Friday 25 October 2019

निवडणूक निकालाचा अन्वयार्थ!

"विधानसभा निकालानं सर्वच राजकीय पक्षांना धडा दिलाय. सत्ताधाऱ्यांना त्यांनी 'आम्हाला गृहीत धरू नका' असं बजावलंय. मतदारांनी मतदानाचा संदेश प्रामुख्यानं नरेंद्र मोदी-अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस-चंद्रकांत पाटील यांना दिलाय! या चौघांची वक्तव्य, त्यांची भाषा, त्यांची अरेरावी, त्यांचा उद्धटपणा, त्यांचा आपण काहीही करू शकतो हा अविर्भाव, विरोधी पक्ष पुरते नामोहरम झाले आहेत अशी गुर्मी, हे सर्व अवगुण या निवडणूक निकालानं स्पष्ट दाखवली आहेत. भाजपेयींनी साम-दाम-दंड-भेद ही रणनीती कधी नव्हे इतकी वापरली होती. आता भाजप-सेना युतीला पूर्ण बहुमत मिळालं आहे, भाजपच्या जवळपास २५ आणि सेनेच्या ५-७ जागा कमी झाल्या असल्या तरी, सत्ता होती आलीय. याचा अर्थ युतीनंच पण सबुरीनं सरकार चालवावं असं मतदारांना वाटतंय. मरणासक्त अवस्थेतील काँग्रेसला तर निकालानं संजीवनी मिळालीय. सोनिया, राहुल वा इतर नेत्यांनी जोर लावला असता तर चित्र वेगळं असलं असतं. राष्ट्रवादी 'सबकुछ शरद पवार' हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं! या निकालानं शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर वाढवलीय. सर्वच राजकीय पक्षांची ध्येयधोरणं ही मतदार केंद्रित न राहता सत्ता केंद्रित झाल्यानं मूल्याधिष्ठित राजकारणाची इतिश्री झालीय!
--------------------------------------------------

*पु* राणात अमृतमंथन नावाचा एक शब्द आलाय. त्या सागराच्या मंथनात देव दानवांनी समुद्र घुसळून काढला आणि त्यातून अमृतकुंभ हाती लागला, अशी ती कथा आहे. पण त्या घुसळणीतून फक्त अमृतच हाती लागलेलं नव्हतं. त्यातून हलाहल नावाचं अतिशय दाहक विषही समोर आलेलं होतं. त्याचं काय करायचं, असा गंभीर प्रश्न उभा ठाकला आणि ते भोलानाथ शंकरानं एकट्यानं पिऊन पचवलं, असंही कथेत म्हटलेलं आहे. म्हणून तर अमृतापेक्षाही ‘हलाहल पचवणं’ हा शब्दप्रयोग अधिक वापरात आला. घुसळण्यातून प्रत्येकवेळी अमृतच, किंवा आपल्याला हवं तेच हाती लागतं असं नाही. पण जे हाती लागेल ते पचवून पुढे जाता आलं पाहिजे, हा त्यातला आशय आहे. पण ती घुसळण चालूच असते, तेव्हा हलाहल सुद्धा हाती लागण्याची शक्यताही अनेकांच्या पचनी पडत नाही. मग हलाहल समोर आलं, तर अशा लोकांची अवस्था काय होईल? त्या कथेतला आशय म्हणून महत्वाचा आहे. अमृताची अपेक्षा जरूर करावी, पण त्यावरच विसंबून भविष्याकडे बघू नये. हलाहल पचवण्याची तयारीही ठेवण्यात शहाणपणा असतो. मात्र भावनाविवश लोकांना त्याचे भान रहात नाही. ते फक्त अमृताखेरीज काहीच हाती लागणार नाही; अशा आशेवर जगतात. किंवा हलाहलाची कल्पनाही सहन करू शकत नाहीत. परिणामी त्यांच्या पदरी निराशा किंवा वैफ़ल्य आल्यास नवल नसतं. लोकशाहीच्या युगात आणि निवडणुकीच्या मंथनात आपल्या हाती सर्वोत्तम काही असेल तेच लागेल; अशी प्रत्येकानं अपेक्षा जरूर बाळगली पाहिजे. पण प्रत्येकाचं सर्वोत्तम वेगवेगळे असतं आणि म्हणूनच सर्वांनाच मंजूर होईल असं सर्वोत्तम वा अमृत हाती लागण्याची शक्यता जवळपास नसते. एकाची अपेक्षा पुर्ण होते आणि इतराना हलाहल पचवण्याची वेळ येते.

