Tuesday 12 March 2024

अमित शहांच धोबीपछाड...!

"भाजपला अवघं आकाश कवेत घ्यायचंय. त्यासाठी ज्यांच्या खांद्यावर बसून त्यांना ध्येय गाठायचंय, त्यांनाच नेस्तनाबूत करून त्यांचं अवकाश मिळवायचं असल्याचं आजवर दिसून आलंय. रामराज्य पक्षापासून सुरू झालेली ही त्यांची भूमिका मगोपक्ष, अकाली दल यापासून अगदी थेट शिंदे, पवारांच्या पक्षांपर्यंत सुरूच आहे. याची अनुभूती येतेय. आम्ही देतो त्याचं आणि तेवढ्याच जागी लढा, आता आमचं ऐका विधानसभेत तुमचा सन्मान ठेवू...! असा निर्वाणीचा इशारा दिलाय. शिंदे आणि पवार मिनतवारी करताहेत पण भाजप ठाम आहे. अमित शहा दिलेला शब्द पाळत नाहीत. विश्वासघात करतात हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. याचा अनुभव उद्धव ठाकरे यांच्या नंतर आता एकनाथ शिंदे, अजित पवारांना येतोय! शिरसाटांनी तर याची कबुलीच दिलीय! यामुळं जागा वाटपाची गुंतागुंत वाढतेय!"
---------------------------------
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचं जागावाटप जवळपास निश्चित झाल्याचं समजतं. परंतु जागावाटपावरून महायुतीतले मित्र पक्ष, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस मात्र समाधानी नाहीत. महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या ४८ जागांपैकी ३२ हून अधिक जागांवर निवडणूक लढवण्याचा भाजपचा निर्धार आहे. तर शिवसेना २२ जागांसाठी आणि राष्ट्रवादी काँग्रेस १० ते १२ जागांसाठी आग्रही होती. परंतु या दोन्ही मित्रपक्षांना आता एक अंकी जागांवर समाधान मानावं लागेल अशी स्थिती आहे. भाजप ३२ हून अधिक जागा, शिवसेनेला जवळपास ९-१० जागा तर राष्ट्रवादी काँग्रसच्या वाट्याला ३ ते ४ जागा मिळतील असं जागावाटपाचं सूत्र ठरतंय. याबाबत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांची कोंडी झालीय. पक्षांतल्या नेत्यांनी आपल्या अपेक्षा उघडपणे बोलून दाखवण्याला सुरुवात केलीय. मात्र शिंदे अजित पवारांची मनधरणी करत नाराजी दूर करण्याचा प्रयत्न स्थानिक पातळीवरील नेते करताहेत. २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे २३ खासदार निवडून आले. शिवसेनेचे १८ तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ४ खासदार निवडून आले. शिवसेना आणि  राष्ट्रवादीत फूट पडली. एकनाथ शिंदे यांच्यासोबत १८ पैकी १३ खासदार आहेत. तर अजित पवार यांच्याकडे चारपैकी एकच खासदार आहे. असं असलं तरी दोन्ही पक्षांना किमान आपल्या पक्षाच्या सर्वच विद्यमान खासदारांच्या जागा हव्या होत्या परंतु तसं होताना दिसत नाहीये. नुकतीच अमित शहा यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवार यांच्यात जागा वाटपाबाबत चर्चा केली. यानंतर पुन्हा देवेंद्र फडणवीस, भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे आणि इतर नेते यांनी दिल्लीत अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी महायुतीचं जागा वाटप निश्चित झाल्याचं समजतं. शिवसेनेच्या जवळपास पाच जागा भाजपकडे जातील यात हिंगोली, कोल्हापूर, पालघर, उत्तर पश्चिम, यवतमाळ या जागांचा समावेश आहे. शिंदेंनी किमान १३ जागा मिळाव्यात अशी विनंती केलीय. त्यात रत्नागिरी सिंधुदुर्ग, रायगड, संभाजीनगर, ठाणे अशा काही मतदारसंघावर शिंदे आणि भाजपनं दावा केलाय.
याशिवाय गजानन किर्तीकर यांच्या वायव्य मुंबईसह उद्धव ठाकरे यांच्याकडील पाच मतदारसंघ आणि आणखी काही मतदारसंघ भाजपला हवेत.
 शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी आपली खंत माध्यमांसमोर बोलून दाखवली. ते म्हणाले, “आम्ही महाराष्ट्रात आम्ही मोदी आणि शाहांच्या कामावर, दिलेल्या शब्दावर विश्वास ठेवून सोबत आलो आहोत. पण आमचा विश्वासघात होणार नाही याची त्यांनी दक्षता घ्यावी. सध्याच्या आमच्या ज्या जागा आहेत, तिथंही भाजपचे उमेदवार जाऊन प्रचार करताहेत. मतदारसंघावर दावे करताहेत. प्रत्यक्षात विद्यमान खासदार असलेल्या ठिकाणीही बळजबरी केली जातेय!" रत्नागिरी, मावळ, रायगड, संभाजीनगर याठिकाणी भाजप घृणास्पद राजकारण करतेय. त्यामुळं मोदी आणि शहांनी महाराष्ट्रातल्या नेत्यांचे कान उपटायला हवेत, असंही कदम म्हणाले. "प्रत्येकाला आपला पक्ष वाढवायचाच आहे. पण तुमच्यावर विश्वास ठेवून जे लोक सोबत आले त्यांचा केसानं गळा कापून तसं करायला नको. याद्वारे वेगळा संदेश जात असल्याचं भान भाजपच्या काही लोकांना असायला हवं...!" अशी टीका रामदास कदमांनी केली. "दापोलीत युती असताना भाजपनं माझ्या मुलाच्या विरोधात उघडपणे मतदान केलं. २००९ मध्ये युती असतानाच मला गुहागरमध्ये भाजपनंच पाडलं होतं," असा आरोपही त्यांनी केला. आताही माझ्या मुलाच्या मतदारसंघामध्ये भाजपचे मंत्री रविंद्र चव्हाण आणि भाजप कार्यकर्ते बजेटची कामं आणून भूमिपूजन आणि उद्घाटनं करताहेत. त्यात स्थानिक आमदाराला बाजूला सारलं जातेय, असं असेल तर भविष्यात भाजपवर कोणी विश्वास ठेवणार नाही, याची दखल भाजपच्या वरिष्ठांनी घ्यायला हवी. पुन्हा-पुन्हा आमचा विश्वासघात झाला तर माझं नावही रामदास कदम आहे. तिकिट जाहीर होईल तेव्हा पुन्हा या विषयावर बोलेन...!, असा इशारा त्यांनी दिला.
अमित शहा यांच्यासोबत मुंबईत झालेल्या बैठकीत युतीतल्या जागा वाटपाचे निकष स्पष्ट करण्यात आल्याचं समजतं. निवडून येण्याची क्षमता आणि संघ, भाजपच अंतर्गत सर्वेक्षण यावरच जागा वाटप आणि उमेदवार निश्चित होणार आहे. तसंच राज्यातली बदललेली राजकीय परिस्थिती, दोन पक्षातल्या फुटींनंतर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना मिळणारी सहानुभूती, मराठा आरक्षणाच्या नुकत्याच झालेल्या आंदोलनांनंतर मराठा, ओबीसी, धनगर, अशी जातीय समीकरणं असे अनेक मुद्दे जागा वाटपाचं सूत्र ठरवण्यासाठी लक्षात घेतलं जाताहेत. परंतु यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद उद्भवण्याची शक्यताही नाकारता येत नाही. अपेक्षित निर्णय न झाल्यास विद्यमान खासदार, इच्छुक उमेदवार आणि त्यांच्य कार्यकर्त्यांमधून रोष समोर येऊ शकतो. २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपने २३ जागा लढवल्या होत्या. २०१९ मध्ये त्यांनी २५ जागा लढवल्या होत्या आणि २०२४ साठी भाजप जवळपास ३० ते ३२ जागा लढवत असल्याचं समजतं. याचा अर्थ त्यांची जागा लढवण्याची आकडेवारी आणि पक्षाची ताकद वाढतेय. शिवसेनेनेची आकडेवारी पाहिली तर २०१४ मध्ये २०, २०१९ मध्ये २३ आणि आता २०२४ मध्ये शिंदेंच्या शिवसेनेला १०-१२ जागांवर समाधान मानावं लागेल. पण विद्यमान खासदार पाहता शिवसेनेला किमान २० जागा तरी मिळायला हव्या होत्यात. शिवसेना जर एक अंकी जागा लढवत असेल तर मुख्यमंत्रीपद मिळालं असलं तरी भविष्यात पक्षासाठी परिस्थिती अधिकाधिक कठीण होत जाईल. मग बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा विचार वाढवणार