Sunday 15 August 2021

स्वातंत्र्याचं अमृतमंथन...!

"समुद्रमंथनातून हलाहल निघालं तेव्हा ते भगवान शंकरानं प्राशन करून जगाला वाचवलं. आज देशातले सत्ताधारी आणि सत्ताकांक्षी यांनी समाजमनाची जी घुसळण चालवलीय त्यातून जे वैचारिक हलाहल बाहेर येतंय ते प्राशन करायला कोणता 'नीलकंठ' उभा ठाकणार आहे? काँग्रेस, भारतीय जनता पक्ष हे राजकारणातले मुख्य चैतन्यदायी स्रोत. ह्या स्रोताचा प्रभाव लक्षांत घेतला की, आपण 'देवाच्या आळंदीऐवजी चोरांच्या आळंदी'ला कसे पोहोचलो आहोत हे लक्षांत येईल! पाऊणशे वर्षांपूर्वी स्वातंत्र्य मिळताना देशाचे जसे तुकडे झाले; तसे समाजाचेही तुकडे होऊन समाज विखुरला गेला. भारतीयांनी आपली अवस्था आपल्याच अंगावर आसूड ओढून घेत रक्तांच्या चिळकांड्या उडवणाऱ्या कडकलक्ष्मीसारखी करून घेतलीय! स्वतंत्र भारत हा एकात्म भारत आहे असं आजच्या वातावरणात जाणवतच नाही. धार्मिक, जातीय, भाषिक, वर्गीय, वर्णीय भेदांनी परस्परांमध्ये जो द्वेष, गैरसमज, अविश्वास निर्माण झालाय, तो दिवसेंदिवस वाढतोच आहे. तो कधी आणि कसा थांबेल यासाठी प्रयत्नशील राहायला हवंय...!"
--------------------------------------------------------------

नाचविता ध्वज तुझा गुंतले शृंखलेत हात l
तुझ्या यशाचे पवाड गाता गळ्यात ये तात l
चरणांचे तव पूजन केले म्हणुनी गुन्हेगार l
देता जीवन-अर्घ्य तुला ठरलो वेडेपीर l
देशील ना पण तुझ्या कुशीचा वेड्यांना आधार l
आई वेड्यांना आधार l
गर्जा जयजयकार, क्रांतीचा गर्जा जयजयकार ll
असं म्हणत हजारो क्रांतिवीरांच्या बलिदानानं ओथंबलेलं, तेजःपूंज स्वातंत्र्य भारताला मिळालं आणि कोट्यवधी जनता धन्य झाली. भारत आज ७५ वा स्वातंत्रदिन साजरा करतोय. स्वातंत्र्याची सात दशकं लोटली, तरी आजही शूरवीर स्वातंत्र्यसैनिकांच्या चित्तथरारक कथा, कहाण्या ऐकल्या की, शरीर, मन आणि विचार शहारल्याशिवाय राहत नाही. शंभर वर्षांच्या लढ्यानंतर भारतानं 'नियतीशी करार' केला आणि दीडशे वर्षाच्या गुलामगिरीतून भारत मुक्त झाला. शतकानंतर स्वातंत्र्याची रम्य पहाट उगवली, तेव्हा तिचं स्वागत सगळ्यांनीच केलं. परंतु, नुकत्याच स्वतंत्र झालेल्या देशापुढं गरिबी, निरक्षरता, बेकारी, अन्नटंचाई यासारखे असंख्य प्रश्न 'आ' वासून उभे होते. याशिवाय, वेगवेगळे धर्म, भाषा, जाती, जमाती, वर्ग आणि संस्कृती असलेल्या या देशाला एकसंघ कसं ठेवायचं, हा तर अवाढव्य प्रश्न होता. तरीही तेव्हाच्या सत्ताधाऱ्यांसह सर्वपक्षीय नेत्यांनी सर्व प्रश्नांवर सारासार विचार करून धेय्य-धोरणं आखली आणि लोकशाहीवर विश्वास असलेलं प्रजासत्ताक स्थापन झालं. त्यासाठी फार लवचिक आणि फार ताठरही नसलेलं; सगळ्या घटकांना सामावून घेणारं, साऱ्या जगात आदर्श ठरेल असं 'संविधान' स्वीकारलं. 