*भाजपेयींनी स्वतःच्याच तत्वांची पायमल्ली केलीय*
भाजपचं आजचं राजकारण कुणाला आवडो न आवडो अतिशय थेट आणि स्पष्ट आहे. त्यांना विरोधक संपवायचे आहेत. आणि राजकारणात अशी इच्छा बाळगणं गैर नाही. कुणी त्याला लोकशाहीला ते मारक आहे म्हणत असेल, तर ते चूक नाही, पण विरोधक असले पाहिजेत अशी तर कुणाचीच इच्छा नसते. फार मोठ्या प्रवासानंतर भाजपनं आजचा टप्पा गाठलाय आणि विरोधकांना सळो की पळो करून सोडलंय. याच त्यांच्या विरोधकांनी इतिहासात वेळोवेळी भाजपला पाठिंबा दिलेला आहे. कम्युनिस्ट, आप सोडले तर देशातल्या सर्वच पक्षांनी भाजपला जमेल तेव्हा जमेल तशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष साथ दिलेली आहे. हे त्यांचं बेरजेचं राजकारण होतं आणि त्या राजकारणाचा फायदा घेत भाजप स्वतःला मजबूत करत गेलेला पक्ष आहे. आज मजबुती आल्यावर भाजपनं बेधडक वजाबाकी सुरू केलीय. ज्यांनी त्यांना साथ दिली त्यांचीच आज त्यांनी दशा केलेली आहे. आणि स्वतःला महान, मुरब्बी राजकारणी समजणारांना पळापळ करायला भाग पाडलंय. एक तर तुमचं अस्तित्व आमच्यात विरघळून टाका, आमच्यात या, नाही तर स्वतंत्र अस्तित्व ठेवणार असाल तर तुम्हाला आम्ही गोत्यात आणतो, असं भाजपचं थेट राजकारण आहे. हे देशात नवं राजकारण आहे आणि बेरजेची राजकारणं करणाऱ्या, स्वतःला मुरब्बी समजणारांच्या ते सरावाचं नाही. भविष्यात काय घडणार आहे याचा अंदाज भूतकाळात त्यांना आला नव्हता, याचं हे निदर्शक आहे. आज देशभरच्या भाजपच्या साथीला उभं राहणाऱ्या पक्षांची ससेहोलपट होताना दिसतेय. त्याचं वाईट वाटायचं कारण नाही. कारण, तत्वनिष्ठता हा राजकारणाचा गाभा आहे. आपल्या देशात गांधीवाद, आंबेडकरवाद, धर्मवाद, समाजवाद, साम्यवाद, जातवाद ही राजकारणाची तत्त्वं आहेत. यात बेरजेचं राजकारण करायचं ठरलं की तत्वांना तिलांजली द्यावी लागते आणि तत्वांना तिलांजली दिली की, राजकारण कधी न कधी गोत्यात येतं, हा इतिहास आहे. भाजप हा धर्मवादी तत्वाचा पक्ष आहे आणि त्यावर तो कायम ठाम आहे. त्याच्या यशात ते तत्व मोठं वाटेकरी आहे. काँग्रेससह बाकीच्या सर्व पक्षांच्या तत्वांची अवस्था काय आहे? तर स्वतःच्या अस्तित्वासाठी आणि बेरजेच्या धंदेवाईक राजकारणासाठी त्यांनी वेळ येईल तेव्हा आपली तत्त्वं गुंडाळून ठेवून असंगाशी संग करायलाही कमी केलं नाही. तात्कालिक स्वार्थलोलुप राजकारणासाठी ज्याही पक्षांनी स्वतःची तत्त्वं मोडून खाल्ली त्यांची अवस्था आज दयनीय आहे आणि आजच्या राजकारणात त्यांना एक तर लाचारीनं भाजपच्या वळचणीला जावं लागतंय, नाही तर स्वतःच्या अस्तित्वासाठी बेसुमार झगडावं लागतंय. ही स्वतःच्या तत्वांशी केलेल्या पायमल्लीची त्यांना मिळणारी शिक्षा आहे. असं आजचं राजकीय वातावरण आहे.

