Friday 15 June 2018

राष्ट्रवाद, राजधर्म आणि प्रणवदा!

 राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रवाद, लोकशाही आणि राजधर्म या संदर्भात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या व्यासपीठावरून जे विचार मांडले आहेत, ते आगामी काळात देशाच्या राजकारणाला आणि राज्यकारणाला मार्गदर्शक करणारं ठरलंय. राष्ट्रवाद आणि देशभक्ती हे केंद्रबिंदू ठेऊन जे काही सांगितलं त्यामागे प्रत्येकासाठी काही ना काही संदेश दिला गेलाय. संघाच्या बौध्दिकांत नेहमी वापरले जाणारे राष्ट्रवाद, राष्ट्रधर्म, राजधर्म, राष्ट्रीयत्व या शब्दांचा चपखलपणे वापर करीत संघाला सुनावलं. संघ स्वयंसेवकांना आणि त्यांच्या समर्थकांना जसं त्यात आपल्या विचारधारेशी संलग्नता दिसून आली तसंच काँग्रेसीजनांना आपली धूसर झालेली वैचारिक बैठक पुन्हा स्पष्टपणे दिसू लागली. काँग्रेसनं आगामी वाटचाल कशी करावी याचंही त्यांना दिशादर्शनही झालं!"
-------------------------------------------------
 *काँ* ग्रेसचे भूतपूर्व नेते आणि माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं आमंत्रण स्वीकारून संघाच्या नागपूर मुख्यालयात संघ स्वयंसेवकांना संबोधित करण्यासाठी राजी झाले तेव्हापासूनच काँग्रेसच्या अंतर्गत वर्तुळात आणि बाहेरही खळबळ उडाली होती. प्रणवदांच्या या निर्णयानं प्रारंभी काँग्रेसीजन अवाक झाले. त्यानंतर त्यांनी त्यांच्या निर्णयावर टीका करायला सुरुवात केली. काही नेत्यांनी तर प्रणवदांना संघाचं आमंत्रण नाकारून नागपूरच्या मेळाव्याला जाऊ नये अशी विनंती केली. त्यानंतर काँग्रेसचे वरिष्ठ नेते पी.चिदंबरम यांनी जाहीरपणे म्हटलं की, प्रणवदा यांनी संघाच्या मेळाव्यासाठी नागपूरला जावं आणि तिथं जाऊन संघाची विचारधारा ही कशी संकुचित आणि घटनाविरोधी आहे हे ठणकावून सांगावं!

*प्रवणदांच्या निर्णयानं काँग्रेसी अस्वस्थ*
संघाच्या नागपूरच्या मेळाव्यात प्रणवदा यांनी जावं की न जावं याबाबत काहीही अधिकृतपणे काँग्रेसपक्षानं सांगितलेलं नव्हतं. पण प्रणवदांच्या 'त्या' निर्णयानं काँग्रेसमध्ये अस्वस्थता पसरली होती. ज्या विचारधारेच्या विरोधात काँग्रेसपक्ष आज मोठ्या स्तरावर आजवर संघर्ष करतोय त्याच विचारधारेच्या व्यासपीठावर प्रणवदांनी जाणं म्हणजे त्या विचारधारेला मान्यता देण्यासारखं होईल, अशी भीती त्यांना वाटत होतं. दुसरीकडं संघाच्या कार्यक्रमाला प्रणवदा कधी जाताहेत त्याच्या वेळेबाबतही लोकांमध्ये शंका होती. भाजप 'काँग्रेसमुक्त भारत' अशा घोषणाबाजी करतोय त्याच अनुषंगाने वारंवार हल्ले चढवतोय; अशावेळी त्यांच्याशी संवाद कसा होऊ शकतो असं अनेक काँग्रेसीजनांचं म्हणणं होतं.

