Wednesday 7 June 2017

श्रद्धा आणि सबुरी

*श्रद्धा आणि सबुरी...!*

"सार्वजनिक जीवनात राहायचं, तर श्रद्धा नसली तरी चालेल; सबुरी महत्वाची. त्यामुळे एरवी मानाने दिल्लीला जाणारे राणे मिरझाराजे जयसिंग होऊन दिल्लीस गेले. दिल्लीत काहीच गरमाईने, घाईघाईने होत नाही. राणेंचंही प्रकरण दिल्लीकरांनी थंड करून खाल्लं आहे. राणेंची ताकद पक्षाने जोखली आहे. कोकणातला राणे फॅक्टर संपुष्टात आला आहे, मुंबईतही त्यांचा काही फायदा होईल असं पक्षाला वाटेनासे झालंय. त्यामुळे त्यांच्या अमित शहा भेटीची वा भाजप प्रवेशाच्या बातमीची दखल घेतली गेली नाही, राणेंनी दिल्ली गाठून काही सांगायचा स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला मात्र त्याची जाणीवच होऊ दिलेली नाही.  श्रद्धा आणि सबुरी नसली की काय होतं याचा अनुभव राणे घेत असतील. राणेंचं प्रकरण म्हणजे इतिहासाची पुनरावृत्ती...!"

*श्रद्धा आणि सबुरी...!*

अपेक्षेप्रमाणे नारायण राणे यांचा भारतीय जनता पक्षातला प्रवेश रोखला गेला. अहमदाबाद वारी, अमित शहांची गळाभेट, देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गाने होऊ घातलेला प्रवेश अखेर होऊ शकला नाही. राणेंचा काँग्रेस प्रवास तसा दुःखाचाच राहिलाय. राणेंच्या या प्रयत्नाला कोणी खो घातलाय हे समजणं शक्य नसलं तरी, प्रामुख्याने शिवसेनेने केलेला विरोध हेच प्रथम दर्शनी दिसून येतंय. राणेंचा हा प्रवास आता लपून राहिलेला नाही. आपण भाजपात जाणार नाही असं त्यांना जाहीर करावं लागलं. पण देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत प्रवास का केला गेला याचा खुलासा पक्षश्रेष्ठींकडे द्यावा लागला. त्यासाठी दिल्लीला जाऊन माफीनामा द्यावा लागला हे राणे यांच्याबाबत पहिल्यांदाच घडतंय असं नाही यापूर्वीही असाच माफीनामा त्यांना द्यावा लागला होता. राणेंचा हा माफीनामा हा काँग्रेसमधल्या काहींना तो त्यांचा अपमान वाटतो तर काहींना तो प्रायश्चित्त वाटतं. मात्र काँग्रेसपक्षातल्या अनेक साक्षी काढल्या, तर काँग्रेसमध्ये हे असंच होतं. काळ बदलला काळातलं वास्तव बदललं, मात्र काँग्रेसपक्ष बदलला नाही. ज्यांना काँग्रेसपक्ष बदललेला नाही. ज्यांना काँग्रेसपक्ष कळला आहे त्यांच्यासाठी राणेंचं एकूणच हे प्रकरण स्वाभाविक आहे. ज्यांना आजपर्यंत राणेंचं व्यक्तिमत्व कळलं होतं, त्यांच्यासाठी घडला प्रकार नवीन आहे. परंतु, या प्रकरणाचं तात्पर्य असं सांगतं की, राणे आता खरोखरीच 'सच्चे काँग्रेसवाले' झालेत!

