Saturday 12 October 2019

सत्तेच्या राजनीतीतील साठमारी!

"सध्या निवडणुकांचा मौसम सुरू आहे. शिमग्याची उत्सव असावा असं वातावरण आहे. सत्तासुंदरीसाठी सुदौपसुंदी सुरू झालीय. कुरघोडी, शह-काटशह विरोधीपक्षाबरोबरच नाही तर स्वपक्षांतर्गतही सुरू आहे. फडणवीस यांनी त्यांना आव्हान देणाऱ्या चार तुल्यबळ नेत्यांना उमेदवारीच दिली नाही. नुकतंच एक पुस्तक वाचण्यात आलं. रॉबर्ट ग्रीन या लेखकानं 'द फोर्टीएट लॉज ऑफ पॉवर' हे पुस्तक लिहिलंय. त्यात त्यानं म्हटलं आहे की, 'प्रत्येक सत्ताधाऱ्याला आतून असुरक्षित वाटत असतं. परंतु तुम्ही जगासमोर तुमच्यातील गुणवत्ता दाखविण्याचा प्रयत्न करता किंवा आपण सर्वशक्तिमान असल्याचा देखावा करायला जाता, तेव्हा काही लोकांची नाराजी, ईर्षा, शत्रुत्व ओढवून घेता. मग सत्तेच्या त्या साठमारीत आपला बळी जातो' हे सध्याच्या राजनीतीला तंतोतंत जुळतं आहे!"
---------------------------------------–---------------------------
*भा* जपनं राजनीतीचा प्रचंड अनुभव, शिवाय गेली चाळीस वर्षे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असलेल्या एकनाथ खडसे, विनोद तावडे, प्रकाश मेहता यासारख्या दिग्गजांना सत्तेपासून रोखण्यासाठी त्यांना उमेदवारीच दिली नाही. एकनाथ खडसे हे ज्येष्ठ आणि राजकारणात सिनिअर त्या तुलनेत देवेंद्र फडणवीस हे अत्यंत ज्युनिअर. त्यामुळं खडसे फडणवीस यांना कमी लेखत. तसंच खडसे यांच्यासारखंचं विनोद तावडेंचं वागणं असायचं. सध्या सोशल मीडियावर एक फोटो फिरतोय. २०१४ ला संपलेल्या विधानसभा सत्राच्यावेळी सर्व आमदारांचा एकत्रीत फोटो काढला गेला. तसा तो प्रत्येक विधानसभा संपताना काढला जातो. त्या फोटोत पहिल्या रांगेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशेजारी विरोधीपक्षनेते म्हणून खडसे यांना बसवलं होतं. तर अगदी शेवटच्या रांगेत एका कोपऱ्यात फडणवीस उभे होते. शेवटच्या रांगेत उभं राहून थेट पहिल्या रांगेत येऊन मुख्यमंत्र्यांची खुर्ची पटकावणं हे सगळ्यांनाच धक्कादायक होतं. विरोधीपक्षनेते असलेल्या खडसेंना मुख्यमंत्रीपद आपल्यालाच मिळेल असं त्यांना वाटतं होतं. मात्र झालं उलटंच! खडसेंचा भ्रमनिरास झाला. हे शल्य त्यांना सतत सलत होतं. संधी मिळताच मुख्यमंत्री बनलेल्या फडणवीस यांनी खडसे यांना दिलेलं मंत्रिपद काढून घेतलं. आता तर विधानसभेची उमेदवारीही काढून घेतली. थोड्याफार फरकानं तावडे, मेहता यांची तीच अवस्था फडणवीस यांनी केलीय. 

