Sunday 1 October 2023

काँग्रेसची धर्मनीती...!

"हिंदुत्वाचा, सनातन धर्माचा मुद्दा भाजपला चर्चेसाठी अपेक्षित असतो. त्यामुळं उदयनिधी स्टॅलिन आणि मणिशंकर अय्यर यांनी तो अलगद भाजपच्या हाती आणून दिलाय. उदयनिधी स्टॅलिनना सनातन धर्माला किड्यामुंग्यासारखं संपवायचंय. कर्नाटकचे मंत्री खरगे यांनी त्यांची पाठराखण केलीय. हे सुरू असतानाच मणिशंकर अय्यर यांनी नरसिंह राव हे 'भाजपचे पहिले पंतप्रधान' असं संबोधून काँग्रेसच्या हिंदुत्वाची टिंगल केलीय. पण राजीव गांधींनी रामलल्लाचं मंदिर खुलं केलं होतं. हे विसरलं जातंय. ही वस्तुस्थिती दाखवणारे सारे भाजपचे ठरताहेत. मणिपूर आणि अन्यत्र घडणाऱ्या घटनांवर बोलणारे काँग्रेसी ठरताहेत. हा सारा दांभिकपणा आहे. आजवर कुणी काँग्रेसी अयोद्धेतल्या राम मंदिरात कधी गेलाय का? हिंदूंची मनं जिंकणार कसे? अल्पसंख्यांकांच्या हिता बरोबरच काँग्रेसला सॉफ्ट हिंदुत्व स्वीकारल्याशिवाय पर्याय नाही...!"
-----------------------------------

*गे* ल्या काही दिवसांपूर्वी विरोधकांच्या आघाडीनं दूरचित्रवाणीवरच्या चर्चेत एकांगी सूत्रसंचालन करणाऱ्या १४ पत्रकारांच्या कार्यक्रमावर बहिष्कार घातला त्यावेळी त्यावर भाजप नेत्यांनी विरोधकांवर टीका करत पत्रकारिता धोक्यात आल्याचा कांगावा केला. पण ह्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलं की, विरोधकांनी केवळ १४ पत्रकारांवरच घोषित बहिष्कार केलाय मात्र सत्तेवर आल्यापासून म्हणजे जवळपास १० वर्षे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी सर्वच्या सर्व पत्रकारांवर अघोषित बहिष्कार घातलाय. त्याचं काय? अशाचप्रकारे एखाद्या पत्रकारानं प्रधानमंत्री वा भाजपच्या वक्तव्यावर, ध्येयधोरणे आणि निर्णयांवर टीका केली तर लगेचच त्याला दूषणं लावली जातात. तो काँग्रेसी असल्याची टीका केली जाते. काही पत्रकार प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी यांच्या धोरणांना विरोध दर्शवतात, टीका करतात. त्यावेळी काहीजण त्यांना काँग्रेसी झाल्याची टीका करतात. जेव्हा कुणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भारतीय जनता पक्ष यांच्या बाजूनं लिहितात तेव्हा ते भाजपचे बनलेत, असं काँग्रेसी म्हणतात. पण पत्रकार कधीच कुण्या एका पक्षाची बाजू घेऊन लिहीत नाही. जनतेच्या मनातल्या भावना ते व्यक्त करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळं कधी कधी जणू एका पक्षाची बाजू घेऊनच लिहिताहेत, असं वाटतं, पण कालांतरानं मग त्याच पक्षावर कडाडून टीकाही केली जातेय. भाजप प्रशासित राज्यांत जर काही बलात्काराच्या घटना घडल्या तर त्या चुकीच्या आहेत. त्यावर टीकेची झोड उठवलीच पाहिजे. मग तशाच त्या राजस्थान या काँग्रेसी राज्यांतही घडल्या तर त्या कशा काय योग्य ठरतात? त्याचं समर्थन कसं करता येईल? त्यावर टीका ही झालीच पाहिजे. भाजपशासित सरकारमध्ये जर भ्रष्टाचार झाला तर तो भ्रष्टाचार म्हणून टीका करायची आणि काँग्रेसच्या सरकारांमध्ये भ्रष्टाचार झाला तर मग काय गप्प बसायचं?
