Saturday 17 March 2018

फिल्मी चांदोबा राजकारणाच्या गगनात!

*फिल्मी चांदोबा राजकारणाच्या गगनात!*

जेव्हा राजकीय क्षेत्रात निर्णायकी होते, 'मता-मतांचा गलबला, कोणी न पुसे कोणाला' अशी शोचनीय अवस्था निर्माण होते, त्यावेळी कोण पुढं सरसावेल ह्याचा काही नेम नसतो. मोगल सल्तनीच्या अखेरच्या दिवसात हे असे झाले होते, उत्तरपेशवाईत असंच घडलं होतं. जेव्हा कर्तव्यभ्रष्ट नेतृत्व खुर्चीवादाच्या हीन चिखलात लोळण गHयेते, क्षुद्र वैयक्तिक स्वार्थाच्या शेणात आकांक्षांचे बंगले बांधते तेव्हा दुसरं काय होणार? नको नको ती माणसं राजकारणाच्या क्षेत्रात उतरतात. आपल्या स्वाभाविक मर्यादा ओलांडून नट-नर्तक नेते बनू पाहतात. सध्या आपल्या देशात हे असंच काही घडतं आहे. ..कोणी सोमाजी गोमाजी राजकारणावर बोलू लागतो. कोणीही झेडपी पातळीवरचा भडकसिंग जर 'सोशालिझम डेमोक्रॅसी, सेक्युलॅरिझम' ह्या शब्दांचे स्पेलिंग माहीत नसताना देखील लेक्चरे झाडू धजतो, तर आमच्या फिल्मी फर्जंदांनी काय घोडं मारलं? त्यांनाही या निवडणूक मोसमात जर कंठ फुटला आणि त्यांनी आपल्या व्यवसायाच्यावतीने एखादी पार्टी स्थापन केली तर काय बिघडले? माळरानावर वाळवी लागल्याने महावृक्ष कोसळून पडतात आणि नवीन महावृक्ष निर्माण होण्याची शक्यताच दिसत नाही तेव्हा....
*'निरस्त पादपे देशे*
*एरंडोअपि दृमायते'*
या न्यायाने एरंडाची झाडेही उंचावू लागली तर आश्चर्य कसले? सवंग लोकप्रियता, प्रसिद्धीलोलुपता इत्यादी गुणात राजकीय नेत्यांशी खूपच साम्य असलेल्या आमच्या फिल्मी चांदोबांनी, रजनीकांत आणि कमल हसन यांनी तामिळनाडूतल्या येत्या विधानसभा निवडणुकांसाठी आपापल्या पक्षाची स्थापना केलीय. हे आजच्या जमान्याला साजेसं, शोभेसं आहे!
------------------------------------------------------------------

*दोन अभिनेते.....बनले राजकीय नेते
तामिळनाडूत गेली पन्नासवर्षे डीएमके आणि एआयडीएमकेचं शासन कार्यरत आहे. द्रविडियन राजकारण आणि केंद्राविरोधी भावना यामुळेच तिथं स्थानिक पक्षाचं वर्चस्व राहिलं आहे. राष्ट्रीय पक्षांनी इथं खूप प्रयत्न केला पण त्यांना कधीच यश मिळालं नाही. रजनीकांत भले तिथले सुपरस्टार आहेत, पण द्रविडियन नाहीत. रजनीकांत मराठी आहेत. शिवाजी गायकवाड हे त्यांचं नांव. त्यांचा जन्म कर्नाटकातला पण गेली ४३वर्षे ते तामिळनाडूत राहताहेत. द्रविडियन आणि मूलतामिळभाषी थिअरी मानणाऱ्या लोकांच्या मते ते तामिळनाडूतल्या घडामोडींवर प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसतात पण त्यांची भूमिका ही संधिग्ध आणि अस्पष्ट राहिलीय. कधी कधी तर द्रविडियन अस्मितेप्रकरणी त्यांचं मौन हे लोकांना खुपणारं ठरलेलं आहे. कमल हसन हे द्रविडियन आहेत, उच्चवर्णीय आहेत. ते डाव्या विचारसरणीचे आहेत. सर्वसामान्य नव्हे तर एका विशिष्ट वर्गात ते लोकप्रिय आहेत. तामिळनाडूत या दोन अभिनेत्यांनी राजकारणात आपलं नशीब आजमायचं ठरवलंय पाहू या तामिळ जनता कुणाच्या मागे उभी राहतेय! पारंपारिक डीएमके, एआयडीएमके की ह्या नव्या पक्षांच्या!

