Saturday 7 September 2024

मंगलमूर्ती मोरया आले!

"लोकांनी लोकांसाठी केलेला लोकोत्सव म्हणजे गणेशोत्सव! गेल्या १३० वर्षातल्या बदलत्या गणेशोत्सवाचा इतिहास. गणेशोत्सव लोकमान्यांनी की, भाऊ रंगारी यांनी सुरू केला. गणपतीच्या बदलत्या मुर्त्या, त्याची बदलती आरास, सुशिक्षितांचं या उत्सवाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, लोकमान्यांनी अशांच्या औदासिन्यावर ओढलेले कोरडे, प्रतिपादन केलेली उत्सवाची गरज, सार्वजनिक मंडळाचे आर्थिक नियोजन, छोट्या मोठ्या व्यापाराचे अर्थकारण, विसर्जन मिरवणुकीतलं प्राथम्यक्रम कसा, काय आणि का? या साऱ्या बाबींचा केलेला उहापोह!"
---------------------------------------
'आमच्या पुण्यात' असं म्हणून पुणेकर काही सांगू-लिहू लागला की, बहिऱ्याचेही कान किटतात आणि वाचणारा यातून कसा वाचू अशा काकुळतीला येतो. त्यातून पुण्यातल्या सार्वजनिक गणेशोत्सवासारखा विषय म्हटलं की, आधीच मर्कट तशात... असं नाही झालं तरच नवल, पण पुण्यातल्या गणेशोत्सवांची विसर्जन मिरवणूक तब्बल दोन दिवस चालते हे बघितल्यावर पुणेकरांच्या अतिशयोक्तीला तसाच सबळ आधार असतो, असं का म्हणू नये? गेल्या वर्षी पुण्यात पोलीस आयुक्तांच्या कार्यक्षेत्रात निदानपक्षी साडेचार हजाराहून अधिक गणेश मंडळांची नोंद झालीय. सुदैवानं ही सर्व मंडळे विसर्जनाच्या मिरवणुकीत आपल्या मूर्ती आणत नाहीत, कारण २०२३ साली मिरवणुकीनं फक्त ३७९ मूर्ती विसर्जनासाठी गेल्या आणि त्यांना २६ तास १५ मिनिटे त्यासाठी लागली. जर सर्व नोंदविलेल्या गणेश मंडळांनी विसर्जन मिरवणुकीत भाग घेतला असता तर ही मिरवणूक आठवडाभर चालायला हरकत नव्हती. विसर्जनाबद्दल सुरुवातीला लिहिलं ते या उत्सवाचा व्याप आणि तापही केवढा वाढलाय हे लक्षात यावं म्हणून.
----------------------------------------------------
गणेशोत्सवाची १३० वर्षे असं सध्या सगळीकडे म्हटलं जातंय, पण महाराष्ट्रातल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला ३१ ऑगस्ट १९९३ रोजी शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत. 
पुण्यातल्या गणपती चौकात पूर्वी गुरुजी तालीम होती. ह्या गुरुजी तालमीत हिंदू-मुसलमान पहिलवान घुमायचे. १८८८ सालापासूनच हे पहिलवान तालमीत गणपती बसवायचे. शेख हशम लालाभाई नालबंद, शेख बाबूभाई रुस्तुमभाई नालबंद. भिकू पांडूरंग शिंदे आदिंचा या गणपती उत्सवात पुढाकार होता. ही तालीम आता नाही, पण गणेशोत्सव मात्र दरवर्षी सुरूच आहे. १९८८ सालीच ह्या गणेशोत्सव मंडळानं उत्सव शताब्दी साजरी केली. लोकमान्य टिळकांना सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक म्हणतात, पण टिळकांचा सार्वजनिक गणेश १८९४ साली पहिल्यांदा पुजला गेला तो त्यावेळी टिळक राहायचे त्या श्रीमंत सरदार बाळासाहेब विंचूरकर यांच्या वाड्यात. सदाशिव पेठ पोस्टाच्या समोर हा वाडा होता. आता तिथं मोठी इमारत उभी राहिलीय. टिळकांनी गायकवाड वाडा १९०५ मध्ये घेतला. मग तिथं सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाला. म्हणजे गायकवाड वाड्यातल्या गणेशोत्सवाची शताब्दी ही २००५ मध्ये झाली. 
