Friday 28 August 2020

गांधी नाम केवलं...!


"काँग्रेसमध्ये दिवसेंदिवस पक्षनिष्ठा दुर्मिळ होत चाललीय. काँग्रेसनं आपले कार्यकर्ते आणि नेते विचारसरणीच्या दृष्टीनं घडवलेलेच नाहीत. आज काँग्रेसची स्थिती  निर्नायकी आहे. त्याला नायकच नाहीये. अशीच स्थिती राहिली तर उद्या काँग्रेसची स्थिती कम्युनिस्ट किंवा शेकापसारखी होईल. काँग्रेसमध्ये पक्षावर नितांत प्रेम करणारे आणि आणि तळमळीनं काम करणारे असंख्य कार्यकर्ते नेते आहेत. याखेरीज करोडो तरुण आपल्याला दिशा दाखवणाऱ्या नेतृत्वाच्या, नायकाच्या प्रतीक्षेत आहेत देशासमोरचे प्रश्न गुंतागुंतीचे आहेत. ते सोडवण्यासाठी व्यक्तिस्तोम न माजवणारा नेता त्याच्याबरोबर निरपेक्षपणे काम करणारे अगणित कार्यकर्ते असलेला पक्ष लोकांना हवा आहे. काँग्रेसच्या मूलभूत विचारांना आधुनिक काळातील विचारांची जोड देऊन आणि केवळ नकारात्मक राजकारण न करता, सतत दिवसरात्र मोदी- शहांना शिव्या देत न बसता, काँग्रेसनं पुढचे पाऊल टाकले पाहिजे. देशातील सर्वात जुना पक्ष सर्वात 'जुनाट' पक्ष बनता कामा नये. जनाधार संपलेल्या आणि शरपंजरी अवस्थेतील काँग्रेसमध्ये संजीवनी आणायची असेल, गतवैभव प्राप्त करायचं असेल तर एखाद्या नव्या दमाच्या, जोमाच्या आणि जनाधार असलेल्या तरुणाकडं नेतृत्व द्यायला हवंय, पण पक्षाच्या सार्वत्रिक ऱ्हासाचं सखोल विश्लेषण करून त्यावर उपाय योजना केली तरच पक्षाचं अस्तित्व राहील. अन्यथा शरपंजरी अवस्थेतच राहायला लागेल!"

-------------------------

काँग्रेसच्या अध्यक्षपदाबाबत असलेली अनिश्चितता आणि पक्षांतर्गत मतभेदांमुळे पक्ष कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला असून काँग्रेस पक्ष कमजोर झाला आहे, त्यामुळे पक्षात अमूलाग्र बदल करण्याची मागणी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी पत्र लिहून केली होती. २०१४ आणि २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. ६ वर्ष उलटून गेली असली तरी काँग्रेस पक्षात कोणत्याही प्रकारचे बदल झालेले नाहीत. त्यामुळं पक्षाला मरगळ आलेली आहे. यासाठी काँग्रेसच्या २३ ज्येष्ठ नेत्यांनी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहून पक्षात आमुलाग्र बदल करण्याची मागणी केली होती. यामध्ये ५ माजी मुख्यमंत्री, काँग्रेस कार्यकारिणीचे सदस्य, विद्यमान खासदार आणि काही माजी केंद्रीय मंत्र्यांचाही समावेश आहे. काही दिवसांपूर्वी पाठवण्यात आलेल्या या पत्रात भाजपची चांगली प्रगती झाल्याचं मान्य करत देशातील तरुण नरेंद्र मोदींकडं आकर्षित झाले आहेत हेसुद्धा मान्य करण्यात आलं होतं. काँग्रेसचा मूळ आधार असलेल्या वर्गानं फिरवलेली पाठ आणि तरुणांचा अविश्वास यामुळं कार्यकर्त्यांमध्ये उत्साह राहिलेला नाही. या पत्रात त्यांनी पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष जो पूर्णपणे सक्रीय असेल आणि लोकांना दिसत राहील अशी मागणी केली. पक्षाचा पुनरुद्धार करण्यासाठी काँग्रेस कार्यकारिणीची निवडणूक, संस्थात्मक नेतृत्व यंत्रणा तातडीनं विकसित करण्याची गरज या पत्रात व्यक्त करण्यात आली आहे. या पत्रावर राज्यसभेतील विरोक्षी पक्षनेते गुलाम नबी आझाद, शशी थरुर, कपिल सिब्बल, मनिष तिवारी, महाराष्ट्रातील पृथ्वीराज चव्हाण, मुकुल वासनिक, मिलिंद देवरा यांच्यासह २३ नेत्यांच्या सह्या आहेत. जेव्हा देशासमोर स्वातंत्र्यानंतरचं सगळ्यात राजकीय, सामाजिक, आर्थिक संकट उभं असताना पक्षाचा ऱ्हास होतोय, अशी खंत या पत्रात या नेत्यांनी व्यक्त केली आहे. या पत्रात पक्षात आमूलाग्र बदलांची मागणी करत सत्तेचं विक्रेंदीकरण, राज्याच्या पातळीवर संघटना मजबूत करणं, स्थानिक पातळीपासून ते काँग्रेस कार्यकारिणीपर्यंत पक्षात सर्व पातळ्यांवर निवडणुका घेऊन यंत्रणा विकसित केली पाहिजे आणि मध्यवर्ती संसदीय मंडळ तयार करण्याची मागणी या पत्रात करण्यात आली आहे.

