Monday 19 September 2022

पवार-येचुरींचा सत्ताबदलाचा मास्टरप्लॅन!

"बिहारचं राजकारण देशाच्या राजकारणाला वळण देणारं ठरतं असा आजवरचा अनुभव आहे. रथयात्रा अडवून भाजपच्या सत्तेचा सोपान तयार करणाऱ्या बिहारनं आता भाजपचा अश्वमेध रोखण्याचा निर्धार केलेला दिसतोय. भाजपची साथसंगत झिडकारून नितीशकुमार यांनी समाजवादी विचारधारा जवळ केलीय. आता ते प्रादेशिक पक्षांबरोबरच भाजप विरोधकांची जुळवाजुळव करताहेत. शरद पवार आणि सीताराम येचुरी यांनी जो काही मास्टरप्लॅन तयार केलाय त्याला आकार देण्यासाठी नितीशकुमार यांनी निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांना जवळ केलंय. दुसरीकडं काँग्रेसनं 'भारत जोडो यात्रा' आरंभलीय. त्याला मोठा प्रतिसाद मिळताना दिसतोय. देशातलं हे बदलत वातावरण पाहून भाजपही आक्रमक झालीय!"
--------------------------------------------

बिहारच्या राजकारणानं देशाच्या राजकारणाला एक वेगळं वळण लागण्याची शक्यता निर्माण झालीय; त्याचं सूतोवाच नितीशकुमार यांनी केलंय. मुख्यमंत्रीपदाची आठव्यांदा शपथ घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना जे काही म्हटलं, त्यानं स्पष्ट संकेत मिळताहेत. त्यांच्यामते '२०१४ मध्ये आम्ही आलो पण २०२४ मध्ये आम्ही येऊ की नाही हे माहीत नाही, पण 'ते' नक्की येणार नाहीत हे मात्र निश्चित!' याचाच अर्थ एक नवी खेळी खेळली जाणार आहे. भाजपनं देशातले सर्वच विरोधीपक्ष संपवण्याचा घाट घातलाय, तसं पक्षाध्यक्ष जे. पी. नढ्ढा यांनी उघडपणे सांगितलंय. आधीच देशातल्या गोदी मीडियानं 'विरोधीपक्षांकडं मोदींना पर्यायच नाही!' असं गृहितक उभं केलंय. त्यामुळं विरोधीपक्ष गर्भगळीत झालाय, बिहारच्या या सत्तान्तरामुळं त्यांना हायसं वाटू लागलंय! जेडीयु आणि आरजेडी एकत्र आल्यानं बिहारमधल्या लोकसभेच्या ४० आणि झारखंडमधल्या १४ अशा ५४ जागांवर त्याचा प्रत्यक्ष परिणाम होऊ शकतो. याबाबत हेमंत सोरेन आणि नितीशकुमार यांच्याशी शरद पवार- सीताराम येचुरी यांची चर्चा सुरू होती. या त्याला यश आलेलं दिसतंय. नितीशकुमार हे मोदींच्या प्रभावातून बाहेर पडल्यानं आता देशात नवं समीकरण आकाराला येईल, असं दिसतंय!

