Sunday 6 October 2019

शिवसेनेचा भाव आणि प्रभाव

"महाराष्ट्रातील एकंदर पक्ष व्यवस्था कमालीची स्पर्धात्मक, कमालीची पोकळ आणि सर्वस्वी खिळखिळी बनली आहे. राज्यपातळीवरच्या राजकारणातल्या तथाकथित, औपचारिक आघाड्या स्थानिक पातळीवर पुरत्या उलट्या-पालट्या झालेल्या प्रत्येक मतदारसंघात आढळतील. सर्वच पक्षांच्या सामाजिक जनाधारांना धक्का बसून ते कमालीचे विस्कळीत झालेले आढळतील. अशा परिस्थितीत कोणत्याच पक्षाला, परंतु विशेषत: कमकुवत शिवसेनेला आपल्या अधांतरी, तळ्यात–मळ्यात अस्तित्वाचा झाला तर फायदाच होईल हे लक्षात यायला वेळ लागला नाही. म्हणून भाजपच्या साथीनं सत्तेत वाटा मिळवून एकीकडं सेनेनं आपल्या शिलेदारांना खुश केलं. अर्थात आत्ताही ते फारसे खुश नाहीतच तर दुसरीकडं आपल्याच विरोधात विरोधी पक्षाची भूमिका खुबीनं निभावून पक्षाचं राजकीय अस्तित्व अबाधित राखलं. याबाबतीत शिवसेनेनं भाजपचाच धडा गिरवून विरोधातून विरोधाचं राजकारण नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न केला असं म्हणता येईल. सेनेचं हे डावपेच किती यशस्वी होतात आणि तिच्या भूमिकेचं रूपांतर यशस्वी व्यावसायिक राजकारणात होतं का ते लवकरच कळेल."
-------------------------------------------------

*शि* वसेना-भाजप युतीच्या घोषणेनंतर बरेचजण शिवसेनेची खिल्ली उडवताहेत पण गेल्या पाच वर्षातील देशातली राजकीय उलथापालथ पाहाता त्यात शिवसेनेनं टिकवलेलं अस्तित्व आणि राजकीय महत्व या त्यांच्या जमेच्या बाजू म्हणायला हव्यात. त्यांच्या भूमिकांमधील 'यू टर्न'वर टीका होणं स्वाभाविक आहे, पण त्याचं राजकीय अंगानं विश्लेषण व्हायला हवं. मोदी लाटेत अनेक राजकीय पक्षांची धुळदाण उडाली. बलाढ्य अशा काँग्रेससह राष्ट्रवादीची वाताहत झाली. अशावेळी भाजपनं सेनेची साथ सोडून अश्वमेध दामटल्यावरही शिवसेनेनं तो रोखून धरला. न मागता राष्ट्रवादीनं भाजपला दिलेला पाठिंबा आणि शरद पवारांच्या अदृष्य हातांनी शिवसेनेचं प्रचंड राजकीय नुकसान केलं. पवारांनी एका झटक्यात सेनेचा बाजारभाव संपवून टाकला. भाजपनंही त्याचा फायदा उचलला. त्या वादळातही शिवसेना मात्र टिच्चून लढली. भाजपकडून शिवसेना फोडण्याचे प्रयत्न सुरु झाले, तेव्हा सत्तेत जाण्याचा शहाणपणा दाखवून भाजप आणि पवारांच्या रणनितीला शिवसेनेनं शह दिला. शिवसेना फुटली तर नाहीच उलट भाजपनं केलेल्या अपमानाचा सव्याज बदला शिवसेनेनं पाच वर्ष घेतला. शिवसेनेनं सरकारमध्ये राहून विरोधकांचं काम बजावलं. महाराष्ट्राला हे नवं होतं. त्यामुळे त्यांच्यावर टीका झाली. खिल्ली उडवली गेली. पण ही शिवसेनेची रणनिती होती. त्या रणनितीमुळेच विरोधक झाकोळून गेलेलं दिसलं. सरकारमध्ये राहून त्यांच्याशी सुरु असलेला सामना कायम चर्चेत राहिला. त्यामुळे वेगवेगळ्या मुद्यांवरून शिवसेना कायम चर्चेत राहिली. त्यांची सगळ्यांनाच दखल घ्यावी लागली. दिलेली सत्ता उपभोगत ते बसले असते तर तेही अस्तित्वहीन जानकर, सदाभाऊ खोत यांच्यासारखं झालं असतं. पण शिवसेनेचे चाणक्य संजय राऊत यांनी भाजपवर हल्ला चढवत त्यांना कायम घायाळ केलं. एकहाती किल्ला लढवला. अनेकवेळा राजकीय कोंडी केली. जे विरोधकांना जमलं नाही ते शिवसेना करत होती. राऊतांच्या सत्तेविरोधी लिखाणातून प्रसंगी ते अनेकांना  खलनायकही वाटायचे पण पक्षाच्या हिताची भूमिका घेताना आपल्या लोकप्रियतेची त्यांनी तमा बाळगली नाही.

