Friday 1 September 2017

सिद्धी-प्रसिद्धीचा फुत्कार

 *सिद्धी-प्रसिद्धीचा फुत्कार...!*

'प्लेबॉय' म्हणून शोभेल अशा लीला करीत असलेल्या गुरू डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमित राम रहीम इन्सान या नटव्याला आपल्याच आश्रमातील दोन साध्वीवर बलात्कार केल्याप्रकरणी २० वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा झालीय. आणखी काही शिष्यांवर केलेल्या अत्याचाराच्या केसेस अद्याप सुनावणीसाठी आलेल्या नाहीत. त्या येतील तेव्हा त्यातही शिक्षा होईल. केवळ गुरमितच नव्हे तर देशात आज सर्वत्र अशा बाबांनी उच्छाद मांडला आहे. सगळे 'राम' नांव धारण करणारे काही 'हराम'खोर गजाआड झालेत.त्यांच्या या प्रवृत्तीला राजकारणी आणि दोन नंबरच्या धंद्यातले तथाकथित उद्योजक कारणीभूत आहेत. राजकारण्यांसाठीची प्रसिद्धी आणि बुवा बाबांची नसलेली सिद्धी या त्यांच्या सिद्धी-प्रसिद्धीच्या तथाकथित मोहमायेत सामान्य जनता, अनुयायी हे त्यांचे बुद्धिबळाच्या खेळातील प्यादे ठरताहेत. ही परिस्थिती केवळ उत्तरेकडेच आहे असं समजण्याचं कारण नाही महाराष्ट्रातही 'धर्मसत्तेनं राजसत्तेला मार्गदर्शन करावं' असं म्हणणारे सत्ताधारी आहेत. ही त्यांची मानसिकता बदलणार कशी? सत्ताधारी राजकारणीच असे वागत असतील तर मग अशा भोंदू बुवा बाबांना आवरणार तरी कोण?
-------------------------------------------


*आ*ज आधुनिक विज्ञानानं जग जवळ आलंय. बायपास होत हृदयाला भिडलंय. आयुष्याला गती देणाऱ्या, आनंद देणाऱ्या अनेक गोष्टी माणसाच्या जवळ आल्यात. तथापि अनेक सामाजिक, सांसारिक, शारीरिक व्याधी-व्यथांनी माणसाला घेरलंय. माणसं जवळ असली तरी मनानं दूर जाताहेत. अशावेळी देव, धर्म, अध्यात्म याचा त्याला आधार वाटतोय. पण ही त्याची गरज ओळखून काहींनी त्याचा बाजार मांडलाय. बाजार म्हटलं की जे काही असतं ते सारं इथे दिसतं. खरं तर सत्संग हा काही उपचार नाही, ती सहजप्रवृत्ती आहे. ती तशीच असली पाहिजे. 'शेवटचा दिस गोड व्हावा' किंवा मोक्षासाठी देव, धर्म, कार्य नाही. जे आपण अनुभवतो, जगतो त्यातील विकारांचा नायनाट करण्यासाठी सत्संग, अध्यात्म आहे. असा सत्संगच मूर्तीतल्या देवाला, धर्माला, अहंकाराला भडभुंजा ठरवणाऱ्या देवमाणसाचं दर्शन घडवितो. अस चित्र आहे.

