Sunday 1 May 2022

अराजकधर्म सोडावा । महाराष्ट्रधर्म वाढवावा ।।

"महाराष्ट्र अस्थिर करण्याच्या मनसुब्याला राज ठाकरेंच्या 'भोंग्या'नं साथसंगत केलीय. भोंग्याच्या जोडीला हनुमान चालीसा आणला. सुशांतसिंगपासून सुरू झालेल्या कचकड्याच्या बाहुल्यात 'नवनीत' अवतरलं. प्रसिद्धीसाठी चवाटलेल्या राणांनी मातोश्रीवर रण आरंभलं पण कारागृहात जावं लागलं. राजनं ३ मेला औरंगाबादेत मैदान मारायचं ठरवलंय. मनसेच्या विविधरंगी झेंड्यात जो दलितांचा निळा, मुस्लिमांचा हिरवा होता तो हटवून महाराष्ट्रधर्माचा भगवा आणि शिवरायांची राजमुद्रा स्वीकारली. सततच्या अपयशानं शिवसेनेच्या पाऊलखुणा धुंडाळत, शिवसेनाप्रमुखांची शाल आणि शैली स्वीकारत राजनं आग्रही हिंदुत्वाच्या दिशेनं वाटचाल आरंभलीय. त्यांनी आधी मोदींना डोक्यावर घेतलं, नंतर 'लाव तो व्हिडीओ' म्हणत जहरी टीका करत त्यांना धु धु धुतला. आज मात्र त्यांच्याच आडोश्याला जाण्याची वेळ आलीय. राजनं जो मार्ग स्वीकारलाय त्याची ब्ल्यूप्रिंट अराजकतेची आहे, महाराष्ट्रधर्माची नाही!"
--------------------------------------------------------

