यांनी आधार ही योजना अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात सुरू झाली, त्याबद्धल संसदेत झालेल्या प्रश्नीत्तराचे दाखले दिले त्यावेळी काँग्रेसच्या सदस्या रेणुका चौधरी यांनी खूप मोठ्याने हास्य केले. त्यावेळी सभापती व्यंकय्या नायडू यांनी त्यांना समज दिली, ती समज देत असतानाच मोदींनी ही टिपण्णी केली त्यानं राजकीय वर्तुळात वाद निर्माण झालंय!
एका व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर लक्षात येईल की, आपल्या संसदसदस्यांना लोकसभा आणि राज्यसभा ही दोन्ही सभागृहं ही मनोरंजनाची मेहफिल झालीय. जबाबदारी, निष्ठा, कर्तव्य, शिस्त याबाबतीत बेफिकीर राहण्याची एक राष्ट्रीय शाळा झाली आहे. प्रधानमंत्र्यांचं भाषण हे गांभीर्यानं घ्यायला हवं, पण त्या विकट हास्याचे प्रतिध्वनी देशभर गुंजताहेत. जेव्हापासून मोदी यांनी सरकारची सूत्रे हाती घेतली तेंव्हापासूनच करुणा आणि हास्य या दोन्ही रसवैभवात वाढ झालीय. संसदेत आणि जनसामान्यांच्या अनुभवात विविध नवरसापैकी हे दोन रस सतत पाहायला, अनुभवायला मिळाले आहेत. नोटबंदी, जीएसटी आणि शेवटी बजेट या तिन्ही प्रकरणात करुण रस अनुभवायला मिळाला. लोकांना यात त्रास, दुःख आणि दुःखच अनुभवायला मिळालं. काही वर्षांपूर्वी विख्यात कॅनेडियन कवयित्री मार्गारेट अटवूड यांनी म्हटलं होतं की, 'पुरुषांना याची कायम भीती वाटत आलीय की, माझ्यावर कुणी महिला हसत तर नाही ना! आणि स्त्रियांना नेहमी असं वाटत आलंय की पुरुषानं तिला संपवलं तर...!' मार्गारेट या विदूषिचं हे वचन खरं तर एक वाक्योपनिषद आहे. परंतु देशातील स्त्रीवादी समीक्षकांनी असं मत व्यक्त केलं होतं की, रेणुका चौधरींच्या ऐवजी एखाद्या पुरुष संसद्सदस्यानं असं विकट हास्य केलं असतं तर, प्रधानमंत्री असे आक्रमक बनलेच नसते. स्रियांनी केवळ मंद स्मितहास्यच करीत सौंदर्यमूर्तीच बनून राहण्याचा नियम आहे का? त्यांनी विकट हास्य कधी करुच नये काय? त्यांना तसा अधिकारच नाहीये का? संसदेत महिला सदस्यांनी केवळ काय स्मितहास्य करीत वावरायचं का?
 प्रधानमंत्र्यांची बुद्धिमत्ता केवळ प्रशासकीय बाबतीतच नाही तर ती इतर अनेक बाबतीतही दिसते. त्यांची कटाक्षवृत्ती आणि एखाद्याच्या बाबतीत उपहासाने टीका करण्याचं कौशल्य वाखाणण्याजोगे आहे. अलबत यामुळं त्यांचा फायदा होण्याऐवजी नुकसानच झालंय. रेणुका चौधरींच्या उपहासाने केलेला विकट हास्यानंतर सभापती व्यंकय्या नायडू यांनी रेणुकाजींना वैद्यकीय उपचार घेण्याचा सल्ला दिला, तेव्हा प्रधानमंत्री मोदींनी अध्यक्षांना म्हणाले, ' सभापती महोदय, तुम्ही त्यांना काहीच बोलू नका, कारण रामायण सिरीयल संपल्यानंतर बऱ्याच काळानंतर असं विकट हास्य मला ऐकायला मिळतं आहे!' ज्यावर संपूर्ण सभागृह हास्यात बुडाले. त्यानंतर भाजपच्या मीडिया सेलने ही संधी साधत रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेतील किष्किंधाकांड मधील पंचवटीतील घटनाक्रमनुसार एक व्हिडिओ क्लिप बनविली त्याला मोदींच्या वक्तव्याची जोड लावली! त्यावर टिपण्णी केली की, ' काय केवळ तलवारीनेच कापायला हवं असं थोडंच आहे?' मूळ घटना आणि त्यावर निर्माण झालेली ही प्रतिक्रिया यानं काँग्रेसपक्षात आगडोंब उसळला.
