Saturday 30 January 2021

पत्रलेखन एक स्वगतच....!

"पत्रलेखन ही एक कला आहे ज्यात आपण आपल्या मनाची भावना शब्दांद्वारे व्यक्त करतो. कधीकधी असे होते जेव्हा आपण व्यक्तीस आपल्या मनात उद्भवलेल्या विचारांचे आणि भावना व्यक्त करू शकत नाही, तर आम्ही त्या भावना आणि विचारांना पत्राने सहजपणे व्यक्त करू शकतो. शब्दांद्वारे शब्दांद्वारे व्यक्त केलेले भाव नेहमी आपल्यासोबत असतात. हृदयाशी जोडण्यासाठी, माहितीचे देवाणघेवाण करणे, समाजात जागरुकता पसरविणे आणि प्रत्येकापर्यंत पोहोचण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे. आपण जितके वारंवार आपल्याला हवे तितके अक्षरे वाचू आणि जितक्या वेळा शक्य तितके आनंद घेऊ. आजही, दूरसंचार क्रांतीमुळे मोबाईल डिव्हाइसेसमुळे तथापि, पत्रांचे महत्त्व कमी झाले नाही. आजही, घनिष्ठ संबंध जतन करण्यासाठी सरकारी आणि व्यवसायासाठी पत्र आवश्यक आहेत. म्हणूनच पत्र हे अभिव्यक्तीचे एक शक्तिशाली आणि सुलभ माध्यम आहे!"
------------------------------------------------–-––---------


*आ* ज संपर्कासाठी साधनं उपलब्ध झालीत. त्यामुळं पत्रलेखन रोडावलं आहे. कागद, पेन याचा संबंधच कमी होत चाललाय. डेस्कटॉप, लॅपटॉप आहेच शिवाय मोबाईलनं क्रांती केलीय. पूर्वी कमरेला तलवारीसारखं लटकवलेलं मोबाईल दिसत होते आतातर प्रत्येकाचा कानाला लागलेला दिसतोय. या अशा संपर्क साधनांनी पत्रलेखन करण्याची मजाच नाहीशी करून टाकलीय. नंबर फिरवताच समोरचा माणूस बोलू लागतो. इंटरनेटमुळं तर तो प्रत्यक्षात आपल्या मोबाईलमध्ये साक्षात उभा ठाकतो अन संवाद करू लागतो. कोरोनाच्या काळात तर झूम संवादानं कल्लोळ माजवला होता. या साऱ्याचा परिणाम नक्कीच जाणवतो. संगणक आणि त्यावरील माहितीचे मायाजाल-इंटरनेट यामुळं हे सारं सहजसाध्य झालं असलं तरी त्यात, संवादाची सहज सुलभ भावना यातलं माधुर्य, सौंदर्य याचा कुठेच थांगपत्ता नसतो. पत्रलेखनात ज्या भावना लिहिता येतात त्या बोलताना शक्य होऊ शकत नाहीत. कधी कधी लिहिल्यासारखं बोलणं नाटकी वाटू लागतं. यामुळं अपुरं, त्रोटक आणि मुद्द्यापुरतंच बोलणं हाच आता संपर्क झालाय. एका संस्कारक्षम वयात काही वाचन होणे अनिवार्य असते, त्याशिवाय जीवनातील विविध अर्थ आणि सामाजिक जाणिवांच्या लक्षवेधी संवेदना याची खरी अनुभूती येत नाही. अशा वाचनाचा अविभाज्य अंग म्हणजे कविता. मला अशा कविता वाचायला मिळाल्या आणि त्यातून मी घडत गेलो हे माझे भाग्य समजतो. त्यांनी लिहिलं आणि पिढ्या मागून पिढ्या त्यावर वाढत गेल्या घडत गेल्या... 