'संविधान' हे देशाचे नागरिक म्हणून भारतीयांना मिळालेली सर्वात मोठी ताकद होती. सुरुवातीच्या काळात सत्ताधाऱ्यांनी दाखवलेल्या या दूरदृष्टीमुळं भक्कम पाया बांधला गेला, रचला गेला आणि भारत एक विकसनशील देश म्हणून वाटचाल करू लागला. भारताला स्वातंत्र्य, स्वाधिनता सुपूर्त करताना ब्रिटिश प्रधानमंत्री विन्स्टन चर्चिल म्हणाले होते, 'भारत देश म्हणून टिकू शकणार नाही; त्याचे तुकडे होतीलं!' तसं काहीच न घडता आपलं वैविध्य जपत भारत अखंड राहिला. प्रगतीचे एकेक टप्पे पार करत राहिला. आज एक महत्त्वाची जागतिक शक्ती म्हणून भारताची ओळख आहे. मात्र त्याच वेळी इतर अनेक गोष्टींमध्ये अजून आपण पिछाडीवर आहोत हेही वास्तव आहे. त्याची अनेक कारणं आहेत, हे नाकारता येणार नाही. पाऊणशे वर्षाच्या या वाटचालीत कुठल्या घटना, टप्पे, गोष्टी महत्त्वाच्या ठरल्या; त्यांनी भारतीय प्रभाव पडला आणि भारतीय समाजाला नव्या वळणावर आणून ठेवलं. याचं सिंहावलोकन होणं गरजेचं आहे. ते भारताच्या पुढच्या वाटचालीसाठी दिशादर्शक ठरणारं आहे!

स्वातंत्र्यानंतरच्या पाऊणशे वर्षात जग खूप बदललंय! या बदलाचा भारतही साक्षीदार आहे. या पाऊणशे वर्षात सामाजिक विकास आणि बदलाचे परिणाम झालेत. त्याचं मूल्यांकन करण्याचं काम सोपं नाही. बदल हाच जगाचा आरसा असतो. या अशातच आपल्या पुढची नवी पिढी दिसते. दोन पिढ्यातील विचारांचा समाजाकडं पाहण्याचा, त्याच्या दृष्टिकोनाचा, आचार व्यवहाराचा फरक दिसतो. हा बदल स्पष्टपणे सांगू लागला की, त्याची योग्यता तपासताना आपली मनस्थिती कोणत्या मार्गानं जायचं, या विचारात गुंतलेल्या तिच्यावरच्या नौजवानांच्या सारखी होती. या नौजवानाला जुन्या रस्त्यानं जाण्याचा मोह होत असतो. त्या मार्गावरचा त्याग, शौर्य त्याला खुणावत असतं. त्या मार्गानं जाण्यासाठी मन उसळी घेतं, पण वर्तमानातला मार्ग त्याला सेवा आणि व्यवहार यांच्या युतीचा अर्थ दाखवत असतो. त्या मार्गावर बरीच वर्दळ सुरू असते. तिसरा मार्ग खुला असतो, पण त्या मार्गावरचे धोके आणि मोके त्याला ठाऊक नसतात. तरीही थोडेफार लोक त्या मार्गानं जाताना दिसतात. या तिहेरी पेचातून सुटण्यासाठी नवजवान त्याच्या स्वभावानुसार तडकाफडकी एक मार्ग पत्करतो, चालू लागतो. त्या चालण्याचा आनंद घेतो. पण काही काळानंतर हा आनंद घटत असल्याची जाणीव त्याला होते. आपलं हे चालणं योग्य असलं तरी, रस्ता चुकीचा असल्याचं त्याला कळतं. तो थांबतो, चुक दुरुस्त करण्याचा विचार करतो. पण आता आपल्यात काही बदल घडवून आणण्याची ऊर्जा, उमेद शिल्लक नसल्याचं त्याला कळतं. मग तो आपण निवडलेला मार्गच कसा योग्य आहे; हे ते सांगू लागतो. भारतीय समाजाची मनोवस्था यापेक्षा वेगळी नाही. याबाबत राजकीय नेतृत्वाला दोष देता येणार नाही. 'यथा राजा तथा प्रजा!' असा साक्षात्कार लोकशाहीत घडत नाही लोकशाहीत जसे लोक असतात तसेच त्यांचे नेते असणार. 