आज १ मे महाराष्ट्रदिन! येत्या ३ तारखेला अक्षयतृतीया आणि रमझान ईदला राज ठाकरेंनी औरंगाबाद इथं जाहीर सभा घेतलीय. ३ तारखेपर्यंत त्यांनी राज्यातल्या मुल्लामौलवींना अल्टीमेंटम दिला आहे की, अजानसाठी वापरले जाणारे भोंगे बंद झाले नाहीत तर त्या भोंग्यासमोर त्याहून मोठ्या आवाजात हनुमान चालीसा लावला जाईल. या इशाऱ्याची पूर्ती होतेय, त्याच दिवशी ही सभा आहे. त्यामुळं इथं तनाव निर्माण झालाय. या भोंग्याच्या वादानं केवळ इथंच नाही तर देशात खळबळ उडालीय. दरम्यान अमरावतीच्या नवनीत आणि रवि राणा यांनी 'बीचमें मेरा चांदभाई' म्हणत अरेरावी, दमदाटी करत थेट उद्धव ठाकरेंच्या घरात घुसून मातोश्रीवर हनुमान चालीसा म्हणण्याचा चंग बांधला. तिथं शिवसैनिक जमा झाले. पोलिसांनी त्या दोघांची गठडी बांधली आणि तुरुंगात रवानगी केली. महाराष्ट्र अस्थिर करण्याच्या प्रयत्नात आणखी एक कडी जोडली गेली. सुशांतसिंग, अर्णव, कंगना, परमजीतसिंग-वाझे-देशमुख, वानखेडे-नवाब मलिक, राणे पितापुत्र, मोहित कंबोज, किरीट सोमय्या, केंद्र सरकारच्या साऱ्या तपास यंत्रणा यांच्यापाठोपाठ राणा दाम्पत्य आणि राज ठाकरे आता सरसावले आहेत. अर्थात यांना कुणाचा वरदहस्त आहे वा त्यांच्यामागे कोण आहेत हे सारेच जाणतात. आज आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राज ठाकरे यांच्याबद्धल बोलणार आहोत. बाळासाहेबांची पडछाया समजले जाणारे राज यांनी आपल्या स्वभावानुसार आणि धरसोडवृत्तीप्रमाणे सतत भूमिका बदलत अयशस्वी राजकारण केलंय. आता त्यांनी शिवसेनेचा अंगरखा नेसण्याचा, राज्याच्या राजकारणात निर्माण झालेली शिवसेनेची पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न चालवलाय. महाराष्ट्रधर्माचा जागर करत राज यांनी आपल्या मनसेची वाटचाल आरंभली होती. त्यासाठी पक्षाच्या विविधरंगी झेंड्यात बदल केला होता. भगवा हा एकच रंग आणि शिवरायांच्या महाराष्ट्रधर्माची शिवमुद्रा स्वीकारली होती. ती राजमुद्रा शहाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांसाठी तयार केली होती. त्या राजमुद्रेवर संस्कृत भाषेतला श्लोक लिहिला होता.
प्रतिपच्चंद्रलेखेव। वर्धिष्णुर्विश्ववंदिता।
शाहसूनो: शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।।
याचा अर्थ 'प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे प्रतिदिन वृद्धिंगत होणारी, जगाला वंदनीय असणारी शाहपुत्र शिवाजीची ही मुद्रा मांगल्यासाठी शोभते आहे' असा आहे! शिवाजी महाराज सर्वांचेच आहेत. ते राज ठाकरेंचे पण आहेत. ही मुद्रा वापरणं चुकीचं असूच शकत नाही. ज्यांनी आपल्याला ओळख दिली त्यांची ओळख अभिमानानं आपल्या सतत सोबत ठेवणं यात काहीच चूक नाही. मनसेनं त्यांच्या झेंड्यात शिवमुद्रा आणण्यात म्हणून काहीच गैर नाही. फक्त