*मतदारांचा इशारा: आम्हाला गृहीत धरू नका*
आता आपण सद्यस्थितीकडं पाहू या. हरियाणा आणि महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका याशिवाय इतर राज्यातील ५१ विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाला अपेक्षेप्रमाणे यश आलं नाही. केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा या जोडीला प्रसिद्धीमाध्यम अजेय म्हणून समजत असली तरी, राज्याच्या विधानसभा निवडणुकीत भाजप अजेय नाही हे यापूर्वी राजस्थान मध्यप्रदेश आणि छत्तीसगडच्या आणि आता हरियाणाच्या निवडणुकीत हे सिद्ध झालं आहे.नुकतंच महाराष्ट्र आणि विधानसभेच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झालाय. या निवडणुकीत एक्झिट पोल आणि राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केलेली मतं आणि अंदाज धुळीला मिळाले. महाराष्ट्रातल्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना यांना अपेक्षेप्रमाणे यश मिळालेलं नाही. शिवाय काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं शिवसेनेच्या बरोबरीने जागा पटकावलेल्या आहेत. भाजपेयींनी आणि शिवसेनेनं खूप मेहनत घेतल्याचे दिसलं; पण हाती फारसं लागलं नाही. मात्र शरद पवार यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यावतीनं एकाकी किल्ला लढविला, त्यामुळेच त्यांना हाती सत्ता आली नसली, तरी प्रबळ विरोधी पक्ष म्हणून काम करता येऊ शकणार आहे हे दिसून आलं. तर हरियाणामध्ये भारतीय जनता पक्षाला अपयश आलं असून तिथं त्रिशंकू अवस्था निर्माण झालीय. भाजपेयींचं हे नुकसान का झालं याचं कारण, कमी झालेलं मतदान असा निष्कर्ष काढला जाऊ शकतो पण एक मतदान कमी का झालं याचाही शोध घेतला गेला पाहिजे मात्र या निकालानं भाजपेयींची चिंता आणखीन वाढली आहे. मतदारांनी त्यांना इशारा दिलाय की, आम्हाला गृहीत धरू नका!

भाजपेयींची महाराष्ट्रातली परिस्थिती फारशी समाधानकारक नाही. सेने-भाजप सत्तेत पुन्हा येऊ शकतात परंतु आजची ही स्थिती काही फारशी सकारात्मक दिसत नाही. देवेंद्र फडणवीस यांची राज्यावर पकड मजबूत राहील असे दिसत नाही. शिवसेनेसाठी तर ही 'बार्गेनिंग पॉवर' वाढणारी आहे २०१४ च्या निवडणुकीनंतर भाजपेयींनी ज्या पद्धतीनं शिवसेनेची अवहेलना केली आणि अपमानास्पद वागणूक दिली; त्याचा वचपा काढण्याची संधी आता शिवसेनेला मिळालेली आहे. त्यामुळे 'आमचाच मुख्यमंत्री होईल!' हे म्हणणं ते पुढे रेटताहेत. ते शक्य झालं नाही, तर मालदार खात्यांसह उपमुख्यमंत्रीपदही स्वीकारतील. अशी चिन्हं आहेत. यामुळेच निवडणुकीचे निकाल लागताच उद्धव ठाकरे यांनी आता भाजपेयींच्या अडचणी आपण समजून घेऊ शकत नाही, एवढेच नाही तर सत्तेतला वाटा निम्मा निम्मा हवाय अशी मागणीही केल्याचं आपण पाहिलं. निवडणुकीपूर्वी शिवसेनेला अगदी शेवटच्या क्षणापर्यंत जागावाटपाबाबत झगडावं लागलं होतं आणि २०१४ च्या निवडणुकीत १५१ पेक्षा कमी घेणार नाही, असं बजावणाऱ्या शिवसेनेला भाजपेयींनी सोडून दिलं होतं. परंतु आज शिवसेनेनं केवळ १२४ जागा स्वीकारल्याचं आपल्याला दिसून आलं. लोकसभेच्या निवडणुकीनंतर भाजपनं आपली पकड मजबूत केलीय असं दिसून आल्यानं शिवसेनेनं कमी जागा स्वीकारल्या. पण आता त्यांची सरकारच्या 'ड्रायव्हिंग सीट'वर बसण्याची परिस्थिती निर्माण झालीय.