काँग्रेस पक्षाचं आणि साईबाबांच्या भक्तांचं एक ब्रीदवाक्य समान आहे. ते आहे - 'श्रद्धा और सबुरी'. साईबाबांचे भक्त श्रद्धा कशी ठेवतात आणि सबुरी कशी राखतात, हा स्वतंत्र लेखाचा विषय होईल. या लेखात काँग्रेसवाल्यांची श्रद्धा कशी असते आणि सबुरी म्हणजेच एकूण कार्यपद्धतीचं सूत्र कसं असतं, यावर प्रकाश टाकण्याचा हेतू आहे. काँग्रेसमध्ये काम करायचं म्हणजे त्यांच्या राष्ट्रीय नेत्यांवर श्रद्धा ठेवायची असते. तशी ती नसेल तर त्या व्यक्तीची गत नेताजी सुभाषबाबू, यशवंतराव चव्हाण वा विश्वनाथ प्रतापसिंह यांच्यासारखी केली जाते. ही उदाहरणे मोठी आहेत आजच्या स्थितीत लागू होत नाहीत पण त्याची व्याप्ती लक्षात यावी म्हणून उल्लेखली आहेत हे लक्षात घ्यावं. म्हणजे या पक्षात फक्त श्रद्धा मनात ठेवून चालत नाही. ती श्रद्धा सतत प्रकट करायची असते. देवावर श्रद्धा ठेवली की, जसे प्रश्न विचारायचे नसतात तसेच काँग्रेसमध्ये राष्ट्रीय नेत्याबद्धल प्रश्न विचारायचे नसतात. असा प्रश्न विचारला की, एकतर पक्षातून बाहेर जायची वेळ येते. ती व्यक्ती जाणार नसेल; तर त्याच्याकडे अजिबात लक्ष दिलं जात नाही. तरीही त्या व्यक्तीची चुळबुळ सुरूच राहिली तर मात्र त्या व्यक्तीला काढून टाकलं जातं. इथे राष्ट्रीय नेत्यासारख्या कुळस्वामीप्रती श्रद्धा ठेवावीच लागते. शिवाय कुळस्वामीने स्थापन केलेले 'म्हसोबा'-महसूल देणारा, 'खंडोबा'-खंड देणारा यांना दुखवून चालत नाही. शिवाय गावोगावच्या बिरोबा, भैरोबा, रवळनाथांना धरून राहायचं असतं. म्हणजेच काँग्रेसमध्ये असायचं तर कुठल्यातरी नेत्याच्या गोटात, गटात असावं लागतं. काँग्रेसपक्षात संघटना नंतर असते. वर उल्लेखलेली स्थळं जास्त महत्वाची असतात. हा विषय झाला श्रद्धा कुणावर ठेवायची त्याचा. आता 'सबुरी' कशी बाळगायची ते पाहू.

