Sunday 18 February 2018

महाराष्ट्राचं भाग्य अन छत्रपतींचं दुर्भाग्य...!

*महाराष्ट्राचं भाग्य अन छत्रपतींचं दुर्भाग्य!*

"छत्रपती महाराष्ट्रात झाले हे महाराष्ट्राचं भाग्य आणि छत्रपतींचे दुर्भाग्य! असं अनेकदा वाटतं. छत्रपतींच्या मोठेपणाची अजूनही आम्हाला पुरती जाणीव झालेली नाही. छत्रपतींचे मोठेपण आम्ही नीट अभ्यासलेही नाही. बाबासाहेब पुरंदरे, रणजित देसाई यांनी लिहलेल्या छत्रपतींच्या कादंबऱ्या आहेत. पण एक राष्ट्रपुरुष म्हणून ज्या तऱ्हेनं छत्रपती सादर व्हायला हवेत तसे अजूनही सादर झालेलं नाहीत. दत्तो वामन पोतदार आणि त्याही आधी त्र्यं. शं. शेजवळकर महाराजांचं चरित्र लिहिणार होते. दुर्दैवानं ते लिहिण्याआधीच पोतदार, शेजवळकर गेले. शेजवळकर यांनी त्यांच्या संकल्पित शिवचरित्राची प्रस्तावना लिहिली आहे. आणि ती प्रस्तावना त्यांनी केलेल्या आराखड्यासह आणि जमलेल्या साधनांसह 'मराठा मंदिर'ने ते प्रसिद्ध केलीय. १९६४ साली छापलेल्या या ६४० पानांच्या ग्रंथाची किंमत फक्त ३० रुपये आहे. आणि या ग्रंथात जे आहे त्याचे मोल अफाट आहे. शिवाजी महाराजांचे मोठेपण शेजवळकर निश्चितपणे सिद्ध करू शकले असते."
--------------------------------------------
 *प्र* त्येक मराठी माणसानं एकदा तरी रायगड चढायलाच हवा. रायगड ही महाराष्ट्राची शान आहे. मराठ्यांची ती ताठ मान आहे. मराठ्यांचा राजा या रायगडावर छत्रपती झाला. शिवरायांनी रायगडावर राज्याभिषेक का करून घेतला याबद्धल असं म्हणतात की, मानवी रक्त न सांडलेल्या भूमीवर आपला राज्याभिषेक व्हावा अशी महाराजांची इच्छा होती. म्हणून ती राज्याभिषेकासाठी निवडली. कन्नड कवी लिंगप्पा याने इ.स. १७७० मध्ये लिहिलेल्या 'केळदिनृपविजयम' मध्ये 'भूतलात आश्चर्यकारक म्हणून गणली जाणारी रायरी' असं रायगडाचं वर्णन केलंय.

*राजधानी रायगड*
रायगड तुटलेल्या कड्यांमुळे सह्याद्रीच्या रांगांपासून अलग वाटतो. पण जणू सह्याद्रीच्या रांगा रायगडाला वेढून उभ्या आहेत. असंही वाटतं. स्वराज्याचं तोरण जिथं शिवरायांनी व बांधलं तो तोरणा रायगडाच्या पूर्वेस वीस मैलावर असून रायगडाहून हजार फूट अधिक उंच आहे. या तोरण्यावरून रायगडचं फारच सुंदर, स्पष्ट दर्शन होतो. पुणे, मुंबई, सातारा रायगडपासून सारख्या अंतरावर आहेत. शिवाजी महाराजांनी चंद्रराव मोऱ्यांचा पाडाव करून हा रायरी किल्ला ताब्यात घेतला. आणि त्याला रायगड नाव देऊन स्वराज्याची राजधानी बनवलं.

