Sunday 7 January 2024

आता लक्ष्य मथुरा...!


"शेकडोवर्षाच्या लढ्यानंतर, अयोध्येत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर श्रीरामजन्मभूमी मुक्त झाली. तिथं भव्य मंदिर साकारलंय. येत्या २२ जानेवारीला रामलल्ला त्यात विराजमान होणार आहेत. अवघ्या जगाच्या दृष्टीनं हा महत्वाचा प्रसंग आहे. यात धार्मिक श्रद्धा, आस्था महत्वाची! मात्र मतांच्या ध्रुवीकरणासाठी या इव्हेंटचा वापर केला जातोय! रामजन्मभूमीवर मंदिर साकारलंय. आता द्वापारयुगात कृष्णजन्मापासून ते कृष्ण राधा यांच्या लीलांचा साक्षीदार असलेल्या मथुरात श्रीकृष्ण जन्मभूमीवर भव्य दिव्य असं मंदिर उभं राहणार आहे. इथंही अयोध्येसारखाच मंदिर मशीद वाद आहे. पण तो तितका तीव्र नाही. सर्वोच्च न्यायालयानं ज्ञानवापी मशिदीप्रमाणेच सर्व्हेक्षण करण्याचा निकाल दिलाय. भाजपच्या अजेंड्यातला ३७० कलमं आणि रामजन्मभूमी मंदिर साकारलंय आता प्रतिक्षा आहे. कृष्ण जन्मभूमीतल्या मंदिराची!"
-------------------------------------------
*श्री* रामाचे बंधू शत्रुघ्न यानं लवण या राक्षसाचा वध करून मधुरा नगर वसवलं. कालौघात मधुराला मथुरा असं संबोधलं जाऊ लागलं. रामजन्मभूमीवरचा शतकानुशतके चाललेला वाद आता मिटलाय. त्यामुळं रामभक्त सुखावलाय. इतकंच नाही तर अयोध्येतल्या रामजन्मभूमीच्या जागेवर भव्य राममंदिर बांधून तयार झालंय. येत्या २२ जानेवारीला, नवीन, भव्य, दिव्य अशा राममंदिरात रामलल्लाची प्रतिष्ठापना होणार आहे. अयोध्येत राममंदिराच्या उभारणीवरून वाद सुरू होता तेव्हापासूनच काशी-मथुरा इथल्या मुद्द्यावरूनही वाद सुरू असल्याचं अनेकांना आठवत असेल. विश्व हिंदू परिषद मथुरेतल्या कृष्ण जन्मभूमीला 'मुक्त' करण्याबाबत अनेक दिवसांपासून बोलतेय. अलाहाबाद हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट यांच्या अलीकडच्या निर्णयवृत्तीनं कृष्णप्रेमींच्या बाजूनं तराजू झुकल्याचं स्पष्ट दिसतेय. अलाहाबाद हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश मयंककुमार जैन यांच्या खंडपीठानं एएसआयला ज्ञानवापीप्रमाणे मथुरा मशिदीचं सर्वेक्षण करण्याची परवानगी दिलीय. या दोन्ही मशिदी हिंदूंच्या धार्मिक स्थळांवर बांधल्या गेल्याचा दावा केला जातोय. या दाव्याचं समर्थनासाठी केलेल्या याचिकेत म्हटलंय की त्यात हिंदू मंदिरांमध्ये दिसणारे पिवळे खांब आहेत. त्याशिवाय त्यात शेषनागाची आकृती कोरलेली आहे. हिंदू पुराणानुसार, शेषनागनं यमुना नदी पार करताना भगवान कृष्णाचं रक्षण केलं होतं. याशिवाय त्या खांबांच्या खालच्या भागात असलेल्या मशिदीच्या खांबांवर हिंदू धर्माची चिन्हं आणि वचनं कोरलेली आहेत. याचिकेनुसार, ज्या ठिकाणी मशीद बांधलीय ती जागा मथुरेत शतकांपूर्वी कंसाच्या कैदेत होती. त्या कैदेतच श्रीकृष्ण जन्मला, त्याचं दर्शन साऱ्यांना झालं. त्यामुळं कारागृह हे श्रीकृष्ण जन्माचं मूळ ठिकाण मानलं जात असेल तर त्याची मालकी मंदिराला द्यावी, अशी मागणी पुढं आलीय.