*वगळलेल्यांना वेगळ्या जबाबदारीचं गाजर*
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपल्या ज्येष्ठ नेत्यांसहीत तब्बल १८ विद्यमान आमदारांचे तिकीट कापले आहे. एकनाथ खडसे, विनोद तावडे, प्रकाश मेहता आणि चंद्रशेखर बावनकुळे अशा ज्येष्ठ मंत्र्यांना घरी बसवल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात होते. अर्ज भरण्याची शेवटची मुदत संपल्यानंतर भाजप-शिवसेनेतर्फे संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी तिकीट कापलेल्या लोकांना पक्षात वेगळी जबाबदारी देणार असल्याचे सुतोवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केलं होतं. विधानसभेसाठी भाजपनं उमेदवारांच्या चार याद्या प्रसिद्ध केल्या होत्या. मात्र चारही याद्यांमध्ये ज्येष्ठांना डावलण्यात आलं होतं. त्यानंतर अनेक तर्क-वितर्क लढवले गेले. मुख्यमंत्र्यांना विरोध करणाऱ्यांना आपल्या मार्गातून हटविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनीच ही खेळी केली असल्याचीही चर्चा रंगली होती. मात्र स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत याबाबत खुलासा केला की, एखाद्याला उमेदवारी दिली म्हणजे सगळे संपले असे होत नाही. त्यांना पक्षाने वेगळी जबाबदारी देण्याचे ठरविले असल्यामुळे उमेदवारी देण्यात आलेली नाही. लवकरच त्यांना वेगळी जबाबदारी दिली जाईल. ह्या साऱ्या ताज्या घटना घडत असतानाच राजनीतीतली ४८ व्यवधानं कांस्य असायला हवीत हे सांगणारं पुस्तक हाती आलं त्यातलं काही इथं देतोय.

*बॉसपेक्षा तुम्ही 'ओव्हरशाईन' होऊ नका!*
सत्ताधारी मंडळी आपली सत्ता टिकविण्यासाठी अनेक चांगली काम कधीच करत नाहीत; किंवा त्यांनी चांगलं काम करण्याचा देखावा केला तरी तो टिकत नाही. आजच्या राजकारणात 'पॉवर गेम' ठाऊक नसलेले लोक सत्तेबाहेर फेकले जातात त्यामुळेच मोरारची देसाई, विश्वनाथ प्रताप सिंह, लालकृष्ण अडवाणी यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांपासून अनेकजण कमी-अधिक कालावधीत सत्तेच्या वर्तुळाबाहेर फेकले गेले. 'पॉवरगेम' चा पहिला नियम असा आहे की, तुम्ही तुमच्या बॉसला कधीच 'ओव्हरशाईन' करायचं नसतं, याचा अर्थ तुम्ही तुमच्या वरिष्ठांहून अधिक चलाख, बुद्धीमंत असल्याचं दाखवू नये. पत्रकारांनी तुमच्यावर भलेही टीका केली तरी, तुम्ही दुतोंडीपणाचा अवलंब करायचा म्हणजे कोणाबद्दल तिरस्कार असला तरी, त्याच्याबद्धल आपल्याला किती प्रेम आहे, असं दाखवत राहायचं. तुम्ही गुणवान असलात, तरी परिस्थितीमुळं दुसरं कुणी सर्वोच्च स्थानी विराजमान झालं, तरी तुम्ही त्याच्यापेक्षा चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करू नका. उलट, तुमच्या वरिष्ठांना खुश ठेवा. तुमच्या बुद्धिमत्तेचा त्यांच्यावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न तुम्ही केल्यास वरिष्ठांच्या मनात असुरक्षितता निर्माण होईल. तेव्हा तुमचा बॉस तुमच्यापेक्षा अधिक हुशार आहे, असा देखावा करत राहिलात तर बॉस गाफील राहील आणि एके दिवशी तुमचा उत्कर्ष होईल! असं या पुस्तकात म्हटलं आहे.

*नेतृत्व झाकोळण्याचा प्रयत्न अंगलट*
भाजपचे लालकृष्ण अडवाणी नेहमी आपण अटल बिहारी वाजपेयी पेक्षा अधिक लोकप्रिय, अधिक लायक आणि अधिक रामभक्त आहोत, हे दाखवत. त्यामुळे त्यांना वाजपेयींवर कधी मात करता आली नाही. त्यांना पक्षाच्या अध्यक्षपदावरून पायउतार व्हावं लागलं. मोरारजी देसाई यांनी इंदिरा गांधींना आणि विश्वनाथ प्रताप सिंह यांनी राजीव गांधींना झाकोळून टाकण्याचा प्रयत्न केला. त्यांची कारकीर्दही लवकरच संपुष्टात आली. असंच उमाभारतीच्या बाबतीत घडलं त्यांनी नरेंद्र मोदी यांच्याहून आपण अधिक आक्रमक असल्याचं दाखवलं. परिणा
मी, त्यांची पक्षातून हकालपट्टी झाली. राज ठाकरे यांना यामुळेच शिवसेना सोडण्याची वेळ आली. केवळ राजकारणातच नव्हे तर असं सगळ्याचं क्षेत्रात घडलंय. संपादकाहून अधिक ज्ञानी असल्याची बढाई मारणाऱ्या पत्रकाराला नोकरीला मुकावे लागतं.