संसदेच्या लोकसभेच्या ५४३ जागा आहेत. त्यातल्या ३०३ जागा या आज भाजपकडं आहेत. २०१९ मध्ये त्यांना मिळालेली मतं आहेत ३७.३६ टक्के. पण जी मतं भाजपला मिळाली नाहीत त्याची टक्केवारी ६२.७४ इतकी आहे. म्हणजे जवळपास दुप्पट मतं भाजपच्या विरोधातली आहेत. युपीएकडं ११० तर इतरांकडे ९५ जागा आहेत. म्हणजे २०५ जागा या भाजप विरोधातल्या आहेत. नितीशकुमार यांना पुढं करून जर आणखी ७०-८० जागा मिळवता आल्या तर भाजपच्या तेवढ्याच जागा घटतील आणि भाजपच्या जागा ह्या २५० च्या आसपास राहतील. असं घडलं तर येचुरी-पवारांचा गेम इथं सुरू होईल. झारखंड, बिहार, उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्र यावर येचुरी-पवारांची नजर आहे. लोकसभेच्या झारखंड १४, बिहार ४०, उत्तरप्रदेश ८० आणि महाराष्ट्र ४८ अशा मिळून १८२ जागा आहेत. महाराष्ट्राला जरी वगळले तरी बिहार, झारखंड आणि उत्तरप्रदेशात लोकसभेच्या एकूण जागापैकी २५ टक्के जागा या पट्ट्यात आहेत. जो काही खेळ होईल तो इथंच होईल असा होरा असल्यानं येचुरी-पवार सतत नितीशकुमार, हेमंत सोरेन आणि अखिलेश यादव यांच्या संपर्कात आहेत. आज देशातल्या निवडणुकांसाठी मोदी-शहांच्यानंतर पवारच विरोधकांना संसाधन उपलब्ध करून देऊ शकतात. कारण देशातल्या सर्वच उद्योगपतींशी त्यांचे मैत्रीचे संबंध आहेत. देशातल्या विरोधीपक्षांची मोट बांधण्यासाठी पवारांशिवाय दुसरं व्यक्तिमत्त्व आजतरी नाही. कारण सर्व पक्षांशी पवारांचे व्यक्तिगत संबंध आहेत. आजतरी त्यांच्या या प्रयत्नात पवारांचा व्यक्तिगत स्वार्थ दिसत नाही. त्यांना प्रधानमंत्रीपद हवंय असं काही दिसत नसल्यानं ही मंडळी त्यांच्याभोवती जमू शकतात. मागे एकदा अशीच सर्व विरोधीपक्षांची बैठक पवारांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी झाली होती, त्यात काही प्रादेशिक पक्षाचे नेते उपस्थित होते. त्यावेळी त्या पक्षनेत्यांना वेगवेगळ्या सूचना करत पवारांनी सुनावलं होतं की, 'केंद्रातल्या सत्ता मिळवण्याच्या गोष्टी आपण नंतर करू या, जर प्रत्येक प्रादेशिक पक्षांनी आपापल्या राज्यातून भाजपला रोखलं आणि दूर हटवलं तर केंद्राची सत्ता आपल्या हाती येऊ शकते. त्यावेळी आपण चर्चा करू की, सरकार कसं असेल, कोणाचं असेल! केंद्रातलं सरकार मिळवण्याच्या नादात कमीतकमी आपलं राज्य तरी गमावू नका. आपल्या राज्यावरच लक्ष्य केंद्रित करा!'

येचुरी-पवारांचा जो मास्टरप्लॅन तयार होतोय त्यानुसार देशातल्या सर्व विरोधकांना, प्रादेशिक पक्षांना, राष्ट्रीय स्तरावरच्या पक्षांनाही ज्यात काँग्रेस आणि डावेही आहेत यांना एका छत्राखाली आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पवारांचे काँग्रेसच्या सोनियांशी, समाजवादी पक्षाच्या अखिलेश यांच्याशी चांगले संबंध आहेत. तेजस्वी यादव हे पवारांना वडिलांच्या जागी पाहतात. ममता बॅनर्जी यांच्याशीही त्यांचे चांगले संबंध आहेत, यापूर्वी त्याही दोन तीनदा मुंबईत येऊन पवारांना भेटल्या आहेत. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, बिजू जनता दलाचे नेते मुख्यमंत्री नवीन पटनाईक, आंध्रप्रदेशचे जगन रेड्डी, तेलंगणाचे के. चंद्रशेखर राव हेही पवारांचे निकटचे मानले जातात. स्टॅलिन यांच्याशीही पवार नेहमी संपर्कात असतात. सीपीएमचे सीताराम येचुरी यांच्या पक्षाचं केरळात सरकार आहे शिवाय ते पवारांचे संसदेतले सहकारी आणि व्यक्तिगत मित्रही आहेत. या सर्वांशी तुलना केली तर त्यांच्याकडं भाजपपेक्षा जास्त मतं आहेत. येचुरी-पवार यांच्या साथीनं नितीशकुमार २०२४ ला दिल्लीकरांना आव्हान देऊ शकतात. त्यांची रणनीती काय असेल, त्याची भूमिका काय असेल, ते कशाप्रकारे वर्कआऊट करताहेत हे हळूहळू लक्षात येईलच. गेले काही दिवस नितीशकुमार यांना बिहारमध्ये भाजपचं आव्हान दिसू लागलं होतं. नितीशकुमारांनी राबडीदेवी यांनी आयोजित केलेल्या एका रोजा इफ्तार पार्टीला आवर्जून उपस्थिती लावली होती. राबडीदेवी, तेजस्वी यादव, तेजप्रताप, लालूंनी कन्या मीसा याही तिथं त्यांच्यासोबत होत्या. त्यांच्यातली राजकीय दरी कमी झाल्याचं त्यावेळीच दिसून आलं. ते हास्यविनोद करीत होते. ह्या मनोमिलनामागे येचुरी-पवार असल्याचं म्हटलं गेलंय. पवार आणि सीताराम येचुरी यांनी २०१९ मध्येही हिंदी भाषिक पट्टयातून नितीशकुमार यांना लोकांसमोर आणून मोदींना पर्याय म्हणून आणण्याचा प्रयत्न केला होता. पण अखेरच्या क्षणी नितीशकुमार द्विधा मनःस्थितीत अडकल्यानं ते सारं बारगळलं. पण आता पवार आणि येचुरी यांचा असा एक प्रयत्न पुन्हा सुरू केलाय. नितीशकुमार यांना राष्ट्रीय नेतृत्वासाठी तयार केलंय. लोकसभा निवडणुकी दरम्यान तेजस्वीकडं बिहारची सूत्रं सोपवायची आणि रिंगणात उतरायचं असा नितीशकुमार यांचा विचार आहे. २०१५ मध्ये जेडीयु आणि आरजेडी म्हणजेच नितीशकुमार आणि लालूप्रसाद यादव यांनी बिहारात मोदींना चांगलाच शह दिला होता.