पत्र लिहिणं एक कला समजली जाते. साधं, सरळ, सोपं लिहिणं म्हणजे पत्र लिहिणं असं असतानाही या पत्रांचा समावेश कधी-कधी ललित लेखनात झालेला आढळतो. अनेक ख्यातनाम लेखकांनी, कवींनी असपल्या पत्रव्यवहाराची पुस्तकं प्रसिद्ध केली आहेत. अगदी आपल्या प्रेयसीला वा पत्नीलाही लिहिलेली पत्रं त्यांनी पुस्तकरूपानं वाचकांसमोर मांडली आहेत. ख्यातनाम कवी आ.रा.कुलकर्णी - आत्माराम रावजी कुलकर्णी म्हणजेच आपले आवडते कवी अनिल हे अशांपैकी एक कवी. ज्यांनी आपली पत्नी कुसुम हिला लिहिलेली पत्रं प्रसिद्ध केली आहेत. गजाननराव वाटवे यांनी आपल्या अमोघ चालीनं मनोहरी बनविलेल्या 'गगनी फुलला सायंतारा' हे भावगीत कवी अनिलांनी या पत्रांच्या पुस्तकांमध्येच लिहिलेलं आहे. कवी अनिल व त्यांच्या पत्नी कुसुम यांच्यातील 'कुसुमानिल' हे पत्रलेखनाचं पुस्तक प्रणयाचे सारे रंग फिक्कट गहिऱ्या छटांनी फुलून टाकला आहे. रसिकांना त्यांच्या या पत्रव्यवहारात सत्य आणि सुंदरता याचा अपूर्व मिलाफ असलेलं एक मनोज्ञ प्रणायचित्राचे दर्शन यात घडवलेलं आहे. मराठी साहित्यात "कुसुमानिल' हा कवी अनिल आणि कुसुमावती देशपांडे यांच्यातल्या पत्रांचा संग्रह प्रसिद्ध आहे. त्यांच्या लग्नाच्या आधीची पत्रे यात समाविष्ट आहेत आणि १९७२ ला तो प्रकाशित झाला होता. कवी अनिल आणि कुसुम जयवंत यांची पहिली दृष्टभेट २ जुलै १९२१ रोजी झाली आणि अनिल यांनी आपल्या प्रियेला लिहिलेल्या पहिल्या पत्राची तारीख होती- २ जुलै १९२२. आजच्या मोबाईल आणि चॅटिंगच्या जमान्यात प्रेमपत्रे किंवा चिठ्ठी याचे महत्व आजच्या पिढीला कळणार नाही. पण प्रेम भावना किती हळुवारपणे आणि नितळ शैलीत व्यक्त करता येतात याचे हे एक आदर्श उदाहरण आहे. कवी अनिल सुरुवातीस या पत्रसंग्रहाच्या प्रकाशनाच्या विरोधात होते. आपल्या प्रेमभावना सार्वजनिक व्हाव्यात हे त्यांना पटले नव्हते. प्रकाशक ह.वि. मोटे यांनी त्यांचे मन वळवले आणि मग ते राजी झाले. दुसरे एक लेखक माधव आचवल यांचाही 'पत्र' नावाचा कथासंग्रह प्रसिद्ध आहे. प्रेयसीचं पत्र धरावं कसं, न फोडताच आत काय असेल याचा अंदाज घ्यावा कसा, एवढंच नव्हे तर आपलं पत्र तिला मिळताच तिला काय आणि कसं झालं असेल? याचाही आचवलांनी प्रभावी आलेख त्यांच्या पत्रकथेत मांडलाय. आचवलांनी पत्रांनी घायाळ केलेल्या त्यांच्या प्रेयसीचं वर्णन 'आता पत्र पोहोचलं असेल, ते तू वाचत असशील. एकदा वाचून उशाखाली ठेवलेलं ते पत्र... रात्री अगदी एकटं असताना पुन्हा काढून.... त्यातल्या त्या शब्दाला छोट्या पक्ष्याच्या मुठीत धरून हळूच गोंजारावं तसं गोंजारत असशील. या कल्पनेनं सुखावावं... उत्तर लिहायला बसलेली तू उघड्या डोळ्यांसमोर दिसाविस. तुला अशी पाहताना डोळ्यांना दुसरं काहीही दिसू नये. झिलमिळयांची शेड असलेल्या त्या जापानी मेझदीपकाजवळ मांडीवर माझं पत्र घेऊन लिहीत बसलेली तू.....' काही झालं तरी ती प्रेमपत्रं आहेत. आचवल या पत्रांबद्धल म्हणतात, ' जे वेडेपणानं आटोकाट भरलेलं नाही ते प्रेमपत्रच नाही. जे वाचताना ओलं व्हायला, वितळायला, वाहून जायला होत नाही ते प्रेमपत्रच नाही. जे शांत करतानाही पेटवत नाही, ते प्रेमपत्र नाही!'

