Saturday 7 August 2021

क्रांती काँग्रेसची, भाजपेयींची...!

"सध्या देशात ज्याप्रकारचं राजकारण होतंय त्यानं उद्विग्नता यावी किंबहुना शिसारी यावी अशी स्थिती आहे. पूर्वी फक्त वृत्तपत्रे होती, दूरदर्शन होतं. जगाची माहिती सोज्वळतेनं मिळायची त्यानंतर दूरचित्रवाणी वाहिन्या अवतरल्या आणि घराचं सिनेमा थिएटर झालं. पाठोपाठ इंटरनेट, सोशल मीडियानं तर धुमाकूळ सुरू झाला. खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं करण्यासाठी व्हाट्सएप विद्यापीठ निर्माण झालं. मूल्याधिष्ठित राजकारण, साधनसुचिता, 'पार्टी विथ डिफरन्स'चा बुरखा घेतलेल्यांनी सत्तेवर येताच देशात जे काही घडलं वा घडवलं ते आम्हीच असा टेंभा मिरवायला सुरुवात केली. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातला इतिहास बदलायला सुरुवात केली. काही राष्ट्रपुरुषांचं चारित्र्यहनन करण्याचा जणू सपाटाच लावला. काँग्रेसनं देशाबाबत 'लाख चुका असतील केल्या, केली पण प्रीती...!' हे विसरता कामा नये !"
----------------------------------------------------------

*उ*द्या क्रांतीची धगधगती मशाल हातात घेऊन देशात स्वातंत्र्याचा प्रकाश आणण्यासाठी ज्या हजारो हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची पर्वा न करता आहुती दिली, अशा अमर हुतात्म्यांचा स्मृतीदिन! त्याला ‘ऑगस्ट क्रांती दिन’ असं म्हणतात. ९ ऑगस्ट १९४२ ला महात्मा गांधींनी ‘छोडो भारत’ ची गर्जना केली. गांधीजींचा ‘करेंगे या मरेंगे’ हा मंत्र तरुणांच्या नसानसात भिनला होता. “आता कार्यकर्ता नाही तर नेता बना”, असं आवाहनही त्यांनी केलं. स्वातंत्र्य संग्रामातला हा शेवटचा 'करो या मरो'चा लढा मानला जातो. इंग्रजांनी चालतं व्हावं, यासाठी गांधीजींनी ‘चले जाव’चा नारा दिला. ९ ऑगस्ट १९४२ रोजी मुंबईच्या गवालीया टँक इथं कॉंग्रेसचं अधिवेशन भरलं होतं. यात गांधींनी ‘छोडो भारत’ची हाक दिली. यातून ब्रिटिशांना भारत सोडून जाण्याचा निर्वाणीचा इशारा देण्यात आला. याची सुरुवात ‘गवालीया टॅंक’ म्हणजे आजच्या ‘ऑगस्ट क्रांती मैदाना’तून झाली आणि नंतर याचा भडका संपूर्ण देशात उडाला. इंग्रजी सत्तेविरुद्ध देश पेटून उठला. धर्म, जात, वंश इत्यादी बाबी बाजूला सारत लाखो लोक या जनआंदोलनात सामील झाले. इंग्रजांना नाकी नऊ आले. इंग्रजांनी इतक्या लोकांना अटक केलं की, जेलमध्ये जागाच शिल्लक राहिली नाही. लोकांनी पोलिस ठाणे देखील नेस्तनाबूत केलं. टेलिफोन सुविधा बंद केल्या. त्यामुळं भांबवलेल्या ब्रिटिश सरकारनं गोळीबाराचा आदेश दिला. मात्र, लोकांनी ब्रिटिशांच्या गोळीबाराला, लाठी हल्ल्याला न घाबरता आंदोलन सुरु ठेवलं. ब्रिटिशांनी गांधी आणि कॉंग्रेसच्या सर्व नेत्यांना अटक केली. महात्मा गांधी आणि त्यांच्या कुटुंबियांची रवानगी पुण्यातील गुप्त ठिकाणी केली. त्याचबरोबर कॉंग्रेसच्या इतर नेतेमंडळींनाही गुप्त जागी ठेवण्यात आलं. परंतु, ही बातमी फुटली. नेतेमंडळींना अटक झाल्यानंतर हे आंदोलन लोकांच्या ताब्यात गेलं. या आंदोलनामुळं जरी प्रचंड उद्रेक झाला असला तरी स्वातंत्र्याची पहाट या आंदोलनामुळेच उगवली, हे विसरता येणार नाही. पण सध्या सत्तेवर आलेलं सरकार हे स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या काळात जन्माला आलेल्यांचं आहे. या आणि अशा आंदोलनाची झळ त्यांनी अनुभवलेली नसल्यानं ते त्याबाबत गंभीर नाहीत. स्वातंत्र्यलढ्यातून सत्तेवर आलेल्या काँग्रेसनं ७० वर्षात काय केलं? असं विचारलं जातंय. त्यांच्यासाठी हे...! केवळ विधानसभा निवडणुकादरम्यानच नव्हे तर इतरवेळीही प्रधानमंत्री, गृहमंत्री आणि इतर भाजपेयीं नेत्यांनी गेल्या सत्तर वर्षाच्या काळात काँग्रेसनं केवळ सत्ता उपभोगली, देशाच्या प्रगतीसाठी, विकासासाठी काहीही केलं नाही. अशी भाषणं करताहेत. भक्तांना हे कदाचित नवीन वाटलं असावं; पण प्रधानमंत्री आणि मंडळी केवळ आत्ताच बोलताहेत असं नाही तर, ती मंडळी गेली सात वर्षे, सातत्यानं सभा-सेमिनार मधून, 'सत्तर वर्षात या देशात काहीच झालं नाही, काहीच घडलं नाही!' असा बकवास करत या खंडप्राय देशाचा सतत अपमान करत आलेत...! मी मोदींची ती चूक सुधारत, मोदींच्या वतीनं या देशाची माफी मागत, मोदींना आज देशात गेल्या सत्तर वर्षात काय घडलं, काय साकारलं याच्या काही गोष्टी सांगाव्यात म्हणतो...! भक्तांनीही हे जरूर वाचावं आणि आपली मतं बनवावीत...!