*भाजपेयींना सत्तेसाठी मजबूर बनवलं*
बाळासाहेबांनंतर शिवसेनेचं शिवधनुष्य पेलणं हे खायचं काम नव्हतं. त्यात उद्धव ठाकरे मवाळ त्यामुळं शिवसेना संपणार हे अनेकांचं भाकीत शिवसेनेनं खोटं ठरवलं. बाळासाहेबांसारखा धाक, खणखणीत वक्तृत्व नसतानाही कधी संयमानं तर कधी आक्रमकपणे उद्धव ठाकरेंनी राजकीय वादळं झेलत शिवसेना पुढे नेलीय. लोकांशी जोडून ठेवलीय. हवेची दिशा बदलताच भाजपच्या दिल्लीश्वरांना मातोश्रीवर यावं लागलं. मानानं बरोबरीचं स्थान द्यावं लागलं, ही भाजपची मजबुरी बनली. राजकारणात शिवसेनेनं घेतलेला हा निर्णय आज अनेकांना लाचारी वाटत असला तरी तो त्यांच्यासाठी ‘व्यवहार्य’ आहे हे मात्र नक्की. त्यामुळंच ती सतत लोकांसमोर राहिली. गेली पांच वर्षे शिवसेनेनं भाजपच्या नावानं कितीही आदळ आपट केली असली तरी देखील लोकसभा आणि  विधानसभा निवडणुकींत  दोन्ही पक्षांची पुन्हा एकदा युती होणार याविषयी त्यांच्याच काय पण कुणाच्याच मनात फारशी शंका नव्हती. मात्र या नि:शंकतेमागे निव्वळ शिवसेनेची राजकीय अगतिकता काम करत होती असं म्हणता येणार नाही. शिवसेनेच्या आजवरच्या, आपल्याच सरकारच्या विरोधातल्या डरकाळ्यांनी आपल्या पोटात अनेक निरनिराळी राजकीय कथानकं घडवत होती असे म्हणता येईल.