गणेशोत्सव पुण्यात कसा सुरू झाला आणि तो महाराष्ट्रभर कसा विस्तारला ही माहितीही रंजक आहे. १८९३ साली सरदार नानासाहेब खासगीवाले, गणपतराव घोटवडेकर आणि वैद्य भाऊसाहेब रंगारी या तिघांनी सार्वजनिकरित्या गणपती बसवले आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी ते रस्त्यातून समारंभपूर्वक मिरवत विसर्जनासाठी नेले. सार्वजनिक गणेशोत्सवाची ही ती सुरुवात होती. १८९२ साली सरदार नानासाहेब खासगीवाले हे ग्वाल्हेरला गेले होते. ग्वाल्हेरमध्ये दरबारी थाटात साजरा होणारा सार्वजनिक गणेशोत्सव बघून ते भारावून गेले. पुण्याला परतल्यानंतर त्यांनी ह्या उत्सवाबाबत लोकमान्य टिळकांना तिथल्या त्या गणेशोत्सवाबद्धल सांगितलं असावं. लोकमान्य हे त्यावेळी पुण्यातल्या राष्ट्रीय वृत्तीचा प्रमुख आधारस्तंभच होते. लोकमान्यांकडून हा सार्वजनिक गणेशोत्सवाचा विचार त्यांच्याकडे येणाऱ्या तरुण मंडळींपर्यंत गेला आणि भाऊसाहेब रंगारी यांच्या घरीच एक बैठक भरली. त्याला महर्षी अण्णासाहेब पटवर्धन, बाळासाहेब नातू, लखूशेट बळवंत दंताळे, नारायणराव सातव, गणपतराव घोटवडेकर, नाना नारायण भोर, खंडोबा तावडे, सरदार नानासाहेब खासगीवाले, बळवंतराव कोकाटे, नाना हसबनीस, रामभाऊ बोधने, गंगाधर रावजी खेर आणि सध्या गाजणाऱ्या गणपतीचे दगडूशेट हलवाई हे ह्या बैठकीला हजर होते. म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सवाची प्रेरणा लोकमान्यांनी दिली होती तरी ते त्यासाठी बैठकीला मात्र हजर नव्हते. हे विशेष!
ही बैठक झाली श्रावणात आणि लगेचच गणपतराव घोटवडेकर, भाऊसाहेब रंगारी, नानासाहेब खासगीवाले यांनी भाद्रपदात सार्वजनिक गणेशोत्सवाची कल्पना प्रत्यक्षातही आणली. पुणेकरांना त्यांच्या उत्साहाला साजेल असा उत्सव मिळाला. हा उत्सव फक्त बामणांचा आहे, हा ढेरपोट्या देव सार्वजनिक जागी नको, असा आणि याहूनही विखारी विरोध या उत्सवाला त्यावेळी झाला. केसरीमधून, जाहीर व्याख्यानातून, लोकमान्यांनी त्याला ठणठणीत जबाब दिला. पण पुण्यातल्या सनातनी मंडळींनी या धार्मिक उत्सवात राजकारण येतं म्हणून कुरकुरायला सुरुवात केली. देवघरातला देव माजघरात आणि आता रस्त्यावर आणला असं म्हटलं गेलं. तेव्हा ती कुरकूर लक्षात घेऊनच की काय, टिळकांनी राष्ट्रीय विचाराच्या प्रसाराचीच सोय करण्यासाठी तीन वर्षांनी शिवजयंतीचा राष्ट्रीय उत्सवही सुरू केला होता. पण लोकांत ठसला, रुचला, फोफावला आणि पुणेच नव्हे, मुंबईसारख्या महानगरीला सर्व महाराष्ट्रासह व्यापून उरला तो मात्र गणेशोत्सवच!