मोदीजी, तुम्ही जन्माला आलात १७ सप्टेंबर १९५० रोजी, या दरम्यान देश स्वतंत्र होऊन या देशात एका सक्षम आणि अद्वितीय संविधानाची निर्मिती झाली होती आणि २६ जानेवारी १९५० रोजी हे अद्वितीय संविधान या देशात रुजू झालं होतं, अर्थातच, तुमचा तेव्हा जन्म ही झाला नव्हता...! तुम्ही जेव्हा पाळण्यात असाल बहुधा, कदाचित सहा महिन्यांचे, तेव्हा या देशांकडून, पहिल्या एशियन गेम्सचं अत्यंत देखणं आयोजन करुन झालं होतं, ते साल होतं १९५०...! तुम्ही असाल जेव्हा केवळ चार वर्षांचे, तेव्हा देशात भाभा अणुशक्ती केंद्र नावाचं एक सेंटर स्थापन होऊन ते कामाला सुद्धा लागलं होतं...ते १९५४ मध्ये...! तुम्ही ११ वर्षांचे झालात, पाचवीत वगैरे असाल तेव्हा, या देशात, डझनभर आयआयटी, आयआयएम केंद्र उघडली गेली होती, शेकडो विद्यापीठं उघडली गेली होती आणि याच संस्थांमधून जे टाॅप क्लास विद्यार्थी घडले, त्यातल्या काहींनी परदेशाचा रस्ता धरला, आता तुम्ही परदेशी गेल्यावर तुम्हाला जो 'मोदी मोदी' असा जो जल्लोष ऐकायला येतो ना, तो याच नतद्रष्टांचा....! तर, या देशात पहिली आयआयटी सुरू झाली खरगपूरला १९५० साली आणि पहिली आयआयएम सुरु झाली १९६१ साली कलकत्त्यात...! याच वर्षी, १९६१ साली या देशानं, पोर्तुगीजांना गोव्यातून हाकलून गोवा या खंडप्राय देशात विलीन केला, तुम्ही तेव्हा केवळ अकरा वर्षांचे होतात...! तुम्ही जेव्हा १३ वर्षांचे होता, तेव्हा या देशातलं भाक्रा नानगल नावाचं महाप्रचंड धरण पंजाबात बांधून झालं होतं ... १९६२-६३...! तुम्ही तेरा-चौदा वर्षांचे असताना, या देशात विमानांचं असेंब्लिंग आणि हेलीकाॅप्टर्सची निर्मिती सुरू झाली...१९६४...! तुम्ही पंधरा वर्षांचे होतात, तेव्हा या देशाच्या फौजांनी लाहोरपर्यंत धडक दिली होती...! लाहोर पाकिस्तान नावाच्या देशात आहे आणि आपले उपोषणसम्राट अण्णा हजारे तेव्हा भारतीय सैन्यात ड्राइव्हर होते...! तुम्ही १९ वर्षांचे असाल तेव्हा या देशात तारापूर न्युक्लिअर पाॅवर प्लांट सुरू झाला होता, इंडियन स्पेस रिसर्च आॅर्गनायझेशन याच वर्षी या देशात अस्तित्वात आलं होतं...१९६९ मध्ये...! तुम्ही २१ वर्षाचे झालात, या देशाचे कायदेशीर मतदार झालात, तेव्हा इंदिरा गांधी नावाच्या, या देशाच्या एका बुलंद प्रधानमंत्र्यानं पाकिस्तान नावाच्या देशाचे दोन तुकडे करून, बांगलादेश नावाचा एक नवा देश या भूतलावर जन्माला घातला...! धर्माधिष्ठित संकल्पनेच्या आधारावर निर्माण झालेला पाकिस्तान, त्याचे दोन तुकडे होत असताना धर्म बिलकुल आडवा आला नाही बरं का...! तुम्ही २४ वर्षांचे झालात तेव्हा या देशानं पहिलं परमाणू परिक्षण केलं बरं का...१९७४ मध्ये...! तुम्ही ३७ वर्षांचे झालात, म्हणजे साधारण १९८७ ला, या देशात राजीव गांधी नावाच्या प्रधानमंत्र्यानी, सुपर कॉम्प्युटर आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी नावाची न भूतो अशी क्रांती आणली आणि या देशानं प्रगतीच्या क्षितीजावर एक बुलंद भरारी घेतली ...! राजीवजींचा खून झाला, नरसिंहराव नावाचे गंभीर आणि विद्वान गृहस्थ या देशाचे प्रधानमंत्री झाले, तेव्हा जागतिक मंदीनं देश एका महाभयंकर आर्थिक संकटात सापडला होता, या देशाचं सोनं जागतिक बँकेकडं गहाण ठेवावं लागलं होतं पण, डॉ. मनमोहनसिंग नावाचे एक जागतिक कीर्तीचे अर्थशास्त्री, नरसिंहरावांच्या मंत्रीमंडळात अर्थमंत्री होते, या अर्थमंत्र्यांनं आपल्या प्रधानमंत्र्यांच्या सहाय्यानं या देशात आर्थिक उदारीकरणाची, खुल्या आर्थिक धोरणाची नव्यानं सुरुवात करून देशाला त्या संकटातून अलगद बाहेर काढलं ...! हेच मनमोहनसिंग पुढे या देशाचे दहा वर्षे पंतप्रधान होते बरं का ...! याच दरम्यान या देशात, चंद्रयान, मंगळयान, जीएसएलव्ही, मेट्रो, मोनोरेल, इंटरनॅशनल एअरपोर्ट्स, पोर्ट्स, जहाजे, सबमरिन्स, पृथ्वी, अग्नी, पिनाक नावाची मिसाईलस्, तेजस, चेतक, धनुष, नावाची हेलिकॉप्टर्स, सुखोई, मिग नावाची फायटर विमानांची निर्मिती, काय आणि किती सांगू....! बरं असो मोदीजी आता थांबतो,... पण शेवटचा एक प्रश्न विचारतो...! मोदीजी देशात झालेली ही प्रगती खरच तुम्हाला ठाऊक नाही? आणि असेल ठाऊक तर मग तोंड उचकटून कशाला हो या देशाचा वारंवार अपमान करीत असता? आपल्या पूर्वजांच्या कार्यकर्तृत्वाचा अनादर करता?