*लोकसभेच्या तुलनेत भाजपची २२ टक्के मतं घटलीत*
तसं पाहिलं तर नरेंद्र मोदी यांच्या उदयानंतर देशातली राजकीय समीकरणं बदलली गेली. स्थानिक स्तरावरचे प्रश्न नगण्य बनले. परंतु या विधानसभा निवडणुका आणि १८ राज्यातल्या ५१ विधानसभेच्या पोटनिवडणुकांच्या निकालानंतर, लोकांना राष्ट्रीय प्रश्नांपेक्षा स्थानिक मुद्द्यांचा महत्व वाढलेलं दिसून आलं. मोदी-शहासह सर्व भाजपनेत्यांनी प्रचारात ३७० कलम आणि पाकिस्तानचा विरोध हाच मुद्दा प्रचारात आणला होता. परंतु लोकांनी तो नाकारला, त्याजागी बेरोजगारी, महागाई यासारख्या मुद्यांवर आता विशेष लक्ष द्यावं लागणार आहे. दुसरी गोष्ट अशी की आपल्या अस्तित्वासाठी झगडणाऱ्या काँग्रेसला हाती लागलेले निकाल हे जीवनदान देणारे आहेत. काँग्रेसमधील अंतर्गत वितंडवाद, नेतृत्वानं प्रचार करण्यात दाखवलेला अनुत्साह, यानंतरही मतदारांनी काँग्रेसला साथ दिली आहे, म्हणजेच मतदारांनी काँग्रेसला नाकारलेलं नाही! लोकसभेच्या निवडणुकीबरोबर त्याची तुलना केली तर असं दिसून येईल की, त्यांच्या मतांत जवळपास २२ टक्क्यांचा फरक पडलाय. लोकसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी काँग्रेसला साथ दिली होती, तर लोकसभा निवडणुकीत भाजपला पसंती दिली आणि आता पुन्हा या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी आपलं मत बदललेलं दिसून येतं. दुसऱ्या बाजूला मेगाभरती केलेल्या नेत्यांचा पराभव झालेला आहे. पक्षबदल करणार्‍या तथाकथित नेत्यांना लोकांनी नाकारलेले आहे.

*जनमानसातील अंतःप्रवाह ओळखण्यात कमी पडले.*
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूक निकालाबाबत झालेल्या निवडणूक सर्व्हे आणि मतदानोत्तर चाचण्यांनी असा अंदाज वर्तवला होता की, भाजप-शिवसेना युतीच्या जागा दोनशे पार असतील आणि कदाचित एकट्या भाजपलाही स्पष्ट बहुमताइतक्या जागा मिळतील. प्रत्यक्षात युतीला दीडशेच्या पार जाता आले आहे आणि भाजपला मिळालेल्या जागा शंभराच्या जवळपास आहेत. याचाही अर्थ, आपली माध्यमं आणि विश्लेषक जनमानसातील अंतःप्रवाह ओळखण्यात कमी पडलेत. लागलेले निकाल हे लोकशाहीच्या दृष्टीने स्वागतार्ह आहेत, कारण ‘आम्हाला गृहीत धरू नका’ हा जनतेचा संदेश यातून मिळतो आहे. युती आणि आघाडी यांच्यातील पाडापाडीच्या राजकारणामुळं त्याचबरोबर मधल्या काळात झालेल्या पक्षांतरामुळं आमचं गणित जुळलं नाही, असे युक्तिवाद, अंदाज वा भाकितं वर्तविणाऱ्यांकडून केले जातील. त्यामध्ये तथ्यही असेल. मतदारांनी मतदानाचा संदेश प्रामुख्यानं नरेंद्र मोदी-अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस-चंद्रकांत पाटील यांना दिलाय! या चौघांची वक्तव्य, त्यांची भाषा, त्यांची अरेरावी, त्यांचा उद्धटपणा, त्यांचा आपण काहीही करू शकतो हा अविर्भाव, विरोधी पक्ष पुरते नामोहरम झाले आहेत अशी गुर्मी, हे सर्व अवगुण या निवडणूक निकालानं स्पष्ट दाखवली आहेत. भाजपेयींनी सर्व प्रकारची ताकद पणाला लावली होती, साम-दाम-दंड-भेद ही रणनीती त्यांनी कधी नव्हे इतकी वापरली होती. आता भाजप-सेना युतीला पूर्ण बहुमत मिळालं आहे, भाजपच्या जवळपास २५ आणि सेनेच्या ५-७ जागा कमी झाल्या असल्या तरी, सत्ता होती आलीय. याचा अर्थ युतीनंच पण सबुरीनं सरकार चालवावं असं मतदारांना वाटतंय. शिवाय गरज नसताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील गावोगावचे सुभेदार भाजपनं स्वतःकडे का वळवले असा सवालही जनतेनं विचारलाय. या बरोबरच काँग्रेसला गेल्या निवडणुकीत मिळाल्या इतक्याच आणि राष्ट्रवादीला पाच-सात जागा जास्त मिळाल्या आहेत. याचा अर्थ काँग्रेस आणि राष्ट्रवादीवरील जनतेचा रोष पाच वर्षांनंतरही कमी झालेला नाही. म्हणजेच आधीच्या पंधरा वर्षात तुम्ही जे काही केलंय ते आम्ही विसरलेलो नाही, असं मतदारांना वाटतंय. शिवाय, मागील पाच वर्षात विरोधी पक्ष म्हणून तुम्ही नीट काम का केले नाही, पक्षबांधणी का केली नाही, असा सवालही जनतेनं विचारलाय. याचा विचार सर्वच पक्षांनी करायला हवाय.
या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीनं राष्ट्रवादीचे तब्बल २३ उमेदवार पाडले असल्याचं दिसून येतंय. राष्ट्रवादीच्या ४२ पैकी २५ आमदार पक्ष सोडून गेले; राहीले फक्त १७ आणि त्या १७ चे ५६ झाले आहेत. दुसरं महत्वाचं की, भाजपच्या १०५ मधले फक्त ३१ आमदार मुळ भाजपेयीं आहेत, बाक़ीचे ७४ हे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या तालमीतले आहेत. मूल्याधिष्ठित राजकारणाच्या गप्पा मारणाऱ्या भाजपची ही अवस्था फारशी चांगली राहिलेली नाही. निदान आगामी काळात तरी पक्षाच्या कार्यकर्त्यांना मानाची पदं मिळतील हे नेतृत्वानं पाहावं, एवढीच अपेक्षा!

