Friday 9 November 2018

सरदार, नेहरू आणि संघ!


"देशापुढील मूलभूत प्रश्न सोडविण्यापासून दूर गेल्यानं भावनात्मक मुद्द्यांना महत्त्व देण्याचा काळ आता सुरू झालाय. कारण येणारं वर्ष हे सार्वत्रिक निवडणुकांचे वर्ष आहे! खरी माहिती दडवून, खोटी, विपरीत, विपर्यास्त आणि विसंगत माहिती लोकांच्या डोक्यात आणि मनात ठासून भरण्याचे हे वर्ष! देशात भाजपेयींची सत्ता आल्यापासून वल्लभभाई पटेल यांचा उदो उदो आणि पंडित नेहरू यांची निंदानालस्ती केली जातेय. त्यांच्यातील संबंधाबाबत अनेक उलटसुलट गोष्टी सांगितल्या जाताहेत. पटेलांची उभी केलेली उंच प्रतिमा न्याहाळतानाच त्यांच्या व्यक्तिमत्वाचा धांडोळा घेण्याची नैतिक जबाबदारी देखील आपली आहे. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा, त्यांच्या धोरणांचा, निर्णयांचा तसंच त्यांच्या इतरांशी असलेल्या संबंधाबाबत विपरीत प्रसार-प्रचार व गॉसिप करण्याचा अधिकार कुणालाही असू शकत नाही. गांधीजींच्या हत्येपूर्वी रा.स्व. संघाबाबत पटेलांचं मत सकारात्मक होतं पण त्यानंतर मात्र अत्यंत प्रतिकूल बनलं. थेट संघावर बंदी घालण्याचा निर्णय त्यांनी घेतला. स्वातंत्र्योत्तर काळात सरदार पटेल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि पंडित नेहरू यांच्यातील परस्पर संबंध कसे होते हे सांगणारा हा लेख आहे."
------------------------------------------------------

*दे* शात सत्तेवर आलेल्या भाजपेयींनी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांच्या स्वयंसेवकांनी पंडित जवाहरलाल नेहरूंची बदनामी करण्याचा जणू विडाच उचललाय. ही गोबेल्सनीती एकाबाजूला सुरू असतानाच सरदार पटेल यांची तोंड फुटेपर्यंत स्तुती करताना ते थकत नाहीत. त्याबद्धल सर्वप्रथम पाहू यात. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर म्हणजे महात्मा गांधी यांची हत्या होण्यापूर्वी १९४८ मध्ये सरदार पटेल यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत म्हटलं होतं, की *" तुम्ही तुमच्याकडे असलेल्या लाठी-काठीनं कोणत्याही संघटनेला दाबून टाकू शकत नाही, लाठी-काठी तर चोर, डाकू वापरत असतात. ते दुष्कर्म करण्यासाठी त्यागोष्टी उपयोगात आणत असतात. मात्र संघ तर देशभक्ती करणारी संघटना आहे!"* या सरदार पटेलांच्या मतप्रदर्शनानंतर  ३० जानेवारी १९४८ ला नथुराम गोडसेनं गांधीजींची हत्या केली त्यानंतर सरदार पटेलांच्या संघाबाबतच्या असलेल्या भूमिकेत, त्याबाबतच्या त्यांच्या विचारांमध्ये आमूलाग्र बदल झाला. हे इथं नमूद करायला हवंय!

*सरदार पटेल यांचं नेहरूंना संघाबाबत पत्र*

सरदार पटेलांनी २७ फेब्रुवारी १९४८ला पंडित नेहरूंना एक पत्र लिहिलं त्यात ते म्हणतात, *" गांधीजींच्या हत्येत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सहभाग दिसून येत नाही. मात्र हे काम हिंदू महासभेच्या कट्टरपंथी कार्यकर्त्यांनी केलेलं आढळतं आहे. हे कट्टरपंथी सावरकरांच्या नेतृत्वाखाली काम करतात. या कट्टरपंथीयांनीच हत्येचं षडयंत्र रचलेलं आहे. हे लोक गांधीजींच्या विचारधारेला आणि गांधीजींना सतत विरोध करत. या कट्टरपंथीशिवाय इतर हिंदू महासभा आणि संघाच्या स्वयंसेवकांवर हत्येबाबत संशय घेता येईल अशी परिस्थिती नाही"* नेहरूंच्या या पत्रव्यवहारातून पटेलांची संघाबाबतची भूमिका, हिंदू महासभाबाबतचं मतं व्यक्त होतं.

