Tuesday 24 August 2021

तालिबानच्या कथा नि व्यथा...!

"अफगाणिस्तानात सत्तेवर असलेल्या तालिबान संघटनेला २००१ मध्ये अमेरिकेनं बाहेरचा रस्ता दाखवला होता. पण हळूहळू या संघटनेनं स्वतःची पाळंमुळं पुन्हा देशात रोवली. तालिबानचे सैनिक अफगाणिस्तानची राजधानी काबुलच्या सीमेपर्यंत पोहोचलेत. अफगाणिस्तानातील सर्व मोठ्या शहरांवर तालिबाननं कब्जा केलाय. तालिबानला अफगाणिस्तानात इतक्या वेगानं विजय कसा मिळत गेला? तालिबानचा अफगाणिस्तानातील २० वर्षांपूर्वीचा सत्तेचा काळ कसा होता? अफगाणिस्तानात अमेरिका-ब्रिटनच्या सैन्यानं वीसवर्षं राहून काय साध्यं केलं? अफगाणिस्तानच्या प्रभारी मंत्र्यांच्या माहितीनुसार, तात्पुरत्या सरकारकडं सत्तांतराची तयारी सुरू आहे. त्यांनी स्थानिक न्यूज चॅनेलला ही माहिती दिली. तालिबान संघटना नेमकी आहे काय? तिचा उदय कधी झाला? हे जाणून घेऊया...!"
---------------------------------------------------

*भा* रताच्या वायव्येकडं हिंदूकुश पर्वताच्या पलीकडं असलेल्या छोट्याशा देशाला खरं तर अस्थिरतेचा, यादवीचा जुना शापच आहे. प्राचीन काळापासून इथं अनेक टोळ्यांचं आक्रमण झालं. तिथं सतत लढाया होत राहिल्या. इ.स च्या १५०० वर्षांपूर्वी आर्य यांनी अफगणिस्तानावर आक्रमण केलं. अनेकांची रहिवाशांची कत्तल करून किंवा त्यांच्याशी विवाह करून तिथं आपली सत्ता जमविली. इ.स.च्या ५०० वर्षांपूर्वी पर्शियन लोकांनी अफगाणिस्तानातील बाक्ट्रिया प्रदेश ताब्यात घेऊन इ.स.च्या ३३० वर्षापर्यंत राज्य केलं. नंतर ग्रीक आणि मेसोडियनांनी अलेक्झांडरच्या नेतृत्वाखाली या प्रदेशावर आक्रमण करून दीडशे वर्ष सत्ता सांभाळली. त्यानंतर आलेल्या कुशाणानी त्यांचा पराभव करून सत्ता हिसकावून घेतली. परंतु इ.स. ४०० च्या सुमारास पर्शियन आणि हुणांनी त्यांना पराभूत केलं. इ.स. ६०० मध्ये अरब आक्रमक अफगाणिस्तानात आले. इ.स. ८०० पर्यंत अरबांनी या प्रदेशात इस्लामचा प्रचार केल्यानं इस्लाम हा अफगणिस्तानचा मुख्य धर्म बनला. तुर्की लोकांनी इ.स. ९०० ते १२०० पर्यंत तिथं राज्य केलं. चेंगीजखानच्या नेतृत्वाखालील मंगोलियन लोकांनी त्यांना धूळ चारून इ.स. १२०० मध्ये सत्ता हस्तगत केली. इ.स. १५०० ते १७०० या काळात मोगलांनी अफगणिस्तानवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. इ.स. १७४७ च्या सुमारास पहिल्यांदाच सर्व अफगाणी आदिवासी जाती एकत्र आल्या आणि त्यांनी अहमदशहा दुराणीच्या नेतृत्वाखाली सत्तेची सूत्र हाती घेतली. इ.