*फ्रेंच अर्थमंत्र्याचं या पुस्तकात उदाहरण*
वॉल्टेअर फ्रेंच फिलॉसॉफर निकोलस फ़ॉकल्ट या फ्रेंच अर्थमंत्र्याविषयी एक किस्सा या पुस्तकात लिहिला आहे. निकोलस हे चौदाव्या लुई राजाचे अर्थमंत्री होते. निकोलस यांना लोकांना 'लॅव्हीश पार्ट्या' देऊन खूष करण्याची सवय होती. त्यांना कविता, साहित्य, सुंदर स्त्रियांचा शौक होता. ते बाहेरून साधे असले, तरी त्यांना चैनबाजी आवडायची. आतून त्यांचं जगणं अत्यंत भपकेबाज होतं. चौदाव्या लुईच्या हे लक्षात आलं की, निकोलस स्वतःचं महत्त्व गरजेपेक्षा जास्त वाढवतोय. स्वतःचीचं टिमकी वाजवतोय. त्यामुळे त्यांची हकालपट्टी करण्याचा गुपचूप निर्णय घेतला 
निकोलसला त्याची गंधवार्ता लागली. तरीही त्यानं आपल्या नव्या निवासस्थानाच्या गृहप्रवेशासाठी मोठा समारंभ आयोजित केला. या समारंभासाठी बुद्धीमंत, लेखक, कवी, उद्योगपती आणि कलाकारांना त्यांनी आमंत्रण दिलं. त्यामध्ये फिलॉसॉफर ला फोटेन, लॉरेशेफॉल्ड, नाटककार मोलीयर आणि दे सेविंगने ही धनिक महिला यांचाही समावेश होता. खुद्द राजासाहेबही पार्टीला उपस्थित होते. नाटककार मोलीयर या भव्य पार्टीने इतके प्रभावित झाले की, त्यांनी पार्टीतील भपक्याचं वर्णन करण्यासाठी हे खास नाटक लिहिलं. पार्टीत 'सात कोर्स'चं जेवण होतं. त्यासाठी जगभरातून विविध पदार्थ, फळ मागवण्यात आली होती. खास निष्णात बल्लवाचार्याकडून नवनवीन डिश बनविण्यात आल्या होत्या. जेवण झाल्यावर निकोलसनं पाहुण्यांना निवासस्थानामागील बगीचा, तिथले कारंजे दाखवले. असं म्हणतात की, आपल्या अर्थमंत्र्यांच्या हा आलिशान महाल पाहून चौदाव्या लुईला पॅरिसमधील व्हरसेलचा प्रसिद्ध महाल बनवण्याची प्रेरणा मिळाली!

*सकाळी शिखरावर तर रात्री जमिनीवर*
अर्थमंत्र्यांची पार्टी पहाटेपर्यंत चालली. सर्वजण राजेसाहेबांना ऐकू जाईल अशा पद्धतीनं पार्टीची वाहवा करत होते. अर्थमंत्र्यांनी राजांनाही महाल आणि बगीचा दाखवला सरतेशेवटी आकाश उजळून निघेल अशी भव्य आतषबाजी झाली. दुसऱ्या दिवशी चौदाव्या लुईनं आपला सेनापती पाठवून निकोलसना अटक केली. त्यांना तुरुंगात डांबून राज्याच्या तिजोरीतून भ्रष्ट मार्गाने पैसे काढल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवला. निकोलसवर खटला चालून त्यांना मोठी सजा झाली. आपल्या आयुष्याची अखेरची वीस वर्ष निकोलस यांनी तुरुंगात घालवली. या किश्शाचा अर्थ स्पष्ट आहे. निकोलस उत्कृष्ट अर्थमंत्री होते. पण आपल्याहून अधिक लोकप्रिय आणि बुद्धिमान अर्थमंत्री चौदाव्या लुईला सहन होणं शक्यच नव्हतं. त्याची लोकप्रियता पाहून राजाचा अहंकार दुखावला. राजाला आपलं स्थान डळमळीत झाल्यासारखं वाटू लागलं. म्हणूनच त्यांनं निकोलसला त्याची जागा दाखवून दिली. वॉल्टेअर या पुस्तकात लिहितो, 'सकाळी सूर्य उगवला तेव्हा निकोलस शिखरावर होता. मध्यरात्री मात्र तो जमिनीवर आपटला होता!' सत्तेच्या साठमारीतही असंच घडतं. मनमोहन सिंग यांनी आपण सोनियाहून अधिक लोकप्रिय आणि स्मार्ट आहोत असं दाखवायचा प्रयत्न केला असता त्यांची गच्छंती अटळ होती. अशी एक का अनेक उदाहरणं भारतीय राजकारणात देता येईल.