अनेक राज्यातल्या जवळपास १८०-२०० जागांवर काँग्रेसची भाजपशी थेट लढत होत असते. राजस्थान, हिमाचल प्रदेश, छत्तीसगड, मध्यप्रदेश असो अशा अनेक राज्यात ही थेट लढत आहे. तिथं काँग्रेसनं मजबुतीनं उभं राहावं असं पवारांना वाटतं. अशाचप्रकारे नितीशकुमार यांच्याकडंही ते पाहतात. हिंदीपट्ट्यात त्यांना मानणारा खूप मोठा वर्ग आहे. राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात, बिहार, झारखंड, छत्तीसगड, उत्तरप्रदेश, उत्तराखंड इथल्या हिंदी भाषिक मतदार स्वीकारतील असा नितीशकुमार यांच्याव्यतिरिक्त इतर कोणताही नेता आजतरी दिसत नाही. आठवेळा मुख्यमंत्रीपदाच्या शपथ घेणारे नितीशकुमार यांना केंद्रीयमंत्री म्हणून कामाचा अनुभव आहे. अटलबिहारी वाजपेयींच्या मंत्रिमंडळात ते होते. 'प्रधानमंत्रीपदाचे उमेदवार' म्हणून भाजपनं मोदींना जाहीर केल्यानंतर मोदींवर टीका करत ते भाजपप्रणीत सरकारमधून बाहेर पडले होते, हा इतिहास आहे. काँग्रेसचं हिंदी पट्ट्यातलं पुनरुज्जीवन आणि नितीशकुमार यांचं पुनरागमन कशाप्रकारे होतेय यावरच पवारांचा हा मास्टरप्लॅन अवलंबून असेल. पण एवढं मात्र निश्चित की, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना याची जाणीव झाल्यानंच सध्या पवारांना आणि त्यांच्या बारामतीला टार्गेट केलं जातंय, जेणेकरुन पवार तिथं अडकून राहतील! उत्तरभारतात आजतरी कोणताही मित्रपक्ष भाजपकडं राहिलेला नाही. त्यांनी तिथल्या मित्रपक्षांना संपवलंय. भाजपला नितीशकुमार यांचा हिंदुत्वाला विरोध आहे हे गृहितक आता चालविता येणार नाही. कारण आजवर बिहार आणि केंद्रात एनडीए सरकारमध्ये नितीशकुमार यांचा जेडीयु होता. सत्तेसाठी बिहारमध्ये नितीशकुमार चालले, त्यांच्या आमदारांची संख्या कमी असतानाही त्यांना मुख्यमंत्रीपद बहाल केलं होतं. त्यामुळं भाजपला नितीशकुमार यांना विरोध करण्याचा नैतिक अधिकार राहिलेला नाही. लोकसभेसाठी अद्यापि दोन वर्षांचा कालावधी शिल्लक आहे. विरोधकांची मोट बांधायला पुरेसा अवधी आहे. भाजपला नितीशकुमार यांचं आव्हान वाटत असल्यानं त्यांनी त्यांच्या विरोधात कंबर कसली आहे. 'पलटूराम' म्हणत त्यांच्यावर टीका केली जातेय. नितीशकुमार यांनी भाजपचा विश्वासघात केलाय अशीही टीका ते करताहेत. इथं मुद्दा सत्तेचा नाही तर सत्ता मिळवण्याच्या अघोरी मार्गाचा आहे. विविधतेत एकता न पाहण्याच्या दृष्टीकोनाचा आहे, एकाधिकाराचा आहे, राक्षसी महत्वाकांक्षेचा आहे. नागरिकांमध्ये सजगता आणण्याऐवजी बधीर-अंधत्व आणण्याचा आहे.