कथित शाही इदगाह मशीद ही हिंदू मंदिर पाडून बांधण्यात आल्याचा दावा श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्ती निर्माण ट्रस्टनं दाखल केलेल्या याचिकेत म्हटलंय. याचिकाकर्त्यानं सुप्रीम कोर्टात युक्तिवाद केलाय की, वादग्रस्त जमिनीबाबत कृष्ण जन्मभूमी ट्रस्ट आणि मशीद समितीनं केलेल्या दाव्याची विश्वासार्हता तपासण्यासाठी वैज्ञानिक सर्वेक्षण आवश्यक आहे. याला शाही मशीद आणि उत्तरप्रदेश सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डानं विरोध केला होता, पण आता सुप्रीम कोर्टानं अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल कायम ठेवलाय. औरंगजेबानं मंदिर पाडून १३.३७ एकर जागेवर ईदगाह तयार केल्याचा दावाही कोर्टासमोरच्या याचिकेत म्हटलंय. त्यांनी श्रीकृष्णाच्या जन्माचा आणि मंदिराच्या बांधकामाचा इतिहास सुध्दा कोर्टात मांडलाय. इतकंच नाही तर ईदगाह मशिदीच्या बदल्यात आम्ही तिप्पट जमीन देण्यास तयार आहोत, असं हिंदू पक्षानं न्यायालयाला सांगितलंय. हिंदू पक्षाच्या प्रतिक्रियेनंतर आता शाही मस्जिद इदगाह समितीचे अध्यक्ष जेद हसन यांनी हा वाद न्यायालयात सोडवण्याऐवजी आम्ही मशिदीचे मालक नाही, तर आम्ही फक्त त्यावर देखरेख करत आहोत, असं सांगितलं. खरी मालकी ही जनतेची आहे आणि हा वाद कसा सोडवायचा हे तेच ठरवतील! अयोध्येतल्या राममंदिराचा मुद्दा जितका ज्वलंत आणि स्फोटक होता तितका मथुरेच्या कृष्णजन्मभूमीचा मुद्दा कदाचित वादग्रस्त वाटणार नाही, पण इथंही मतांच्या राजकारणानं कधीही आक्रमक रूप धारण केलं जाऊ शकतं, तेव्हा इथं अराजक माजेल. त्यामुळं मथुरेत एकंदरीत शांतता नांदते. मात्र इथल्या कृष्णजन्मभूमी मंदिर ईदगाहच्या सावलीतून मुक्त करण्यासाठी हिंदू नेत्यांनी वर्षांपूर्वी श्रीकृष्ण जन्मस्थान विकास समितीची स्थापना केली. ही समिती अयोध्येतल्या रामजन्मभूमी मुक्त करण्याच्या आंदोलनासारखीच मोहीम राबवतेय. एका बाजूला विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे तरुण आहेत. तर दुसरीकडे, दिल्लीच्या जामा मशिदीच्या शाही इमामच्या तरुण मुलानं मथुरेत आदमसेना नावानं पक्ष स्थापन केलाय.
मथुरेच्या कृष्णमंदिराच्या गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर एक फलक लावलाय. ज्यात इथली चार हिंदू मंदिरे कशी बांधली गेली आणि ती नंतर कशी उध्वस्त झाली याच्या कथा आहेत. चौथे मंदिर हे आधुनिक वादाचं कारण आहे. जो ओरछा इथल्या वीर सिंहदेव बुंदेला यानं मुघल सम्राट जहांगीरच्या काळात तो बांधला होता. इथं औरंगजेबानं कटरा केशवदेव नावाच्या १३ एकर जागेतलं तिथं असलेलं मंदिर उध्वस्त करून ईदगाह बांधली. फ्रेंच प्रवासी टेव्हरनियर भारतभ्रमण करत असताना त्यानं त्याच्या मथुरा भेटीत, १६५० मध्ये इथं एक मंदिर असल्याचा उल्लेख केलाय. परंतु औरंगजेबानं १६६९ मध्ये ते मंदिर उध्वस्त करून ते नष्ट करण्याचा आदेश दिला आणि सध्याची ईदगाह केशवदेवाच्या मंदिराच्या खांबांवर बांधली गेली. सध्या कृष्ण मंदिर बघायला गेलं तर त्याच्या बाजूलाच एक उंच मशीद दिसते. लाल दगडानं बनलेली ही मशीद मंदिरापेक्षा उंच आहे. त्यामुळं हे मंदिर मशिदीच्या सावलीत उभं असल्याचं दिसतं. मशिदीचा मोठा हिरवा, पांढरा घुमट पूर्वी मंदिरावर वर्चस्व गाजवत होता. परंतु काही वर्षांपूर्वी मंदिराचे स्पायर उभारल्यानंतर दोन्ही देवस्थानांमधली उंची समान असल्याचं दिसतं. हे मंदिर-मशीद संकुल पूजास्थान कायदा १९९१ अंतर्गत समाविष्ट करण्यात आलंय. या  कायद्यानुसार १५ ऑगस्ट १९४७ रोजी असलेल्या स्थितीतच या संकुलाचं धार्मिक स्वरूप कायम ठेवावं लागतं. काशी इथलं ज्ञानव्यापी मशीद आणि मथुरा इथली शाही इदगाह मशीद कोणत्याही परिस्थितीत पाडू नये, असे आदेशही सुप्रीम कोर्टानं राज्य आणि केंद्र सरकारांना दिलेत. तथापि, मथुराचे स्थानिक इमाम आणि इथले हिंदू संन्यासी यांच्यात सौहार्द आणि सद्भावना आहे. या कृष्णजन्मभूमी आणि मशिदीवरून काही राजकारणी जाणीवपूर्वक वाद निर्माण करत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.  मथुरेत आजवर क्वचितच जातीय दंगली झाल्यात. आता काही माथेफिरू लोक इथं गदारोळ माजवायला लागलेत, असा त्यांचा आरोप आहे.