*सुशिक्षितही यांच्या कह्यात*
या बुवाबाजीनं केवळ अशिक्षितांनाच नव्हे तर सुशिक्षितांना सुद्धा आपल्या कह्यात घेतलं आहे. त्यामुळे अल्पशिक्षित, अर्धशिक्षितांमध्ये एक वेगळ्याप्रकारच्या संभ्रमाची भावना निर्माण होते. हल्ली आपल्याकडं अध्यात्म, धर्म, श्रद्धा, यासारख्या शब्दांना बरेच चांगले दिवस आले आहेत. जिकडे तिकडे सत्संग, प्रवचन, योग शिबीर, आयोजित केली जात आहेत. प्रसिद्धीमाध्यमे दररोज अशा या बुवा बाबांच्या प्रवचनाचे रतीब घालताहेत. त्यामुळे अशा सत्संगाला हजारो भाविकांची हजेरी लागते. कुण्या बाबा-स्वामी-महाराज-पूज्य यांच्या अनुषंगाने काही वाद निर्माण झालाच तर, त्याच्या बाजूनं वादात लोक मोठ्या संख्येनं उतरतात. बाबा गुरमित याच्यावरील आरोप सिद्ध होताच त्याच्या भक्तांनी हरियाणा, पंजाबमध्ये धुमाकूळ घातला. यापूर्वी आसारामबापू, रामफल, रामवृक्ष यांच्यावर कारवाई झाली तेव्हादेखील अशारीतीने या बुवा, बाबा, गुरू, महाराज यांच्या प्रतिष्ठेच्या रक्षणार्थ त्यांचे अनुयायी रस्त्यावर उतरल्याचे आपण पाहिले आहे. मध्यंतरी नाणीजच्या नरेंद्र महाराजांच्या धर्मदंडाबाबत वाद झाला तेव्हा देखील मुंबई, औरंगाबाद विमानतळावर निदर्शने झाली, दगडफेक झाली, लाठीमार झाला होता. बुवा, बाबांच्या चरणी ज्यांनी आपल्या श्रद्धा अर्पिल्या आहेत, अशा लोकांची संख्या वाढली आहे. या भानगडीत आत्मशांती, सहिष्णुता, अहिंसा, सदाचार वगैरे शिकवण गळून पडते नि भक्त हमरीतुमरीवर येतात.

*'पुण्या'साठीचा शॉर्टकट*
देवाधर्माच्या नावाने पोट जाळणाऱ्यांनी देवाला आकारात आणि धर्माला कर्मकांडात अडकवलं. आधुनिक काळात झालेल्या भौतिक प्रगतीतून लोकांमध्ये भोगवादी वृत्ती वाढते आहे. चंगळ वाढते आहे. एकीकडे मौजमजा करायची, वाट्टेल त्या मार्गाने पैसा, संपत्ती मिळवायची आणि दुसरीकडे पुण्य गाठीशी बांधण्याचा 'शॉर्टकट' म्हणून बुवा-बाबांचा हा सत्संग करायचा; ही वाढती वृत्तीही हे प्रस्थ वाढविण्यास कारणीभूत आहे. उच्चभ्रू वर्गातील सुशिक्षित डॉक्टर्स, इंजिनिअर्स, वकील, शास्त्रज्ञ, व्यापारी, चित्रतारका, खेळाडू, राजकारणी, या मंडळींनी बुवा बाबांचा सत्संग हा स्टेटस सिम्बॉल झाला आहे. सामान्य माणसं त्याचं अनुकरण करतात.

*नियत साफ हवी*
बऱ्याच जणांना या परमपूज्य मंडळींचं भजन-पूजन, आणि वाणी श्रवण केलं की, आपण धार्मिक, आध्यात्मिक झालो असं वाटतं. स्वामी विवेकानंदांनी या वृत्तीवर परखड टीका केलीय. ते म्हणतात, " खऱ्या धर्मात कोणत्याही विश्वासाला आणि श्रद्धेला स्थान नाही. कोणत्याही महान धर्माचार्याने अंधविश्वासाची शिकवण दिलेली नाही. अंधविश्वास हा धर्मग्लानीकाळातच पुढे येतो. मूर्ख लोक कोणातरी महान विभूतीचे अनुयायी असल्याचा आव आणतात आणि त्यांच्या स्वतःमध्ये कोणतेही सामर्थ्य नसले, तरी इतरांना डोळे मिटून विश्वास ठेवण्याचा उपदेश देतात. पण विश्वास ठेवायचा कशावर? आंधळेपणाने श्रद्धा ठेवल्याने माणसाचा अधःपात होतो. तुम्ही नास्तिक झाला तरी चालेल, पण कशावरही डोळे मिटून विश्वास ठेवू नका. उगीच स्वतःला पशूंच्या पातळीवर का घसरू देता? त्यामुळे तुम्ही स्वतः चेच नुकसान घेत नसून, समाजाचेही नुकसान करता! अंधविश्वासाच्या भरीला न पडता दृढतेनं तर्कबुद्धीच्या सहाय्यानं विचार करा. या अवस्थेप्रत जेव्हा तुम्ही पोहोचाल तेव्हाच तुम्ही धार्मिक व्हाल. तोपर्यंत तुम्ही पशुपेक्षा भिन्न नसाल," तर महात्मा गांधींनी म्हटलंय 'श्रद्धा ही नीतीला पर्याय नाही'. मानवी व्यवहाराच्या नावानं दिवसभर अशुभं करायचं आणि सांजवातीला शुभंकरोती म्हणायचं, ही विसंगती देवाधर्माला बदनाम करणारी आहे. अंतरीचा ज्ञानदीप सतत तेवत असेल तर रोजचं जगणंही उजळून निघेल, यासाठी कुणाची करुणा भाकायची गरज नाही. नियत साफ असली म्हणजे बस्स!

