Friday 18 October 2019

राजयोद्धा

"कुणी म्हणेल हा मनुष्य सत्तेसाठी वेडा झालाय, कुणी म्हणेल म्हातारपणी आराम करायचा सोडून हे काय लावलंय. पण आयुष्यात जेव्हा केव्हा, अपयश येईल, मार्ग दिसणार नाही, हताशपणा येईल आणि सारं काही सोडून द्यायची इच्छा होईल तेव्हा तेव्हा हा मनुष्य आठवत राहिल. वयाच्या ऐंशीव्या वर्षी या माणसानं दिलेली लढाई आठवत राहील. रक्ताळेल्या पायांनी निवडणूक काळात केलेला महाराष्ट्राचा दौरा आठवत राहील. परिस्थितीशी झुंजायचं, हार मानायची नाही वगैरे पुस्तकात वाचलंय त्याचं जागतं उदाहरण शरद पवारांनी दिलंय! दिवसभरात पाच ते सहा सभा घेत जनसमुदायाला अजमावत, ऐंशी वर्षाचा हा नेता मैदानात उतरतो तेव्हा निश्चितच राज्यातलं राजकीय वातावरण ढवळून निघालेलं असतं. शरद पवार यांनी शुक्रवारचा दिवसच नाही तर रात्रही गाजवली....कोसळत्या पावसात भाषण देऊन! पुरोगामी महाराष्ट्राचं हे नेतृत्व निश्चितच तरूण राजकारण्यांसाठी प्रोत्साहन देणारं आहे! वैचारिक, राजकीय मतभेद कितीही असोत पण त्यांच्या या दुर्दम्य इच्छाशक्तीला, जिद्दीला, लढाऊवृत्तीला आणि या राजयोद्ध्याला मानलंचं पाहिजे...!"
---------------------------------------------------

*पु* ण्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सभेत पावसाचा व्यत्यय येऊ नये म्हणून कोट्यावधी रुपये खर्च करुन वॉटर प्रुफ स्टेज आणि मंडप उभारण्यात आला होता. त्यात सभेच्या जागेसाठी काही झाडांचाही कत्तल देखील करण्या त आली होती. त्या सभेच्या वेळी पाऊस आला नाही. या पार्श्वभूमीवर दुसऱ्याच दिवशी शरद पवार यांची सातारा लोकसभा आणि विधानसभेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेतली. शरद पवारांची ही सभा महाराष्ट्राच्या राजकीय इतिहात कायमची नोंद होणारी ठरली. सभेला शरद पवार उभे राहताच पावसाला सुरुवात झाली. अनेकांना वाटलं पवार भाषण थांबवतील मात्र, पवारांनी भर पावसात भाषण सुरू ठेवलं. पावसापासून बचावासाठी छत्री आणली गेली पण त्यांनी ती बाजूला सारून वयाच्या ८० व्या वर्षी पायांना जखमा असतानाही पवार भरपावसात सभेला संबोधित करत राहिले. तर हजारोच्या संख्येने नागरिकही या ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार झाले. लगेचच सोशल मीडियावर या 'पावसातील सभेच्या फोटो'चाही पाऊस पडला. प्रत्येकजण पवारांच्या या निर्धाराचं कौतुक करत होता. निवडणुका जाहीर झाल्यापासून पायाला भिंगरी लावल्यासारखं शरद पवार पळताहेत. अनेक आजारांशी सामना करताहेत. त्यात नव्यानं त्यांच्या पायाला जखम झालीय. चालताना त्रास होतोय. तरीही ते उभे ठाकलेत! पवारांवर सर्वाधिक प्रेम आजवर सातारा जिल्ह्यानं प्रेम केलंय. यशवंतरावांच्या हयातीत सातारा जिल्ह्यानं पवारांना सर्वाधिक प्रेम केलंय. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर सातारा जिल्ह्यानं विधानसभेच्या अकरापैकी दहा जागा पवारांच्या पक्षाला दिल्या होत्या तर काँग्रेसला एक जागा मिळाली होती. उदयनराजे तीनवेळा खासदार झाले ते केवळ पवारांच्या पक्षाकडून हे इथं लक्षात घेतलं पाहिजे. निवडणुकीच्या तोंडावर अनेक जिवाभावाची माणसं त्यांना सोडून गेली. परंतु ज्यांच्यावर शिवस्वराज्य यात्रेची जबाबदारी दिली होती, ते पक्षाचे खासदार असलेले उदयनराजे सोडून गेले हा पवारांसाठी मोठा धक्का होता. परंतु डगमगले नाहीत! कंबर कसली अन तरुणाला लाजवेल अशा उत्साहानं प्रचारात सरसावले!