शिवमुद्रेसोबत एक खूप मोठी जबाबदारी आपल्यावर येतेय याचं भान मनसेला आहे असं दिसत नाही. ही जबाबदारी प्रामुख्यानं शिवरायांच्या विचारांची आहे. आपल्या भाषणाची सुरुवात त्यांनी 'माझ्या तमाम मराठी बांधवांनो ऐवजी आता 'माझ्या तमाम हिंदू बांधवांनो....!! अशी केली जातेय. यात हिंदुत्व वगैरेचा उल्लेख आहे. शिवाजी महाराजांचं राज्य 'हिंदवी स्वराज्य' होतं. हिंदवी ही भौगोलिक संकल्पना आहे. ते हिंदुत्ववादी स्वराज्य नव्हतं. हिंदुत्व ही राजकीय संकल्पना आहे. हिंदुत्व ही प्रतिक्रिया आहे. युरोपातल्या फॅसिस्ट विचार प्रणालीनुसार आपल्याकडेही हिंदू धर्माची मांडणी झाली पाहिजे असं वाटणा-यांनी ती केलीय. राज ठाकरे शिवमुद्रेसोबत ‘हिंदवी’ राज्याच्या दिशेनं जाणार असं वाटलं होतं तेव्हा तर ते स्वागतार्ह होतं. पण आज ते ‘हिंदुत्वा’च्या दिशेनं जात असल्याचं दिसतं. शिवरायांच्या विचारांचा पुन्हा एकदा चुकीचा अर्थ काढला गेलाय. शिवरायांचं राज्य हे सगळ्यांचं होतं. त्यात जश्या सगळ्या जातींच्या लोकांना स्पेस होती तशीच धर्माच्याही होती. मुळात शिवकालीन संघर्ष हा धार्मिक नव्हताच. तो राजकीय होता, एतद्देशीय आणि परकीय असा होता. त्यामुळं शिवरायांच्या विरोधात अनेक हिंदू सरदार लढले आणि शिवरायांच्या बाजूनं अनेक मुस्लिम सरदारही लढले. आजच्या 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणित हिंदू' विरुद्ध 'मुस्लिम चष्म्यातून शिवकालीन संघर्ष' बघणं म्हणजे वडाची साल पिंपळाला लावणं आहे. राज ठाकरेंनी ते करू नये. पूर्वी भाजपला महाराष्ट्रात पाय रोवण्यासाठी शिवसेनेची मदत हवी होती. यातून तब्बल पंचवीस-तीस वर्षें मान अपमान गिळून भाजप ‘धाकटी’ होऊन राहिली. बाळासाहेबांना भाजपच्या ह्या धूर्तपणाचा पुरता अंदाज होता. त्यामुळेच त्यांनी भाजप-सेना संबंधात कधी आपला ‘अप्पर हॅन्ड’ सोडला नव्हता. उद्धव यांची २०१४ ला मजबुरी झाली पण संधी मिळताच भाजपची खोड त्यांनी २०१९ ला मोडली. भाजपला हाच वेग कायम राहिला तरी एकहाती महाराष्ट्र जिंकायला अजून काही काळ जावा लागेल. तोवर त्यांना राज्यात एका सशक्त ‘धाकल्या’ची गरज आहे. राज ठाकरे यांना ही स्पेस खुणावतेय का? हा खरा प्रश्न आहे. जर असं झालं तर राज जे काही ‘महाराष्ट्र धर्म’ वगैरे बोलत होते त्यांच्याशीही ती आता प्रतारणा ठरेल आणि त्या ‘शिवमुद्रे’सोबतही! त्यामुळं मराठी मतांसाठीचा हा राज यांचा नवा प्रयोग, प्रयत्न बारकाईनं बघितला पाहिजे. जर तो ‘हिंदवी’ दिशेने गेला तर आनंद, जर तो ‘हिंदुत्व’ दिशेनं गेला तर मात्र क्लेशदायक असणारंय. असं मनसेनं आपला विविधरंगी झेंडा बदलून भगवा शिवमुद्राधारी झेंडा स्वीकारला तेव्हा म्हटलं गेलं. आज त्याचं खरं स्वरूप समोर आलं आहे. त्यांनी भाजपची सावली म्हणून जाण्याचं ठरवलेलं दिसतंय!