स १८०० च्या सुमारास रशियनांनी अफगाणिस्तानात घुसखोरी केली तर त्यांना शह देण्यासाठी ब्रिटिश फौजांनी १८३९ मध्ये अफगणिस्तानावर हल्ला केला. ब्रिटिशांनी अफगाण राजाविरुद्ध तीन लढाया केल्या. या तिन्ही लढायांत ब्रिटिशांचा पराभव झाला. त्यामुळं अफगाणिस्तानात ब्रिटिश राजवट कधीच स्थापन झाली नाही. १९३१ मध्ये अफगाणिस्तानात घटनात्मक राजसत्ता स्थापन झाली. मोहम्मद नादीर शहा हा पहिला राजा बनला ही राजसत्ता १९७३ पर्यंत यथास्थित होती. १९७३ मध्ये बादशहा झाहिर शहा याच्या पुतण्यानं मोहम्मद दाऊदनं सत्ता उलथवून टाकली. सरतेशेवटी १९७९ मध्ये रशियानं अफगाणिस्तानात फौजा घुसवून कर्माल बारबाक याला सत्तेवर आणलं. तेव्हापासून अमेरिकेलाही अफगाणिस्तानच्या राजकारणात रस वाटू लागला. अफगाण घुसखोरींविरुद्ध चीन, अमेरिका, पाकिस्तान सगळे लढले शेवटी १९९२ मध्ये रशियानं अफगाणिस्तानातून माघार घेतली. सततच्या आक्रमणामुळं अफगाणिस्तानात अनेक लहान मोठ्या टोळ्या लहानलहान प्रांतावर कब्जा करू लागल्या. त्यामुळं अफगाणिस्तान असं एकसंघ राष्ट्रच नव्हतं. ज्याच्याकडं काबूल त्याच्याकडं अफगाणिस्तानची सूत्रं असं समजलं जायचं. या टोळ्यांना रशिया, अमेरिकेनं शस्त्रास्त्र दिली. दरम्यानच्या काळात बनीहुद्दीन रब्बानी यांनी काबूलचं सरकार काही सेनाधिकाऱ्यांकडं सोपवलं. तेही स्थिर नव्हतंच कारण पाकिस्ताननं हिकमतीयार या सेनापतीला पाठींबा दिला होता. काबूलवर आपलाच हक्क असल्याचा त्यांचा दावा होता. रब्बानी आणि हिकमतीयार यांच्यात आधी लढाई झाली. मग समझौता झाला. रब्बानी राष्ट्रपती तर हिकमतीयार पंतप्रधान झाले. राजकीय अस्थिरतेचा शाप मात्र सरला नाहीच. आज अमेरिकेला डोईजड झालेल्या तालिबानचा जन्मही अमेरिकेच्याच कृपेनं झालाय. अफगाणिस्तानामधील रशियन फौजांविरुद्ध लढण्यासाठी अमेरिकेनं अफगाण टोळ्यांना आधुनिक शस्त्रास्त्र दिली. रशियन सैन्य मागे घेतल्यावरही ही शस्त्रास्त्र त्यांच्याच हाती राहिली. साहजिकच या शस्त्रास्त्रांच्या जोरावर टोळ्यांमध्ये रक्तरंजित संघर्ष सुरू झाला. या यादवीनं उध्वस्त झालेल्या अफगाणिस्तानला शिस्त लावण्यासाठी तालिबान चळवळ सुरू झाली. 'तालिबान' या शब्दाचा अर्थ 'विद्यार्थी' असा असला तरी त्यात अनेक प्रौढ माणसं आहेत. अमेरिकेच्याच म्हणण्यानुसार तालिबान म्हणजे अफगाणिस्तान-पाकिस्तानात शिकलेले आणि देशाला यादवीतून बाहेर काढणारे बंडखोर तरुण! त्यांना लष्करी शिक्षण, शस्त्र, पैसा, कोण पुरवतं यावर मात्र अमेरिकेनं काहीच भाष्य केलं नाही. तालिबानला अमेरिकेबरोबर पाकिस्तानची पुरेपूर मदत मिळाली. तालिबान चळवळीची सुरुवातही पाकिस्तानकडील दक्षिण अफगाणिस्तानच्या बाजूनं झाली. आधी कंदहार मग हेरत शहरं जिंकत त्यांनी काबूलवर हल्ला चढवला. त्यावेळी अध्यक्ष रब्बानी आणि प्रधानमंत्री हिकमतीयार पळाले. फारशी लढाई न करता काबूल तालिबानच्या हाती आलं.