चौकट....
*व्यथा भाजपेयीं कार्यकर्त्यांची.....'दगा बाज रे!'*
रा. स्व. संघाच्या शाखेत अनेक वर्षे गेलेल्या कार्यकर्त्यांनी आपलं मन सोशल मीडियावर व्यक्त केलंय. त्यांच्या मते, "संघात तिथं नितीमत्ता, प्रामाणिकपणा, सचोटी याचे जे धडे गिरवले ते आजही कामी येताहेत. आयुष्यभराचा संस्कार मिळालाय पण आजचा संघ आणि संघाचाच राजकीय विभाग असलेला भाजप जेव्हा नितीमत्ता गुंडाळून ठेवतो तेव्हा खूप त्रास होतो. मी शिवसेनेचा समर्थक नसलो तरी युतीचा मतदार म्हणून भाजपच्या पाडापाडीच्या घाणेरड्या राजकारणाची मला या निवडणुकीत किळस आली. सर्व पातळ्यांवर शिवसेनेला फसवलं होतंच ना भाजपनं? मग पुन्हा शिवसेनेला सोडलेल्या ४२ जागांवर बंडखोर उमेदवार उभे करण्याची गरज काय होती? शिवाय प्रत्येक शिवसेनाविरोधी बंडखोराला आर्थिक रसद पुरवण्याचा विश्वासघात कशासाठी? भाजपच्या पहिल्या फळीत नसलो तरी दुसऱ्या फळीत मी गेली अनेक वर्षे वावरतोय. शिवसेना ८० जागांचा आकडा ओलांडणार असा सीआयडीचा अंतर्गत रिपोर्ट आला म्हणून भाजपनं इतकं घाबरून जायचं काय कारण होतं? आपल्या जागा वाढवण्याचे प्रयत्न करण्याऐवजी शिवसेनेच्या जागा कमी करण्यात आपण अधिक शक्ती खर्च केली हे आपण नाकारू शकतो काय? बाहेर नाही पण बंद दाराआड तरी यावर चिंतन केलेच पाहिजे. सगळेच मित्रपक्ष भाजपला विश्वासघातकी का समजतात, तसा संदेश का जातोय, याचा विचार करण्याची खरंच गरज आहे. वाजपेयींच्या काळात हे असं वातावरण नव्हतं. हो, आपण शिवसेनेचा घात केलाच. आधी १४४ जागा देऊ असा शब्द दिला. मग 'अडचण' सांगून शिवसेनेला १२४ जागांवर रोखले. उद्धव ठाकरे होते म्हणून त्यांनी ऐकले. बाळासाहेबांनी हे ऐकलं असतं काय? राजकीय डावपेच म्हणून इथपर्यंत ठीक होतं. मग भाजपच्या रिपाइं, रासप, सदाभाऊ खोतांची शेतकरी संघटना या मित्रपक्षांना फसवून त्यांच्या हाती आपण कमळ चिन्ह दिलं. बरं हे करताना त्या मित्रपक्षांच्या नेत्यांना अंधारात ठेऊन थेट त्यांचे उमेदवार कमळासाठी मॅनेज केले. या बनवाबनवी आणि फसवणुकीकडं मतदारांनी निमूटपणे 'चाणक्यनिती' म्हणून दुर्लक्ष करावं अशी अपेक्षा कशी करता येईल? 