*मोठेपणाची जाणीवच नाही*
छत्रपती महाराष्ट्रात झाले हे महाराष्ट्राचं भाग्य आणि छत्रपतींचे दुर्भाग्य! असं अनेकदा वाटतं. छत्रपतींच्या मोठेपणाची अजूनही आम्हाला पुरती जाणीव झालेली नाही. छत्रपतींचे मोठेपण आम्ही नीट अभ्यासलेही नाही. बाबासाहेब पुरंदरे, रणजित देसाई यांनी लिहलेल्या छत्रपतींच्या कादंबऱ्या आहेत. पण एक राष्ट्रपुरुष म्हणून ज्या तऱ्हेनं छत्रपती सादर व्हायला हवेत तसे अजूनही सादर झालेलं नाहीत. दत्तो वामन पोतदार आणि त्याही आधी त्र्यं. शं. शेजवळकर महाराजांचं चरित्र लिहिणार होते. दुर्दैवानं ते लिहिण्याआधीच पोतदार, शेजवळकर गेले. शेजवळकर यांनी त्यांच्या संकल्पित शिवचरित्राची प्रस्तावना लिहिली आहे. आणि ती प्रस्तावना त्यांनी केलेल्या आराखड्यासह आणि जमलेल्या साधनांसह 'मराठा मंदिर'ने ते प्रसिद्ध केलीय. १९६४ साली छापलेल्या या ६४० पानांच्या ग्रंथाची किंमत फक्त ३० रुपये आहे. आणि या ग्रंथात जे आहे त्याचे मोल अफाट आहे. शिवाजी महाराजांचे मोठेपण शेजवळकर निश्चितपणे सिद्ध करू शकले असते.

*मेहेंदळे यांचं शिवचरित्र*
प्रत्येक प्रसंग, प्रत्येक नोंद, प्रत्येक दंतकथा याचा अभ्यास करून शुद्ध सत्य पारखून घेऊन शिवाजी साकारण्याचा शेजवळकरांचा प्रयत्न होता. गजानन भास्कर मेहंदळे यांनी असाच महत्वाकांक्षी आणि महत्वाचा प्रयत्न चालवलाय. 'श्री राजा शिवछत्रपती' या ग्रंथाचा खंड-१, भाग-१, त्यांनी स्वतःच प्रसिद्ध केलाय. त्याची पानं आहेत १०८० आणि फक्त अफझलखान वधापर्यंतच  शिवचरित्राचा मागोवा त्यात आहे. चरित्र म्हणजे कथा,कादंबरी नव्हे. याची जाणीव ठेवून हा प्रयत्न मेहंदळे यांनी केलाय आणि स्तुतिस्तोत्राचे स्वरूप या ग्रंथाला येऊ नये याची दक्षता ते घेत आहेत. पण त्यांचे हे चरित्र पुरे होईल याची खात्री नाही. जेम्स लेन प्रकरण उदभवलं त्याचा परिणाम त्यांच्यावर झाला. या आघाताच्यावेळी त्यांनी लिहिलेल्या दुसऱ्या खंडाची पाने त्यांनी फाडून टाकली होती आणि आता आपण शिवचरित्र लिहिणार नाही, असं त्यांनी त्रासून, चिडून म्हटलं होतं. 'केवळ सुसंगती म्हणजे सत्य नव्हे' अशी खात्री झाल्यानं विश्वसनीय साधनांतून जास्तीत जास्त तपशील वेचून काढून शिवचरित्र लिहायचे व्रत मेहंदळे चालवत आहेत. पहिल्या खंडाचं लेखन त्यांनी पुरे केले आहे. दोन खंड लिहायचे आहेत. पहिल्या खंडातला अर्धाभाग छापलाय. त्यासाठी मेहंदळे यांनी जीवाचा जसा आटापिटा केलाय हे एकदा या खंडाच्या प्रस्तावनेत वाचलं तर लक्षात येईल.

*देशी विदेशी भाषेत शिवचरित्र हवे*
महाराजांचे भव्यदिव्य स्मारक करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करायला सरकार तयार आहे. उद्यान, पुतळा, संग्रहालय अगदी समुद्रातही पुतळा अशा कल्पनाभोवतीच स्मारक फिरते आहे. छत्रपतींचे विश्वसनीय समग्र चरित्र, त्यांचे मोठेपण सिद्ध करणारे, विविध पैलूंवर प्रकाश पाडणारे ग्रंथ निव्वळ मराठी भाषेत नव्हेत, अन्य भारतीय आणि मुख्य आंतरराष्ट्रीय भाषेत करण्याची आमची कुवतच दिसत नाही. साहित्य संमेलनावर एक कोटी रुपये खर्च करायला आम्ही तयार! मात्र छत्रपती शिवरायांमुळे आम्ही हिंदू म्हणून शिल्लक राहिलो त्यांचे चरित्र निघावं म्हणून कुणी 'महाकोश' उभारायला मात्र तयार नाही. शिवरायांचे गडकोटकिल्ले आज भग्नावस्थेत आहेत तिकडं कुणाचं लक्ष देत नाही.