*भांडणासाठीही विरोधीपक्ष राहिला नाही*
त्यातील एक मुख्य कथानक शिवसेनेच्या राजकीय हतबलतेचं अर्थातच होते. या हतबलतेचं मूळ शिवसेनेच्या आजवरच्या वैशिष्ट्यपूर्ण राजकारणात जसं सापडेल तसंच ते महाराष्ट्रातल्या समकालीन राजकारणाच्या संरचनेतही शोधता येईल. तिसरीकडं, शिवसेनेची राजकीय हतबलता केवळ महाराष्ट्रातल्या राजकारणाशी संबंधित नसून एका अर्थानं देशभरातल्या विशेषत: प्रादेशिक पक्षांना सध्या भेडसावणार्‍या अस्तित्वासंबंधीच्या पेचांशी देखील तिचं नातं जुळतं असं म्हणावं लागेल. पहिला मुद्दा शिवसेनेच्या वैशिष्ट्यपूर्ण राजकारणासंबंधीचा आहे. तिच्या स्थापनेपासूनचं सेनेचं राजकारण नेहमीच कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या शत्रुत्वसंबंधावर आधारलेलं राहिलं आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या कालखंडातलं गुजराती बनिये शोषक; साठ–सत्तरच्या दशकातलं दाक्षिणात्य स्थलांतरित; नामांतराच्या आंदोलनकाळातील दलित आणि भाजपाशी सोयरिकी दरम्यान जुळलेल्या हिंदुत्वाच्या नात्यातून मुस्लिम, असे निरनिराळे ‘शत्रु’ सेनेने स्वत:च्या राजकारणाच्या प्रारूपातून निर्माण केलं आणि वाढवलं. बाळासाहेब ठाकरे नंतर मनसेच्या उदयाच्या काळात शिवसेनेला पुन्हा एकदा मराठी विरुद्ध बिगरमराठी असं वैर रेटावं लागलं. तर दुसरीकडं भाजपाच्या साथीनं आपला विस्तार घडवित असतानाच हिंदुत्वाच्या ‘त्या’ राजकारणापेक्षा आपलं हिंदुत्वाचं राजकारण वेगळं कसं आहे याविषयीही सेना आग्रही राहिली. थोडक्यात, शत्रू बदलत गेले असले तरी शिवसेनेनं आजवर ‘शत्रुत्वसंबंधां’वर आधारलेल्या आपल्या राजकारणाचा ढाचा कायम ठेवला आहे आणि त्यासाठी सतत कोणत्या ना कोणत्या ‘इतरे’जनांची निर्मिती केली आहे. ‘आम्ही’ विरुद्ध ‘ते’ अशा विभागणीतूनच सेनेनं आपलं राजकारण आजवर पुढं रेटलं आहे. २०१४ नंतर, विशेषत: विधानसभेतील तथाकथित बाणेदार राजकारणानंतर शिवसेनेला जेव्हा भाजपशी पुन्हा एकदा जुळवून घ्यावं लागलं तेव्हापासून तिचा ‘शत्रुत्वसंबंधां’वर आधारलेल्या राजकारणाचा ढाचा अचानक चांगलाच डळमळीत झाला. भाजपच्या साथीनं सरकारातच सामील झाल्यानं मराठी माणसांच्या, हिंदूंच्या आणि सकल महाराष्ट्राच्या रक्षणाची एकंदरीतच घाऊक जबाबदारी सेनेच्या शिरावर येऊन पडली आणि भांडण्यासाठी समोर शत्रूच उरला नाही. त्याचवेळेस भाजपनं मोदींच्या नेतृत्वाखाली अखिल भारतीय स्तरावर आणि महाराष्ट्राच्या स्थानिक पातळीवर देखील विरोधाचं राजकारण नेस्तनाबूत करण्याचं एक नवीन प्रारूप विकसित केलं. या प्रारूपात प्रांतवाद, धर्मनिरपेक्षवाद, दारिद्र्यनिर्मूलन अशा सर्व तंट्यांचा झटपट राजकीय निकाल लागून आशावादी आणि आशाळभूत मध्यमवर्गीय राजकारण निर्माण झालं. मोदींच्या नेतृत्वाखालील या राजकारणात केवळ शिवसेनेलाच नव्हे तर इतर अन्य कोणत्याच पक्षाला राष्ट्रीय आणि प्रादेशिक पातळीवर विरोधाचे राजकारण करण्यास फारशी मुभा राहिली नाही.