तालिबान ही संपूर्ण लष्करी प्रशिक्षण लाभलेली संघटना आहे. कंदहारचा मोहम्मद ओमर हा तिचा प्रमुख आहे. अफगाणिस्तानमधील रशियन फौजविरुद्ध तो मुजाहिद्दीन स्वातंत्र्यसैनिक म्हणून लढला या लढाईत त्याला एक डोळा गमवावा लागला. पाकिस्तान आणि अमेरिकेनं त्याला भरपूर पाठींबा दिल्यानं तो तालिबानचा नेता बनला. तालिबान ही अतिशय पुनरुज्जीवनवादी संघटना आहे. त्यामुळं ती सत्तेवर येताच अफगाणिस्तानच्या दुर्दशेला सुरुवात झालीय. तालिबानचा उदय होण्यापूर्वी सगळं काही आलबेल होतं असं नव्हे. मुळात दक्षिण-पूर्व आशिया खंडातील हा देश पूर्वीपासून अत्यंत अविकसित आहे. आधुनिक सुधारणांचा गेली कित्येक वर्षे त्याला स्पर्श झालेला नाही. तिथं खनिज संपत्ती, वनसंपदा फारशी नाही. कारखानदारी नाही. अत्याधुनिक तंत्रज्ञान तर अफगाणिस्तानातील नागरिकांना कधी पाहायलाच मिळालं नाही. अनेक बाबतीत तिथं अजून जुनं, अविकसित तंत्रज्ञानच वापरलं जातं. खरं तर अफगाणिस्तानचं भौगोलिक स्थान खूप मोक्याचं आहे. पश्चिमेला चीन, पाकिस्तान, दक्षिणेला कझाकिस्तान, उझबेकिस्तान, तुर्कमनिस्तान आणि पश्चिमेला इराणशी त्याच्या सीमा जोडलेल्या आहेत. त्या महत्वाच्या स्थानामुळं जुन्या काळी भारत आणि मध्य-पूर्व आशिया यांच्यातील तो 'सिल्क रूट' म्हणजे सोनेरी मार्ग समजला जायचा भारत आणि मध्य-पूर्व देशातील सगळा व्यापार इथूनच व्हायचा. त्यामुळं या प्रदेशातील कब्जातील इतिहासात अनेक लढाया झाल्या. अफगाणिस्तानचा बहुतेक सगळा प्रदेश डोंगराळ असल्यानं तिथे शेती कमीच होते. तरीही नव्वद टक्के अफगाणिस्तानी जनता शेतीवर जगते. गहू, कापूस, फळभाज्या, ऊस, सुकामेवा, हे इथलं प्रमुख उत्पादन. मात्र शेतीसाठी केवळ परंपरागत पद्धतच वापरली जात असल्यानं फारसं उत्पादन घेता येत नाही. उत्पादन वाढविणाऱ्या विविध खतांचा वापर अफगणिस्तानात अजूनही होत नाही. अफगाणिस्तान अफूच्या शेतीसाठीही बदनाम आहे. अफूच्या मादक द्रव्याची अफगाणिस्तानामधून पाकिस्तान-भारतात मोठ्या प्रमाणात निर्यात होते. हाच पैसा अफगाण बंडखोरांनी रशियनविरुद्ध लढण्यासाठी वापरला असं म्हणतात. पशुपालन हा अफगाणी लोकांचा आणखी एक व्यवसाय. इथं भटक्या जातींची संख्या भरपूर आहे. ते हा व्यवसाय करतात तसंच दुग्धजन्य पदार्थांचं उत्पादनही करतात. अफगणिस्तानची लोकसंख्या जवळजवळ तीन कोटींच्या घरात आहे. अफगणिस्तानचे मूळ रहिवासी असलेले जवळपास वीस वांशिक समूह आहेत. यातील बहुतेक आदिवासी जाती जमातीचे आहेत. ते सगळे एकमेकांशी बरंच साम्य असलेल्या भिन्न भाषा बोलतात. 'पश्तून' हा यातील सगळ्यात मोठा वांशिक गट. इ.स.च्या पहिल्या शतकापासून तो अफगणिस्तान आहे, असं म्हटलं जातं. पन्नास टक्के अफगाणी या वांशिक गटाचे आहेत. 'ताजीक' हा दुसऱ्या क्रमांकाचा मोठा गट असून ते मूळचे इराणचे समजले जातात. तसंच इराणी भाषेशी साम्य असलेली भाषा बोलतात. काबूलच्या आसपास आणि इराणच्या सरहद्दीनजीकच्या भागात त्यांची वस्ती आहे. तिसरा मोठा गट 'हजारा' हा आहे. मूळचा मंगोलियन असलेला हा गट तेराव्या ते पंधराव्या शतकात अफगणिस्तानात आला. हे लोक पर्शियन बोलीभाषा बोलतात. ते शिया मुस्लिम आहेत. हजरत नावाच्या भागात ते राहतात. तुर्क आणि तुर्को-मंगोल यांचा 'तुर्कोमनस' हा मेंढपाळ गट आहे. 