*साताऱ्यातली ऐतिहासिक पर्जन्यसभा*
साताऱ्याच्या त्या सभेत पवार व्यासपीठावर आले तेव्हा पाऊस कोसळतच होता, परंतु कोसळत्या पावसात भिजणा-या आपल्या लढवय्या नेत्याचं रूप पाहून उपस्थित कार्यकर्त्यांना आण टीव्हीच्या पडद्यावर ज्यांनी हे दृश्य पाहिलं त्या शेकडो किलोमीटर अंतरावर असलेल्या माणसांचेही डोळे भरून आले. त्यावेळी मुंबईत प्रधानमंत्री बीकेसीच्या मैदानावर बोलत होते. टीव्हीची सर्व चॅनेल्सवरून त्याचं थेट प्रक्षेपण सुरू होतं. इकडं साता-यात पवारांच्या सभेला आलेले लोक पाऊस सुरू झाल्यावरही विचलित झाले नाहीत, नेतेमंडळीही तसेच उभे होते. सगळ्यांनाच पवारांची चिंता वाटत होती. त्यांनी त्यांच्यासाठी छत्री आणली पण ती त्यांनी दूर सारली आणि पवारांनी आपल्या नेहमीच्या जोशात भाषण सुरू केलं. लोकांनी सुरुवातीला खुर्च्या डोक्यावर घेतल्या पण पवारांनी कोसळत्या पावसातही आपलं भाषण सुरू ठेवलंय हे पाहताच त्यांनीही खुर्च्या टाकून दिल्या. साता-याची ही सभा म्हणजे शरद पवार यांच्या राजकीय जीवनातला सर्वोच्च क्षण! असा क्षण ना भूतकाळात कुणी पाहीला ना भविष्यात कुणी पाहतील. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातला एक सर्वांगसुंदर, भविष्यात अनेक दशके स्मरणात राहील असा ऐतिहासिक क्षण निसर्गानं घडवून आणला होता! शरद पवार नावाच्या योध्यासाठी! यातून प्रतिकूल परिस्थितीत लढायचं कसं, याचा धडा शरद पवारांनी महाराष्ट्राला दिला. ही विधानसभा निवडणुक एकतर्फी होणार असं वातावरण सुरुवातीच्या काळात निर्माण झालं होतं. त्याला कारणही तसंच होतं. लोकसभा निवडणुकीत राज्याच्या २८८ विधानसभा मतदारसंघापैकी २२७ मतदारसंघात सेना-भाजपला आघाडी मिळालेली होती. त्यामुळं विरोधी पक्षांमध्ये निवडणूक लढविण्याचा उत्साह राहिला नव्हता; पण ८० वर्षाच्या तरुण लढवय्या शरद पवारांनी त्यात धुगधुगी निर्माण केली. पवार साहेबांची प्रचंड इच्छाशक्ती, दुर्दम्य आशावाद, शरीरातील व्याधींची जराही तमा न करण्याची अफाट क्षमता, डाव उलटवून टाकण्याचा क्रिकेट आणि कुस्तीतला अनुभव या जोरावर निवडणुकीत रंग आणलाय. 'पवार साहेबांचं बोट धरून मी राजकारण शिकलो', असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी का म्हणाले होते त्याचा अनुभव पुन्हा एकदा महाराष्ट्रानं घेतला. 