कसे? तसंच जागा वाटपात वाटाघाटी करत असताना पक्षाच्या जागा कमी होणार असतील तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वावरही पक्षात प्रश्न उपस्थित होऊ शकतो. यामुळे पक्षाचा केडर कमकुवत होऊ शकतो. शिवसेनेचं कॅडर विस्कळीत झालं तर युतीसाठी ते कसं काम करतील? हीच परिस्थिती राष्ट्रवादी काँग्रेसलाही लागू होते. अजित पवार यांना केवळ तीन ते पाच जागा मिळणार असतील आगामी विधानसभा निवडणुकीवरही याचा परिणाम दिसेल अशी शक्यता आहे. यातही दोन्ही मित्र पक्षांच्या जागा कमी आल्या तर विधानसभेतही जागा वाटप करताना भाजप याची दखल घेईल आणि या दोन्ही पक्षांच्या जागा कमी होऊ शकतात. त्यामुळं या मित्रपक्षांच्या जागा भाजप हिसकावून घेऊ शकते. ही भीती सुद्धा आहे, दुसऱ्या बाजूला भाजपसाठी केंद्रात आपली सत्ता कायम राहील याकडे प्राधान्य आहे. यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत येताना भाजपने काय कमिटमेंट केली होती काय शब्द दिला होता हे सुद्धा महत्त्वाचं आहे. जी आश्वासनं मिळाली ती पूर्ण होतील. आत्ता जे उघड बोललं जात आहे ते अपेक्षित नव्हतं हे दाखवण्याचा नेत्यांकडून प्रयत्न होईल पण अमित शहा यांनी स्पष्ट सांगितलं की केवळ निवडून येण्याची क्षमता आहे त्यानुसारच निर्णय होतील. काही ठिकाणी मित्र पक्षाच्या उमेदवाराला भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवता येऊ शकते. ही उघड नाराजी व्यक्त करण्याचं कारण म्हणजे उद्या विरोधकांनी टीका केल्यानंतर किमान त्यांच्यासमोर हा मुद्दा स्पष्ट करता येईल. सत्तेत समान वाटा दिला म्हणजे जागांचं वाटप समान होईल अशी अपेक्षा मित्र पक्षाच्या नेतृत्त्वालाही नाही. जशा शिंदे गटाच्या जागा आहेत तशा भाजपच्याही जागा आहे. विधानसभेत मात्र वेगळं चित्र दिसू शकतं. भाजपसाठी प्राधान्य आहे ते लोकसभा भाजपने कमिटमेंट नाही असं कोणीच म्हणत नाहीय. परंतु महायुतीत भाजपचच मोठा भावाच्या भूमिकेत असून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना मिळेल त्या जागांमध्ये समाधान मानावं लागण्याची शक्यता आहे. अजित पवार गटानं नऊपेक्षा अधिक जागांची मागणी केलीय. पण तटकरे यांची जागाही भाजपनं मागितलीय. शरद पवार गटाकडे असलेल्या अन्य जागाही भाजपला हव्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्रात चार खासदार आहेत. अमोल कोल्हे शिरूर, सुप्रिया सुळे बारामती, श्रीनिवास पाटील सातारा आणि सुनील तटकरे रायगड. यापैकी सुनील तटकरे अजित पवार यांच्यासोबत आहेत. पण तरीही या चार जागा तसंच मावळ, शिरुर असे आणखी काही मतदारसंघ आपल्याला मिळावेत यासाठी अजित पवार गट आग्रही होते. तसंच बारामती, रायगड, शिरुर या तीन जागांसाठीही राष्ट्रवादी काँग्रेसचा आग्रह आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी शिंदे गटाला जेवढ्या जागा मिळणार तेवढ्याच जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळायला हव्यात अशी मागणी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत बोलताना मित्रपक्षांना एक आकडी जागा ही पतंगबाजी असल्याचं म्हणत सहकाऱ्यांना योग्य सन्मानाप्रमाणे जागा मिळतील असं स्पष्ट केलं. रामदास कदमांच्या टीकेवर पत्रकारांनी फडणवीस यांना प्रश्न विचारला. त्यावर, "मी एवढे वर्ष रामदास कदमांना ओळखतो. त्यांना अशा प्रकारची