गणेशाशी या उत्सवामुळेच लोकांचं अतूट असं नातं निर्माण झालं. शिवजयंती उत्सवात गणेशोत्सवातलं बाकी सगळं येऊ शकतं, पण गणेशाची मूर्ती हाच गणेश उत्सवाचा एक आगळा आकर्षणाचा विषय झाला. दुर्दैवानं सध्या अनेक सार्वजनिक गणेश मंडळांनी एकच एक ठोकळा मूर्ती बनवून, विसर्जन न करता ती तशीच ठेवून, तिच्यासाठी कायदे धाब्यावर बसवून, देवळे वा टपऱ्या बांधून आणि त्यापुढे पेट्या ठेवून गणेशाची दुकानं काढली आहेत हा भाग वेगळा; पण दरवर्षी नव्या रूपातली नवी मूर्ती, मग ती पारंपरिक वळणाचीच का असेना, आणण्यात जो अवर्णनीय आनंद होता वा आहे तो गणेशाला आणि त्याच्या उत्सवालाही जिवंतपणा देणारा आहे. उघडा बाळ गणेश, झबलं घातलेला रांगता बाळ गणेश, कृष्णाच्या रूपातला गणेश, पिंपळ पानावर पायाचा अंगठा चोखणारा गणेश, नागाच्या वेटोळ्यावर बसलेला, नागफणीवर नृत्य करणारा, शेषावर शेषशायी विष्णूसारखा लवंडलेला, हत्तीवर बसून वाघावर भाला मारणारा, वाघाचा जबडा फाडणारा, सिंहाला टेकून बसलेला, सिंहावर बसलेला, मोरावर बसलेला, गरुडावर बसलेला, उंदरावर बसलेला, उंदराच्या रथावर बसलेला, हरणाच्या रथात बसलेला, सात घोड्यांच्या रथात बसलेला, अशी किती रूपं, किती प्रकार! सारी सोज्वळता राखून बनवलेल्या या मूर्तीनीच माणसांना घराबाहेर खेचलं आणि एकत्र आणलं. 
याशिवायही काही मूर्ती घडल्या. त्यात लकडी पुलाच्या जवळ म्हणजे संभाजी पुलाजवळ नवी पेठेत विसावा विठोबापाशी बसणाऱ्या गणपतीनं प्रचंड खळबळ माजवली होती. प्रभात फिल्म कंपनीतल्या कलावंतांनी बनवलेली चांगली दहा फुटांची खुर्चीवर बसलेली सुटाबुटातली गणेशाची मूर्ती एक वर्ष इथं बसवण्यात आली आणि जणू हाहा:कार झाला. पितांबरधारी गणेशाऐवजी धोतर, मलमली अंगरखा घातलेला, टिळकांप्रमाणे पगडी, लांब अंगरखा घातलेला किंवा शिवाजी वेषातला तुमान घालणारा जिरेटोपवाला अथवा बजरंगबलीच्या लंगोटधारी वेषातला गणेश लोकांनी निमूट बघितला. एवढंच नव्हे, ज्ञानेश्वरासारखा गणेशही याच संभाजी पुलाजवळ बसवला गेला, पण सुटाबुटातला गणेश मात्र लोकांना चालला नाही. बरसात सिनेमानं लोकांना वेडं केलं त्यावर्षी हातावर नर्गिस घेतलेल्या राज कपूरची ती सुप्रसिद्ध पोज जी पुढं आरके फिल्मची निशाणीच ठरली तसा बरसात गणपतीही पुण्यात बसवला गेला होता. तेव्हाही लोकांनी नाराजी व्यक्त केली होती. काही काही मंडळांच्या मूर्ती ठरलेल्या असायच्या. वज्रदेही मंडळाची पहिलवानाच्या वेषातली, हत्ती गणपतीची हत्तीवर बसून वाघ मारणारी, दगडूशेठ हलवाई आणि मंडईतल्या मूर्तीही पूर्वापार रूपातल्याच. आता मूर्तीपेक्षा देखावे आणि विजेची करामत यांचं महत्त्व वाढलंय. पूर्वी करमणुकीचे, प्रबोधनाचे कार्यक्रम होत असत. गणेशोत्सवात मेळे हे त्याकाळी खूप गाजले. फडके हौद चौकात वज्रदेही मंडळ संगीताचे, गायनाचे कार्यक्रम आयोजित करत. तिथं दिग्गज कलावंतांनी हजेरी लावलीय. आज असे कार्यक्रम नाममात्रही उरलेले नाहीत. 