'भल्याच्या बतावणी'ला भूलणं ही मूळ भारतीयांची सनातन खोड आहे. फसणारे आहेत म्हणून फसवणारेही आहेत. हे लोकशाही ठळकपणे दाखवत असूनही लोक किरकोळ स्वार्थ, खोटे अहंकार, अनावश्यक लाचारी, तडजोडी या अवगुणांमुळं फसवणार यांना संपू शकत नाहीत. परिणामात देशाच्या विकासाची चमकधमक दिसत असूनही भारतातील ६०-७० टक्के गावात वीज पोहोचलेली नाही. शौचालय ही नाहीत. प्राथमिक शिक्षणाची व्यवस्था जेमतेम पोहोचलीय. दुर्गम भागातील लाखभर लोकांना वैद्यकीय सेवा अभावी दरवर्षी मरण पत्करावं लागतं. ही अर्ध्याहून अधिक भारतीय लोकसंख्येच्या खेडेगावात राहते, तिथली ही दुरावस्था आहे. उर्वरित भारताची स्थिती त्यापेक्षाही भयानक आहे. 'अपहरण ते आरक्षण पर्यंतचं राजकारण' धर्म, जाती आणि समाज विघातक घटकांशी युती करून खुलेआम सुरू आहे. खेडेगावात विकासाचा अंधार आहे तर शहरी भागात सुरक्षेचा अंधार आहे. अशी विचित्र स्थिती आहे. कोणाच्या भयानक परिस्थिती ही

माणूस हा बुद्धिजीवी प्राणी आहे. तसाच तो परिवर्तनशील आणि प्रगतिशील आहे. धर्मकल्पना कितीही उदात्त असली तरी ती स्थितिशील आहे. धर्माचा वाढविस्तार झाल्यानं संबंधित समस्त धर्मियांचा विकास झालाय असा आजवरचा इतिहास नाही. आणि वर्तमानही नाही. किंबहुना धर्मबंधनानं आंतरिक वर्चस्ववाद वाढला जातो. भेद-पोटभेद माजले जातात, लोकांचा मानसिक विकास खुंटला जातो. राष्ट्र हुकूमशहांच्या, विदेशी साम्राज्यशाहीच्या कब्जात गेलाय. असा इतिहास आहे. भारताच्या स्वातंत्र्याचा लढा कुण्या धर्मवाद्यांनी अथवा धर्मवादी संघटनांनी लढलेला नाही. तो धर्माला राजकारणापासून, सत्तेपासून दूर ठेवणाऱ्यांनीच लढलेला आहे. हे लक्षांत घेतलं पाहिजे. तेव्हा धर्मातीत विचारानं राजकारण आणि राज्यकारण देशात निर्माण होईल तेव्हाच भारताची असलेली 'सेक्युलर' ओळख उजाळेल, अशी वस्तुस्थिती नाही. कारण सत्ताधारी आणि सत्ताकांक्षी दोघेही सेक्युलरवादाचा मुखवटा धारण करूनच वावरताहेत. कारण राज्यघटनेनं त्यांना तसं भाग पाडलंय. धर्म आणि धर्मवाद कुठलाही असो; त्याचं दुसरं टोक धर्मबांधवांचं शोषण आणि दहशतवाद हेच असतं. लोकशाहीचा व्यवहार आणि कायदा हा लोकांना सामाजिक सुरक्षा देणारा, विकासाची हमी देणारा, समाजातील भेदभाव नष्ट करणारा, आधुनिक जीवनदृष्टी देणारा असतो. त्याला छेद देण्याचं काम लोकशाही विरोधक करीत असतात. पूर्वी त्यासाठी सामाजिक उच्च नीचता जोपासणाऱ्या नि भांडवलदारांच्या पैशाचा आणि वतनदार, जमीनदारांचा वापर केला गेला. सध्या त्यासाठी धर्म, धर्मवाद आणि धर्मातराचा खेळ खेळला जातोय. यावर भारतीय संविधानातल्या तरतुदी कठोरपणे वापरण्याचा आग्रह हाच एक जालीम उपाय आहे, तरच भारताची 'सेक्युलर स्टेट' आणि त्याच बरोबर 'प्रजासत्ताक राष्ट्र' अशी जी ओळख आहे ती अधिक परिणामकारकरित्या दिसून येईल! स्वातंत्र्यप्राप्तीनंतर काही काळ धर्माच्या साथीनंच निधर्मीवाद देशात सत्ताधाऱ्यांनी चालवला, पण त्याचा अतिरेक झाल्यानं धर्मवाद्यांनी उचल खाल्ली. पाऊणशे वर्षांपूर्वी स्वातंत्र्य