सध्या काँग्रेसमध्ये पुनर्रुजीवनाची चर्चा आहे. यासाठी पक्षातील २३ वरिष्ठ नेत्यांनी पुढाकार घेतला असून पक्षांतर्गत निवडणुका योग्य रितीने व्हाव्यात, पक्षाला जमीनीवर काम करणाऱ्या पूर्णवेळ नेत्याची गरज आहे, अशा स्वरूपाच्या भावना या २३ नेत्यांनी व्यक्त केल्या आहेत. तसंच पक्षाला संस्थात्मक नेतृत्वाची गरज आहे. असं म्हणत या नेत्यांनी अप्रत्यक्षपणे गांधी घराणेशाहीला आव्हान ही दिलं आहे. ज्यांनी खरंतर स्वतःच मार्गदर्शक मंडळात जायला हवं, अशी वरिष्ठ मंडळी काँग्रेसला अंतर्बाह्य बदलण्यासाठी मोहीम करतायत, ही पण एखादी राजकीय खेळी असू शकते असं जाणकारांचं म्हणणं आहे. वरिष्ठ नेत्यांनी लिहिलेलं पत्र हा सोनिया गांधी यांचा गेम आहे की, पक्षातील नेत्यांनी मिळून गांधी परिवाराचा गेम करायचं ठरवलंय? हे आजच्या काँग्रेस वर्कींग कमिटीच्या बैठकीत काही वेळातच ठरणार आहे. काँग्रेसची रचना पाहता गांधी परिवारावर टीका करून कोणीही पक्षात टिकू शकलेलं नाही. अशा वेळी केंद्रीय नेतृत्वाच्या चुका दाखवणारं २३ नेत्यांचं पत्र हा सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय आहे. राहुल गांधी यांनी अपेक्षेपेक्षा चांगलं नेतृत्व दिलेलं असलं तरी काँग्रेस सारख्या राष्ट्रीय पक्षाला त्यांच्या सारखी धरसोड भूमिका परवडणारी नाही. त्याचमुळे संस्थात्मक, पूर्णवेळ, जमीनीवर काम करणारं नेतृत्व अशी मागणी पुढे आली असावी. राहुल गांधी हे मोदींवर ट्वीटर च्या माध्यमातून हल्ला चढवतात, त्याला ऑनलाइन प्रतिसाद ही चांगला मिळतो. मात्र, खाली पक्षाची बांधणीच नसल्याने ही केवळ आभासी लढाई झालेली आहे, आणि अशा परिस्थितीत काँग्रेसला जमीनीवर काम करणाऱ्या नेतृत्वाची गरज आहे. अशा कानपिचक्या २३ नेत्यांच्या नथीतून तीर मारत सोनिया गांधी यांनी दिलेल्या असाव्यात असं दिसतंय. राहुल गांधी यांच्याकडे पक्षाची धुरा परत जाणार असेल तर त्यांच्यावर यंदा सामुहीक नेतृत्व करण्याबाबत दबाव टाकण्यात येईल. असं ही एकूण चित्र दिसत आहे. राहुल गांधी यांना पुन्हा अध्यक्ष केलं तर त्यांना तुल्यबळ अशी कार्यकारी समिती अथवा कार्यकारिणीही देण्यात येईल, किंवा कोअर टीम बनवण्यात येईल असा कयास आहे. त्यामुळे काँग्रेसमधल्या घडामोडी या काही पक्षासाठी फार आशादायक नाहीयत. सोनिया गांधी अद्यापही निर्णयप्रक्रीयेच्या केंद्रस्थानी आहेत. राजकीय परिपक्वता या एका गुणामुळे राहुल गांधी यांचं सपशेल नेतृत्व स्वीकारण्यात काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना अडचण आहे, या अडचणीवर आजच्या बैठकीत मात करण्याचा प्रयत्न करण्यात येईल असं दिसतंय.