'उझबेक' हा मूळ तुर्की असलेला गट आहे; तो शेती व्यवसाय करतो आणि तुर्की भाषा बोलतो. 'किरगिझ' हा आणखी एक वांशिक गट चीनकडील सरहद्दीनजीक वाखत भागात राहतो. पश्चिम अफगणिस्तानात राहणाऱ्या 'चाहार ऐमार' या प्रत्यक्षात 'फिसझुकही', 'तैमानी', 'जमशिदी', 'तैमुरी' आणि 'पश्चिम हजारा' अशा पाच आदिवासी जमाती आहेत. दक्षिण भागात 'बलुची' ही भाकी जात आढळते. ते बलुची ही इराणीयन भाषा बोलतात. सर्वसाधारण अफगाणिस्तानी रहिवाशांना अफगाणी वा पठाणी म्हटलं जातं. दारी किंवा पुश्तू या अफगणिस्तानच्या राष्ट्रीय भाषा आहेत. सर्व सरकारी व्यवहार याच भाषेतून होतात. इस्लाम हा इथला प्रमुख धर्म आहे. यातील ८० टक्के अफगाणी शिया मुसलमान तर वीस टक्के सुन्नी आहेत.

पश्तो भाषेत विद्यार्थ्यांना 'तालिबान' असं संबोधलं जातं. ९० च्या दशकात सोव्हिएत संघ आपले सैनिक अफगाणिस्तानातून परत बोलवत होतं, त्याच दरम्यान देशात तालिबान संघटना उदयाला आली. 'पश्तो आंदोलन' सुरुवातीला धार्मिक मदरशांमधून सुरू झालं. या माध्यमातून कट्टर सुन्नी इस्लामचा प्रसार-प्रचार केला जायचा. त्यासाठी सौदी अरेबियानं आर्थिक पुरवठा केला. याच दरम्यान दक्षिण-पश्चिम अफगाणिस्तानात तालिबानचा प्रभाव वेगानं वाढला. सप्टेंबर १९९५ मध्ये त्यांनी इराणशी लागून असलेल्या हेरात प्रांतावर ताबा मिळवला. त्यानंतर एका वर्षानं तालिबाननं अफगाणीस्तानची राजधानी काबुल शहरावरही नियंत्रण मिळवलं. त्यावेळी अफगाणिस्तानाची सत्ता बुरहानुद्दीन रब्बानी यांच्या हाती होती. ते त्यावेळी सोव्हिएत सैनिकांचा विरोध करणाऱ्या अफगाण मुजाहिदीन संघटनेच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते. तालिबाननं सर्वप्रथम रब्बानी यांना सत्तेवरून हटवलं १९९८ येता-येता सुमारे ९० टक्के अफगाणिस्तानवर तालिबाननं ताबा मिळवला. सोव्हिएत संघाचे सैनिक परतल्यानंतर अफगाणिस्तानातील सर्वसामान्य नागरीक मुजाहिदीन सत्ताधाऱ्यांचे अत्याचार आणि अंतर्गत कलहाला कंटाळले होते. त्यामुळं सर्वसामान्यांनी सुरुवातीला तालिबानचं स्वागत केलं. भ्रष्टाचारावर अंकुश, अराजकतेच्या परिस्थितीत सुधारणा, रस्तेबांधणी तसंच विशिष्ट पद्धतीची प्रशासन यंत्रणा उभारणं, लोकांना सुविधा पुरवणं यांसारख्या कामांमुळं सुरुवातीच्या काळात तालिबान संघटना लोकप्रिय झाली. याच दरम्यान तालिबाननं शिक्षा देण्यासाठी इस्लामिक पद्धतीचे कायदे देशात लागू केले. यात हत्या आणि अत्याचाराचे आरोप असलेल्या दोषींना सार्वजनिकरित्या फासावर लटकवणं, चोरीच्या प्रकरणातील दोषींचे अवयव कापणं, अशा प्रकारच्या शिक्षांचा समावेश होता. पुरुषांनी दाढी वाढवणं आणि महिलांनी संपूर्ण शरीर झाकणाऱ्या बुरख्याचा वापर करणं अनिवार्य करण्यात आलं. तालिबाननं टिव्ही, संगीत आणि सिनेमा यांच्यावर बंदी घातली. १० वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या मुलींनी शाळेत जाण्यावर बंदी घालण्यात आली. त्यानंतर तालिबानवर