आल्यानं इथल्या पिचलेल्या लोकांमध्ये चैतन्य खुलेल असं वाटत होतं. जे जे व्हायला हवं असं वाटत होतं, त्या सगळ्याचा विध्वंस झालाय, साऱ्या इच्छा, आकांक्षा, स्वप्नांचा, कल्पनांचा दारुण पराभव झालाय. स्वातंत्र्यात माणसं अंधश्रद्ध, अज्ञान यांच्यापासून मुक्त झालेले असतील, आपले हक्क, आपली बुद्धी याचा या माणसाला विचारपूर्वक जाणीव झालेली असेल. कर्मसिद्धांत न मानणारा, विभूतीपूजेत न गुंतलेला, ईश्वरी संकेतांची पळवाट दाखवून प्रत्येक मैदानातून ऐनवेळी पसार न होणारा, स्वकर्तृत्वावर, स्वबुद्धीवर विश्वास असलेला जागृत झुंजार मानवतावादी माणूस स्वातंत्र्यात असेल, असा आमचा समज त्यावेळी होता. लोकशाही कशी असावी याचा आदर्श आम्ही जगापुढं ठेवू, असं आम्ही म्हणत असू, मानत असू. स्वातंत्र्य आले आता गांधीबाबांना हवं असलेलं 'रामराज्य' येणार असं वाटत असतानाच गांधीजींना 'राम' म्हणावं लागलं आणि गांधीजी गेल्यानंतर या देशात गरिबांची वास्तपुस्त करणारा, त्यांच्यासाठी प्राण लावून उभा राहणारा, त्यांचे अश्रू पुसणारा कुणी राहिलाच नाही. आज सर्वत्र दिसताहेत ते आत्ममग्न सत्तापिपासू! त्यांच्या या सत्ता लालसेनं सगळंच पणाला लागलेलंय. आज देशातील तरुणांसमोर स्वातंत्र्यलढ्यात चौफेर लढलेल्या स्वातंत्र्यसैनिकांपेक्षा मोठी जबाबदारी येऊन पडलीय. स्वातंत्र्यपूर्व काळातील तरुणांसमोर स्वातंत्र्यप्राप्ती हेच ध्येय्य होतं अन शत्रू देखील एकच होता... फिरंगी... इंग्रज! आज उलट भयानक अवस्था निर्माण झालीय. जगाच्या मयसभेत भारतमातेचं वस्त्रहरण होताना त्याला धृतराष्ट्रासारखं डोळ्यावर पट्टी बांधून आंधळं व्हावं लागतंय. एकाबाजूला पाकिस्तान, चीन, बांगलादेश, श्रीलंका या शेजारी राष्ट्रांनी आपल्यासमोर सवतासुभा उभा केलाय. बाह्यसीमेवरील या शत्रूंचा मुकाबला तरुणांना करतानाच, तर दुसरीकडं एतद्देशीय शत्रूंशीही सामना करावा लागतोय. देशात दहशतवादाला पूरक वातावरण करणाऱ्यांच्या विरोधात, अतिरेकी कारवाया करणाऱ्यांच्या विरोधात लढावं लागतंय. सत्तांध सत्ताधाऱ्यांच्या नेभळट धोरणाशी मुकाबला करावा लागतोय. स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसैनिकांनी जो लढा दिला त्याहून अधिक तीव्रतेचा लढा देण्याची जबाबदारी आजच्या तरुणांवर येऊन ठेपलीय! पण मनांत इच्छाशक्ती आहे की, 'बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो' अन त्यासाठीच आज आपल्याला वाटचाल करायचीय, मार्गक्रमण करायचंय. पण धर्मवाद्यांनी, जातवाद्यांनी अभिनिवेश दाखवत, नसलेल्या बेंडकुळ्या दाखवत त्यांच्या मार्गात अडथळे निर्माण केलेत. त्याला रोखण्याची, ती पार करण्याची गरज निर्माण झालीय. स्वातंत्र्याची, रामराज्याची स्वप्नं ज्यांनी पाऊणशे वर्षांपूर्वी पाहिली होती त्यांच्या मनांत प्रश्न उभा राहतोय, याचसाठी हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली होती का?

