Thursday 4 May 2017

राजकारण गरजेचे आणि बेरजेचे

*राजकारण गरजेचे अन बेरजेचे...!*

भारतातल्या कोट्यवधी माणसांचे दैनंदिन जीवनही सर्वंकष राजकारणाशी निगडित झाले आहे. कारण असे एकही क्षेत्र नाही की, ज्यांच्याशी राज्यकर्त्या शासनाशी संबंध नाही. पण तरीही अष्टौप्रहर पोटापाण्याच्या विवंचनेत असलेल्या सामान्य रयतेला 'राजकारण कसे असते, वा कसे असावे?' ह्या परिसंवादाशी कर्तव्य नाही. त्यात रस घ्यायला फुरसतही नाही. सामान्य माणूस काकुळतीने इतकंच म्हणेल, की....'बाप हो, राजकारण करा, बेरजेचे करा अथवा वजाबाकीचे करा, त्रैराशिकाचे करा अथवा पंचराशिकाचे करा म्हणजे झाले!' परंतु सामान्यजनांप्रमाणे राजकारणाची अथवा कोणत्या 'कारणा'ची उपेक्षा करुन बुद्धिमंतांचे- इंटेलेक्च्युअल्सचे कसे चालेल? अतिशहाणपणामुळे त्यांचा स्वतःचा राजकारणाचा बैल रिकामा राहिला तरी त्यांना स्वतः ला क्रियाशील राजकारण फारसे जमले नाही; तरी राजकारण चर्चा हा त्यांचा खास प्रांत आहे. प्रत्यक्ष राजकारण आणि राज्यकारण करणाऱ्या मंडळींना 'गाईडलाईन्स' पुराविणाऱ्या यथार्थदीपिका उजळणे हे त्यांचे 'मिशन' आणि कधीकधी कमिशनही आहे. कोणत्यातरी शिवबाचे गागाभट्ट वा रामदास होण्याची अथवा कोण्या चंद्रगुप्तांचे आर्य चाणक्य बनण्याची तमन्ना त्यांच्या दिलाच्या दिवाणखान्यात थैमान घालीत असते. त्या बुद्धिमंतांतील एक पोटवर्ग आहे आम्हा पत्रकारांचा. आम्हास जीवनातील सर्व विषयात रस घ्यावाच लागतो. विशेषत: राजकारणात!  राज्यकर्त्यांची आणि राजकारणाची संगत नको रे बाबा असे आम्हास म्हणताच येत नाही. शासनकर्त्यांना ऐकविणे आणि त्यांचे ऐकणे, त्यांच्या मुलाखती घेणे, त्यांच्याशी प्रश्नोत्तरी करणे हा आमच्या व्यवसायाचाच एक भाग!

राजकारण गरजेचे असते हे राजकारण्यांचे म्हणणे फार महत्वाचे असते, हे सहज लक्षात येईल. राजकारणात कधी कृष्णशिष्टाई, तडजोड, तर कधी कुरुक्षेत्रावरील झोडाझोडी, कधी समझौता, कधी निव्वळ दमबाजीने बाजी मारणे! असे राजकारणाचे स्वरुप गरजेनुसार म्हणजेच देशकाल परिस्थितीप्रमाणे पालटत राहते. 'गरजेचे राजकारण' हे एकदा मान्य केले म्हणजे ते सदैव बेरजेचेच असेल, असं सांगवत नाही. ते जेवढे बेरजेचे तेवढेच वजाबाकीचे; जेवढे गुणाकाराचे तेवढेच भागाकाराचे! राजकारण किंबहुना कोणतेही काम, कार्य एकंदरीत बेरजेने, लोकमान्य टिळकांच्या शब्दात सांगायचे झाल्यास 'लोकसंग्रहा'ने साध्य होते हे खरे; पण कधी कधी वजाबाकीनेही कार्यभाग उत्तमपणे साधतो. बारा भिन्नभिन्न वाटांनी जाणाऱ्या बारभाईंच्या बेरजेपेक्षा, सुसूत्रता साधणारी वजाबाकी कधीकधी वाजवी वाटते, वाजवी ठरते! 'राखावी बहुतांशी अंतरे' हा समर्थ संदेश बहुश: फलदायी असला तरी बहुतांना विशिष्ट अंतरावर ठेवणे देखील राजकारणात काहीवेळा क्रमप्राप्त ठरते. समर्थ रामदासांनी राखावी बहुतांशी अंतरे या आशयाचा उपदेश अनेकदा जेला असला तरी, 'दासबोधा'तील 'राजकारण' नामक निरुपण नामक समासात ह्याच उपदेशाला पुस्ती जोडली आहे. 'जो बहुतांचे सोसेना। त्यास बहुत लोक मिळेना।।' एवढं सांगून ते थांबले नाहीत तर, 'अवघेचि सोसिता उरेना। महत्व आपुले।।' अशी जोडही दिली आहे. पुष्कळांना आपलेसे करावे हे सांगतानाच ' हिरवटाशी दूरी धरावे। युद्ध कार्यास ढकलावे। नष्टासी नष्ट योजावे। राजकारणामध्ये।।' असा इशाराही त्यांनी दिला आहे.