*सत्संगाचे सोहळे*
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. सातशे वर्षांची संत परंपरा आहे. पण तुकडोजी महाराजानंतर ती संपली. आज संत म्हणण्याच्या लायकीचा एकही अध्यात्मिक पुरुष नसला तरी बुवा, बाबा, स्वामी, परमपूज्य, महाराज यांची संख्या दिवसागणिक वाढते आहे. त्यांच्याही देवस्थानचे अड्डे थाटात उभे राहत आहेत. अध्यात्म, सत्संग याला धंद्याचं स्वरूप आलंय. सत्संगासाठी हे बुवा, बाबा लाख लाख रुपयांच्या सुपाऱ्या घेताहेत. ह्या सुपाऱ्यांबरोबरच सत्संगासाठीच्या मंडपाला, लाऊडस्पीकरला, प्रसिद्धीला त्याहून अधिक पैसा खर्च केला जातो. तो काही या बुवा, बाबांच्या खिशातला नसतो. तो कुठून आणला जातो? कोण देतो? याची विचारपूस बुवा बाबा करतात का? मिळालेल्या पैशाचा हिशेब कधी कुणाला देतात का? कुमार्गातले दोन नंबरचे धंदे करणारे आणि राजकारणी यांचा हा पैसा असतो.  त्यांच्या दातृत्वाची किंमत त्यांच्या गैरव्यवहाराकडे दुर्लक्ष करून मोजावी लागते. ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही.पण सत्संगाचे मोठमोठाले सोहळे भरवून आपल्या भक्तीचे आणि भक्तांच्या सांघिक शक्तीचे दर्शन घडविण्याची संधी हे बुवा बाबा सोडत नाहीत. माणसात देव आहे म्हणायचं आणि त्यालाच आपला मोठेपणा मिरवण्यासाठी झुकवायचं, वापरायचं हा कसला सत्संग? महाराष्ट्रातल्या संतांनी आखून दिलेला मार्ग हा सन्मानानं जीवनप्रवास करण्याचे बळ देणारा आहे. या प्रवासातील देवांच्या दलालांची आणि धर्माच्या 'हवाला'दारांची गरजच काय?

*राजकारण्यांची खेळी*
गुरमितसारख्या बाबांचे स्तोम उत्तर भारतात खास करून हरियाणा व पंजाबच्या भागात मोठ्याप्रमाणात आहे. उत्तर प्रदेश व उत्तरांचल मध्ये देखील हे प्रमाण अधिक दिसते. याला कारण तिथली सामाजिक व्यवस्था आहे. तिथली जातीय उतरंड आणि असमतोल सामाजिक स्थिती लोकांच्या मनात एक असुरक्षितता निर्माण करत असते. जातीच्या उतरंडीमुळे होणारा अन्याय दूर करण्यासाठी म्हणून डेराच्या अनुयायांनी शीख धर्माचा स्वीकार केला. शीख धर्म तसा सिद्धांत म्हणून जातीविरहित आहे पण, प्रत्यक्षातली परिस्थिती दुर्दैवाने फारच वेगळी आहे. जाट-खत्री या उच्चवर्णीय जातींचा शिखांच्या धार्मिक घटनाचक्रावर प्रभाव आहे. शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटी आणि इतर गुरुद्वारा समित्यांमध्ये त्यांचंच प्राबल्य आहे. त्यांच्यानंतर शीख धर्मात आलेल्यांना पद्धतशीरपणे सत्तास्थानांपासून दूर ठेवलं जातं.  जातीय उच्चनीचतेचं समीकरण या धर्मातही अबाधित ठेवलं गेलं आहे. या असमतोल स्थितीमुळे अनेकांच्या मनात न्यूनत्व येते आणि स्वतःसाठी एक सन्मानजनक स्थिती हवी असते. आणि यातूनच अशाप्रकारचे डेरे आणि बाबांचा जन्म झालाय. कबीरपंथीय रामपाल असो की गुजरात मधील आसाराम या सर्वांनी या लोकांना एक आत्मभान दिले. व्यसनमुक्ती हा एक नवा मंत्र दिला आणि स्वतःची अशी एक वेगळी नशा दिली ज्यातून लोक जोडले जाऊ लागले. धार्मिक कार्यक्रमात सन्मान प्राप्त करू लागले. डेरे,  मठ आणि आश्रम माणसांनी गजबजून राहू लागले. याचा लाभ राजकारणी मंडळींनी घेतला ज्यांना आपल्या राजकारणासाठी ही मंडळी लाभदायक होती. त्यांना व्होटबँक ओळखता येते. म्हणूनच तर ते राजकारणी असतात. त्यांनी असे डेरे उभे राहू दिले, त्यांचा उत्कर्ष होऊ दिला, त्यांची संख्या वाढू दिली. या डेऱ्यांना त्यांनी मोकळं रान दिलं. त्यांना सर्व प्रकारचं पाठबळ देऊन त्यांच्या रूपाने हक्काची मतपेढी बाबांच्या माध्यमातून निर्माण केली. कालचे विरोधक हे आजचे सत्ताधारी बनलेत ते अशाच बाबांच्या सहाय्यानं त्यामुळे शपथविधी सोहळ्याला त्यांना सन्मानानं उच्चासनावर बसवलं गेलं. सत्ता हाती येताच याच बाबांचा वापर विरोधकांनी करु नये, आपल्या विरोधात ही मंडळी जाऊ नयेत म्हणून त्यांना स्वतःच्या स्वार्थासाठी संपविण्याचा प्रयत्न सुरू झालाय, हे विशेष!