 *ता* मिळनाडूच्या राजकारणात रजनीकांत नंतर आता कमल हसन चित्रपट अभिनेत्याने उडी घेतलीय. रजनीकांतप्रमाणे त्यानंही आपला नवा पक्ष स्थापन केलाय आणि तोही दिल्लीच्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या साक्षीनं! 'मक्कल निधी मय्यकम' अर्थात लोक न्याय पार्टी असं त्याचं नामकरण कमल हसन यानं केलंय. त्याआधी त्यानं भूतपूर्व राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या बंधूंची मोहम्मद मुथुमीरन लेब्बाई मराईक्कायार यांचा रामेश्वरम इथं त्यांच्या निवासस्थानी जाऊन आशीर्वाद घेतला. अब्दुल कलमांच्या तसबिरीला वंदन केलं.

*कलाम आणि महात्मा गांधी हे आदर्श*
आपण कलाम यांच्या गावी, त्यांच्या निवासस्थानी जाऊन येण्यामागे असलेली आपली भूमिका स्पष्ट करताना कमल हसन म्हणाला 'माझ्या जीवनात महात्मा गांधी आणि अब्दुल कलाम हे दोन आदर्श आहेत. त्यांच्या विचारानं मी लोकांची सेवा करू इच्छितो!' असं त्यानं सांगितलं असलं तरी विरोधकांनी त्याच्या या भूमिकेवर टीका झालीय. त्याचं हे वागणं तद्दन राजकीय आहे. आज त्याच्याकडे कोणताही विचार व मूल्याधिष्ठित राजकारणासाठी लागणारी परिपक्वता नाही. त्यामुळेच त्यानं महात्मा गांधींबरोबरच अब्दुल कलाम यांच्या वलयाचा फायदा घ्यायचा निश्चय प्रयत्न केलेला दिसतो. मात्र यामागे कोणतंही राजकारण नाही तर केवळ श्रद्धा आहे असं कमल हसन यानं स्पष्ट केलंय.

*कमलमध्ये राजकीय कुटनीतीचा अभाव*
बॉलीवूडच्या अभिनेत्यांपासून दाक्षिणात्य अभिनेत्यांपर्यंत साऱ्यांनाच राजकारणाबाबत नेहमीच आकर्षण राहिलेलं आहे. कमल हसन हा देखील त्याप्रमाणे एक आहे. सामाजिक प्रश्नांबाबत केवळ प्रतिक्रियाच त्यानं व्यक्त केलेल्या नाहीत तर त्याच्या चित्रपटातूनही त्यानं सामाजिक समस्यांवर त्यानं बोट ठेवलं आहे. तामिळनाडूतल्या राजकीय विश्लेषकांच्या मते कमल हसन रजनीकांत प्रमाणे चतुर तर आहे, पण अनेकदा जे काही बोलतो त्यात गूढता असते, सामान्यजनांना ते फारसं समजतच नाही. तो राजकारणाबाबत स्पष्टवक्ता आहे पण त्याच्याकडे राजकीय कुटनीतीचा अभाव आहे. ज्याला राजकारणात फार महत्व आहे.

*नव्या पक्षांमुळे इथं कमळ फुलण्यात अडचणी*
त्याची तामिळनाडूतील लोकप्रियता पाहता त्याला तरुणांचा पाठींबा मिळेल, पण रजनीकांत यांच्याशी तुलना करता त्याचे प्रशंसक खूप कमी आहेत. रजनीकांत यांचे पन्नास हजाराहून अधिक फॅनक्लब्स आहेत जी त्यांची व्होटबँक समजली जाते. तर कमल हसन चे फॅन्स हे सामाजिक काम करत असतात. रजनीकांत यांचे फॅन्स त्यांना देव मानतात त्याची अनेक ठिकाणी पूजाही केली जाते. मात्र कमल हसन यांच्या फॅन्स यांना हे अजिबात मान्य नाही. किंबहुना अशी पूजा करण्याचा विरोधात त्यांनी आंदोलने केली आहेत
जयललितांच्या निधनानंतर एआईएडीएमके पक्षाचे संयोजक आणि तामिळनाडूचे हंगामी मुख्यमंत्री पनीरसेल्वम यांनी म्हटलं आहे की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार आपण पलामीसामी गटाशी हातमिळवणी केली. आता तामिळनाडूत कमल हसन यांचा उदय झाला आहे. त्यानं भाजपचा कमळ इथं फुलण्यात अडचणी उभ्या राहिल्या आहेत.