*संघानं देशात विद्वेषाचं वातावरण निर्माण केलं*

जसा जसा काळ गेला तस तसा सरदारांच्या लक्षांत आलं की, गांधीजींच्या हत्येत संघाचा जरी थेट हात नसला तरी, त्यांनी देशभरात जे हिंदू-मुस्लिम विरोधातलं आणि सांप्रदायिक विद्वेषाचं वातावरण निर्माण केलं आहे. त्यातूनच गांधीजींची ही हत्या झालीय असं त्यांचं मत बनलं. त्यानंतर गृहमंत्री म्हणून सरदार पटेलांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घातली. दीड वर्षाच्या कालावधीनंतर ती उठविण्यात आली असली तरी संघ आणि हिंदू महासभा यांना राजकीय घडामोडीत सहभाग घेता येणार नाही, असं स्पष्टपणे नमूद केलं आणि बंधनं टाकली.

*सरकारला आणि भारताच्या अस्तित्वालाच धोका*

१८ जुलै १९४८ रोजी सरदार पटेलांनी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांना पत्र लिहिलं, *"गांधीजींच्या हत्येबाबतचा खटला हा अद्याप न्यायालयात सुरू आहे. त्यामुळं संघ आणि हिंदू महासभा यांच्याबाबत आताच मी काही सांगणार नाही, कोणतंही मतप्रदर्शन करणार नाही. परंतु आमच्याकडे प्राप्त झालेल्या रिपोर्ट्सनुसार, महात्मा गांधीजींच्या हत्येची जी काही घटना घडली आहे ती या दोन्ही संघटनांनी चालवलेल्या विद्वेषमुलक हालचालींनी आणि निर्माण केलेल्या विपरीत परिस्थितीमुळेच! खासकरून संघाच्या करणीचा हा परिणाम आहे. देशात असं काही वातावरण निर्माण करण्यात आलं की, अशा प्रकारची म्हणजेच गांधीजींच्या हत्येसारखी भयानक घटना घडावी. माझ्या मनांत शंका नाही की, हिंदू महासभेचा कट्टरपंथी गट गांधीजींच्या हत्येच्या कटात सामील होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या चालवलेल्या हालचालींनी, प्रचारांनी भारत सरकार आणि देशाच्या अस्तित्वाला देखील धोका निर्माण झालाय!"* श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्याशी झालेला पत्रव्यवहार हा संघाबाबतचा पटेलांचा दृष्टिकोन स्पष्ट करणारा आहे.

*गांधीजींबाबत विखारी प्रचार केला होता*
निवडणुकीच्या काळात रामजन्मभूमीच्या नावानं उठता बसता भजन करणारे भाजपेयीं आजकाल स्वार्थासाठी गांधी-गांधी असं जप करत असतात. गांधीजींचं नाव घेताहेत. पण प्रत्यक्षात त्यांची पैतृक संस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं मात्र गांधीविरोधी जी भूमिका घेतली आणि गांधीजींबाबत जो विखारी प्रचार केला, त्यामुळं ती एक विषारी संघटना बनली आहे. गांधीजींची हत्या झाली तेव्हा संघानं मिठाई वाटली होती, असं त्यावेळी निष्पन्न झालं होतं. डॉ. केशव हेडगेवार यांच्यानंतर गोळवलकर हे सरसंघचालक होते. १९४० ते १९७३ पर्यंत त्यांनी संघाचं नेतृत्व केलं होतं. ११ सप्टेंबर १९४८ रोजी सरदारांनी त्यांना एक पत्र लिहिलं होतं.

