Saturday 20 November 2021

राजकीय रोमांचांचा काळ...!

बंगालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपेयींचा पराभव झाला. यासोबत झालेल्या इतर राज्यांच्या निवडणुकात म्हणावं तसं यश भाजपेयींना मिळालं नाही. यांचा आनंद काँग्रेसीना झालाय. नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपेयींना अपयशाला सामोरं जावं लागलंय. भाजपेयींच्या पराभवानं काँग्रेसनेत्यांना विशेषतः राहुल गांधी, प्रियांका गांधी यांना आपल्याच हाती सत्ता येणार अशी स्वप्न पडायला लागलीत. काँग्रेसीजन आणि त्यांचे नेते राहुल गांधी हे एका गोड गैरसमजात आहेत, 'मोदींना लोक कंटाळले आहेत, त्रासले आहेत. त्यांच्यासमोर काँग्रेसशिवाय पर्याय नाही!' अशा भ्रमात ते आहेत. पण त्यांच्या लक्षांत येत नाही की, पुढील अनेक दशकं भारतीय राजकारणावर भाजपेयींचेच वर्चस्व राहणार आहे; पण राहुल गांधींना वाटतंय की भाजप केवळ मोदी लाट असेपर्यंतच सत्तेत राहणार आहे या भ्रमात ते आहेत, पण वस्तुस्थिती तशी नाही, केवळ येत्या एक-दोन निवडणुकांमध्येच नाही तर पुढील अनेक दशकं भारतीय राजकारणावर भाजपेयींचेच वर्चस्व राहणार आहे. त्यामुळं मोदी-शहा युग संपण्याची वाट पाहणं ही काँग्रेस नेते राहुल गांधी यांची चूक ठरणार आहे, त्यांना पुढील अनेक दशकं भाजपेयींशी लढावं लागणार आहे!"
-----------------------------------------------------------

*व* र्षाच्या सुरुवातीला झालेल्या बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसनं विजय मिळवल्यानंतर काँग्रेसच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. त्यानंतरच्या पोटनिवडणुकीत भाजपेयींना अपयश आल्यानं तर काँग्रेसला सत्तेची स्वप्न पडायला लागली. त्यात तृणमूलचे सल्लागार प्रशांत किशोर यांनी काँग्रेसच्या राहुल आणि प्रियांका यांना आता काँग्रेस सत्तेवर येऊ शकेल अशी आशा दाखवली. त्यानंतर प्रशांत किशोर काँग्रेसवासी होणार अशा संदर्भातल्या बातम्याही आल्या होत्या. भाजपेयींच्या विरोधात विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न सुरु असताना, चर्चेच्या अनेक फेऱ्यांनंतरही काँग्रेसनं आपला ताठा नं सोडल्यानं विरोधकांची मोट बांधली जाऊ शकत नाही. आगामी गोवा विधानसभा निवडणुकीपूर्वी तृणमूल काँग्रेस आपण राष्ट्रीय स्तरावर आहोत हे दाखविण्यासाठी गोव्यातही पोहोचली आहे. प्रशांत किशोर यांनी शरद पवारांसह सर्व विरोधकांकडं एकत्र येण्याबाबतची चाचपणी केली. पण विरोधकांमध्ये एकजूट होण्याची शक्यता दिसत नाही हे लक्षांत येताच राजकारणात आपली काही डाळ शिजणार नाही हे पाहून त्यांनी राजकारणात शिरण्याचा प्रयत्न सोडून दिला. आणि यापुढच्या काळात राजकीय क्षेत्रात अनेक दशकं भाजपेयींच्या वर्चस्वाचा अंदाज वर्तवण्याबरोबरच राहुल गांधींचीही खिल्ली उडवण्यात धन्यता ते मानताहेत.