'फसवणारा पक्ष' ही भाजपची प्रतिमा तयार होतेय ती अशा चुकांमुळे. बरं इतकं केल्यावर ४२ ठिकाणी शिवसेनेविरुद्ध भाजपनं बंडखोर उभे करावेत ही तर हद्दच झाली. शिवाय भाजप व संघानंही युतीचा धर्म गुंडाळून बंडखोरांच्या पाठीशी ताकद उभी करावी हे न पटणारं होतं. भाजपचा प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून यावर बोललेच पाहिजे असं मला वाटते. शिवसेना भाजपच्या बहुतांश मतदारसंघात भाजप उमेदवारांच्या विजयासाठी जीवाचे रान करत होती. हरीभाऊ बागडे, अतुल सावे, चंद्रकांत पाटील आणि इतरही आपले अनेक उमेदवार शिवसेनेकडून मिळालेल्या सहकार्याबद्दल नक्कीच सांगतील. शिवसेना भाजपच्या मतदारसंघात खांद्याला खांदा लावून लढत असताना भाजपचे पदाधिकारी मात्र शिवसेनेचे उमेदवार कसे पाडता येतील याची व्यूहरचना करत राहिले. त्याचा मोठा फटका शिवसेनेला बसला हे खरेच. पण आपली ही बदमाशी इतक्या उघडपणे दिसू लागली की त्यातून भाजपसाठी बुथ पातळीवर काम करणाऱ्या शिवसैनिकांची नाराजी काही ठिकाणी भाजपच्याही उमेदवारांनी ओढवून घेतली. त्याचा झटका आपल्यालाही बसलाच. त्याचा परिणाम समोर आहे. आपलं ताट भरलेलं असताना दुसऱ्याच्या ताटातलं काढून घ्यायची गलिच्छ वृत्ती आपण का बाळगावी तेच मला कळत नाही. मित्रपक्ष म्हणायचं आणि मित्राच्या ताटात माती कालवायची ही विकृत मानसिकता का जोपासली जातेय? उलट शरद पवारांसारखा शत्रू समोरून चाल करून येत असताना शिवसेनेसारख्या आक्रमक संघटनेला सोबत घेऊन एकत्रित प्रतिहल्ला चढवण्याची रणनिती बाळगली असती तर 'अबकी बार २२० पार' ही घोषणा नक्कीच यशस्वी ठरली असती. ते सोडून आपण भलतंच धोरण स्वीकारलं आणि मित्राचा गळा केसानं कापण्याच्या नादात आपल्याही पायावर कुऱ्हाड मारून घेतली. त्या फिल्मी गाण्याप्रमाणे होत चाललेली दगाssबाज रे..! ही आपली प्रतिमा आता तरी पुसू या, आणि शिवसेनेसह सर्वच मित्रपक्षांना सोबत घेऊन देश आणि महाराष्ट्र घडवण्यासाठी एकत्रितपणे काम करूया!" निष्ठावान भाजपेयीं कार्यकर्त्याचं हे मनोगत सोशल मीडियावर खूपच व्हायरल झालंय. यातून भाजपेयीं नेत्यांची मनोवृत्ती दिसून येते!

हरीश केंची
९४२२३१०६०९

No comments:

Post a Comment

लोकशाही की एकाधिकारशाही...!

"देशात लोकशाहीचा उत्सव सुरू आहे, पण सत्ताधारी  लोकशाही संसदीय ऐवजी अध्यक्षीय असल्यासारखे वागताहेत. सामूहिक नेतृत्व सांगणारा...