काँग्रेसमध्ये सेवादल नावाची एक फ्रंट आहे. हे सेवादल पूर्वी समाजाच्या सेवेसाठी बांधील होतं. अजूनही हे सेवादल आहेच. मात्र या सेवादलापासून ते मदर काँग्रेस म्हणजेच अ. भा. राष्ट्रीय काँग्रेसपर्यंत सर्व ठिकाणी आता जो कोणी येतो तोच थेट सत्तेसाठी किंवा सत्तेच्या लाभासाठी! हे सर्व करताना सबुरी अत्यंत महत्वाची असते. म्हणजे कोणतंही पद मिळवायचं, तर इथं दंगाधोपा करून चालत नाही. म्हणजे समाजात आणि संघटनेतही माऱ्यामाऱ्या करणं, हे इथं क्वालिफिकेशन समजलं जात नाही. सारं करायचं ते धीरे-धीरे! म्हणजे शिवसेनेत नारायण राणे जसे दहा वर्षांत नगरसेवकपदापासून मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचले; तसं फास्ट काही इथं होतंच नाही. तो अधिकार फक्त नेहरू घराण्यातल्या गांधी आडनावाच्या लोकांचा! पक्षातली ही वाटचाल प्रत्यक्षात धीरे धीरे म्हणजेच अत्यंत संथ गतीची असतेच असं कुणी समजू नये. या धीरे धीरेलाही गती असतेच. म्हणजे कुणी पक्षाचा पदाधिकारी झाला, की तो कोणत्या ना कोणत्या सत्तेच्या स्थानावर पोहोचतोच. कधी कधी ती व्यक्ती आमदार होण्याइतपत मोठी होते. ती व्यक्ती आमदार झाली की, त्याने आपल्या भोवतीची प्रभावळ वेगाने निर्माण करायची असते. ती आमदार व्यक्ती मंत्री झालीच, तर तिनं पक्षाचं संख्यात्मक बळ आणि काम कसं वाढेल, हे पाहायचं असतं. सत्तेची सारी साधनं वापरून आपला आणि पक्षाचा प्रभाव वाढतो आणि काँग्रेस ग्रामपंचायतीपासून केंद्र सरकारपर्यंत सत्तेचं वर्तुळ व्यवस्थित आखलं जातं. एवढं सारं घडतं; ते सबुरीनेच. म्हणजे संयम सर्वत्र पाळावाच लागतो. विरोधकाबद्धल कधी इथं स्पष्ट बोलायचं नसतं. 'आमचाच मुद्दा योग्य कसा? विरोधकांचा मुद्दा कसा चुकीचा' याबाबी लोकांना सांगायच्या असतात. मात्र त्या संयमी भाषेत. आक्रमकता आणि आक्रस्तालीपणाला इथं थारा नाही. कुणाबद्दल कितीही वैरभाव असला, कुणाशी काही पटत नसलं, कुणाच्या भानगडीचा दंभस्फोट करायचा म्हटलं, तर इथे कुणालाच गडबड नसते. काही करायचं यापेक्षा काय करायचं नाही, याकडेच अनेकांचा कटाक्ष असतो. काय करायचंच तर ते परस्पर. उदाहरणार्थ, विलासराव अशोकरावांना किती पाण्यात पाहात होते तरीही ते परस्परांना भेटले की, एकमेकांना मिठीच मारायची बाकी असतात. पतंगराव शंकरराव चव्हाणांना भेटायला जायचे तेव्हा अशोक क्रिकेट खेळून आलेला असायचा. त्याच पोराच्या हाताखाली मी मंत्री आहे, याच दुःख त्यांना होतं मात्र ते बोलायचं नाही.एकुणात काय, तर देहबोलीतली, प्रत्यक्ष कृतीतली सबुरी फार फार महत्वाची. कुणी त्याला सहनशीलता म्हणो अथवा उपेक्षा!

जे हे सहन करतात ते सांगत नाहीत. ज्यांना ते सहन होत नाही, त्यांची गत नारायण राणे यांच्यासारखी होते. अशीच गत पूर्वी बाळासाहेब देसाई यांची झाली होती. ते वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात अनेक वर्षे मंत्री होते. अनेक महत्वाची खाती त्यांनी सांभाळली. त्यांचा सतत मुख्यमंत्रीपदावर दावा असायचा. यशवंतराव चव्हाणसाहेब आज ना उद्या आपल्याकडे पाहतील, असं त्यांना वाटायचं, शेवटी ते दिल्लीला म्हणजे इंदिरा गांधींच्या खास गोटात गेले. अनेक प्रयत्न केले. राणेंसारखेच त्यांनी अनेक पर्याय दिले. मात्र त्यांची पक्षावरची, पक्षाच्या कुळस्वामी, भैरोबा, खंडोबावरील श्रद्धा काही फळाला आली नाही. श्रद्धा संपली आणि सबुरीही! त्यांनीही राजीनामा दिला. तोही दिला मुख्यमंत्र्याकडे आणि थेट कोल्हापूर गाठलं. त्यांना वाटलं, आपल्या राजीनाम्याला पक्षश्रेष्ठी घाबरतील, मुख्यमंत्रीपद देऊ करतील , राजीनामा मागे घ्या म्हणतील. पण कुठलं काय? बाळासाहेब देसाईंना, त्यांच्या शक्तीला पक्षाने केव्हाच पचवून टाकलं होतं. त्यांचाही असाच पूर्ण नारायण राणे केला गेला. पुढे बाळासाहेब देसाई जनता पक्षात गेले, परत काँग्रेसमध्ये आले. मात्र सबुरी संपली असल्याने त्यांचं नांव मुख्यमंत्र्याच्या चर्चेत आलं नाही. तशीच काहीशी अवस्था जयंत पाटील यांचे वडील राजारामबापू पाटील यांनीही झाली होती. तात्पर्य हेच की, सबुरी नसणाऱ्या व मुख्यमंत्रीपद सांभाळण्याची क्षमता असणाऱ्या अनेक व्यक्तींना काँग्रेसने असेच पचवून टाकलं आहे.