*भाजपेयीं राजकारणाच्या केंद्रस्थानी राहतील*
पुढच्या काही काळात भाजपेयीं जिंकतील किंवा हरतील, पण काँग्रेसच्या गेल्या ४०-५० वर्षांच्या कारभाराप्रमाणेच भाजपेयीं देखील भारतीय राजकारणाच्या केंद्रस्थानीच राहतील, हे मात्र निश्चित! भाजपेयीं कुठेही जाणार नाहीत. भारतात ३० टक्के मते मिळाली की कोणताही पक्ष इतक्या लवकर राजकारणातून बाहेर फेकला जात नाही, असा इतिहास आहे त्यामुळं भाजपेयीं जाणार नाही. लोक संतप्त होऊन मोदींना उखडून टाकतील या भ्रमात कुणी असतील तर ते मूर्खाच्या नंदनवनात राहताहेत असंच म्हणायला हवंय! भाजपेयींनी निर्माण केलेलं हे चक्रव्यूह भेदून फारसं कुणाला कधीही बाहेर पडता येणार नाही. लोक मोदींना हटवू शकतात, पण भाजपेयीं कुठेही जाणार नाहीत. पुढील अनेक दशकं विरोधकांना भाजपेयींचा सामना करावा लागणार आहे. काँग्रेसनं वा विरोधकांनी मोदींची ताकद कशात आहे हे समजून घेतलं, त्यांचा कमकुवतपणा काय आहे हे जाणून घेतलं तरच त्यांच्याशी सामना होऊ शकेल अन्यथा भाजपेयींना हटवणं शक्य वाटत नाही. मात्र राहुल गांधींची हीच अडचण आहे की, वास्तवतेचं भान त्यांना येत नाही. बहुधा, त्यांना असं वाटत असावं की भाजपेयींची राजवट ही फक्त थोड्या कालावधीची बाब आहे, पण जोपर्यंत लोक मोदींना सत्तेवरून घालवत नाहीत तोपर्यंत राहुल गांधींना वा इतरांना इथं येण्याची संधीच नाही. दुसरं असं की, तोपर्यंत असं काही होणार नाही. जोपर्यंत तुम्ही मोदींची ताकद समजून घेत नाही आणि त्यांची ताकद स्वीकारत नाही, तोपर्यंत तुम्ही त्यांचा सामना करू शकणार नाही. इथं दिसत असलेली अडचण अशी आहे की, लोक मोदींची शक्ती समजून घेण्यास जास्त वेळ देत नाहीत, त्यांना समजत नाही की मोदी इतके लोकप्रिय कसे होत आहेत. जर तुम्हाला हे माहित असेल तरच तुम्ही त्यांचा सामना करू शकाल!

*मोदी जाण्याची काँग्रेसवाले वाट पाहत आहेत*
तुम्ही काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याकडे जा, ते तुम्हाला सांगतील ही थोड्या काळाची बाब आहे, लोक कंटाळले आहेत, सत्ताविरोधी लाट येईल आणि लोक मोदींना हटवतील. मला शंका आहे, असं होणार नाही. मोदी सरकारनं पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवल्या तरीही त्यांच्याविरोधात मोठा जनक्षोभही निर्माण झालेला नाही. हे आपण अनुभवतो आहोत. डॉ. मनमोहनसिंगांची कारकीर्द ही अजिबात रोमांचक नव्हती. त्यांची धोरणं, निर्णय यावर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचं जबरदस्त नियंत्रण होतं. मनमोहनसिंग अर्थतज्ञ असले तरी सत्ता राबवणं त्यांना जमलं नाही. त्यामुळं पक्ष सत्तेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचायला हवा होता तसा तो पोहोचलाच नाही. त्यामुळं पक्ष कमकुवत झाला. पक्षाचे नेते हवालदिल झाले होते. ही वस्तुस्थिती मान्य करावी लागेल. हे वातावरण भाजपेयींनी त्यावेळी बरोबर हेरलं. तत्पूर्वी नरेंद्र मोदींनी गुजरातचे अध्यक्ष असतानाच २०१० सालीच असा निर्धार केला होता की, 'आपण चौकीदार व्हायचं!' तशी त्यांनी फिल्डिंग लावायला सुरूवात केली होती. त्यांनी आपले राजकीय स्पर्धक असलेल्या संघ प्रचारक सुनील जोशी यांना अश्लील सीडी प्रकरणातून बदनाम करून मार्गातून हटवलं. पाठोपाठ त्यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेले नितिन गडकरी यांची विकेट काढली. त्यांच्या विविध 'पूर्ती उद्योगा'वर टीकेचे आसूड ओढायला आपल्या मीडियातल्या माणसांना हाताशी धरलं. त्यांची कोंडी केली. पक्षाध्यक्षपदाची सूत्रं पुन्हा गडकरींच्या हाती जाणार नाहीत अशी व्युहरचना केली. मग राजनाथसिंह हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष बनले. त्यानंतर मोदींच्या योजनेनुसार लालकृष्ण अडवाणी यांना दूर सारलं गेलं. भाजपाध्यक्ष राजनाथसिंहांच्या माध्यमातून त्यांनी आपलं नांव 'प्रधानमंत्रीपदाचे उमेदवार' म्हणून जाहीर करवून घेतलं. त्यामुळं त्यांची वाटचाल सोपी झाली.