मानवाधिकाराचं उल्लंघन आणि सांस्कृतिक गैरवर्तणुकीशी संबंधित अनेक आरोप होऊ लागले. याचंच एक उदाहरण म्हणजे २००१ मध्ये पाहायला मिळालं. त्यावेळी तालिबाननं आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठा विरोध होऊनसुद्धा अफगाणिस्तानातील बामियान येथील भगवान बुद्ध यांची प्रतिमा नष्ट केली. तालिबानची स्थापना आणि त्याला बळकटी देण्याचं आरोप पाकिस्ताननं नेहमीच फेटाळून लावले आहेत. पण सुरुवातीच्या काळात तालिबानी आंदोलनाशी संबंधित लोक पाकिस्तानातील मदरशांमधूनच निघाले होते, यात काहीही शंका नाही. अफगाणीस्तानवर तालिबानचं नियंत्रण होतं, त्यावेळी त्यांना मान्यता देणाऱ्या तीन देशांमध्ये पाकिस्तानचा समावेश होता. पाकिस्तानशिवाय सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरात यांनीही तालिबानला मान्यता दिली होती. तालिबानसोबतचे आपले राजकीय संबंध तोडणाऱ्या देशांमध्ये पाकिस्तान सर्वात शेवटचा देश होता. एक वेळ अशी आली की तालिबाननं आपल्या नियंत्रणाखाली असलेल्या वायव्य भागातील क्षेत्रातून पाकिस्तान अस्थिर करण्याची धमकीही दिली होती. याच दरम्यान तालिबानी कट्टरवाद्यांनी ऑक्टोबर २०१२ मध्ये मिंगोरानगरमध्ये आपल्या शाळेतून परतत असलेल्या मलाला युसूफजई हिच्यावर गोळीबार केला. तालिबानी प्रशासनाच्या अत्याचाराविरुद्ध आक्रमक लिखाण करणाऱ्या मलालावर तालिबानी नेते नाराज होते, असं म्हटलं जातं. या गोळीबारात मलाला गंभीर जखमी झाली. पुढे केवळ पाकिस्तानच नव्हे तर जगभरातून या घटनेचा तीव्र निषेध झाला. या घटनेच्या दोन महिन्यांनंतर तालिबानी कट्टरवाद्यांनी पेशावरच्या एका शाळेवरही हल्ला केला. त्यानंतर पाकिस्तानमधील तालिबानचा प्रभाव कमी होत गेला. २०१३ मध्ये अमेरिकेनं पाकिस्तानातील तालिबानच्या अड्ड्यावर ड्रोन हल्ला केला होता. या हल्ल्यात पाकिस्तानात तालिबानचं नेतृत्व करत असलेल्या हकीमुल्ला मेहसूदसह तीन प्रमुख नेते ठार झाले.

११ सप्टेंबर २००१ रोजी न्यूयॉर्क वर्ल्ड ट्रेड सेंटरवर कट्टरवाद्यांकडून हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर संपूर्ण जगाचं लक्ष तालिबानकडं वेधलं गेलं. हल्ल्याचा मुख्य आरोपी ओसामा बिन लादेन आणि अल कायदाच्या हल्लेखोरांना शरण दिल्याचा आरोप तालिबानवर लावला गेला. ७ ऑक्टोबर २००१ रोजी अमेरिकेच्या नेतृत्वाखालील संयुक्त सैन्यानं अफगाणिस्तानवर हल्ला केला. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात तेथील तालिबानचं शासन संपुष्टात आलं. पण जगातील सर्वात मोठ्या शोधमोहिमेदरम्यान ओसामा बिन लादेन आणि तालिबान प्रमुख राहिलेला मुल्ला मोहम्मद उमर तसंच इतर सहकारी अफगाणीस्तानातून पळून जाण्यात यशस्वी ठरले. तालिबान संघटनेतील अनेक नेत्यांनी पाकिस्तानच्या क्वेट्टा शहरात आश्रय घेतला. तिथूनच ते आपला कारभार चालवू लागले. मात्र, पाकिस्तान सरकारनं क्वेटामधील तालिबानचं अस्तित्व कधीच मान्य केलं नाही. अफगाणिस्तानात मोठ्या संख्येनं परदेशी सैन्य असूनसुद्धा तालिबाननं हळू-हळू स्वतःला मजबूत बनवलं. संपूर्ण देशभरात त्यांनी आपला प्रभाव वाढवला.