काही वर्षापूर्वी महाराष्ट्र टाईम्समध्ये गोविंदराव तळवळकरांचा एक छानसा लेख प्रसिद्ध झाला होता. अर्थात, तो पत्रांच्या संदर्भातलाच होता. 'दोघे एकाकी दोघे एकत्र' आपल्याला जे मिळत नाही अथवा सहज कळत नाही असं म्हटलं तरी चालेल, अस इंग्रजीत खूप काही साहित्य तळवलकर सहज सुंदर मराठी भाषेत आपल्यापुढं ठेवतात. खूप वेगळं, खूप ठसठशीत आणि रसरशीत लिहिण्याची त्यांची हातोटी हे त्यांचं वेगळेपण. पंडित जवाहरलाल नेहरु आणि इंदिरा गांधी या पिता-पुत्रीतील झालेल्या पत्रव्यवहाराचं 'टू अलोन टू टुगेदर' नावाचं एक पुस्तक सोनिया गांधींनी संपादित केलंय. तळवळकरांनी या पुस्तकाचं परीक्षण करताना इतक्या सोप्या आणि सुंदर भाषेत केलं आहे की, आपल्याला मूळ इंग्रजी वाचण्याची ओढ लागावी, अशी त्याची ओळख करून दिली आहे. १९४१ साली इंदिराजींनी कारावासात असलेल्या जवाहरलालजींना पाठवलेल्या पत्रातील एका फ्रेंच वचनानं या लेखाची सुरुवात होती. ते वचन असं आहे, ' प्रत्येक सरणाऱ्या दिवसाबरोबर मी तुमच्यावर अधिक प्रेम करते. कालच्यापेक्षा आज अधिक, पण उद्यापेक्षा कमी.' ते फ्रेंच वचन प्रेमाचा अर्थ आणि दुरावाही स्पष्ट करतं. साने गुरुजींची अशीच खूपशी पत्रं 'सुंदर पत्रे' या नावानं प्रसिद्ध झाली आहेत. आज ती पुस्तकं वाचतंय कोण? त्याची साधना Kव करतंय? हे तेच जाणो.

नानासाहेब गोरे त्यांच्या शुभला लिहिलेली पत्रं अशीच प्रसिद्ध झाली आहेत. त्या दोघांमधला भावगंध आणि वातावरणाचं अलौकिक वर्णन नानासाहेबांनी या पत्रातून घडवलेलं आहे. ते पत्र शुभाला लिहिलेलं आहे की, वाचकांना हे काही काळ समजतच नाही आणि आपण त्या पत्रांमध्ये विलीन होतो. पत्रातल्या मजकुराबरोबर वाहून जातो आणि पत्र संपताच आपण भानावर येतो. तेव्हा लक्षांत येतं की, नानासाहेबांनी हे पत्र शुभाला लिहिलेलं होतं. इंदिरा गांधी स्वित्झर्लंडमधल्या आरोग्यधामात बिछान्यावर पडून असायच्या त्यावेळच्या एक पत्रांत त्यांनी जवाहरलालजींना लिहिलंय, 'तुमचे पत्र म्हणजे आशेचा संदेश. आजूबाजूच्या अंधारात यामुळे आश्वासन मिळते आणि काहीतरी घडवून आणण्याची उमेद वाटते.' इंदिराजींनी आपल्या आजारपणातही वडिलांशी करलेला हा सुसंवाद मनाला चटका लावून जातो. राजकीय जीवनात जवाहरलालजी, इंदिराजी हे या देशाचे पंतप्रधान झाले. पण त्यांच्यातला सुसंवाद हा सोनिया गांधींनी आपल्यासमोर मांडला आणि इंदिराजींच्या लेखनशैलीचा आणि पंडितजींच्या लेखनशैलीचा अनुभव वाचकाला दिला. मनोहर सप्रे नावाच्या व्यंगचित्रकाराने असंच 'सांजी' नावाने आपली पत्रे प्रसिध्द केली आहेत. त्यात त्यांनी म्हटलंय, माझं पत्रलिखाण हा केवळ एकतर्फी संवाद आहे. त्या अर्थानं सारी पत्रं ही निमित्तमात्र मायन्यात रूपांतरित ।झालेली स्वगत आहेत. केवळ व्यक्तिगत भावनांच्या आंदोलनाची अभिव्यक्ती असल्याने त्यातून वस्तुनिष्ठ निष्कर्षाचा दावा करणं खुलेपणाचं आहे. खरंच पत्रलिखाण हा एकतर्फी संवाद असला तरी तो किती रंजक असू शकतो, हे 'कुसुमानिल' वरून आपल्याला समजू शकते, आणि प्रेयसीला, पत्नीला पत्रं कशी लिहावीत याचं मार्गदर्शनही लाभेल. तेव्हा लिहिताय ना पत्रं....?
हरीश केंची,
९४२२३१०६०९


No comments:

Post a Comment

लोकशाही की एकाधिकारशाही...!

"देशात लोकशाहीचा उत्सव सुरू आहे, पण सत्ताधारी  लोकशाही संसदीय ऐवजी अध्यक्षीय असल्यासारखे वागताहेत. सामूहिक नेतृत्व सांगणारा...