*सेनेची राजकीय हतबलता दिसून आली*
मात्र विरोधाचं आणि म्हणून अपरिहार्यपणे आक्रस्ताळे राजकारण हे सेनेच्या राजकारणाचं एक व्यवच्छेदक, व्यवस्थात्मक लक्षण आहे ही बाबदेखील या संदर्भात ध्यानात घ्यायला हवी. महाराष्ट्राच्या पूर्वीच्या काळातल्या काँग्रेस वर्चस्वाच्या चौकटीत, हे राजकारण आकाराला आलं आणि त्याला अधिमान्यताही मिळाली. बाळासाहेब ठाकरेंच्या वैशिष्ट्यपूर्ण नेतृत्व शैलीतून त्याला बळ मिळालं. बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाचं आणखी एक वैशिष्टय होतं. ते म्हणजे लोकशाहीविरोध! लोकशाही राजकारणाच्या, संसदीय राजकारणाच्या चौकटीत वावरत असतानाच बाळासाहेबांनी कायम लोकशाहीच्या संकल्पनेला निरनिराळ्या पातळ्यांवर विरोध केला. आणि आपल्या अनुयायांच्या बिगर-लोकशाही राजकारणाला, लोकशाही चौकटीत मान्यता मिळवून दिली. ही मान्यता कायम ठेवल्याखेरीज शिवसेनेला एक राजकीय पक्ष म्हणून आपलं अस्तित्व कायम ठेवता येणार नाही ही बाब गेल्या दहा वर्षांच्या, बाळासाहेबानंतरच्या काळात अनेकदा स्पष्ट झाली आहे. शिवसेनेची सूत्रे उद्धव ठाकर्‍यांनी हाती घेतल्यानंतरच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी शिवसेनेला एक ‘नॉर्मल’, इतर राजकीय पक्षांसारखा एक सर्वसाधारण पक्ष म्हणून जनतेसमोर पेश करण्याचा प्रयत्न केला. परंतु ते शिवसैनिकांना रुचलं नाही.  इतकेच नव्हे तर त्यातून सेनेचं राजकीय पक्ष म्हणून असलेलं अस्तित्व धोक्यात आलं. त्या पार्श्वभूमीवर विरोधाचं, आक्रमक आणि लोकशाहीबाह्य लोकशाहीच्या कडा उसवणारे तिची परीक्षा पाहणारं राजकारण करणं ही शिवसेनेची एक व्यवस्थात्मक गरज बनली. गेल्या पाच वर्षांच्या काळात याच गरजेपायी शिवसेनेनं आपल्या राजकीय हतबलतेचं रूपांतर एका अर्थानं यशस्वी डावपेचांमध्ये केलं. भाजपबरोबर सरकारात सामील असतानाच, सरकारच्या कामकाजांची आणि धोरणांची सातत्याने खिल्ली उडवत शिवसेनेनं एकीकडं शत्रुभावी संबंधांचा एक नवीन आयाम स्वत:साठी तयार केला. तर दुसरीकडं इतर सर्वसाधारण राजकीय पक्षांपेक्षा आपले चारित्र्य वेगळं कस आहे याची खात्री शिवसैनिकांना आणि महाराष्ट्रातल्या जनतेलाही पटवून दिली. शिवसेनेच्या या डावपेचांना, समकालीन महाराष्ट्रातील पक्ष व्यवस्थेच्या स्वरूपाचाही ठळक संदर्भ आहे. महाराष्ट्रातल्या काँग्रेस व्यवस्थेच्या पडझडीनंतर इथं वरवर पाहता काँग्रेस–राष्ट्रवादी विरुद्ध भाजप–शिवसेना अशा आघाड्यांचं राजकारण निर्माण झालं खरं. परंतु या आघाड्या कधीच स्थिरस्थावर होऊ शकल्या नाहीत. त्या उलट प्रत्येक आघाडीतल्या घटक पक्षांमधे एकमेकांवर कुरघोडी करण्याविषयीची चढाओढ सुरू राहिली.