तसं पाहिलं तर रेणुका चौधरी अशा वादग्रस्त व्यक्तव्यानं नेहमीच चर्चेत राहिल्या आहेत. २०११ साली युपीए सरकारमध्ये त्या जेव्हा महिला व बालकल्याण मंत्री होत्या तेव्हा त्यांनी असं वक्तव्य केलं होतं की, 'पुरुषांनी पँट ऐवजी धोतरच वापरायला हवं. कारण की, त्यामुळं पुरुषांच्यामध्ये 'फर्टिलिटी'ची अभिवृद्धी होते. या त्यांच्या मंत्री म्हणून केलेल्या वक्तव्यानंतर खूप गदारोळ झाला होता. एवढ खरं की, आता त्यांनी संसदेत केवळ हास्यच केलं, कोणतंच वक्तव्य केलं नाही शब्दप्रयोग केला नाही! विधानसभा निवडणुकीच्यावेळी उमेदवारी देण्यासाठी एक कोटी रुपये घेतल्याबद्दल हैद्राबाद पोलिसांनी अटक केली होती. त्यापूर्वी हसन अलिखाने एक कोटी रुपये किंमतीचे एक डायमंड भेट दिल्यानंतर विवाद निर्माण झाला होता. मंत्रीपदी असतानाच मुलीच्या घटस्फोट प्रकरणात सासरच्या मंडळींवर हुंड्याची तक्रार केली होती. त्याआधीही त्यांनी असं खळबळजनक वक्तव्य केलं होतं की, 'स्त्रियांनी आपल्या पतीवर विश्वास ठेवण्यापेक्षा गर्भनिरोधकांवर अधिक विश्वास ठेवायला हवा'!'
 विरोधी पक्षाच्या सदस्याने केलेल्या हास्याला जाणीवपूर्वक राक्षसी हास्य म्हणून संबीधलं म्हणून दक्षिणेकडील मीडियाने, रेणुका चौधरी या आंध्रप्रदेशच्या असल्यानं खूपच टीका केलीय, ज्यानं भाजपला आंध्रप्रदेशात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत जड जाणार आहे. हे एक मोठं संकट भाजपला असू शकेल. रेणुका चौधरी यांनी लगेचच सभागृहाबाहेर आल्यानंतर म्हणाल्या होत्या की, मी आता कायम हसत राहणार आहे, कारण या सरकारच्या विविध मुर्खतापूर्ण आणि धुर्तपणे केलेल्या वक्तव्याने मला सत्ता हसण्याची संधी देत आहेत. आणि महत्वाचं हे की, अजूनपर्यंत हसण्यावर जीएसटी लागत नाहीये!' प्रधानमंत्रीसारख्या पुरुषानं एखाद्या महिला संसद्सदस्यांच्या हसण्याला  उद्देशून रामायणातील शुपर्णखाशी जोडलं तर केवळ संसदेलाच नव्हे तर समग्र महिलांच्या गौरवाला आणि गरिमाला धक्का लागतो. प्रधानमंत्र्याच्या या उतावीळ वक्तव्याने त्याचा हजरजबाबीपणा दिसला, पण असा हजरजबाबीपणा तुमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यालाही धक्का लावतो. कारण दुसऱ्याचं अपमान हा पुढेजाऊन स्वतःला देखील अडचणीत आणू शकेल. असलं हसणं सोडून द्यायला हवं होतं पण पंतप्रधानांनी जी भूमिका घेतली ती भाजपच्या अडचणींचा काळ जेव्ह येईल तेव्हा ते अधिक धोक्याचं ठरू शकेल.
- हरीश केंची.

No comments:

Post a Comment

आपलं ठेवायचं झाकून......!

"एकचालुकानुवर्तीत पक्ष आणि सत्ताधारी असं रूप 'लोकशाहीची जननी' म्हणवणाऱ्या देशात आकाराला येतंय. सामूहिक नेतृत्वाची प...