*द्रविड राजनीतीचा नवा चेहरा*
कमल हसन याच्याआधी तामिळनाडूतल्या राजकारणात उतरलेल्या रजनीकांत यांना भाजपेयींचा पाठींबा मिळतोय. त्यांना आशा आहे की, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत रजनीकांतशी युती करून  निवडणुकीला सामोरं जाता येईल. कमल हसन याने पक्षस्थापना करतानाच स्पष्ट केलं की, 'आपला पक्ष हा द्रविड विचारधारानुसार चालणारा  असेल!' त्याच्या या धोरणानं जयललितांच्या निधनानंतर 'द्रविड राजनीतीचा चेहरा' बनू पहात आहेत. त्यानं अद्याप आपली राजकीय भूमिका काय असेल हे स्पष्ट केलं नसली तरी एआईएडीएमके ला विरोध करून आगामी वाटचाल कशी असेल याची चुणूक दाखवलीय. गेल्या रविवारी त्यानं डीएमकेचे पक्षप्रमुख करुणानिधी यांची भेट घेतली होती. त्यांच्या भेटीनंतर त्यानं म्हटलं होतं की, आमच्या विचाराशी डीएमकेची विचारधारा मिळतीजुळती आहे. यामुळे कदाचित त्यांच्याशी युती करण्याची शक्यताही व्यक्त केली जाते.

*अभिनेत्यांना राजकारणाचं आकर्षण*
तामिळनाडूत सिनेअभिनेत्यांना नेत्यांपेक्षा मोठा प्रतिसाद लाभतो त्यामुळे चित्रपटव्यवसायात असलेले अनेकजण राजकारणाशी जोडले जातात. तमिळनाडूत ही सामान्यबाब आहे. आणि ही मंडळी इथं यशस्वी होतानाही दिसतात. त्यामुळे केवळ आमदार-खासदार नाही तर राज्याचे मुख्यमंत्रीही बनले आहेत. एमजीआर म्हणून ओळखले जाणारे एम.जी.रामचंद्रन हे तामिळनाडूचे पहिले सुपरस्टार होते की, ज्यांनी राजकारणात पाऊल ठेवलं. त्यांनी अण्णा द्रविड मुनेत्र कळघम-एआईएडीएमके हा राजकीय पक्ष स्थापन केला. १९७७ ते १९८७ दरम्यान एम. जी. रामचंद्रन हे राजकारणात कार्यरत होते. आपल्या कार्यकर्तृत्वानं त्यांनी तिथंही सुपरस्टार म्हणून कारकिर्द गाजविली. एम.जी.रामचंद्रन यांच्यानंतर जयललिता या लोकप्रिय अभिनेत्रीनं राजकारणात प्रवेश केला. १९६१ मध्ये अभिनय क्षेत्रात, फिल्म करियरला सुरुवात करणाऱ्या जयराम जयललिता यांनी जवळपास १५०चित्रपटातून कामे केली. १९८२ मध्ये जयललिता यांनी अण्णाडीएमके पक्षात प्रवेश केला आणि बघता बघता त्या पक्षाच्या एक महत्वाच्या नेत्या बनल्या. १९९१मध्ये त्या तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीदेखील बनल्या. तामिळनाडूत हिंदी भाषेच्या विरोधात राजकारण करून स्थान मिळविणारे करुणानिधी हे देखील  नाटककार आणि पटकथा लेखक होते. त्यांनी पांच वेळा मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळलीय. त्यांची कलेच्या क्षेत्रातील विद्वान म्हणूनही ओळख आहे.