*विरोधातून विरोधाचं राजकारण*
त्याच वेळेस महाराष्ट्राचे एकंदर राजकारण वैचारिक दिवाळखोरीचं राजकारण बनून कोणत्याच पक्षाकडे विरोधाचा वा हिरीरीचा ठोस मुद्दा शिल्लक राहिला नाही. परिणामी महाराष्ट्रातील एकंदर पक्ष व्यवस्था कमालीची स्पर्धात्मक, कमालीची पोकळ आणि सर्वस्वी खिळखिळी बनली आहे. राज्यपातळीवरच्या राजकारणातल्या तथाकथित, औपचारिक आघाड्या स्थानिक पातळीवर पुरत्या उलट्या-पालट्या झालेल्या प्रत्येक मतदारसंघात आढळतील. सर्वच पक्षांच्या सामाजिक जनाधारांना धक्का बसून ते कमालीचे विस्कळीत झालेले आढळतील. अशा परिस्थितीत कोणत्याच पक्षाला, परंतु विशेषत: कमकुवत शिवसेनेला आपल्या अधांतरी, तळ्यात–मळ्यात अस्तित्वाचा झाला तर फायदाच होईल हे लक्षात यायला वेळ लागला नाही. म्हणून भाजपाच्या साथीने सत्तेत वाटा मिळवून एकीकडं सेनेनं आपल्या शिलेदारांना खुश केलं. अर्थात आत्ताही ते फारसे खुश नाहीतच तर दुसरीकडं आपल्याच विरोधात विरोधी पक्षाची भूमिका खुबीनं निभावून पक्षाचं राजकीय अस्तित्व अबाधित राखलं. याबाबतीत शिवसेनेनं भाजपचाच धडा गिरवून ‘विरोधातून विरोधाचे राजकारण’ नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न केला असं म्हणता येईल. सेनेचं हे डावपेच किती यशस्वी होतात आणि तिच्या भूमिकेचे रूपांतर यशस्वी व्यावसायिक राजकारणात होते का ते लवकरच कळेल.

चौकट
*सीमोल्लंघन... ठाकरेंचं!*
दसरा....हा शिवसैनिकांसाठी विचारांचं सोनं लुटण्याचा उत्सव! शिवसेनेची आगामी वाटचाल कशी राहील याचं मार्गदर्शन असतं. त्यामुळं प्रत्येक शिवसैनिक हा या दसरा मेळाव्याची उत्सुकतेनं वाट पहात असतो. यंदाचा शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवसेना आणि ठाकरे घराण्याच्यादृष्टीनं विशेष आनंदसोहळा असणार आहे...सीमोल्लंघनाचा! ठाकरे घराण्यातली चौथी पिढी आदित्यच्या रूपानं प्रत्यक्ष निवडणुकीच्या राजकारणात उतरतेय! समाजातील दांभिकतेवर, वाईट चालीरिती, रूढी परंपरेवर 'प्रबोधनी' प्रहार करणारे प्रबोधनकार ठाकरे यांनी समाज सुधारक म्हणून शिवसेनेची पायाभरणी केली. व्यंगचित्रांच्या माध्यमातून राजकारणावर 'मार्मिक' फटकारे मारीत आसूड ओढणारे बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या न्यायहक्कासाठी आंदोलन उभं करून त्यांना सन्मानानं उभं केलं. राज्याच्या सत्तेच्या चाव्या आपल्याकडं घेतल्या. आपल्या शांत, संयत, समंजस प्रसंगी आक्रमक होत, सत्तेत असतानाही विरोधकांची जागा व्यापणारे आणि खंबीरपणे राजकारणाचा 'सामना' करणारे उद्धव...! महाराष्ट्राच्या समाजजीवनात आपलं योगदान देणाऱ्या या ठाकरे घराण्यातील तीन पिढ्या निवडणुकीच्या राजकारणापासून दूर होत्या. शिवसेनेची ही स्थित्यंतरं एकाबाजूला ठेवत तिला कार्पोरेटरूप देत सत्तेत सहभागी होण्यासाठी आता प्रथमच ठाकरे घराण्याची ही चौथी पिढी युवासेनाध्यक्ष आदित्य विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करून सत्तेच्या राजकारणासाठी सज्ज झालाय! आदित्यची ही वाटचाल ठाकरे घराण्याची हे सीमोल्लंघन ठरणारी  आहे!

हरीश केंची
९४२२३१०६०९

No comments:

Post a Comment

लोकशाही की एकाधिकारशाही...!

"देशात लोकशाहीचा उत्सव सुरू आहे, पण सत्ताधारी  लोकशाही संसदीय ऐवजी अध्यक्षीय असल्यासारखे वागताहेत. सामूहिक नेतृत्व सांगणारा...