*प्रभाव दाखविण्याचा प्रयत्न करताच बदललं जात*
रॉबर्टग्रीन या लेखकानं 'द फॉरटीएट लॉज ऑफ पॉवर' - 48 laws of power हे पुस्तक लिहिलंय. त्यात त्यांनी म्हटलंय की प्रत्येक सत्ताधाऱ्यांना आतून असुरक्षित वाटत असतं. परंतु तुम्ही जगासमोर तुमच्यातील गुणवत्ता दाखवण्याचा प्रयत्न करता किंवा आपण सर्वशक्तीमान असल्याचा देखावा करायला जाता, तेव्हा काही लोकांची नाराजी, ईर्षा, शत्रुत्व ओढवून घेता. थोडक्यात सांगायचं तर अठराव्या शतकातील चौदाव्या लुईच्या काळात होती, तशीच सत्तेची साठमारी आजही आहे. इंदिरा गांधीच्या काळात एखादा मंत्री किंवा मुख्यमंत्री आपला प्रभाव तयार करतोय असं वाटताच, त्याची खुर्ची काढून घेतली जायची. त्याच्या जागी कोणीतरी कमजोर नेमला जायचा. महाराष्ट्रात आपण पाहिलंय की, बाबासाहेब भोसले वा गुजरातमध्ये अमरसिंग चौधरी अशांच्या नेमणूका कशा झाल्या.

*सत्तासूर्याला प्रकाशमान करण्याचा प्रयत्न हवा*
निसर्गाचा नियम लक्षात घ्या. आकाशात अद्भुत प्रकाश देणारे अनेक तारे असले तरी, सूर्य एकच असतो. ताऱ्यांनी त्यांच्याशी कधीच स्पर्धा करू नये. उलट ताऱ्यांनी स्वतःचा प्रकाश कमी करून सूर्याला अधिक प्रकाशमान बनवण्यासाठी मदत करावी. तुमचे वरिष्ठ सामान्य कुवतीचे असले तरी, तुम्ही त्यांच्यापेक्षा अधिक लायक असल्याचा देखावा करू नका किंवा त्यांच्या विरुद्ध मोहीम चालवू नका. ती व्यक्ती वरिष्ठ पदाला लायक नसेल, तर एके दिवशी तिला पदावरून जावंच लागणार. त्यानंतर सद्दी तुमचीच असेल हा निसर्गनियम आहे! असं या पुस्तकात सत्तेचे जे ४८ नियम समजावून सांगण्यात आलंय त्यात हे म्हटलं आहे.