लोकशाहीचा सर्वात मोठा देश अशी जगात भारताची ओळख आहे. ती ओळख आपण गर्वानं सांगतो. सेन्सेक्सची भरारी देशाचं उंची अर्थकारण दाखवतं. तंत्रज्ञानातील प्रगती विकासाच्या बाता मारते पण शिक्षित नागरिक प्रजासत्ताक भारत सुरक्षित ठेवणं ही आमची जबाबदारी आहे. हे कृतीतून दाखवतात का? ही कृती म्हणजे एखादी मॅरेथॉन स्पर्धा नाही. शहीदांच्या स्मृती उजळणाऱ्या मेणबत्त्या लावून दहशतवाद्याला केलेला विरोध नाही. भारतात वेतनवाढीसाठी, नोकरीसाठी, नोकऱ्या सुरक्षित राहण्यासाठी आंदोलन होतात. कर्जमाफी, वीजबिल माफीसाठी आंदोलन होतात. अशी सोय हिताची, फायद्याची अनेक आंदोलनं होतात. ती झालीही पाहिजे. पण प्रामाणिकपणे एखादा प्रशासकीय अधिकारी काम करतो म्हणून त्याची जाणीवपूर्वक बदली केली जाते, तेव्हा त्याचे सहकारी आंदोलन करतात का? किंबहुना नियमानुसार काम करणाऱ्या अधिकाऱ्याच्या हाताखालून आपली सुटका झाल्याबद्धल त्यांचे सहकारी खासगीत आनंद व्यक्त करतात. असा उरफाटा अनुभव सर्व क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांना येतो. 'मीडिया'ही याला अपवाद नाही. मीडियातही दलाल आहेत. काही पत्रकार स्वतः दलाल आहेत. काही राजकारण्यांच्या, नोकरशहांच्या आणि पब्लिसिटी कंपन्यांच्या पे रोलवर आहेत. जाहिरातीच्या भावात बातम्या छापणारेही 'मीडियासम्राट' आहेत. ही सगळी हरामखोरी लोकांना कळते. तरीही लोक त्याच्या विरोधात मौन पाळतात, तटस्थता दाखवतात, प्रतिक्रियाशून्य होतात. अशांना 'माहितीचा अधिकार'च काय, आणखी लाखो अधिकार मिळाले तरी ते त्याचा वापर स्वहितासाठी तेच करणार; देशहितासाठी नाही! हीच संवेदनशून्यता देश आणि समाज स्वास्थासाठी विपरीत आहे. ही दु:स्थिती कवी मुक्तिबोध यांच्या 'देश' या कवितेतील या ओळीसारखी आहे, ते म्हणतात...."हम जी रहे है। लेकिन सच मर रहा है l देश मर रहा है ll" भारताला स्वातंत्र्य हे सत्य आणि अहिंसा ही तत्व जागवणाऱ्या महात्मा गांधीच्या नेतृत्वाखाली प्रदीर्घ लढ्यातून मिळालं आहे. ते स्वातंत्र्य टिकवायचं असेल तर जाती, धर्म, प्रांत, भाषा यांच्यापलीकडं जाऊन केवळ देशाचा आणि फक्त देशाचाच विचार केला पाहिजे. यासाठी असत्याला मारण्यासाठी सज्ज झालं पाहिजे. त्यानं सत्य जगेल, स्वार्थ टाळला तरच देश सुरक्षित राहील आणि असं घडवण्यासाठी कवी सुरेश भट आपल्या 'विजय' या कवितेत म्हणतात,
हे असे आहे तरी पण, हे असे घडणार नाही
दिवस आमचा येत आहे, तो घरी बसणार नाही ll१ll
हे खरे आहे की, आज त्यांनी घेतले सारेच ठेके
पण उद्या त्यांच्या चितेवर, एकही रडणार नाही ll२ll
छान झाले दांभिकांची, पंढरी उद्ध्वस्त झाली
यापुढे वाचाळ दिंडी, एकही निघणार नाही ll३ll
बांधतो हे रोज भिंती, सांगती ते धर्म जाती
पण उद्याचा सूर्य काही, त्यामुळे असणार नाही ll४ll
आज आमचे पराभव, पचवितो आम्ही उद्यास्तव
विजय तो कसा उरावर, जखम जो करणार नाही ll५ll
भारतीय स्वातंत्र्यदिनाला अशा विजयाची आज नितांत आवश्यकता आहे. यासाठी आपल्यापेक्षा देशाचं जगणं आणि सुरक्षितता ही अधिक महत्त्वाची आहे. हे स्वतंत्र भारताचा सच्चा नागरिक म्हणून आपल्या विचार-व्यवहारातून दाखवलं पाहिजे. त्यासाठी कुण्या नेत्याच्या आदर्शाची गरज नाही!