प्रत्येकवेळी इतिहासाची पुनरावृत्ती होतेच असं नाही. त्यासाठी राजकीयदृष्ट्या व्यवहारचातुर्य हवंय जे जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांच्याकडं होतं. त्यांनी पक्षाची आणि सत्तेची सूत्रं हाती येताच आपल्या जुन्या सहकाऱ्यांना दूर सारलं. इंदिराजींनी तर जुन्या खोंडांना जाणीवपूर्वक हटवलं. पण राजीवजी त्याच इंदिराजींच्या सहकाऱ्यांवर विसंबून राहिले, त्यांच्या मृत्यूनंतर त्याच नेत्यांची सोनियाजींना साथ घेतली. या नेत्यांनी अनेकदा सोनियांना अडचणीत आणलं होतं. राहुल गांधींनी पक्षाची सूत्रं हाती घेतल्यानंतर पक्षहिताऐवजी सत्तेसाठी हपापलेल्या राजीवजींच्या काळातील नेत्यांना दूर सारणं गरजेचं होतं आणि आपल्या समवयस्क, तरुण, नव्या दमाच्या ज्योतिरादित्य शिंदे, सचिन पायलट, नवीन जिंदाल, मिलिंद देवरा यासारख्या तरुणांना सोबत घ्यायला हवं होतं. पण ते झालं नाही, कदाचित या तरुण नेत्यांच्या सक्षम नेतृत्वक्षमतेची राहुलना भीती वाटली असावी. त्यामुळं त्यांना देशाच्या राजकारणातून दूर करून राज्याच्या राजकारणापुरतच सीमित केलं. त्याचा परिणाम काँग्रेसच्या अधोगतीत झालाय. हे नाकारता येणार नाही. नेतृत्वाकडून असं घडलं असलं तरी, आजही जनाधार नसलेली, कार्यकर्त्यांशी थेट संपर्क नसलेली किंबहुना कार्यकर्त्यांचं पाठबळ नसलेली मणिशंकर अय्यर, चिदंबरम, सॅम पिट्रोडा यासारख्या वाचाळ नेतेमंडळींनी पक्षाला घेरलंय. तेच पक्षाला रसातळाला घेऊन जाताहेत! अशी भावना कार्यकर्त्यांची झालीय. राहुल गांधी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष असताना बिहारमध्ये नितीशकुमार, लालूप्रसाद यादव यांच्यासोबत जाऊन भाजपला रोखलं होतं. नंतर काँग्रेसचं नेतृत्व स्वीकारलं तेव्हा त्यांनी गुजरातमध्ये भाजपच्या सरकारला पुरतं घायाळ केलं होतं. ती किमया त्यांनी गुजरातमधल्या नव्या नेतृत्वाला पुढे आणून साधली होती. पुढं त्यांच्याच नेतृत्वाखाली काँग्रेसनं पंजाब, गोवा, राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड इथं यश मिळवलं होतं. दरम्यानच्या काळात कर्नाटकात जेडीएससोबतचा प्रयोगही करून पाहिला होता. तो काही काळ यशस्वी झाला होता. त्यांनी नेतृत्व सोडल्यानंतर कर्नाटकमधली काँग्रेस सैरभैर झाली आणि ते राज्य हातातून गेलं. लोकसभा निवडणुकांत त्यांनी नोटबंदी, राफेल अशा मुद्द्यावरून देशभर वादळ निर्माण केलं, पण त्या मोहिमेत पक्षातले बरेचशे ज्येष्ठ नेते अलिप्त होते, त्याचा परिणाम व्हायचा तो झालाच! काँग्रेसमधल्या बड्या नेत्यांची संभ्रमावस्था निश्चितच पक्षाच्या दृष्टीचं चिंतेची बाब आहे आणि हे दिसूनही येतेय. दुसरा एक धोका पक्षात आलेल्या शैथिल्याचाही आहे. संसदेत माहिती अधिकाराचा कायदा, तिहेरी तलाक कायदा आणि ३७० कलम रद्द करण्याचा कायदा असे एकापाठोपाठ एक कायदे संमत होऊनही राज्याराज्यातील काँग्रेसचा एकही नेता रस्त्यावर उतरला नाही कि, त्यांनी या कायदाचा निषेध वा त्याला विरोध करणारा मोर्चा काढलेला नाही. माहिती अधिकारात दुरुस्त्या करून जनतेचं सत्तेला जाब विचारण्याचं हक्क कसं नाकारलं जातंय, त्याची साधी सोप्या भाषेत माहितीही काँग्रेस नेते मतदारांपुढं मांडताना दिसत नाहीत. असा पक्ष वेगानं निष्प्रभ अवस्थेत जात असेल तर त्याला संजीवनी आणण्यासाठी शस्त्रक्रियेची जरूरी आहे. ती शस्त्रक्रिया सोनिया गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली होईल असं वाटत होतं पण तसं घडताना दिसत नाही. राहुल गांधी यांना पक्षात व्यक्तीस्वातंत्र्य, मतस्वातंत्र्य, आधुनिकता, सेक्युलरिझम, समता, न्याय्य अशा वैचारिक मूल्यांशी सतत प्रामाणिक राहणारे नेते हवेत आणि तसं मिशन प्रत्येकानं हाती घ्यायला हवं असं आपल्या अध्यक्षीय भाषणात सोनिया गांधी यांनी अध्यक्षपदाची सूत्र हाती घेताना म्हटलं होतं. प्रत्यक्षात काँग्रेस नेत्यांनी त्यांच्याशी एकप्रकारची गद्दारीच केलीय. हे नेते लोकांपासून दूर राहिलेत. मतदारांशी संवाद ठेवला नाहीये. काँग्रेसच्या विरोधात केलेल्या अपप्रचाराला सडेतोड उत्तर दिलेलं नाहीये. आता त्यापुढं जात काँग्रेसचे काही नेते भाजपच्या बहुसंख्याकवादी राजकारणाकडंही आकृष्ट होऊ लागलेत. 