वक्तव्यं करण्याची किंवा टोकाचं बोलण्याची सवय आहे. कधी कधी रागानं ते बोलतात," असंफडणवीस म्हणाले. पुढं देवेंद्र फडणवीस यांनी शिंदेंना मुख्यमंत्री करताना भाजपनं मोठं मन केल्याचा उल्लेख केला. "भाजपनं कायम शिवसेनेचा सन्मान केला आहे. आम्ही ११५ आहोत तरीही आमच्याबरोबर आलेल्या शिंदे साहेबांना मुख्यमंत्री केलं," असं फडणवीस म्हणाले. खरी शिवसेना आमच्याबरोबर आली त्याचं आम्हाला समाधान आहे. तसंच आम्ही भक्कमपणे शिंदेंच्या पाठिशी आहोत. मुख्यमंत्री म्हणून त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे, असंही त्यांनी म्हटलं. "अनेक वेळा अनेक लोकं आमचं लक्ष वेधून घेण्यासाठी किंवा आपलं महत्त्वं पटवून देण्यासाठी अशाप्रकारचं टोकाचं बोलत असतात. पण आमच्यासारख्या मोठ्या आणि मॅच्युअर लोकांनी अशा प्रकारची वक्तव्यं गांभीर्यानं घेऊ नये," असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी रामदास कदमांवर प्रतिक्रिया दिली. कोणीही काहीही मागणी केली तरी जागावाटपाचा निर्णय वास्तविकतेवरच होईल. तसंच महायुतीत काहीही मतभेद नसल्याचंही फडणवीस म्हणाले. जागावाटपावरून आमच्यात काहीही गंभीर मतभेद नाहीत. दोन-तीन जागांवरून चर्चा सुरू आहे. पण त्यातही गंभीर काही नाही. त्यामुळं लवकरच जागावाटप पूर्ण करू, असं फडणवीसांनी सांगितलं. आमच्याबरोबरची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस किंवा इतर मित्रपक्षांना सोबत घेऊनच आम्ही निवडणूक लढवणार आहोत.
पक्ष स्थापन केलेल्या ठाकरे आणि शरद पवार यांनी विश्वासाने जबाबदारी सोपवल्या एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी पक्षच गिळंकृत केलाय. ठाकरे, शरद पवार हे पक्षाचे सदस्यच नाही असा कावा करून सारं काही मिळवलं पण ज्यांच्या तालावर हा खेळ हे दोघे खेळले त्यांना भाजपच्या कपटनीतीचा अनुभव येतो आहे. हिंदुत्ववादाची झूल पांघरून एकनाथ शिंदे यांनी आपला डाव साधला असला, तरी सर्वसामान्य जनता आणि सामान्य शिवसैनिक त्यांचा डाव आणि लबाडी पुरती ओळखून आहे. आपल्यावर आलेलं इडीच बालंट टाळण्यासाठी अजित पवार आणि पटेल, तटकरे यांनी भाजपच्या पायाशी लोळण घेतली असली तरी कार्यकर्ते सारं जाणून आहेत. दोन गुजराथ्यांच्या तालावर आणि नागपुरी बँडवर 'आवो मारी साथ' करत त्यांनी कितीही फेर धरला, तरी या अट्टल बदमाषीला सामान्य जनता बिलकुल भुलणार नाही! निवडणुकीत ते समृद्ध गटवाल्यांना चांगलीच अद्दल घडवतील. सत्ता आणि पैशाच्या बळावर आपण प्रत्येक गोष्ट विकत घेऊ शकतो, असे यांना वाटत असणार. परंतु शरद पवार यांच्यासमोर उभं राहण्याची हिंमत होणार नाही, याचा अनुभव शरद पवारांनी बारामतीत नमो रोजगार मेळाव्यात आणि लोणावळ्यात कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात दाखवून दिलंय. तेव्हा सबुरीने घ्या. दुसरीकडे शिवराय असोत किंवा बाळासाहेब असोत, त्यांच्या पुतळ्या वा स्मारकासमोरही उभे राहण्याची या फुटीर मंडळींची लायकी नाही. इतिहासकाळात शिवरायांनी गद्दारांची गय केली नव्हती. महाशक्तीच्या ४०-५० गुलामांनी हे पक्के लक्षात ठेवले पाहिजे...!
हरीश केंची
९४२२३१०६०९


No comments:

Post a Comment

आपलं ठेवायचं झाकून......!

"एकचालुकानुवर्तीत पक्ष आणि सत्ताधारी असं रूप 'लोकशाहीची जननी' म्हणवणाऱ्या देशात आकाराला येतंय. सामूहिक नेतृत्वाची प...