गौतम अदानी संपूर्ण देशाला लुटताहेत असं वातावरण सर्वत्र निर्माण झालंय, काँग्रेसनं आणि राहुल गांधींनी त्यावर कडाडून टीका केलीय, त्यावर संसदेत विचारणा केली होती. मग अशा या अदानीना देशात काँग्रेसची राज्यसरकारं जिथं आहेत ती सरकारं त्यांना आपल्या मांडीवर का बसवताहेत, का कवटाळताहेत. अशावेळी पत्रकारांना गप्प कसं बसता येईल? राजस्थानात अदानीना हजारो एकर जमीन काँग्रेसच्या सरकारनं काही प्रकल्पांसाठी दिलीय. जर अदानी गद्दार आहेत, ते देशाला लुटताहेत असा आरोप काँग्रेसी एकाबाजूला करताहेत अशावेळी मग हजारो एकर जमीन अदानीना का दिली जातेय? असे विरोधाभास दाखवणारे अनेक विषय आहेत. भाजपचं राज्य असलेल्या उत्तरप्रदेशात हत्या, मॉब लिंचींग झाल्यावर लिहायचं नाही का? ते तर लिहायलाच हवंय मग राजस्थानात काँग्रेसचं सरकारं आहे तिथं जर नासीर आणि जुनैद यांची हत्या झाली तर मग गप्प का बसायचं? हा कुठला सर्वधर्मसमभाव, हा कसला सेक्युलॅरिझम आहे? कन्हैया नावाचा एक गरीब तरुण त्याचा गळा कापला गेला. त्यांची 'अल्ला हो अकबर' म्हणत किती निघृणपणे हत्या केली गेली. हे आपण वाचलं असेलच. तो त्याची हत्या होण्याच्या काही दिवस आधीपासून पोलिसांकडे तक्रारी करत होता की, आपली हत्या होईल, अशा आपल्याला धमक्या मिळताहेत, मला संरक्षण द्या अशी मागणी तो पोलिसांकडे करत होता. मात्र त्याकडं दुर्लक्ष केलं गेलं. त्याला पोलीस संरक्षण मिळालंच नाही, शेवटी त्याचा हकनाक जीव गेला याला जबाबदार कोण आहे? अशावेळी मौन धारण करता येईल का? लेखणी मोडून टाकता येईल का? पण हे लिहिलं जातं ते सामान्य माणसांच्या हक्कासाठी, सरकारला सवाल केला जातो ते राष्ट्राच्या हितासाठी, इंटरेस्ट ऑफ नेशन...! अशावेळी पत्रकाराला भाजपशी, काँग्रेसशी का जोडलं जातं ते समजत नाही. केवळ हिंदूंना शिव्या घालणं म्हणजे ' सेक्युलॅरिझम ' आहे का? तसंच मुसलमानांना शिव्या देणं म्हणजे काही हिंदुत्व नाही! जर परमात्मा असेल तर तो सगळ्यांचाच असेल. हा भारत, इंडिया, हिंदुस्थान हा सर्वांचा आहे. लोकहिताच्या, दिशहिताच्या दृष्टीनं लिहिताना, दांभिकपणा उघड करताना तुम्ही जर पत्रकार गुन्हा करतोय असं तुम्ही समजत असाल तर मग तो तुमचा गुन्हेगार आहे!