स्वातंत्र्यानंतर नेहरूंनी जी नवी काँग्रेस जन्मास घातली किंवा इंदिरा गांधींनी परत नव्या दमानं ज्या काँग्रेसची बांधणी केली, त्यात जुन्याचा मोह पूर्णपणे टाळला. लोकांना नेहरू नव्या दमाचे, नव्या विचारांचे व नव्या कार्यशैलीचे नेते वाटायचे ते त्यामुळेच! इंदिरा गांधींनी काँग्रेसमधील प्रस्थापितांना सत्तेतून विस्थापित केल्यामुळेच त्यांची गरिबांच्या बाजूने आणि प्रस्थापितांच्या विरुद्ध लढणारी प्रतिमा जनमानसात रुळली होती. सोनिया गांधी किंवा राहुल गांधीला जुन्याशी मोडते घेता आले नाही. सोनिया गांधींच्या कार्यकाळात काँग्रेसमध्ये इंदिरा व राजीव गांधींचे समकालीन असलेल्यांचीच चलती होती. या सर्वांनी मिळून राहुलला अलगदपणे काँग्रेसमध्ये प्रस्थापित केलं, निदान जनसामान्यांच्या लेखी तरी अशीच प्रतिमा तयार झाली. साहजिकच, लोकदरबारी राहुल गांधी हा प्रस्थापितांचा नेता झाला. स्वत: राहुलनं आपली प्रतिमा प्रस्थापित विरोधी बनवण्याचा कितीही प्रयत्न केला असला तरी पक्षातील प्रस्थापितांच्या गोतावळ्यापुढे तो अगदीच फिका पडला आहे. ज्यांना काँग्रेसचा ऱ्हास  थांबावा असे वाटते त्यांनी या मुद्द्यांवर गांभीर्यानं विचारविनिमय करणं गरजेचं आहे. मात्र, जोवर काँग्रेसअंतर्गत काँग्रेसच्या सार्वत्रिक ऱ्हासाचं सखोल विश्लेषण करण्याची तयारी नसेल, तोवर काँग्रेसचे शुभेच्छुक असलेल्यांनी केलेल्या विचारविनिमयाला अर्थ नसेल.