*राज्यघटना हाच सर्वश्रेष्ठ धर्म*
संघाच्या व्यासपीठावर जाऊन संघ स्वयंसेवकांना संबोधित करताना प्रणव मुखर्जींनी ज्या विषयांवर आपले स्वतःचे विचार व्यक्त केले ते ऐकून त्यांच्या संघाच्या मेळाव्याला उपस्थित राहण्याबाबत नाराजी व्यक्त करणाऱ्यांचे तोंडं बंद झाली. प्रणवदांनी आपल्या भाषणात एकीकडे राष्ट्रवाद आणि धर्मनिरपेक्षता याची आवश्यकता प्रतिपादन केली तर दुसरीकडे देशभक्ती आणि उदारमतवादी लोकशाही यावरही आपली मतं मांडली. त्यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केलं की, आपण इथं राष्ट्र, राष्ट्रवाद आणि देशभक्ती म्हणजे काय हे समजावून सांगण्यासाठी आलो आहोत असं त्यांनी सुरुवातीलाच स्पष्ट केलं. माजी राष्ट्रपतींनी संघाच्या व्यासपीठावरून केलेल्या  आपल्या भाषणात लोकमान्य टिळक, रवींद्रनाथ टागोर, महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरु याशिवाय इतर विद्वानांचा, त्याच्या वैचारिक अधिष्ठतेचा उल्लेख करीत राष्ट्रवाद आणि राष्ट्र यावर आपले प्रखर विचार मांडले. राष्ट्रवादाच्या नावाखाली राज्यघटनेची अवगणना कधीही मान्य होणारी नाही. तिचा सन्मान राखलाच गेला पाहिजे, असं ठणकावून सांगितलं. सुदृढ लोकशाहीसाठी धर्मापेक्षा अधिक महत्व राज्यघटनेला द्यायला हवं अस प्रतिपादन केलं. राज्यघटनेनं नमूद केलेला धर्म हाच आपला राष्ट्रधर्म आहे, इतर कोणताही नाही, आसनी तो असू शकत नाही, असंही त्यांनी बजावलं!

*नेहरूंच्या वैचारिक भूमिकेचा पाठपुरावा*
आपल्या भाषणात प्रणव मुखर्जी म्हणाले की, कोणताही विशिष्ट 'धर्म' ही काही भारताची ओळख असू शकत नाही. राज्यघटनेवर निष्ठा हाच खरा धर्म आणि हाच खरा राष्ट्रवाद असू शकतो. हीच देशाची ओळख असू शकते आणि देशाची प्रगती हीच देशभक्तीची श्रद्धा आपल्या सर्वांची असायला हवीय, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. माजी राष्ट्रपतींनी भारताची पुरातन 'वसूधैव कुटुंबकम' ह्या संकल्पनेची महिमा यावेळी कथन केली. गेल्या काही दिवसांत भारतात निर्माण झालेल्या असहिष्णुतेच्या वातावरणाचा उल्लेख करून ते म्हणाले, भारताचा आत्मा हा सहिष्णुतेत आहे. त्यात वेगवेगळ्या भाषा, रंग आणि ओळख आहे. हिंदू, मुस्लिम, शीख आणि ख्रिस्ती हे सारे मिळूनच देश घडला आहे. यावेळी त्यांनी इशारा दिला की, धर्म, मतभेद आणि असहिष्णूच्या माध्यमातून देशाची होणारी जगभर ओळख देशाची शक्ती कमकुवत करणारी आहे. देश तोडणारी आहे. आपल्या भाषणात त्यांनी नेहरूंच्या विचारधारेशी जोडून एक मोठी खेळी त्यांनी खेळलीय आणि नेहरूंबाबत सतत टीका, आलोचना करणाऱ्यांना परस्पर उत्तर देऊन टाकले.