या सर्व वादांमध्ये भाजप खासदार हेमामालिनी यांनीही अयोध्या आणि काशीनंतर त्यांचं मतदारसंघ असलेल्या मथुरेतही भव्य मंदिर बांधलं जाईल...! अशी आशा व्यक्त केलीय. त्यासाठी त्यांनी काशी विश्वनाथ कॉरिडॉर सारखं इथंही भव्य कॉरिडॉर बांधलं जाईल. रामजन्मभूमी आणि काशीच्या पुनरुज्जीवनानंतर आता मथुरा हे हिंदूंच्या आस्थेनुसार अत्यंत महत्त्वाचं आहे. मथुरेचा खासदार या नात्यानं मी म्हणेन की तिथं जगाला हेवा वाटेल असं भव्य मंदिर व्हायला हवंय...! १९६२ मध्ये इंडियन एक्सप्रेस ग्रुपचे प्रमुख रामनाथ गोएंका यांनी जुन्या कृष्ण मंदिराचा जीर्णोद्धार केलाय. कारी यांनी नवीन मंदिर बांधलंय. पण ते मंदिर कृष्णजन्मभूमीच्या मूळ जागेवर बांधलं गेलेलं नाही. मूळ मंदिरावर मशीद बांधण्यात आलीय. एखाद्या परदेशी माणसानं हे मंदिर आणि मशीद जवळून पाहिल्यास भारतात हिंदू-मुस्लिम यांच्यात किती संघर्ष आहे, याची कल्पना येईल. पण दुसऱ्याच क्षणी सत्य जाणून त्याचा हा भ्रम दूर होतो. मंदिराच्या आवारात प्रवेश करताच विविध पोस्टर्स, बॅनर इथं वाचायला मिळतात. जसं हिंदूधर्माचं हिंदुत्त्वाचं रक्षण करा, उर्दू हटवा अशा आशयाचा मजकूर त्यावर आढळतो. एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की, अयोध्देच्या तुलनेत मथुरेमध्ये मुस्लिमांची लोकसंख्या खूपच कमी आहे. तसे इथले मुस्लिम शांतताप्रिय आहेत. अनेक मुस्लिम तरुण मथुरेला येणाऱ्या यात्रेकरूंना जेवणावळी घालून, विविध सेवा उपलब्ध करून आपला उदरनिर्वाह करतात. काही मुस्लिम मुले आणि मुली भगवान श्रीकृष्णाची आवडती बासरी किंवा मोरपिसं विकून उत्पन्न मिळवतात. अयोध्या आणि मथुरा यांच्यातला वाद पूर्णपणे असंबंधित असल्याचं वर्णन करणार्‍या एका माहितीदाराचं केलंय. अयोध्येप्रमाणेच, मथुरेत कृष्ण जन्मस्थानावर आणि शाही इदगाह मशिदीवर मालकी किंवा इतर कायदेशीर वाद नाहीत. ही मंदिरे आणि मशिदी एकमेकांच्या शेजारी असली तरी त्यांचं अस्तित्व पूर्णपणे भिन्न आहे, दोन्हीची प्रवेशद्वारं ही वेगळी आहेत. तर अयोध्येतल्या रामजन्मभूमीच्या मोठ्या भागावर बाबरी मशीद बांधण्यात आली होती. यावरून वाद विकोपाला गेला होता. तसंच इथल्या इदगाहमध्ये नमाज अदा केली जाते. विशेषत: शुक्रवारी इथं मुस्लिम भाविकांची गर्दी असते. १९६८ मध्ये, कृष्ण जन्मस्थान सेवा संघ आणि शाही इदगाह मस्जिद ट्रस्ट यांच्यात झालेल्या करारानुसार कॉम्प्लेक्समधल्या मालमत्तेची मालकी कोणाकडे आहे हे स्पष्ट केलंय. यापूर्वी परिक्रमेचा कार्यक्रम जाहीर करून विहिंपनं मंदिर परिसराच्या चौथ्या भिंतीसारखी मशीदही परिक्रमेच्या मार्गात येईल, अशी परिस्थिती निर्माण केली होती. त्यामुळे १९६८ च्या कराराचं उल्लंघन होण्याच्या भीतीनं कृष्ण जन्मस्थानाची प्रदक्षिणा केली जात नाही आणि त्यासाठी परवानगीही दिली जात नाही. दुसरीकडे, प्रत्येक ईदच्या दिवशी अधिकारी मशिदीचं प्रवेशद्वार स्वच्छ करतात आणि मुस्लिमांच्या आगमनासाठी सुरक्षा व्यवस्था करतात.