*कमल हसन करुणानिधीकडे झुकणारा*
आता तामिळनाडूत एकाचवेळी दोन सुपरस्टार राजकारणाच्या आखाड्यात उतरले आहेत. आधी रजनीकांत आणि आता कमल हसन! या दोन्ही सुपरस्टार यांच्या विचारधारा अलग अलग आहेत. रजनीकांत प्रधानमंत्री मोदींच्या जवळचे समजले जातात. तर कमल हसन मोदींच्या धोरणांना कट्टर विरोध करणारा समजला जातो. पण आपल्या पक्ष स्थापणेच्यापुर्वी कमल हसन रजनीकांत यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. तेव्हा अशी शक्यता व्यक्त केली जात होती की, हे दोघे एकत्र येतात की काय? याबाबत आताच काही सांगता येणार नाही, सध्या दोघे आपल्या विचारसरणीनुसार वाटचाल करतील. पण पुढे भविष्यात एकत्र येण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

*रजनीकांत-कमल हसन भेटीचं रहस्य*
आता हे दोघे एकमेकांना शुभेच्छा देताहेत. कमल हसन म्हणतो, 'आमची ही भेट शुभेच्छा भेट होती, आपण आता राजकीय क्षेत्रात प्रवेश करतो आहोत याविषयी माहिती मी त्यांना देण्यासाठी त्यांच्या घरी गेलो होतो'. तर रजनीकांत म्हणतात,'कमल हसन लोकांची सेवा करण्यासाठी राजकारणात येऊ इच्छितो आहे. आणि त्यांच्या या निर्णयाविषयी शंका घेण्याचं काही कारण नाही'. जेव्हा रजनीकांत यांनी पक्ष स्थापनेची घोषणा केली त्यावेळी कमल हसन यांनीही तेव्हा शुभेच्छा पाठविल्या होत्या. विशेष म्हणजे गेली अनेक वर्षे ते दोघे खास मित्र आहेत. त्यामुळे त्या दोघांचे पक्ष वेगवेगळे असले तरी कालांतराने ते एकत्र आले तर आश्चर्य वाटायला नको.

*कमल हसनचा नरेंद्र मोदींना विरोध*
कमल हसन हा अरविंद केजरीवाल यांच्या कार्यकर्तृत्वाने प्रभावित आहे. त्यांच्याकडे तो रोलमोडेल म्हणून पाहतो. त्यामुळेच केजरीवाल यांना पक्षस्थापनेवेळी आमंत्रित करण्यात आलं होतं. केजरीवाल यांच्याशिवाय केरळचे मुख्यमंत्री आणि सीपीएम नेते पिनराई विजयन यांच्याशीही कमल हसन यांचे घनिष्ठ संबंध आहेत. या भाजपविरोधी नेत्यांशिवाय डीएमकेच्या करुणानिधी आणि त्यांचे पुत्र एम.के.स्टॅलिन यांचीही त्याने भेट घेतलीय. मोदींच्या धोरणांच्या, नीतीच्या आणि निर्णयांची तो मोठ्याप्रमाणात आलोचना करतो. जाहीरपणे त्यांनी मोदींवर टीका केलीय.

*कमल हसनचा पॉलिटिकल स्टार्ट अप*
एवढंच नाही तर एआईएडीएमके च्या कारभारावरही त्यानं कोरडे ओढलेत. त्यानं आता 'पॉलिटिकल स्टार्ट अप' घेतल्याचं दिसतंय. अण्णाडीएमके विरोधी मतं आपल्याकडं खेचू इच्छितोय.या कारणांमुळे डीएमकेला फायदा होईल अशी भूमिका दिसते. राजकीय विश्लेषकांच्या मते डीएमकेची व्होट बँक तोडणं सहजा सहज शक्य नाही.तामिळनाडूत असा इतिहास घडलाय की, एकदा डीएमके तर एकदा एआईएडीएमके सत्ताधारी बनले आहेत. शहरातील मध्यमवर्गाची मतं कमल हसन खेचू शकतो. पण ग्रामीण भाग जो खूप मोठा आहे, तिथं कसं होणार?