*सोशल मीडियावर राजकीय भांडणांचा उद्रेक*
मनमोहनसिंगांचं सरकार काही एकट्या काँग्रेसचं नव्हतं, तरी काँग्रेसला भ्रष्टाचाराच्या आरोपाची राळ उडवून विकत घेतलेल्या मिडिया आणि आंदोलकांकडून गदारोळ माजवला गेला. जे जे म्हणून भ्रष्टाचाराचे आरोप झाले ते आजवर सिद्ध झालेले नाहीत. तत्कालीन कॅगचे अध्यक्ष विनोद राय यांनी त्यावेळी आपल्या अहवालातून, भाषणांतून, लेख आणि लिहिलेल्या पुस्तकातून भ्रष्टाचाराच्या आरोपांची राळ उठवली होती. ज्याबद्धल राय यांनी जाहीर माफी मागीतलीय. मात्र या भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या गदारोळानं देशातलं राजकारण अधिकच रोमांचक झालं. या सगळ्या वातावरणात मनमोहनसिंगांच्या आणि देशाच्या शांततेत खळबळ माजली. या रोमांचकतेचा शेवट म्हणजे मोदी चौकीदार पदावर आरुढ होण्यात झाला. अशांत, अस्वस्थ आणि गोंधळाच्या वातावरणातून आता मोदी आणि देशाच्या कारकिर्दीत शांतता येईल. समाज आता राजकारण सोडून आपल्या उद्योगांकडं वळेल असं वाटलं होतं.
पण झालं भलतंच. मोदी प्रधानमंत्रीपदावर बसल्यापासून देशात दररोजच रोमांचक घटनांचा राजकीय भडीमार होऊ लागला. त्यांनी आपला अजेंडा राबवायला सुरुवात केली. याच काळात अस्तित्वात आलेल्या सोशल मिडिया खूपच तगडा झाला होता. भक्तांनी त्यावर उच्छाद मांडला. त्याच्यावर कार्यकर्त्यांच्या राजकीय भांडणांचा उद्रेक झाला. त्या भांडणाला धर्म, जाती, महापुरुष, प्रदेश, खरं, खोटं असे रंग आले. वाद विकोपाला जाऊ लागले. वातावरण अधिकच रोमांचक बनलं. जणू रोमांचांचं रानच माजलं. स्वतःला आमच्यावर आदर्श संस्कार झालेले आहेत म्हणणाऱ्या जाती घाणेरड्या शिव्यांची मुक्त उधळण करून आपल्या संस्कारांची विकृती व्यक्त करू लागल्या. लोकांच्या आणि पक्षांच्या श्रद्धास्थानावर आघात केले जाऊ लागले. प्रधानमंत्री मोदी फेकूसम्राट म्हणून त्यांची निर्भत्सना करण्यात कुणालाही काही वाटेनासं झालं. त्यामुळं त्याचा भारतीय जनता पक्ष आणि त्याची मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघही बदनाम होऊ लागला. केवळ भारतातच नाही तर सगळ्या जगभर त्याचे पडसाद उमटू लागले. हे एकीकडं सुरू असतानाच इकडं निवडणूक आयोग, न्यायालये, नोकरशाही, पोलीस, सीबीआय, एनसीबी, सैन्य असं सगळंच मोदीच्या अंकित बनलं आणि त्यानं देशात राडे वाढले. त्यातच कोरोनाच्या महामारीनं लोकांना वेठीला धरलं. त्याला आवर घेतला जातो की नाही, लगेचच मोदी सरकारनं मग देश विकायला काढला. विमानतळ, रेल्वे, रेल्वेस्थानकं, बंदरंच नाही तर सरकारी मालकीचे उद्योगही विकायला काढले. दरम्यान मोदींची सत्ता येऊन सात वर्षं झाली, या कालावधीत काँग्रेसवरचा केल्या गेलेल्या एकही भ्रष्टाचार सिद्ध झाला नाही. त्याबाबत मात्र देशातून कोणतीच प्रतिक्रिया व्यक्त झाली नाही.