अनेक राज्यांमध्ये काँग्रेसची अवस्था ना घर का, ना घाट का अशी झालीय? १९६७ पासून काँग्रेस पक्षाचा सातत्यानं ऱ्हास होतोय, जी प्रक्रिया थांबवणं कुणाही नेत्याला शक्य झालेलं नाही. काँग्रेसची देशाला आवश्यकता आहे की नाही, किंवा काँग्रेस संपायला हवी की नाही हे वादाचे मुद्दे असू शकतात. मात्र, काँग्रेसच्या ऱ्हासातील सातत्य कुणी नाकारू शकत नाही. ज्यांना काँग्रेस संपावी असं वाटतं, त्यांनी फार काही करायची गरज नाही, कारण काँग्रेसचा प्रवास त्याच दिशेनं सुरू झालाय. ज्यांना काँग्रेस संपू नये असं वाटतं त्यांनी मात्र काँग्रेस राज्या-राज्यांत पुन्हा कशी रुजेल याची सविस्तर चर्चा आणि विस्तारीत कृती करण्याची आवश्यकता आहे. याबाबतीत काही ठळक मुद्द्यांकडे लक्ष देणं गरजेचं आहे. काँग्रेसमध्ये दिवसेंदिवस पक्षनिष्ठा दुर्मिळ होत चाललीय. आमदारांना भाजप आमिष दाखवत आहे, असे म्हणून उपयोगाचे नाही. काँग्रेसनं आपले कार्यकर्ते आणि नेते विचारसरणीच्या दृष्टीनं घडवलेलेच नाहीत. आज काँग्रेसची स्थिती  निर्नायकी आहे. त्याला नायकच नाहीये. अशीच स्थिती राहिली तर उद्या काँग्रेसची स्थिती कम्युनिस्ट किंवा शेकापसारखी होईल. काँग्रेसची इतकी केविलवाणी अवस्था यापूर्वी कधीच झाली नव्हती. काँग्रेसमध्ये पक्षावर नितांत प्रेम करणारे आणि आणि तळमळीनं काम करणारे असंख्य कार्यकर्ते, नेते आहेत. याखेरीज करोडो तरुण आपल्याला दिशा दाखवणाऱ्या नेतृत्वाच्या, नायकाच्या प्रतीक्षेत आहेत देशासमोरचे प्रश्न गुंतागुंतीचे आहेत. ते सोडवण्यासाठी व्यक्तिस्तोम न माजवणारा नेता त्याच्याबरोबर निरपेक्षपणे काम करणारे अगणित कार्यकर्ते असलेला पक्ष लोकांना हवाय. काँग्रेसच्या मूलभूत विचारांना आधुनिक काळातील विचारांची जोड देऊन आणि केवळ नकारात्मक राजकारण न करता, सतत दिवसरात्र मोदी-शहांना शिव्या देत न बसता, काँग्रेसनं पुढचं पाऊल टाकलं पाहिजे. देशातील सर्वात जुना पक्ष सर्वात 'जुनाट' पक्ष बनता कामा नये. या देशाला काँग्रेस विचारांची गरज आहे. पण सत्तेच्या आधाराविना जनतेसाठी काम करण्याची सवय काँग्रेसनं लावून घेतली, तरच त्याला भवितव्य आहे. जनाधार संपलेल्या आणि शरपंजरी अवस्थेतील काँग्रेसमध्ये संजीवनी आणायची असेल, गतवैभव प्राप्त करायचं असेल तर एखाद्या नव्या दमाच्या, जोमाच्या आणि जनाधार असलेल्या तरुणाकडं नेतृत्व द्यायला हवंय पण तसं होताना दिसत नाही. पक्षाच्या सार्वत्रिक ऱ्हासाचं सखोल विश्लेषण करून त्यावर उपाय