*सत्तेचे पासंग....!*
या पुस्तकात फ्रेंच राजनीतीचं वर्णन असलं तरी थोड्याफार फरकाने भारतातही तशीच स्थिती आहे. सत्ता ग्रामीण आणि शहरी अशा दोन भागांचे पुरेसे प्रतिनिधीत्व असणारी असेल. सत्तेत सर्व जाती-धर्माच्या घटकांचा समावेश असेल तरच ती सत्ता समतोल साधणारी आहे, असं म्हणता येतं; अन्यथा सत्तेची गाडी एका बाजूकडून झुकण्याचा आणि अपघात होण्याचा धोका असतो. सत्तेत समतोल राखण्यासाठी काही घटक पासंगासारखे उपयोगाचे असतात. रामदास आठवले यांच्या पक्षाची राज्य विधानसभेत एकही जागा नव्हती तरीही त्यांच्या पक्षाच्या एका व्यक्तीस मंत्री केलं जातं, ते सत्तेचा समतोल साधण्यासाठीच! मात्र तेवढ्यानं सर्वजण समाधानी होतात वा सरकार प्रातिनिधिक होतं असं नाही. शिवसेना-भाजपच्या सरकारच्या बाबतीत तसं झालं होतं. ग्रामीण महाराष्ट्रातील लोकांना हे सरकार कधीच आपलं वाटत नव्हतं. राजकारणातील बदलांचा मागोवा घेताना असे छोटे-छोटे परंतु महत्त्वाचे घटक निर्णायक ठरू शकतात. दलित मतांचा गठ्ठा कुठे जाईल हे खात्रीने सांगता येत नाही मात्र वंचितकडे वा दोन्ही काँग्रेस कडे जाईल अशी खात्रीची स्थितीही आज राहिलेली नाही. उरलासुरला एखाद्या विरोधीपक्षाकडं वा दोन पैकी एका काँग्रेस पक्षाकडं जाईल. शेतकरी कामगार पक्ष यावेळी कोकणात किमान काही मतदारसंघात दखलपात्र हालचाली घडवेल. त्याचा दोन्ही काँग्रेसला तोटा झालेला असेल. मराठ्यांचे विविध गट पुन्हा स्वतंत्रपणे जातीच्या नावाने निवडणुकांची चर्चा करतील त्याचा फायदा झालाच तर अनेक ठिकाणी शिवसेना-भाजपला होईल. यावेळी मोठ्या प्रमाणावर स्थानिक राजकारणाचे संदर्भ पक्षीय संदर्भांना बाद करतील. राज ठाकरे यांचं नवं 'विरोधीपक्ष बनण्यासाठी'चं आंदोलन शिवसेनेच्या अस्तित्वाला धक्का लावेल अशी आज तरी स्थिती नाही. शिवसेना दोन्ही काँग्रेसच्या झोळीला अनेक ठिकाणी भोकं पाडेल. सत्ता आणि सत्तेचा पासंग आपल्याकडे यावा यासाठीच या हालचाली अधिकच गतिमान होतील. सत्तेचं घोडं बेकाबू होण्याचा प्रसंग घोडेस्वाराची मांड पक्की नसल्यानं होतोच, शिवाय घोड्यांना भरकटत जावं असंही वातावरण बऱ्याचदा तयार होतं. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पूर्वीच्या काळात सत्तेच्या घोड्यांची बुद्धी भ्रमिष्ट सारखी झाली होती. त्याला अशी एक ना अनेक कारणं आहेत. तशीच परिस्थिती आज शिवसेना-भाजप सरकारची झालेली आहे. त्यातल्या एका आणि निर्णायक कारणांची चर्चा करायलाच हवी. ते कारण म्हणजे संपूर्ण समाजाच्या मानसिकतेत दडलं आहे. सर्वत्र अस्वस्थता आहे. ग्रामीण समाजाचीच लोक संपन्न स्थिती असायला हवेत. परंतु तसे घडत नाही. उलट, शहरी लोक अधिकच नाराज आहेत. उपेक्षितांची जी यादी होते. त्यात शहरातील झोपडपट्ट्यांचा ही समावेश होतो. ही नाराजी एखाद्या ज्वालामुखी सारखी आहे. ती विविध गुन्ह्यांच्या आणि वर्तनाच्या माध्यमातून व्यक्त होत असते. असे नाराज लोक राजकारण बदलू शकत नाहीत. परिवर्तन तर अजिबात आणू शकत नाहीत. मात्र त्यांना हवा तो पर्याय ते निवडू शकतात. आजवर काँग्रेस पक्षाचे नेते असं समजत होते की आपण शिवसेनेच्या लोकांना आपणाकडे घेऊन त्यांचा जनाधार कमी करू. राष्ट्रवादीच्या नेत्यांना असं वाटत होतं की आपण भाजपचे लोक फोडून त्यांचा जनाधार कमी करून आपण सक्षम होऊ. पण तसं घडत नाही आता या काळामध्ये नेमकं उलट होते आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यातील बहुतेक नेते मंडळी सेना-भाजपच्या वळचणीला गेली आहेत. या दोन पक्षांचा प्रयत्न असा होता की, त्यानुसार राज्यसत्ता आपलीच. राज्यभरात सत्ताधारी पक्ष आपणच आणि विरोधी पक्षही आपणच. त्यांचा आराखडा तात्पुरती व्यवस्था म्हणून ठीक होता. परंतु तो सतत लागू होणारा उतारा नव्हता!

हरीश केंची
९४२२३१०६०९

1 comment:

लोकशाही की एकाधिकारशाही...!

"देशात लोकशाहीचा उत्सव सुरू आहे, पण सत्ताधारी  लोकशाही संसदीय ऐवजी अध्यक्षीय असल्यासारखे वागताहेत. सामूहिक नेतृत्व सांगणारा...