*आमच्याकडं दानतच नाही*
मुंबईचा विमानतळ आता महाराजांच्या नावानं पावन झालाय. पण या विमानतळावरून  येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना महाराजांचं मोठेपण सांगणारी छोटी छोटी विविध भाषेतली  तोंडओळख पत्रके काढायचं कुणाला सुचणार नाही. आपल्या माणसाला मोठं करायची आमची दानतच नाही. आणि मोठ्या माणसाचं मोठेपण ओळखण्याची आमची कुवत नाही. असं म्हणायचं का? शिवाजी महाराज कसे होते, याचा अनेकांगाने शोध घेता येतो, ते सांगणारं एक कवन आहे, ते असे
*गेला भोक्ता गडांचा हयगजपतीचा*
*आणि त्या भूपतींचा।*
*शुरांचा सज्जनांचा ऋषीजनमुनींचा*
*आणि त्या देवतांचा।*
*भक्तांचा पंडितांचा चतुर सुमतीचा*
*साबड्या भाविकांचा।*
*नाना विद्याकवींचा कुशल जगतीचा*
*बोलक्या नेमकांचा।*
या प्रत्येक गोष्टीचा विस्तार केला तर एक ग्रंथ ' शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व साकार करणारा ' होईल की नाही!

*रामदासांचा शब्द जाळ*
शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेचा निर्धार केला त्याआधी देशस्थिती काय होती, याच विदारक चित्र रामदासांनी उभं केलंय. काव्यात शब्दाची मर्यादा सांभाळीत केलेल्या वर्णनानेसुद्धा मन कासावीस व्हावं एवढा अनाचार, अत्याचार त्याकाळी माजल्याचं वर्णनातून स्पष्ट होतं. कल्पांत या एकाच शब्दाने समर्थांनी ती दारुण परिस्थिती दर्शविलीय.
*किती येक मृत्यासि ते योग्य जाले*
*किती येक देश त्यागूनि गेले।*
*किती येक ग्रामेचि ती वोस झाली*
*पिके सर्व धान्येचि नाना बुडाली।*
*किती येक धाडीवरी धाडी येती*
*तया सैनिकाचेनि संहार होती।*
*किती येक ते घ्राणकर्पेचि घेती*
*किती उत्तमा त्या स्त्रिया भ्रष्टविती।*
शब्दाशब्दातून नुसता दुःखाचा जाळ भरलाय.

*विदेशीचं परिस्थितीचं चित्रण*
इंग्रजांच्या 'ईस्ट इंडिया कंपनी'च्या पीटर मुंड नांवाचा इंग्रजी नोकराने आपल्या रोजनिशीत लिहिलेल्या नोंदीची माहिती अशी आहे. हा पीटर मुंड लिहितो, 'एक दिवस फुरसत मिळाल्याने मी हवा खायला बाहेर पडलो, तेव्हा शहराच्या एकाबाजूला कित्येक मिनार उभारलेले दिसले. त्यांच्या भोवती अनेक लोकांची मुंडकी चुन्यात बसवलेली होती.' मानूची यानेही प्रवासात रस्त्याच्या कडेला अनेक ताजी मुंडकी पडलेली दिसल्याचा, झाडांना प्रेते टांगलेली असल्याचा  आणि रस्त्यावर मुंडक्यांचे मिनार बघितल्याचे लिहून ठेवले आहे. अशाप्रकारे मारण्यात आलेल्यांना चोर, वाटमारे म्हटलं जायचं. पण मोगलांनी ज्यांची घरदार लुटली, गावं उठविली, असे हे दुर्दैवी  भारतीय-हिंदू असायचे. मोगलांच्या या क्रूर जुलमी सत्तेला शिवरायांनीच टक्कर दिली. शिवरायांनीच हिंदू आणि हिंदुस्थान शिल्लक ठेवले.