*पवारांनी वातावरण ढवळून काढलं*
राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या धोरणांमुळं उद्ध्वस्त झालेला शेतकरी, रोजगाराच्या शोधात असलेला वैफल्यग्रस्त शहरी आणि ग्रामीण तरुण, आंदोलन करुन थकलेले शिक्षक, अंगणवाडी ताई, स्पर्धा परीक्षांचे उमेदवार आणि कंत्राटी कर्मचारी. राज्याचा पर्जन्यवंचित भाग असो नाहीतर सत्तावंचित सामाजिक घटक. या सगळ्या वर्गाच्या बाजूनं उभं राहण्याऐवजी नव्या दिल्लीश्वरांशी जमवून घेण्यातच विरोधी पक्षांतील नेतृत्वाचा वेळ गेला. सत्ता वंचितांना सन्मान देण्याऐवजी सगेसोयरेच आता पळाले याचीच चिंता ते वाहत राहिले. या साऱ्या प्रतिकूल वातावरणात आपल्या मोजक्या शिलेदारांसह शरद पवार निवडणुकीच्या रणांगणात उतरले, अन वातावरण ढवळून काढलं. सातारच्या त्या सभेनं तर त्यांनी लोकांची मनही जिंकली! महाराष्ट्राचं विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात वसंतदादा पाटील, यशवंतराव चव्हाण यासारख्या दिग्गजांनी सहकाराच्या माध्यमातून सामूहिक हितसंबध महत्वाचं मानून ते जपण्याचं काम केलं. त्यातून ग्रामीण भागात अर्थव्यवस्था उभी केली. पण पुढच्या पिढीनं मात्र सहकार संस्थाकडं ती उत्पन्नाची साधनं म्हणून पाहिलं. याचा परिणाम म्हणून या संस्थांमध्ये भ्रष्टाचार सुरू झाला. जनतेचा पैसा जनतेपर्यत पोहोचलाच नाही. त्यातून हळूहळू सहकार संपला, त्याचं विकेंद्रीकरण संपलं आणि पैशाचं केंद्रीकरण सुरू झालं. सहकारी संस्था आपल्या उत्पनाचं साधन आहेत असं मानलेल्या राजकारण्यांकडून संस्थेत काम करणाऱ्या लोकांना गुलामासारखी वागणूक मिळू लागली. परिणामी ही चळवळच कमकुवत बनली. पाठोपाठ राजकीय सत्ताकेंद्रेही त्यांच्या हातून निसटली. पवारांनी सहकारी चळवळ सावरण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण चंगळवादी बनलेल्या नव्या तरुण नेतृत्वाला ते भावलं नाही.त्यांनी मग त्यांची साथ सोडण्याचाच निर्णय घेतला. ज्या लोकांमुळं या संस्था उभ्या राहिल्या, त्या लोकांची इच्छाशक्ती मरण पावली. याकडे ते फक्त नोकरी म्हणून पाहू लागले. या संस्था जगल्या पाहिजेत. यासाठी राज्य सरकार सातत्यानं या संस्थाना आर्थिक पुरवठा करू लागलं. त्या संस्था वाचवण्यासाठी प्रयत्न केलं गेलं. पण सहकाराच्या दृष्टीचा अभाव असल्यानं या पिढीकडं लोकांना सोबत घेऊन जाण्याची दृष्टी नव्हती. शिक्षण संस्थांकडं देखील दुर्लक्ष केलं गेलं. त्यामुळं जनता आणि राजकारणी यांच्यात उभी दरी निर्माण झाली. याचाच फायदा सेना-भाजपनं उचलला.