*भारतीय विचारांचा पाठपुरावा केला*
नागपूरच्या संघाच्या व्यासपीठावरून मुखर्जी यांनी जे काही सांगितलं ते त्यांच्या 'मनकी बात' म्हणायला हवं. राष्ट्रवाद आणि देशभक्ती हे केंद्रीभूत ठेऊन केलेलं भाषण हे प्रत्येकासाठी काहीतरी संदेश देणारं होतं. याच कारणानं संघ समर्थक, भाजपेयीं आणि काँग्रेसचे नेते हे माजी राष्ट्रपतींच्या भाषणाचं आपापल्या परिनं सोयीचा अर्थ काढताहेत. काँग्रेसचे नेते त्यांच्या भाषणांत काँग्रेसची विचारधारा, वैचारिक बैठक, आयडॉलॉजी शोधताहेत. तर संघ समर्थक, भाजपेयी यांना तर संघाची हीच विचारधारा असल्याचं जाणवतेय. भारतीय उपखंडातली भूमिकाच प्रणवदांनी आपल्या भाषणातून मांडली, तेव्हा त्यांचं भाषण ऐकून त्यांना 'भारतरत्न' दिलं जावं अशी काहींनी वाटतंय.

*त्या 'राजधर्म पाळण्याची' आठवण झाली*
महात्मा गांधी आणि पंडित नेहरु यांच्याबाबत संघाचा वैचारिक दृष्टिकोन हा नेहमीच नकारात्मक राहिलेला आहे. केंद्रातलं मोदी सरकार उठताबसता महात्मा गांधींचं नाव घेत असलं तरी अनेकदा असं म्हटलं गेलंय की, नेहरूंच्या ऐवजी सरदार पटेल प्रधानमंत्री झाले असते तर देशाचं चित्र काही वेगळं असतं. संघाच्या व्यासपीठावरून त्यांनी असाही संदेश दिलाय की, गांधी आणि नेहरूंच्या विचारांची कधी अवगणना करता येणार नाही. त्यांच्या विचारांची अवहेलना करता येणार नाही! यावेळी त्यांनी अनेक देशभक्तांच्या नावाचा उल्लेख करून कोणत्याही शासकासाठी 'राजधर्म' किती महत्वाचा आहे हे त्यांनी स्पष्ट केलं. 'राजधर्म' शब्दाचा जेव्हा जेव्हा उल्लेख होत होता तेव्हा तेव्हा गुजरातच्या दंगलीनंतर तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी तेव्हाचे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना राजधर्म पाळायला हवंय; असं जे म्हटलं होतं त्याची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. त्यावेळी वाजपेयींनी 'राजधर्म' पाळण्याची समज मोदींना दिली होती तर, आता प्रणवदांनी देखील हेच अपील संघाच्या समर्थकांना, भाजपेयींना, सत्ताधाऱ्यांना केलं.

*संघाची विचारधारा बदलणे अशक्य*
प्रवणदांच्या भाषणाचा एकूण सूर पाहिला तर असं जाणवतंय की, ते पंतप्रधान नरेंद्र मोदींना अप्रत्यक्षरित्या राजधर्माची आठवण करून देताहेत. त्याचबरोबरच काँग्रेसीजनांना इशारा देताहेत की, संघाच्या विचारधारेत बदल करणं कठीणच नाही तर अशक्य आहे. संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेगडे यांच्या जन्मस्थळाला भेट देऊन तिथल्या व्हिजिटर बुक मध्ये लिहिलं की, भारताच्या महान पुत्राला सन्मान देण्यासाठी, श्रद्धांजली वाहण्यासाठी इथं आल्याचं स्पष्ट केलं आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत आपले काय विचार आहेत, मत काय आहे, हे ही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