*राजकारणात यायला तसा उशीरच झालाय*
जाणकारांच्या मते रजनीकांत आणि कमल हसन यांनी राजकारणात यायला उशीर केलाय.एम.जी.रामचंद्रन आणि जयललिता यांनी राजकारणात प्रवेश केला तेव्हा त्यांची फिल्मी कारकीर्द टॉपवर होती. राजकारणात यश मिळेलच याची कुणालाच खात्री देता येत नाही. तेलुगु मेगास्टार एन.टी. रामाराव यांनी अचानकपणे तेलुगु देशम पक्ष स्थापन करून राजकारणात प्रवेश केला . राज्याच्या मुख्यमंत्रीपदापर्यंत ते पोहोचले होते. आता फिल्मी कारकिर्दीत अप्रतिम यश मिळवणारे रजनीकांत आणि कमल हसन यांनी राजकारणात आता प्रवेश केलाय त्यांना किती आणि कितपत यश मिळेल हे आगामी काळच सांगेल.

*द्रविडियन राजकारण इथं यशस्वी होतं*
 तीन चार पिढ्यांना आपल्या अभिनयानं वेड लावणाऱ्या ६७ वर्षीय अभिनेता रजनीकांत यांना तामिळ लोक स्वीकारतील का ही एक शंकाच आहे! तमिळनाडूचं राजकारण याचा उल्लेख राष्ट्रीय राजकारणात द्रविडियन राजकारण म्हणून ओळखलं जातं. द्रविडियन राजकारणात रुपेरी पडद्यावरील कलाकारांना स्वीकारल्याची अनेक उदाहरणे आहेत. एमजीआर, करुणानिधी, जयललिता यांना लोकांनी डोक्यावर घेतलं. सध्याचे मुख्यमंत्री पलानिस्वामी, टी.टी.व्ही.दीनाकरन, पनीरसिल्वम हे इथले महत्वाचे राजकारणी पण त्यांना एमजीआर, जयललिता यांच्यासारखा जनाधार मिळेल अशी खात्री देता येत नाही. तशीच थोड्याफार फरकाने रजनीकांत यांचीही आहे.

-हरीश केंची
९४२२३१०६०९


चौकट....

*रजनीकांत समोरील अडचणी*
 तामिळनाडूत गेली पन्नासवर्षे डीएमके आणि एआयडीएमकेचं शासन कार्यरत आहे. द्रविडियन राजकारण आणि केंद्राविरोधी भावना यामुळेच तिथं स्थानिक पक्षाचं वर्चस्व राहिलं आहे. राष्ट्रीय पक्षांनी इथं खूप प्रयत्न केला पण त्यांना कधीच यश मिळालं नाही. रजनीकांत भले तिथले सुपरस्टार आहेत, पण द्रविडियन नाहीत. रजनीकांत मराठी आहेत. शिवाजी गायकवाड हे त्यांचं नांव. त्यांचा जन्म कर्नाटकातला पण गेली ४३वर्षे ते तामिळनाडूत राहताहेत. द्रविडियन आणि मूलतामिळभाषी थिअरी मानणाऱ्या लोकांच्या मते ते तामिळनाडूतल्या घडामोडीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसतात पण त्यांची भूमिका ही संधिग्ध आणि अस्पष्ट राहिलेली आहे. कधी कधी तर द्रविडियन अस्मितेप्रकरणी त्यांचं मौन हे लोकांना खुपणारं ठरलेलं आहे.

1 comment:

  1. महान अभिनेत्री जया भादुरी यांची राज्यसभेवर वर्णी लागताच असभ्यतेने नाची म्हणून उल्लेख करणारे भाजपात नुकताच प्रवेश करणारे थोर नेत्यास आपण विसरलात असेच म्हणावे लागोल आम्हासी. दक्षिण कला संस्कृतीने समृद्ध, मग येथील नागरिकांचे नेतृत्व त्यातील नेतृत्वच करणार ना ! मला आश्चर्य वाटते रजनीकांतचे. दाद द्यायला हवी त्याच्या हिंमतीस. एक मराठी माणूस दक्षिणात्य नेतृत्व करायला पुढे सरसावला आहे. एवढं प्रेम मिळवले असेल त्याच्या कलेने ?
    माणूस , प्रांत इ. भेदापेक्षा त्यांना संस्कारसमृद्ध करणारी कला महान

    ReplyDelete

आपलं ठेवायचं झाकून......!

"एकचालुकानुवर्तीत पक्ष आणि सत्ताधारी असं रूप 'लोकशाहीची जननी' म्हणवणाऱ्या देशात आकाराला येतंय. सामूहिक नेतृत्वाची प...