वर्गण्या गोळा करण्यावरून गणेशोत्सवावर टीका व्हायची. ह्या वर्गण्यांची सक्ती होते असं लोक म्हणायचे. आता हे वर्गण्यांचे पर्वही संपलंय. घरोघर जाऊन वर्गण्या वसूल करण्याचा व्याप कार्यकर्त्यांना नकोसा झालाय. त्याऐवजी प्रायोजक पकडण्याचं युग सध्या आहे. यातले काही आपल्या मालाची वा आपली जाहिरात करणारे असतात, तर काही गुपचूप पंथातलेही असतात. पुण्याच्या वाडिया महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य व. कृ. नुलकर यांनी प्रा. माधव धायगुडे यांच्या सहाय्यानं पुण्यातील गणेशोत्सवावर काही वर्षांपूर्वी एक अभ्यासपूर्ण अहवाल तयार केला होता. त्यांनी ७७ मंडळांचे अहवाल हिशोब आणि प्रत्यक्ष कार्य अभ्यासलं. आपल्या अहवालात प्राचार्य नुलकर म्हणतात, 'ही मंडळे, त्यांची कामे, त्यांचा उतू जाणारा उत्साह मी पाहिला आणि खरोखर अशी जाणीव झाली की, आम्ही उगीच ओरडतो की, आपली नवी पिढी बिघडलीय! आपण मोठे लहानांना जसे वळण देऊ तसे ते वागतील. माझी तर खात्री पटली की, गणेशोत्सवाला खरोखर आपण उत्तम वळण देऊ शकू. जे ईप्सित मनात ठेवून महाराष्ट्राच्या या लोकमान्य टिळक महापुरुषानं ह्या उत्सवाचा पुरस्कार केला तेच ईप्सित-समाज जागरण मनात ठेवून आपण वळण लावले तर नक्की फायदाच होईल...! प्राचार्य नुलकर ह्यांनी अहवालात हे म्हटलं खरं, पण 'आपण' म्हणजे नक्की कुणी हे वळण लावायचं? नुलकरांची त्या मंडळींपर्यंत पोहोचण्याची ताकद आहे? लोकमान्य टिळकांनी सातत्यानं या उत्सवावर लिहिताना कुणाला साद घातलीय? प्राचार्य नुलकरांना दगडूशेट हलवाई मंडळानं स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून बोलावलं तेव्हा त्यांना या उत्सवाकडे, त्यातल्या कार्यकर्त्यांकडे बघावंस वाटलं आणि ह्या अहवालाबरोबरच ते वाटणेही संपलं असण्याची शक्यता नाकारता येत नाही! लोकमान्यांनी व्याख्यानातून अग्रलेखांतून सुशिक्षितांना या उत्सवात सामील होण्यासाठी वारंवार हाक दिली. मंडईतल्या गणेशोत्सवात बोलताना १८९६ साली लोकमान्य म्हणाले, 'जर उत्सवात काही कमतरता असेल तर त्याचं पाप ह्या उदासीन शहाण्या मंडळीच्याच कपाळी मारावं लागतं. लोकात मिसळा, त्यांचं कुठं चुकत असल्यास सर्व गोष्टी नीट जुळवून द्या. सुशिक्षितांचा अधिकार असा आहे. त्यांची कर्तव्यं हीच आहेत...!' लोकांत मिसळा, तो तुमचा अधिकार आहे. सर्व गोष्टी नीट जुळवून द्या, ते तुमचे कर्तव्य आहे ही गोष्ट आज तरी कुठे सुशिक्षितांना कळलीय? सुशिक्षित समाजात मिसळत नाहीत, स्वतःला वेगळे समजतात. तसं राहून नाकं मुरडत बसण्यातच फुशारकी मिरवतात. लोकमान्यांनी यावर अक्षरशः कोरडेही ओढलेत. 'समाजाहून सुशिक्षित लोकांचा वर्ग निराळा समजण्याइतकं मौर्य दुसऱ्या कशातही नाही. शिकलेले लोक समाजाचं आणि समाजातलेच आहेत. समाज तरला तरच ते तरणार. समाजाला सोडून त्यांचं काडीचंही चालावयाचं नाही...!' हुशार आणि या बोटाची भुंकी त्या बोटावर करणारे सुशिक्षित गणेशोत्सवावर पोपटपंची करताना नेमक्या या गोष्टी सोडून बाकी सगळं रामायण करतात आणि लोकमान्यांनी सुरू केलेल्या राष्ट्रीय उत्सवाचं या अज्ञ समाजानं काय हो केलं... असा गळाही काढतात. हा उत्सव मुसलमानांना उत्तर देण्यासाठी सुरू झाला असंही काही उतारे तोंडावर फेकून सांगितलं जातं. 