*भाजपेयींचा आत्मविश्वास डळमळीत केला*
महाराष्ट्रात अगदी अलीकडच्या काळापर्यंत शरद पवार म्हणजे ‘राजकीय पॉवर’ हे समीकरण रूढ होतं. आज शरद पवार राज्यातील भाजप-शिवसेनेचं सरकार आणि स्वत:च्या पक्षातील घरभेदी यांच्या अभद्र युतीच्या विरोधात एकटेच लढताहेत. त्यांच्यासाठी ही राजकीय अस्तित्वाची लढाई झालीय. त्यांच्या जागी इतर कुणीही असता तरी त्याची ‘दयनीय’ अशी प्रतिमा उभी राहिली असती. मात्र, सर्व विपरीत परिस्थितीत पवार ज्या दुर्दम्य इच्छाशक्तीनं लढताहेत आणि सत्ताधार्‍यांना शिंगावर घेताहेत, ते वाखाणण्याजोगं आहे. महाराष्ट्रातील विरोधकांच्या जवळपास ढासळलेल्या किल्ल्यांत शरद पवार नावाचा बुरुज आज अधिकच बुलंद दिसतोय. वयाच्या ८० व्या वर्षी पवार राज्यातील सर्वाधिक सक्रिय नेते बनलेत. त्यांनी केवळ स्वत:चं राजकीय महत्त्व अबाधित राखलेलं नाही, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा येत्या विधानसभेत एकहाती विजयप्राप्तीबाबतचा आत्मविश्वासही डगमळीत केलाय. लोकसभा निवडणुकीनंतर पवारांच्या राजकारणाचे लाभार्थी असलेल्या अनेक लहान-मोठ्या नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडल्यानंतर पवारांनी अखेर कात टाकण्याचा प्रयत्न केला. गेली अनेक वर्षे आपले सरदार, जमीनदार, देशमुख यांच्यामार्फत राजकारण करणार्‍या पवारांनी पुन्हा एकदा थेट कार्यकर्त्यांशी आणि जनतेशी संपर्क साधण्यासाठी राज्याचा झंझावाती दौरा केला. राज्य सरकार पुढे शरणागती न पत्करता त्यांच्याविरुद्ध मुलुख मैदान तोफ असल्याचं दाखवून दिलं! जे नेते पक्ष सोडून भाजप-सेनेत दाखल झाले आहेत, त्यांच्याच मतदारसंघात सभा घेत कार्यकर्त्यांचं मनोबल आणि आपल्या मतदारांचा विश्वास उंचावण्याचा प्रयत्न पवारांनी केला. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर, आणि ज्या बँकेत पवार कधीही कुठल्याही पदावर नव्हते तिथल्या कथित गैरव्यवहाराच्या प्रकरणात पवारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यामागील राजकारण सामान्य जनतेच्या नजरेतून सुटले नाही. लगेच चाणाक्ष पवारांनी आपण स्वत: ईडी कार्यालयात हजर राहण्याचे जाहीर करत ‘कर नाही त्याला डर कशाचे’चा प्रत्यय दिला. मागील तीन दशकांमध्ये पहिल्यांदाच पवारांविरुद्ध दाखल झालेल्या आर्थिक गुन्ह्याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला नक्कीच झालाय. अद्याप राष्ट्रवादी सोडून न गेलेल्या तसेच सोडण्याची इच्छा नसलेल्या अथवा पर्याय नसलेल्या नेत्यांना राष्ट्रवादीतच आशेचा किरण दिसू लागला आहे. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे ‘फक्त तू लढ म्हण’ची आकांक्षा मनी बाळगून असलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना नवी उमेद प्राप्त झाली आहे. मात्र, याचा अर्थ विधानसभेत राष्ट्रवादीचे संख्याबळ वाढले नाही तरी किमान घटणार नाही, असा काढता येणार नाही. लोकसभा निवडणुक निकाल आणि त्यानंतर विरोधकांच्या झालेल्या दयनीय परिस्थितीचा पगडा मतदारांच्या मनावर अद्याप कायम आहे. पण या सर्व परिस्थितीत पवारांनी दाखवलेल्या जिगरीमुळे सत्ताधार्‍यांच्या विरोधात फक्त राष्ट्रवादीने शड्डू ठोकल्याचे चित्र उभे राहिले आहे. भारतीय जनता पक्षाने कोट्यावधी रुपये खर्च करुन राज्यातील मोदीच्या आतापर्यंत घेतलेल्या सभांवर पवार यांच्या पावसातील एका सभेनं पाणी फेरल्याचं चित्र सोशल मीडियावर काही काही वेळेतच दिसत होतं ८० व्या वर्षीही अशी अफाट इच्छाशक्ती आणि परिस्थितीशी दोन हात करण्याची ताकद यामुळं या विधानसभा निवडणुकीत पवार हे मोदींपेक्षा कितीतरी पटीनं सरस ठरल्याचं दिसून आलं. पवार यांची ही सभा साताऱ्यासह संबंध राज्याच्या निवडणुकीवर परिणाम करणारी ठरेल, असं चित्र सोशल मीडियावर अवघ्या काही तासातच तयार झालं. पवार यांना देखील या सभेचं महत्त्व चांगलंच माहिती होतं. त्यामुळं त्यांनी सभा सुरु असताना आलेल्या पावसाला अडचण न समजता त्यांच्या चौकस बुद्धीने त्याकडे संधी म्हणून पाहिले. या सभेचा पुरेपुर फायदा त्यांना नक्कीच येणाऱ्या काळामध्ये होणार यात शंका नाही.

हरीश केंची
९४२२३१०६०९

No comments:

Post a Comment

लोकशाही की एकाधिकारशाही...!

"देशात लोकशाहीचा उत्सव सुरू आहे, पण सत्ताधारी  लोकशाही संसदीय ऐवजी अध्यक्षीय असल्यासारखे वागताहेत. सामूहिक नेतृत्व सांगणारा...