२६ मे २०१४ रोजी नरेंद्र दामोदरदास मोदी या देशाचे प्रधानमंत्री झाले आणि पुढचं सारं तुम्हाला ठाऊक आहे...! ७० वर्षात काय केलं? जे केलं तेच विकून विकून सुध्दा देश चालवता येईना, स्वतःची थापांशिवाय कोणतीच बोंब पडली नाही...! स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पायाभूत क्षेत्र आणि अवजड उद्योगासाठी प्रगती साधण्यासाठी प्रधानमंत्री नेहरूंच्या सरकारनं मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली अन या क्षेत्रासाठी सरकारी कंपन्या स्थापन झाल्या. एकेकाळी या सरकारी कंपन्यांची संख्या ३८० पर्यंत पोहोचली होती. भारताच्या अर्थव्यवस्थेला आज पुन्हा झळ लागलीय. नोकऱ्यांचं आश्वासन पाळता आलेलं नाही उलट लोक बेरोजगार होताहेत, बॅंकांना टाळे लागतायत, अनेक कंपन्या बंद पडतायत. सरकारकडं देश चालवायला पैसा पुरत नाही. पैसे नसले की ते मिळवण्याचे तीन मार्ग सरकार वापरतं. बेग, बॉरो आणि स्टील. म्हणजे मागायचं, उधार घ्यायचं किंवा चोरी करायची. अलिकडेच टॅक्स भरा अशी विनंती सरकार वारंवार करतंय म्हणजे लोकांकडून मागून पैसे जमवतंय. बॉरो म्हणजे उधार घेणं. जागतिक बाजारातून, वर्ल्ड बॅंकेतून सरकार पैशांची उचल करतंय. मध्यंतरी सरकारनं रिझर्व्ह बँकेकडून पैसे घेतलं होते. सरकार चोरी तर करू शकत नाही. मग काय करणार? तर सरकारनं चक्क घरातली भांडी विकायला काढलीयत. आता ही भांडी कोणती? तर सरकारच्या मालकीची जमीनी आणि पूर्वीच्या काँग्रेसी सरकारनं निर्माण केलेल्या १०० हून अधिक सरकारी कंपन्यांचं खासगीकरण किंवा निर्गुंतवणूक करायचं असं सरकारनं ठरवलंय. सरकारी म्हणजे तुमच्या आमच्या मालकीच्या बँका विकायला काढल्यात. विकासाची कामं करण्यासाठी पैसा लागतो. रस्त्यांची कामं करायला, सरकारी दवाखाने, शाळा चालवायला पैशांची गरज असते. देशातल्या श्रीमंत आणि उच्च मध्यमवर्गीय नागरिकांकडून आणि भरपूर नफा कमवणाऱ्या कंपन्यांकडून सरकार कर घेतं. तसंच नागरिकही वेगवेगळ्या वस्तुंवर अप्रत्यक्ष कर देतात. त्यातून ही विकास कामं होतात. यासाठी आर्थिक नियोजन व्यवस्थित करायला हवंय पण नियोजनाअभावी ह्या टॅक्समधून मिळणार पैसा कमी पडू लागलाय. त्यामुळं सध्या अशी परिस्थिती सरकारवर ओढवलीय. पण त्याची जाणीव सरकारला नाही. सरकार दिवाळखोरीत निघणार तर नाही ना? अशी भीती वाटतेय. आर्थिक, औद्योगिक बाबीत लक्ष घालण्याऐवजी भावनात्मक गोष्टींचं अवडंबर माजवलं जातंय! मंत्र्यांवर होणारा खर्च पाहिला तर करदात्यांच्या पैशाचा कसा अपव्यय होतोय तो दिसून येईल. 'चहावाल्याचं पोर' म्हणून सहानुभूती मिळवणाऱ्याचा खर्च पाहिला तर डोळे फाटून जातील अशी परिस्थिती आहे.