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशबांधवांना 'भारतीय' म्हणून ओळख पटवून देण्यात आपण अयशस्वी झालोत. स्वातंत्र्यदिनी प्रधानमंत्री लालकिल्ल्यावरून भाषण देताना 'भारत एक धर्मनिरपेक्ष-सेक्युलर स्टेट आहे!' अशी नेहमीप्रमाणे आळवणी करतील. निधर्मीपणाची उजळणी करतील; पण प्रत्यक्षात काय आहे? भारताच्या निधर्मीपणाची ओळख सर्वधर्मसमभाव, समावेशकता अशी आहे. भारताचा निधर्मीपणा हा धर्म, त्यातल्या धर्मवादाला संपविण्यासाठी नाही तर धर्मांधता आणि त्या आडोशानं पोसल्या जाणाऱ्या वर्णवर्चस्ववादाला, जातीवादाला संपविण्यासाठीचा आहे. अशा सेक्युलर भारतात सध्या धर्मवाद्यांचा, जातिवाद्यांचा खेळ जोरात सुरू आहे. देशाच्या पूर्वेकडील राज्यांत, त्याचबरोबर ओरिसा, केरळ, छत्तीसगढ, झारखंड, बिहार, पूर्वांचल या भागात धर्मातराचा खेळ सुरूच असतो. धर्म ही जशी व्यक्तिगत बाब आहे, तशीच ती विचारानं करण्याची बाब आहे. पण यात लवचिकता पहा किती आहे, "प्रभू येशू, या पामराचा तुझ्यावर विश्वास आहे, तू ह्यांच्या मागील सर्व पापांना माफ कर, त्यांच्या प्रार्थनेचा स्वीकार कर" या प्रार्थनेसरशी ख्रिस्ती झालेली व्यक्ती तशाच एका झटक्यात "हिंदव:सोदराह सर्वेन हिंदू पतितो भवेत" या मंत्रोच्चारणानं पुन्हा हिंदू होते. अल्लावर भरवसा दाखवला की मुस्लिम होते. "बुद्धम शरणम गच्छामी... संघम शरणम गच्छामी" म्हणताच बौद्ध होते हा धर्मातराचा, पूर्वधर्मातराचा खेळ सुरू आहे. ख्रिस्त्यांच्या खुल्या, बौद्धांच्या छुप्या, इस्लामीच्या उन्मादी आणि हिंदूंच्या गर्वपर्वाच्या धर्मवादी चाळयांकडं पाहिलं की, ग्लोबल मार्केटिंगच्या आजच्या जमान्यात 'धर्म' देखील एक प्रॉडक्ट मानून त्याचा प्रचार, प्रसार केला जातोय. भारतात धर्मव्यापाराचा खुला खेळ होणं आणि राजकारणासाठी धर्मवादाचं समर्थन आणि विरोध असा दुधारी हत्यारासारखा वापर होणं हे भारताच्या सेक्युलर या ओळखीवर 'वार' करण्यासारखं आहे. अशा वार करणाऱ्यांना साथ देणारे जितके राष्ट्रघातकी, राष्ट्रद्रोही आहेत; तितकेच त्यांच्याकडं सत्तासोयीसाठी दुर्लक्ष करणारे आणि त्यांना सहन करणारेही राष्ट्रघातकी आहेत!
हरीश केंची,
९४२२३१०६०९

1 comment:

बदसूरत ’पॅटर्न'

‘ ‘अब की बार चारसौ पार’ ची घोषणा देऊन तिसऱ्यांदा सत्ताप्राप्तीसाठी लोकसभा निवडणुकीत शड्डू ठोकून उतरलेल्या भाजपची जोडी मोदी-शहा य...