*प्रणवदांचं संघाबाबतचं मतप्रदर्शन*
प्रारंभी व्यक्त केलेल्या हेडगेवार यांच्याबद्धलच्या भावना, आणि त्यानंतर मेळाव्यात केलेल्या जाहीर भाषणाद्वारे काँग्रेसीजनांना संदेश दिलाय की, संघाला कमी लेखून चालणार नाही. भूतकाळात संघावर टीका करणारे प्रणवदा यांना आज आपण काँग्रेसमध्ये असल्यानं नाईलाजानं हे मत व्यक्त करावं लागलंय. असंही असू शकेल की, आताचं त्यांचं संघाबाबतचं मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या कामकाजाची पद्धत जवळून पाहिल्यानंतर बनलेलं असू शकत. असंही वाटतं की, प्रणवदांचं हे भाषण प्रधानमंत्री मनकी बात म्हणून अनुसरतात की काय! २०१५ मध्ये असहिष्णुताचं वातावरण देशात भडकलं होतं, देशातील अनेक मान्यवरांनी आपापले सन्मान परत केले होते. दादरीत अखलाकची हत्या झाल्यानंतर असहिष्णुता विरुद्धचं आंदोलनानं वेग पकडलं होतं, त्यावेळी प्रधानमंत्र्यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी व्यक्त केलेल्या भावनांना टाळून आपले असहिष्णुता बद्धलचे विचार मांडले होते.

*प्रणवदांच्या विचारावर वाटचालीचं मोदींचं आवाहन*
देशभरात त्यावेळी असहिष्णुवरून विरोधकांचा आक्रोश सुरू होता. त्यावेळीही प्रधानमंत्र्यांनी त्याबाबत मौन पाळलं होतं. त्याच दरम्यान बिहार विधानसभेच्या निवडणुका होत्या, त्याच्या प्रचारसभेत मोदी भाजपची बाजू आग्रहानं मांडत आणि विरोधकांवर घणाघाणी टीका करीत. मात्र असहिष्णुता आणि आखलाकची हत्या याबाबत चकार शब्द काढत नसत. याच वेळी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात म्हटलं की, आपण आपले आदर्श आणि जीवनमूल्य गमावता कामा नये. देशातील विविधतेचा सन्मान राखायला हवाय. सहनशीलता आणि अखंडता यावर जोर देतानाच त्यांनी असहिष्णुता दूर करण्यासाठी आग्रह धरला. लगेचच प्रधानमंत्री मोदी यांनी त्यांच्या भाषणाची री ओढत म्हटलं की, लोकांनी एकवेळ नरेंद्र मोदींचं ऐकलं नाही तरी चालेल, पण राष्ट्रपतींनी जो विचार मांडलाय त्यावर वाटचाल करायला हवीय, त्यांचे विचार हे देशाप्रती मोलाचे आहेत!

*...तर काँग्रेसला सूर सापडेल*
हा संदर्भ अशासाठी दिलाय की, मोदींनी त्यावेळी राष्ट्रपतींच्या भाषणाचं कौतुक केलं होतं आणि त्यावर वाटचाल करण्याचा सल्लाही दिला होता. आता मोदी काय भूमिका घेतात! संघाच्या व्यासपीठावरून प्रणवदांनी जे काही विचार मांडलेत ते आपल्याच 'मनकी बात' समजून भाजपेयी आणि मोदी अनुसरणार आहेत का हा खरा सवाल आहे! गेले काही दिवस काँग्रेसपक्ष आपलं अस्तित्व टिकविण्यासाठी धडपडतोय. त्यासाठी त्यांनी आपली विचारधारा देखील धूसर करून टाकलीय. ही धूसर झालेली विचारधारा  प्रणवदांच्या अ भाषणानंतर स्पष्ट झालीय. हीच खरी काँग्रेसची विचारधारा आहे याचा मागोवा घेत काँग्रेसनं वाटचाल केली तर आगामी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत आपला हरवलेला सूर पुन्हा लाभू शकेल!

-हरीश केंची,
९४२२३१०६०९

No comments:

Post a Comment

मोदींचं ठाकरे प्रेम.....?

"गोध्रा हत्याकांड, दंगलीनंतर मोदींची गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावरून उचलबांगडी करायचं वाजपेयी अडवाणी यांनी ठरवलं होतं. पण शिव...