कोंबडा जसा डोक्यावर तुरा मिरवतो तसं हिंदुत्व मिरवणारी काही मंडळी सध्या दिसताहेत. हिंदुत्व हे खरं तर धमन्यातून वाहणाऱ्या रक्तासारखं हवं. ते असायला हवंय, पण दिसायला हवंच असं मात्र नाही. अंगात रक्त आहे हे दाखवण्याचं मार्ग वेगळं आहेत. कडकड कडे वाजवत फडफड फडाड आसूड स्वतःवरच उडवत, दाभणानं दंडाला भोसकून रक्ताच्या चिळकांड्या उडवणाऱ्या कडकलक्ष्म्या ररस्त्यानं कधीमधी फिरतात. भाबड्या बायाबापड्या त्यांना नमस्कार करतात. चार पैसेही देतात. हिंदुत्वाच्या कडकलक्ष्म्या असाव्यात असं कुणालाच वाटणार नाही, पण सध्या हिंदुत्वाचं प्रदर्शन करण्याची क्रेझ आहे, हे नाकारता येणार नाही. नको तिथं हिंदुत्व दाखवून हिंदुत्वाला सवंग बनवत आपला स्वतःचा भाव वाढवून घेणारे सध्या दिसताहेत. त्यामुळं कुणी सत्तेसाठी रंग बदलल्याची टीका करतोय तर आपला रंगच नव्हे तर, अंतररंगही भगवंच असल्याची ग्वाही देतोय! बाळासाहेबांच्या वारसांपैकी एकानं 'शिवमुद्रे'चा ध्वज करून 'हिंदवी स्वराज्या'चा ध्यास घेत, 'महाराष्ट्र धर्म' जागविण्याची आस दाखवली होती. तर दुसऱ्यानं आपण काँग्रेसीबरोबर गेलो असलो तरी आपलं अंतरबाह्य मन हे 'भगवं' असल्याचंच म्हटलंय. मनसेनं गेल्या १६ वर्षांत अनेक स्थित्यंतरं अनुभवली. यशापयशाचा अनुभव घेतलाय. प्रारंभी मराठीच्या मुद्द्यावर त्यांना मिळालेलं यश राजकीय पक्षांना हेवा वाटावं असंच होतं. आपल्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत २००९ मध्ये १३ आमदार निवडून आणण्याची किमया त्यांनी साधली होती. अर्थात या यशाचे मानकरी एकटे राज ठाकरे होते. महाराष्ट्राच्या राजकीय आखाड्यात त्यांच्या निमित्तानं एका सक्षम नेतृत्वाचं पदार्पण झालं होतं. राज यांच्या झंझावाती नेतृत्वानं मुंबई, ठाणं, पुणं, नाशिक इथं अक्षरश: वादळ निर्माण केलं होतं. कुणाचाही मुलाहिजा न ठेवणाऱ्या त्यांच्या वक्तृत्वानं तरुणाईला वेडं केलं होतं. 'मराठी हृदयसम्राट' अशी उपाधी दिली गेली. आता मात्र ते 'हिंदू जननायक' बनलेत. त्यांनी वेगवेगळ्या प्रश्नांवर केलेली आंदोलनंही लक्षवेधक ठरली. टोल आंदोलन त्यापैकीच एक, पण मनसेचं हे यश औटघटकेचं ठरलं. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत २०१४ आणि २०१९ मध्ये मनसेचा अवघा एक आमदार निवडून आला. नरेंद्र मोदी यांच्या लाटेत काँग्रेस, राष्ट्रवादीप्रमाणे मनसेचीही वाताहत झाली. एकटी शिवसेना आपलं अस्तित्व दाखवू शकली. नरेंद्र मोदी यांच्या रूपानं देशभर हिंदुत्वाचा माहोल पसरला होता. त्यात राज यांचा मराठीचा-प्रादेशिकवादाचा मुद्दा नकळत मागं पडला. शिवसेना त्यावेळी भाजपाविरोधात लढली खरी, पण त्यांना हिंदुत्वानंच तारलं हे नाकारता येणार नाही. याच मुद्द्यावर भाजपा आणि शिवसेनेनं नंतर एकत्र येऊन महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली. मनसे मात्र या पराभवानंतर दिशाहीन झाली. मोदींच्या लोकप्रियतेचा आलेख वाढतच गेला. नोटबंदीच्या निर्णयानंतर तर कधी काळी मोदींचे प्रशंसक असणारे राज ठाकरे त्यांचे कट्टर विरोधक बनले. राज यांनी संधी मिळेल तिथं मोदींवर तोंडसुख घेतलं. पुढं तर राज यांचं राजकारण मोदी विरोधावर केंद्रित झालं. मोदींच्या निर्णयांचं राज यांनी जाहीररीत्या वाभाडं काढलं. लोकसभा निवडणुकीत तर त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर मोदींविरोधात प्रचाराचं रान उठवलं, पण मोदींच्या लोकप्रियतेवर ओरखडादेखील उमटला नाही. मोदींविरोधी राज यांची चाल अयशस्वी ठरली!