मुसलमानांनी दाखवलेल्या कृतघ्नपणावर, असहिष्णुतेवर आणि ब्रिटिशांच्या फुशीनं चालवलेल्या अविवेकी आक्रस्ताळेपणावर लोकमान्यांनी कोरडे ओढले आणि गणेशौत्सवासाठी एकत्र येणाऱ्या हिंदूंना संघटनेचे सामर्थ्य समजावून देऊन निर्भय केलं हे खरंच आहे, पण गणेशोत्सव हा समाजातल्या भेदाभेदावर मात करण्याचा, समाज मन सांधण्याचा प्रभावी मार्ग आहे. त्यानं अशिक्षित अडाणी-उपेक्षित समाज आणि सर्वार्थानं समर्थ असलेला सुशिक्षित पुढारलेला समाज यांचं द्वैत मिटवता येईल अशीच टिळकांची भावना होती. ती त्यांच्या लिखाणातून वारंवार प्रकटलीही आहे. गणेशोत्सव सार्वजनिक स्वरूपात सुरू झाला. त्यामध्ये समाजातल्या सर्व थरातल्या लोकांनी भाग घेतला. एकप्रकारे सार्वजनिक स्फुरणच सर्वांना आलं आणि त्याचं कौतुक करताना लोकमान्यांनी लिहिलं, 'दिवसभर कामधंदा करून घरी आल्यावर चकाट्या पिटीत बसणारे, दारू पिऊन झिंगल्यामुळे गटारात लोळणारे आणि ह्या दारूच्या पायी बायका-पोरांचे हाल करणारे अथवा तमाशामध्ये अचकट विचकट गाणी ऐकत बसणारे या सर्वांना निदान काही काळपर्यंत तरी उपरती होऊन त्यांचा रिकामा वेळ बुद्धिदात्या श्री गजवदनाच्या भजनपूजनात गेला ही गोष्ट काही लहान सामान्य नाही! देवाचे नाव घेऊन वाईटातून चांगल्याकडे जाण्याची ही वाट त्या काळच्या सुशिक्षितांनी आपल्या प्रत्यक्ष सहकार्यानं जर रुळवली असती तर हा समाज समर्थ आणि सुसंस्कृत झाला असता...!' पण साळी, माळी, रंगारी, सुतार, कुंभार, सोनार, वाणी टिळकांच्या हाकेला धावले तरी सुशिक्षित मंडळी मात्र धावली नाहीत! लोकमान्य सुशिक्षितांच्या ह्या वृत्तीबद्दल लिहितात, 'पण लोक जमतात त्या ठिकाणी आम्हाला कोठे जावयाला पाहिजे? देव देतो, पण कर्म नेते अशातली आमची स्थिती झालीय. लोक एका ठिकाणी जमण्याचे प्रसंग पूर्वजांनी आयते तयार करून ठेवलेत, पण सुशिक्षित मंडळीला हे प्रसंग असून नसल्यासारखेच आहेत. आम्ही शिकलेले ही त्यांना ऐट आहे ना? लोकात कसे मिसळावे? ह्यांना मोठी पंचाईत पडते ती हीच...!' लोकांत मिसळा... हा लोकमान्यांचा टाहो सुशिक्षितांनी दुर्लक्षलाच. आजही लोकमान्यांचे हे विचार समाजातल्या सुशिक्षितांनी आचरले पाहिजेत. समाज घडवण्याची, समाज बांधण्याची, समाजाला सदैव जागे ठेवण्याची, समाजाला चवताळून उभं करण्याची जबाबदारी सुशिक्षितांचीच आहे. लोकमान्यांनी अनेक अंगांनी या उत्सवावर लिहिलंय. या उत्सवावर होणारा खर्च ही उधळपट्टी आहे असं म्हणणाऱ्यांना त्यांनी खडसावलंय, 'आठ-दहा दिवस उत्साहानं जर काढता येत नाहीत वा त्या उत्सवाप्रित्यर्थ थोडकेसे द्रव्य खर्चण्याचे जर सामर्थ्य नाही, तर ते राष्ट्र जिवंत असून मेल्यासारखेच आहे. ह्या गोष्टीला उधळपट्टी म्हणणारे म्हणोत, पण