काँग्रेसकडं पवारांचा तोडीचा नेता नाही. पवारांचं राजकीय व्यक्तिमत्व मोदीही मानतात. कारण पन्नासवर्षांहून अधिक काळ ते सक्रिय राजकारणात आहेत. प्रधानमंत्रीही त्यांना चाणक्य मानतात. ते मागे एकदा जाहीरपणे म्हणाले होते की, 'राजकारणाची दिशा कोणत्या बाजूला झुकलीय वा हवा कोणत्या दिशेनं वाहतेय हे समजून घ्यायचं असेल तर त्यांच्या शेजारी जाऊन काही काळ बसलं तर लक्षांत येईल!' पवारांच्या व्यक्तिमत्वातले काही पैलू पाहिले तर लक्षांत येईल की, जे असाध्य ते साध्य करण्याचा ते प्रयत्न करतात. त्यांची पकड सहकारी चळवळी बरोबरच उद्योगपतींवरही आहे. ज्यांची कार्पोरेट कार्यालये इथं मुंबईतच आहेत. अदानी-अंबानीच नव्हे तर इतर सारे उद्योगपती पवारांसमोर नतमस्तक होत असतात. त्यामुळं काही घडवायचं असेल तर लागणाऱ्या साधनसामुग्रीची, संसाधनाची पवारांकडं कमतरता नाही. त्यामुळं एखादा निर्णय घेतला तर त्याची अंमलबजावणी मजबुतपणे ते करू शकतात. पवार कधी डगमगलेले दिसले नाहीत मग त्यांना ईडीनं बोलावलं असेल, त्यांच्या नातेवाईकांवर, सहकाऱ्यांवर कारवाया होत असतांनाही हे शांत दिसले. हाच आत्मविश्वास त्यांना राजकारणातली वाटचाल करण्याला ताकद देत असतो. संसाधन आणि अंमलबजावणीनंतर त्यांच्याकडं एक असा गुण आहे की, ते फोडाफोडीच्या राजकारणात माहीर आहेत. भाजपच्या मागे संघाची ताकद आहे. कार्यकर्त्यांचं मोहोळ आहे, कार्पोरेट जगताचा मोठा पाठींबा आहे. आता तर सर्व सत्ता हाती आहे. साऱ्या संस्था, यंत्रणा ताब्यात आहेत. असं असलं तरी देशातलं अंतर्गत संबंधातलं राजकारण मोदीहून पवार अधिक जाणतात. हे खुद्द मोदीही मानतात. ते शरद पवारांच्या पुस्तकाचं प्रकाशन करताना म्हणाले होते की, 'पवारांमध्ये एक शेतकरी लपलेला आहे. शेतकऱ्याला हवामानाचा अंदाज सर्वात आधी येतो. शरदरावांनी त्यांच्या त्या गुणांचा राजकारणात पुरेपूर उपयोग केलाय!' शरद पवारांसमोर दोन महत्वाची आव्हानं आहेत. एक काँग्रेसला वळवणं, त्यांच्यात पडलेली फूट सांधणं, अस्वस्थ असलेल्या, दूर गेलेल्या काँग्रेसजनांना एकत्र आणणं! काँग्रेसनं मजबुतीनं उभं राहावं असं पवारांना वाटतं. हा सत्ताबदलाचा राष्ट्रीय खेळ खेळण्यासाठी पवारांनी हाताशी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांना घेतलंय. वयोपरत्वे त्यांना हालचाली करणं शक्य नसल्यानं येचुरीच्या मदतीनं मास्टरप्लॅन तयार केलाय. पाहू या पुढं काय होतं ते!
हरीश केंची,
९४२२३१०६०९

No comments:

Post a Comment

लोकशाही की एकाधिकारशाही...!

"देशात लोकशाहीचा उत्सव सुरू आहे, पण सत्ताधारी  लोकशाही संसदीय ऐवजी अध्यक्षीय असल्यासारखे वागताहेत. सामूहिक नेतृत्व सांगणारा...