*आदर्शवत राजा*
 छत्रपती शिवाजीमहाराज हे एक विलक्षण व्यक्तिमत्त्व होते. ते अजिंक्य असा लढवय्या पुरुष होते. राज्यकारभाराची कला त्यांना पूर्ण अवगत होती. त्यांनी आपले बेत उत्तमरित्या आखून ते शहाणपणाने व धीमेपणाने कृतीत उतरविले. कोणत्याही मोहिमेस वा कार्यास हात घालताना ते अनेकांचा सल्ला घेत व नंतरच आपल्या योजनेला पटेल तेच स्वीकारत. सर्व कार्यात त्यांनी सर्व जातींतील गुणी माणसे सामावून घेऊन त्यांच्याकडून ती ती कामे करवून घेतली. पतितपरावर्तन हा मार्गही त्यांनी अवलंबिला. बजाजी निंबाळकर व नेताजी पालकर हे सुंता झालेले आणि मुसलमानांत दहापाच वर्षे राहिलेले मराठे सरदार त्यांनी परत हिंदू करविले व त्यांच्या कुटुंबियांशी सोयरीक केली. तसेच सर्व धर्मांतील साधु-संतांना सन्मानाने वागविले आणि त्यांना उदार अंतःकरणाने देणग्या दिल्या. मुंबई–लंडन येथील इंग्रजांच्या पत्रव्यवहारात (१६ जानेवारी व १४ फेब्रुवारी १६७८) अलेक्झांडर द ग्रेट, सीझर आणि हॅनिबल या पराक्रमी शूर वीरांबरोबर शिवाजी महाराजांची तुलना करण्यात आली आहे. मार्तिन या प्रवाशाने आपल्या रोजनिशीत शिवाजी महाराजांच्या धूर्तपणाबद्दल कौतुक केले आहे. खाफीखान हा औरंगजेबाचा तत्कालीन इतिवृत्तकार. तो शिवाजी महाराजांचा कट्टर द्वेष्टा होता; पण तोही शिवछत्रपतींविषयी म्हणतो, ‘शिवाजीने सर्वकाळ स्वराज्यातील प्रजेचा मान राखण्याचा प्रयत्न केला. लज्जास्पद कृत्यापासून तो सदैव अलिप्त राहिला. मुसलमान स्त्रियांच्या अब्रूला तो दक्षपणे जपत असे. मुसलमान मुलांचेही त्याने रक्षण केले. या बाबतीत त्याच्या आज्ञा कडक असत. जो कोणी या बाबतीत आज्ञाभंग करील, त्याला तो कडक शासन करीत

*राज्यकारभारासाठी :'कानुजाबता'*
शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक शक सुरू केला आणि त्याबरोबरच राज्यकारभाराविषयक एक सुसूत्र नियमावली – 'कानुजाबता' तयार केली. राज्याभिषेकाच्या समयी मुख्य-प्रधान पेशवा, अमात्य, सेनापती, पंडितराव, न्यायाधीश, सचिव, मंत्री व सुमंत अशी अष्टप्रधानांची नियुक्ती केली. त्यांपैकी सहा प्रधानांनी सैन्य घेऊन युद्धादी प्रसंग करावे, अशी आज्ञा होती. तत्कालीन राजकीय परिभाषा फार्सी होती व अधिकाऱ्यांची नावे फार्सीवरूनच घेतलेली असत. त्यासाठी रघुनाथपंत हणमंते यांच्याकरवी 'राजव्यवहारकोश' तयार करवून घेतला. अष्टप्रधानांची कर्तव्ये आणि कार्यभार यांचे तपशील कानुजाबतात देण्यात आले आहेत. राज्याभिषेकानिमित्त होन आणि शिवराई ही दोन नवी नाणी पाडण्यात आली. त्या नाण्यांवर ‘राजा शिवछत्रपती’ अशी अक्षरे घातली. शिवाजी महाराजांची शासकीय मुद्रा संस्कृत श्लोकबद्ध असून ते बहुधा शहाजींनी घडवली असावी; कारण ही मुद्रा शिवाजी महाराजांच्या पंधराव्या वर्षापासून वापरात दिसते. राज्याभिषेकानंतरही हीच मुद्रा कायम राहिली. ती अशी : “प्रतिपच्चन्द्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववन्दिता शाहसूनो:शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते”. स्वराज्याचा ध्वज भगवा ठेवला. संस्कृत भाषेचा आणि भाषापंडितांचा मानसन्मान व आदर केला.