कष्टमय संसाराची यात्रा सुखाची आणि शांतीची होण्यास असले खर्च आवश्यक आहेत...!' या उत्सवात राजकारण येते म्हणून नाके मुरडली जातात हे बघून लोकमान्यांनी लिहिले, 'भक्ती ही प्रत्येक मनुष्य आपापल्या घरी करीतच असतो. भक्ती करावयास आमच्या धर्मात ख्रिस्त्यांप्रमाणे फक्त रविवारी एक ठिकाणी जमावयास नकोय. गणपती उत्सव हा एक धार्मिक उत्सव तर खराच, पण त्यात नुसती भक्ती प्रधान नसून राजकीय प्रश्नांचा आणि राजकीय शिक्षणाचा जनसमूहात प्रसार हा हेतू प्रधान होय...!' लोकमान्यांनी सुशिक्षितांचा ह्या सर्व कार्यात जो सहभाग अपेक्षिला होता तो मिळवण्यात मात्र लोकमान्यांना यश आलं नाही आणि त्यांच्यानंतर ह्या उत्सवाकडे लोकमान्यांच्या दृष्टीतून कुणी बघितलेलंही दिसत नाही. हा उत्सव मोकाट सुटलेल्या घोड्यासारखाच उधळलाय आणि अजूनही तो आवरणे कुणाला जमू शकलेलं नाही. या उत्सवाला वळण देण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना न जुमानता आजही हा उत्सव उधळतोय. त्यामध्ये नको त्या अनिष्ट गोष्टी शिरल्यात. या उत्सवातून निर्माण होणारं चैतन्य, उत्साह ज्वालामुखीतून फेकल्या जाणाऱ्या लाव्हासारखाच विध्वंसक आहे. त्यातून अपप्रवृत्ती जोपासल्या जाताहेत. हे सगळे बदलण्याचा, ही ऊर्जा शक्तीत बदलण्याचा मार्ग एकच आहे. लोकमान्यांनीच तो सांगितलाय. 'आमच्याच औदासिन्यामुळे मलिन झालेले हे उत्सव सतेज करण्याचे काम सुशिक्षितांनी आपल्या शिरावर घेतले पाहिजे. उत्सवाचे वेळी त्या त्या ठिकाणी त्यांनी हजर राहून व्यवस्थेसंबंधीचे हर एक प्रकारचे काम अंग मोडून करण्यास तयार असले पाहिजे. महोत्सवातल्या लोकशिक्षणाचा भाग सुशिक्षित मंडळीला आपल्या ताब्यात पाहिजे असल्यास सामान्य लोकांच्या खरोखर गरजा कोणत्या आहेत, लोकांत धर्मबुद्धी कितपत जागृत आहे, लोकांच्या स्वाभाविक ओघाला कोणते वळण दिले असता राष्ट्रहित सहजगत्या साधणार आहे ह्या सर्व गोष्टी लोकनायक होऊ पाहणाऱ्यांनी लोकात मिसळूनच समजावून घेतल्या पाहिजेत म्हणून लोकात मिसळा...!' लोकांच्या खरोखर गरजा कोणत्या जाणून घ्या, कंबर कसून लोकांबरोबर काम करा हे सुशिक्षितांना लोकमान्यांनी वारंवार सांगितलं. तेवढंच फक्त न ऐकता ह्या उत्सवाकडे सुशिक्षित बघत राहिले. अजूनही त्या बघण्यात फारसा बदल पडलेला नाही. बुद्धिदात्या गजानना, हे तुलाही कळून चुकलं असेल... असो. म्हणा मंडळी, गणपतीबाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!
हरीश केंची
९४२२३१०६०९

No comments:

Post a Comment

मोदींची आरती, चंद्रचूडांची गोची...!

"खुज्या माणसांची सावली संध्याकाळी मोठी होते. तशीच आता सुमार कुवतीच्या माणसांची सर्वत्र सरशी झालेली दिसतेय. राजकारणाप्रमाणेच...