जर तुम्ही म्हणत असाल की, मुहम्मद पैगंबर केवळ तुमचे आहेत, जेवढे ते मुसलमानांचे आहेत तेवढेच ते आमचेही आहेत. अशावेळी भाजपची मंडळी म्हणतात की, प्रो मुस्लिम बनलेत. पण जेव्हा कन्हैयाची झालेली हत्या चुकीची आहे असं म्हटलं, इस्लामच्या नावाखाली निर्दोष लोकांना एके ४७ नं गोळ्या घातल्या जाणं, अल्ला हो अकबर म्हणत हत्या करणं, गळा चिरणं, मारून टाकणं हेही गैर आहे. तेव्हा काँग्रेसी मंडळी त्याला भाजपेयी ठरवता! ही कोणती धर्मनिरपेक्षता? तुम्ही गांधींजींपेक्षा, त्यांच्या सहिष्णुतेहून मोठे झाले आहात का? महात्मा गांधींच्या प्रत्येक सभेची सुरुवात होत होती, 'रघुपती राघव राजाराम पतीत पावन सीताराम...!' काय महात्मा गांधी भाजपचे होते का? 'वंदमातरम' ची घोषणा भारताच्या स्वातंत्र्यासाठी देणारे क्रांतिकारक काय भाजपचे होते? तोवर तर भाजपचा जन्मही झालेला नव्हता. काय भगवा ध्वज भाजपचा आहे? काय 'भारत माता की जय' ही घोषणा भाजपची आहे काय? प्रश्न असा आहे की, काँग्रेस पक्ष ज्यांची मूळ प्रेरणा, धरोहर ही राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती, राष्ट्रजागृती, राष्ट्रउत्थान, राष्ट्रीय एकता, देशाची अखंडता ही आहे. तीच काँग्रेसची ताकद आहे, शक्ती आहे! भगवा रंग तर आमच्या राष्ट्रध्वजात, झेंड्यात सर्वात वर आहे. भगवा रंग हे शौर्याचं, वैभवाचं, बलिदानाचं, संस्कृतीचं, सभ्यतेचं, सनातनचं प्रतिक आहे. भगवा हा केवळ भाजपचाच आहे हे काँग्रेसजन कधीपासून समजू लागलेत? मग आता भगव्याचाही विरोध काँग्रेसी करणार का? जर उद्या कुण्या काँग्रेसीनं 'वंदे मातरम' ची घोषणा दिली तर तो काय लगेच भाजपचा झाला का? असं झालं तर काँग्रेसी भगव्याला, वंदेमातरम् , 'भारत माता की जय' याला हरवून बसतील. आज काँग्रेसी महात्मा गांधीना हरवून बसले आहेत. त्यांना हायजेक केलं गेलंय. सरदार वल्लभभाई पटेलांना तर काँग्रेसी केव्हाच हरवून बसलेत. पटेल तर काँग्रेसचेच होते ना? त्यांनाही भाजपनं हिसकावून घेतलंय. काँग्रेसच्या सुभाषचंद्र बोस यांनाही हिसकावून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. यदाकदाचित उद्या इंदिरा गांधीनाही हिसकावून घेतील. अशावेळी एखादा कार्यकर्ता, एखादा लेखक, पत्रकार जर या गोष्टी काँग्रेसीना स्पष्टपणे सांगत असेल तर ते काय भाजपचे बनले आहेत काय? या साऱ्या गोष्टी सांगितल्या जातात याचा अर्थ मजबूत विरोधीपक्ष म्हणून काँग्रेसनं भाजपच्या समोर उभं ठाकावं म्हणून सांगितलं जातंय, लिहिलं जातंय. अगदी भाजपचे वरिष्ठ नेते नितीन गडकरी यांनीही हेच म्हटलंय. 'लोकशाही मजबूत करायची असेल तर विरोधीपक्षही तेवढाच सक्षम असायला हवा!' पण इथं लक्षात कोण घेतोय?
आता काँग्रेसी भगव्याला विरोध, हिंदुत्वाला विरोध, संतांना विरोध, गाईला विरोध. गायत्रीला विरोध, वंदेमातरम् ला विरोध करताहेत. विचार करा, जी काँग्रेसची मंडळी गोरखपूरच्या गीता प्रेसला शिव्या घालतात अशी मंडळी काँग्रेसच्या वर्किंग कमिटीत जाऊन बसतात. अशा वातावरणात लोकांपर्यंत काय संदेश जाईल? जो 'भारत तेरे तुकडे होंगे..!' अशा घोषणा देतो त्याला काँग्रसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीत स्थान मिळतं. त्यामुळंच भाजपच्या नेत्यांकडून असं वातावरण तयार केलं जातंय की, काँग्रेस ही हिंदूविरोधी, राष्ट्रविरोधी बनलीय. म्हणजे जे भाजप इच्छिते आहे तेच काँग्रेसचे नेते करताहेत. याविरोधात जर कोणी काही बोलत असेल तर काँग्रेसनं त्याचं स्वागत करायला हवंय. कारण ते राष्ट्रधर्म जागवताहेत, ते त्यांचं कर्तव्य पार पाडत आहेत. मात्र अशांना दूर लोटलं जातंय. अशावेळी पत्रकारांनी काही टीकेचे आसूड ओढले तर त्यांची निर्भत्सना केली जाते. पत्रकाराचं काम काय असतं? सत्यासाठी दार ठोठावणं म्हणतात याला. 