*सरसंघचालक गुरुजींना सरदार पटेलांचं पत्र*

*"भाईश्री गोळवलकर,*
*११ ऑगस्ट रोजी तुम्ही पाठवलेलं पत्र मिळालं, जवाहरलालजींनीही तुमचं पत्र माझ्याकडं पाठवलंय. तुम्ही आरएसएसबाबतची माझी असलेली मतं जाणता. लोकांनाही माझी ही मतं माहिती आहेत. मला आशा होती की, तुमचे लोकही या माझ्या मताचा स्वीकार करतील. पण मला असं वाटतंय की, माझ्या या भूमिकेचा आरएसएसवर कोणताच परिणाम झालेला दिसत नाही. त्यांच्या कार्यक्रमातही कोणत्याही प्रकारचं परिवर्तन झालेलं नाही. याबाबत माझ्या मनात कोणताही संदेह नाही की, संघानं स्वातंत्र्यानंतर निर्माण झालेल्या देशांतर्गत परिस्थितीत हिंदू धर्माची सेवा केलीय. अशा भागात जिथं लोकांना मदतीची गरज होती. याशिवाय अशाप्रकारच्या संघटनेची जिथं गरज होती की, तिथं संघाच्या तरुणांनी महिलांचं आणि लहान मुलांचं रक्षण केलंय, मदत केलीय. मीच काय पण कोणीही समजूतदार माणसं याबाबत शंका घेणार नाही. प्रश्न त्यावेळी निर्माण झाला जेव्हा बदला घेण्याच्या भावनेनं मुसलमानांवर हल्ले केले गेले. हिंदूंना संघटित करणं आणि त्यांना मदत करणं ही गोष्ट अलाहिदा पण प्राप्त परिस्थितीत हिंदूंना जो त्रास झाला त्याचा बदला निर्दोष मुस्लिम महिला आणि मुलांवर घेतला जाणं ही वेगळी गोष्ट आहे!"* या पत्रावरून सरदार पटेलांची संघाबाबत बदललेली भूमिका स्पष्ट होते.

*भावी पिढी आपल्याला माफ करणार नाही*

सरदार पटेल आणि जवाहरलाल नेहरू यांच्यात मतभेद होते पण त्याचा अर्थ असा नाही की, ते एकमेकांच्या विरोधात होते. मतभेद कुणामध्ये नसतात? दोन सख्या भावाभावात किंवा मित्रांमध्ये देखील असतात. एकाच पक्षातील दोन नेत्यांमध्ये मतभेद असणं हे लोकशाहीचं सौंदर्य म्हणायला हवं, ते जिवंत लोकशाहीचं लक्षण म्हटलं पाहिजे. आजकाल असं चित्र रंगविण्यात येतंय की, सरदार पटेल हे नेहरूंच्या विरोधात होते. इतिहासाला अशाप्रकारे तोडूनमोडून विपरितपणे भविष्य बदलण्याचा, भावी पिढीसमोर ठेवण्याचा प्रयत्न केला गेला तर भावी पिढीच काय वर्तमान देखील आपल्याला कधीच माफ करणार नाही! हे मात्र निश्चित!

*काक तो खाकमें मिल जायेगा*

जून १९४६ मध्ये जवाहरलाल नेहरू हे कारागृहात असलेल्या शेख अब्दुल्ला यांना भेटून न्यायालयात त्यांची केस लढविण्यासाठी निघाले होते. परंतु तत्कालीन काश्मीरचे प्रधानमंत्री रामचंद्र काक यांनी नेहरु यांना ते श्रीनगर पोहोचण्यापूर्वीच त्यांची धरपकड केली होती. त्यावेळी याबाबत कुणीतरी सरदार पटेल यांना विचारलं, "सरदारसाहेब, काक यांचं काय? त्यांनी नेहरूंना अटक केलीय!" त्यावर सरदार पटेलांनी संताप व्यक्त केला, ते म्हणाले, "काक तो हमेशा खाकमें मिल जायेगा!" यावरून सरदारांच्या नेहरूंबाबतची भूमिका आणि त्यांची मानसिकता स्पष्ट होते.