प्रधानमंत्री म्हणून नरेंद्र दामोदरदास मोदी यांनी शपथ घेतली. राष्ट्रपती भवनाच्या आवारात दैदिप्यमान असा सोहळा पार पडला. सोहळ्यात नरेंद्र मोदी शपथ घेत होते आणि समोर अनेक दिग्गजांसोबतच 'सार्क संघटनेतील सगळ्या देशाचे राष्ट्राध्यक्ष उपस्थित होते. सारा माहौल भारदस्त होता. तेव्हापासून आज या सातवर्षाच्या कार्यकाळात तुम्हाला भारतीय संघराज्याची चौकट हळूहळू ढासळली जात असताना पाहावं लागलंय. शिवाय देशातल्या संवैधानिक संस्थांना कसं 'कुंद' बनवून टाकलंय. हेही आपण अनुभवलं असेल. पण अनेक गोष्टी दिसत नाहीत. या कालखंडात २०० हून अधिक नव्या योजनांची घोषणा प्रधानमंत्र्यांनी केल्या आहेत. या घोषणांची चर्चा होते पण या योजनांतील सत्यता आपल्याला ठाऊक नाहीये. देशाला ७० वर्षांत पहिल्यांदा असे प्रधानमंत्री मिळालेत की, ज्यानं प्रत्येक क्षेत्रात नवं रेकॉर्ड प्रस्थापित केलंय. जे कधीच विसरता येणार नाही. हे हवं तर कुणी सुवर्णाक्षरात लिहू द्यात. पण तुम्हाला तो एखादा डाग लागल्यासारखा दिसेल. हा असा एक प्रवास आहे, महागाईचा, बेरोजगारीचा, नोटबंदीचा, बँकांच्या विलिनीकरणाचा, जीएसटी, तीन तलाक, सीएए, कोरोनाच्या महामारीतील उपाययोजनेत आलेलं अपयश, देशात प्रचार प्रसिद्धीसाठी होणारा खर्च, महामारीतील मृत्यूंचं तांडव, लसीकरण, प्रवासी मजदूरांची स्थिती हा या सत्तेचा कसला प्रवास आहे?