'उठ, जाग मुसाफिर अब भोर भई, आप रैन कहा सोवत हैं...!' तुम्ही जागेच होणार नसाल तर जागविणारी मंडळी तरी काय करणार? पक्षाकडून काही चुकीचं घडत असेल, चुकीच्या मार्गावर, डाव्या मार्गावर, वाम मार्गावर पक्ष नेला जात असेल तर कुणीच बोलायचं नाही का? हिंदू धर्माचे विरोधी असल्याचा काँग्रेसवर ठप्पा लागला जातोय. जे भाजपची मंडळी करू पाहताहेत त्याला अशाने काँग्रेस मधल्या मणिशंकर अय्यर सारख्या नेत्याचा हातभार लागतोय. प्रश्न केवळ काँग्रेसी नेत्यांचा नाहीये. देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या काँग्रेस पक्षाचा आहे. जी काँग्रेस महात्मा गांधी, पंडित जवाहलाल नेहरूं, वल्लभभाई पटेल, सुभाषचंद्र बोस यांच्या मार्गावर चालली, इंदिरा गांधी, लालबहादूर शास्त्रींच्या मार्गावरून चालली, जिनं इतकी बलिदानं दिली आहेत, त्या काँग्रेसवर ती राष्ट्रद्रोही असल्याचा आरोप करण्याची हिंमत भाजप करतेच कशी? काँग्रेस राष्ट्रविरोधी आहे असं भाजप म्हणतेच कशी? काहीतरी कारण असेलच ना, ज्यांनी भारत के तुकडे करण्याच्या घोषणा दिल्यात त्यांना काँग्रेस महत्वाच्या पदांवर बसवलं जातंय. किंबहुना भाजपला अपेक्षित असं वागणं काँग्रेसी नेत्यांकडून होतेय. तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यानं सनातन धर्मावर टीका केलीय. काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे चिरंजीव जे कर्नाटकात मंत्री आहेत त्यांनी त्याचीच री ओढलीय. भाजपला आयत कोलीत मिळालंय. तेही द्रमुकचं ओढणं आपल्या गळ्यात घेऊन. खरं तर उदयनिधीचा निषेधच व्हायला हवा होता. काँग्रेसचे काही नेते आपल्या उथळ वागण्यानं पक्षाची अवहेलना करतातच शिवाय भाजपला सहाय्यभूत ठरताहेत. त्यात मणिशंकर अय्यर अग्रभागी आहेत. शेकडो वर्षांच्या न्यायालयीन लढ्यानंतर प्रभू रामाचं मंदिर अयोद्धेत साकारतेय. रामजन्मभूमी मंदिर काय फक्त भाजपचं आहे? आजपर्यंत काँग्रेसचा एकही वरिष्ठ नेता रामलल्लाचं दर्शन घ्यायला का तिथं गेला नाही? त्यामुळं असं दिसतं की, रामजन्मभूमी मंदिर निर्मितीच्या निर्णयानं काँग्रेस खुश नाहीये, आनंदित नाहीये. पॉलिटिक्स हा पर्सप्शन खेळ आहे. आणि काँग्रेस हिंदूविरोधी असल्याचं पर्सप्शन बनत चाललंय. हे पर्सप्शन बनू नये की, काँग्रेस हिंदू विरोधी आहे, राष्ट्र विरोधी आहे. काँग्रेसनं सौम्य हिंदुत्व स्वीकारावं, लोकशाहीत बहुसंख्य असलेल्यांना देखील न्याय मिळाला पाहिजे, भारतात हिंदू बहुसंख्य असल्यानं हिंदू हिताचे निर्णय घ्यायला हवेत! असं काँग्रेसचे दिवंगत मंत्री आणि प्रवक्ते बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ यांनी तिरुपती इथल्या काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पक्षानं तो प्रयत्न हाणून पाडला. त्यावेळी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी होत्या. तिथूनच काँग्रेसच्या पतनाला सुरुवात झालीय.