सारांश, जीवणाप्रमाणेच राजकारणाचे धेय्य निश्चित ठरविता येईल; पण त्या धेय्याच्या गरजेनुसार उपाय योजावे लागतील. वेगवेगळ्याप्रकारे गणित मांडावे लागेल. पुष्कळदा बेरजेचे, गुणाकाराचे पण वेळप्रसंगी वजाबाकीचे आणि भागाकाराचे देखील! राजकारण धुरंधर इंदिरा गांधीची कारकीर्द डोळ्यासमोर आणली तरी हे सहजच पटेल की, ज्यांनी बेरजेप्रमाणेच वजाबाकीचे पाठही अनेकदा गिरवले आहेत. छत्रपती शिवरायांच्या चरित्रात निरपवाद बेरीज आणि निरपवाद वजाबाकी आढळत नाही. कधी शरणागती तर कधी रणनीती, कधी माघत्तर तर कधी पुढाकार, कधी तह कधी तलवार, कधी संधी कधी विग्रह, कधी बेराजेचं सामर्थ्य तर कधी वजाबाकीचं चातुर्य अशी विविधपरींची वळणे घेत  त्यांच्या राजनीतीचा अश्व प्रगतीपथावरून ध्येय मंदिराकडे गेला! राजकारणाची ही क्षणाक्षणाला बदलणारी वळणे...वळणेच ती! तेव्हा ती वक्रीच असणार. राजकारणाची मुशाफिरी सरळसोट धोपट मार्गाने सहसा होतच नाही. राजकारण म्हणजे एक वक्री शनी! त्याच्या साडेसातीच्या फेऱ्याला तोंड देणे फार मुष्कीलच. पण त्याचा तोंडवळा नुसता न्याहाळणेच सोपे नाही. राजकारणाचे गणित कळायला आणि यशस्वीपणे सोडवायला विशिष्ट पिंड प्रकृतीची गरज असते. तत्वज्ञ, साहित्यिक, कलावंत ह्यांच्या पिंडप्रकृतीला सहसा ते मानवात नाही. म्हणूनच या वर्गातील शहाणी माणसं राजकारणाच्या चक्रव्यूहात अडकत नाहीत.इतकंच काय त्यावर भाष्य करणंच टाळतात. लोकशाहीच्या दृष्टीने आणि राष्ट्राचाही दृष्टीने हे कितपत योग्य आहे. याचा विचार शहाणी मंडळी कधी करणार?

शहाणी सुशिक्षित मंडळी राजकारणापासून लांब जाण्याचा प्रयत्न करताना दिसतात. ते असे का वागतात? याचाही त्यांनी विचार करावा. सज्जन माणसे दूर गेल्यानेच दुर्जन माणसांचा संचार राजकारणात होऊ लागला आहे. सभा समारंभात, खासगी बैठकीत किंवा अगदी सहज गप्पा मारतानाही राजकारणात वाईट माणसं कशी आहेत. याच रसभरीत वर्णन करुन त्यापासून आपण कसे लांब आहोत याची शेखी मिरवण्यातच ते धन्यता मानतात. वास्तविक, दुर्जनांना राजकारणातून दूर ठेवायचं असेल तर सज्जनांचा, सुशिक्षितांचा शहाण्या माणसांचा वावर वाढायला हवा. राजकारणातले शिंतोडे आपल्या अंगावर उडतील म्हणून त्यापासून दूर राहणं हे खरं तर स्वतः शी आणि राष्ट्राशीही प्रतारणा करण्यासारखे आहे. राजकारणाची गटारगंगा स्वच्छ करण्यासाठी आपण उतरणार असू, तर या गतारगंगेतील शिंतोडे आपल्या अंगावर उडणारच आहेत, याची जाणीव असायला हवी. शिंतोडे उडताहेत म्हणून लांब पळून जाणं हा पळपुटेपणा आहे. शहाणी, सुशिक्षित, सज्जन माणसं पापभिरू असतात. त्यांच्यासमोर आपण एखादा बागुलबुवा उभा केला , तर ते शांतपणे मान वळवून दुसरीकडे निघून जातील. अशी धारणा राजकारणातल्या दुर्जनांची असते म्हणूनच राजकारणातल्या दुर्जनांचा हा कावा ओळखून हिंमतीने आणि निर्धाराने राष्ट्रीय राजकारणात उतरणं हे कर्तव्य ठरतं.
- हरीश केंची.

No comments:

Post a Comment

आपलं ठेवायचं झाकून......!

"एकचालुकानुवर्तीत पक्ष आणि सत्ताधारी असं रूप 'लोकशाहीची जननी' म्हणवणाऱ्या देशात आकाराला येतंय. सामूहिक नेतृत्वाची प...