*विवेकाची कास सोडलीय*
मात्र महाराष्ट्रात तशी स्थिती फारशी नसली तरी सध्या अध्यात्माच्या नावाने जे काही प्रकार सुरू आहेत ते पाहता महाराष्ट्रातल्या अनेक समाजसुधारकांनी, संतांनी, निर्माण केलेले प्रबोधन लुप्त झालं आहे की काय आणि इथल्या माणसांनी हा सारा संस्कार पाहता  पाहता पुसून टाकला की काय? असं वाटून जावं अशी परिस्थिती आहे. महाराष्ट्रात आणि देशात अध्यात्माची जी नवी आवृत्ती बुवा, बाबांच्या रूपानं अवतरली आहे आणि तिला जो उदंड प्रतिसाद लाभतो आहे, ती पाहता या मंडळींनी ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा सारखे धार्मिक ग्रंथ पचवून एक जोरदार ढेकर दिलेली दिसते. कालपर्यंत खेडूत, ग्रामीण, अशिक्षित, गरीब वर्गाच्या श्रद्धांना विधींना, पुजांना, परंपरांना 'अंधश्रद्ध' म्हणणारा शहरी सुशिक्षित तुलनेने सुस्थिर पांढरपेशा, मध्यमवर्ग अशा विचारांची, विवेकाची कास सोडून बाजू बदलू पाहतो नि सत्संगाना नि प्रवचनांना उपस्थिती लावू पाहतो आहे. या वर्गाने काल पर्यंत मागासलेले अंधश्रद्ध असं ज्यांचं वर्णन केलं होतं, त्यांच्या मांडीला मांडी लावून सश्रद्ध बनले आहेत. त्यामुळेच सत्संगाना हजेरी लावणं, आस्था, संस्कार, जागरण, साधना यासारख्या धार्मिक, आध्यात्मिक चॅनल्सवरील प्रवचन ऐकणं, त्यांच्या अनुषंगाने निर्माण झालेल्या वादात 'भक्त' या नात्यानं सामील होणं असे कारनामे हा वर्ग करू लागलाय. शिक्षणाचा, शहाणपणाचा, योग्य-अयोग्य ठरविण्याचा मक्ता आपल्याकडं आहे, असं मानणारा हा वर्ग पाहता पाहता नवाध्यात्मिक लाटेत सामील झालाय. हे चिंताजनक आहे तिकडे जातीची उतरंड होती इकडे संतांच्या शिकवणीनं, पुरोगामी विचारधारेच्या प्रसारानं ती फारशी नाही. पण यातलं गांभीर्य लक्षात घेतलं पाहिजे.