त्यानंतर देशात असुरक्षितता, हिंसाचार आणि भयाचं वातावरण निर्माण होऊ लागलं होतं. सप्टेंबर २०१२ मध्ये तालिबानी हल्लेखोरांनी काबुलमध्ये अनेक ठिकाणी हल्ले केले. नाटोच्या तळावरही त्यांनी हल्ला केला. २०१३ मध्ये तालिबाननं कतारमध्ये आपलं कार्यालय उघडण्याची घोषणा केली तेव्हा शांततेची उमेद पुन्हा जागी झाली होती. पण त्याचवेळी तालिबान आणि अमेरिकन सैन्याला एकमेकांवर काहीच विश्वास नव्हता, हे नाकारून चालणार नाही. याच कारणामुळं हिंसाचारही थांबला नाही. तालिबाननं मुल्ला उमरचा मृत्यू झाल्याची माहिती दोन वर्षांपेक्षा जास्त काळ लपवून ठेवली होती. अखेर ऑगस्ट २०१५ मध्ये त्यांनी असं केल्याचं स्वीकारलं. मुल्ला उमरचा मृत्यू कथितरित्या प्रकृती अस्वास्थ्यामुळं पाकिस्तानमधील एका रुग्णालयात झाला होता. याच महिन्यात तालिबाननं मुल्ला मन्सूर याला आपला नवा नेता म्हणून निवडलं. यादरम्यान, तालिबाननं २००१ च्या पराभवानंतर पहिल्यांदाच एखाद्या प्रांताच्या राजधानीवर नियंत्रण मिळवलं. सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या कुंडूज शहरावर तालिबाननं पुन्हा ताबा मिळवला. पुढं मे २०१६ मध्ये अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात मुल्ला मन्सूर ठार झाला. त्यानंतर संघटनेची कमान त्याचाच सहकारी राहिलेल्या मौलवी हिब्तुल्लाह अखुंजादा याच्याकडे सोपवण्यात आली. सध्या त्याच्याकडंच तालिबानचं प्रमुखपद आहे. फेब्रुवारी २०२० मध्ये अमेरिका आणि तालिबान यांच्यात शांतता करार झाला. अनेक टप्प्यात चर्चा होऊन अखेरीस हा करार झाला होता. सुरुवातीच्या काळात शहरं आणि लष्करी तळांवर हल्ले करणाऱ्या तालिबाननं यानंतर विशिष्ट प्रकारच्या लोकांवर निशाणा साधण्यास सुरुवात केली. या हल्ल्यांमुळं अफगाणिस्तानची जनता पुन्हा एकदा भयभित झाली. या हल्ल्यात तालिबाननं पत्रकार, न्यायाधीश, शांतता कार्यकर्ते आणि मोठ्या पदावरील महिलांना निशाणा बनवलं. म्हणजेच तालिबाननं आपली कार्यपद्धती बदलली, पण कट्टरवादी विचारसरणी सोडली नाही, हे दिसून येतं. अफगाणीस्तानातील सत्ताधाऱ्यांनी याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. आंतरराष्ट्रीय मदतीविना अफगाणिस्तान सरकारसमोर अस्तित्वाचा प्रश्न उभा राहील, असं त्यांचं म्हणणं आहे. पण अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी एप्रिल २०२१ मध्ये सैन्य परत बोलावण्याची घोषणा केली. त्यानुसार, ११ सप्टेंबरपर्यंत अमेरिकन सैन्य अफगाणिस्तानातून परत बोलवलं. दोन दशक चाललेल्या या युद्धात तालिबाननं अमेरिकन महासत्तेला त्रस्त केलं. त्यानंतर आता एका मोठ्या क्षेत्रावर पुन्हा नियंत्रण मिळवण्याच्या दिशेनं त्यांचा प्रवास सुरू झालाय!
हरीश केंची,
९४२२३१०६०९

No comments:

Post a Comment

बदसूरत ’पॅटर्न'

‘ ‘अब की बार चारसौ पार’ ची घोषणा देऊन तिसऱ्यांदा सत्ताप्राप्तीसाठी लोकसभा निवडणुकीत शड्डू ठोकून उतरलेल्या भाजपची जोडी मोदी-शहा य...