*राजकारणाच्या रोमांचांचं जंगलच्या जंगल माजलं*
लोकशाहीच्या सर्वात मोठ्या देशात सतत येणाऱ्या एकापाठोपाठच्या निवडणुका, त्यातल्या दिल्या जाणाऱ्या थापा, देशानं फक्त सात वर्षांत ५५ लाख कोटी रुपये कर्ज घेणं, रिझर्व्ह बँकेचा सगळा पैसा लुटणं, सगळ्याच खात्याच्या खोट्या आकडेवाऱ्या, सरकारी नव्हे तर खासगी धर्मदाय ट्रस्ट असलेला भ्रष्ट पी.एम. केअर फंड, लोकांची जीवघेणी ठरलेली खोटी नोटबंदी, देशाच्या अर्थकारणावर परिणाम करणारी भंपक जीएसटी करपद्धती, महामारीच्या काळातल्या थाळ्या बडवणं, टाळ्या पिटणं असा रोज नुसता राडाच राडा. या राड्यातून कुणीच परकं राहिलं नाही. प्रत्येकाच्या अंगावर रोजच्या रोज राजकारण येऊन धो धो पडत राहिलं आणि देशातल्या प्रत्येकाच्या अंगावर राजकारणाचे रोमांचच रोमांच उभे राहिले! देश एवढा राजकीय रोमांचित महात्मा गांधींच्याच काळात झाला होता. पण ते त्यावेळचं विधायक राजकारण होतं. मोदीच्या काळात आख्खा देश पुन्हा एकदा राजकीय रोमांचित झालाय. पण हे सारं राजकीय वातावरण घातक आणि घाणेरडं राजकारण खेळू लागलाय. प्रत्येकाच्या अंगावर राजकारणाच्या रोमांचांचं जंगलच्या जंगल माजलंय. महात्मा गांधींना देशाला स्वातंत्र्य द्यायचं होतं, स्वतःसाठी काही कमवायचं नव्हतं, मोदीला देशाचं सगळं स्वातंत्र्य काढून घ्यायचं आहे, सारी सत्ता, प्रशासकीय यंत्रणा, तपास यंत्रणा, कार्यपलिका, न्यायपालिका सारंकाही आपल्या स्वतःच्या नियंत्रणात आणायचं आहे. एवढाच त्या दोघांमधला फरक. एवढ्या तीव्र आणि बेसुमार राजकीय रोमांचांचा हा काळ देश कधीच विसरणार नाही!
हरीश केंची,
९४२२३१०६०९
 
चौकट
*सत्तासमीप नेणाऱ्या महाजनांचा विसर...!*
गुजरातमध्ये नेतृत्वाचा वाद निर्माण झाला तेव्हा अटलजींनी प्रमोद महाजनांच्या सांगण्यावरून दिल्लीच्या राजकारणात रमलेल्या मोदींना गुजरातेत पाठवलं. ते जायला तयार नव्हते. आपल्याला राष्ट्रीय राजकारणातून हटविण्यासाठीच ही महाजनांची खेळी आहे. हे मोदींच्या लक्षांत आल्यानं त्यांनी महाजनांना 'मी तिथं असेपर्यंत यायचं नाही!' अशी ताकीद दिली. महाजनही अखेरपर्यंत गुजरातेत गेले नाहीत. दुर्दैवाने महाजनांचं निधन झालं आणि मोदींचा मार्ग मोकळा झाला. पण त्यांचा महाजनांवर राग होता. त्यामुळंच त्यांनी मुंढेना खेळवलं. तिष्ठत ठेवलं! भाजपेयींना सत्तेच्या निकट नेणाऱ्या महाजनांचा पक्षाला विसर पडलाय. पक्षानं आणि नेत्यांनी महाजनांची छबी आपल्या कार्यालयातून हटवल्या आहेत. न जाणो मोदींचा आपल्यावर कोप होईल म्हणून महाजनांच्या तसबिरी दूर गेल्यात. आता त्यांची आठवणही काढत नाहीत.

No comments:

Post a Comment

लोकशाही की एकाधिकारशाही...!

"देशात लोकशाहीचा उत्सव सुरू आहे, पण सत्ताधारी  लोकशाही संसदीय ऐवजी अध्यक्षीय असल्यासारखे वागताहेत. सामूहिक नेतृत्व सांगणारा...