काही वर्षांपूर्वी आचार्य गिरीराज किशोर म्हणाले होते की, 'आम्ही कोणत्याही कराराला बांधील नाही. आम्ही  जमिनीचा ताबा मिळवण्यासाठी कायदेशीर लढा सुरूच ठेवू कारण आम्हाला त्यावर मालकी हक्क हवा आहे....!'  कृष्णजन्मभूमीच्या जागेवर केशव देव यांच्या भूखंडावर मालकी हक्क सांगणारे श्रीकृष्ण जन्मभूमी ट्रस्ट आमच्या जमिनीवर शाही ईदगाह मशीद उभी असल्याची भूमिका अनेक वर्षांपासून मांडत आहेत. या ट्रस्टचे प्रवक्ते विजय बहादूर सिंह सांगतात की, कटारा केशव देव यांच्या १३.३७ एकर जागेत कृष्ण मंदिराशिवाय मशीद आणि ५० मुस्लिम कुटुंबं आहेत. हे मुस्लिम नागरिक औरंगजेबाचे वारस मानले जातात. आजूबाजूच्या भागात परिस्थिती सामान्य आहे आणि रस्त्यावर दृश्यमानपणे गर्दी आहे, परंतु अनेक लष्करी तुकड्या, स्थानिक कॉन्स्टेब्युलर अधिकारी आणि निमलष्करी दलांची प्रचंड उपस्थिती लोकांना इथं असामान्य परिस्थितीबद्दल सावध करते. असं असलं तरी इथलं वातावरण कधी बदलेल हे सांगता येत नसल्यानं श्रीकृष्ण जन्मस्थान मंदिर आणि शाही मशीद या दोन्ही प्रवेशद्वारांवर मेटल डिटेक्टर बसविण्यात आले आहेत. दोन्ही ठिकाणी सशस्त्र सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहेत आणि मशिदीच्या बाजूला असलेल्या रिकाम्या मंदिराच्या आवारात कुंपण घालण्यात आलंय. मथुरेच्या जिल्हा दंडाधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, सीआरपीएफच्या तीन कंपन्या, सुमारे दीडशे पोलिस अधिकारी १३.७७ एकर परिसरात दोन्ही देवस्थानांना इजा करू इच्छिणाऱ्या, तोडफोड करणाऱ्या घटकांच्या कोणत्याही प्रयत्नांपासून त्या सुरक्षित ठेवण्यासाठी सतत गस्त घालत आहेत.