*सत्संगासाठीच्या सुपाऱ्या*
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. सातशे वर्षांची संत परंपरा आहे. पण तुकडोजी महाराजानंतर ती संपली. आज संत म्हणण्याच्या लायकीचा एकही अध्यात्मिक पुरुष नसला तरी बुवा, बाबा, स्वामी, परमपूज्य, महाराज यांची संख्या दिवसागणिक वाढते आहे. त्यांच्याही देवस्थानचे अड्डे थाटात उभे राहत आहेत. अध्यात्म, सत्संग याला धंद्याचं स्वरूप आलंय. सत्संगासाठी हे बुवा, बाबा लाख लाख रुपयांच्या सुपाऱ्या घेताहेत. ह्या सुपाऱ्यांबरोबरच सत्संगासाठीच्या मंडपाला, लाऊडस्पीकरला, प्रसिद्धीला त्याहून अधिक पैसा खर्च केला जातो. तो काही या बुवा,बाबांच्या खिशातला नसतो. तो कुठून आणला जातो? कोण देतो? याची विचारपूस बुवा बाबा करतात का? मिळालेल्या पैशाचा हिशेब कधी कुणाला देतात का? कुमार्गातले दोन नंबरचे धंदे करणारे आणि राजकारणी यांचा हा पैसा असतो.  त्यांच्या दातृत्वाची किंमत त्यांच्या गैरव्यवहाराकडे दुर्लक्ष करून मोजावी लागते. ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही.पण सत्संगाचे मोठमोठाले सोहळे भरवून आपल्या भक्तीचे आणि भक्तांच्या सांघिक शक्तीचे दर्शन घडविण्याची संधी हे बुवा बाबा सोडत नाहीत. शिवाय प्रसिद्धीमाध्यमे जाहिरातीच्या आमिषानं अशा बाबांच्या, बुवांच्या, महाराजांच्या सोहळ्याची रसभरीत वर्णन प्रसिद्ध करीत असतात. दूरचित्रवाणीवरील वाहिन्या त्यांच्या या सत्संगाचं नियमित रतीब घालीत असतात त्यानं ही भोळी भाबडी माणसं आणि आपल्या कृष्णकृत्यानं आत्मभान हरवलेली मंडळी अशा बाबा, बुवांच्या चरणी लीन होतात.

 *यांना आवरणार कोण?*
देशभर गाजत असलेल्या आणि 'प्लेबॉय' म्हणून शोभेल अशा लीला करीत असलेल्या गुरू डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमित राम रहीम इन्सान या नटव्याला आता आपल्याच आश्रमातील दोन साध्वीवर बलात्कार केल्याप्रकरणी २० वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा झालीय. आणखी काही शिष्यांवर केलेल्या अत्याचाराच्या केसेस अद्याप सुनावणीसाठी आलेल्या नाहीत. त्या येतील तेव्हा त्यातही शिक्षा होईल. केवळ गुरमितच नव्हे तर देशात आज सर्वत्र अशा बाबांनी उच्छाद मांडला आहे. सगळे 'राम' नांव धारण करणारे काही 'हराम'खोर गजाआड झालेत.त्यांच्या या प्रवृत्तीला राजकारणी आणि दोन नंबरच्या धंद्यातले तथाकथित उद्योजक कारणीभूत आहेत. राजकारण्यांसाठीची प्रसिद्धी आणि बुवा बाबांची नसलेली सिद्धी या त्यांच्या सिद्धी-प्रसिद्धीच्या तथाकथित मोहमायेत सामान्य जनता, अनुयायी हे त्यांचे बुद्धिबळाच्या खेळातील प्यादे ठरताहेत. ही परिस्थिती केवळ उत्तरेकडेच आहे असं समजण्याचं कारण नाही महाराष्ट्रातही 'धर्मसत्तेनं राजसत्तेला मार्गदर्शन करावं' असं म्हणणारे सत्ताधारी आहेत. ही त्यांची मानसिकता बदलणार कशी? सत्ताधारी राजकारणीच असे वागत असतील तर मग अशा भोंदू बुवा बाबांना आवरणार तरी कोण?


हरीश केंची

प्रभंजन साठीचा लेख

No comments:

Post a Comment

आपलं ठेवायचं झाकून......!

"एकचालुकानुवर्तीत पक्ष आणि सत्ताधारी असं रूप 'लोकशाहीची जननी' म्हणवणाऱ्या देशात आकाराला येतंय. सामूहिक नेतृत्वाची प...