करदात्यांच्या जमा झालेल्या पैशांवर प्रधानमंत्री आणि त्यांचे सहकारी कसे आलिशान, श्रीमंती जीवन जगताहेत हेही लोकांसमोर आहे. पण नागरिकांच्या पदरी काहीच येत नाही. त्यासंबंधीचे आकडे आणि वस्तुस्थिती याची माहिती आपण घेतली पाहिजे. भारताचा जीडीपी आज या आर्थिकवर्षात १३४ लाख कोटी इतका होता. गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी झालाय. तो १४५ लाख कोटी रुपये इतका होता. त्याआधी तो १४० लाख कोटी इतका होता. म्हणजे दिवसेंदिवस तो कमी होत चाललाय. यावरूनच लक्षांत येईल की, इथल्या लोकांचं उत्पन्न कमी होत गेलंय. देशात शहरी, ग्रामीण, आदिवासी भागांत राहणाऱ्यांच्या उत्पन्नाची सरासरी काढली जाते. मग ते सर्वसामान्य माणसाचं उत्पन्न असेल, प्रधानमंत्र्यांचं असेल, अदानी-अंबानीचं वा इतर कोणत्याही कार्पोरेटमधल्याचं, बेरोजगार, शेतकरी यांचं उत्पन्न असेल. लोकसंख्येच्या जीडीपीनं भागलं तर प्रत्येक माणसाचं समान उत्पन्न आपल्याला दिसेल. २०१७-१८, २०१८-१९, २०१९-२० यातुलनेत उत्पन्न घटत गेलं. १ लाखापेक्षा कमी म्हणजे ९९ हजार ६९४ रुपये प्रतिव्यक्तीचं वार्षिक उत्पन्न झालंय. तर मासिक उत्पन्न ८ हजार ३०७ रुपये ८३ पैसे इतकी आहे. आणि प्रतिदिनी उत्पन्न २७३ रुपये १३पैसे.…..! याचा तुलनेत प्रधानमंत्र्यांचा किती खर्च होत असेल? त्यांच्या प्रवासखर्चाचा हिशेब इथं पकडला नाही तो दरमहा पाचशे ते सातशे कोटी इतका आहे. जे विमान त्यांच्या दिमतीला आहे त्याच्या देखभालीसाठी दीड हजार कोटी खर्च येतो. केवळ हेच नाही तर त्यांच्यासाठी म्हणून जो वाहनांचा ताफा आहे. त्यात बीएमडब्ल्यू सेवनसिरीज च्या सहा मोटारींचा ताफा आहे, यातील प्रत्येक मोटारीची किंमत अडीच हजार कोटी इतकी आहे. रेजरेव्हर सिक्युरिटीसाठी..! प्रधानमंत्री कार्यालयातली कर्मचाऱ्यांची संख्या ही इतर कोणत्याही प्रधानमंत्र्यांपेक्षा सर्वाधिक आहे. देश चालविण्यासाठी की, प्रधानमंत्र्यांचं कार्यालय चालविण्यासाठी इथली इकॉनॉमी काम करतेय, हेही जरा समजून घ्या! हे अशासाठी म्हणतोय की, इथल्या प्रत्येक व्यक्तीचं मासिक उत्पन्न ८ हजार ३०७ रुपये आहे तर प्रधानमंत्र्यांच्या सुरक्षेसाठी प्रती मिनिट ८ हजार १२५ रुपये इतका आहे. म्हणजे प्रधानमंत्र्यांच्या सुरक्षेसाठी प्रती मिनिट खर्च होतो तेवढं उत्पन्न इथल्या प्रतिव्यक्तीचं मासिक उत्पन्न आहे. प्रधानमंत्री म्हणून नरेंद्र दामोदरदास मोदी यांनी शपथ घेतली. राष्ट्रपती भवनाच्या आवारात दैदिप्यमान असा सोहळा पार पडला. सोहळ्यात नरेंद्र मोदी शपथ घेत होते आणि समोर अनेक दिग्गजांसोबतच 'सार्क संघटनेतील सगळ्या देशाचे राष्ट्राध्यक्ष उपस्थित होते. सारा माहौल भारदस्त होता. तेव्हापासून आज या सातवर्षाच्या कार्यकाळात