*नेहरूंनी केली पटेलांची वाखाणणी*

भगतसिंगांना फाशी दिल्यानंतर कराची इथे संपन्न झालेल्या काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनाचे अध्यक्षपद सरदार पटेलांनी भूषविलं होतं, त्या अधिवेशनात नेहरूंनी आपल्या भाषणातून सरदार पटेल यांची जाहीरपणे वाखाणणी केली होती, गौरव केला होता. याविषयी नेहरूंनी आपल्या आत्मचरित्रात लिहिलं आहे की या *"अधिवेशनात अध्यक्षस्थानी असलेले सरदार वल्लभभाई पटेल हे हिंदुस्थानात लोकप्रिय असलेले एक जबरदस्त, भारदस्त असे व्यक्तिमत्व होते त्यांनी गुजरात मध्ये झालेल्या बारडोली सत्याग्रहाच्या वेळी शेतकऱ्यांचे यशस्वी नेतृत्व करून सुकिर्ती, ख्याती प्राप्त केली होती"* यावरून नेहरू आणि पटेल यांचे परस्पर संबंध लक्षांत येईल. 

*पटेल हे गांधीजींचे पट्टशिष्यच नव्हे तर भक्तही*

१८३० मध्ये गोलमेज परिषद भरली असताना ग्लोन वॉल्टन नामक एका इंग्रज पत्रकारानं  *'द ट्रेजडी ऑफ गांधी'* या आपल्या पुस्तकात लिहिलं आहे की 'मुलतान नावाच्या एका जहाजात जे भारतीय नेते बसले होते, त्यांच्यात एक चर्चा सुरू होती. ती त्यांची सारी चर्चा ही गांधीजींच्या विरोधात होती. त्यांना हे माहीत होतं की गांधीजी विरुद्ध काँग्रेसची वर्किंग कमिटीतील अनेकजण आहे आणि त्यांनी एक षडयंत्र रचले आहे. त्यांना हेही माहीत होतं की, ती वेळ येताच  काँग्रेस वर्किंग कमिटीतील काही मंडळी गांधीजींना काँग्रेसमधून उखडून फेकून देतील, याशिवाय काँग्रेस वर्किंग कमिटी ही गांधींबरोबरच त्यांच्या जवळच्या लोकांना देखील काढून टाकील!' या बातमीने त्यावेळी खळबळ उडाली होती. नेहरूंनी या अशा बातम्यांना 'हवेत केलेला गोळीबार' असं म्हणत फेटाळून लावलं हे षडयंत्र रचणारे कोण आहे त्याचा हेतू काय आहे? असा सवालही केला होता. त्याचवेळी असं सांगण्यात आलं होतं की काँग्रेस वर्किंग कमिटीच्या सदस्यांमध्ये मी आणि सभापती सरदार वल्लभभाई पटेल हे दोघे अत्यंत तापट स्वभावाचे आहेत यावरून या षडयंत्र रचणाऱ्यांमध्ये आमचेही नाव घेतले जाईल! खरं तर सरदार वल्लभभाई पटेल हे गांधीजींचे पट्टशिष्य आणि भक्त म्हणून ओळखले जातात त्यांच्याशिवाय दुसरा कोणी असा त्यांचा भक्त वा शिष्य असेल असं मला वाटत नाही ते स्वतः कडक शिस्तीचे आणि मजबूत विचाराने काम करणारे होते, त्यांचं राजकारणच नव्हे तर जीवन देखील मूल्याधिष्ठित होते.पण गांधीजींचा विचार, त्यांचा आदर्श, त्यांची नीती, त्यांचे व्यक्तिमत्त्व याच्याविषयी पटेलांना खूपच भक्ती होती. पण मी असा दावा करत नाही की, गांधीजींना मी त्यांच्या आदर्शासह स्वीकारलेलं आहे. पण मला त्यांच्या अत्यंत जवळ राहण्याचं भाग्य मला प्राप्त झालेलं आहे. त्यांच्याविरुद्ध षडयंत्र निर्माण करण्याचा विचार देखील माझ्या मनात येऊ शकत नाही तो माझा पराभव असेल आणि गांधीजींच्या संस्कारांचाही पराभव असेल!