हा मोठा परिसर व्यापण्यासाठी ठिकठिकाणी टेहळणी बुरूज उभारण्यात आले असून कोणत्याही अनुचित प्रकाराला सामोरं जाण्यासाठी बॉम्ब निकामी पथकंही स्थापन करण्यात आली आहेत. पोलिस खात्याशी संबंधित दोन्ही समुदायांचे लोक जवळपासच्या भागात शांततेनं राहतात. १९९२ च्या अयोध्या घटनेनंतर काही लोकांनी इथंही दंगल घडवण्याचा प्रयत्न केला, मात्र कडक प्रशासनानं हे प्रयत्न हाणून पाडले होते. हु या चिघळलेल्या मंदिर-मशीद वादात मथुरेतल्या नेत्यांचा एक गट नवीन तत्त्वज्ञान मांडत आलाय. भारताच्या या पवित्र भूमीवर अनेक प्राचीन आणि नवीन मंदिरे, मशिदी, गुरुद्वारा आणि चर्च आहेत. अशा देशात एकमेकांच्या आवारात काही धार्मिक स्थळांवर कायमची भांडणे किंवा वाद होणं योग्य नाही. देशाच्या शांततेसाठी दोन्ही बाजूंना एक तडजोडीचा उपाय शोधावा लागेल की, ते एका बाजूला पूर्णपणे मान्य असो वा नसो! भूतकाळात, इस्माईल फारुकी यांनी १९९५ मध्ये दाखल केलेल्या दाव्यात हे निरीक्षण कायम ठेवत, सुप्रीम कोर्टानं म्हटलं होतं की मशीद हा इस्लाम धर्म पालन करण्याचा अत्यावश्यक भाग नाही. त्यानंतर न्यायालयानं हे शब्द निकालातून काढून टाकण्याची याचिका फेटाळून लावली. सर्वात महत्त्वाचं म्हणजे २०१९ मध्ये अयोध्या वादावर घटनापीठानं निर्णय दिलाय. सुप्रीम कोर्टानं काशी-मथुरा वादावर निर्णय दिल्यास तो देशाच्या हिताचा, बंधुभावाच्या असेल, त्यामुळं कोणीही भुवया उंचावू नयेत.
काही घटनांना उजाळा मिळाल्यानंतर समोर येतो तो इतिहास. असाच एक ज्वलंत इतिहास कृष्ण जन्माच्या वादानंतर पुढे आलाय. तो म्हणजे मराठ्यांनी मथुरेतून दिल्लीचं तख्त राखलं होतं. आणि याच मराठ्यांमधले महादजी शिंदे यांच्या कार्याला उजाळा मिळालाय. तो तो इतिहास जाणून घेणं गरजेचं आहे. मथुरेतल्या श्रीकृष्ण जन्मभूमीच्या वादानंतर मराठी शाहीच्या एका महान सरदाराचं थेट कनेक्शन समोर आलंय. मुगल सम्राट औरंगजेबानं श्रीकृष्णाच्या जन्मस्थानावर बांधलेले प्राचीन केशवनाथ मंदिर नष्ट केलं होतं. तर त्याच ठिकाणी १६६९-७० मध्ये शाही ईदगाह मशीद बांधली. यानंतर १७७० मध्ये गोवर्धन इथं झालेल्या युद्धात मराठ्यांचा विजय झाला. या विजयानंतर मराठ्यांनी पुन्हा मंदिर बांधलं. या विजयाचे शिल्पकार होते महादजी शिंदे...! मराठ्यांनी जय मिळवल्यानंतर मराठ्यांनी मथुरेत अनेक हिंदू मंदिरांची उभारणी केली. यामध्ये महादजी शिंदे हे आघाडीवर होते. मराठ्यांनी मुगलांना नमवत उत्तरेत मराठेशाहीचा भगवा झेंडा फडकवल्यानंतर महादजी शिंदे यांनी दिल्लीचा कारभार इथूनच हाकला. एवढेच नव्हे तर ते स्वतः कृष्णभक्त होते. त्यांची कृष्णभक्तीवरची कवनं देखील उपलब्ध आहेत. गौरवशाली इतिहास असलेले महादजी शिंदे यांचा जन्म ३ डिसेंबर १७३० मध्ये झाला. मराठा साम्राज्यातला एक प्रमुख योद्धा म्हणून त्यांना ओळखलं जातं. कमी वयातच त्यांनी आपलं शौर्य दाखवण्यास सुरुवात केली होती. १७४५ ते १७६१ या मराठ्यांच्या राज्य विस्ताराच्या सुवर्णकाळात त्यांनी ५० लढायांचे नेतृत्व केल्याचं सांगितलं जातं. पानीपतच्या तिसऱ्या लढाईतही महादजी यांचा सहभाग होता. कृष्णजन्मभूमीच्या निमित्तानं त्यांचं केलेलं हे स्मरण!
हरीश केंची,
९४२२३१०६०९.


No comments:

Post a Comment

आपलं ठेवायचं झाकून......!

"एकचालुकानुवर्तीत पक्ष आणि सत्ताधारी असं रूप 'लोकशाहीची जननी' म्हणवणाऱ्या देशात आकाराला येतंय. सामूहिक नेतृत्वाची प...