हे खरं असलं तरी राज यांच्या नेतृत्वाची जादू तसूभरही कमी झाली नाही. आजही महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचा दबदबा कायम आहे. त्यांनी 'भोंग्या'चा आवाज टाकताच देशभरात आणि सर्व राजकीय पक्षांत खळबळ उडालीय. त्यांच्या एका हाकेनं लाखोंचा जनसमुदाय एकत्र आणण्याची किमया, ताकद त्यांच्यात आहे. परंतु पक्ष म्हणून मनसेच्या मागील १६ वर्षाच्या वाटचालीवर दृष्टिक्षेप टाकला तर सत्तेच्या सारीपाटावर त्यांच्या पक्षाचं अस्तित्व शून्य आहे, हे त्यांनाही मान्य करावं लागेल. आपल्या पक्षाला उभारी देत त्याचं नव्यानं अस्तित्व निर्माण करण्याच्या दृष्टीनं राज ठाकरे आज एक पाऊल पुढं टाकलंय. आपल्या विचारांना नवी दिशा देत पक्षाची कक्षा रुंदावत आहेत. राजकारणातल्या नव्या समीकरणानं त्यांना ही संधी दिलीय. भाजपची साथ सोडून शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीसारख्या धर्मनिरपेक्ष पक्षांच्या साथीला सामील झालीय. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना असा एकमेकांवर उभा असलेला हा सत्तेचा डोलारा टिकवण्यासाठी शिवसेनेला तारेवरची कसरत करावी लागतेय. राष्ट्रवादी आणि काँग्रेस आपल्या विचारांशी ठाम आहेत. शिवसेनेलाच आपल्या तत्त्वांना मुरड घालावी लागतेय. हिंदुत्वाचे अनेक मुद्दे शिवसेनेला बासनात गुंडाळून ठेवावं लागताहेत. शिवसेनेची ही राजकीय अगतिकता एक संधी असल्याचं जाणवल्यानं राज यांनी शिवसेनेचेच ध्येय धोरण स्वीकारून आवेशानं पुढं सरसावलेत! राज्याच्या राजकारणात निर्माण झालेली ही पोकळी भरून काढण्यासाठी मनसे सज्ज झालीय. पूर्वी शिवसेनेलाही मराठीच्या मुद्द्याला हिंदुत्वाचा मुलामा चढवला तेव्हाच त्यांना यशाचा गड सर करता आला होता. अगदी त्याच पावलावर पाऊल ठेवण्यासाठी मनसेची त्यामागे व्यूहरचना दिसतेय. बाळासाहेबांचा वारसा मानली जाणारी शिवसेना त्यांच्याच विचारापासून कशी दूर गेलीय, हे सांगतानाच मनसे हीच खरी त्यांच्या विचारांची वारसदार आहे, हे राज ठाकरे यांना अधोरेखित करायचंय. शिवसैनिकांवर ठसवायचंय. त्यासाठी राजनं शिवसेनाप्रमुखांची जशी शैली अंगिकारली तसंच त्यांची शालही...! बाळासाहेबांनी शिवरायांचा विचार डोळ्यासमोर ठेवून शिवसेना उभी केली, अगदी त्याप्रमाणेच शिवछत्रपतींना अभिप्रेत हिंदुत्व हीच राज ठाकरे यांची संकल्पना दिसत होती. सर्व जातीधर्माच्या शिलेदारांना सोबत घेऊन 'हिंदवी स्वराज्या'ची भगवी पताका फडकावण्याचा त्यांचा इरादा होता. सत्ता टिकवण्याच्या प्रयत्नात शिवसेनेला आपल्या हिंदुत्वाच्या मूळ मुद्द्यालाच बगल द्यावी लागतेय. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा त्यासाठी त्यांच्यावर सतत दबाव आहे. त्यातून हिंदुत्वाचं आक्रमकपणे प्रतिनिधित्व करणारी संघटना ही स्वत:ची ओळखच शिवसेना गमावून बसेल, हे राज ठाकरे यांनी ओळखलंय. पण केवळ हिंदुत्व पक्षाला नवी उभारी देऊ शकेल का? हा खरा प्रश्न आहे! मनसेला हिंदुत्वाची कास धरल्यानं आपसूकच भाजपच्या समर्थनाची भूमिका घ्यावी लागलीय. यातून भाजप आणि मनसे नैसर्गिकरीत्या जवळ येतीलही. मनसेला नसली तरी भाजपला महाराष्ट्रात मित्रपक्षाची गरज आहे. भाजपची 'हिंदुत्व विचारसरणी' असली तरी त्यात आक्रमकपणा नाही. आतापर्यंत शिवसेनेला पुढं करत त्यांनी आपला आक्रमक हिंदुत्वाचा अजेंडा राबवलाय. मनसे कदाचित आता त्यांची ती अपेक्षा पूर्ण करू शकेल, असं त्यांना वाटतं. हिंदुत्व अंगिकारल्यानं मनसेला जवळ घेण्याचा भाजपचा निश्चितच प्रयत्न राहील. राज एक फायरब्रॅण्ड नेते आहेत. तरुणाईत 'हिंदुत्वा'चं स्फुलिंग फुलवणाऱ्या नेत्याची भाजपला गरज आहे. विरोधकांना त्याच भाषेत उत्तर देणारी आक्रमक संघटना भाजपला मित्र म्हणून हवीय. त्यामुळं भाजप मनसेसाठी पायघड्या टाकतेय. राज यांना भाजपसोबतची आपली भूमिका ठरवताना मात्र तारेवरची कसरत करावी लागणार आहे. गेली काही वर्षे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या धोरणांना 'लाव रे तो व्हिडीओ'नं टोकाचा विरोध केलाय, त्यावर लोकांचं समाधान करण्याचं मोठं आव्हान त्यांच्यासमोर असणारंय. राज या सर्वातून कसा सुवर्णमध्य काढतात हे पाहणे उत्सुकतेचं ठरणार आहे! मराठी साधू-संतांनी सामाजिक क्रांतीनं जनतेला जागृत केलं होतं. जन्ममूलक वर्णभेद, आचार, संप्रदाय, यज्ञयाग, कर्मकांडाच्या अनिष्ट प्रथांवर त्यांनी हल्ला केला होता. संतांचं आवाहन माणुसकीसाठी होतं. राज यांनी मनसेला अवश्‍य मोठं करावं, स्वतःही मोठं व्हावं; पण महाराष्ट्राला कुठंही छोटेपण आणू नये. नाहीतर 'मनसे गयी मन से' असंच लोक म्हणतील! मराठी मुलांना नोकऱ्या मिळाव्यात म्हणून निर्माण झालेली शिवसेना आणि तिच्या उदरातून जन्माला आलेली मनसे रोजगार, व्यवसाय, प्रशिक्षण याविषयी आज बोलत नाही, बोलतेय ती भोंग्यांबाबत, हनुमान चालीसा अन हिंदुत्वाबद्धल जसं पूर्वी ती विकासाची ब्ल्यूप्रिंट अन टोल नाक्याबाबत बोलत होती अगदी तसंच!
हरीश केंची,
९४२२३१०६०९

No comments:

Post a Comment

मोदींचं ठाकरे प्रेम.....?

"गोध्रा हत्याकांड, दंगलीनंतर मोदींची गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावरून उचलबांगडी करायचं वाजपेयी अडवाणी यांनी ठरवलं होतं. पण शिव...