*जागतिक घडामोडीतील वास्तव गांधीजींनी ओळखले*

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात आणि देशाच्या स्वातंत्र्य निर्मितीत सरदार पटेल आणि नेहरू यांची भूमिका आणि कार्यकर्तुत्व एकसमान होतं. दोघे एकमेकांचे प्रतिस्पर्धी नव्हते तर ते एकमेकांना पूरक असेच होते नेहरू हे गांधींचे आदर्श विचार राबविणारे होते तसेच, जागतिक घडामोडीबाबत राष्ट्रीय दृष्टिकोन असलेले जे काही लोक होते त्यात नेहरूंचा समावेश होता. तर सरदार पटेल हे काँग्रेस पक्षाची संघटना आणि देशांतर्गत व्यवस्था चालविणारे कर्मयोगी होते. पंडित जवाहरलाल नेहरू यांना आपला वारसदार नेमताना महात्मा गांधींनी अत्यंत विचारपूर्वक निर्णय घेतला होता. गांधीजींनी सरदार पटेलांना वारसदार म्हणून नाकारण्याचं प्रमुख कारण होतं ते म्हणजे पटेलांचं वय झालेलं होतं त्यांना देशाची जबाबदारी झेपणारी नव्हती. दुसरं महत्त्वाचं कारण असं होतं की दुसऱ्या महायुद्धानंतर कठीण बनलेल्या वैश्विक परिस्थितीत भारतात स्वतःचं वेगळं असं स्थान निर्माण करायचं होतं त्यासाठी जागतिक दृष्टिकोन असल्याची गरज होती ती नेहरूंकडे होती. इंग्रजांनी जेव्हा देशात कारभार करण्यासाठी जे कामचलाऊ सरकार बनवलं त्यात सरदार पटेल यांच्याकडे गृह खातं सोपविण्यात आलं होतं, आणि नेहरू यांच्याकडं विदेशमंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. त्यामुळं सरदार पटेल आणि पंडित नेहरू यांची एकमेकांशी तुलना करताच येणार नाही कारण दोघांनी त्यावेळी आपापली भूमिका यशस्वीपणे, मजबुतपणे पार पाडली होती

*पटेल हे माझे थोरले बंधू : नेहरू*

महात्मा गांधी यांच्यासोबत त्यांच्या आश्रमात राहणारे हरीभाई उपाध्याय हे पंडित नेहरू आणि सरदार पटेल या दोघांच्याही निकटवर्ती होते त्यांनी पटेल आणि नेहरूंच्या परस्पर संबंधाबाबत आपल्या 'सरदार पटेल अँड कॉन्ट्रास्ट नेहरू' या पुस्तकात लिहिलं आहे की, 'पंडित नेहरू आणि सरदार पटेल यांचे विचार वेगळे होते. दोघांची कार्यशैली देखील वेगळी होती. कामचलाऊ सरकारमध्ये सरदार पटेलांनी पंडित नेहरूंना आपले नेते मानायला सुरुवात केली होती. नेतृत्व मान्य केलं होतं. तर दुसर्‍या बाजूला नेहरू देखील सरदार पटेल यांचा आदर करीत होते, सन्मान करीत होते. या दोघांमध्ये मतभेद आणि गैरसमजआहेत असं लोकांना वाटत होतं. काही लोकांना त्यांच्यातील मतभेद, गैरसमज वाढावेत असं वाटत होतं. परंतु सरदार यांनी कधीच अशा गोष्टीना थारा दिला नाही. प्रसिद्ध होणाऱ्या अशाप्रकारच्या बातम्यांना महत्त्व दिलं नव्हतं. दोघांची राजकारणाबाबत आपली विशिष्ठ मतं होती, त्यानुसारच ते काम करीत असल्यानं तिसऱ्या कोणी त्यांच्या पद्धतीबद्दल आलोचना करायला लागला तर दोघेही त्याच्यावर रागवत, फैलावर घेत. दोघे एकमेकांसाठी ढाल म्हणून त्याकाळी काम करत होते. एकमेकांना सांभाळून घेत होते. जेव्हा सरदार मृत्युशय्येवर होते तेव्हा त्यांनी आपल्या एका जवळच्या मित्राला बोलावून सांगितलं होतं की 'नेहरूंवर लक्ष असू दे, त्यांना जपा!' एकदा नेहरूंना एक विशेष व्यक्ती म्हणाली की सरदार पटेलांनी तुमच्याविषयी कडक भाषेत टीकाटिप्पणी केली. तेव्हा नेहरूंनी त्या माणसाला बजावलं की, काही झालं ते तर मला माझ्या थोरल्या भावासारखे आहेत आणि माझ्यावर टीका करण्याचा, बोलण्याचा त्यांचा अधिकार आहे खरंतर ते आपल्या सगळ्यांचे कस्टोडीयन आहेत..!