योजना केली तरच पक्षाचं अस्तित्व राहील. अन्यथा शरपंजरी अवस्थेतच राहायला लागेल! देशात सर्वत्र पीछेहाट होत असताना, काँग्रेसी नेत्यांचं, नेहरू-गांधीजींची कार्यकर्तृत्वाची टवाळी केली जात असताना मात्र त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून येत नाही. नेहरूंनी रचलेला आधुनिक भारताचा पाया, इंदिरा गांधींनी, राजीव गांधींनी आपल्या ध्येयधोरणांनी, निर्णयांनी देशाला दिलेला आकार या नव्यापिढीपुढे आणला जात नाही. त्यांच्याविरुद्ध केल्या जाणाऱ्या गोबेल्सनीतीला नवी पिढी बळी पडत असताना त्याबाबत मौन पाळलं जातंय. काँग्रेसजनांमध्ये हतोत्साह आहे. त्या नेत्यांचं स्मरण, जागरण होतच नाही. किंबहुना त्यांचं विस्मरणच केलं गेलं. त्या दिव्यत्वाची प्रचिती नव्यापिढीपुढे ठेवण्याची गरज असताना मात्र काँग्रेसी नेतृत्व भलत्याच गोष्टीत रममाण झालेलं दिसतंय. मूल्याधिष्ठित राजकारणाची कास धरण्याऐवजी खोट्या, फसव्या आणि तत्वहीन राजकारणातच गडबडा लोळताना दिसतेय. आपल्याकडं असलेल्या खणखणीत नाण्यासारख्या नेतृत्वाकडे डोळेझाक करीत इतरेजनांसारखे बागडताहेत याचं शल्य जुन्या जाणत्या काँग्रेसी मंडळींना वाटतं आहे. पण त्यांच्या मौलिक सल्ल्याकडं दुर्लक्ष केलं जातंय. पंडित नेहरू आणि इंदिरा गांधी, राजीव गांधी यांचा उज्ज्वल कार्यकाळ लोकांसमोर आणण्याची कधी नव्हे इतकी आज गरज निर्माण झालीय! सत्तेच्या, मतांच्या आणि संख्येच्या राजकारणात काँग्रेस पक्ष हा कमकुवत बनलाय हे जरी खरं असलं तरी जनतेच्या मनांत अजूनही एक हळवा कोपरा त्यांच्यासाठी शिल्लक आहे. त्याला पक्ष साद घालताना दिसत नाही. नेहरू-गांधी यांचं राजकारण कसं प्रभावशाली होतं हे त्यांना सांगताच येत नाही. पक्षाला स्वकर्तृत्वाची ओळखच राहिलेली नाही. त्यामुळं त्यांचं वैभवशाली कार्य झाकोळलं गेलंय, त्यात भाजपेयींनी त्यांची बदनामी विद्वेषाच्या माध्यमातून चालविलीय. ती रोखण्याची इच्छाशक्ती दिसत नाही. रणांगणात उतरलेल्या अर्जुनाची जशी अवस्था झाली होती तशी काँग्रेसची झालीय. 'काँग्रेसी इतिहासाची भगवद्गीता' सांगणारा श्रीकृष्ण येण्याची वाट तर ते पाहात नाही ना? अशी स्थिती त्यांची झालीय!
हरीश केंची
९४२२३१०६०९

No comments:

Post a Comment

मोदींचं ठाकरे प्रेम.....?

"गोध्रा हत्याकांड, दंगलीनंतर मोदींची गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावरून उचलबांगडी करायचं वाजपेयी अडवाणी यांनी ठरवलं होतं. पण शिव...