*मुलकी सत्ता, लष्कराहून वरचढ*
शिवाजी महराजांनी वतनदारांचे हक्क नियंत्रित केले, त्यांना महसुलातून रयतेकडून हिस्सा मिळत असे. त्याऐवजी रोख रक्कम वेतन म्हणून ठरवून दिली, त्यांना गढ्याकोट बांधण्यास मनाई केली. तसेच लष्कराला नियमित वेतन देण्याची पद्धत सुरू केली. तलवारीच्या जोरावर राज्य निर्मिले व तलवारीच्या जोरावरच ते रक्षिले; तथापि ‘साहेबी कारकुनाची’ अशी घोषणा केली. याचा अर्थ नागरी प्रशासन लष्करापेक्षा सर्वोच्च असेल. गड–कोटांना काय हवे ते कारकून देतील. कारकून प्रजेकडून कर वसूल करतील. तो लष्कराला हक्क नाही, अशा शिवाजी महाराजांच्या आज्ञा असत. कारभार ठीक चालवायचा असेल, तर मुलकी सत्ता ही लष्करी सत्तेहून श्रेष्ठ असली पाहिजे. मध्ययुगात मुलकी सत्तेचे श्रेष्ठत्व सांगणारा हा थोर नेता भारताच्या इतिहासातही कदाचित एकमेव असेल. स्वराज्यस्थापनेत डोंगरी किल्ले, सवेतन सुसज्ज सेना आणि विश्वासू सहकारी यांचा वाटा मोठा होता. स्वाऱ्यांचा हेतू राज्यविस्ताराबरोबर लूट मिळविणे आणि संपत्ती व दारुगोळा जमा करून खजिना सुसज्ज ठेवणे, हा होता. या राज्यांगाकडे शिवाजी महाराजांनी विशेष लक्ष पुरविले. त्यामुळे सैन्याचा पगार कधी तटला नाही वा मागे पडू दिला नाही. किल्ले, दारुगोळा, धान्य, गलबते यांचा खर्च त्यांच्या या कोषबलावर अवलंबून होता. अपुरी शस्त्रास्त्रे, मर्यादित सैन्य व साधनसंपत्ती यांमुळे आमनेसामने अशी मैदानी युद्धपद्धती मोगल वा विजापूर यांसारख्या बलाढ्य शत्रूंसमोर निरुपयोगी ठरेल. एवढेच नव्हे तर ते हानिकारक ठरेल, हे जाणून त्यांनी आपल्या युद्धपद्धतीला गनिमी युद्धतंत्राची जोड दिली.
छ. शिवाजी महाराजांची मुद्रा. आपल्या प्रशासन–लष्कर व्यवस्थेत शिवाजी महाराजांनी धार्मिक बाबींना कधी आड येऊ दिले नाही. या काळात सर्वधर्मसहिष्णू राज्यपद्धती स्थापणे, हे एक प्रकारचे क्रांतिकार्य होते. मुसलमान सुलतान इस्लामशिवाय इतर धर्मांना आणि ख्रिश्चन राज्यकर्ते ख्रिस्ती धर्माशिवाय इतर धर्मांना गौण व हीन लेखत, भिन्न धर्मीय प्रजेला समान दर्जाची रयत म्हणून मान्यता मिळत नसे. लष्कराला त्यांच्या खास आज्ञा असत की, ‘युद्धात धार्मिक वास्तू, साधू-संत, बायका-मुले, कुराण् आदींना धक्का लागता कामा नये’. स्त्रियांची विटंबना त्यांना मान्य नव्हती. त्यांच्या लष्करात स्त्रियांना व कबिल्याला स्थान नव्हते.

-हरीश केंची
९४२२३१०६०९

No comments:

Post a Comment

आपलं ठेवायचं झाकून......!

"एकचालुकानुवर्तीत पक्ष आणि सत्ताधारी असं रूप 'लोकशाहीची जननी' म्हणवणाऱ्या देशात आकाराला येतंय. सामूहिक नेतृत्वाची प...