तुम्हाला भारतीय संघराज्याची चौकट हळूहळू ढासळली जात असताना पाहावं लागलंय. शिवाय देशातल्या संवैधानिक संस्थांना कसं 'कुंद' बनवून टाकलंय. हेही आपण अनुभवलं असेल. पण अनेक गोष्टी दिसत नाहीत. या कालखंडात २०० हून अधिक नव्या योजनांची घोषणा प्रधानमंत्र्यांनी केल्या आहेत. या घोषणांची चर्चा होते पण या योजनांतील सत्यता आपल्याला ठाऊक नाहीये. देशाला ७० वर्षांत पहिल्यांदा असे प्रधानमंत्री मिळालेत की, ज्यानं प्रत्येक क्षेत्रात नवं रेकॉर्ड प्रस्थापित केलंय. जे कधीच विसरता येणार नाही. हे हवं तर कुणी सुवर्णाक्षरात लिहू द्यात. पण तुम्हाला तो एखादा डाग लागल्यासारखा दिसेल. हा असा एक प्रवास आहे, महागाईचा, बेरोजगारीचा, नोटबंदीचा, बँकांच्या विलिनीकरणाचा, जीएसटी, तीन तलाक, सीएए, कोरोनाच्या महामारीतील उपाययोजनेत आलेलं अपयश, देशात प्रचार प्रसिद्धीसाठी होणारा खर्च, महामारीतील मृत्यूंचं तांडव, लसीकरण, प्रवासी मजदूरांची स्थिती हा या सत्तेचा कसला प्रवास आहे? गेल्या सातवर्षातले २ हजार ५५५ दिवस! या अडीच हजार दिवसात देशांतर्गत आणि परदेशात विमानप्रवास जो मोदींनी केलाय, तेवढा प्रवास आजवर कोणत्याच प्रधानमंत्र्यांनी केलेला नाही. निवडणुकांच्या प्रचारातही मोदींएवढा प्रवास कुण्या प्रधानमंत्र्यांनं केलेला नाही. त्यांनी ६८२ विमानप्रवास केलाय. यापैकी २१२ दिवस आंतरराष्ट्रीय दौरे केले आहेत. ४७० दिवस त्यांनी देशांतर्गत विमानप्रवास केलाय. या ४७० पैकी २०२ दिवस त्यांनी निवडणूक प्रचार केलाय. निवडणूक प्रचारासाठीचा प्रवास हा खरंतर सरकारी असत नाही. 'अनऑफिशिअल', खासगी दौरा असतो. पण हे सारे दौरे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय हे सरकारी खर्चाने झाले आहेत. सत्तेचे २ हजार ५५५ दिवस आणि ६८२ दिवसांचा प्रवास म्हणजे जवळपास दर तीन दिवस आणि ७ तासांनी हा प्रवास सुरू झालाय. म्हणजे दर पाच दिवसांनी प्रधानमंत्री कार्यालयातून बाहेर, दर बाराव्या दिवशी निवडणूक प्रचार आणि दर अकराव्या दिवशी आंतरराष्ट्रीय दौऱ्यावर जात. या साऱ्या प्रचारासाठी ७ हजार ६५८ कोटी रुपये खर्ची पडलेत. २०१७-१८ मध्ये सर्वाधिक १ हजार ३१३ कोटी, २०१९-२० मध्ये सर्वात कमी म्हणजे ७१३ कोटी आहेत. २ हजार ५५५ दिवसात ७ हजार ६५८ कोटी म्हणजे प्रतिदिन तीन कोटी रुपये प्रधानमंत्र्यांच्या प्रचार, प्रसिद्धीसाठी खर्च झालेत. हा पैसा येतो कुठून? तर तो करदात्या नागरिकांकडून! अशा अनेक बाबी आहेत. तूर्त इतकंच...!
हरीश केंची
९४२२३१०६०९





No comments:

Post a Comment

बदसूरत ’पॅटर्न'

‘ ‘अब की बार चारसौ पार’ ची घोषणा देऊन तिसऱ्यांदा सत्ताप्राप्तीसाठी लोकसभा निवडणुकीत शड्डू ठोकून उतरलेल्या भाजपची जोडी मोदी-शहा य...