आता वर्तमानावर येऊ, नारायण राणे काँग्रेसमध्ये आले तेव्हा त्यांनी शिवसेनेला उद्देशून सांगितलं होतं की, 'मी पूर्वी सच्चा शिवसैनिक होतो, त्यामुळे शिवसेनाप्रमुखांवरील टीकेने पेटून उठायचो. आता मी सच्चा काँग्रेसवाला झालोय. माझ्या नेत्या सोनिया गांधींवर जर कुणी खालच्या पातळीची टीका केली, तर त्या टीकेचं उत्तर त्याच पद्धतीने देईन, जसं मी पूर्वी देत होतो' नारायणरावांच्या या उदगारातील साराच तपशील सत्यात आला नाही. महत्वाचं म्हणजे, त्यांना काँग्रेस किती कळली? हाच प्रश्न पुन्हापुन्हा प्रकट करण्यासारखी स्थिती निर्माण झाली. नारायण राणे यांनी अशोक चव्हाणांवर केलेली टीका, त्यानंतर दिलेला मंत्रिपदाचा राजीनामा आणि नेतृत्वावर केलेली आगपाखड याची तेव्हा मोठी चर्चाच झाली. काँग्रेसपक्षात असं काहीच चालत नाही. तुमची ताकद असो वा उपद्रवमूल्य; पक्षाच्या शिस्तीत उर्फ रिवाजात ते बसत नाही. आश्वासन देणं आणि ते न पाळणं, हा तर या पक्षात नेहमीचाच शिरस्ता आहे. म्हणजे हा पक्ष लोकांना जी आश्वासनं देतो, ती बऱ्याचदा पाळतो. मात्र संघटनेतल्या व्यक्तींना दिलेली आश्वासनं पाळली जातातच असं नाही. म्हणजे ती पाळणं बंधनकारक तर अजिबात नसतं. त्यामुळेच राणेंचा मूळ स्वभाव उफाळून आला. विलासरावानंतर मी नाही म्हटल्यावर ते जास्तच चिडले. त्यांना चिडवण्यातही आलं. मग राणे सोनिया गांधींपासून ते अशोक चव्हाण सर्वांवर घसरले. पत्रकार परिषद, जाहीर सभा यांच्या माध्यमातून त्यांनी सारी मळमळ व्यक्त केली होती. एकदाचे ते मोकळे झाले पण उपयोग काहीच झाला नाही. राग शांत झाल्यावर वास्तव ध्यानी आलं.

सार्वजनिक जीवनात राहायचं, तर श्रद्धा नसली तरी चालेल; सबुरी महत्वाची. त्यामुळे एरवी मानाने दिल्लीला जाणारे राणे मिरझाराजे जयसिंग होऊन दिल्लीस गेले. दिल्लीत काहीच गरमाईने, घाईघाईने होत नाही. राणेंचंही प्रकरण दिल्लीकरांनी थंड करून खाल्लं आहे. राणेंची ताकद पक्षाने जोखली आहे. कोकणातला राणे फॅक्टर संपुष्टात आला आहे, मुंबईतही त्यांचा काही फायदा होईल असं पक्षाला वाटेनासे झालंय. त्यामुळे त्यांच्या अमित शहा भेटीची वा भाजप प्रवेशाच्या बातमीची दखल घेतली गेली नाही, राणेंनी दिल्ली गाठून काही सांगायचा स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला मात्र त्याची जाणीवच होऊ दिलेली नाही.  श्रद्धा आणि सबुरी नसली की काय होतं याचा अनुभव राणे घेत असतील. राणेंचं प्रकरण म्हणजे इतिहासाची पुनरावृत्ती...!

- हरीश केंची




No comments:

Post a Comment

मोदींचं ठाकरे प्रेम.....?

"गोध्रा हत्याकांड, दंगलीनंतर मोदींची गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावरून उचलबांगडी करायचं वाजपेयी अडवाणी यांनी ठरवलं होतं. पण शिव...