हे सारं आठवायचं कारण, उदयनिधी स्टॅलिनचं सनातनी धर्मावरची टिपण्णी आणि गांधी परिवारनिष्ठ मणिशंकर अय्यर यांनी आपल्या आत्मचरित्रात नरसिंह राव यांच्यावर 'भाजपचे पहिले पंतप्रधान' म्हणून टीका करणं हे आहे! अय्यर यांनी यापूर्वी सावरकर, नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केलीय. अय्यर यांनी राव यांच्यावर द्वेषातून आणि गांधी परिवार निष्ठेतून ही टीका केली असली, तरी राव यांचा राजकीय कल ते पंतप्रधान झाल्यानंतर हिंदुत्ववादाकडे राहिला हे खरंय. पण अय्यर ज्या पद्धतीनं राव यांच्यावर हिंदुत्ववादाचा ठपका ठेवतात, तसे ते बिलकुलच हिंदुत्ववादी नव्हते. कारण राव यांच्या हिंदुत्वाची छटा ही सनातन होती. भारताच्या मूळ अध्यात्मिक आणि सांस्कृतिक गाभ्याचं स्वागत आणि स्वीकार करणारी होती. ती नेहरूवादी धर्मनिरपेक्षतेच्या म्हणजे मुस्लिम अनुनयाच्या पलीकडची होती. बाबरी मशीद पतना संदर्भात राव यांची भूमिका त्यांच्या समकालीन नेत्यांनी वादग्रस्त ठरवली असली, तरी राव यांनी पंतप्रधान म्हणून घटनात्मक चौकट ओलांडली नव्हती. तोडगा काढण्याचे शक्य तेवढे सगळे प्रयत्न त्यांनी केलं होतं ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. पण केवळ बाबरी मशिदीच्या पतनावरून त्यांना 'भाजपचे पहिले पंतप्रधान' ठरवणं हा नरसिंह राव यांच्या राजकीय कर्तृत्वावर पूर्णपणे अन्याय आहे. भले राव यांनी अय्यर यांना भारत हे 'हिंदू राष्ट्र ' आहे, असं म्हटलं असेल, पण ती संकल्पना त्यांनी घटनाबाह्य पद्धतीनं मांडलेली किंवा स्वीकारलेली नव्हती. उलट या देशात हिंदू बहुसंख्य आहेत. घटनात्मक लोकशाही तत्त्वाला अनुसरून त्यांच्या कलानं राज्य चालवावं लागेल, ही वस्तुस्थिती त्यांनी आपल्या ५० वर्षांच्या दीर्घ अनुभवातून मांडली होती. काँग्रेस पक्षात डॉ. राजेंद्रप्रसाद, सरदार वल्लभभाई पटेल, राजर्षी पुरुषोत्तमदास टंडन, आचार्य जे. बी. कृपलानी, कन्हैयालाल मुन्शी, डॉ. संपूर्णानंद हे सर्व नेहरूंच्या समकालीन होते, या सर्व नेत्यांनी आपला राजकीय कल हा हिंदुत्व निष्ठेकडेच ठेवला होता हा इतिहास आहे. सरदार वल्लभभाई पटेल, पुरुषोत्तम दास टंडन आणि आचार्य कृपलानी हे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. राजेंद्रप्रसाद, कन्हैयालाल मुन्शी, डॉ. संपूर्णानंद हे सर्व नेते स्वतंत्र प्रतिभेचे विद्वान म्हणून गणले जात. पण या सगळ्यांचा राजकीय कल हिंदुत्ववादाकडे असला, तरी त्यांच्यावर कोणी तसा उथळ ठपका ठेवलेला नव्हता. त्यांच्या काँग्रेसनिष्ठेविषयी कोणी शंका घेतली नव्हती. सरदार पटेल यांना तर महात्मा गांधी हे काँग्रेसमधला 'हिंदू महासभा'वादी नेता असं म्हणायचे, तर हिंदू महासभेचे माजी अध्यक्ष सावरकरांचे अनुयायी आणि जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांना तेच महात्मा गांधी हिंदू महासभेतला 'काँग्रेसी', असं म्हणायचे. एवढी सहिष्णुता त्याकाळी होती. बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ यांनी तिरुपतीच्या काँग्रेस अधिवेशनात हीच सॉफ्ट हिंदुत्वाची भूमिका मांडली होती. पण पक्षाध्यक्ष असलेल्या सोनिया गांधी यांनी ती नाकारली. तेव्हापासूनच काँग्रेसच्या पटनाला सुरुवात झाली! असा विचार मांडला ते पत्रकार लगेचच भाजपचे ठरतात!
हरीश केंची,
९४२२३१०६०९


No comments:

Post a Comment

मोदींचं ठाकरे प्रेम.....?

"गोध्रा हत्याकांड, दंगलीनंतर मोदींची गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावरून उचलबांगडी करायचं वाजपेयी अडवाणी यांनी ठरवलं होतं. पण शिव...