*पटेलांना नेहरूंबाबत आकस नव्हता*

सरदार पटेलांना नेहरूंप्रती कोणताही आकस व त्याबाबतची कटुता नव्हती. नॅशनल बुक ट्रस्टने सरदार पटेल यांनी लिहिलेल्या पत्रांचं संकलन करून एक पुस्तक प्रसिध्द केलंय. सरदार पटेलांचं एक पत्र पंडित जियालाल कौल जलाटी (असिस्टंट जनरल जम्मू काश्मीर, १९ जून१९४६) यांना उद्देशून लिहिलंय, *"राजकीय आंदोलनांना धार्मिक-जातीय प्रश्नांपासून दूर राखायला हवंय. मी मानतो की, नेहरू स्वतः शांतीचा संदेश घेऊन  व्यक्तिगतरीत्या काही समजुती घडविण्यासाठी काश्मीरला येताहेत. नेहरू हे हिंदूतर आहेतच पण स्वतः काश्मिरी पंडितही आहेत. ते एक कडवे देशभक्त आहेत, आधुनिक भारताचे महान नेते आहेत. असं असलं तरी ते एक माणूस आहेत त्यांच्याकडूनही काही चूक होऊ शकते. माणुसकीच्या दृष्टीनेही नेहरू उच्च कोटीचे आहेत. त्यांनी आजवर जी कामं केली, निर्णय घेतले त्यात देशासाठीची उत्कृष्ट समर्पण भावनाच दिसून येते. आपण आशा करू या की, काश्मीरचा तोडगा लवकर निघेल. आपण कुणाच्याहीप्रती कटुता ठेऊ नये."*  नेहरूंनी ८ ऑक्टोबर १९४७ रोजी सरदार पटेलांना लिहिलेल्या पत्रात स्पष्ट केलं की, *"मला वाटतं की, काश्मीर समस्या सोडविण्यासाठी कोणतीही कसर आपण ठेवलेली नाही. काश्मीर प्रश्न सोडविण्याबाबत जे धोरण, जी नीती अवलंबिली आहे, त्याबाबत आपल्यात मतभेद असतील पण त्याची मला काही माहिती नाही. असं असलं तरी अनेक जणांना असं वाटतं की आपल्यात मतभेद आहेत. त्यामुळे आपल्यातील संबंध आणि आजूबाजूच्या लोकांच्या सदभावना यात दुर्दैवानं याला धक्का लागलाय. मला या गोष्टीचंही खूप दुःख झालं आहे."*

*दोन्ही महानायकांना कलंकित करतो आहोत*

दुर्दैवाने स्वातंत्र्य लढ्यातील महानायकांना समोरासमोर भिडवून आपण खरंतर त्यांच्या समर्थकांचे गट निर्माण करतोय आणि त्याबरोबरच या दोन महानायकांचं कार्यकर्तृत्व कलंकित करतो आहोत. त्यांच्या त्यागावर शिंतोडे उडवीत आहोत.याची जाणीवच राहिली नाही.त्याबाबतचे ऐतिहासिक संदर्भ देतानाही इतिहासकार आणि राजकीय विश्लेषक आपापल्या बुद्धीनं, इराद्यानं आणि राजकीय हेतूनं अर्थ लावताहेत. आगामी लोकसभा निवडणुकीपर्यंत भाजप आणि काँग्रेसचे नेतेमंडळी आपापल्या बौद्धिक उंचीप्रमाणे ग्रंथालये, जुने दस्तऐवज यांचा धांडोळा घेतील. 

- हरीश केंची,
९४२२३१०६०९

No comments:

Post a Comment

आपलं ठेवायचं झाकून......!

"एकचालुकानुवर्तीत पक्ष आणि सत्ताधारी असं रूप 'लोकशाहीची जननी' म्हणवणाऱ्या देशात आकाराला येतंय. सामूहिक नेतृत्वाची प...